लॉकडाऊन : विसावा दिवस
लॉकडाऊन आता ३० एप्रिलपर्यंत वाढलाय.
जेव्हा १६ मार्चच्या आसपास पुण्यातल्या काही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली तेव्हा त्यात आमची कंपनी नसल्याने आम्ही कंपनीला यथेच्छ शिव्या दिल्या. यथावकाश आमच्या कंपनीने पण ही परवानगी दिली ३१ मार्चपर्यंत (तेव्हा २१ दिवसाचे लॉकडाऊन जाहीर झालं नव्हतं) सुरुवातीचे काही दिवस मस्त गेले, रोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ७.३०/८ पर्यंत काम करायचं नंतर पत्ते, कॅरम, लुडो खेळायचं. घरी जेवायला पण मिसळ पाव, इडली सांबार, पुलाव वगैरे उत्तम बडदास्त होती. चार पाच दिवस झकास गेले.
काम/ उदयोगधंद्यांबद्दल थोडे :
मग हळू हळू परिस्थितीच्या वजनाची कल्पना सगळ्यांनाच आली. सुरुवातीचा उत्साहपण मावळून काळजीत रूपांतरित झाला होता. घरी काम करणाऱ्या दोन्ही बायकांना मार्चचा पगार देऊन सुट्टी दिली. ऑफिसचं काम तर जोरात होतंच. शेवटी बायको म्हणाली की ऑफिस असतं तर बरं झालं असतं ऑफिसपेक्षा जास्त काम करतोयस तू घरून. खरच मी ज्यावेळी ऑफिसला निघायचो त्यावेळी काम चालू करतो आणि ज्या वेळी घरी यायचो त्यावेळी बंद. दीड तास तर असाच वाढला. दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये अर्धा पाऊण तास चकाट्या मारायचो. आता १५,२० मिनिटात जेवण आटपलं की बॅक टू वर्क. खरच सांगतो आमच्या टीमचे काम तर जोरात चालू आहे आधीपेक्षा. रिझल्ट पण तेच म्हणतायत. पण मला एक वाटतं या लॉक डाऊन मूळे भविष्यात एक होईल की पीपल मॅनेजरची खरोखर किती गरज आहे यावर प्रश्नचिन्ह उभे राहील. आता हाकायला मेंढरच नाहीत तर मेंढपाळ करणार काय? आमच्याकडे १४-१५ मेंढरांवर १ मेंढपाळ आहे, माझ्यामते मेंढपाळांचे हे प्रमाण खूपच जास्त आहे आणि हे कमीत कमी ५० पर्यंत तरी जायला पाहिजे. असो.
चाकण MIDC मधल्या दोन मित्रांना फोन केले, दोघांचे वर्कशॉप आहेत. कामगारांना मार्चचा पूर्ण पगार देऊन सुट्टी दिली आहे, एप्रिलचं माहीत नाही. भोसरी, तळेगाव, चाकण येथल्या उत्पादन कंपन्यांना खूपच फटका बसलाय. आमच्या कंपनीचा मालक म्हणतोय कोरोना ही आपल्यासाठी इष्टापत्ती ठरेल. सगळ्या पाश्चात्य देशानी प्रोडक्शन, सप्लायसाठी चीनवर अवलंबून राहून मोठी चूक केली आहे ती त्यांना आता उमगेल आणि परत उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण होईल. याचा आपल्याला फायदाच होईल. पुढे ४/५ दिवसातच बातमी आली की जपान चीनमधले प्रोडक्शन बंद करण्यासाठी त्यांच्या कंपन्यांना पैसा पुरवणार. थोडा हुरूप आला बातमी वाचून. याचे खरच दुरोगामी परिणाम होणार आहेत, काय होईल देव जाणे.
सोसायटीबद्दल थोडे :
पेपरवाले, दुधवाले गेटवर वॉचमन केबिनजवळ पेपर, दूध ठेऊन जातात, लोक त्यांच्या सवडीने घेऊन जातात. शेजारची फॅमिली मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परदेशातून आली. हातावर शिक्के होतेच पण ते अतिशय जबाबदारपणे वागले. टेरेसमध्येसुद्धा दिसले नाहीत. सोसायटीमधल्याच एका दुकानदाराला सांगून त्यांना भाजीपाला, किराणा सोसायटी गेटपर्यंत मिळत होता. तिकडून सोसायटी सदस्य त्यांच्या दरवाज्यात आणून ठेवायचे. त्यांनी १४ दिवसाचा विलगिकरण अवधी यशस्वीपणे पूर्ण केला. यानंतर दोन दिवसातच महापालिकेला त्यांच्या परदेश प्रवासाची माहिती मिळाली, आरोग्य विभागाचे लोक आले त्यांना सांगूनसुध्दा त्यांनी ऐकले नाही आणि परत या फॅमिलीवर १४ दिवसांचा वनवास लादून गेले. तोसुद्धा आता संपला.
