लॉकडाऊन: एकोणीसावा दिवस

कंजूस काथ्याकूट
"कळावे, लोभ असावा, पण इकडे येऊन पायधूळ झाडण्याचे कष्ट घेण्याचे टाळावेत ही विनंती". असा पत्राचा मायना सुरुवातीचा घेण्याचे दिवस आले आहेत. भीती कोपऱ्याकोपऱ्यावर उभी आहे. भूताखेतांपेक्षाही भयंकर. सर्वांचा माज उतरला आहे. श्रद्धावंत आणि अश्रद्ध, गरीब आणि श्रीमंत, अलिकडचे आणि पलिकडचे सर्वांचा. धीर देणारे, उपदेश देणारे निष्प्रभ. वारा पडल्यावर उंच गेलेला पतंग खाली येतो ती स्थिती. अमचा एक सहकारी एक हिंदी कहावत सांगायचा. 'आशा' ही जीवन है, लेकिन आशा की माँ हमेशा खटिया पे बिमार सोई रहती है। तर ही उठणार कधी? विज्ञान की गाडी का पहियाँ पंचर। जल्दही ठीक होना जरुरी है। तर काय सांगत होतो की हे ही दिवस जातील आणि हिंडू फिरू केव्हा लागू इकडे लक्ष ठेवून पुस्तकं वाचणे, टीवी पाहाणे, मुलांचे खेळ घेणे यामध्ये सर्व जण एकेक दिवस पुढे ढकलताना दिसत आहेत. मला घरात बसण्याची सवय लागून बरीच वर्षं झाली. सकाळी/संध्याकाळी फेऱ्या मारण्याचं केव्हाच सोडलं आहे. आता आजुबाजूचा भाग खूप शहरी झाला आहे आणि खूप दूर गेलं तरीही बदल होत नाही. त्याच त्याच प्रकारच्या इमारती, दुकानं बघायला कंटाळा येतो. तीस वर्षांपूर्वी गावासारखा मोकळा ढाकळा भाग, घरं दोन किमि गेल्यावर दिसत. तसं नाही. तिथे उलट तीसमजली इमारती आहेत. त्यामुळे बाल्कनीची पिटुकली बाग हीच हिरवाई. आता भटकंतीला गेल्यावर डोंगरात जी काही होईल तेवढीच उरली. एरवी पुस्तकं/ मासिकं वाचतो. ओनलाईन पेपर्स इ -पेपर्समुळे घरातली रद्दी उगाचच वाढत नाही. पुराणं डाउनलोड केली आहेत. ती वाचायला बराच वेळ जातो. जियो-टिवी वर भरपूर चानेल्स आहेत. घरच्या डिटिएचवरही कार्यक्रम डाउनलोड करून हवे तेव्हा बघतो. मला हवी असलेली बरीच इंग्रजी मासिकं ( इंडिया टूडे, डिस्कवर इंडिया, लोनली प्लानिट, वगैरे) जिओ-न्यूज app वरून डाउनलोड करता येतात. ती वाचतो. हल्ली पावसाळा आणि थंडीतली डोंगर भटकंती न करता मे महिन्यातली सुरू करून पाच वर्षं झाली. ते या वर्षी बुडीतमध्ये जमा आहे. कुटुंबाबरोबर फेब्रुवारी आणि सप्टेंबर या महिन्यांत दुसऱ्या राज्यांत सहली होतात. पण या वेळी का कुणास ठावूक 'आता यापुढे हातपाय धड नसले तर फिरता येणार नाही' या विचाराने दिवाळी २०१९ ते मार्च २०२० तीन सहली पटापट केल्या. शेवटची सहल आटपून घरी आलो आणि सात दिवसांत सर्व वाहनं ठप्प झाली. योगायोग म्हणा. आता जमावबंदी/संचारबंदी आहे. पण जरा एक तास फेरी मारून कुठे काय परिस्थिती आहे पाहून येतो. काही भागांत इमारतींत रुग्ण सापडल्याने रहिवाशांचा वावर अडकवला आहे. सकाळी नऊला भाजीवाला, दूध येते. कचऱ्याची गाडी येते. मग सर्व बंद. पण इतर ठिकाणी लोक बाजारहाट करत फिरत आहेत. कठीण प्रसंगी लोकांनी समजून उमजून मदत करण्यातच शहाणपणा आहे. हॉस्पिटल, बँक, आरोग्यखाते कर्मचारी तसेच दूध आणि भाजी आणणारे सतत काम करून इतरांची सुखसोय पाहात आहेत. त्यांना चांगली प्रतिकार शक्ती मिळो हीच इच्छा व्यक्त करूया

