मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!

ज्योति अळवणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज! नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते. येणाऱ्या बाळाबरोबरच होणाऱ्या आई-बाबांचं आयुष्य बदलतं. त्यात जर घरात इतर मंडळी असतील तर मग सुरू होते खरी भावनिक लढाई. सांभाळावी लागणारी सगळीच नाती.... आपली नोकरी किंवा व्यवसाय... सण-वार.... पै-पाहुणा... यातून मग एकमेकांना फारसा वेळ देता येतोच असं नाही. त्यातून कधी कधी होणारी भावनिक कुचंबणा ही दोघांचीही असते. केवळ पत्नी/आईच सगळं सांभाळत असते असं माझं मत नाही; तर अनेकदा पती/वडील देखील अनेक भावनिक दोलायमानतेतून जात असतात. या सगळ्याचा परिणाम मूळच्या पती-पत्नी या नात्यावर नकळतपणे होत असतो. पहाता-पहाता दिवस-महिने-वर्ष संपतात. मुलं मोठी होतात आणि त्यांच्या आयुष्याच्या मार्गी लागतात. पण तोवर पती-पत्नींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असतो. एकमेकांबरोबर ते असतात तर खरे.... सहली.... मित्र-मैत्रिणींबरोबर भेटी-गाठी.... सण-समारंभ एकत्र साजरे करणं सगळं अगदी बिनबोभाट चालू असतं. पण मनाचं जोडलेलं असणं तितकंच महत्वाच नाही का? अनेकदा ते अभावानेच दिसतं. सवईमुळे एकमेकांची घेतलेली काळजी... किंवा आता या वयाला येऊन मी एकटी पडेन किंवा एकटा पडेन म्हणून साथीदाराला सांभाळणं वेगळं आणि मनात असलेल्या प्रेमामुळे सोबत असणं वेगळं. अर्थात हे 'प्रेम' प्रत्येकानं आपलं आपण ठरवायचं असतं. लग्न! केवळ शिक्षण पूर्ण करून नोकरी-धंद्याला लागलं....वयात आलं....प्रेम केलं.... म्हणून करतो आपण. आपली मानसिकताच ती असते. पण कधी कोणी असा विचार का नाही करत.... सोबत राहण्यासाठी.... आयुष्य एकत्र समरसून जगण्यासाठी लग्न करावं. मुलं जन्माला घालणे.... माझ्या/तुझया आईवडिलांना सांभाळणे.... आर्थिक जवाबदऱ्या एकत्र सांभाळणे हे लग्नाचे मुद्दे का असावेत? काही दिवसांपुर्वी एका बावीस वर्षाच्या मुलीने मला सांगितले की मी आता हळूहळू माझ्या करियरमध्ये काहीतरी करायला लागले आहे. अजून थोडा वेळ लागेल पण मला माहीत आहे की मी पुढे जाऊन नक्की यशस्वी होईन. माझ्या आई-वडिलांची मला साथ देखील आहे. सगळं छान चालू आहे पण अलीकडे आई-बाबांना माझ्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. खर सांगू का मला तर वाटतं की मला आयुष्यात पुरुषाची आधारासाठी गरजच नाही. पण सुखी समाधानी आयुष्यासाठी सोबती हवा आहे; आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी सोबत हवी आहे. पण म्हणून लग्नाचा अट्टहास नाही करायचा मला. इतकी वर्षे मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहिले त्यांची तत्व-त्यांचे विचार... या घरातल्या सवई सोडून आणि केवळ लग्न केलं म्हणून एखाद्या मुलाच्या घरातले विचार-आचार मान्य करायचे हे मला पटत नाही आहे. अर्थात त्याचा अर्थ मी केवळ स्त्रीवादी विचारांची किंवा मुक्त नात्यात राहण्याच्या विचारांची आहे अस देखील नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की लग्न करताना आयुष्य जोडीने जगावं... लग्नामुळे येणाऱ्या नवीन जवाबदऱ्या दोघांनी सांभाळून आपल्या वयाला आवश्यक असे मोकळे श्वास देखील दोघांनी अनुभवावेत. केवळ लग्न झालं म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींना दोघांनीही तिलांजली द्यायची गरज नाही... मात्र लग्नाच्या बंधीलकीला विसरायचं नाही.  काहीसे पटले मला तिचे विचार. पण इतके आदर्शवादी संसार आपल्या आजूबाजूला होताना आपण बघतो तरी का? लग्न म्हणजे 'जुळवून घेणे' असं अजूनतरी आपल्या समाजात आहे. दुर्दैवाने अजूनही आपण घरच्या कर्त्याची भूमिका केवळ पुरुषाकडे देतो. त्यामुळे अनेकदा पुरुष त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त मोठे वाटतात; आणि याउलट स्त्रीची तिची हुशारी... समजूतदारपणा तिने किती वर्षे संसार केला आहे यावर ठरवला जातो. त्यामुळे तसे म्हंटले तर दोघांवरही अन्यायच नाही का? मुलगा त्याच वय विसरून जातो... आणि वयाबरोबर गुलाबी ढगसुद्धा... मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात! .... आणि मग मी वर म्हंटल्याप्रमाणे अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. मात्र आजची पिढी थोडी वेगळी आहे... काहीशी स्वतंत्र विचारांची आहे.... मागील पिढीमध्ये लग्नाची बोलणी होताना जवाबदाऱ्यांची जंत्री मोजली जायची. मात्र आजच्या पिढीमध्ये वयक्तिक आणि जोडीदाराच्या स्वप्नांचा अगोदर विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. मला वाटतं बदल होतो आहे.... चांगला की वाईट हे काळच ठरवेल... पण बदल होणे ही समाजव्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे आजच्या लग्नाळू मुलांच्या आणि मुलींच्या पालकांनी त्यांच्या विचारांना समजून घेणं आवश्यक आहे. 'आमच्या वेळी असं नव्हतं.' 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. थोडं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे की! आपल्याला खूप काही करायचं होतं... कदाचित आपण नाही करू शकलो... पण आजची मुलं प्रयत्न करत आहेत... तर करू देत की! त्यांच्या पाठीशी उभं राहून 'क्या जमाना बदल राहा हे?' हा प्रश्न विचारण्यापेक्षा... 'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.

