भाग २ मराठ्यांच्या लढायांचा इतिहास - खडकीची लढाई - ५ नोव्हेंबर १८१७

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
3 Apr 2020 - 8:59 pm
गाभा: 

1

1

खडकीची लढाई - ५ नोव्हेंबर १८१७

भाग २

बाजीराव साहेबांनी मसलत नाकारली…

फिसकटलेली मराठा कॉन्फिडरसी…

(काहीही झाले तरी इंग्रजांना नाराज करायचे नाही असा मनाचा निश्चय कोणी केला असेल तर? कोण काय करणार?)

सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर आपल्या लष्करासह काही दिवस ब्रिगेडियर जनरल स्मिथ यांच्या सैन्याबरोबर होते. इंग्रजी सैन्यातील शिस्तीची, टापटिपीची आणि कर्तबगारीची चांगली माहिती झालेली होती. (ते) स्वतः लढाई देण्याचे विरुध्द होते, तरी पेशवाई मोडावयाची नाही, अशा पूर्ण स्वामीनिष्ठेच्या भावनेने विंचुरकर आपले सैन्य घेऊन लढायला आले. त्याचप्रमाणे बारामती येथील मुत्सद्दी गोविंदराव यांचेही मत लढाईच्या विरुध्द होते. त्यांनी अशी मसलत सांगितली की इंग्रजांशी लढाईचा प्रसंग घालू नये. तुमचा सरंजाम अवघा नवा(आहे). काल चाकर ठेवलेला आज लढून मरतो असे घडत नाही. वर्षे दोन वर्षे फौज अशी(च) बाळगावी व इंग्रजांशी सख्यत्व आहे तेच चालवावे. दुसरे, लढाईचा प्रसंग शहरापाशी करू नये. एखादी सरकारची मोहीम बाहेर परराज्यांत काढावी आणि इंग्रजास समागमे घेऊन जावे व तिकडे गेल्यानंतर लढाईचा प्रसंग करावयाचा (तो) करता येईल. सध्या लढाई उभी केली असता इंग्रज म्हणजे हटला जातो असे घडत नाही." गोविंदराव काळे यांची ही मसलत होती, तशीच बाकीच्याही बऱ्याच सरदारांची मसलत होती. परंतु तिकडे लक्ष दिले गेले नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय.

बाजीरावसाहेबांना (सल्ला) पटला नाही आणि त्यांनी पुण्याच्या लढाईची जोराने तयारी सुरू केली. या प्रसंगासंबंधाने पेशव्यांच्या बखरीतील जे वर्णन आहे, ते येणेप्रमाणे आहे- “पुण्यात तमाम सरदार जमा झाले. निपाणकर, अक्कलकोटवाले भोसले, निंबाळकर, घोरपडे, जाधव, विंचूरकर, पटवर्धन, बापू गोखले, राजेबहादर, भोईटे, पुरंदरे (व) किरकोळ सरंजामा असे मिळून नवीन ठेवलेली फौज मिळून लाख सव्वा लाख घोडे मिळाले. खेरीज पायदळ आरब, रोहिले, पठाण, शिद्दी, गोसावी, शिवाय रजपूत, रांगडे, मुसलमान असे 50,000 पायीचे लोक नवे चाकर ठेवलेले असा सरंजाम तयार जाहला." व या सगळ्या लष्कराचे अधिपत्य बापू गोखले यांजकडे देण्यात आलेले होते. बाजीरावांचे हे जे नवीन सैन्य आसपासच्या भागातून तयार होऊन येत होते, ते पुण्यास आल्यावर गारपीरच्या बाजूला त्या सैन्याची छावणी पडू लागली….

