मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लॉकडाऊन: सतरावा दिवस

चांदणे संदीप · · काथ्याकूट
नमस्कार मिपाकरहो! लॉकडाऊनच्या लेखमालेतील सतरावा पुष्प अर्पण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. याआधी सिद्धहस्त लेखकांनी आपापले प्रकटन सादर केले आहे आणि अर्थातच... कल और आयेंगे नगमो की खिलती कलियाँ चुननेवाले, मुझसे बेहतर कहनेवाले...या ओळींप्रमाणे आणखीही मान्यवर येतील परंतु आज, आत्ता तर हा क्षण मला अनुभवण्यास मिळत आहे त्याचा मला अतीव आनंद होत आहे. लॉकडाऊनमध्ये मानवी स्वभावाचे विचित्र कंगोरे आपणांस ठळक अनुभवण्यास मिळत आहेत. म्हणजे तसे ते नेहमीच आपल्या अवतीभवती दिसत असतातच पण त्यांचा ठळकपणा आजच्या वैश्विक आपत्तीमुळे चटकन दिसून येतो. एरवी दिसला तरी, मला काय त्याचे? यामुळे त्यावर विचार करायला कुणाला वेळ नसतो. आता सध्या लोकांमध्ये पुढे काय? नोकरी करणार्‍यांना, लॉकडाऊननंतरचे वाढलेले टार्गेट्स दिसत आहेत. व्यावसायिकांना येणे आणि देणे यांचा मेळ बसवण्यावर विचार करण्यात वेळ खर्च करावा लागतोय. विद्यार्थ्यांना राहिलेले पेपर, परीक्षा, त्यांचा अभ्यास याची चिंता आहे. पण... पण... यातलं कोणी जरा थांबून विचार करेल का की आत्ता या क्षणी काय? गेले ते निसटले, पुढचे पुढेच राहिले आत्ताच्या या क्षणी, मी जीवनासी पाहिले.. मी तरी स्वतः या ओळींनुसार कायमच जगत आलोय आणि कायम तसाच राहण्याचा प्रयत्न करीन. वाचनाची आवड आणि एक यःकश्चित कवी असल्यामुळे काव्याचा माझ्या जगण्यावर खूप प्रभाव आहे. अवतीभवती असणार्‍या विसंगतीचा मला त्रास होतो पण त्याचाच मला फायदाही असा होतो की त्या विसंगतीला वळसा घालून मला पुढे जाण्यास काव्यामधून प्रेरणा मिळत जाते आणि तसा प्रयत्न करताना एक आत्मिक समाधानही मिळत राहते. असो, उगीचच आध्यात्मिक वगैरे व्हायला लागलंय बहुतेक. तर, मानवी स्वभावातली त्रुटी दर्शवणारे, जीवन जगतानाची होणारी ओढाताण यावर भाष्य करणारे, कटू परंतु सत्य साध्या आणि थेट शब्दांत पोहोचवणारे आणि चालत राहण्यासाठी प्रेरणा देणारे, खंबीरपणे उभे राहण्यासाठी उर्जा देणारे अशा विविध विषयांवरच्या काव्यरचनांची मिसळप्लेट असा आजचा माझा हा लेख असणार आहे आणि याद्वारे मी मला प्रभावित करणार्‍या काही काव्यांना उजळणी देणार आहे. प्रथम मला मनुष्य स्वभावाच्या अंधानुकरण करण्याच्या स्वभावावर व्यंग करणार्‍या ओळी आठवतात. हिंदीतील प्रसिध्द कवी हरिशंकर परसाई यांच्या अमर लेखणीतून त्या आलेल्या आहेत. कुठलीच कविता संपूर्णपणे देत नाही कारण लेख लांबण्याची शक्यता आहे. आपण सर्व नेटकरी आहात, नेटाने नेटवर सर्च करालच. तर, हरिशंकर परसाई म्हणतात: जब तान छिड़ी, मैं बोल उठा जब थाप पड़ी, पग डोल उठा औरों के स्वर में स्वर भर कर अब तक गाया तो क्या गाया? सब लुटा विश्व को रंक हुआ रीता तब मेरा अंक हुआ दाता से फिर याचक बनकर कण-कण पाया तो क्या पाया? जो वर्तमान ने उगल दिया उसको भविष्य ने निगल लिया है ज्ञान, सत्य ही श्रेष्ठ किंतु जूठन खाया तो क्या खाया? माझ्या मते, स्वतःला गुणी, ज्ञानी समजणार्‍या माणसाला लावलेली चपराकच आहे ही! आणखी एक म्हणजे, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात म्हणा किंवा स्वतःहून लादून घेतलेल्या धकाधकीच्या, धावपळीच्या, ताणतणावाच्या