Skip to main content

हंपी आणि हंपी..भाग १

लेखक हर्षद खुस्पे यांनी शुक्रवार, 28/12/2018 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या सुट्ट्या आल्या आणि दरवर्षी प्रमाणे पुण्याबाहेरील ऑफिस मधील सहकार्यांना घरी जायला मिळावे म्हणून आम्हाला आमच्या सुट्टीची कुर्बानी द्यायला लागली. हे दर वर्षी असेच असतं . मग ही कुर्बानी आम्ही डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात भरून काढत असतो. ह्याही वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं ठरवत होतो पण कधी तारखा जमत नव्हत्या तर कधी बजेट . शेवटी केरळ ची माहिती काढायला सुरुवात केली आणि नेहमीचे ट्रॅव्हल पार्टनर असलेले माझे जिजाजी आणि बहीण ह्यांना फोन केला .२२ डिसेम्बर ते २६ डिसेंबर पर्यंत विमानाची तिकिटे आटोक्यात होते तो पर्यंत बुक करू म्हणून चर्चा झाली आणि कुठल्याश्या कामामध्ये २ दिवस गेले आणि नंतर बघतो तर काय विमानाच्या तिकिटांचे दार ४००० वरून ९००० वर पोहोचले होते. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे माझी भाची जी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत होती तिने भारत भेटीवर यायचे नक्की केले ते पण २५ डिसेंबर ला आता काय करायचे ? म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्ने. पण मग ठरले की ती यायच्या आत जाऊन जायचे .पण कुठे जायचे ? इकडे आमच्या ऑफिस मधील एक सहकारी हंपी (कर्नाटक) येथे जाऊन आली आणि तिने आल्यावर फोटो आणि वर्णन केले त्यावरून आम्ही हंपी नक्की केले कारण ते गाडी घेऊन कव्हर करणे शक्य होते आणि ते पण ३-४ दिवसांमध्ये. मग धावपळ सुरु झाली हॉटेल बुकिंग साठी तब्बल एक महिना अगोदर बुकिंग शोधूनसुद्धा सर्व हॉटेलस बुक होते . आता काय करायचे ? शेवटी एक होम स्टे चा पर्याय बरा वाटला आणि फोटो पाहून पैसे भरून ते बुक करून टाकले. आणि मग ऑफिस मध्ये रजा मिळवण्यासाठी अर्ज केला आणि बघत बघता सुट्टी मंजुर झाली. आता प्लांनिंग सुरु झाले. दररोज फोन पे चर्चा सुरु झाल्या आणि मग रूट ठरला तो इस्लामपूर -->विजापूर -->अलमट्टी धरण -->कुडाळ संगम (महात्मा बसवेश्वर समाधी ) -->होस्पेट -->हंपी . इकडे दररोज प्लांनिंग सुरु आणि तिकडे ऑफिस मध्ये साहेब पूर्णपणे विसरून गेले कि मी रजा टाकली आहे आणि नेमक्या रजेच्या काळामध्येच नाईट शिफ्ट मिळाली .पुन्हा साहेबाला आठवण करून दिली अहो माझी रजा आहे ना ? त्यावर साहेब म्हणे हो आहे ना ..मग मी अहो मग नाईट शिफ्ट कशी काय? त्यावर साहेब .. काळजी करू नको ...तू जा बिनधास्त ...ऑफिस मधील सहकारी म्हणाले जा रे तू बिनधास्त .. तरी पण थोडी धाकधूक होती कारण, अस्मादिकांचे कुठलेकाम कामं सरळ झाले असेल तर शप्पथ . जायला २ आठवडे राहिले होते तो पर्यंत थोरले चिरंजीव सकाळी सकाळी प्रेमाने वदले ...बाबा तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना ...मग तुम्ही मला ट्रेन मध्ये बसवा . अरे पण तुला सारसबागेमध्ये फुलराणीमध्ये बसवले ना ? ..नाही मला खऱ्या ट्रेन मध्ये बसवा इती चिरंजीव .. मग काय इस्लामपुर (जि . सांगली) येथे बहिणीकडे गाडी घेऊन जायचा कार्यक्रम रद्द करून कोयना एक्सप्रेस चे पुणे ते ताकारी जे इस्लामपूर जवळील स्टेशन आहे तेथील तिकीट काढले कारण गाडी संध्याकाळी पोहोचत होती आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होतो त्यामुळे वेळेचे गणित बसत होते. आता आमच्या प्रवासाला काही तास उरले असताना दरवर्षी प्रमाणे अजून काहीच थ्रिल नाही म्हणजे आमची ट्रिप होत नाही कि काय असे वाटले आणि ते होऊ नये म्हणून आमची ही पाणी साठवायचा टाकी मध्ये किती पाणी आहे ह्याचा अंदाज घ्यायला गेली असताना आमच्या धाकट्या चिरंजीवांनी त्यांची महागडी खेळण्यातील गाडी उघड्या झाकणातून टाकून दिली आणि ती गाडी बायकोला मस्त वाकुल्या दाखवत तळाशी गेली. आता ती गाडी काठीने ,लोहचुंबकाने काढायचे सर्व प्रयत्न संपल्यावर अस्मादिक स्वतः टाकीत उतरले आणि शिडी घसरल्याने ७ फुटी टाकीत दाणकन कोसळले आणि थोड्यावेळाने कळले कि पाय नावाचा अवयव ठणाणा बोंबलत आहे.थोड्याच वेळात पाय सुजून टम्म झाला आणि म्हटलं चला शुभशकुन झाला म्हणजे आपली ट्रिप मस्त होणार तर. शेवटी हो हो म्हणता जायचा दिवस उजाडला आणि जिजाजींचा फोन आला, जरी गाडी १२:४५ ला सुटत असली तरी गाडीचा इतिहास हा लेट होण्याचा आहे तर तू aap इन्स्टॉल कर म्हणजे ट्रेन चे लोकेशन कळेल . ओके म्हणून आप इन्स्टॉल केले तर शुभ वर्तमान दिसले ट्रेन तब्बल १ तास लेट आहे म्हणजे ०१:४५ ला सुटणार, चला बरे झाले म्हणजे जरा निवांत आवरू म्हणत जरा निवांतच आवरले आणि सहज म्हणून aap चेक केले तर स्टेटस होते ट्रेन शिवाजीनगर आणि आम्ही घरात ? अरे बापरे ...नवीन थ्रिल नको रे बाबा म्हणत बायकोवर नेहमीप्रमाणे तुझ्यामुळे उशीर झाला म्हणून ओरडत उबेर बुक केली आणी सुदैवाने ती ५ मिनिटांमध्ये आली देखील . ड्रायवर ला म्हटले बाबा तुझी धन्नो पळव लवकर मेरी इज्जत खतरे मे है . त्याने ही केवळ २० मिनिटामध्ये स्टेशन ला गाडी पोहोचवली . अँप चे स्टेटस बघायची हिम्मत होत नव्हती. समोर प्लॅटफॉर्मवर २ गाड्या लागल्या होत्याच दोन पोरं ,बायको आणि दुखरा पाय घेऊन एका दामामध्ये पळत प्लॅटफॉर्म वर पोहोचलो आणि मंजुळ आवाजात घोषणा ऐकू आली .छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई से छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर जानेवाली कोयना एक्सप्रेस ०१:३५ को प्लॅटफॉर्म नंबर ५ पे आ राही है . बायको डोळे मोठे करून आणि प्लॅटफॉर्मवरील गोल घड्याळ ०१:०० ची वेळ दाखवत खदाखदा माझ्याकडे बघून हसत होते. क्रमशः