1

...परंतु गारपिरावर कर्नल बर यांच्या हुकमतीखाली इंग्लिशांची काही पलटणे आधी पुष्कळ दिवसापासून राहात होती. या इंग्रजी लष्करात नेटिव्ह इन्फन्ट्रीच्या सहाव्या आणि सातव्या रेजिमेंटमधील मिळून एकंदर 1200 शिपाई लोक होते (इंग्रजांकडून लढणारे विविध स्थानिक लोकांचे पगारी सैन्य थोडक्यात अत्यंत तुटपुजे संख्याबळ) व शिवाय त्यांच्यापाशी दोन तोफाही होत्या. हे इंग्रजी लष्कर मुठा नदीच्या उजव्या हातच्या किनाऱ्याच्या बाजूला हल्ली जेथे पुण्याच्या कलेक्टरचे ऑफिस आहे त्याच्या आसपास गारपिरावर राहात असे आणि त्या लष्कराकरिता ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांच्याकडून इ.स. 1803 सालापासून ही जागा मुक्रर करून देण्यात आलेली होती. गारपिरावरील इंलिश लष्कराच्या या छावणीच्या सभोवार पेशव्यांच्या लष्कराच्या छावण्या आणि गोसावी लोकांची पलटणे वानवडीच्या मैदानावर येऊन उतरली. त्याचप्रमाणे संगमावरील रेसिडंट, मि. एल्फिन्स्टन, यांचा बंगला आणि भांबुर्डे गाव यांच्या दरम्यानच्या मैदानामध्ये विंचुरकरांचे घोडेस्वार, पायदळ आणि तोफखाना यांचा तळ येऊन पडला. अशा रीतीने गारपिरावरील इंग्लिशांची फौज ही पेशव्यांच्या लष्कराकडून चोहोबाजूंनी हळूहळू वेढली जात होती. शिवाय गारपिरावरील इंग्लिशांच्या छावणीच्या बाजूने शहरातील कित्येक बागांची मोठमोठी कुंपणे असल्यामुळे त्यांच्या आडून शहरातील पेशव्यांच्या शिपायांना इंग्लिशांवर हल्ले करण्याला सोईचे पडत असे व इंग्लिशांच्या छावणीतील फितुर झालेल्या लोकांना पेशव्यांच्या सैन्यात जाऊन मिळण्यालाही फार सोपे पडत असे. पेशव्यांचे लष्कर इंग्लिशांच्या छावणीच्या इतक्या जवळ येऊन भिडल्याच्या योगाने पेशव्यांच्या लोकांना इंग्रजी सैन्यात येऊन फंदफितुर करण्याला फार सुलभ होऊ लागले. अशा रीतीने मराठ्यांच्या सैन्याची सगळी तयारी झाल्यानंतर इंग्लिशांच्या छावणीवर ताबडतोब हल्ला करावा असे, मराठ्यांच्या लष्करातील लोकांचे मत होते व त्याकरिता ता. 28 ऑक्टोबर रोजी रात्री तोफेच्या गाड्यांना बैल जुंपण्यात आले; घोडेस्वारांनी आपल्या घोड्यांवर खोगिरे चढविली; आणि पायदळाच्या पलटणी लढाईला निघण्याकरिता तयार झाल्या. अशा रीतीने त्या दिवशी रात्री शहरात मोठी धामधूम चाललेली होती, व तोफांच्या गाड्यांचा आणि घोड्यांच्या टापांचा आवाज मोठ्याने ऐकू येत होता...

...त्या रात्री संगमावरील बंगल्यात रेसिडेंट, मि. एल्फिन्स्टन, यांना झोप आली नाही. ते आपल्या बंगल्याच्या गच्चीवरून चिंताग्रस्त मुद्रेने या सगळ्या प्रकाराचा कानोसा घेत होते. या वेळी पळत असताना त्याचा पाठलाग करणे किंवा नदीच्या पलीकडून जोराचा हल्ला करून गोळ्या झाडणे अशक्य होते असे नाही. तरी पण फौजेतील फंदफितुरीमुळे तसे काही एक घडून न येता एल्फिन्स्टनसाहेबा जवळच्या सुमारे 500 लोकांसह बेटावरून ( मेण्यातून) निघाले ते होळकर पुलापर्यत जाऊन पोहोचले. 'मि. एल्फिन्स्टन हे बेटावरून निघून नदीच्या काठाने येत आहेत,' अशी आगाऊ सूचना समजलेली असल्यामुळे कर्नल बर खडकीहून आपल्या लष्करातील एक तुकडी एल्फिन्स्टनसाहेबांना सुरक्षित घेऊन येण्याकरिता पुढे पाठविली होती. …