वाचने 30776 वाचनखूण प्रतिक्रिया 62

In reply to by ज्योति अळवणी

जॉनविक्क Sat, 06/22/2019 - 13:24
अहो इथे जुन्या नात्यातील गुंतागुंत सुटत नाही तिथे अजून नवीन काही समजून घ्यायचा अट्टहास करावाच का असा प्रश्न आपणास कधी पडला आहे ?

यशोधरा Fri, 06/21/2019 - 21:53
मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात!
सिरीयसली?? वय वर्षे बावीस फक्त असणारी मुलगी तुमच्याशी इतक्या प्रगल्भ रीत्या बोलली, हे ज्या परिच्छेदात लिहिलं आहेत, त्याच्याच पुढच्या परिच्छेदात शेवटी हे वाक्य? लेख अतिशय विस्कळीत वाटला आणि आजच्या मुलींना जबाबदाऱ्या नसतात आणि त्या स्वप्नांच्या जगात असतात, हे वाक्य तर प्रचंड खटकणार आहे. असो.

In reply to by यशोधरा

ज्योति अळवणी Fri, 06/21/2019 - 22:16
कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं गेलं नसेल यशोधराजी. मुली प्रगल्भ असतातच. पण अनेकदा लग्नानंतर अनेक वर्षे त्यांच्यावर महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येत नाही. त्यामुळे कदाचित त्यांची नवऱ्याकडून अपेक्षाच वेगळी असते, असं मला मांडायचं होतं

In reply to by ज्योति अळवणी

यशोधरा Fri, 06/21/2019 - 22:31
वेळ न येणं आणि निर्णय घेऊ न देणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. मुलींना निर्णय घेण्याची वेळ का येत नाही? प्रत्येक घरात असं होतच, असंही नाही पण. जाऊदेत झालं. आजकालच्या बऱ्याच मुली फार स्वतंत्र बाण्याच्या असतात हो, आणि ती चांगली गोष्ट आहे. आर्थिक परिस्थितीवर सुद्धा आता पूर्णांशाने काही अवलंबून राहिले नाही. कठीण आर्थिक परिस्थितीशी दोन हात करून, कामे करून, पैसे जमवून डबल ग्रॅज्युएशन करून आता उत्तम नोकरी करणाऱ्या आणि घराची जबाबदारी उचललेल्या अतिशय प्रगल्भ मुली मी पाहिल्या आहेत. तुम्ही लिहिलंय तितक्या गोंधळलेल्या नसतात मुली.

In reply to by यशोधरा

ज्योति अळवणी Fri, 06/21/2019 - 22:53
मी देखील तेच म्हणते आहे. अलीकडच्या मुलींचे विचार आणि मतं स्पष्ट असतात. पूर्वी म्हणजे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पर्यंत मुलींचे विचार स्पष्ट असायचे. पण काहीसा दबाव असायचा सासरचा. पुरुषांना कर्ता मानणं आणि स्त्रीला निर्णय घेण्याची मुभा न देणं हे मागील पिढीत होतं. हे ज्यांनी भोगलं आहे किमान त्यांनी आजच्या तरुण पिढीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं

In reply to by ज्योति अळवणी

यशोधरा Fri, 06/21/2019 - 22:33
त्यामुळे कदाचित त्यांची नवऱ्याकडून अपेक्षाच वेगळी असते, 
वेगळी अपेक्षा असते, म्हणजे काय अपेक्षा असते/ असतात? उदाहरणार्थ?

In reply to by यशोधरा

ज्योति अळवणी Fri, 06/21/2019 - 23:00
अगदी पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुली छान शिक्षण, नोकरी करायला लागल्याचं होत्या. पण लग्नाचं वय झालं की स्वयंपाक, सासू सासऱ्यांशी वाद घालू नये, नवऱ्याचं काही पटलं नाही तर सर्वांसमोर वाद घालू नकोस हे सांगण्यास सुरवात होत असे. हा एक मुद्दा. नवऱ्याकडून असणाऱ्या अपेक्षा म्हणजे तिला मान मिळावा. ते दोघेच असताना तो जसा समजूतदार असतो तसच त्याने सासरच्या इतर लोकांसमोर तिच्याशी राहावं या अपेक्षा आणि ही स्वप्न होती अगदी अलीकडच्या काळापर्यंत. एक दबाव असायचाच मुलींच्या मनात. मात्र आता मुली त्यामानाने स्पष्टपणे आपलं मत मांडतात. हेच माझं देखील मत आहे

