Skip to main content

जय जवान !

जय जवान !

Published on 20/12/2018 - 19:14 प्रकाशित
काही दिवसांपूर्वी एका पेपरात खालील बातमी वाचली: ‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’. वाचून मनोमन वाईट वाटले आणि त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी मी प्रवासात अनुभवलेली घटना डोळ्यांसमोर उभी राहिली. तेव्हा आम्ही काही मित्र एका अभ्यासदौऱ्यासाठी झेलम एक्सप्रेसने दिल्लीस निघालो होतोने. आम्ही द्वितीय श्रेणीच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण केले होते. तेव्हा दिवाळीच्या सुटीचे दिवस असल्याने गाडीस प्रचंड गर्दी होती. आम्ही व्यवस्थित आरक्षण केले होते आणि सर्वांची तिकीटे निश्चित झालेली होती. गाडी येण्यापूर्वी जेव्हा आम्ही फलाटावर पोचलो तेव्हा तिथे पाय ठेवायलाही जागा नाही अशी तोबा गर्दी. त्यात सामान्य प्रवाशांबरोबरच जवानांच्या अनेक पलटणी होत्या. याच्या जोडीला त्यांच्या मोठाल्या अवजड ट्रंका. तेव्हाच जाणीव झाली की बिगर आरक्षितांच्या गदारोळातच आपल्याला गाडीत चढायची कसरत करावी लागणार आहे. अखेर गाडी आली आणि प्रचंड चेंगराचेंगरीतून आम्ही कसेबसे डब्यात शिरलो. pict त्यानंतरचे दृश्य तर चीड आणणारे होते. आमच्या आरक्षित आसनांवर आमच्या आधीच अनेक जवान स्थानापन्न झाले होते. त्यांना उठवताना जे काही तीव्र संवाद हिंदीतून झाले ते आता आठवायलाही नको वाटतात. त्याचा निष्कर्ष एवढाच होता की आम्ही आरक्षित प्रवाशांनी ‘चुप्प’ बसायचे आहे ! आम्ही आमच्या आसनावर कसेबसे अंग चोरून बसलो आणि आमच्या शेजारी चक्क अंगावर रेलून जवान मंडळी बसली. डब्यात सर्व आसनांवर हीच स्थिती. एकंदरीत सर्व डब्यात हवे तसे वावरण्याचा प्रथम हक्क जवानांचा आणि आम्हीच विस्थापित अशी अवस्था होती. आमच्यातील ज्या एकदोघांनी जवानांशी नियमानुसार वाद घातला. पण त्यांना तर झटापट करून त्यांनी गप्प बसवले. गाडी सुटली. चालत्या गाडीबरोबर आम्ही थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो. पण तो आनंद काही फार टिकला नाही. पुढच्या २ स्थानकांत जवानांच्या अजून पलटणी त्यांच्या ट्रंकासह डब्यात शिरल्या. आता तर आमच्या पाय ठेवायच्या जागी अजून ट्रंका आणि त्यावरही ते बसलेले अशी स्थिती झाली. म्हणजे त्या ‘३ टीअर’च्या डब्यात आता हा चौथा टीअर निर्माण झाला होता ! कहर तर यापुढे झाला. जेव्हा त्यांच्या ट्रंका डब्यात मावेनात तेव्हा त्यांनी त्या डब्याच्या एका बाजूच्या संडासात एकावर एक अशा ठेऊन दिल्या आणि तो संडास बाहेरून देखील ट्रंका लावून बंद करून टाकला. नंतर जेव्हा काही सामान्य प्रवासी लघवीसाठी तिकडे पोचले तेव्हा जवानांनी त्यांना अत्यंत उद्धटपणे, “ये बंद है, उस साइडमें जाव” असे फर्मावले. आता सर्व गर्दी तुडवत विरुद्ध बाजूस जाताना काय यातना झाल्या ते आम्हीच जाणो. सर्वांचीच खूप चिडचिड झाली. “काय तरी तक्रार करायला पाहिजे” असे हताश पुटपुटणे फक्त चालू होते. आता एवढ्या ओसंडून वाहणाऱ्या गाडीत रेल्वे-पोलीस तरी कशाला यायची तसदी घेईल? त्या काळी ‘१३८’ वगैरे तक्रारीचे फोननंबरही नव्हते आणि तिकीट तपासनीसाचे काम फक्त तिकीट पाहणे एवढेच असते. तेव्हा गुमान बसायला पर्याय नव्हता. त्याकाळी झेलामचा प्रवास म्हणजे अगदी दिव्य असायचे. गाडी ५ तास उशीरा पोचणे हे “नॉर्मल” धरले जायचे. त्यापुढे जो काय उशीर होइल तोच फक्त मोजायचा असे ! त्यात आमचे दुर्दैव बघा. आम्हाला दिल्लीस जायचे तर सर्व जवान थेट जम्मूपर्यंत जाणार होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला हायसे वाटायचा प्रश्नच नव्हता. गर्दीची ही परिस्थिती दिवसा होती तर रात्री काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. डब्यातील एकमेव चालू संडासात जायच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.त्यात जमिनीवर झोपायचा ५वा टीअर निर्माण झालेला ! अखेर एकदाची दिल्ली आली आणि आम्ही उतरलो. आमच्या अभ्यास दौऱ्याची सुरवात अशा “भारतीय समाज-अभ्यासाने”च झाली होती खरी. एकूण परिस्थिती शाब्दिक हमरीतुमरीपर्यंतच राहिली हे नशीब. नंतर काही विचार मात्र मनात येऊन गेले. जवानांच्या सुखदुख्खाची जाणीव आपल्याला असते. पराक्रमी आणि धारातीर्थी पडलेल्या जवानांचा यथोचित गौरव समाज नेहमी करतोच. परंतु, जवान जेव्हा आपल्या बेशिस्त व बेताल वर्तनाने सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडतात तेव्हा काय म्हणायचे? एक आरक्षित प्रवासी म्हणून आम्हाला काहीच किमान हक्क नसतात का? असो....

याद्या 28254
प्रतिक्रिया 86
वास्तविक जवान लोकांच्या साठी झेलम एक्सप्रेसला एक किंवा दोन स्वतंत्र डबे जोडलेले असतात. संडासात एकावर एक बॅग ठेवून संडास अडवणे हे मी देखील अनुभवले आहे. आपली अडचण सांगितल्यावर आम्ही डोळे झाकतो तुम्हाला आत काय करायचे ते करा असे उत्तर मिळे. दुर्दैवाने आपण एक आशा समाज व्यवस्थेचे भाग आहोत की जिथे शिस्त लागायला आणखीन वेळ लागेल असे मनात समजायचे नी पुढे जायचे. डब्याच्या बाहेर रिझर्व्हेशन करणाऱ्यांची नावे देखील अशी चमत्कारिक लिहली असतात की कळत देखील नाहीत. उदाहरणात वागळे सुनील एकनाथ हे नाव w.s.eknath असे लीहले असते. अर्थात् ह्या माझ्या जुन्या आठवणी आहेत. कदाचीत आता खुप सुधारणा नक्कीच झाल्या असतील.

दुर्दैवाने आपण एक आशा समाज व्यवस्थेचे भाग आहोत की जिथे शिस्त लागायला आणखीन वेळ लागेल>>>>+ ११ सर्वच क्षेत्रांत भयानक बेशिस्त आहे. रस्ता वाहतुकीत तर बोलायलाच नको.

"सैन्यात उच्च पदावर जायची आवड असेल तरच जा.. सैनिक वगैरे झालास तर ट्रंका घेऊन ट्रेनमधून फिरावे लागेल" असा सल्ला ह्यांना लहानपणीच मिळाला होता. असो. फारच क्लेषदायक अनुभव.

बहुसंख्य सैनिक उत्तर भारतातुन भरती होतात. तेथे रेल्वेची स्थिती अशीच असते.उत्तर प्रदेश बिहार येथे आरक्षितच नव्हे तर वातानुकूलित डब्यातही असंख्य अनारक्षित /विना तिकीट लोक चढतात. मग तुम्हाला आरक्षण आहे तर बसायला जागा मिळाली आहे ना मग गप्प बसा हे ऐकवले जाते. वातानुकूलित दुसरा दर्जा (AC II TIER) येथे आलेले माझे असे अनेक अनुभव (लखनौ, पाटणा, बिहटा इ ठिकाणी जाताना) आहेत. यातून "धट्टाई खाई मिठाई" असेच तत्व शिकलेले हे उत्तर भारतातील तरुण जेंव्हा लष्करात भरती होतात त्यांना अशी "शिस्त लावणे" हे कर्मकठीण काम आहे. त्यातून मे आणि दिवाळीच्या सुटीत बदली झालेल्या जवानांना लषकरी कोट्यातून आरक्षण मिळवणे अशक्य असते. बदली झाली कि २ महिन्यात हजर व्हावेच लागते आणि आरक्षण (साधे किंवा लष्करी कोटा) ४ महिने अगोदरच संपलेले असते. या प्रकारातून जवान दंडेली केली तरच आपल्याला जायला मिळेल हे "शिकतात". त्यातून लष्करासाठी आरक्षित डब्यात असंख्य नागरिक प्रवास करत असतात. पुणे मुंबई डेक्कन एक्स्प्रेस मधून या डब्यात प्रवास करताना निदान ५० % तरी प्रवासी लष्करातील नसतात हा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस जरबेच्या आवाजात बोलल्याशिवाय मला तेथे जागा मिळालेली नाही कारण हे लोक यार्डातूनच बसवून येत असत. जवानांचे असे वागणे हे अजिबात समर्थनीय नाही. परंतु बहुसंख्य लोक केवळ नाईलाजाने करत असतात हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. केवळ नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न आहे. गणपती उत्सवाच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या गाड्यात प्रवास करण्याचा प्रयत्न करून पहा. आपल्या बर्थ वर चार ते पाच माणसे बसलेली आढळतील आणि पोलीस नावाला सुद्धा दिसणार नाही. हि मुंबईतील स्थिती आहे. अति लोकसंख्या हा देशाला मिळालेला शाप आहे कोणतीही नागरी सुविधा पुरी पडत नाही हि वस्तुस्थिती आहे.

In reply to by सुबोध खरे

गणपती उत्सवाच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या गाड्यात प्रवास करण्याचा प्रयत्न करून पहा. आपल्या बर्थ वर चार ते पाच माणसे बसलेली आढळतील आणि पोलीस नावाला सुद्धा दिसणार नाही. हि मुंबईतील स्थिती आहे.
६ डिसेंबरच्या आसपास महाराष्ट्रातुन कुठुनही मुंबईला जाणार्या ट्रेन्समध्येही हा प्रकार दिसेल.