25 टिप्पण्या 14,918 दृश्ये

Comments

प्रचेतस नवीन

छान लिहिलंत काका. आमच्याइथे सुदैवाने अजून परिस्थिती बिकट नाही, घराच्या अगदी जवळपासच किराणा, दूध, भाजीपाला सगळं ताजे मिळतं, ते पण विना गर्दीचं. इकडं लोक सोशल डिस्टनसिंग पाळतात. तुमची मार्चची सहल अगदी योग्य वेळेत झाली. सुखरूप घरी आलात हे महत्वाचे. मात्र आता डोंगरात न फिरल्यामुळे तुम्हाला चुकल्याचुकल्यासारखे वाटत असावे. काळजी घ्या, घरीच राहा,सुरक्षित राहा.

हेमंतकुमार नवीन

काळजी घ्या, घरीच राहा,सुरक्षित राहा. >>> +१११

वामन देशमुख नवीन

छान लिहिलंय. >>> पण जरा एक तास फेरी मारून कुठे काय परिस्थिती आहे पाहून येतो. सांभाळून हं कंजूस राव. खरंतर, अत्यावश्यक नसेल तर बाहेर पडायलाच नको. BTW, रस्त्यावर लोकांची गर्दी नसताना / गर्दी नसलेल्या रस्त्यावर / गर्दी नसलेल्या वेळी - बाहेर जाण्यात काही धोका आहे का?

प्रशांत नवीन

मस्त लिहिलंय काका

सतिश गावडे नवीन

पहीला परिच्छेद अगदी रोखठोक आहे. आता हल्ली कुणी पत्र लिहीत नाही तो भाग वेगळा. आवडलं प्रकटन. मला अजून एका गोष्टीबद्दल लिहावंसं वाटत आहे, ज्याबद्दल सहसा कुणी लिहीत नाही हल्ली. कधी नव्हे ते लोकांनी यावेळी "देवाला" अडगळीत टाकलं आहे. घरगुती पातळीवर लोक पुजा करत असणारच मात्र ते सवयीचा भाग म्हणून असावं. कुणी सार्वजनिकरीत्या देवाला साकडं वगैरे घालताना दिसत नाही. किंबहूना लॉकडाऊन करताना सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by सतिश गावडे

कुणी सार्वजनिकरीत्या देवाला साकडं वगैरे घालताना दिसत नाही. किंबहूना लॉकडाऊन करताना सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली.
कोणाचा शेर आहे माहिती नाही. ”शराब पीने दे मस्जिद में बैठ कर या वो जगह बता जहाँ पर ख़ुदा नहीं” मला वाटतं यात खूप मोठा अर्थ आहे, त्यादृष्टीने अशी जागाच नाही, तिथे परमेश्वर नाही. नामदेव महाराज विसोबा खेचरांना भेटायला गेले तेव्हा विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून होते, नामदेव महाराज म्हणाले पिंडीवरुन पाय काढून बाजूला ठेवा. विसोबा खेचर म्हणाले, माझ्यात त्राण उरलेला नाही. जिथे पिंडी नाहीत, तिथेच तुम्हीच माझे पाय उचलून ठेवा. नामदेव महाराजांना त्यांचं बोलणं स्वाभाविक वाटलं. विसोबा खेचरांचे चरण उचलून बाजूला ठेवले तर जिथे पाय ठेवले तिथे पिंडी तयार झाली अशी एक आख्यायिका सांगितल्या जाते. तात्पर्य, परमेश्वर सर्वत्र आहे. मूळात इतका मोठा चराचर सृष्टीता करता करविता त्याला एका मूर्तीत एका जाग्यावर आणून त्याची स्थापना किंवा तिथेच त्याचं अस्तित्व कसं असू शकेल, तो सर्वत्र आहेच. पण अशा सार्वजिनक ठिकाणी एक भावपूर्ण वातावरण तयार होतं, प्रसन्न वाटतं, किंवा अन्य जी काही कारणे असतील त्यामुळे अशा प्रार्थनास्थळांवर गर्दी होते. आता घरातूनच त्या परमेश्वराला सांगणे आहे की हे परमेश्वरा या करोना विषाणुचा नायनाट कर माझं जग विषाणुमुक्त करुन सर्वांना सुख समाधान आनंदी राहू दे, अशी प्रार्थना घरात बसून करणे इतकंच आपल्या हातात आहे. -दिलीप महाराज बिरुटे, औरंगाबादकर.