In reply to by ज्योति अळवणी

यशोधरा Sat, 06/22/2019 - 08:34
ज्योती ताई, लेख आणि एकूण प्रतिसाद बघता विषयाची मांडणी व्यवस्थित नाहीये हे तर झालेच पण तुमच्या स्वतःच्या मनातही गोंधळ आहे, हे जाणवते. मुली प्रगल्भ असतात पण निर्णय घेत नाहीत, नवऱ्याकडून वेगळी अपेक्षा करतात हे इतके परस्पर विरोधी विधान आहे.. नवऱ्याकडून मान मिळावा ( इथे बरोबरीने वागवावे, असे म्हणायचे आहे असे गृहीत धरते), दोघे असताना जसे समजूतदारपणे नवरा वागतो, तसेच त्याने चार लोकामध्ये असताना वागावे, ह्या अपेक्षेत वेगळे काय आहे? हे फार मूलभूत नाहीये का? जर ही वेगळी ठरणारी अपेक्षा असेल तर मग कठीण आहे की! घरामध्ये निर्णय घेताना मुळात सर्व सदस्यांचे मत विचारात घेतले जाते का, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, की फक्त जो / जी कोणी कुटुंबप्रमुख ह्या नात्याने वावरा आहे ती व्यक्ती निर्णय घेते? ज्या घरात लोकशाही नांदते, कुटुंब संस्था नांदते, त्या घरात सुनेच्या मताला किंमत असेल, नाही तर असणार नाही. एक व्यक्ती म्हणून जोडीदाराकडून मूलभूत आदराची अपेक्षा असणे म्हणजे तरी काय? जोडीदाराने स्त्री सुद्धा माणूस आहे, ही जाणीव बाळगून त्याप्रमाणे तिला वागवणे. ह्यात काय चुकले हो स्त्रीचे? इतकी सुद्धा स्व जाणीव तिला नको का?

In reply to by यशोधरा

नाखु Sun, 07/07/2019 - 19:43
नवीन सुनबाई फक्त दोघेच राहत नाहीत आणि एकत्र कुटुंबात असेल आणि ती नेमकी फक्त गृहकृत्यदक्ष (housewife) अशी असेल तर ती रोजच्या जेवणातील भाजी काय करायची याच सुद्धा स्वातंत्र्य असलेली नसते, बाकीचे निर्णय तर लांबची गोष्ट. आर्थिक स्वावलंबी गृहिणी सुद्धा आपली लहान सहान आवड निवड जोपासना करु शकत नाहीत हेही पाहिले आहे. परावलंबी अवस्था त्याहून जास्त प्रमाणात बिकट असते. वाहिन्यांवर आदर्श सूनबाई आणि आदर्श सासुबाई यांचा अतिरंजित भडिमार केला जातो आणि तमाम महिला वर्ग अगदी ग्रामीण भागातील सुद्धा त्यालाच प्रमाण समजतात. तस्मात् निर्णय घेऊ देणे आणि क्षमता असणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काहींना अगदी हम आपके है कौन सारखी कुटुंबे अनुभवली असतील त्यांनी हा प्रतिसाद नाही वाचला तरी चालेल आपली सल्लागाराची तलवार परजत येउ नये. सुस्पष्ट आणि रोखठोक मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by यशोधरा

ज्योति अळवणी Fri, 06/21/2019 - 22:16
कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं गेलं नसेल यशोधराजी. मुली प्रगल्भ असतातच. पण अनेकदा लग्नानंतर अनेक वर्षे त्यांच्यावर महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येत नाही. त्यामुळे कदाचित त्यांची नवऱ्याकडून अपेक्षाच वेगळी असते, असं मला मांडायचं होतं

In reply to by जॉनविक्क

जालिम लोशन Fri, 06/21/2019 - 23:50
मुद्देसुदपणे मांडता आला नाही. विषय समाजावर दूरगामी परिणाम करणारे आहे. फक्त शिर्षक वापरतांना स्त्रीमुक्ती. live in relationship असे ओळीने यायला हवे होते.

In reply to by जालिम लोशन

ज्योति अळवणी Sat, 06/22/2019 - 05:40
कदाचित विषय नीट मांडला गेला नसेलही. पण माझ्या मते स्त्री ही मुक्तच आहे. तिच्या विचारांना पाठबळ देऊन तिला सशक्त करणे आवश्यक आहे. संपूर्ण लेखात मी कुठेही live in relationship ही भलावण केली आहे असं मला वाटत नाही. माझं म्हणणं केवळ इतकंच आहे की मूलग्यांना अति जवाबदरीच ओझं दिल जाऊ नये संसारात आणि स्त्रीच्या मताचा आदर करून त्यांना देखील निर्णय घेण्याचा अधिकार/मुभा द्यावी. केवळ लग्न झालं पाहिजे कारण वय झालंय किंवा शिक्षण, नोकरी मार्गी लागलंय म्हणून नव्हे. तर दोघांनाही पुढील आयुष्यात समजून घेणारा जोडीदार असणं आवश्यक आहे म्हणून. अर्थात कदाचित माझं मत मी नीट मांडू शकले नसेलही. प्रत्येकाने स्वतःचा अर्थ काढावा. काहीच हरकत नाही

In reply to by ज्योति अळवणी

यशोधरा Sat, 06/22/2019 - 08:42
माफ करा, पण मुलांना संसारात अती जबाबदारी असते हे विधान चुकीचे आहे. उदाहरणांनी सांगू शकता का की मुलगे कोणत्या अती जबाबदारीने पिचलेले असतात?