1

दोन्ही सैन्याची जमवाजमव

इंग्लिश सैन्याची लाइन लढाईकरिता पहिल्याने कोठे उभी राहिली होती हे नक्की ठरविणे कठिण आहे. पण खडकीस हल्लीही 'बर रोड' आणि एल्फिन्स्टन रोड' या नावाचे दोन रस्ते आहेत. यापैकी कर्नल बर यांच्या नावाने ओळखला जाणारा रस्ता होळकर ब्रिज वरून युरोपियन बोट क्लबकडे जाणाऱ्या रस्त्यांशी काटकोन करून खडकीच्या गावाकडे वळलेला आपल्याला आढळतो. त्याच रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी जुन्या मोठमोठाल्या तोफाही पुरून ठेवलेल्या आढळतात. त्याच्यापुढे इंग्लिश शिपायांच्या काही बराकी लागतात व त्या बराकीच्या पाठीमागून तो एल्फिन्स्टन रोड आलेला आहे. तो थेट हल्लीच्या खडकीच्या गावापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. या एल्फिन्स्टन रस्त्यांच्या जवळपासच कोठे तरी इंग्लिश सैन्याची लाइन लढाईकरिता उभी राहिलेली असली पाहिजे असे दिसते.

1

समोर दुसऱ्या बाजूला पेशव्यांचे सैन्य चतु:श्रृंगीच्या गणेशखिंडीच्या डोंगरापासून तो संगमावरील रेसिडेन्सीच्या बंगल्याच्या आसपास चोहोंकडे पसरलेले होते. इंग्लिशांचे सैन्य आणि पेशव्यांचे सैन्य यांच्यात सुमारे दीड ते दोन मैलांचे अंतर होते. पेशव्यांच्या फौजेची डावी बगल गणेशखिंडी टेकडीला लागलेली असून उजवी बगल रेसिडेन्सीच्या जवळ-जवळ ये पोहोचलेली होती. यात विंचुरकरांच्या घोडेस्वारांची काही पलटणे डाव्या बगलेच्या बाजूला उभी होती. व मोर दीक्षित मराठे हेही त्याच बाजूला होते. पेशव्यांच्या चौदा तोफांचा तोफखाना आणि पायदळ ही मध्यभागी होती आणि उजव्या बगलेच्या बाजूला आणि पिछाडीला बापू गोखले व इतर सरदार यांचे घोडेस्वार होते. या युध्दाच्या वेळी मराठ्यांचे मुख्य जरीपटक्यांचे जे निशाण ते उजव्या बगलेच्या बाजूला बापू गोखल्यांच्या लष्करामध्ये कोठे तरी फडकत असावे. असे दिसते. पण ते मोर दीक्षित मराठे यांच्या बरोबर डाव्या बगलेकडे होते, असेही कित्येक ठिकाणी वर्णन आढळते. अशा रीतीने डावी बाजू मध्यभाग आणि उजवी बाजू यांनी बनलेली ही पेशव्यांच्या लष्कराची लाइन प्रथमत: कोठे उभी राहिलेली असावी, हे इंग्लिशांच्या लाइनीच्या जागेप्रमाणेच निश्चितपणे ठरविणे जरी कठिण असले तरी सामान्यत: असे म्हणता येईल की, हल्ली बेटावरून 'डॉ. भांडारकरांच्या बंगल्याजवळून रेल्वे ओलांडून जो रस्ता गणेशखिंडीतून गव्हर्मेट हाऊसकडे जातो त्या रस्त्यापैकी काही भागाच्या बहुतेक समांतर रेषेने पुढे खडकीच्या बाजूला काही अंतरावर पेशव्यांच्या सैन्याची पहिली लाइन उभी असली पाहिजे. व त्याच्या पाठीमागे इतर सैन्यांच्या रांगा बऱ्याच दूरवर पसरलेल्या असल्या पाहिजेत. त्याच प्रमाणे संगमावरून डॉ. भांडारकर यांच्या बंगल्याच्या पिछाडीकडून दगडी बंगल्यावरून आणि वाकड्याच्या बागेवरून एक रस्ता खडकीकडे जात असता 'एग्रिकल्चरल कॅटल फार्म' जवळच्या पुलावर जेथे दोन रस्ते फुटून एक 'होळकर ब्रिजकडे' जातो आणि दुसरा खडकीकडे उजव्या बाजूच्या बगलेचे पुढील हल्लीच्या ग्रिकल्चरल टकल्याच्या बागेतील शेतात गेला. दुसरा खडकीकडे वळतो, त्याच्या आसपास कॅटलफार्म, श्रीधर यांचा बंगला, शेट हणमंतराम रामनाथ यांचा बंगला, वगैरे ठिकाणापर्यंत जिच्या बगलेचे पुढील तोंड गेलेले असणे स्वाभाविक आहे.