सतिश गावडे नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्पर्य, परमेश्वर सर्वत्र आहे.
ही धारणाही चांगली आहे. मी अभियांत्रिकीला असताना आम्हाला अभियांत्रिकी गणित नावाचा विषय होता. बनारस हिंदू विद्यापिठातून गणितात विद्यावाचस्पती झालेले एक प्राध्यापक शिकवायचे हा विषय. गणित शिकवतानाच ते तत्वज्ञान, धर्म यावरही बोलायचे. त्यांचं एक वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे, God is omnipresent, God is omnipotent, God is omniscient अर्थात देव सर्वव्यापी आहे, देव सर्वशक्तीमान आहे, देव सर्वज्ञानी आहे.
दिलीप महाराज बिरुटे, औरंगाबादकर
तुमच्या मठात एखादी व्हॅकन्सी असेल तर सांगा. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by सतिश गावडे

तुमच्या मठात एखादी व्हॅकन्सी असेल तर सांगा. ;)
आपण एकाच मठातले शिष्य आहोत. आपापल्या प्रांतात आपल्या शाखा आहेतच, आपलं कधीही स्वागत. -दिलीप बिरुटे

कंजूस नवीन

देव पाण्यात घालणे, वगैरे काही नाही. भारतातल्या काही भागातच प्रकोप झाला असता तर 'पाप वाढले' ही ओरड झाली असती. ------------- पुराणं वाचताना खालील नवीन कळले. देव ,दानव हे कश्यप ऋषींची मुले. सावत्र भावंडे. तेरा बायकांची मुले. गरूड आणि साप मावसभावंडे. विष्णूची आवडती तिथी द्वादशी, शंकराची चतुर्द्शी असणारी रात्र. भीमाशंकर हे आसाममध्ये आहे, वैद्यनाथ हे परळीचे नाही, संथाळ परगणा जसिडोह स्टेशनजवळचे.

प्रचेतस नवीन

In reply to by कंजूस

गरूड आणि साप मावसभावंडे.
आणि सावत्र भावंडेही :) विनता आणि कद्रू दोन्ही कश्यपाच्याच बायका. कद्रूला लक्षावधी पुत्र झाले ते म्हणजे सर्प तर विनतेला एकच महापराक्रमी पुत्र झाला तो म्हणजे गरुड. अदितीपासून देव, दितीपासून दैत्य, दनुपासून दानव. पुराणे काहीशी रटाळ आणि कर्मकांडानी युक्त आहेत. महाभारतातल्या आदीपर्वात हे सर्वच आहे. वाचायला मजा येते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

नमस्कार कंजुस काका, चांगलं लिहिलंय. कळावे लोभ असावा. ता.क. इकडे सर्व मजेत आहेत, तिकडेही सर्व कुशल असतीलच. लहानांना आशिर्वाद मोठ्यांना नमस्कार. बाकी, तुमच्या सहली लवकर आटोपल्या हे चांगलं झालं. खरं तर सकाळ संध्याकाळ इतरवेळी तुम्ही फिरायला पाहिजे असं वाटलं. आता लॉकडाऊनला उत्तम सपोर्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अजूनही लोक पोलिसांना कसं उल्लू बनवलं या खुशीत मार्केटात फिरुन येतात. हे वाईट आहे. औषधी, किराणा, हे अत्यावश्यक आहे. गरज सर्वच वस्तूंची असते पण त्यातही आपल्याला दोन तीन वेळा जेवणासाठी आवश्यक ते महत्वाचं वाटतं. माझ्या तालुक्याच्या गावी आता तालूके जसे लॉक केले तसे खेडेही लॉक केली आहेत, नव्या माणसांना विचारपूस केल्याशिवाय गावात येऊ देत नाही. आमच्याकडे भाजीपाला विक्रेत्यांना शासकीय दवाखान्यातून प्रमाणपत्राशिवाय भाजीपाला विकता येणार नाही अशी घोषणा पोलीस सकाळी आपल्या व्हॅन म्हणून देत आहेत. माझे एक नातेवाईक स्वत:च्या शेतात असलेला कांदे काही भाजीपाला देऊन गेले. घरात सुद्धा ते आले नाही. गेटवरुनच एक मोठी थैली देऊन गेले. खरं तर ग्रामीण भागातील लोक स्वतः शिस्त पाळत आहेत हे पाहून बरं वाटलं. बाकी, अनेक वाट्सॅप ग्रुप सोडले. त्यामुळे अधिक निवांत झालोय, असं वाटलं. वल्लीसेठशी एखादा डाव बुद्धीबळाचा खेळेन. नेटावर फूल पडीक. टीव्ही बातम्या पाहणे कमी केलेच आहे. -दिलीप बिरुटे