In reply to by यशोधरा

जॉनविक्क Sat, 06/22/2019 - 12:35
ही बहुदा सर्वात अवघड कसरत करावी लागते. ;) कोणत्याही घरात आजही कर्ता पुरुष काम गमावून बसला तर चिंता निर्माण होते पण ते स्त्रीयांच्या बाबतीत कमी घडते आजही स्त्री अशिक्षित अबला राहिली तर जगातील सर्वात तुलनेने अवघड व गरजेची गोष्ट पोटापाण्याची चिंता तिला कमीच भासते

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क Sat, 06/22/2019 - 12:56
सोपी गोष्ट समजून घ्या स्त्रियांच्या कर्तुत्वावर शंका मी सुद्धा घेत नाही पण प्रवृत्तीची हमी ब्रम्हदेव तरी घेतो का ? ;)

In reply to by जॉनविक्क

यशोधरा Sat, 06/22/2019 - 13:01
डोळेझाक तर केलीच आहे, पण ती तुम्ही. :) समाजाच्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरावर पहा - खास करून निम्न आर्थिक स्तर, मध्यम वर्गीय स्तर, उच्च मध्यम वर्गीय स्तर. ह्या प्रत्येक स्तरावर तुम्हाला स्त्रिया घरं सांभाळताना दिसतीलच पण आर्थिक हातभार लावताना सुद्धा दिसतील. किंबहुना, नोकरी करणारी मुलगीच हवी, हे कशाचे निदर्शक आहे म्हणे? शेतकरी स्त्रियांचे उदाहरण तर मी आधीच दिले आहे. चतुर, टाळ्या खेचू शब्दखेळ करायला हरकत नाही पण परिस्थिती तशी असतेच असे नाही आणि क्षणापुरत वा, वा ह्यापलीकडे त्याचं काही महत्त्व सुद्धा नाही, तेव्हा त्यात काही रस नाही. ह्या विषयांवर खूप विस्ताराने लिहायचा सुद्धा आताशा कंटाळा येतो, तेव्हा असो.

In reply to by यशोधरा

जॉनविक्क Sat, 06/22/2019 - 13:15
म्हणजे विरोधी मताचा आवाज म्हणजे जणू देशद्रोहच की. कंटाळा येतोय ? हरकत नाही, चर्चा करायचा कंटाळा असतोच काही लोकात. माझ्यातही येतो अधून मधून जेंव्हा मला माझे मत लोकांना सांगावे असे तर वाटते परंतु ते योग्य कसे आहे हे पटवणे फार बोअरिंग वाटते. तुम्हाला समजू शकतो.

In reply to by जॉनविक्क

यशोधरा Sat, 06/22/2019 - 13:23
म्हणजे विरोधी मताचा आवाज म्हणजे जणू देशद्रोहच की. कंटाळा येतोय ? 
हा सूर लावणारी व्यक्ती
तुम्हाला समजू शकतो.
हे करू शकेल असे वाटत नाही. :)

श्वेता२४ Sat, 06/22/2019 - 09:53
तुमच्या प्रतिसादांवरुन तुम्हाला काय म्हणायचे आहे ते समजुन घेऊ शकते. केवळ शहरी, उच्च मध्यमवर्गीय, आधुनिक विचारसरणीच्या कुटुंबांचा विचार केला तर तुमचा लेख खटकू शकतो. कारण जोडीदाराला माणूस म्हणून समजुन घेण्याची, त्याची स्पेस देण्याची गरज या वर्गाने बर्याच अंशी अंगीकारली आहे. पण, ग्रामीण भाग, निमशहरी भाग व विचारानं आधुनिक नसलेल्या परंपरावादी समाज, जो मोठ्या प्रमाणात आहे त्यांना हा लेख लागू पडतो, हा माझा अनुभव आहे. कॉलेज मध्ये माझ्याबरोबर कितीतरी मुली कुठेकुठे काम करुन कुटुंबास हातभार लावायच्या ,पण त्यांना पुढे करण्याचे करीयर ,त्यांच्या इच्छा, यांचा कुठेही आदर न करता लग्न ठरवले गेले. काहींना लग्नानंतर काम करण्याची परवानगी मिळाली पण नवर्यापेक्षा दुय्यम वागणूक मिळते . वर नोकरी करणे ही त्या मुलीची हौस असल्यासारखे सगळे घरचे(नवर्यासकट) वागत असतात. फार लांब कशाला, माझ्या एका भावाने काल परवाच पुरुषांनी घरातली सगळी कामे शिकायलाच पाहिजेत असा अट्टाहास बायकांनी धरणे कसे चुकीचे आहे यावर वाद घातला. का? तर मी म्हणले की मी माझ्या मुलाला लहानपणापासूनच हळूहळू स्वयंपाक करणे, घरकाम करणे याची सवय लावणार असे म्हणले म्हणून. समाज बदलतोय हे नक्की पण अजुनही ही बदल तळागाळापर्यंत पोचणे गरजेचे आहे.