In reply to by सुबोध खरे

गणपती उत्सवाच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या गाड्यात प्रवास करण्याचा प्रयत्न करून पहा. आपल्या बर्थ वर चार ते पाच माणसे बसलेली आढळतील आणि पोलीस नावाला सुद्धा दिसणार नाही. हि मुंबईतील स्थिती आहे. -- कोकण रेल्वे सर्वसामन्य प्रवाशांसाठी गणपती, दिवाळी किंव्हा मे महिन्यात जश्या हॉलीडे स्पेशल ट्रेन सोडतात तसे गर्दीच्या वेळी जवानांसाठी स्पेशल ट्रेन का सोडत नाहीत. मुंबई, पुणे किंव्हा नाशिकवरुन अश्या ट्रेन सुट्टीच्या सिझनला सोडल्यास इतर प्रवाशांना होणारा त्रास(!) वाचेल व जवानांची देखील सोय होईल. -- अश्या प्रकारे ट्रेन सुरु करायला आजवर कुणी प्रयत्न केला असल्यास जाणून घ्यायला आवडेल. संरक्षण मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यास, हे सहज शक्य आहे असे वाटते.

In reply to by प्रसाद_१९८२

लष्कराने असे प्रयत्न केले होते. सुरुवातीला रेल्वेने आमच्याकडे डबेच नाहीत म्हणून हात वर केले. एकदा अशी गाडी सोडली होती पुणे ते जम्मू तावी. ती भोपाळ पर्यन्त सुखरूप गेली यानंतर केवळ लष्करासाठी गाडी असून त्यात इतरांना प्रवेश नाही या कारणाने झाशीच्या आसपास गाडीवर दगडफेक झाली. यानंतर रेल्वेने परत आमच्याकडे डबेच नाहीत म्हणून हात वर करायला सुरुवात केली.

अति लोकसंख्या हा देशाला मिळालेला शाप आहे कोणतीही नागरी सुविधा पुरी पडत नाही हि वस्तुस्थिती आहे.>>>>+ १

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लोकसंख्या, ‘त्यांच्या’अडचणी हे सगळे मान्य आहे.पण वरील घटनेत सर्व आमच्याही सहनशक्ती पलीकडे गेले होते.

In reply to by वन

तुमच्याबद्दल सहानुभूति आहे पण !!!! तुमच्या जागी दूसरे कोणीही असले तरी त्याने सुद्धा वैयक्तिक विचारच करून सैनिकाना शिव्याच घातल्या असत्या . सीमेवर कर्तव्यपूर्ति करण्यासाठी जाण्याची सोय लोकसंख्या च्या भस्मासुर मुळे सरकार करु शकली नाही म्हणून शेवटी त्या जवानाना आरक्षित जागा बळकाव्या लागल्या . तुमच्या या लेखा मुळे अफ़ग़ानिस्तान मध्ये कर्त्तव्य निभावुन घरी परतणाऱ्या यु एस सोल्जर्स चे सामान्य प्रवासी विमानतळ वर टाळ्या वाजवून कसे स्वागत करतानाचा व्हाट्सएप वर पाहिलेला विडिओ अठवला .

या विषयात समोरील व्यक्ती हि "सैनिक " असल्या मुळे इथे थोडी भावनिक कसरत झाली आहे . हीच ट्रेन जेव्हा थोडी पुढे जाते व सोनिपत ,पानिपत हि स्टेशन्स लागतात ,तसे हरियानातील बाबू लोक भेटू लागतात .मग कोणीही असू दे ,ते समोरच्या लोकांची परवा करीत नाहीत .रिझर्वेशन आहे असे त्यांना सांगितले तर "रिझर्वेशन रात दस के बाद " म्हणून नवा कायदा सांगतात . म्हणूनच मी आधी हेच म्हटलो आहे कि "आपण एक अशा दुर्दैवी समाजाचे भाग आहोत कि तिथे ,सुधारणा या फारच कुर्म गतीने चालतात . श्री. खरे यांचे लोक संख्या वाढीचे कारण हे कांही अंशी बरोबर आहे ,पण त्या अनुषंगाने ज्या सुधारणा आवश्यक आहेत ,त्या कुठेच दिसत नाहीत . तसे पहिले तर भारता शिवाय इतर सर्व देशाची लोकसंख्या हि वाढतच आहे .चीन तर आपल्या पुढे एक पाऊल आहे पण तिथे अशा प्रकारच्या समस्या कमी असाव्यात . एक उदाहरण म्हणून रेल्वे खाते घेतल्यास , गेल्या सत्तर वर्षात फक्त मीटर गेज चे ब्रॉड गेज झाले व कांही ठिकाणी अलीकडे डिझेल इंजिन ऐवजी इलेक्ट्रिकल इंजिन्स आली आहेत.माझ्या मते कुठलाही व्यवसाय योग्य प्रकारे करण्यास सरकार अयशस्वी ( ना -लायक ) ठरले आहे ,त्यांनी स्वतः असले उद्योग करण्या पेक्षा खाजगी करणातून ह्या गोष्टी कराव्यात व त्यावर प्रामाणिक पणाने फक्त आणि फक्त नियंत्रण ठेवण्याचे काम करावे .हे माझे वैयक्तिक मत आहे. मग ती वाहतूक सेवा असो कि दूरसंचार सेवा असो किव्हा इतर कोणतीही सरकारी सेवा असो .मग कदाचित " या ठिकाणाचा आरसा चोरीला गेला आहे " या सारखे निवेदन रेल्वेच्या डब्यात वाचायला मिळणार नाही किव्हा सैनिकाच्या वॉरंट वरच (रजेच्या अर्जावर ) त्यांचा रेल्वे प्रवासाच्या रिझर्वेशनचा नंबर असेल . शिस्त असेल तर आपली मानसिकता हि बदलेल .

समोरील व्यक्ती हि "सैनिक " असल्या मुळे इथे थोडी भावनिक कसरत झाली आहे . >>>> + ११ निव्वळ लोकसंख्या हे कारण नाही, या मतास अनुमोदन. मुरलेली बेशिस्त हा भाग अधिक वाईट आहे.

In reply to by हेमंतकुमार

मुरलेली बेशिस्त हा भाग अधिक वाईट आहे. बेशिस्त का मुरते? कोकणात जाणाऱ्या गाडयांमध्ये इतर वेळेस आरक्षित जागेवर कोणीही बसले असले तरी उठवल्यास उठवतात. परंतु गणपती उत्सवाचे वेळेस कितीही गाड्या सोडल्या तरी त्या अपुऱ्या पडतात मग जसे जमेल तसे जिथेमिळेल तिथे बसून लोक प्रवास करतात यात आरक्षित डब्याचा पण समावेश असतो. तेथे येणारी गर्दीच इतकी जास्त असते कि पोलीस किंवा रेल्वे कर्मचारी अपुरे पडतात. हीच स्थिती १२ महिने उत्तर भारतात आहे. अशी स्थिती दक्षिण भारतात नाही. तात्पर्य -- अति लोकसंख्या ज्यामुळे मूलभूत सुविधेवर पण अतोनात ताण पडतो तेच बेशिस्तीचे मूळ कारण आहे.