Nitin Palkar नवीन

छान लेखन.... नेहमी प्रमाणेच नेमके...

धर्मराजमुटके नवीन

नमस्कार काका ! पत्रास कारण की लॉकडाऊन सुरु झाल्यापासून खरंतर तुमची फार आठवण येत होती. तुमची म्हणण्यापेक्षा तुमच्या मिपावरील आयडीची येत होती म्हणणे जास्त रास्त ठरेल. लॉकडाऊन सुरु होण्याच्या अगोदरपासूनच मी खरेतर कंजुसपणा सुरु केला होता. आता तो सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. लॉकडाऊन च्या अगोदर २ दिवसापासून माझ्या जिओ प्रीपेड सिम कार्डचे रिचार्ज संपले होते. अंबानी सर मला दिवसातून ८-१० वेळा रिचार्ज करण्यासाठी संक्षीप्त सुचना पाठवत आहेत पण मी त्याकडे मराठीत काणाडोळा आणि इंग्रजीत बहिरा कान करत आहे. बेट्याने गेली दोन वर्ष ३०/३१ दिवसाच्या महिन्यातील २/३ दिवस कापून २८ दिवसांचाच रिचार्ज दिला होता. आता ते वाया गेलेले २/३ दिवस मी वसूल करुन घेणार आहे. आज डोक्यावरचे केस संपूर्णपणे काढून टाकले. दरमहिन्यात डोकी करायला १५० रुपये खर्च येतो. लॉकडाऊन मुळे एका महिन्याचे पैसे वाचले होतेच. आज घरीच टक्कल करुन येणार्‍या दोन महिन्याचे पैसे देखील वाचविले आहेत. शिवाय केस विंचरायला लागणारे रोजचे २-३ मिनिट आणि ५ मिलिग्रॅम खोबरेल तेलाचे पैसे देखील वाचणार आहेत तो आनंद वेगळाच. मागील काही दिवसांपुर्वी संत्री आणली होती त्याची साल फेकून न देता त्याची बारीक पावडर करुन स्नानाअगोदर मर्दन करुन घेतले. त्यामुळे कांती एकदम चकचकीत झाली आणि आम के आम गुठलियों के दाम ह्या उक्तीचा प्रत्यय देखील आला. माझ्या चहात साखर आणि दुध घालणे बंद केले आहे त्यामुळे गेल्या महिन्याभरात किमान एखाद लीटर दुध आणि एखाद किलो साखरेची बचत झाली आहे. तेव्हढेच एखाद लीटर दुध गायीच्या बछड्याच्या मुखी लागेल व ते पुण्य मला मिळेल ही अपेक्षा. रोज बाहेर जायचे नसल्यामुळे कपडे धुणे, इस्त्री करणे वाचते त्यामुळे साबण, वीजबीलाची बचत झाली आहे. आता माझ्याकडे पंचा नाही नाहीतर प्रतिगांधी म्हणून फोटोसेशन करण्याइतकी प्रतिमा कमावली आहे. घरकामात मदत होत असल्यामुळे भार्या देखील सध्या खुश आहे. तीचे वजन एखाद्या किलोने वाढले असावे आणि गाल वर आले आहेत असा तिचा तिलाच संशय येत आहे. तो खरा असावा असे मलादेखील वाटते. असो. पत्र फारच लांबले. आम्ही सगळे घरातच आहोत. तुम्ही देखील घरीच राहून काळजी घेणे. ता. क : लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत वाढला आहे त्यामुळे तुमच्या पोतडीत अजून काही कंजूसपणाच्या टिप्स असतील तर पत्राने कळविणे. धन्यवाद ! आपलाच धर्मराज