1

त्या नंतर अॅग्रिकल्चरल कॉलेजच्या भव्य इमारतीने व त्याच्या आसपासच्या | बागेतील शेतांनी जी जागा व्यापलेली आहे, त्याच्या सुमाराला ही आसपास पेशव्यांच्या सैन्याच्या मध्यभागातील लोक उभे राहिलेले आणि चतु:श्रृंगीच्या डोंगराच्या पुढून गव्हर्मेन्ट हाऊसकडे जो रस्ता डाव्याच्या पुढे उत्तरेच्या अंगाला खडकीच्या बाजूकडे ज्या एका लहानशा नीचे टोक वळलेले आहे, त्या टेकडीच्या पूर्व बाजूला पेशव्यांच्या डाव्या बगलेचे सैन्य उभे राहिलेले असले पाहिजे, असे दिसते. अशा रीतीने इंग्लिशांच्या आणि मराठ्यांच्या सैन्याच्या पहिल्या लाइनीच्या ज्या जागांचे वर्णन वर दिलेले आहे. त्या दोन जागांच्या दरम्यान दोन-तीन मैलांचे विस्तीर्ण मैदान चोहोंकडे पसरलेले हल्लीही दिसते. हे मैदान फार मोठे आहे. व त्या मैदानातील एखाद्या उंच ठिकाणी उभे राहून “हे ते त्या खडकीच्या लढाईचे रणक्षेत्र !" अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहिले, म्हणजे आपल्या मनामध्ये काय भावना उचंबळतात, याचे वर्णन करणे शक्य नाही. त्या भावनांचा ज्यांना अनुभव घ्यावयाचा असेल, त्यांनी त्या मैदानावर समक्ष जाऊनच त्या स्थळाचे आपल्या अश्रुपूर्ण नेत्रांनी निरीक्षण केले पाहिजे.

नकाशा वाचनासाठी संदर्भ

1

1

1

1

1

1

1

मोर दीक्षितांचा रणमैदानात मृत्यू

पेशव्यांच्या सैन्याच्या डाव्या बगलेमधीलच मोर दीक्षित वगैरे सरदारांच्या हाताखाली जे लष्कर खडकीच्या गावच्या बाजूने चाललेले होते, त्याला असे आढळून आले की, दापोडीहून आपले लष्कर घेऊन खडकीच्या इंग्लिश लष्कराला येऊन मिळण्याकरिता निघालेला कर्नल फोर्ड हा सुमारे 2000 कदमांवर येऊन पोहोचला आहे तेव्हा हे दापोडीचे लष्कर आणि खडकीचे लष्कर यांचा मिलाफ होऊ देता कामा नये. या हेतूने मोर दीक्षित आणि रास्ते हे आपल्या हाताखालचे घोडेस्वार घेऊन कर्नल फोर्डला अडविण्याकरिता त्या दिशेला वळले.