वरच्या मजल्यावरील एका ७४ वर्षांच्या आजोबांना पोटात दुखायला लागले अचानक. टेस्ट केल्यावर पोटात गाठ आहे समजले आणि मागच्या आठवड्यात पुण्यातील प्रथितयश सर्जनने शस्त्रक्रिया करून गाठ काढली, गाठ पहिल्या टप्प्यातील कर्करोगाचीच होती. आजोबांचा मुलगा घरीच असल्याने सर्व गोष्टी पटापट झाल्या. आजोबा घरी आलेसुद्धा. कोरोना नसता तर टेस्ट आज करू, उद्या करू झाले असते आणि रोग कदाचित बळावला असता पण सर्वजण घरी, प्रथितयश सर्जन सुद्धा ताबडतोब उपलब्ध होते. ( इतरवेळी किमान आठवडा लागला असता).
बिल्डींगचा कचरा नेणाऱ्या मावशी रोज येतात. १ एप्रिलला आधीच ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी त्यांना बोनस म्हणून काही रक्कम दिली, समाधान दिसले बाईंच्या चेहऱ्यावर.
घरातले रहाटगाडगे :
आई बाबांचा मॉर्निंग वॉक बंद आहे, घरातल्या घरात सकाळी/संध्याकाळी फिरतात. भाजी, किराणा सध्या बिग बास्केटवरून चालू आहे. पण त्याचे डिलिव्हरी स्लॉट फुल्ल असतात. रात्री बिग बास्केटशी कुस्ती खेळल्यावर कधी कधी मिळतात. स्लॉट मिळाला की आनंद; काय सालं आयुष्य आहे. भाजी बरी असते, २/३ वेळा फळं पण मागवली होती, ठीक होती. फक्त एक दिवसाआड दूध आणायला कधी मी कधी बायको जाते.
मुलीच्या शाळेतल्या शिक्षकांचे गुगल ड्राइव्हवर व्हिडीओ, वर्कशीट येतात त्याप्रमाणे बायको तिचा अभ्यास करून घेते. बायकोने स्वतः मात्र ऑनलाइन कोर्सेसचा धडाका लावलाय. सिक्युरिटी, AI, ML, पायथॉन एक ना दोन. तिचा कॉलेजचा अभ्यासक्रम लॉकडाऊन नंतर २/३ दिवसातच शिकवून संपला. झूम लेक्चर्स झिंदाबाद. आमच्या इंजिनीअरिंगच्या ग्रुपवर पण सरांकडे चौकशी केली ते पण म्हणाले झूमवर लेक्चर्स चालू आहेत, उपस्थिती ४०/५०% बरीच मुलं गावी गेली तिकडे डेटा स्पीड नाही म्हणून ती जॉईनच करत नाहीत. परीक्षा कधी, शेवटच्या वर्षाच्या मुलांचे कॅम्पस प्लेसमेंटचे काय होणार? माहीत नाही अजून तरी.
काम झाल्यावर घरी सगळे मिळून जुने फोटो बघत बसतो. टीव्हीला १ टीबीची हार्डडिस्क लावलेली आहे आणि कारभारणीने फोटोंचे एकदम पद्धतशीर वर्गीकरण केले आहे त्यामुळे मजा येते बघायला, अगदी पुरवून पुरवून बघतोय आणि सर्व मिळून ते प्रसंग परत जगतोय. पोपिलोन वाचताना तुरुंगात तोदेखील एकांतवासात असेच करत असे हे वाचलेलं आठवलं आणि तसंच कधी काळी आपल्याला करायला लागेल असं वाटलं नव्हतं. रात्री मेंढीकोट, ३०४, ५/३/२, बदाम सत्ती वगैरे. ९ ला रामायण आहेच. आमची आजी मात्र खुश आहे, वय ९० असल्याने ती तशी पण बाहेर पडत नव्हतीच पण आता सगळे घरी असल्याने गप्पाटप्पाना आलेला ऊत, पत्ते मधे मधे चहाची आवर्तनं आणि बरोबर धुडगूस घालायला ४ वर्षांचा पणतू; या वयातही बदाम सत्ती खेळताना कुठले पान अडवायचे, ५/३/२ ला कोणती पाने आहेत, कोणती ऑलरेडी गेली सगळं लक्षात. म्हातारी खुश आहे एकदम.
यु ट्यूब वरून बरीच नाटकं पण डाऊनलोड केली आहेत, ती बघण्यात पण वेळ छान जातो. मात्र नाटक लाईव्ह बघताना जिथे गडगडाटी हास्य येतं तिकडे घरात बघताना फक्त खिक्क होतं. चलता है, इतका फरक तर पडणारच. शनिवार, रविवारी तर संध्याकाळी मिटिंग्ज सेट झालेल्या असतात. कधी वडिलांच्या बाजूचे नातेवाईक, कधी आई, कधी बायको तर कधी आजीच्या माहेरचे नातेवाईक यांचे व्हिडीओ कॉल असतात. व्हाट्सएप व्हिडिओ कॉलला ४ जणांचे लिमिटेशन आहे म्हणून गुगल ड्युओ, झूम चालू केलं. अर्धा / एक तास कसा जातो समजतच नाही.
