मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

सोत्रि · · लेखमाला

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स


chawadee

चिंतामणी"सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो-लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलंय!" चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.
नारुतात्या"नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, तेही एकदम सोशल मीडिया-बीडिया. हम्म, जोरात आहे गाडी!" नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.
"नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो!" घारुअण्णा तिरिमिरीत. "अहो चिंतोपंत, कसला व्हिडिओ आणि काय आहे काय त्या व्हिडिओत एवढं व्हायरल होण्यासारखं?" बारामतीकर. "व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?" नारुतात्या वेड पांघरत. "नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे." चिंतोपंत. "म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?" बारामतीकर मोठा आ करत. भुजबळकाका"बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी कामं रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली" भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत. "म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते!" नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत. "तितकं सोपं नाहीये ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही." चिंतोपंत. "विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचं. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?" घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत. "घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं." इति भुजबळकाका. "अहो बहुजनहृदयसम्राट, असं कसं? चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडिओत काही तथ्य असेलच ना." घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत. चिंतोपंत"होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गूगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हेसुद्धा सांगतंय, आता बोला!" चिंतोपंत. "हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?" घारुअण्णा चिंताग्रस्त होत. "काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!" इति बारामतीकर. "अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसंच टेस्ट करण्यासाठी केला जातोय." इति बहुजनहृयदयसम्राट भुजबळकाका. "काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!" घारुअण्णा बावचळून जात. "अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्यापादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाइक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वात क्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसअ‍ॅप्स - म्हणजे फोटो प्रोसेस करणारी अ‍ॅप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत. गूगलचा 'इमेज कॅप्चा' हाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर करून वापरकर्ता हा रोबोटिक यूजर नाही, हे ठरवत असतो." भुजबळकाका समजावून सांगत...भुजबळकाका "आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खूप सारा विदा (डेटा) - अक्षरशः टेराबाइट्समध्ये - पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणंही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला, तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार." इति भुजबळकाका. "अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!" नारुतात्या 'आजी म्या ब्रह्म पाहिले' असा चेहरा करत. "हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!" बारामतीकर सुस्कारा सोडत. "अहो, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे." भुजबळकाका शांतपणे. चिंतोपंत"अहो, पण अमेरिकेत तर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. अ‍ॅमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्ट करून मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवणही करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!" चिंतामणी चिंताग्रस्त होत. "साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार, हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला." भुजबळकाका. "म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल, तो तरून बारामतीकर जाईल हा अवघड काळ, काय बरोबर ना?" बारामतीकर विचार करत. "बारामतीकर, ते खरंच हो. पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असंच राहूनराहून वाटतंय!" साशंक चिंतोपंत. "म्हणजे त्या इंग्लिश सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रिक्स सिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका?" घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत. "अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!" भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत. "आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही असं नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?" नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात. सोकाजीनाना "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ही काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावलं आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला आणखी बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचं आणि नोकर्‍यांचं नेमकं काय होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणं उचित ठरणार नाही. त्याची कास धरून पुढे जावंच लागेल. औद्योगिक क्रांतीला, मशीन्सना आणि अलीकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगीकारावंच लागेल. पणह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंगमुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही, ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या 'जाणिवेत' न राहता आधिभौतिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने येणार्‍या नेणिवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेचं अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही, ह्याची काळजी घेतली की झालं!" सोकाजीनाना मंद हसत. "पटतंय का? चला तर मग. आज चहा नको. बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी, ते घ्या आणि तोंड गोड करा!" सोकाजीनाना मिश्किलीने. सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचं ताट फिरवू लागले.


चित्रे श्रेयनिर्देश: अभ्या..