In reply to by सुबोध खरे

अति लोकसंख्या ज्यामुळे मूलभूत सुविधेवर पण अतोनात ताण पडतो तेच बेशिस्तीचे मूळ कारण आहे. सहमत. पण यापुढे जाऊन अजून काही फार महत्वाची कारणेसुद्धा आहेत. त्यातील काही अशी आहेत... १. सरकार : गेल्या सात दशकांत, काही सन्माननिय अपवाद वगळता, सर्व स्तरांवरच्या (देश, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) बहुतेक सरकारी कांमांचे सर्वोच्च ध्येय "दीर्घकालीन उत्तम सुविधा निर्माण करणे" हे नसून, "नेते, बाबू व त्यांचे साथीदार यांचे (आर्थिक व राजकिय) हितसंबंध सांभाळणे" हेच असल्याचे दिसते. सरकार व बाबू यांच्यात बुद्धी, कौशल्य किंवा नियोजन यांची कमी असते असे नाही. पण त्यांची बहुतेक सगळी क्षमता हेच उद्येश साध्य करण्यात खर्च होते... पुढच्या २०, २५, ५० वर्षांच्या अंदाजाने सुविधा निर्माण करण्यात नाही. या सरकारी पद्धतीला मी, "उत्तम नियोजनाने केलेले कुप्रबंधन (Well planned mismanagement)" असे म्हणतो. २. जनता : भारतियामंमध्ये "वसुधैव कुटुंबकम्" हे तत्व खोलवर रूजलेले आहे व विकसित देशांमधील लोक फारच स्वकेंद्रित आहेत असा माझा समज होता. मात्र, भारताबाहेर पडल्यानंतर काही वर्षांतच हा गोड गैरसमज दूर झाला. अनेक दशकांच्या भारत व विकसित देश यांच्या सतत संपर्कात आल्यानंतर मी खात्रीने असे म्हणू शकतो की, विकसित देशांमधील बरेच लोक वैयक्तिकरित्या संकुचित (रिझर्व्ह्ड) असू शकतील, पण सार्वजनिक/सामाजिक भलेपणाची (कॉमन गुड) जाणीव त्यांच्यातील बहुसंख्यांत खूप प्रमाणात असते. त्याविरुद्ध, बहुसंख्य भारतियांच्या विचाराची मजल "स्वतः, स्वतःचा खिसा" यापलिकडे फार तर नातेवाईक, कंपू व धर्म/जात या कुंपणापर्यंत जाऊन थांबते. माझा परिसर, गाव/शहर, राज्य आणि देश हे दुसरे कोणी (बहुदा सरकार) बघून घेतील, मला काय त्याचे, असेच त्यांचे मत असते. भ्रष्टाचार, बेशिस्त आणि अस्वच्छतेच्या मागे मुख्यतः ही मानसिकता आहे असे मला वाटते. उदा : ...(अ) विकसित देशांत... * सार्वजनिक संसाधनांचा अथवा जागेचा दुरुपयोग करणे अभावानेच आढळते. * मला सार्वजनिक जागेवर हवा तसा, हवा तेथे, हवा तितका कचरा करायचा आधिकार आहे, सरकारने तो साफ करायची व्यवस्था करावी, अशी बहुसंख्य भारतिय लोकांची धारणा आहे. * सार्वजनिक जागेचा विनापरवाना उपयोग आणि दुरुपयोग करणे जनतेला आवडत नाही व त्यासंबंधी सामान्य लोकही तक्रार करतात. विकसित देशांत, जनता हे वरचे सर्व आणि इतर बरेच काही, बेजबाबदारपणाचे लक्षण समजते. त्याबद्दल कायद्याचा बडगा वापरून प्रशासन कडक शिक्षा करते तेव्हा हिटलरशाही, अन्याय झाला, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला, इत्यादी ओरडा केला जात नाही आणि तथाकथित विचारवंतानाही करून दिला जात नाही. कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक संसाधनांची मोडतोड / जाळपोळ हा मोठा गुन्हा समजला जातो. त्याची शिक्षाही जबर असते व त्वरीत मिळते. ...(आ) जपानमध्ये त्सुनामी आली होती तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी एक क्लिप, "सार्वजनिक भले (कॉमन गुड)चे", सार्वकालीक उत्तम उदाहरण ठरावे अशी होती. त्यावेळी जपानच्या आपत्तीग्रस्त भागातली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती आणि आठवड्याभरानेही सुरू होईल याची शास्वती नव्हती. सुपरमार्केटसमोर मोठ्या रांगेत शांतपणे उभे राहून, गर्दीगडबड होणार नाही केवळ इतक्याच संख्येच्या गटांनी, आपत्तीग्रस्त लोक आत जात होते आणि विनाअपवाद एका दिवसाला पुरेल इतकेच खाद्यसामान आणि पाणी खरेदी करून बाहेर येत होते. याचे तेथे असलेल्या पाश्चिमात्य वार्ताहराला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले, "पुढचा अन्नपाण्याचा साठा केव्हा येईल हे माहित नसताना तुम्ही बरीच खरेदी का करत नाही?" सगळ्या जपानी लोकांचे उत्तर साधारणपणे, "मी असे केले तर रांगेत असलेल्या इतरांचे काय?", अश्याच अर्थाचे होते. ...(इ) सिंगापूर, जपान, युरोप, अमेरिकेत फिरताना (कायद्याचा बडगा पाठीत बसेल या भितीने) सार्वजनिक जागी कचरा न होण्याची खबरदारी घेणारे भारतिय लोक मायदेशाच्या विमानतळावर परतल्यावर ती स्वच्छतेची सवय विसरून जातात, हे काही विरळ नाही. मात्र, परदेशातील स्वच्छता आणि शिस्तीची तारीफ करताना याच मंडळीची जीभ थकत नाही ! :( ३. अर्थकारण : उत्तम संसाधन आणि सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी व चालू ठेवण्यासाठी जास्त खर्च येतो, हे सगळ्यानाच माहीत असते. मात्र, त्यांच्या उपभोक्त्याला तिची योग्य किंमतही मोजणे जरूर असते, हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते. विकसित देशांतील आरामदायक व नियमित वाहतूकीसारख्या सार्वजनिक सेवा आपल्याकडे नाहीत याची खंत वाटणार्‍यांनी, जालावर सहज उपलब्ध असलेली तेथिल आणि भारतातील दरपत्रके चाळून पहावी व त्यातील दरफरकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भाड्यात १०-१५ रुपयांची वाढ झाल्यावर होणारी आंदोलने, चक्का जाम, जाळपोळ, इ. पहावे. मॉलमध्ये, रेस्टॉरंतमध्ये निमूटपणे महिना शेपाचशे ते काही हजार खर्च करण्याची ताकद व शिरस्ता असलेल्या भारतियाच्या काळजात, सरकारी सेवेचे दर तुलनेने किंचितसे वाढले तरी, सणकून कळ येते आणि तो सरकारच्या गलथान कारभारावर सडकून टीका करतो. भारतियांना सरकारी सेवा जागतिक स्तराची हवी असते, पण ती कमीत कमी दरात किंवा शक्यतो मोफतच असायला हवी असते ! ४. राजकिय नेते : लोकशाहीत जनतेला तिच्या दीर्घ फायद्याचा उत्तम मार्ग सांगणारे नेते विरळ असतात आणि त्या मार्गावरून जनतेने जावे असा आग्रह धरणारे त्याहून विरळ असतात. कारण, त्यांचे प्राधान्य निवडून येण्यालाच असते... किंबहुना, निवडून आल्याशिवाय, नेत्याच्या मनात खरोखरच असलेल्या सर्व योजना केवळ हवेतच राहतील ही वस्तूस्थिती आहे. मात्र, दीर्घ फायद्याचा उत्तम मार्ग कधीच सहज सोपा नसतो. त्याकरिता जनतेलाही आपल्या हाव/लालसा/लोभ/भय इत्यादीवर ताबा ठेवून व प्रसंगी वैयक्तिक त्रास भोगून सार्वजनिक भल्याला (कॉमन गुड) प्राधान्य देणे जरूरीचे असते. त्याविरुद्ध, जनतेतील हाव/लालसा/लोभ/भय यांचा उपयोग जनतेची दिशाभूल करून मते मिळवणे सोपे असते... जे सर्वसाधारण राजकिय नेते भारतात करताना दिसतात. जनतेची ही हाव कशी पुरवली जाते ?... जनतेने दिलेल्या करातूनच. हे फुकट वाटले जाणारे फायदे (कर्जमाफी, सबसिडी, इ) जनतेच्याच पैशातून दिले जातात; नेत्याच्या किंवा त्याच्या पक्षाच्या तिजोरीतून नाही. याचा सरळ अर्थ असा की जनतेकडून वसूल केलेल्या पैशांपैकी काही तिच्याच तोंडावर फेकण्याच्या आश्वासनांवर, नेते दिमाखाने मते गोळा करत असतात ! प्रगल्भ लोकशाहीत बहुसंख्य जनता सामाजिक भल्याचा विचार करून मते देते... पक्षी, माझे कर्ज माफ होईल, माझा वशिला लागेल, मला वैयक्तिक आर्थिक फायदा होईल, इत्यादी लालसा बाजूला सारून सार्वजनिक भले (पक्षी : स्वच्छता, रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, शिक्षण, वैद्यकिय सेवा, व्यवसाय/नोकरीच्या संधी, इ) करणार्‍या गोष्टींबाबत आग्रही असते. अर्थातच, नेत्याला तेच करावे लागते... जनतेचे भले करावे म्हणून करायचे नसले तरी मते मिळविण्यासाठी करावेच लागते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विकसित देशांमधील बरेच लोक वैयक्तिकरित्या संकुचित (रिझर्व्ह्ड) असू शकतील, पण सार्वजनिक/सामाजिक भलेपणाची (कॉमन गुड) जाणीव त्यांच्यातील बहुसंख्यांत खूप प्रमाणात असते. >>>> + १११

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

'सरकार, अर्थकारण अणि नेते' याबाबत थोडे अधिक आपले मतभेद असतील पण """जनता """ लय वंगाळ आहे, याबाबत 100% सहमत. .... समाजामधे कसे वागावे हे संस्कार कधीच घरी शिकवले जात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक (चांगली प्रतिष्ठित सुद्धा) बाहेर खुपच हव्र्या सारखी वागतात. कधी न मिळल्या गत. दम धीर च नसतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

* मला सार्वजनिक जागेवर हवा तसा, हवा तेथे, हवा तितका कचरा करायचा आधिकार आहे, सरकारने तो साफ करायची व्यवस्था करावी, अशी बहुसंख्य भारतिय लोकांची धारणा आहे.
अशीच धारणा विकसीत देशांमधल्या नागरीकांची देखील असते. फरक फक्त हा कि त्यांच्या धारणेची योग्य काळजी घेतली जाते. विकसीत देशात भारतापेक्षा कमी कचरा तयार होत नाहि. किंबहुना तिथे प्रमाण जास्तच असावे. पण कचरा व्यवस्थापन उत्तम असल्यामुळे ते जाणवत नाहि.

In reply to by अर्धवटराव

"अशीच धारणा विकसीत देशांमधल्या नागरीकांची देखील असते"
नेमके कुठले देश या निकषांत येतात हे जाणून घ्यायला आवडेल

In reply to by अर्धवटराव

माझे मत, वाचन आणि २ ऊत्तर अमेरिकेन व ४ युरोपिय देशांमधील प्रत्यक्ष अनुभवावरून बनलेले आहे. याशिवाय, सिंगापूर, जपान यांच्याबद्दल सांगायला नकोच. पण, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया येथेही लोकांच्या सार्वजनिक स्वच्छतेसंबंधीच्या चांगल्या सवयींमुळे ते देश बऱ्यापैकी स्वच्छ दिसतात. 'बेजबाबदारपणे अनिर्बंध अस्वच्छता' हा स्थाईभाव असणारे नागरिक असलेला कोणताही देश सतत स्वच्छ ठेवण्याइतके संसाधन सधन देशांकडेही (अगदी तेलाचे भाव गगनाला भिडले असतानाही खाडी देशांकडेही) नसते. तुमच्या माहितीत असा देश असल्यास त्याचे नाव वाचायला जरूर आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

महत्वाचे : "देशात प्रतिमाणसी कचऱ्याचे प्रमाण जास्त असणे" आणि "नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे कचरा करण्याची सवय असणे" या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

In reply to by अर्धवटराव

साहेब, माफिची अजिबात गरज नाही. मुद्दा समजला आणि पटला, इतके पुरेसे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारत :ड माझा प्रतिसाद "मला सार्वजनिक जागेवर हवा तसा, हवा तेथे, हवा तितका कचरा करायचा आधिकार आहे, सरकारने तो साफ करायची व्यवस्था करावी" या धारणेवर आहे, अस्वच्छतेच्या स्थाईभावावर नाहि. विकसीत देशांतले लोक्स पॅकेजींग, मेल्स, अन्नादी कन्स्युमेबल गोष्टी, सफाई सुवीधेत वापरायच्या गोष्टी, हायजीन प्रॉडक्ट्स... इ. अनेक गोष्टींचा अगदी मनसोक्त कचरा करतात... फक्त तो एफीशियण्टली मॅनेज होतो, म्हणुन त्याची घाण होत नाहि. मुळात कचरा निर्माणच होऊ नये, किंवा कमितकमि निर्माण व्हावा याबद्दलची खबरदारी घेतल्याचं मी तरी वीकसीत देशांत बघितलं नाहि. माझं मत दोन अमेरीका खंडातले देश आणि एक युरोपीय देशांतल्या थोड्या काळच्या वास्तव्यावर बनलं आहे.

In reply to by अर्धवटराव

विकसीत देशांतले लोक्स पॅकेजींग, मेल्स, अन्नादी कन्स्युमेबल गोष्टी, सफाई सुवीधेत वापरायच्या गोष्टी, हायजीन प्रॉडक्ट्स... इ. अनेक गोष्टींचा अगदी मनसोक्त कचरा करतात... फक्त तो एफीशियण्टली मॅनेज होतो, म्हणुन त्याची घाण होत नाहि. मुळात कचरा निर्माणच होऊ नये, किंवा कमितकमि निर्माण व्हावा याबद्दलची खबरदारी घेतल्याचं मी तरी वीकसीत देशांत बघितलं नाहि.
याचे मुख्य कारण लोक कचरा कचरापेटीत टाकतात (आणि तो सुद्ध्धा वर्गवारी केलेल्या कचरापेट्यांतच) हे आहे.....अमेरिका आणि युरोपात एकूणच सार्वजनीक जागी कचरा टाकू नये याबाबत लहानपणापासून घरात आणि शाळेत असे दोन्हीकडे संस्कार होतात...अर्थात याला काही जागा थोड्याफार अपवाद आहेत पण त्या नावापुरत्याच भारतात फक्त इतके जरी केले तरी आपल्याकडे कचरा मॅनेजमेंट बेताचे असूनही चालून जाईल

In reply to by टवाळ कार्टा

इतर देशांशी तुलना चालू आहे तर माझे अजून दोन पैसे: रस्ता-वाहतुकीबाबत आशियाई परदेशातला हा अनुभव. समजा एखादी कार रस्त्यावर पळते आहे आणि समोर पादचारी रस्ता ओलांडायला आलाय. तर इथे चक्क कारवाला थांबतो, डीपर देतो आणि ते पाहून पादचारी आधी रस्ता ओलांडतो आणि मग कारवाला पुढे जातो. तसेच जर दोन कार्स समोरासमोर आल्या तर एकजण डीपर देतो व त्याचा अर्थ असतो की दुसऱ्याने आधी पुढे जावे ! अशा वेळेस दुसरा पहिल्याकडे पाहून कृतज्ञतापूर्वक हात हलवतो. ... आता नुकताच महाराष्ट्रातील एक अनुभव. मी एकटा एका गावाहून टुरिस्ट कारने यायला निघालो. मी चक्रधराच्या शेजारी बसलो अन बसताक्षणी माझा सीटबेल्ट लावला. त्याने काही तसे बिलकूल केले नाही. त्यावर मी म्हणालो, “तुम्ही पण लावा की”. त्यावर तो, “न्हाई, इकडं कोनी बघत नाय”. त्यावर मी, “अहो, पोलिसाचे जाऊदेत, हे आपल्या जिवासाठीच चांगले आहे”. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने गुटख्याचा तोबरा भरत गाडी चालू केली. म्हणजेच ही बेशिस्त अंगभूत (की जनुकीय?) आहे. इथे आपण सुशिक्षित अथवा सरकार काय करणार कपाळ? असा अनुभव बरेच वेळा आलेला आहे. असो....