किचनमध्ये थोडं :
तसा मी किचनमध्ये असतो बरं का पण शक्यतो नॉन व्हेज करायलाच. व्हेज स्वतःहुन करायला ती झिंगच येत नाही तर काय करू? मागच्या १५/२० दिवसात मी व्हेज बिर्यानी, रगडा पॅटिस मधले पॅटिस, पास्ता (मॅक्रोनी- वल्लीबुवा झिंदाबाद) आणि पाडव्याला पायनाप्पल शिरा केला होता घरच्यांच्या एकंदर रिस्पॉन्सवरून सर्व पदार्थ बरे झाले असावेत.
पण मंडळी, घरी यंदा मत्स्य दुष्काळ झाला हो. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च दणकून मासे हादडतो. यंदा जानेवारीत घरात आजारपणामुळे मासे झालेच नाहीत. फेब्रुवारीत तीन चारदा खेकडे, सुरमई, करली, कोळंबी झाली. मार्चपासून सगळं बंद. खापी, मुडदूसे, बांगडूले, माकुळ, सौंदाळे, तिसऱ्या काही तोंडाला लागलेच नाही. चिकन/ मटण उपलब्ध आहे ऑनलाइन (धन्यवाद केडी भाऊ) पण आई, बायको आणून देत नाहीत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मंडईत शेवटची फेरी झाली होती तेव्हा येता येता सोड्याचा भाव विचारला होता, दिघीचे सोडे रुपये सातशे फक्त पाव किलो होते (मागच्या वर्षीच्या जवळ जवळ दुप्पट महाग) म्हणून घेतले नाहीत नंतर बघू म्हणून. आता घरकारीण येता जाता म्हणतेय चिकन/ मटण नको पण सुकट असतं तर काही तरी तोंडीलावणं केलं असतं. दर रविवारी हा संवाद होतोय आणि माझ्या दुःखाला डागण्या मिळतायत. काही अट्टल बेवड्याना दारू न मिळाल्याने रुग्णालयात भरती केले अशी बातमी परवाच वाचली आणि हीच वेळ प्रदीर्घ काळ मासे न खाल्ल्याने माझ्यावर येऊ नये हीच प्रार्थना.
समारोप :
सध्या परिस्थितीला पुर्णपणे शरण गेलो आहे. सरकारच्या सर्व आदेशांचे पालन करत आहे. आई, बाबा, आजीचा रोजचा दिवस कसा जातो याचा अंदाज आला. लॉकडाऊनच्या आधी घरात वीकडेजमधे माझा संवाद जवळपास नसायचाच याची पण जाणीव झाली.
मिपाही खूप आधार देत आहे या काळात. आपल्याबरोबर कोणतरी गप्पा मारायला आहे असं वाटत राहतं. मी रोज सकाळी मिपावरील नवे लेखन आणि रात्री शेवटच्या पानापासून मागे मागे वाचत येतोय. (अभ्यास वाढवतोय) मिपाच्या स्थापनेपासूनचे लेख वाचायला मज्जा येतेय खूप.
हा आयुष्याला लागलेला कोरोनाचा फिल्टर जेव्हा निघेल त्यावेळी या फिल्टरमधून झिरपलेले चार सुख-दुःखाचे क्षण जे अदरवाईज कधीच मिळाले नसते ते माझ्या पुढच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवतील असाच माझा प्रयत्न असेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लिहिलंय एकदम. सध्या
खरंय...!
=))
छान.
मिळतात ते बर्फाच्या
बरोबर काका,
जळावीण मत्स्य..
काय करणार काका आता,
छान.
https://www.flightradar24.com
https://www.marinetraffic.com
अरे वाह !
येस्स.
भारी लिहिलंय !
मस्त लेख
लॉकडाऊन नंतर काय ?
ज्यांच्या नोंदी सरकारी नाहीत
असंघटित कामगारांसाठी शासन कशा
सामाजिक सुरक्षा वटहुकुम
पुढे काय वाढून ठेवले आहे .....?
केवळ चर्चेसाठी मुबई ते सिएटल
शेवटच्या वाक्यावर प्रतिक्रिया
यावर ...
अपेक्षितच.
चीनमधला रोबोट टांगा बनवणारा
ही आवाजी आज्ञेवर काम करणारी
छान
छान
हल्ली बहुतांश टीव्हीना युएसबी
हे उपयोगी पडतंय का ते बघा :
सरांबरोबर बुद्धिबळाचे २ डाव
कबूल है, कबूल है, कबूल है.
हारजीत तर होतंच असते सर, आपण
सर, तुमच्यावर रामायण आणि
धन्स.
मी आणि गुल्लूदादा
छान
छान लिहीलंय
"ऑफिसचं काम तर जोरात होतंच.
सर्वांचे धन्यवाद,
लेख आवडला
इतर क्षेत्रात
मजूर वर्गाचे फार हाल झाले
भाऊ, एकदम भारी लिहिले आहे..