कर्नल फोर्ड आणि मोर दीक्षित यांचा विशेष स्नेह असल्यामुळे मोर दीक्षितांच्या स्वामी निष्ठेबद्दल कित्येकांच्या मनात संशय होता व बापू गोखले हेही या वेळी यासंबंधाने मोर दीक्षितांना काही टोचून बोलले तेव्हा तो संशय दूर करण्याला ही चांगली संधी आहे, असे लक्षात आणून मोर दीक्षितांनी कर्नल फोर्डवर हल्ला करण्याचे ठरविले. मोर दीक्षितांचे घोडेस्वार कर्नल फोर्ड यांच्या उजव्या बाजूच्या शिपायांच्या जवळ येत चालले आहेत असे पाहून त्या लोकाना मागे हटण्यास प्रतिकार करण्यात आला. व पेशव्यांचे स्वार आपल्या माऱ्याच्या आटोक्याइतके जवळ आल्यानंतर कर्नल फोर्ड यांनी आपल्या बॅटेलियनला, जवळ असलेल्या तीन तोफांना गोळीबार सुरू करण्याविषयी हुकूम केला. तेंव्हा कर्नल फोर्डच्या सैन्यावर हल्ला करण्याचे सोडून मोर दीक्षितांचे लोक, खडकीच्या बाजूला वळले. पण तेथे खडकीच्या बाजूला इंग्लिशांच्या लाट तोफा तयार होत्या. त्यांनी आपली गोलंदाजी या सैन्यावर एकदम सुरू केली तेव्हा त्यांपैकी एक गोळा मोर दीक्षित यांना लागून ते तेथल्या तेथे मरण पावले. आपले सरदार मोर दीक्षित हे अशा रीतीने मरण पावल्यामुळे त्यांच्या धांदल उडाली व ते सैन्य माघारे फिरले. खडकीच्या लढाईत इंग्लिश बाजूचे जे कोणी लहानमोठे इंग्लिश लोक मारले गेले. त्यापैकी काहींचे एक कबरस्थान हल्लीच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या समोर नदीच्या काठी पूर्वी जी एक बर्फाची गिरणी होती, त्या गिरणीच्या जवळ एका लहानशा कंपाउंडमध्ये संरक्षित करून ठेवण्यात आलेले आहे. पण मोर दीक्षित मराठे हे पेशव्यांचे एक मोठे प्रधान असूनही खडकीच्या लढाईत ते कोणत्या ठिकाणी मारले गेले, ती जागाही आज कोणाला माहीत नाही. पेशवाई पुढे टिकली असती, तर कदाचित् त्या जागेच्या स्मरणार्थ पेशव्यांकडून काही तजवीज करण्यात आली असती; पण पेशवाई गेली आणि ज्या कर्नल फोर्डवर मोर दीक्षित आपल्या भावी व्यवस्थेसाठी विसंबून राहिले होते, त्यांनीही त्यांच्यासाठी काही केलेले दिसत नाही. एवंच, पूर्वकाली आपल्याकडील कोणी कितीही मोठा असला, तरी त्याचे स्मरण राहाण्याला आज आपल्यापाशी काही साधन राहिलेले नाही, हे आपले दुर्दैव आहे.

1

मराठ्यांच्या फौजांनी इंग्लिशांना चोहोबाजूंनी वेढले होते, यात संशय नाही बापू गोखले यांच्या घोडेस्वारांनी इंग्लिश सैन्याची फळी फोडून त्यामधून ते कसे घुसले...
इंग्लिश लाइनीच्या डाव्या बाजूवर पेशव्यांच्या लष्कराने हल्ला करून फारच गर्दी उडवून दिलेली होती. पेशव्यांच्याकडील तीन हजार अरब आणि गोसावी हे आपल्या लाइनीच्या मध्यभागातून निघून सातव्या रेजिमेंटची पहिली बॅटेलिअन आणि सहाव्या रेजिमेंटची दुसरी बॅटेलिअन यांच्यावर ही हला चढविला. पेशव्यांच्या सैन्यात डी पिंटो या नावाचा एक पोर्तुगीज सेनापती होता. त्याने हा हल्ला चढविण्यात पुढाकार घेतला होता. व तो यात मरण पावला, असा एक इतिहास आहे. आणि हल्ली डॉक्टर भांडारकरांच्या बंगल्याच्या पिछाडीकडून खडकीच्या रस्त्याने जात असताना मुळा नदीच्या काठच्या दगडी बंगल्याच्या पुढील एका लहानशा ओढ्याच्या काठी जे एक थडगे दिसते ते हा पोर्तुगीज सेनापती डी पिंटो, यांचे असावे, असाही कित्येकांचा तर्क आहे. वर सांगितलेले अरबांचे आणि गोसाव्यांचे लष्कर आपल्यावर चाल करून येत आहे, असे पाहून इंग्लिश पलटणीतील शिपाई आपली लाइन सोडून त्यांच्यावर हल्ला करण्याकरिता पुढे सरसावले व त्यामुळे इंग्लिशांची डावी बाजू आणि मध्यभाग यांच्यामध्ये अंतर पडले.

