धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...
जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत. पण राजीव जैन, राकेश जैन, महावीर जैन, अशोक जैन असे अनेक जैन बांधव माझ्या परिचयाचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक मोठ्या उद्योगांना नाव देतेवेळी जैन शब्दाचा प्रकर्षाने वापर केला गेला आहे - जसे की, जैन टीवी, जैन इरिगेशन, इत्यादी. हिंदू ह्या वर्तमानपत्राचा अपवाद वगळता मला जैनेतर कुठल्याही धर्माचा कुठल्या ही उद्योगाकरिता फारसा वापर केल्याचे आढळलेले नाही.
जैनांनी आपल्या धर्माला (म्हणजे फक्त जैन या शब्दाला) अशा प्रकारे आपल्या रोजच्या व्यवहारातील पदार्थांना, स्वत:च्या नावाला, उद्योगाच्या नावाला जोडून त्याचा उच्चार जास्तीत जास्त वेळा कानावर पडेल अशी व्यवस्था करून ठेवलीय. डिसेंबर १९९९ ते फेब्रुवारी २००० दरम्यान मी बिहार मधील एका अतिशय प्रसिद्ध अशा जैन धर्मीयांच्या सामाजिक संस्थेत दोन महिने काम केले होते, त्यावेळी माझ्या पाहण्यात असे आले की तिथल्या जैन साध्वी वेगळ्या प्रकारची पादत्राणे वापरतात (ज्यात प्राण्यांच्या कातडीचा वापर केला गेला नाही). त्याचप्रमाणे त्या काळी वापरात असलेला रोल फिल्मचा कॆमेरा त्यांना चालत नसे. त्यांचे फोटो काढण्यासाठी डीजीटल कॆमेराच वापरला जावा असा त्यांचा आग्रह असे (तेव्हा डीजीटल कॆमेरा अतिशय महाग - साधारणत: रू.५०,०००/- च्या आसपास होता). रोल फिल्म ला प्राण्यांपासून मिळविलेले जिलेटीन लावलेले असते असे त्यांचे म्हणणे होते.
अशा प्रकारे आपल्या धर्मातील तत्वांचे अनुसरण करण्यात हा धर्म अतिशय काटेकोर असल्याचे इतरही अनेक प्रसंगी दिसून येते. उदाहरणार्थ, मांसाहारी व्यक्तिंना आपल्या वसाहतीत जागा न देणे, महावीर जयंतीच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे, तसेच हा अथवा इतर कोणताही जैन सण व मुस्लिमांची बकरी ईद एकाच दिवशी आल्यास मुस्लिमांना त्यांचा सणात केला जाणारा बकर्याच्या आहूतीचा विधी पुढे ढकलण्याची प्रेमळ सक्ती करणे. (खरे तर हे सायकल ने ट्रक ला "मला वाट देण्याकरिता बाजूला हो" असे सांगितल्या सारखे वाटते. गंमत म्हणजे मुस्लिम बांधव ही जैनांची ही सूचना विनातक्रार मान्य करतात.)
आता या सगळ्या गोष्टींमुळे जैन धर्माची तत्त्वे या समाजात अगदी खोलवर रुजली आहेत असा भास होतो. पण यातला फोलपणा जाणवून देणार्या काही गोष्टी मला इथे मांडाव्याशा वाटतात.
१. परवाच वीसीडीवर २०१० चा अतियशस्वी चित्रपट राजनीती पाहत होतो. चित्रपट जास्त कंटाळवाणा होता की त्यात ठराविक अंतराने सतत त्रस्त करणार्या अल कबीर च्या जाहिराती जास्त कंटाळवाण्या होत्या हे काही मी ठरवू शकलो नाही. या अल कबीर ला इतके वर्ष जाहिरातीची फारशी गरज कधी पडली नव्हती आणि तरी देखील हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याच्या भागीदारांपैकी सर्वात मोठा भागीदार हा जैन धर्मीय आहे. (संदर्भ: http://visfot.com/index.php/jan_jeevan/477.html). म्हणजे जैनांच्या नेहमीच्या सवयीनुसार या कत्तलखान्याच्या नावात जैन शब्द असायला हवा होता पण ते गैरसोयीचे असल्याने तसे केले गेलेले नाही.