In reply to by हेमंतकुमार

Google Pay वरुन माझे पण 2 रुपये.. एका ठिकाणी कागदी डिश मधे वडापाव खात होतो. शेजारी आणखी एक खात होता. जवळच कचराकुंडी ठेवली होती. त्या व्यक्तिचा वडापाव खाऊन झाला अणि त्याने ती डिश कचराकुंडीत न टाकता तिच्या शेजारीच टाकली. मी पण आणखी त्वेषा ने माझी डिश कचराकुंडी च्या बाहेर टाकली. अन त्याला मस्त मिस्टर बीन सारखी स्मयिल दिली. असा चाकटला! .... दरोंतो एक्सप्रेस ला सगळा क्रौड बर्यापैकी सुशिक्षित असतो. उठुन 4 पाऊले कचरा टाकायला पण त्याच्या जीवावर येते. ते पण कचराकुंडी उपलब्द असुन देखील. .... खोड आहे बाकी काही नाही.

In reply to by विशुमित

गडकरी म्हणाले, जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचं हे भाषण मला खूपच आवडतं. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही.

In reply to by विशुमित

जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. >>>> माझ्या मते हे मूळ वाक्य चर्चिल यांचे आहे: India is not a nation, it is only population.

In reply to by विशुमित

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे याला तर अनेक सुशिक्षित भारतीयही बळी पडलेले आहेत. त्याला कोणी वावगे मानत नाही ही दुखाची गोष्ट आहे. मी बऱ्याच टुरिस्ट ड्रायव्हरना सांगून पहिले आहे की तुम्ही वाहन चालवतानाचा फोन घेण्यासाठी हस्तमुक्त कानाचे यंत्र वापरा. पण ऐकतंय कोण?

In reply to by वन

हस्तमुक्तकानयंत्र लावून वहान चालवणे अत्यंत धोक्याचे आणि तितकेच बेकायदेशीर पण आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

+१०० हस्तमुक्तकानयंत्र वापरून चाललेल्या संभाषणामुळे चित्त समोरच्या व आजूबाजूच्या गोष्टीवरून ढळून अपघात होऊ शकतो. ते यंत्र वापरून अप्रिय संभाषण होत असल्यास त्यामुळे ढळलेल्या मनःशांतीमुळे अपघाताची शक्यता अजूनच वाढते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माफ करा, मला ‘हस्तमुक्त’ म्हणजे मोबाइलमध्ये पिन खुपसून कानाला लावायचे फोन्स एवढेच म्हणायचे होते. ‘त्या’ इलेक्ट्रोनिक यंत्राचा काहीही अनुभव/ माहिती नाही. धन्यवाद. वाहन चालवताना कुठलाच फोन वापरू नये असे मात्र वाटते. मी ते कटाक्षाने पाळतो.

In reply to by वन

ऐकता-बोलताना लक्ष विचलित होण्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे, वायरने जोडलेले यंत्र असो की वायरलेस... धोका तितकाच असतो.

In reply to by टवाळ कार्टा

लहानपणापासून घरात आणि शाळेत असे दोन्हीकडे संस्कार होतात हि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

In reply to by सुबोध खरे

+१ जपानी मुलांना, स्वावलंबनाचे, एकमेकाला सहकार्य करण्याचे आणि स्वच्छतेचे शिक्षण प्राथमिक शाळेपासून कसे मिळते हे कळण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ... असे काही भारतातल्या शाळांत कोणी केले तर निदान शहरी भागांत तरी "आमच्या मुलांना काय कामकरी समजता की काय?" असा आक्षेप घेऊन पालकांचे मोर्चे शाळा प्रशासनाकडे जातील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकेतही, "व्हॉलंटियरिंग" ही खोलवर रुळलेली प्रथा आहे. संग्रहालये, ग्रंथालये, पार्क्स, इत्यादींमध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करणारे लोक ५०% किंवा जास्त काम करताना दिसणे विरळ नाही. हे काम स्वागतकक्ष, तिकिटविक्री, इत्यादींपासून ते कष्टाची व सफाईची कामे करण्यापर्यंत कोणतेही असून शकते. काही शिक्षणसंस्था प्रवेश देताना आणि व्यापारी संस्था नोकरी देताना व्हॉलंटियरींग हा बायोडेटाचा महत्वाचा भाग समजतात. भारतात अगदी मध्यमवर्गातही सरंजामशाही व सामाजिक स्तरांची जाणीव इतकी भिनलेली आहे की कोणतेही कष्टाचे आणि/अथवा सफाईचे काम करणे कमीपणाचे समजले जाते... मात्र, अश्या लोकांना बेजबाबदारपणे कचरा करण्यास अजिबात शरम वाटत नाही ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारतात अगदी मध्यमवर्गातही सरंजामशाही व सामाजिक स्तरांची जाणीव इतकी भिनलेली आहे की कोणतेही कष्टाचे आणि/अथवा सफाईचे काम करणे कमीपणाचे समजले जाते.>>> + १११११११ साधी ही तुलना बघा. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेणारा अमेरिकी विद्यार्थी आणि भारतातून तिथे शिकायला गेलेला वि. पहिला स्वतः शैक्षणिक कर्ज काढतो व 'कमवा व शिका' अनुसरतो. दुसरा सहसा कष्टाची कामे करत नाही (अपवाद सोडून). ( ही माहिती बरेच जणांकडून ऐकली आहे ; प्रत्यक्ष अमेरिकी पाहिलेला नाही. तरी चू भू दे घे ).

In reply to by हेमंतकुमार

त्या विडीओसाठी. लय झ्याक हाये राव ते जपानमधले शिक्षण. शाळेतली मुले स्वत बटाटे पिकवण्यापासून ते जेवणाची ताटे धुणे व फरशी पुसायची कामे करता ना पाहून धन्य जाहलो. मोठेपणी ही मुले स्वयंशिस्त नागरिक होणार यात नवल ते काय !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यातले हे वाक्य भावले: 'आम्ही विदेशी कपडे घालतो, भारी मोबाईल वापरतो, त्यांच्यासारखी उच्च भाषा बोलतो.... पण..... आम्हाला नागरी जाणीव आहे का? '

In reply to by हेमंतकुमार

पहिल्या चित्र फितीत शिक्षक चमच्याने खात आहे हे पाहून कॅमेर्‍यामागच्या मंडळींनी त्याला प्रश्न विचारून चॉपस्टिक्स आणण्यास भाग पाडले हे लक्षात आले का ? भारतात असे काही झाले असते तर, "बुरसटलेल्या प्रथा पाळण्याची शिक्षकावर सक्ती केली", "शिक्षकाच्या निवड/मानवी अधिकाराची पायमल्ली केली जात आहे", "आता आम्ही कसे जेवावे हे पण सरकार सांगणार काय?", "यात सरकारचा राजकिय अजेंडा आहे?" अश्या प्रकारच्या मथळ्यांवर महिनाभर तरी सगळ्या माध्यमांतून गदारोळ झाला असता ! :)

संजय उवाच, तुमचे विश्लेषण आवडले. कुमार१, तुमचा बेशिस्तीचा मुद्दा पटला. आता माझे काही मुद्दे: १. रेल्वे प्रवासात कायम बिगर-आरक्षण/विनातिकीट प्रवास करणारे, भाई-दादा लोक वगैरे एका बाजूस आणि सैनिक दुसऱ्या बाजूस असे धरूया. तर या दोन गटांत काहीच गुणात्मक फरक असू नये का? पहिला गट हा ’सामान्य बेशिस्त नागरिक’ असा आहे. उलट सैनिकांनी असे वागणे हे ‘लष्करी शिस्तीत’ कसे काय बसते? संडासात ट्रंका ठेवून तो बंद करणे हा बेशिस्तीचा कळस झाला. २. वर चर्चेत अन्य देशांशी तुलनेचा मुद्दा आला आहे. माझ्या वृत्तपत्र वाचनावर आधारित दोन उदा. देतो. * जपानमध्ये दर चौ.किमी. मध्ये भारतापेक्षा जास्त माणसे राहतात. तेव्हा त्यांचे नियोजन छान असते हे मानावे लागेल. सतत “लोकसंख्या, सरकार” अशी कारणे देऊन आपण आपले नियोजनाचे अपयश झाकतो. * चीनमध्ये एका राष्ट्रीय सुटीच्या दिवशी एका ट्रेनला मरणाची गर्दी असते. खूप लोक तेव्हा आपापल्या गावी जात असतात. किमान प्रवास साधारण ४-५ तास असतो. ती गर्दी इतकी असते की प्रवासी डब्यातील संडासजवळ जाऊच शकत नाहीत (अगदी त्या दाराजवळचे सोडून). यावर सर्वांनी मिळून तोडगा काढला आहे. सर्व प्रवासी आपापल्या अंतर्वस्त्राच्या आत चक्क डायपरचे pad बांधतात. त्यामुळे जर प्रवासात लघवी लागली तर न लाजता त्यातच करायची ! त्या देशात आपल्याहून जास्त लोकसंख्या असली तरी अशी ‘सामूहिक समज’ आली आहे हे मला विशेष वाटते. अंगभूत बेशिस्त हा आपला खरा प्रश्न आहे

In reply to by वन

चीन (बीजिंग) मधला प्रत्यक्ष अनुभव - आपण रांगेत शिस्तीत उभे असलो तरी इतर लोक धक्का मारूनही पुढे घुसतात आणि आपल्या आधी बस मध्ये शिरायचा प्रयत्न करतात. परदेशी माणूस पाहून तर अजूनच कारण आपण भाषेच्या अडचणीमुळे तक्रार नाही करू शकत . हे एखाद्या वेळी नाही तर 15 दिवस पाहिलंय. तसंच स्वच्छ रस्त्यावर कचरा करणे, उलट्या दिशेने बाईक नेणं असे अनेक प्रकार तिथेही होतात. तो एकच देश जिथे अगदी घरच्यासारखं वाटतं ... (खरेदी करताना बायकोने 10% किमतीत बॅग भरून वस्तू जमवल्या, घासाघीस अगदी मुंबईच्या वर आणि नाटकं फार, हात पकडणे, calculator वर किमती टाईप करणे, तसच सगळं) परत बीजिंग विमानतळावर जाताना टॅक्सीवाल्यांने खरी नोट बदलून खोटी परत केली, अजून आहे ती घरी आठवण म्हणून. एकूण काय तर आपण एकटेच काही बेशिस्त नाही, मनुष्य स्वभाव आहे तो, घरोघरी मातीच्याच चुली ....