ही शत्रूची चूक लक्षात आणून बापू गोखले यांनी आपले जरीपटक्याचे निशाण हातात घेऊन आपल्या सहा हजार निवडक घोडेस्वारांसह शत्रूच्या सैन्याच्या त्या दोन भागांच्या मधून घुसण्याचा प्रयत्न केला. बापू गोखले यांचे हे कृत्य लष्करी हालचालींच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आणि कौशल्याचे होते. परंतु बापू गोखल्यांच्या या युक्तीमुळे आपल्यावर केवढे संकट येणार आहे, हे लक्षात आणून कर्नल बर हे त्या सातव्या रेजिमेंटच्या निशाणाजवळ येऊन उभे राहिले आणि त्या पलटणीतील जे लोक आपली लाइन सोडून डी पिंटो याच्या लष्करावर हल्ला करण्याकरिता पुढे चालले होते, त्यांना त्याने थांबविले; व शत्रूच्या सैन्यावर गोळीबार सुरू करण्याविषयी त्याने हुकूम केला. इंग्लिश सैन्याची फळी फुटून त्याच्या दोन भागांमध्ये जे अंतर पडले होते, त्यामधून बापू गोखले हा यशस्वी रीतीने घुसला. परंतु इतक्यात बापू गोखले यांच्या घोड्याला जखम लागून त्यांना माघारी परतावे लागले. बापू गोखल्यांचे दोन आवडते घोडे होते; त्यातील एकाचे नाव हनुमान आणि दुसऱ्याचे नाव राजाबाण असे होते. त्यापैकी या वेळचा घोडा कोणता होता, हे निश्चित माहीत नाही, घोड्याला गोळी लागून बापू गोखले जरी थोडे माघारी फिरले, तरी लगेच दुसरे सरदार त्यांच्या पाठीवर होतेच. ते पुढे सरसावले आणि इंग्लिश सैन्यात पडलेल्या त्या फळीच्या मधून त्यांनी मराठ्यांच्या सैन्याची दौड तशीच पुढे चालविली. अशा रीतीने ते दौड करीत चालले असता त्यांना मुढे एक खोल आणि दलदलीचा असा ओढा लागला. आणि त्या दल चिखलात मराठ्यांचे घोडेस्वार एका पाठीमागून एक येऊन पडले. संधी साधन इंग्लिशांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. तरी पण अशा संकटात मराठ्यांचे सुमारे तीनशे घोडेस्वार त्या दलदलीतून बाहेर पडले, व: इग्लिशांच्या बाजूवर हल्ला चढविला. परंतु इग्लिशाच्या वेगळ्या पडले सातव्या रेजिमेंटच्या मदतीला काही युरोपियन कंपन्यांचे शिपाई घेऊन त्यांनी हल्ला परतविला...

1
इंग्रजांच्या सैनिकांचे एक प्रातिनिधिक चित्र

पेशव्यांच्या सैन्याची डावी बाजू आणि उजवी बाजू यांनी वा सांगितल्याप्रमाणे दोन्ही टोकांना मोठ्या जोराने लढाई चालविली होती व पेशव्यांचे काही घोडेस्वार इंग्रजांच्या पिछाडीला जाऊन तिकडूनही ते त्यांच्यावर हल्ला करू लागले होते. परंत कॅप्टन फोर्ड याच्या सैन्यातील लोक ये मिळाल्यामुळे इंग्लिशांना त्यांच्या मदतीचा फायदा झाला. दापोडीहून त्या सेैन्याने ज्या तोफा आणिल्या होत्या, त्या उजव्या बगलेवर ठेवून तेथे पूर्वी ज्या तोफा होत्या त्या इंग्लिश लाइनीच्या मध्यभागी आणण्यात आल्या, व त्या तोफांचा मारा सुरू करण्यात आला. त्यामुळे मराठ्यांच्या लाइनीतील मध्यभागाचे सैन्य मागे हटू लागले. तरी पण पेशव्यांच्या लाइनीतील उजव्या बाजूला जे पायदळ होते, ते अजून टिकाव धरून राहिलेले होते. त्यांनी एका ओढ्याच्या आणि तेथील काही बागांच्या कुंपणाचा आश्रय घेऊन इंग्लिशांच्या डाव्या बाजूवर खूप जोराचा मारा चालविला होता व त्यांनी तेथील इंग्लिश सैन्याला अगदी जेरीस आणिले होते. परंतु कर्नल बर याने आपल्या पलटणीतील काही लोक आणवून तो हल्ला परतविला.
अशा रीतीने खडकीच्या लढाईत मुख्य मुख्य ३-४ ठिकाणी लढाया झाल्या, अशा प्रमाणे लढता लढता आणि पुढे सरता सरता पेशव्यांचे सैन्य जेथे उभे होते तेथपर्यंत इंग्लिश लष्कर येऊन पोहोचले. इतक्या गोष्टी होत आहेत. तो
सात वाजण्याची वेळ होऊन जिकडे तिकडे काळोख पडू पेशव्यांचे सैन्य पुणे शहराकडे माघारी वळले.

