लॉकडाऊन: चाळीसावा दिवस
लॉकडाऊन चे दिवस
कोरोनाच्या जागतीक संकटामुळे जे अविश्वसनीय वातावरण तयार झालं ते प्रत्यक्षात पाहिलं नसतं तर कुणी सांगुनही विश्वास बसला नसता. जगातील अनेक देश कुलुपबंद झालेत. जगात विमानं उडायला लागली तेव्हापासून आकाशात विमान नाही असे कधी घडले नव्हते की सुरूवात झाली तेव्हापासून देशात रेल्वे आणि महाराष्ट्रात एसटी धावली नाही असे घडले नव्हते. आता मात्र या कुलुपबंद ( लॉकडाऊन) मुळे अश्या अनेक फ़ॅण्टसी सारख्या गोष्टी घडताना दिसत आहेत. यासोबतच हा घडामोडींकडे अनेक लोक अनेक वेगवेगळ्या विचाराने बघत आहेत. त्यांच्या या लॉकडाऊनकडे बघण्याचा विचार जाणून घ्यावा. तसेच या लॉकडाउन ने लोकांना त्यांच्या धकाधकिच्या जीवनात बळजबरीने का होईना पण थोडं थांबून आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला लावलाय. जी मुंबई आणि मुंबईची लाईफ़लाईन म्हणजे मुंबई लोकल कधी थांबूच शकत नाही असे म्हटले जायचे ती मुंबई आणि लोकल थांबून आता चाळीस दिवस होतील. विदर्भातील मागास जिल्हे हे एवढ्या तातडीने चीनहून आलेल्या व्हायरसच्या प्रभावाखाली येतील असे वाटले नव्हते मात्र असे दिसतेय की जगातील लोकांचा एकमेकांशी जरा जास्तच घनिष्ठ संबंध असावा.
गेले 39 दिवस आपण लॉकडाऊन ही लेखमाला चालवतोय. यात अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. जे नियमीत लिहीत आहेत ते तर लिहीते होतेच पण जे लोक लिहीत नव्हते ते सुध्दा परत एकदा सक्रिय होऊन लिहायला लागले आहेत. लिहीते आणि परत लिहीते झालेले आणि नव्याने लिहू लागलेल्या सर्वांचे मिपाकडून आभार मानतो. कारण आजच्या कठीण काळात मिपासारख्या संकेतस्थळावर वाचायला मिळणे फार आवश्यक होते. लिहीणे आणि वाचणे म्हणजे आपल्यासोबत अन्य लोकांसोबत आपले आयुष्य सामायीक करणे होय.
अश्या वेळी जेव्हा आपल्याल्या प्रत्यक्ष भौतीक आयुष्यात सामाजीक अंतर पाळणे आवश्यक आहे तेव्हा आपण ऑनलाईन जगात मात्र एकमेकांच्या अधिकच जवळ येतो. एकमेकांच्या नजरेने जग बघायला शिकतो. आपण करतो तोच विचार शेवटचा नाही आणि आपण बघतो तोच एकमेव दृष्टीकोण नाही हे आपल्या लक्षात यायला लागते. हे सगळं समजण्यासाठी आपण कुठेतरी एकत्रीत यायला हवं. प्रत्यक्षात एकत्रीत येणे सध्या लॉकडाऊन मुळे म्हणा किंवा प्रत्यक्षात आपण जगात कुठे आहोत त्यावर अबलंबुन असु शकते मात्र इंटरनेटमुळे हे शक्य झाले आहे. गेले 39 दिवस आपण सतत मिपावर कुणीतरी आपल्या लॉकडाऊनच्या काळातील केलेले उपक्रम शेअर करतंय. कुणी गच्चीवर बाग लावतंय, कुणी सलग वेबसीरीज बघतंय, कुणी लोकप्रतिनिधी समाजकार्य करतंय, कुणी वाचतोय, कुणी लिहीतोय, कुणी कविता करतोय. अश्या एक नाही तर अनेक त-हांनी लोक व्यक्त होत आहेत. ह्या सर्वांचा उत्साह बघून मिपा सुध्दा भरभरून वाहतंय.