वाचने 7925
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अगदी मजा येणार वाचायला असं दिसतय. पाय मोडला म्हणून नाही, धावपळ पाहून. >>ताकारी जे इस्लामपूर जवळील स्टेशन आहे>> भिलवडी स्टेशनवरून जवळ आहे ना? पण मग ट्रेनने गेलात तर गाडी घेऊन तिकडे कोण गेलं ही उत्सुकता बाकीच.

In reply to by कंजूस

...... ताकारी जे इस्लामपूर जवळील स्टेशन आहे........ कराड ते सांगली रस्त्यावर गावांची नावे रोचक आहेत. शेणोली, दुधारी, ताकारी, दह्यारी.... गोपालक भाग असावा आधीपासून :-) काही दिवसांपूर्वी ह्या भागात जाणे झाले, सगळीकडे रस्ता चौपदरीकरणाचे काम चालू असल्यामुळे लेह-लद्दाखच्या रस्त्यांसारखी मजा घेता आली. अवांतराबद्दल क्षमस्व.

In reply to by कंजूस

धन्यवाद . गाडी घेऊन कोण आले हे पुढील भागात दिले आहे

प्रत्यक्ष प्रवासा पेक्षा अशी प्रवासाची तयारी वाचायला मजा येते आणि तुम्ही तर खूपच मजा आणली खूप हसलो राव धन्यवाद.. फोटो भरपूर टाका

In reply to by लोनली प्लॅनेट

धन्यवाद