अशा प्रकारची लढाई करून रात्र पडली तेव्हा पेशव्यांच्या फौजा स्वाभाविकपणेच पुण्याकडे माघारी वळल्या. या लढाईत मराठ्यांनी जरी इतके कौशल्य दाखविले, तरी त्यांनी इंग्लिश फौजेला पूर्णपणे उध्वस्त करून टाकले नाही, हेही खरे आहे. त्याचप्रमाणे इंग्लिशांनी मराठ्यांचा त्यादिवशी खडकीच्या रणांगणावर पूर्णपणे पराभव केला, असे इग्लिशांनाही म्हणता यावयाचे नाही. खडकीच्या रणांगणावरील विजयाच्या संबंधाने पाहाता दोन्ही पक्षांची बरोबरी झाली, एवढेच फार तर म्हणता येईल.

तीन हजार सैन्याच्या विरुद्ध तीस हजार सैन्याने लढून फक्त बरोबराचा लढाई केली, यात काही मोठेसे शौर्य नाही, असे कदाचित कोणी म्हणेल; पण एकमेकाच्या सैन्याची संख्या कितीही असली (आणि पेशव्यांच्या सैन्याचा संख्या जास्त होती हा काही त्यांचा दोष नव्हे) तरी त्या दिवशीच्या टक्कर दोघांची बरोबरी झालेली होती, ही गोष्ट अगदी निर्विवाद सत्य आहे.
...
बाजीरावसाहेब पर्वतीच्या गच्चीवरून दुर्बिणीतून खडकीची लढाई पाहात बसलेले होते. ( दुर्बीण मॅलेट नामक इंग्रज रेसिडेंटने पुर्वी बक्षिस दिली होती!)...रेसि़डंट ऑफिसर माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन सारखा त्यांच्याशी संपर्कात होता...

1
...खावंदाचे मनात इंग्रज मोडावयाचा नाही. तेव्हा श्रीमंतांची बोलावण्यावर बोलावणी बापू गोखले यांस गेली. शेवटी निदान श्रीमंतांनी सांगून पाठविले, तेव्हा त्यामुळे बापू गोखले शह सोडून माघारी आले."...

________________________________________
पुढे चालू... येरवड्याची लढाई

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Apr 2020 - 9:13 pm | प्रचेतस

छान लिहिताय.
प्रत्येक भागावर प्रतिसाद द्यायला जमत नसले त्री वाचत असतोच.

शशिकांत ओक's picture

3 Apr 2020 - 10:22 pm | शशिकांत ओक

जमेल तेव्हा जरूर माहितीपूर्ण प्रतिसाद द्यावा.

२०० वर्षांपूर्वी इंग्रजांकडील सेनेतील नकाशातून लष्करी कारवाई कशी केली गेली याचे आकलन व्हायला मदत होते. सैन्य व्यूह, विभागणी, महत्त्वाचे निर्णय घ्यायला ते किती महत्वाचे ठरतात ते प्रकर्षाने जाणवते. पेशवेकालीन आपल्या दप्तरखान्यात नकाशे, काही मिळते का?

> पण मोर दीक्षित मराठे हे पेशव्यांचे एक मोठे प्रधान असूनही खडकीच्या लढाईत ते कोणत्या ठिकाणी मारले गेले, ती जागाही आज कोणाला माहीत नाही.

या लढाईचा मोठा नकाशा इथे ऑनलाइन आहे (तोच तुम्ही वर वापरला आहे)
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/da/Plan_of_action_at_th...

हा नकाशा प्रमाणात काढलेला असल्याने लढाईच्या जागा निश्चित करणे मुळीच कठीण नाही.

नकाशाच्या खाली जर तुम्ही ee ही नोट पहिलीत तर त्यांनी मोर दीक्षित पडल्याची जागा दाखवली आहे. पुणे विद्यापीठाच्या मागच्या बाजूला ब्रेमेन चौकातील रस्ता जातो तिथे एक नाला आडवा येतो, त्याच्या काठावर ही जागा आहे.