In reply to by श्वेता२४

यशोधरा Sat, 06/22/2019 - 12:00
केवळ शहरी, उच्च मध्यमवर्गीय, आधुनिक विचारसरणीच्या कुटुंबांचा विचार केला म्हणून लेख खटकत नाहीये, एकुणात खटकतो आहे. ग्रामीण भाग, निमशहरी भाग व विचारानं आधुनिक नसलेल्या परंपरावादी समाज - ह्या समाजातल्या स्त्रिया काय कमी कर्तृत्ववान असतात? संधी मिळण्याचा, स्व जाणीव व्हायचा अवकाश असतो. ठिणगी असतेच, स्फुल्लिंग पडायचा अवकाश असतो. बहिणाबाई किती उच्च मध्यमवर्गीय होत्या, सावित्रीबाई किती उच्च मध्यमवर्गीय होत्या? आता जे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यांच्या मागे राहिलेल्या बायका ज्या मग शेती, संसार सावरतात, त्या कितीशा उच्च मध्यमवर्गीय असतात? घेतात ना निर्णय? पेलतात ना अती जबाबदार्यांचे ओझे? त्यांना मदत करणार्यांपेक्षा त्यांना त्रास देणाऱ्यांची संख्या अधिक असेल, घरापासून दारापर्यंत! उच्च मध्यमवर्गीय, शहरी समाजात बायकाना स्पेस मिळते, असा समज असला तर फार चुकीचा आहे, हेही जाता जाता नमूद करू इच्छिते. लेख ह्यासाठी खटकतो आहे की मुली, स्त्रिया ज्यांच्याबद्दल चुकीची विधाने केली गेली आहेत.

In reply to by यशोधरा

श्वेता२४ Sat, 06/22/2019 - 15:18
ग्रामीण भाग, निमशहरी भाग व विचारानं आधुनिक नसलेल्या परंपरावादी समाज - ह्या समाजातल्या स्त्रिया काय कमी कर्तृत्ववान असतात? संधी मिळण्याचा, स्व जाणीव व्हायचा अवकाश असतो. ठिणगी असतेच, स्फुल्लिंग पडायचा अवकाश असतो माझा प्रतिसाद वाचला तर मी हेच म्हणतेय की तेथील स्त्रिया कर्तृत्ववान असतात पण त्याना आजही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. सावित्रीबाई, बहिणाबाई या लाखो त एक असतात. मी सर्वसामान्य पणे जे दिसतेय. आणि घडत असताना पाहतेय त्याबद्दल बोलले. बाकी तुम्हाला लेखातल्या ज्या गोष्टी खटकल्याचा त्या मलाही खटकल्या. पण लेखिकेने नंतर प्रतिसादात जी भूमिका घेतली त्यावरुन मी तो प्रतिसाद दिला. असो

जालिम लोशन Sat, 06/22/2019 - 12:45
खर सांगू का मला तर वाटतं की मला आयुष्यात पुरुषाची आधारासाठी गरजच नाही. पण सुखी समाधानी आयुष्यासाठी सोबती हवा आहे; आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी सोबत हवी आहे. पण म्हणून लग्नाचा अट्टहास नाही करायचा मला. लग्नाचे फायदे हवेत. पण त्या बरोबर येणारी adjustment नको.

ज्योति अळवणी Sat, 06/22/2019 - 13:49
२४ यांनी प्रतिसादात जे म्हंटले आहे ते मला बहुअंशी म्हणायचे आहे. मनमानी जगणे किंवा केवळ फायदे घेणे असे माझे मुळीच म्हणणे नाही. पण स्त्रीची मतं आणि निर्णयक्षमता याचा आदर झाला पाहिजे. त्याच बरोबर पुरुषाच्या मनावरचं कर्त्याच ओझं उतरलं पाहिजे. हा माझा मुद्दा आहे. यशोधरा जी, कधी जर आपण भेटलो तर तुमच्याशी याविषयावर बोलून माझी मतं मला सांगायला आवडतील. तुम्हाला माझा लेख पटला नाही हे वाचून वाईट वाटल. पण अस होऊच शकत. बाकीच्यांच चालू दे

In reply to by ज्योति अळवणी

जॉनविक्क Sat, 06/22/2019 - 13:54
पण स्त्रीची मतं आणि निर्णयक्षमता याचा आदर झाला पाहिजे. त्याच बरोबर पुरुषाच्या मनावरचं कर्त्याच ओझं उतरलं पाहिजे. हा माझा मुद्दा आहे.
हे विचार मनापासून आवडले.

In reply to by ज्योति अळवणी

यशोधरा Sat, 06/22/2019 - 14:10
ज्योती, कधी पुण्याला आलात तर आपण नक्की भेटुयात. मलापण खूप आवडेल तुमच्याशी गप्पा मारायला. :)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु Sun, 07/07/2019 - 19:47
आला आहे का हे बघायला मी नक्की येईन. त्या निमित्ताने यशोधरा (नक्की कोण आहेत) याची खातरजमा करून घेता येईल. खुलाशी नाखु

Rajesh188 Sat, 06/22/2019 - 14:03
स्त्री आणि पुरुष लग्न कशा साठी करतात मूळ हेतू तर सॅक्शुअल गरज भागविणे हाच असतो . व्यक्ती स्वतंत्र चा अतिरेक होवून जर मुला ,मुलींना आईवडील हे बोजा वाटत असतील तर मुल हवीत कशाला आणि त्यांच्या वर लाखो रुपये खर्च का करायचे ,संपत्ती का निर्माण करायची हे सुध्दा व्यक्ती स्वतंत्र chya नियमात च आहे . एवढे सर्व वाकडी वळण घेण्या पेक्षा रोबोट शी लग्न करणे च योग्य आहे