* जपानमध्ये दर चौ.किमी. मध्ये भारतापेक्षा जास्त माणसे राहतात. चुकीची माहिती आहे. जपान मध्ये एका चौरस किमी मध्ये ३४८ माणसे राहतात आणि भारतात ४५५ म्हणजे ३० % जास्त. सिंगापूर मध्ये एका चौरस किमी ७९०९ माणसे राहतात. भारताचे क्षेत्रफळ ३३ लाख चौरस किमी तर जपानचे ३. ७ लाख म्हणजे एक दशांश आणि सिंगापूरचे क्षेत्रफळ आहे ७२१ चौरस किमी त्यातून भारत हा विविध जाती धर्माचे आणि शैक्षणिक स्तराचे लोक आहेत जपान त्या मानाने एकसंध संस्कृतीचा देश आहे. जितका मोठा देश आणि जितका विविधतेचा तितकं त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. दोन मुलांवर नियंत्रण ठेवणे २० मुलांवर ठेवणे आणि २०० मुलांवर (ती सुद्धा विविध जाती धर्माची) नियंत्रण ठेवणे यात असलेला हा फरक आहे.

एक दुसरा अनुभव बहुदा इथे मिपावरच वाचला होता. कारगिल युध्दाची जेव्हा संभाव्य सुरुवात होऊ लागली तेव्हा सगळ्या सैनिकांच्या रजा कॅन्सल करुन त्यांना कामावर रुजु होण्याची ऑर्डर आली तेव्हा सर्व कल्पना देऊन आरक्षित डब्यात चढ्ण्याची अनुमती मागणार्या एका सैनिकाकडुन २०० रू ची लाच टी.सी ने घेतली होती. वर असेही ऐकवले होते कि अशाच पध्दतीने आम्ही कमाई करु शकतो. प्रत्येकाला सूट देऊ गेलो तर कुणाकडुनही घेऊ शकणार नाही. असा अनुभव आल्यानंतर "मरोत ते नागरिक" असा विचार एका सैनिकाच्या मनात आला तर त्यात काही वावगे वाटण्याचे कारण नाही.

ही मनोवृत्ती बाळकडू मिळालं की जवान असो की किसान,शहरी असो वा ग्रामीण ,बोटचेटपण व बेमुर्वतखोरी बरोबरीने नांदणार. कधी अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन तर कधी जवान-किसान असल्याचं कारण देउन. तुका म्हणे उगी रहावे,चित्ती असू द्यावे समाधान. कोपच्यातला वाचकांची पत्रेवाला नाखु

या विषयाला अनेक पदर आहेत. त्यामुळे विविध मते असणार. सर्वांच्या मताबद्दल आदर आहे. परामर्श: १) डॉ म्हात्रे यांच्या प्रतिसादातील ‘जनता’ या मुद्द्याला पूर्ण अनुमोदन. २) विशुमित: ""जनता """ लय वंगाळ आहे, याबाबत 100% सहमत >>>>> १०००% सहमत ! ३) मनो: चीन हा एकच देश जिथे अगदी घरच्यासारखं वाटतं >>> स्वानुभव व माहितीबद्दल धन्यवाद !... ४) सुबोध खरे : * जपानमध्ये दर चौ.किमी. मध्ये भारतापेक्षा जास्त माणसे राहतात. चुकीची माहिती आहे >>> धन्यवाद. मी ही माहिती संदीप वासलेकरांच्या लेखात वाचली होती. जालावर शहानिशा न केल्याबद्दल चू भू दे घे. ५) दोन मुलांवर नियंत्रण ठेवणे २० मुलांवर ठेवणे आणि २०० मुलांवर (ती सुद्धा विविध जाती धर्माची) नियंत्रण ठेवणे यात असलेला हा फरक आहे.>>> इथे मला नाखु यांचा बाळकडूचा मुद्दा लावावा वाटतो आणि पटतो. जर बाळकडू चांगले मिळाले तर मोठेपणी २०० जण सुद्धा स्वयंशिस्त होतील. अति लोकसंख्या आणि अंगभूत बेशिस्त यात मी बेशिस्तीला ८०% जबाबदार धरेन. (अर्थात हे मा वै म.) धन्यवाद !

नुकताच यंदाच्या ‘लोकमत’ दिवाळी अंकातील द.कोरिआबद्दलचा लेख वाचला. त्यांच्या सोल या राजधानीची लोकसंख्या आहे १.१० कोटी. तरीही तिथे अंगावर येणारी गर्दी वा कलकलाट नाही. याचे कारण दीर्घकालीन नियोजन व अंमलबजावणी. त्यातले ठळक मुद्दे: १. अनेक कार्यालये व उद्योग दूरच्या शहरांत जाव्यात यासाठी करसवलती आणि प्रोत्साहन दिले. २. मेट्रोची सुसज्ज आणि कार्यक्षम व्यवस्था. लोक ही वापरतात कारण: a) खाजगी वाहन पार्क करायचे शुल्क जबरी आहे व b) taxi सेवा मरणाची महाग आहे. सोलची लोकसंख्या मुंबईशी तुलना करण्याजोगी असल्याने हे आशियाई उदाहरण भावले.

अजून दोन मुद्दे आहेत. १.त्यांनी राजधानीत निवासी इमारती खूप कमी बांधल्या आहेत. बरेच लोक बऱ्यापैकी लांब (१-२ तासाचा प्रवास) राहून तिथे मेट्रोने कामाला येतात. २. पादचारी व वाहनचालक वाहतूक नियम अगदी स्वयंशिस्तीत पाळतात; पोलिसाचा धाक म्हणून नव्हे. झेब्रा क्रॉसिंग, सीटबेल्ट इ. गोष्टी समजून उमजून पाळतात. ...... सहज म्हणून .... द. कोरीआचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट, १९४८ आहे !

आता पर्यंत वरील विषयाच्या अनुषंगाने अनेक गोष्टीची चर्चा आपण या धाग्यवर केली .सर्वांच्या मते अनेक गोष्टी यातून पुढे आल्या . प्रामुख्याने लोकसंख्या ,बेशिस्त ,राजकीय परिस्थिती या सारखे अनेक मुद्दे यातून बाहेर आले . मात्र एक महत्त्वाचा मुद्धा ,ज्याने सदोदीत मला अंतर्मुख केले, तो मी इथे मांडण्याचा थोडा प्रयत्न करत आहे . या साठी मी कांही उदाहरणे देतो . पंधरा वर्षा पुर्वी रेल्वे प्रवासा साठी जी गर्दी होती ,तितकीच गर्दी किंव्हा त्या पेक्षा अधिक गर्दी आज हि आहे . रेल्वे मध्ये जागा मिळत नाही म्हणून रेल्वे डब्यांच्या वर बसून प्रवास करतात महाभाग अजूनही आहेत.या शिवाय लोकांच्या मध्ये असाही वर्ग असू शकेल कि मी थोडे जास्त पैसे देण्यास तयार आहे, पण मला आरामात प्रवास करता आला पाहिजे . याचाच अर्थ या सेवेची मागणी असणारे लोक अनेक आहेत. या गोष्टीचा आर्थिक लाभ कसा घ्यावा हे सांगण्या साठी कोण्या चाणक्याची मात्र बिलकुल गरज लागणार नाही . यातून मिळणाऱ्या उत्पनातून नवनवीन रेल्वे ,त्याचे असणारे नवीन रेल्वे मार्ग ,त्यासाठी लागणार पायाभुत खर्च(basic infrastructure) जाऊन देखील आणखीन निधी शिल्लक राहील असे मला वाटते . फक्त या साठी गरज आहे ती भविष्याचा विचार करून केलेल्या योग्य नियोजनाची . हे का होत नाही ? याचे उत्तर माहित असून देखील प्रत्येक भारतीय माणूस मात्र निरुत्तर होतो

In reply to by Sanjay Uwach

२००४ पासून रेल्वेच्या भाड्यात वाढ झालेली नाही. कारण सवंग लोकप्रियता. लालूप्रसाद यादव यांनी तर भंगार विकून आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हा "देणे" ऐवजी नफा दाखवून रेल्वे फायद्यात आणण्याची करामत करून दाखवली होती.त्याचा परिणाम २०१६ पर्यंत जाणवत होता. Indian Railways still coping with Lalu Prasad's myth of "cash surplus" https://www.business-standard.com/article/news-ians/when-railway-s-surplus-vanished-on-closer-scrutiny-looking-back-116022500895_1.html आजमितीला भारतीय रेल्वे हि जगातील सर्वात स्वस्त रेल्वे पैकी एक आहे. एक किमी ला ३६ पैसे असा दर लावल्यावर पैसे आणायचा कुठून? बेस्ट च्या साध्या बसचा दर २ रुपये किमी ला आहे रिक्षाचा ११ रुपये आहे किमीला. (म्हणजे साधारण ३रुपये ६५ पैसे माणशी/ किमी ला) त्यातून ममता बॅनर्जी यांनी सवंग लोकप्रियतेसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुद्धा वातानुकूलित तिसऱ्या दर्जाने प्रवास करण्याची "सुविधा उपलब्ध करून दिली यामुळे सर्वात नफ्यात असलेला प्रवासी वर्ग तोट्यात गेला. कारण १२ लाख कर्मचारी आणि त्यांचे किमान तीन कुटुंबीय मिळून ५० लाख लोकांना वातानुकूलित तिसऱ्या दर्जाने प्रवास करण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याने याही वर्गाचे तिकीट तुम्हाला उपलब्ध होणे कठीण झाले आहे. बाकी विविध वेतन आयोगांनी सुचवलेली पगारातील भरघोस वाढ सर्व सरकारांनी मान्य केली पण कर्मचारी कपात सुट्टीतील कपात या गोष्टी मान्य केल्या नाहीत. हा सर्व बोजा माल वाहतुकीवर टाकल्यामुळे माल वाहतूक महाग झाली आणि त्यामुळे उद्योगांनी आपला माल रस्त्याने पाठवायला सुरुवात झाली. त्यामुळे मालवाहतुकीच्या दर वाढवता येत नाही. प्रवासी वाहतुकीचा दर वाढवता येत नाही आणि भरघोस पगारवाढ सुट्ट्या आणि इतर सुविधा मात्र वाढत चाललेल्या या शृंगापत्तीत भारतीय रेल्वे सापडलेली आहे. आज रेल्वेचे उत्पन्न १०० रुपये असेल तर खर्च १११ रुपये आहे. https://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/railway-expenditure-outpaces-earnings-operating-ratio-breaches-112/articleshow/67205477.cms https://www.indiatoday.in/india/story/indian-railways-operating-ratio-1318888-2018-08-20 आणि आता कर्जमाफीमुळे तीन राज्यात निवडणूक हरण्याची नामुष्की आलेला भाजप शेवटच्या वर्षात रेल्वेची भाडेवाढ करणे शक्य नाही. होऊ द्या खर्च सरकार आहे घरचं चांग भलं