जीवनाला कंटाळून जेव्हा एक मुलगा आपल्या वडिलांना मला जन्म का घातला असा प्रश्न करतो. मागे बातम्यांमध्ये तर एकाने आईवडिलांवर कोर्टात केसही ठोकल्याचे पाहिले असेलच सर्वांनी. असो, तर त्या परिस्थितीला त्रासलेल्या मुलाला वडील एक सर्वकालीन सत्य समजावून सांगत असतानाच त्यालाच अशक्य असे आव्हान देतात. हरिवंशराय बच्चन यांची ही अफलातून रचना आहे जी प्रत्येकाने वाचली तर परिस्थितीला सामोरे जाण्याची नवी उर्मी मिळू शकते. ज़िन्दगी और ज़माने की कशमकश पहले भी थी, आज भी है, शायद ज्यादा… कल भी होगी, शायद और ज्यादा… तुम ही नई लीक रखना, अपने बेटों से पूछकर उन्हें पैदा करना. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच सर्वकाही आहे, सर्वकाही म्हणजे स - र्व - का - ही, तरी पण थोडक्यात सांगतो बघा की म्हणजे त्यात सगळंच आलं, जसं की सकाळी उठून दात घासण्यापासून ते बड्डे सेलिब्रेट करताना नाचणे, फिरायला जाणे, नवनवीन पदार्थ चाखणे, हादडणे, आजारी पडणे - दवाखाना, शिव्या खाणे, देणे, कुणावर तरी प्रेम करणे, आपली मुले, राजकारण, चंद्रयान, कुंभमेळा, पुस्तके, टीव्ही, गाडी धुणे, सर्व्हिसिंगला टाकणे, प्रमोशन आणि पगारवाढीची वाट, बँकाचे ईएमआय, शेअर मार्केट, अंबानी, टाटा, मोदी-राहुलबाबा-ट्रम्प-पुतिन-किम जोंग, माऊंट एव्हरेस्ट, ट्राएथलॉन, ऑलिम्पिक, क्रिकेट, फुटबॉल, सिनेमा, कोपर्‍यावरचा न्हावी, दूधवाला, पेपरवाला, देव, अल्ला, जीझस, वाहेगुरू इत्यादी इत्यादी.. थोडक्यात स - र्व - का - ही! फिरोज खान या कवीचे यावर साध्या शब्दांत सांगणे आहे की, मेरे मरते ही मर जाएगा ये शहर ये वतन ये दुनिया मर जाएगी मेरे मरते ही स्मृतियाँ मर जाएँगी मर जाएँगी मेरी प्रेमिकाएँ मेरी माँ मर जाएगी जिसके मरने का सताता रहा है डर वो पिता मर जाएगा मेरे मरते ही वे सब मर जाएँगे जिनके जीने की दुआएँ की थीं मैं एक खंडहर हूँ या कि हूँ एक ईश्वर ढह जाऊँगा एक रोज मैं मर जाऊँगा मेरे मरते मर जाएगा ईश्वर भी! आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चालत राहणे महत्वाचे असते. पण, बर्‍याचदा असे प्रसंग येतात की का चालावे? कशासाठी करायचा सारा आटापिटा किंवा तोचतोचपणामुळे मनाला येणारी मरगळ काही काळ का होईना थांबण्यास भाग पाडते. अशी मरगळ माझ्यासाठी ही कविता अगदी सहजपणे झटकून टाकते. रॉबर्ट फ्रॉस्ट या कविची ही सुंदर, चित्रदर्शी रचना आहे. The woods are lovely, dark, and deep, But I have promises to keep, And miles to go before I sleep, And miles to go before I sleep. ही कविता अत्यंत प्रेरणादायी आहे, नक्की शोधून वाचून पहा. लेख आधिक न लांबवता मला शेवटची कविता आपणांसमोर ठेवावी वाटते ती कविवर्य मंगेश पाडगांवकरांची आहे. ह्या कवितेने मला नेहमीच सर्व संकटांशी सामना करण्याचे धैर्य दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीबरोबर झगडण्याची स्फूर्ती दिली आहे. जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही मी फूल तृणातील इवले उमलणार तरीही नाही आजच्या या कोरोनाच्या विषाणूलाही आपण, तुझ्या सामर्थ्याने दहा दिशा ढळू देत पण मी तृणातले इवले पाते तुला विरूद्ध जाण्यास तयार आहे असे ठणकावून सांगूयात. अर्थात, घरी बसूनच! घरी रहा, स्वस्थ रहा, काळजी घ्या.