वाचने 76229 वाचनखूण प्रतिक्रिया 58

In reply to by जॉनविक्क

गामा पैलवान Wed, 09/11/2019 - 17:36
जॉनविक्क, मला म्हणायचंय ते थोडक्यात सांगतो. मला कृत्रिम बुद्धिमत्तेची आजिबात भीती वाटंत नाही. कृत्रिम बथ्थडपणाची मात्र वाटते. कृत्रिम बथ्थडपणाची उदाहरणं देतो : कृब १. माणूस हा गरजांचा समुच्चय आहे. त्यामुळे त्याच्या गरजा भागवणारी यंत्र विकसित झाली की तो आपसूक नियंत्रणात येईल. कृब २. कॉर्पोरेट अर्थव्यवस्था ही सुबत्तेची जननी आहे. कृब ३. राष्ट्रीय सरकार कर्जात बुडलेलं आहे. कृब ४. बँका उत्पादक कार्ये करतात. कृब ५. परकीय गुंतवणुकीशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही. कृब ६. काँग्रेसने भारतास स्वातंत्र्य मिळवून दिलं. कृब ७. तत्पूर्वी इंग्रजांनी पूर्ण भारतवर दीडशे वर्षं राज्य केलं. कृब ८. तत्पूर्वी मोगलांनी पूर्ण भारतावर राज्य केलं. कृब ९. देवदासी ही हिंदू प्रथा आहे. यादी अपूर्ण .... श्रद्धा असेल तर उपरोक्त बथ्थडपणांतनं आरपार पाहता येईल. ती श्रद्धा भगवंतांवर असेल तर सोन्याहून पिवळं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जॉनविक्क Wed, 09/11/2019 - 18:00
मला कृत्रिम बुद्धिमत्तेची आजिबात भीती वाटंत नाही. कृत्रिम बथ्थडपणाची मात्र वाटते.
मला तर नैसर्गिक बथ्थडपणाचीही तितकीच भीती वाटते.

In reply to by जॉनविक्क

गामा पैलवान गुरुवार, 09/12/2019 - 00:15
जॉनविक्क, मला नैसर्गिक बथ्थडपणाची तितकीशी भीती वाटंत नाही. कारण हा प्रकार यथोचित भक्ती व/वा बुद्धीद्वारे दूर होऊ शकतो. मात्र कृत्रिम बथ्थडपणा हा मेकॉलेछाप शिक्षणात काळजीपूर्वक रीतीने जोपासलेला दुर्गुण आहे. नैसर्गिक बथ्थड माणूस स्वत:ला बथ्थड समजतो, तर कृत्रिम बथ्थड माणूस स्वत:स सर्वज्ञ समजतो. हा दोहोंतील भेद आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जालिम लोशन गुरुवार, 09/12/2019 - 00:47
त्याने एतत् देशींना नोकर्‍यांसाठी तयार करण्यासाठी घोका आणी ओका शिक्षण पध्दत आणली. त्यात चिकीत्सेला स्थान नाही. असे का? हा प्रश्न पडण्याला महत्व ह्या पध्दतीत नाही. आणी पुढच्या पिढ्यांनी इंग्रजानी सांगितले म्हणजे ते खरेच आहे ही अंधश्रध्दा जोपासली त्या मुळे शास्रीय चिकीत्सा करणारी कुतुहल, जिज्ञासा जोपासणारी ईकोसिस्टीमच तयार झाली नाही. हा दोष व्येवस्थेचा आहे. भारतीय समाजाचा आहे.