माझ्या व्यक्तीगत आयुष्यात लॉकडाऊन अनेक पातळीवर मध्ये येत गेला. मूळात कामाच्या स्वरूपामुळे लॉकडाऊन किंवा सुरक्षीतपणे घरात राहणे शक्य नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्याशी संपर्कात येणे होत आहे. अश्या वेळी आपल्याला अनेक गोष्टी जाणवतात. सुरूवातीच्या काळात लोकांना असा काही व्हायरस असतो हे समजण्यास अडचण गेली. त्यामुळे सुरूवातीचा काळ असं काही असतं का कुठे? पासून ते आपल्याला काही होत नाही अश्या स्वरूपात गेला. हळूहळू जेव्हा पेपरमध्ये लोक आजारी पडण्याची बातमी येत गेली आणि लोक मरायला लागले तेव्हा लोकांनी हा आजार गांभीर्याने घेणे सुरू केले. मात्र तरीही घरात बसण्याची सवय नाही असे लोक कसे घरात राहतील? सरकारने जून्या मालीका सुरू केल्यामुळे अनेक लोकांना घरात बसून काहीतरी करण्याचा कार्यक्रम मिळाला.
वेगवेगळ्या राज्यातील प्रवासी लोक अडकून पडलेत. कुणाला तरी मध्ये रस्त्यात थांबवून 15 दिवस विलगीकरणात ठेवलेले दिसले. यापुर्वी असं वाटायचं की लोकांना दोनवेळ जेवण, चहा नास्ता करायला दिलं की काय मजाच मजा. मात्र प्रत्यक्षात लोकांना काहीतरी करायला आणि स्वत:ला काहीतरी कामात गुंतवून घेणे आवश्यक वाटते असे दिसून आले. दोन वेळ जेवा आणि आराम करा ही मजा आहे पासून ही सजा आहे हे अंतर केवळ एका आठवड्यात पार पडलं. त्या लोकांशी बोलताना हे जाणवत होतं की लोक कामाच्या निमीत्ताने घराच्या दूर राहू शकतात. कामावर गेल्यामुळे शरीर मन एका थकवणा-या प्रक्रियेत (प्रोसेस)मध्ये गुंतलेले असतात. या लॉकडाऊनमुळे एका जागेवर थांबलेल्या लोकांना घरची आठवण फारच प्रकर्षाने येत असलेली जाणवली. आता सुध्दा काल परवा पासून ज्या स्पेशल ट्रेन सुरू झाल्या आणि त्यामध्ये घरी जाण्यासाठी जी गर्दी झाली त्यावरून तर घर, आपले लोक यांचा किती मोठा मानसीक आधार आपल्याला असतो हे दिसून येते. हे लोक आपल्या घरापासून, नातेवाईकांपासून हजार – दिड हजार किलोमिटर दूर असतात. मेहनत करतात आणि घरी पैसे पाठवतात. मात्र आपण कुठेतरी स्थानबद्द आहोत किंवा आपल्या घरीच आहोत पण एवढ्यात कामाची किंवा कमाईची काही शक्यता नाही हे समजल्यावर त्यांना घराची ओढ खुप तीव्र झालेली लक्षात येते. खरं तर तेथे जाऊन काय करणार हे सुध्दा त्यांना ठाऊक नाही. कारण घरी-गावी खाण्यापिण्याची व्यवस्था असती तर यातील कुणीही घर सोडून आले नसते. सध्या मात्र बदलत्या परिस्थितीमुळे लोकांचे जगण्याचे प्राधान्यक्रम सुध्दा बदललेले दिसून येत आहेत.
पुर्वी ठरल्याप्रमाणे हा लॉकडाऊन आज म्हणजे 3 मे रोजी संपणार होता. आपली ही लेखमालासुध्दा आज म्हणजे 3 तारखेला थांबणार होती. आपला राष्ट्रीय कुलुपबंद कालावधी पुढ़े गेलाय. मात्र ही लेखमाला येथे थांबवतोय. हा संवाद मात्र असाच सुरू राहील हे नक्की.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखमाला चांगली झाली..धन्यवाद
वा !
लॉकडाऊन लेखमालेच्या समारोपा
रामराम मालक!
हेच बोलतो!!
लवकरच
हुर्रेर्रेर्रे....
लेखमाला
उत्तम समारोप.
समाधान
खरंय, बरेच वर्ष मिपा सदस्य
धन्यवाद
लाॅकडाऊन मालिकेचा समारोप
ह्या साथीच्या निमित्ताने जगण्याची क्षणभंगुरता
छान लेखमाला
सध्या मात्र बदलत्या
नीलकांत, उत्तम लेख.. अजून
लेखमालेचा योग्य समारोप.
व्वा!
वा
उत्तम समारोप!