वाचने 16083 वाचनखूण प्रतिक्रिया 32

प्रचेतस 10/04/2020 - 07:48
अतिशय सुरेख लिहिलंय. फ्रॉस्टची कविता वाचून जॉईस किल्मरची ट्रीज (Trees) ही कविता आठवली. ह्या काव्यपंक्तीचा शिलालेख असलेली शिळा ब्रिटिशांनी दोडाबेट्टा शिखरावर बसवली आहे. I think that I shall never see A poem lovely as a tree. A tree whose hungry mouth is prest Against the earth’s sweet flowing breast; A tree that looks at God all day, And lifts her leafy arms to pray; A tree that may in Summer wear A nest of robins in her hair; Upon whose bosom snow has lain; Who intimately lives with rain. Poems are made by fools like me, But only God can make a tree.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर 10/04/2020 - 09:29
झाडं ही सर्वात जास्त फायटींग स्पिरिट असलेली स्पेशी आहे. स्वतःच्या बचावासाठी माणसानं हजारो सुख-सुविधा शोधल्यात, पक्षी स्थलांतर करतात आणि प्राणी निवारा शोधतात पण झाडं एकाच जागी स्थिर राहून लाईफ सायकल पूर्ण करतात. वाट्टेल ते जीवाणू , विषाणू त्यांच्यावर राहातात; पर्यावरणातले सर्व बदल मग ते पाणी असो, हवा की माती; ते आपलेसे करतात. आयुष्यभर जीवसृष्टी जगवायला मदत करतात, त्यांच्या उत्छवासातून, फळा -बीजातून आणि या जीवनात कायम रंग भरत राहातात !

In reply to by संजय क्षीरसागर

चौकटराजा 10/04/2020 - 11:10
" हॅपनींग " नावाचा एक सायन्स फिक्शन डिझास्टर फिल्म आहे.त्यात लेखकाने मूळ कल्पना अशी केली आहे ही मानव सर्व रिसोर्सेस स्वतः: च्या स्वार्थासाठी वापरीत आहेत म्हणून झाडेच बंड करतात .आता त्यांना हलता तर येत नाही म्हणून ते स्वतः: मध्ये एक विष तयार करतात .वारा आला की ते विष वाऱ्यावर सवार होऊन बसते. सेंट्रल पार्क न्यूयॉर्क येथील चौकानजीक एक बांधकाम चालू आहे.वाऱ्याची एक झुळूक येते अन स्लॅब वर काम करणारा एक कामगार वरून उडी मारून जीव देतो . पहिल्यादा वाटते अपघात असावा.तितक्यात एक दोन तीन आत्महत्यांची लाईन लागते. ती पार्क मध्ये पसरते अन ........