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by धर्मराजमुटके

दिवसातून एक वेळ, जेवणाऐवजी वायुभक्षण करतो त्यामुळे पत्नीचा भार कमी केला आहे, शिवाय वजन वाढत नाही आणि दुपारी झोप न आल्यानं रात्री गडद्द झोप लागते. यात भांडी धुण्यासाठी लागणारा सोप आणि वेळ यांची बचत अंतर्भूत आहे

कंजूस नवीन

काही कंजूसपणाच्या टिप्स असतील तर पत्राने कळविणे. ----------- नक्कीच. घरामध्ये दुसरे हँडसेट असतील( वोडाफोन/एरटेल कार्ड) पण त्यात जिओचे सिम नसेल तरी JioTv आणि JioNews apps पाहण्यासाठी - दोन्ही apps download करा. ओपन करून १) लॉगिन विद गूगल करा. किंवा २) एंटर जिओ नंबर करून ओटीपी त्या जिओ फोनमध्ये येतो तो टाका. झाले काम. आता इतर फोनातही दोन्ही apps चालतील. JioCinema नाही चालणार ओटिपीवर.

कंजूस नवीन

सकाळी साडेनऊ ते साडेदहा चार किमी रपेट झाली. दोन तीन किराणा दुकानांसमोर लागलेल्या रांगा सोडता रस्ते रिकामे आहेत. फक्त एका नाक्यावर मंडप डेकोरेटरचा बांबू भरलेला ट्रट अडवून चौकशी चालू होती. राशन भरा अशी आवई उठल्याने आणि पुढच्या आठवड्यात पाच किलो तांदूळ फुकट जाहीर झाल्याने एका रेशन दुकानासमोर साठ जण रांगेत उभे दिसले. काही ठिकाणी ( पश्चिम) भाजी विकणे बंद केले आहे तरी एक जण दिसला. त्याची भाजी गटारात टाकली गेली. आजुबाजूच्या इमारतीतले लोक मध्यस्तीसाठी गेले तरी भाजी गेलीच. आता पोलीस कडक वागत आहेत. या पंधरा दिवसांत प्रसार थोपवायचा आदेश आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्णत:बंद दिसत नाही. प्रवाशी असतील की काही अत्यंत महत्वाची वाहतूक असेल ते माहिती नाही. -दिलीप बिरुटे

सस्नेह नवीन

लॉकडाऊन चं पुराण लिहिता लिहिता एकदम 'संध्याछाया भिवविती हृदया.. ' ? ..हळवं केलंत कं काका. ईश्वर करो अन तुम्हाला आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य लाभो ! कोरोनाच्या नानाची टांग

सान्वी नवीन

आज पहिल्यांदा कुणीतरी आमच्यासारख्या बँक कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला, त्यामुळे पहिल्यांदा आपले आभार. कारण सध्या सगळेजण डॉक्टर, नर्स, पोलीस यांचे कायम कौतुक करतात ( जे अगदी बरोबर आहे) परंतु जीवनावश्यक म्हणून गणल्या गेलेल्या या बँक कर्मचाऱ्यांचे नाव कुणी फारसे घेताना दिसत नाही. ड्युटी आहे काम आहे म्हणून ते केले जाणार च आहे, परंतु अशी कुणी दखल घेतली तर या नकारात्मक परिस्थितीत जरा बरे वाटते. असो, आपला लेख उत्तम. सगळ्यांनी काळजी घ्या आणि घरी रहा.

कंजूस नवीन

@ सान्वी, खरं आहे. सर्वात अधिक धोका लोकांच्या संपर्कात येणाऱ्या या सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आहे. मी रोज रिकाम्या रस्त्यातून फेरी मारून आलो तरी लोकांपासून दूरच असतो. माझी मुलगी बँकेतच जाते. कधी क्याश काउंटरला बसते. मोजे घालून काम असते तरी धोका आहेच. @ स्नेहांकिता, संध्याछायांपेक्षाही अधिक व्यापक ही भीती आहे. सर्वांना गुरफुटून विळख्यात घेणारी. जगणाऱ्या लोकांनाच भिववणारी.

गणेशा नवीन

चांगले लिहिले आहे. ट्रिप आधी संपवल्या ते चांगले झाले.. मी धागे उलटे वाचले 34, 33, 32... 22, 21, 20, 19.. येथून पुढचे धागे lockdown 1 मधले असतील बहुतेक