Rajesh188 Tue, 09/10/2019 - 21:01
माणूस २३००० हजार वर्षांपूर्वी शेती करू लागला म्हणजे तो एका जागेवर स्थिर झाला . पण मानवी जीवन खरे बदलले ते १७ व्या शतकाच्या शेवटला आणि १८ व्या शतकाच्या सुरवातीला ह्याच काळात महत्वाचे शोध लागले आणि मानवी आयुष्यात अमुलाग्र बदल झाला तो मानवी इतिहासाच्या हजारो वर्षात झाला नव्हता . मानवी जीवन अमुलाग्र बदलणारा वीजेचा शोध असेल किंवा वाफेवर चालणाऱ्या इंजिन चा शोध असेल,किंवा tv आणि रेडिओ चा शोध असेल हे सर्व ह्याच काळात लागले . आणि हे सर्व शोधणारे कोण्ही उच्च शिक्षित व्यक्ती नव्हते .शालेय उच्च शिक्षण चा ह्या संशोधकांचा जास्त मोठा संबंध सुद्धा नव्हता. ना ह्याचे कोण्ही प्रायोजक होते ना संशोधन करणे हे त्यांचे आर्थिक प्राप्तीचा मार्ग होता ना तसा काही त्यांचा उध्येश होता . स्वतः च्या बुध्दी नी त्यांनी शोध लावले . जन्मजात प्रतिभा त्यांच्या मध्ये होती . आणि ह्याच मूळ शोधावर माणसांनी उत्तुंग भरारी मारली . १७ शतक ते आज २१ शतक ह्या चारशे वर्षाच्या काळात जी मानवाची प्रगती झाली तिचा वेग अतिशय जास्त होता . मग मला नेहमी हाच प्रश्न पडतो ४०० वर्षात जी माणसांनी अतिशय वेगाने प्रगती केली त्याच्या पाठी काही संकेत तर नसतील . ज्या वेगाने माणूस प्रगती करत आहे म्हणजे अतिशय तीव्र वेगाने तो विनाशाकडे तर जात नाही ना? आता संशोधन हे स्पॉन्सर असते,संशोधक व्यवसायी असतात . आणि पैसे कमविणे आणि वर्चस्व स्थापित करणे हाच हेतू असतो . आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो विकास होत आहे त्या पाठी सुद्धा तोच हेतू आहे . मशीन द्वारे काम करून मानवाला पर्याय देणे हा आजचा ज्वलंत प्रश्न नाही . कारण मानवी बळ खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे .. जेव्हा खूप मोठा जनसमूह आर्थिक व्यवस्था मधून बाहेर फेकला जाईल तेव्हा सरळ त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेचा आकार कमी होण्यात होईल . सर्व च देशांच्या अर्थव्यवस्था चा आकार संकुचित होईल . आता नोकरी नसेल तरी अन्न वस्त्र आणि निवारा मिळेल एवढी आर्थिक प्राप्ती चे मार्ग उपलब्ध आहेत अगदी भिक मागून किंवा शेतमजुरी करून सुद्धा माणूस आपल्या गरजा भागवता आहे . पण जेव्हा सर्वच कामे कृत्रिम बुध्दीमत्ता असणारे मशीन करू लागले तर अर्थ प्राप्तीचा कोणताच मार्ग खूप मोठ्या जनसमूह समोर राहणार नाही आणि हा अस्वस्थ वर्ग हिंसाचाराच्या मार्गाने जावू शकतो. Syria आणि बऱ्याच अशांत देशाची उदाहरणे आहेत . सर्वात महत्वाचे हे जे प्रचंड उत्पादन खरेदी करणार कोण. सुरवातीला परिस्थिती chya रेट्याने सर्व ह्याच प्रगतीच्या मार्गाने जातील पण त्याचे दुष्परिणाम दिसू लागतील तेव्हा थांबावे लागेल . लोकशाही देशात नागरिकांचा प्रचंड दबाव सरकार वर येईल आणि तो दबाव सरकार सहन करू शकणार नाही . खरे तर आता जे महत्वाचे प्रश्न आहेत जे मानवी अस्तित्वाला आव्हान देत आहेत . ते आहेत वातावरणातील बदल . ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे पृथ्वी मानवी वसाहती साठी उपयोगी राहणार नाही . पावसाचे बदलेले वेळापत्रक . हे अशा प्रकारचे महत्वाचे प्रश्न न सोडवता ज्याची काही गरजच नाही अशा प्रगती chya पाठीमागे माणूस का थावत आहे . विनाशाकडे जाण्यासाठी? हे तर कारण नाही ना ह्या वेगा पाठी

In reply to by Rajesh188

जॉनविक्क Wed, 09/11/2019 - 02:18
फार पूर्वीपासून घडत आले आहे. फरक इतकाच आहे की त्यातून जो त्रास झाला त्याला मानवाने देवाची मर्जी मानली व आता जे होतंय त्याला स्वतःचे कर्तृत्व म्हणायची जाण विकसित होणे म्हणता येईल. तेंव्हा हो गेल्या400 वर्षात मानवाने कोणते कर्तृत्व आपले असू शकते हे ओळखन्यात कमालीची प्रगती नक्कीच साधली आहे

Rajesh188 गुरुवार, 09/12/2019 - 13:29
ह्या विशाल विश्वाची रचनाच एक परफेक्ट सायन्स आहे . आणि त्यातील थोडेसे ज्ञान आपल्याला आता कुठे झाले आहे . तरी त्या माहीत झालेल्या ज्ञान चा वापर तारतम्य नी करणे मानवाला जमले नाही तर . उत्तुंग झेप घेण्यापासून माणूस भरकटला जाईल. त्या मुळे कृत्रिम बुध्दी मत्ता अजुन विकसित करावी पण तिचा वापर मानव हितासाठी च करावे . अजुन बऱ्याच घटने मागील विज्ञान आपल्याला माहीत नाही .

In reply to by Rajesh188

जॉनविक्क गुरुवार, 09/12/2019 - 14:55
तर तुम्ही आम्ही मिपावर कशाला पडीक राहिलो असतो ? जिथे नैसर्गिक बुध्धी मानव हिताचे काम करेल याचा भरवसा नाही तिथे कृत्रिम बुध्दीमत्ता ते साध्य करेल असे मानणे अंधश्रद्धा ठरत नाही का ?