मदनबाण 10/04/2020 - 09:32
सुरेख लेखन... रिवंशराय बच्चन यांची ही अफलातून रचना आहे जी प्रत्येकाने वाचली तर परिस्थितीला सामोरे जाण्याची नवी उर्मी मिळू शकते. अवांतर :- Coronavirus may 'reactivate' in cured patients, Korean health authority says About 51 patients classed as having been cured in South Korea have tested positive again, the KCDC said in a briefing. Rather than being infected again, the virus may have been reactivated in these people, given they tested positive again shortly after being released from quarantine, said Mr Jeong Eun-kyeong, director-general of the KCDC. "While we are putting more weight on reactivation as the possible cause, we are conducting a comprehensive study on this," Mr Jeong said. "There have been many cases when a patient during treatment will test negative one day and positive another." A patient is deemed fully recovered when two tests conducted with a 24-hour interval show negative results. चिंताजनक आहे हे !

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Tu Hi Hai Aashiqui... :- Dishkiyaoon

मित्रहो 10/04/2020 - 11:04
वाह दिल खूष कर दिया. काय एकापेक्षा एक कविता आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/04/2020 - 12:14
खुपच सुंदर लिहिलंय संदीपसेठ. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच सर्वकाही आहे, हे व्यक्त करणारं मनोगत अतिशय आवडलं. केवळ जगण्यासाठी लाखो श्वास घरात लॉक झाले आहेत. पैसे, अलिशान घर, स्थावर जंगम मालमत्ता काय आणि काय सर्वांची किंमत शुन्य वाटतेय. खरं तर इतकं छान लिहिलंय की बस आवडतं गाणं हेडफोन लावून डोळे मिटून ध्यान लावावं तसं. काहीच न बोललेलं बरं. मिपापडीक आहेच. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 10/04/2020 - 12:16
वा, सुंदर लेखन ! मैं एक खंडहर हूँ या कि हूँ एक ईश्वर ढह जाऊँगा एक रोज मैं मर जाऊँगा मेरे मरते मर जाएगा ईश्वर भी! तंतोतंत खरं आहे, आपण शेवटी अवशेषच बनून राहणार !