In reply to by Rajesh188

जॉनविक्क Sat, 06/22/2019 - 14:14
स्त्री आणि पुरुष लग्न कशा साठी करतात मूळ हेतू तर सॅक्शुअल गरज भागविणे हाच असतो .
हे तसे खरे नाही, ती गरज लग्नाशिवाय भागू शतके पण प्रॉब्लेम सवयीचा आहे. लहानपणापासून आपण कुटुंबात राहिलो आहोत ती आता आपल्या मनाची सवय व शरीराची गरज आहे म्हणून मोठेपणी ते कुटुंब चालू रहावे म्हणून विवाह होतात. सवय मोडणे सोपी गोष्ट न्हवे. तुम्ही रोबोट सोबत लहानाचे मोठे झालात तर सर्वात जास्त कॉम्फोर्ट व होमली फील तुम्हाला रोबोट सोबतच येईल. त्यामुळे विवाहसंस्था कुचकामी, अनैसर्गिक अथवा कालबाहय म्हणणे अति धाडसाचे कार्य होय

In reply to by जॉनविक्क

Rajesh188 Sat, 06/22/2019 - 15:34
हल्ली स्त्रियांचे विचार हे स्फोटक झाले आहेत . कुटुंब आणि समाज व्यवस्था ह्यांना स्त्रिया दुश्मन समजू लागल्या आहेत . आर्थिक क्षेत्रात प्रगती chya आड कुटुंब येते असा स्त्रियांचा गैरसमज झाला आहे . समाज व्यवस्था चे सर्व फायदे हवे आहेत पण जबाबदारी नको असे विचार स्त्रिया करत आहेत पुरुष पुढचा विनाश डोळ्या समोर घेवून माघार घेत आहे . त्या मुळे पुरुष नी आता माघार न घेता .मुल सांभाळत राहण्या पेक्षा ते पैसे वाचवून म्हातारपणी त्या पैशात रोबोट विकत घ्यावा सेवा करण्या साठी . स्त्रिया ना जास्त कीमंत न देता सएक्शुअल गरज सुधा रोबोट चा वापर करून च भागवावी. संसार नको one night relation मागणी स्त्रिया सासू सासरे ,आई वडील जबाबदारी नको मी जास्त शाहणी गैरसमज स्त्रिया. एकीकडे म्हणायचे स्त्री पुरुष समान . आणि व्यवहारात बलात्कार हा पुरुषच करतो . चेडचाड पुरुषच करतो बस मध्ये स्त्री म्हणून वेगळी वागणूक हवी कायद्यात स्त्री म्हणून झुकते माप हवे ह्यांनी खून जरी केला तरी ह्यांना रात्री अटक करायची नाही . हे पुरुष जास्त दिवस सहन करेल असे वाटत नाही . मानवी वंश चालवा ही पुरुषांची गरज नाही

श्वेता२४ Sat, 06/22/2019 - 16:08
हल्ली लोकांचे विचार विनोदी झाले आहेत. शुद्धलेखनाला लोक दुश्मन समजू लागल्े आहेत . धागे काढण्याच्या आड कंपुबाजी येते असा गैरसमज झाला आहे . डु आयडीचे चे सर्व फायदे हवे आहेत पण जबाबदारी नको असे विचार विनोदवीर करत आहेत मिपाकर पुढचा विनाश डोळ्या समोर घेवून माघार घेत आहे . त्या मुळे मिपाकरांनी आता माघार न घेता . आहे त्या धाग्यांचे व त्यातील पोकळ आरोपींकडे दुर्लक्ष करुन आपली करमणुकीची हौस भागवावी. शुद्धलेखन नको one meaningful statement मागणी मिपा डु आयडी, कंपुबाजी शुद्धलेखन नको माझेच जास्त धागे धाग्यांचे रतीब. एकीकडे अर्थहीन धागे . आणि अर्थपूर्ण धाग्यावर अर्थहीन प्रतिसाद हा विनोदवीरच करतो . भाषेशी चेडचाड हा विनोदवीरच करतो वर वेगवेगळे डु आयडी असले तरी ह्यांना काय करायचे नाही . हे मिपा जास्त दिवस सहन करेल असे वाटत नाही. इतका विनोदी प्रतिसाद द्यावा ही या धाग्याची गरज वाटत नाही.

In reply to by श्वेता२४

Rajesh188 Sat, 06/22/2019 - 20:28
बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्वलप विराम दिला नाही ,आणि नको त्या जागी पूर्ण विराम दिला आहे . भाषा ही शुद्ध लिहायला शिका . आणि दुश्मन हा शब्द हिंदी आहे तो मराठी मध्ये लीहताना वापरू नका

गामा पैलवान Sat, 06/22/2019 - 16:54
ज्योतीताई, हे वाक्यं जाम खटकलं :
'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.
वाक्य म्हणून ऐकायला छान आहे. पण त्यातनं परावलंबन सूचित होतंय. तुम्ही म्हणता की 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. मी म्हणतो का म्हणून थांबलं पाहिजे? चालू राहू दे की बडबड. आपण फक्त दुर्लक्ष करायचं. आता बायकांच्या दृष्टीने पाहू जाता यातनं एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे नाती हवीत कशाला ? आ.न., -गा.पै.

सस्नेह Sat, 06/22/2019 - 17:08
कहना क्या चाहती हो बहना ? प्वांईंट काय जल्ला कल्ला नाय !