चांगली व समतोल चर्चा झाली आहे. आपली गर्दी, नियोजन, कारभार आणि मनोवृत्ती यांवर इथे अनेकांनी अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. हे सर्व धागालेखकाच्या अनुभवास अनुसरून झाले. पण, धाग्यात जी खालील अन्य बातमी उल्लेखिली आहे त्याकडे आपले लक्ष गेले नाही. ‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’. आता यावर थोडे लिहितो. जेव्हा जवान सामान्यांशी, “मरोत ते नागरिक, कारण ते आम्हालाही त्यांच्या भ्रष्टाचारातून सोडत नाहित”, अशी भूमिका घेतात ती एकवेळ ठीक म्हणू. पण, जेव्हा ते अशा वादातून ‘त्यांच्या’तल्याच एखाद्याचा चक्क खून करतात तेव्हा काय म्हणावे? ही हिंसक प्रवृत्ती निषेधार्ह आहे. तेव्हा त्यांनाही संयम व शांततेचे बाळकडू मिळायला हवे असे राहून वाटते. अलीकडे आपल्या नागरी जीवनात शिस्त ही जवळपास संपली आहे. देशात जी काय शिल्लक आहे ती फक्त लष्करात, असे बरेचदा अभिमानाने सांगितले जाते. तेव्हा स्वतःवर काबू ठेवून कोणीच आपल्याच बांधवांशी हिंसक होता कामा नये.

In reply to by हेमंतकुमार

लष्करातील जवान ( पोलीस आणि निमलष्करी दले सुद्धा) अत्यंत तणावपूर्ण वातावरणात जगत असतात. त्यामुळे तणावातून आपल्याच बांधवांची हत्या किंवा आत्महत्या करण्याचे प्रमाण हा एक लष्करात चिंतेचा विषय असून लष्करी मनोविकारतज्ज्ञ यावर बरेच संशोधन आणि उपाय करण्याचा प्रयत्न करीत असतात. नागरी जीवनात माणसे तणावातून हिंसेला प्रवृत्त होतात पण तेथे प्राणघातक शस्त्रे "त्या प्रमाणात" नसल्यामुळे हत्येचे हे प्रमाण कमी आहे याउलट लष्कराच्या नोकरीत प्राणघातक शस्त्रास्त्रांशी रोजचा संबंध असल्याने हत्येचे प्रमाण जास्त आहे. गुगलून पहा https://www.google.com/search?q=soldier+kills+colleague&rlz=1C1CHNY_en-ININ376IN383&oq=soldier+kills&aqs=chrome.1.69i57j0l5.5512j0j8&sourceid=chrome&ie=UTF-8

आजमितीला भारतीय रेल्वे हि जगातील सर्वात स्वस्त रेल्वे पैकी एक आहे. एक किमी ला ३६ पैसे असा दर लावल्यावर पैसे आणायचा कुठून? >>> +१ तेव्हा स्वतःवर काबू ठेवून कोणीच आपल्याच बांधवांशी हिंसक होता कामा नये. >>> +११ या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.

सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व उत्तर प्रदेश - बिहार मधल्या रंगरुटांचं असतं का पंजाबी -शीख लोक असतात/आहेत ?? (मला वाचीव शीख भारतीय सेनेत सगळ्यात जास्त आहेत इतकं आठवतं आहे, डिटेल मिळाले तर माझंही ज्ञान अपडेट होईल इतकाच हेतू)

भारतात आणि अन्य देशातही काहीवेळा सैन्याला नको इतके डोक्यावर चढवले जाते. प्रत्येक सैनिक हा अगदी तळहातावर प्राण ठेवून सीमेवर लढत असतो असे काही नाही. अनेक सैनिकांना आपल्या सैनिकी गणवेशाची गुर्मी असते. सैन्याला पैसे कोण देते? त्यांचे शिक्षण, हत्यारे, त्यांच्या पार्ट्या, त्यांना स्वस्तात मिळणार्या वस्तू, त्यांचे दिमाखदार पोशाख गोष्टी ह्या आकाशातून पडत नाहीत. भारताच्या करदात्यांकडून जे पैसे मिळतात त्यावर हे चालते. देशासाठी सैन्य हे खरे. सैन्यासाठी देश नाही. प्रत्येक देशाला अगदी पाकिस्तानलाही आपले सैनिक म्हणजे अगदी थोर, शूर, खंदे योद्धे आहेत. ते आहेत म्हणून देश आहे असे वाटत असते. केवळ भारतीय सैन्यच थोर असे काही नाही. पण कुठेतरी ह्याला आवर घातला पाहिजे. सैन्यात राजकारण, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, सरकारी दिरंगाई, गलथानपणा नाही असे कोणी म्हणू नये. अनेक अनेक उदाहरणे आहेत जिथे लोकांवर अन्याय झाला आहे. मिग विमानांच्या अक्षम्य ढिसाळ देखभालीमुळे अनेक पायलट मेले आहेत. इमाने इतबारे, कष्ट करून केलेले अन्य व्यवसाय आणि सैनिक ह्यात फार फरक करू नये. देश चालवण्याकरता दोन्ही लागतात. एकवेळ सैन्य नसणारे देश असू शकतात. पण निव्वळ सैनिकांचा देश असू शकत नाही. तसा असेल तर तिथे यादवी माजेल.

In reply to by हुप्प्या

अनेक सैनिकांना आपल्या सैनिकी गणवेशाची गुर्मी असते.
सेनादले आणि सैनिकांबद्दल आदर आहेच पण, कादंबऱ्यांमध्ये आणि सिनेमात सैनिकी प्रशिक्षणात त्यांचे प्रशिक्षक तुम्ही सिव्हीलीयन्स पेक्षा वेगळे, श्रेष्ठ आहात असे त्यांच्या मनावर बिंबवताना, सिव्हीलीयन्सना तुच्छ लेखताना दाखवतात ते खरे असेल तर अशी गुर्मी त्यांच्या वागण्यात दिसणे स्वाभाविक आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही पण जर हे खरे असेल तर काळानुरूप प्रशिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.

In reply to by टर्मीनेटर

सेनादले आणि सैनिकांबद्दल आदर आहेच पण, कादंबऱ्यांमध्ये आणि सिनेमात सैनिकी प्रशिक्षणात त्यांचे प्रशिक्षक तुम्ही सिव्हीलीयन्स पेक्षा वेगळे, श्रेष्ठ आहात असे त्यांच्या मनावर बिंबवताना, सिव्हीलीयन्सना तुच्छ लेखताना दाखवतात
यात काही प्रमाणात तथ्य असेल असे वाटते. एका सहकार्याने ऑफिस मध्ये एका मुलीला मागणी घातली होती... त्या दोघांची चांगली मैत्री वगैरे होती! तिचे वडील आर्मी मधून निवृत्त झालेले होते. तिने कारण काय द्यावं तर, मी "सिव्हिलिअन" शी लग्न करू शकत नाही, पप्पाना आवडणार नाही वगैरे वगैरे! तेव्हा पहिल्यांदा असे काही वेगळे भेददेखील असतात हा साक्षात्कार आम्हाला झाला! :D आता ती मुलगी स्वतः एका ऑफिस मध्ये काम करत होती म्हणजे सिव्हिलिअनच होती ना? का सैनिकांचे पूर्ण कुटुंब "सिव्हिलिअन" या सामान्य श्रेणीमधून बाहेर पडलेले असते? (हा खरंच प्रश्न आहे )

In reply to by शब्दबम्बाळ

सिव्हिलिअन" शी लग्न करू शकत नाही, पप्पाना आवडणार नाही वगैरे वगैरे! तेव्हा पहिल्यांदा असे काही वेगळे भेददेखील असतात हा साक्षात्कार आम्हाला झाला! :D >>>>> + १ आधीच समाजात बरेच जन्मजात 'भेद'आहेत; त्यात ह्याची एक भर झाली आहे.

In reply to by वन

येस all are equal some people are more equal. मला या वाक्याचा नक्की काय अर्थ आहे ते कोणी समजवून सांगाल काय? अधिक समान म्हणजे ?

In reply to by प्रमोद देर्देकर

त्याचा अर्थ असा: एखाद्या राज्यव्यवस्थेत सर्व नागरिकांना मिळणाऱ्या खालील गोष्टी समान असाव्यात: १. मूलभूत गरजा भागविण्याच्या सुविधा २. राज्यकर्त्यांकडून मिळणारी वागणूक ३. कायदा/ नियम/ न्याय इ. पण..... वास्तवात काही जणांचे लाड होतात तर सामान्यजन त्या गोष्टींना वंचित होतात.

In reply to by वन

त्या वाक्याचा Dictionary.com मधील अर्थ पहा: The sentence is a comment on the hypocrisy of governments that proclaim the absolute equality of their citizens but give power and privileges to a small elite. वन यांनी त्याचा भावार्थ बरोबर लिहिला आहे.

आवडला. अनेक सैनिकांना आपल्या सैनिकी गणवेशाची गुर्मी असते. >>>> याचे बरेच अनुभव आलेले आहेत. तेव्हा सैन्याप्रती आदर व्यक्त करूनही तुमच्याशी सहमत आहे.