In reply to by चौथा कोनाडा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 10/04/2020 - 12:26
मेरे मरते मर जाएगा ईश्वर भी!
वरील ओळी नास्तिक धाग्यात डकवण्यात येतील. बाकी, आदरणीय मा.प्रधानमंत्र्यांच्या सन्मानप्रित्यर्थ दहा मिनिटाचा स्टँडीग ओव्हेशनचा किडा कोणी तरी टाकला होता. ट्वीटरवर आदरणीय प्रधानमंत्री यांना खुलासा करावा लागला की असे काही नाही, त्या पेक्षा लोकांनी गरजु लोकांना मदत करावी असं त्यांना सांगावं लागलं. अवघड आहे. चालू द्या. -दिलीप बिरुटे
हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे. महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले - "माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?” “मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही. याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रीय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे “त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही.” “एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला. खरतर त्यात माझा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्या गाईच्या धन्याचा शाप मला झेलायला लागलाच.” “द्रौपदीच्या स्वयंवरात तर सूतपुत्र म्हणून चक्क माझी बदनामीच केली गेली.” “कुंतीनेही मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले. पण कधी सांगितले? सर्वात शेवटी. तेही तिच्या इतर मुलांना माझ्यापासून वाचवण्यासाठी.” “मला आजवर जे जे काही मिळाले ते फक्त दुर्योधनाच्या औदार्यामुळेच मिळाले आहे. असे असताना, मी त्याची बाजू घेतोय, हे चुकीचे कसे काय असू शकते?” ** भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले, "कर्णा, माझा जन्म तुरूंगात झाला होता.” “जन्म झाल्यावर मृत्यू होतो. पण कंसाच्या रूपाने, माझ मरण माझ्या जन्माच्याही अगोदरपासून माझी वाट बघत होतं.” “ज्या रात्री माझा जन्म झाला, त्याच दिवशी माझी आई वडिलांपासून ताटातूट झाली. ” “लहानपणापासून तू तलवारी, रथ, घोडे, धनुष्य-बाणांचे आवाज ऐकतच मोठा झाला आहेस. मला फक्त गायीच्या कळपामधे गाईचे हंबरणे ऐकायला मिळाले. त्याच्यासोबत मिळालाय गोमूत्र व शेणाचा वास. मला चालायलाही येत नव्हतं, त्या वयांत माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत.” “सगळ्यांच्या अडचणींना मीच कारणीभूत आहे, असंच लोकांना नेहमी वाटत असे. ना मला योग्य शिक्षण मिळाल होतं, ना माझ्याकडे सैन्य होतं. अशा परिस्थितीत मी काय करू शकत होतो? त्यामुळे जरासंधापासून सगळयांना वाचविण्यासाठी मला माझा संपूर्ण समुदाय यमुनेच्या किनाऱ्यावरून लांब समुद्रकिनारी हलवावा लागला. पण मला मात्र त्यावरून पळपुटा ही पदवी कायमची चिकटली.” “जेव्हा तुमच्या शिक्षकांकडून तुमच्या शौर्याचे कौतुक केले जात होते तेव्हा मी मात्र शिक्षणाला पारखा झालेलो होतो. मला सांदिपनीं ऋषींच्या आश्रमात प्रवेश कधी मिळाला माहितेय? सोळाव्या वर्षी. हे काय वय आहे शिक्षणाला सुरवात करायचे?” “तुम्हाला तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता आलंय. पण जिच्यावर माझं खरखूर प्रेम होतं, तिच्याशी मी नाही लग्न करू शकलो. माझं लग्न अशा मुलींशी झालंय की ज्यांना मी पसंत होतो. पण माझ्या पसंतीचे काय? तुरूंगातून सुटलेल्या अभागी स्त्रियांबरोबर मला लग्न करावे लागलंय. ते ही, निव्वळ त्यांच्या आयुष्याचं मातेर होऊ नये म्हणून. आणि ही जबाबदारी माझ्या गळ्यात का आली? तर मीच त्यांची तुरूंगातून सुटका केली होती. वारे खासा न्याय!!!” “जर दुर्योधन युद्धात जिंकला तर तुला त्यातले बरेच श्रेय मिळेल. पण धर्मराजाने युद्ध जिंकल्यास मला काय मिळणार आहे? केवळ युद्धाचा दोष मला चिकटणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व समस्यांबद्दल बोलताना माझ्याकडे बोट दाखवले जाणार आहे.“ “कर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येकाच्या जीवनात आव्हाने ही असतातच. ही आव्हाने नेहमीच न्याय्य असतात किंवा सोपी असतात असं मी म्हणत नाहीये.” “योग्य काय? व अयोग्य काय? हे आपल्या अंतर्मनाला बरोबर ठाऊक असते. त्यानुसार योग्य तीच प्रतिक्रिया आपणाकडून अपेक्षीत असते. मला एवढेच कळते की, आपल्यावर किती अन्याय झाला, आपली किती वेळा बदनामी झाली वगैरेची सावली आपण घेत असलेल्या निर्णयावर पडली नाही पाहिजे.” “आपण पदोपदी आपल्या मनाला हे सांगितले पाहिजे की, माझ्यावर झालेला अन्याय, मला दुसऱ्यांशी अन्यायाने वागण्याची सवलत देत नाही. आपल्यावर झालेला अन्याय जेवढा मोठा, तेवढ्या प्रमाणात आपल्या मनाला हे समजवण्याची आपली जबाबदारी वाढत असते.“ “एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला लागते. आपल्या जीवनांत अवघड प्रसंग येतात व जातात. पण ते प्रसंग आपले नशीब घडवत नसतात; तर त्या अवघड प्रसंगात आपण घेतलेले निर्णय आपले नशीब घडवत असतात.”

In reply to by शाम भागवत

रविकिरण फडके 10/04/2020 - 22:22
श्री. शाम भागवत, तुम्ही दिलेला हा कर्ण-श्रीकृष्ण संवाद खूप भावला; माझ्या काही मित्रांना WhatsApp वरून शेअर केला आहे, अर्थातच तुमच्या नांवासह आणि मिसळपावचा संदर्भ देऊन. धन्यवाद!