२. पुण्यातील आकुर्डी येथे एक जैन स्थानक (जैन धर्मीयांचे प्रार्थना स्थळ) आहे. या स्थानकाच्या १०० मीटर परिसरात एक परमीट रूम उघडण्यात आले आहे. धार्मिक स्थळाच्या १०० मीटर परिसरात मद्य विकण्यास कायद्याने परवानगी नाही तरीही असे राजरोसपणे चालु आहे कारण या स्थानकाच्या विश्वस्तांपैकीच एक जण हा त्या परमीट रूमचा देखील भागीदार आहे. यावर कडी म्हणजे या परमीट रूमला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा स्थानिक नगरसेवक मुस्लिम धर्मीय आहे.
या दोन अतिशय प्रातिनिधिक घटना आहे. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. माझा मुख्य आक्षेप असा आहे की, जैन बांधव आपल्या धार्मिक तत्त्वांचे जिथे तिथे गोडवे गात फिरत असतात. इतरांनाही अहिंसा, सदाचार व शाकाहाराचा संदेश देतात (ज्याविषयी माझी काहीच हरकत नाही), पण मग त्यांनी वरील दोन घटनांचा तीव्र विरोध व जाहीर निषेध का केला नाहीय? जैन लोकांचे प्रसारमाध्यमात व समाजाच्या इतर क्षेत्रांमध्येही लक्षणीय प्राबल्य आहे; त्याचा उपयोग करून ते मनात आणले तर आपल्या बांधवांकडून घडणार्या अशा गोष्टी निश्चितच थांबवू शकतात.
मला हे ठाऊक आहे की प्रत्येक धर्माच्या लोकांपैकी काही जण अशा प्रकारे चूकीचे आचरण करत असतील पण जेव्हा आपण परधर्मीयांच्या अशा आचरणाचा निषेध करतो तेव्हा प्रथम स्वधर्माच्या लोकांकडून असे काही घडत नाहीयना याची खात्री करून घ्यायला हवी आणि तसे घडत असेल तर प्रथम आपण आपल्या वाट चुकलेल्या बांधवांचा निषेध केला पाहिजे जसा की मी स्वत: एक जैन धर्मीय या नात्याने या लेखनाद्वारे करीत आहे.
http://beftiac.blogspot.com/2010/10/blog-post_08.html
प्रतिसादांना उत्तरे देण्याकरिता पुरवणी लेखन
या लेखाच्या प्रतिसादात अनेकांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या प्रतिसादांना तिथल्या तिथे उत्तरे देण्याचा मी कमाल प्रयत्न केला आहे. अर्थात अनेक वाचकांच्या प्रतिसादात काही मुद्दे पुन्हा पुन्हा आले आहेत. त्या सर्वांना त्या त्या ठिकाणी एकसारखी प्रत्युत्तरे देण्यापेक्षा अशा मुद्यांना या लेखातच उत्तरे द्यावी या उद्देशाने हे पुरवणी लेखन करीत आहे. या पुरवणी मजकूराच्या वर असणार्या मूळ लेखात कोणतेही संपादन केलेले नाहीय.
१. अनेकांनी जैन धर्मीयांच्या कट्टरपणाचा, विखारीपणाचा, तसेच त्यांच्या आचरण व शिकवणूकीतील विसंगतींचा मुद्दा मांडला आहेत. याबद्दल एक उदाहरण द्यावेसे वाटते. काही वर्षांपुर्वी हिंसक प्रचार करणार्या एका धार्मिक नेत्याला जैन धर्मीयांच्या दादावाडी (पुणे) मंदिरात आमंत्रण दिले गेले होते व ते जैन मंदिरात आले देखील होते. http://articles.timesofindia.indiatimes.com/keyword/jain-temple/featured/4 अशा लोकांना बोलवायचे असेल तर एरवी अहिंसेचे गोडवे गाण्यात तरी काय अर्थ आहे?