त्यांचे शिक्षण, हत्यारे, त्यांच्या पार्ट्या, त्यांना स्वस्तात मिळणार्या वस्तू, त्यांचे दिमाखदार पोशाख गोष्टी ह्या आकाशातून पडत नाहीत. बहुसंख्य लष्करी अधीकारी आणि सैनिक याना ( डॉकटर आणि इंजिनियर सोडून) लष्करात मिळणारे शिक्षण निवृत्त झाल्यावर निकामी असते. तोफखान्यात तोफ चालवण्याचे किंवा सामान्य सैनिकाला मिळालेले बंदूक मशीन गन चालवण्याचे उत्तम शिक्षण बाहेर संपूर्ण कुचकामी असते तेंव्हा ३२ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सैनिकाला ( १८ व्या वर्षी भरती आणि १५ वर्षे नोकरी) बाहेर केवळ रखवालदार म्हणून नोकरी मिळते ज्यात त्याला केवळ हडत हुडुत केले जाते. यामुळे मद्यपानाच्या आहारी गेलेले असंख्य सैनिक आणि अधिकारी मी लष्कराच्या व्यसन निवृत्ती केंद्रात पाहिलेले आहेत. त्यांच्या पार्ट्या स्वतःच्या खर्चानेच होतात. मिळणारी दारू फक्त स्वस्त असते. दिमाखदार पोशाख हा स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून स्वच्छ आणि कडक ठेवावा लागतो. २००६ साली मी निवृत्त झालो तेंव्हा सात वर्षात एकदा ७ हजार रुपये OUTFIT ALLOWANCE मिळत असे आणि महिना १०० रुपये KIT MAINTAINCE ALLOWANCE मिळत असे. वर्षाला मिळणाऱ्या एक हजार रुपयात गणवेशाचा दोन जोड्या विकत घेता येतात आणि स्वच्छ पांढरा गणवेश आपल्याला किमान ४ जोड्या दर सहा महिन्याला म्हणजे ८ जोड्या (शर्ट आणि पॅन्ट) आणि १५ ऑगस्ट २६ जानेवारी साठी एक कोरा करकरीत असे ९ जोड गणवेश दर वर्षी मला लागत असत. १०० रुपये महिन्यात बूट त्याचे पॉलिश खांद्यावरच्या चमकणाऱ्या फिती इ ची देशभाल अशक्य आहे. बाकी मला मिळणाऱ्या पगाराच्या ३० % अगोदरच आयकर कापून जात असे त्यामुळे केवळ इतरच नव्हे तर मी पण एक प्रामाणिक करदाता होतो. आपल्या सारख्याच एका माझ्या डॉक्टर मित्राचे असे उद्गार ऐकून मी त्याला मी भरत असलेल्या कराची रक्कम सांगितली तेंव्हा तो माझ्यापेक्षा तिप्पट पैसे मिळवत असून कर मात्र अर्धाच भरत होता असे लक्षात आले अर्थात यानंतर तुमची "ऐश" आमच्या कराच्या पैशातून होते आहे असे बोलणे त्याने बंद केले. मिग विमानांच्या अक्षम्य ढिसाळ देखभालीमुळे अनेक पायलट मेले आहेत. या विधानाच्या समर्थनार्थ आपल्याला एक तरी पुरावा देता येईल का? विमाने ४० वर्षे जुनी आहेत. सर्वात जास्त वापरली गेली आहेत. त्यांचे सुटे भाग उपलब्ध करून देण्यात सरकार संपूर्णपणे कुचकामी ठरले आहे. अद्ययावत वैमानिक प्रशिक्षण विमान( ऍडव्हान्सड जेट ट्रेनर) विमान त्यातील तीन दशके आपल्याकडे नव्हते. पहिले अद्ययावत वैमानिक प्रशिक्षण विमान वीस वर्षाच्या कंत्राटाच्या गुर्हाळानंतर २००८ मध्ये उपलब्ध झाले. तोवर दीपक (HPT ३२) हे वैमानिक प्रशिक्षण विमान वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात असे. दीपक चा हवेतील जास्तीत जास्त वेग २८० किमी आहे तर मिग २१ चा उतरतानाचा कमीत कमी वेग ३९६ किमी आहे. म्हणजे म्हशीवर बसणाऱ्या माणसाला एकदम चित्त्यावर बसवले तर काय स्थिती होईल राहिली गोष्ट देखभालीची-- सोव्हिएत युनियन कोसळल्यावर मिग विमानांचे सुटे भाग मिळत नसत. मिळत त्यासाठी पैसे देण्यात बाबू लोकांची अक्षम्य दिरंगाई होती. असंख्य सुटे भाग केवळ वर्षानुवर्षे पडून राहिल्याने (WEATHERING) मुळे कालबाह्य झाले होते ते प्रथम भंगारात काढून त्याच्या निविदा काढून ते रशिया युक्रेन अशा विविध देशांकडून मिळवावे लागत तेवढ्या कालावधी मध्ये इतर नादुरुस्त झालेल्या विमानांचे सुटे भाग (CANNIBALISATION) वापरून विमाने जिवंत ठेवली जात होती. देखभाल ढिसाळ कधीही नव्हती. वायुसेनेचे एक विमान जेंव्हा अगदी अर्ध्या तासासाठी सुद्धा उड्डाण करते तेंव्हा त्याच्या एकंदर १०,०००( दहा हजार) गोष्टींची कसून तपासणी(CHECKLIST) होते. सरकारच्या नालायकीमुळे असंख्य तरुण वैमानिक मृत्युमुखी पडलेले आहेत केवळ बॅटऱ्या विकत घेण्यात (त्या सुद्धा भारतीय कंपनीच्या) झालेल्या दिरंगाई मुळे एक १५०० कोटी रुपयांची पाणबुडी स्फोटाने निकामी झाली त्याबद्दल जबादारी घेऊन नौसेनाध्यक्षानी राजीनामा दिला पण पण नोकरशाहीला ना खंत ना खेद. ना संरसक्षण सचिव उपसचिव किंवा संरक्षण मंत्री यांनी जबादारी घेतली किंवा राजीनामा दिला. हि स्थिती असूनही आपण अशी ढिसाळ विधाने पुरावा न देता करत आहेत याचे दुःख आणि आश्चर्य वाटते.

In reply to by सुबोध खरे

फ्लाईट लेफ्ट्नंट अभिजित गाडगीळ ह्याचा मिग २१ नामक जुनाट विमान उडवताना मृत्यु झाला. विमानदळाने सगळा दोष अभिजित गाडगीळचा होता असे जाहीर केले. त्याच्या आईने प्रकरणाचा पाठपुरावा करुन अनेक वर्षे लढा दिला. विमानदळाने सर्वपरीने त्याला विरोध केला. सत्य बाहेर येणार नाही ह्या करता खूप प्रयत्न केले. कविता गाडगीळ (आई) वर वाईट आरोप केले. पण त्या आईने थेट राष्ट्रपतींची गाठ घेतली आणि नंतर कधीतरी पुन्हा तपास झाला आणि त्यात असे निष्पन्न झाले की अभिजित गाडगीळ पूर्ण निर्दोष होता. आणि त्या विमानांची देखभाल नीट होत नव्हती. ह्या विमानांना उडत्या शवपेट्या असे नाव दिले गेले होते. अनेक वर्षांनी एअर चीफ मार्शलने कविता गाडगीळांची माफी मागितली होती. तुम्हाला गणवेष नीटनेटका ठेवायला मिळणारा भत्ता पुरत नाही. ठीक. पण पोषाख तर फुकट मिळतो ना? बाकी किती व्यवसायात लोकांना भपकेबाज पोषाख फुकट मिळतो? लष्करातील तमाम पार्ट्या ह्या खाजगी पैशानेच होतात ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. जरी लष्करातील लोक कर भरत असले तरी ते मोठ्या प्रमाणात करदात्यांचे पैसे खर्च करतात हेही तितकेच खरे. सामान्य नागरिक कर भरतो पण त्याच्या कामाकरता, प्रशिक्षणाकरता कर खर्च होतो का? नगण्य. लष्कर हे देशाच्या म्हणजे देशाच्या नागरिकांकरता आहे हे सैनिक अनेकदा विसरुन ब्लडी सिव्हिलियन्स वगैरे शिव्या देण्यात धन्यता मानतात. कितीही थोर असले तरी सैन्याच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणजे नागरी अधिकारीच असतो हे विसरू नये.

In reply to by हुप्प्या

१) ब्लडी सिव्हिलियन्स म्हणणारे दीड शहाणे लष्करात नक्कीच आहेत आणि ते अगदी चूक आहे याबद्दल कोणतेही दुमत नाही २) देशभक्ती काही लष्कराची मक्तेदारी नाही कोणीही माणूस जर आपले काम मन लावून इमानेइतबारे आणि संपूर्ण जबाबदारीने करत असेल तर तो तितकाच देशभक्त आहे यातही कोणताही वाद नसावा. कारगिल युद्धाचे वेळेस मी जेंव्हा असे म्हणालो कि मी माझी नोकरी लष्करात करतो म्हणून मी जास्त देशभक्त असे नाही तर माझा भाऊ कारखाना चालवतो त्याच्याकडे ६ अभियंते आणि ३४ कामगार काम करतात म्हणजेच तो ४० लोकांना रोजगार पुरवतो तर तो माझ्यापेक्षा जास्त देशभक्त आहे, तेंव्हा हे म्हणणे लष्करातील लोकांना रुचले नव्हते( हे मी मिपावरच कोठे तरी अगोदर पण लिहिले आहे) ३) विमानांची 'देखभाल नीट होत नव्हती' हे आपले विधान पटत नाही कारण याचा सरळ अर्थ असा निघतो कि देखभाल करणारे वायुदलात कर्मचारी ढिसाळ होते. वस्तुस्थिती अशी आहे कि विमाने फार जुनी झाली होती आणि त्याचे सुटे भाग वेळेवर मिळत नसत त्यामुळे दुसऱ्या नादुरुस्त विमानांचे सुटे भाग लावून विमाने उड्डाणयोग्य स्थिती मध्ये आणली जात असत. विमाने जुनी होणे( वेळेत त्यांच्या जागी दुसरी विमाने न विकत घेणे), सुटे भाग वेळेत न मिळणें ( हि सरकारची जबाबदारी आहे) आणि देखभाल नीट न करणे ( हि जमिनीवरील देखभाल करणाऱ्या अभियांत्रिकी विभागाची आहे) आणि वायुदलात अभियांत्रिकी विभाग आपले चोख काम करतो याबद्दल मला कोणतीही शंका नाही. ४० वर्षे जुनी कार आपल्यापैकी कोण मेंटेन करीत आहे का? मग जे विमान उतरण्याचा वेग ३९६ किमी आहे (weathering, stress failure किती असेल याचा एकदा विचार करून पहा) त्या जुन्या विमानाची मनोभावे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण अपमान का करीत आहात? ३) सामान्य नागरिक कर भरतो पण त्याच्या कामाकरता, प्रशिक्षणाकरता कर खर्च होतो का? नगण्य. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर खर्च होतो तो करदात्यांचाच असतो ना? उदा रेल्वेचा लोको पायलट किंवा लोकलच्या मोटर मनच्या प्रशिक्षणावर खर्च होतोच ना किंवा भाभा अणुकेंद्रात इसरो मध्ये एम एस सी/ बी टेक झालेल्या लोकांना घेतात आणि त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण होते तो खर्च काय ते शास्त्रज्ञ भरतात का? मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण आपल्याला लष्कराबद्दल आकस आहे असेच मी म्हणेन ४) पण पोषाख तर फुकट मिळतो ना? बाकी किती व्यवसायात लोकांना भपकेबाज पोषाख फुकट मिळतो? एअर इंडिया जेट एअरवेज इंडिगो सारख्या विमान कम्पन्यापासून पासून असंख्य आस्थापनात रुग्णालय हॉटेल इ ठिकाणी अक्षरशः फुकट पोषाख मिळतात.मला दर वर्षी येणार खर्च मी लिहिला आहे मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण उघड आहे. ५) लष्करातील तमाम पार्ट्या ह्या खाजगी पैशानेच होतात ह्यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.हा तुमच्या विश्वासाचा प्रश्न आहे त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. शाळेच्या, कॉलेजच्या, कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त का मिळतात? याचे कारण त्यांच्या जागेचे भाडे वीज पाणी याचा खर्च नगण्य असतो तीच स्थिती लष्कराच्या पार्टीची आहे. सगळ्याच पार्ट्या कोणीतरी स्पॉन्सर करते असे तुम्हाला वाटत असेल तर आपले मत परिवर्तन होणे अशक्य आहे. आणि अशा स्पॉन्सर पार्ट्या पंचतारांकित हॉटेल सोडून लष्करी मेस मध्ये का होतील? २००६ साली पार्टीचा खर्च माणशी २५० येत असे अर्थात लष्करात दारू स्वस्त मिळते हेही एक कारण आहे (मी स्वतः दारू पित नाही) असो आपले मतपरिवर्तन होइल यावर माझा विश्वास नाही परंतु इतर लोकांना वस्तुस्थिती समजावी म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.