Rajesh188 Sun, 06/23/2019 - 17:40
माणसाच्या आयुष्य चा विचार केला तर सुरवातीची 10 वर्ष आणि शेवटची 10 वर्ष माणूस परावलंबी असतो तो स्वतःचे आयुष्य स्वतः जगू शकत नाही त्याला दुसऱ्याच्या आधाराची गरज असते. .आयुष्यातील 23 वर्ष ही शिक्षण घेण्यात जातात . त्या वेळी आर्थिक आणि भावनिक पाठिंबा आई वडील देतात . त्या काळात होणारा आर्थिक खर्च हा आई वडील कसलेही व्याज न घेता करतात आणि मुलगा असू ध्या किंवा मुलगी आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगतात ते सुधा दुसऱ्या chya जीवा वर . 23 व्या वर्षी शिक्षण पूर्ण होवून नोकरी मध्ये स्थिर होण्या साठी वयाची 30 वर्ष होतात तो पर्यंत पालक आणि मुल ह्यांच्या मध्ये अत्यंत भक्कम प्रेमाचे बंध असतात कारण अजुन सुधा आई वडिलांची समाजातील पत हीच मुलाची किंमत असते . त्या मुळे स्वतंत्र विचार,स्वतःची मतं ,स्वतःच्या आवडीने आयुष्य जगणे,व्यक्ती स्वतंत्र हे व्यवहारिक दृष्ट्या तोट्याचा सौदा असतो . 30 वर्षा chya पुढे स्वतःची ओळख निर्माण होते आता जे आपण आहोत ते आपल्या स्वतःच्या मेहनतीने आहोत ह्यात कोणाचाच सहभाग नाही असले भास निर्माण होतात . 35 chya आसपास लग्न हा आयुष्याचा तिसरा टप्पा चालू होतो आणि तो 35 वर्षा पासून 50 वर्षा पर्यंत सुखात असतो .मला कोणाचीच गरज नाही असा अभास निर्माण करणारा काळ. असतो आणि जबाबदारी पासून दूर जाण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्याच आधार घेतला जातो . समाज आणि कुटुंब व्यवस्थे शी माझा काही संबंध नाही आणि मला त्याची गरज नाही असा विचार ह्याच आयुष्य chya काळात येतो . 50 शी ओलांडली की निसर्ग आपले अस्तित्व दाखवू लागतो blood pressure,मधुमेह,किडनी चे आजार,आणि शारीरिक,sexual ताकत कमी होते . आणि परत कोणाच्या तरी आधाराची गरज वाटू लागते .तुम्ही मुक्त संबंधात असाल तर ह्या काळात जोडीदार पळ काढतो कारण त्याला तुमच्या कडून कोणत्याच प्रकारचे शारीरिक सुख मिळू शकत नाही . मग आयुष्याचं शेवटच्या टप्प्यात एकाकी जीवन जगावे लागते . स्वतः ची नैसर्गिक कामे सुधा स्वतः करता येत नाहीत शरीर साथ देणे सोडून देते आणि अंतिम काळ अतिशय यातनामय रीतीने व्यथित करावा लागतो . तेच ह्याच्या उलट राहणारे जोडीदार शी भावनिक गुंतवणूक असणारे , समाजात मिसळणारे,मुलांशी प्रेमाचे संबंध असणारे ,नातेवाईक जपणारे शेवटच्या टप्प्यात पैसा कमी असला तरी अत्यंत सुखाने जगतात . मानसिक,भावनिक,आर्थिक सर्व गरजा अशा लोकांच्या पूर्ण होतात. व्यक्ती स्वतंत्र वाले फक्त 4000 sq feet chya घरात एकटेच तळमळत असतात कोणीही विचारात नाही

Rajesh188 Sun, 06/23/2019 - 22:46
एक व्यक्ती अब्जाधीश आहे करोडो रुपयाची गाडी आहे . पैश्याची मस्ती आहे त्याच्या दृष्टीने सर्व समाज तूच्य आहे . प्रवासात गाडी उलटते ,रक्त बांबळ अवस्थेत पडले आहेत . रस्त्यावर सामान्य लोकांची ये जा आहे त्यांनी त्या व्यक्तीला मदत का करावी ? एक फोन केला की हेलिकॅपटर येवू शकते पण डोळ्या वर अंधारी आली आहे . पैसा ताकत कामाला येणार नाही . दुसरी सामान्य व्यक्ती आहे समाजप्रिय आहे अपघात झालंय खूप लोक मदत करतील . मी बघितलं आहे अब्जाधीश व्यक्ती वयस्कर १० हजार पगार घेणाऱ्या नोकर असलेल्या माणसाचा हात धरून चालताना ,त्यांनी हात सोडला तर रुपये कामाला येणार नाहीत . मी पण ,व्यक्ती स्वतंत्र धोतांड आहे एकटा व्यक्ती जगूच शकत नाही . समाज,कुटुंब,मित्र लागतातच