२. जैन ब्रॅन्डींगची मी बरीच उदाहरणे दिली होती पण त्यातील प्रामुख्य़ाने खाण्याच्याच बाबींची चर्चा झाली. अनेकांनी अशा प्रकारे जैन धर्मीयांना साजेसे अन्नपदार्थ हॉटेला त उपलब्ध करून देण्यात काहीच गैर नसल्याचे म्हंटले आहे. मलाही यात काही गैर आहे असे म्हणायचे नव्हतेच. मला स्वत:ला देखील माझ्या आवडीप्रमाणे हॉटेलात अन्न उपलब्ध असावे असे वाटतेच. आक्षेप आहे तो अशा पदार्थांच्या नावामागे जैन हा शब्द लावण्यास. कारण यातून बरेच गैर समज निर्माण होतात. उदाहरणार्थ - जैन पावभाजी - आता या पावभाजीत कांदा, लसूण, बटाटा आदी पदार्थ नसतात हे खरे. परंतू तरीही तिला जैन पावभाजी संबोधणे चूकीचेच आहे. जैन धर्मीयांच्या अन्नग्रहणाच्या काटेकोर नियमानुसार पाव देखील जैन आहारात समाविष्ट होऊ शकत नाही. तो किण्वन प्रक्रियेने बनतो व त्यात जंतुंची वाढ होत असते. याप्रमाणेच जैन पिझ्झा हा देखील खर्या अर्थाने जैन आहार होऊ शकत नाही. पण गंमतीचा भाग असा की बाजारात मिळणारे बहुतेक सर्व पदार्थ खाण्याची इच्छा तर असतेच, त्याचवेळी आपण धर्म पाळतो असेही दाखवायचे असते मग त्या पदार्थात थातुर मातुर बदल करून त्याच्यामागे जैन उपाधी चिकटवून हादडणे चालु होते. आता इतके जैन पदार्थ बाजारात मिळत आहेत की जैन मांस व जैन अंडी देखील मेन्यूकार्ड मध्ये विराजमान होतात की काय अशी शंका वाटू लागली आहे.
याबाबत मॅगी टोमॅटो सॉस उत्पादकांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांनी त्यांच्या सॉसमध्ये कांदा व लसुणाशिवायचा देखील एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, परंतू त्यावर जैन सॉस असे न लिहीता सॉस विदाऊट ओनिअन ऍन्ड गार्लिक असे लिहीले आहे.
३. मी लेखात निवडलेल्या बाबी फारशा त्रासदायक नाहीत असाही काहींचा आक्षेप होता. हे मलाही मान्य आहे. परंतु एक लक्षात घ्या की एक जैन धर्मीय म्हणून जगताना मी आमच्या धर्माच्या साधु साध्वींचे अतिशय कडक नियम पाहिले आहेत. हे लोक किती क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करतात हे कदाचित आपणास ठाऊक नसेल म्हणून त्याबद्दलची ही उदाहरणे इथे मांडू इच्छितो - स्थानक या प्रार्थना स्थलात ध्यान करतेवेळि इलेक्ट्रॉनिक घड्याळ वापरू नये कारण त्यातील विद्युत प्रभावा मुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, नळाचे वाहते पाणी वापरू नये कारण या प्रवाहामुळे सुक्ष्म जीवांची हत्या होते, इत्यादी. असे अजब तर्कशास्त्र रोजच्या व्यवहारातील गोष्टींना लावले जाते. इतकेच नव्हे तर जैन धर्मीयांच्या धार्मिक / सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे इतर धर्मीय झाडुवाले, वाहनचालक आदी आर्थिक दृष्ट्या निम्नस्तरावर असलेल्यांना गोड बोलुन मांसाहार वर्ज्य करण्याच्या शपथा घ्यायला लावल्या जातात. अशा प्रकारे इतरांच्या गळी आपले धार्मिक आचरण उतरवून त्यांना बाटविणारे आमचे हे समाजधुरीण आमचाच एखादा बांधव कत्तलखाना / मद्यालय अशा व्यवसायांमध्ये सक्रिय असतो तेव्हा त्याला खडसावून जाब का विचारीत नाहीत याचा मला राग येतो. तीन वर्षांपूर्वी शिरूर स्थित एका गुटखा व्यापार्याच्या कन्येने नऊ दिवस उपवास केले होते त्याचा मोठा समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या समारंभात जैन साध्वींनी सदर कन्यारत्नाचे कौतुक केलेच परंतू तिच्या गुटखा किंग पित्याची देखील सामाजिक बांधिलकी जपणारे व्यावसायिक असे म्हणत तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. देणगी मिळते म्हणून असे मिंधे आचरण करणार्या साधु साध्वींचा मला जराही आदर वाटत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
मी दहा वर्षे जैन धर्मीय
छान लेख लिहिलास चेतन.
पहिल्या अनुभवाच्या बाबतीत गैर
स्पष्टीकरण
यातले बरेच प्रतिसाद मी
''सोलापूरचे जैन यामध्ये आचरण
१३
मला 26 हा आकडा आवडतो....MH-26
लेख चांगला आहेअनेकांनी तसे
पुरवणी लेखन वाचले
<< तुमची मते निर्भीड आहेत
मित्रा या लेखावरून
त्यांचे एका मारवाड्याची गोष्ट
व्यवसायात सचोटेी हा एक जैन
जैन लोकांचा लाघवीपणा हा
चांगला लेख
ते तसेच आहे...
मधले काही प्रतिसाद हाकललेले
लेख आणि त्यावरील चर्चा