तुम्ही जर नकाशा मोठा करून पाहिलात तर मराठी फौज भोसलेनगरचा मागचा डोंगर आणि पुणे विद्यापीठ यातल्या मधल्या भागात, चतुशृंगीच्या देवळाच्या समोर उभी होती असे दिसते. लढाई पुणे विद्यापीठाच्या परिसरात झाली.

आजचा नकाशा आणि जुना नकाशा एकमेकांच्या वरती ठेवला (जुन्या नकाशाची transparency कमी करायची आणि डोंगर match करायचे) की जुन्या जागा नक्की आज कठे येतील ते निश्चित सांगता येते. तुलनेने शिवकाळातील फार कमी तपशील आपल्यापर्यंत पोचले आहेत, पण या नंतरच्या लढाईबाबत भरपूर अस्सल कागद, नकाशे आणि वर्णने मिळतात.

> पेशवेकालीन आपल्या दप्तरखान्यात नकाशे, काही मिळते का?

मराठ्यांच्या कागदामध्ये नकाशे आहेत, पण फार थोडे आहेत. खडकी, पुणे यांचे नकाशे यांची मराठ्यांना गरज नव्हती करण तो त्यांच्या रोजच्या जगण्यातला परिसर होता. आणि मराठ्यांची युद्धनीती तशी ओबडधोबड होती, एक प्लॅन बनवून नकाशाप्रमाणे आधी ठरवून त्यांनी केलेली लढाई मला ठाऊक नाही. एक औरंगझेबाने मात्र दोन वेळा नकाशे पाहायला मागितले आहेत, मला वाटते तरबियातखान की कुणीतरी राजगडाचा नकाशा लाकडावर काढून बादशहाला दाखवला होता आणि मग बादशहाने तो पाहून लढाईच्या सूचना केल्या होत्या. पण हे अपवाद. लढाईचा सेनानी शक्यतो स्वतः पाहणी करून हुकूम करत असे, कागदी नकाशे पाहण्याची पद्धत भारतात नव्हती.

आधी सांगितलेल्या पद्धतीने तयार केलेला superimposed नकाशा खाली देतो आहे. त्यावरून या युद्धातल्या सर्व जागा सापडायला अडचण येऊ नये.

मोरदीक्षित जिथे पडले तिथे आता QMTI क्वार्टर्स आणि CSD डेपो आहे. ही जागा सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे तुमचे मित्र अथवा परिचित यांच्याकरवी तिथे स्मारक करता येईल का याची चाचपणी नक्कीच करून पाहता येईल.

नकाशा मुद्दाम मोठा टाकतो आहे, म्हणजे तपशिलात जाऊन पाहता येईल

इथुन डाउनलोड करता येईल
https://imgur.com/a/av9f1CC
https://i.imgur.com/1hjG4r7.jpg

map

शशिकांत ओक's picture

5 Apr 2020 - 3:43 pm | शशिकांत ओक

२०० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची निश्चित जागा १०० वर्षे उलटली तरी उपलब्ध होऊ नये याचा विषाद कै परांजपे यांच्या लेखनातून आला आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकांत इंग्रजांच्या नकाशातून शोधून ५ क्रमांक देऊन ती जागा निश्चित करण्यात यश मिळविले होते असे म्हणता येईल. आजच्या उपलब्ध साधनांचा उपयोग करून तुम्ही दाखवलेली जागा जास्त अचुक ठरायला मदत झाली आहे.
जागा १००, २शे मीटर पुढे मागे झाली तरी एका वीराचे स्मारक व्हायला हवे. आजूबाजूला फंदफितुरीची लागण झाली असताना त्यांनी दाखवलेला जिगरबाज मृत्यू या लढाईला उदात्त करून जातो. पुढील भागात तीच वेळ बापू गोखल्यांवर येणार आहे!

आजचा नकाशा आणि जुना नकाशा एकमेकांच्या वरती ठेवला (जुन्या नकाशाची transparency कमी करायची आणि डोंगर match करायचे) की जुन्या जागा नक्की आज कठे येतील ते निश्चित सांगता येते.

माझ्या कष्टांना लक्षात घेऊन, पुढाकार घेऊन आपण सहकार्य करत आहात याचा मला अभिमान वाटतो. यापुढेही असेच सहकार्य घेत पुढे जात राहिले पाहिजे.
येरवड्याची लढाईचा त्यांच्या पुस्तकातील नकाशा मला सापडलेला नाही.
तो आपल्या प्रयत्नानी मिळाला तर फारच उत्तम...