In reply to by रविकिरण फडके

शाम भागवत 10/04/2020 - 23:24
खरतर कोरोनासाठी लिहिला होता. पण शेवटचे वाक्य टाकायचे विसरलो व त्या आधीच पोस्ट झाला. हे ते शेवटचे वाक्य होते कोरोना नव्हे, तर घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय, आपले व भारताचे नशीब घडवणार आहे. खरतर ही गोष्ट गेली १० वर्षे वेगवेगळ्या रूपांत जालावर फिरतीय. पण मराठीत मात्र नव्हती. मी फक्त मराठीत स्वैर भाषांतर केलंय. _/\_

In reply to by शाम भागवत

कंजूस 11/04/2020 - 05:27
दोघांचे रवि ( ग्रह) बिघडलेले होते त्याचा प्रताप. १) अवहेलना, २) विनाधिकार लुडबुड.

गोंधळी 10/04/2020 - 12:38
हज़िन्दगी और ज़माने की कशमकश पहले भी थी, आज भी है, शायद ज्यादा… कल भी होगी, शायद और ज्यादा… धन्यवाद.

मोदक 10/04/2020 - 20:19
गेले ते निसटले, पुढचे पुढेच राहिले आत्ताच्या या क्षणी, मी जीवनासी पाहिले.. सुंदर..!!

चौकटराजा 10/04/2020 - 20:29
https://www.youtube.com/watch?v=xyp3Pp9w9d4 भारत देश सोशल डिस्टन्सिन्ग ने जिंकला तर नशीब नाहीतर ................ अत्यन्त काळजीची भयानक परिस्थेती येत्या एक वर्षात भारतावर येउ शकते. मानसशास्त्र वेगळे अर्थशास्त्रीय जीवन वेगळे याचा कठोर सन्देश अच्युत गोडबोले यानी " करोना नन्तरचे जग .." या विषयावर आजच विडिओ टाकला आहे. तो सर्वानी खास करून आज जे नोकरीत आहेत त्यानी आवश्य पहावा ! रात्र वैर्‍याची आहे जागा रहा...... असाच सूर दिसतोय त्यान्चा. ज्याना हे निगेटिव्ह आहे असे म्हणून गोडबोले यान्ची खिल्ली उडवायची असेल त्यान्चे तोड कोण धरणार ..... ?
सर्व वाह्तुक बर्यापैकि बन्द असल्याने प्रदुषण जे कमि झाले आहे तसेच प्रत्येक महिन्याच्या एका रविवारि सक्तिचे केले पाहिजे इथुन पुढे . प्रदुषण त्या शिवाय कमि होणार नाहि.

झेन 11/04/2020 - 10:03
काय सुरेख लिहिले आहे.

गणेशा 29/04/2020 - 17:13
संदीप भाऊ.. तुम्ही खूप भारी लिहिले आहे.. मध्ये मध्ये दिलेल्या कविता तर अप्रतिम... निव्वळ अप्रतिम कविता कधी काळी माझ्या वीक पॉईंट होत्या त्यामुळे आतापर्यंत चा lockdown series मधील मला सर्वात आवडलेला हाच धागा आहे
विसंगतीला वळसा घालून मला पुढे जाण्यास काव्यामधून प्रेरणा मिळत जाते आणि तसा प्रयत्न करताना एक आत्मिक समाधानही मिळत राहते.
वा.. भारीच... लिहीत रहा... वाचत आहे....

In reply to by गणेशा

चांदणे संदीप 30/04/2020 - 07:58
तुमच्याशी मागे व्हाट्सॲपवरून संपर्क साधला होता. लॉकडाऊननंतर भेटून कवितांची मैफल जमवूया एखाद्या संध्याकाळी. चिंचवडात नाहीतर मोशीत. वल्लीदा, नाखुकाका आणि इतर मिपाकर जमवून. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

गणेशा 30/04/2020 - 08:17
मिपाकट्टा करूच.. खादाडीचा करूच .. कविता तुमच्या ऐकू.. एक वाईट वाटते आहे, तुम्ही मला संपर्क केलेला आठवतच नाही.. आपण बोललो आहे? Anyway पुन्हा बोलू.. माझ्या कडे नंबर नाहीये तुमचा..