In reply to by Rajesh188

गामा पैलवान Mon, 06/24/2019 - 12:09
Rajesh188, तुमच्याशी बऱ्याच अंशी सहमत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक होऊन मनमानी कधी सुरू होते तेच कळंत नाही. वृद्धपणी व्यक्तिस्वातंत्र्य फारसं उपयोगी नाही. प्रस्तुत लेखिकेस तरुणपणी मनमानी करायची आहे. काही हरकत नाही. पण मग इतरांनी आपणांस समजून घ्यावं ही अपेक्षा कशासाठी? म्हातारपणाची भीती वाटते का? आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर Mon, 06/24/2019 - 18:54
मांडणी थोडी विस्कळीत आहे पण फक्त शहरी वातावरणाचा विचार केला तर लेखातील बहुतांश विचारांशी सहमत आहे. कारण अशा गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला घडताना बघत असतो, तर काही स्वतः अनुभवत असतो. मध्यंतरी आमच्या सौभाग्यवतींच्या (इंटरनेट सॅव्ही नसल्याने मॅट्रीमोनी साईट्स बद्दल अनभीज्ञ असलेल्या) विधुर आत्ये भावासाठी वधू संशोधन करताना मुलींच्या अपेक्षा वाचून आज आपला समाज कुठे आहे वा कुठे चाललाय याचा आम्हा दोघांना बऱ्यापैकी अंदाज आला! प्रथम वधू, Annulled, बिन लग्नाच्या सिंगल मदर्स, एक-दोनदा वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रिया, एक ते तीन वेळा घटस्फोटीत स्त्रिया अशा अनेक प्रोफाइल्स आणि त्यांच्या अपेक्षा वाचून अंतर्मुख व्हायला झाले. Annulled आणि वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रियांची परिस्थिती वेगळी म्हणू, कारण त्या घटना त्यांच्या हातात नव्हत्या. पण बिन लग्नाच्या सिंगल मदर्स आणि एक ते तीन वेळा घटस्फोटीत स्त्रियांचे आणि त्यांच्या अवाजवी/अव्यावहारिक अपेक्षांचे काय?(मॅट्रीमोनी साईट्स वर जाऊन खात्री करून घ्यावी) त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे वर त्यांची कुठलीही फसवणूक न करता त्यांना मिळोत हि सदिच्छा! आजच्या काळात लग्न करताना बाकीच्या व्यावहारिक गोष्टींबरोबरच मुख्य मुद्दा एखाद्याचे स्वतंत्र विचार असणे हा नसून त्याला/तिला जोडीदार कसा लाभतो हा आहे. एकजण डॉमीनेटिंग असेल आणि दुसरा त्याच्या म्हणण्या प्रमाणे चालणारा असेल तर परिस्थिती आदर्श असते, पण जर दोघेही डॉमीनेटिंग असतील तर मात्र भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते . कित्येकदा नाती बिघडवायला पझेसिवनेस पण खूप परिणामकारक घटक ठरतो. वर यशोधराजींनी म्हंटले आहे,
समाजाच्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक स्तरावर पहा - खास करून निम्न आर्थिक स्तर, मध्यम वर्गीय स्तर, उच्च मध्यम वर्गीय स्तर. ह्या प्रत्येक स्तरावर तुम्हाला स्त्रिया घरं सांभाळताना दिसतीलच पण आर्थिक हातभार लावताना सुद्धा दिसतील. किंबहुना, नोकरी करणारी मुलगीच हवी, हे कशाचे निदर्शक आहे म्हणे?
सहमत, त्यासाठी अशा स्त्रियांचा अभिमान आहे! नोकरी करणारी मुलगीच हवी हि मानसिकता ७०-८० च्या दशकात समाजामध्ये निर्माण होण्यात कै. दत्ता सामंत कारणीभूत होते असे आधीच्या पिढ्यांचे म्हणणे आहे. कधी गिरणी/कारखाना बंद पडून आपल्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल याची शाश्वती नसल्याने त्याकाळी 'ब्लू कॉलर' (मासिक प्राप्तीत कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा त्याकाळी सरस असलेला कामगार वर्ग) लोकांमध्ये असुरक्षिततेच्या भीतीतून हि मानसिकता निर्माण झाली. ती काळानुरूप खरीही ठरली, कित्येक कुटुंबे देशोधडीला लागली तर कित्येक कुटुंबातील तरुण मुले संघटीत गुन्हेगारी क्षेत्रात उतरली. (त्याच काळात मुलींच्या/ मुलीकडच्यांच्या अपेक्षा सरकारी नोकरी करणारा वर पाहिजे अशा होत्या) आजच्या घडीलाही अनेकदा (काही सन्माननीय अपवाद वगळता) जॉब सिक्युरिटी नसल्याने, तर काहीवेळा लाईफ स्टाईल एन्हांस करण्यासाठी अशा मागण्या होऊ लागल्या आहेत. कोण चूक कोण बरोबर हे येणारा काळच ठरवेल. शेवटी कालाय तस्मै नमः !

Rajesh188 Mon, 06/24/2019 - 20:40
घर फक्त दोघांचं च हवे असे विचार पुरुषानं पेक्षा स्त्रि मध्ये जास्त प्रबळ पने दिसून येतात . पती हा आर्थिक दृष्ट्या सक्षम हवा ही अपेक्षा ठेवणे गैर नाही . पण त्यानी स्वतःच्या आई वडिलांची उतार वयात सेवा करू नये .किंवा त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी नाकरावी ही स्त्री ची भूमिका नक्की काय दर्शवते . घरातील कामे दोघांनी मिळून करावीत आक्षेप घेण्यासारखे काही नाही. कुटुंबाचे निर्णय घेताना सर्व सदस्य ची मत घ्यावीत आक्षेप घेण्यासारखे काही नाही . पण कुटुंब फक्त दोघांचे असावे हे मत बिलकुल स्वीकारता येत नाही .