In reply to by सुबोध खरे

== सुटे भाग वेळेत न मिळणें ( हि सरकारची जबाबदारी आहे) आणि देखभाल नीट न करणे ( हि जमिनीवरील देखभाल करणाऱ्या अभियांत्रिकी विभागाची आहे) आणि वायुदलात अभियांत्रिकी विभाग आपले चोख काम करतो याबद्दल मला कोणतीही शंका नाही == एखाद्या संस्थेवर आंधळा विश्वास ठेवणार्‍या लोकांचे मतपरिवर्तन करणे अशक्य आहे. परंतु विमाने उडवणे हे विमानदळाचे काम आणि त्यांची देखभाल करणे हे मात्र "सरकारचे" काम हे अगदीच मूर्खपणाचे आहे. जर जी विमाने आपण उडवत आहोत त्यांची देखभाल कुणी दुसराच करत असेल आणि त्याच्या दर्जाची शाश्वती नसेल तर अशी विमाने आपल्या प्रशिक्षित पायलटांना उडवायला देणे हा बेजबाबदारपणा आहे. माझ्या माहितीप्रमाणे लष्करी विमानतळावरील सर्व व्यवस्था लष्करच चालवते. आणि जर हवाईदळाची चूक नव्हतीच तर एअरचीफ मार्शलने कविता गाडगीळांची माफी का बरे मागितली? कर्तृत्व आमचे आणि चुका मात्र दुसर्‍याच्या हे धोरण ढोंगीपणाचे आहे. == सगळ्याच पार्ट्या कोणीतरी स्पॉन्सर करते असे तुम्हाला वाटत असेल तर आपले मत परिवर्तन होणे अशक्य आहे. आणि अशा स्पॉन्सर पार्ट्या पंचतारांकित हॉटेल सोडून लष्करी मेस मध्ये का होतील? ===== सगळ्या पार्ट्यांना एकच नियम लागू असण्याचे काहीच कारण नाही. काही लष्करी आलिशान पार्ट्या ह्या नक्कीच सरकारी खर्चाने होतात हे मी ठासून सांगू शकतो. बहुतेक मिलिटरी संस्था ह्या आपापल्या कँपसवर असतात. कित्येकदा हे कँपस मुख्य शहरापासून लांब असतात. उदा. पुण्याचे एन डी ए. पूर्वी हे पार गावाबाहेर होते. असे असल्यामुळे आणि लष्करी मेस पुरेशी उत्तम स्थितीत असल्यामुळे पार्ट्या तिकडेच झाल्या तर आश्चर्य नको. == एअर इंडिया जेट एअरवेज इंडिगो सारख्या विमान कम्पन्यापासून पासून असंख्य आस्थापनात रुग्णालय हॉटेल इ ठिकाणी अक्षरशः फुकट पोषाख मिळतात.मला दर वर्षी येणार खर्च मी लिहिला आहे मग केवळ लष्कराबद्दल आपण टिप्पणी करता आहात याचे कारण उघड आहे. == बँकेच क्लार्क, कॅशियर आणि अन्य कर्मचारी, विम्याच्या ऑफिसमधील कर्मचारी, रेल्वेच्या तिकिट ऑफिसात काम करणारे, बाकी कर्मचारी, शेतावर काम करणारे, अन्य खाजगी क्षेत्रात काम करणारे ह्यांची संख्या विमान कंपन्यात काम करणार्‍यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि ह्यांना कुठलाही पोषाख दिला जात नाही. अशा लोकांच्या तुलनेत लष्करातील लोकांना निदान युनिफॉर्म आणि त्याकरता भत्ता तरी मिळतो हा माझा मुद्दा आहे. == कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणावर खर्च होतो तो करदात्यांचाच असतो ना? उदा रेल्वेचा लोको पायलट किंवा लोकलच्या मोटर मनच्या प्रशिक्षणावर खर्च होतोच ना किंवा भाभा अणुकेंद्रात इसरो मध्ये एम एस सी/ बी टेक झालेल्या लोकांना घेतात आणि त्यांचे तांत्रिक प्रशिक्षण होते तो खर्च काय ते शास्त्रज्ञ भरतात का? == अतीविशिष्ट क्षेत्रात काम करणारे लोक सरकारी खर्चाने प्रशिक्षित होत असतीलही. पण बहुतांश कर्मचारी कुठलेही सरकारी खर्चाने प्रशिक्षण घेत नाहीत. उदा. कारकून, कॅशियर, हिशेबनीस, तिकिट तपासनीस, तिकिट विक्रेते हे सगळे शाळा कॉलेजच्या शिक्षणावर कामावर लागतात आणि काम करता करता ते शिकतात. लष्करात प्रशिक्षण, त्याकरता लागणारी साधने ह्याचा खर्च अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा कितीतरी जास्त आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे. लष्कराकडील विमाने, बोटी, शस्त्रास्त्रे , दळणवळण उपकरणे ह्यातले काहीही स्वस्त नसते. बाकी क्षेत्रात केले जाणारे काम आणि खर्च ह्यातून काहीतरी उत्पन्न मिळते. सेवा वा उत्पादन गिर्‍हाईकाला मिळते. नागरी विमान सेवा, हॉटेल, रेल्वे, बँक, विमा उत्पादने बनवणारे कारखाने सर्व. लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. खरोखरच अमुक एका दर्जाची संरक्षण सेवा पुरवायला इतका अफाट खर्च आवश्यक आहे का हा प्रश्न पुरेसा विचारला जात नाही असे मला वाटते. उलट लष्कराचे काम आहे म्हणजे पडेल ती किंमत घेऊन ते खरेदी करणे असा साधारण दृष्टीकोन असतो. आजवर भारतात झालेले मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्रातले होते. मग ते चीन युद्धातील जीप, बोफोर्स, वेस्टलँड, राफेल, शवपेट्या . हा योगायोग नाही. आणि प्रत्येक वेळी लष्करी अधिकारी धुतल्या तांदळासारखे. मात्र बाकी सगळे लोक सरकारी कर्मचारी, नेते मात्र भ्रष्ट अशी मांडणी करणे भोळसटपणाचे आहे.

In reply to by हुप्प्या

लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. खरोखरच अमुक एका दर्जाची संरक्षण सेवा पुरवायला इतका अफाट खर्च आवश्यक आहे का हा प्रश्न पुरेसा विचारला जात नाही असे मला वाटते. >>>+ १ कित्येकदा मला असे वाटते की जगात सर्वत्र शांतता नांदली असती तर अवाढव्य लष्करी खर्च वाचला असता आणि तो विकासासाठी उपयोगी पडला असता. पण असो…. दुसरा विचार असा की सध्या लष्कर सीमांचे संरक्षण करते आणि म्हणून नागरी लोकांनी त्यांच्यासाठी खर्च करायचा. एक प्रकारे ही पूरकता आहे का? नक्की समजत नाही. कोणी समजून सांगितल्यास आवडेल.

In reply to by हुप्प्या

आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी समजून आली. आपल्याला समजावणे माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे. फक्त दोनच मुद्दे १) आजवर भारतात झालेले मोठे भ्रष्टाचार हे संरक्षण क्षेत्रातले होते. फक्त दोनच घोटाळे पहा -- २G घोटाळा २ लाख कोटी आणि कोळसा घोटाळा २ लाख कोटी संरक्षण क्षेत्रातील आजवरचे सर्व घोटाळे मिळून यातील एका घोटाळ्याइतकीही रक्कम होत नाही २) लष्कराचा मात्र निव्वळ खर्च असतो. उत्पादन काही नाही. हे अगदी बरोबर आहे. निव्वळ अनुत्पादक खर्च असलेले लष्कर बडतर्फच करून टाकावे. शरीरात सर्वात जास्त वाढीचा वेग असणाऱ्या पेशी म्हणजे पांढऱ्या पेशी यांचे काम काय तर शरीराचे बाह्य आक्रमणापासून संरक्षण करणे शरीराचा हा खर्चही अनुत्पादकच असतो कि मग निसर्ग एवढा खर्च का करतो? पांढऱ्या पेशींचे काम बंद होते असा एक आजार आहे त्याला एड्स म्हणतात. इतर आपला युक्तिवाद अगदीच हास्यस्पद आणि पूर्वग्रहदूषित आहे. तेंव्हा मी आपल्याशी वितंडवाद घालू इच्छित नाही. बाकी आपले मत आपल्यापाशी. धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

खरे तर पूर्वग्रह आपाल्याकडेही आहेतच. दुसरी बाजू ऐकून न घेता त्याची हेटाळणी करणे हे कसले लक्षण आहे? लष्कर बडतर्फ करता आले तर खर्च कमी होईल. पण ते एक टोक आहे. लष्कराचा अफाट खर्च थोडा कमी करता आला तर चांगले असे म्हटले तर त्यात आकांडतांडव करण्यासारखे काय आहे? लष्कराच्या लोकांना आपला खर्च कमी केला जातो आहे ही कल्पनाच सहन होत नाही. कारण त्यांच्या हक्काची कुरणे जातात. पण करदात्यांनी तसा विचार केलाच पाहिजे. शून्य खर्च आणि अफाट खर्च ह्याच्या मध्ये काही असू शकते की नाही? डोक्यात राख घालून "करा बडतर्फ फौज मग!" असे म्हणणे प्रगल्भतेचे लक्षण नाही. अनेक संरक्षण संबंधित भ्रष्टाचार प्रकरणे यावर निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. उदा. बोफोर्स. राजीव गांधी हरण्याचे कारण तेच होते. बाकीही प्रकरणे अशीच खळबळजनक होती. पैशाचा आकडा कदाचित कमी असेल पण धुरळा जास्त उडला होता.

In reply to by हुप्प्या

"संरक्षण संबंधित भ्रष्टाचार प्रकरणे" लष्करी अधिकाऱ्यांनी केली का संरक्षण मंत्रालयात असलेल्या बाबू आणि राजकारण्यांनी केली आहेत याचा एकदा शोध घ्या बरं. बाकी मी म्हटलंच आहे आपली पूर्वग्रहदूषित विचारसरणी आणि एकांगी मते बदलणे माझ्या कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. त्यासाठी मी डोक्यात राख घालायची गरज नाहीच.

In reply to by हुप्प्या

कितीही थोर असले तरी सैन्याच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती म्हणजे नागरी अधिकारीच असतो हे विसरू नये. >>>>> + ११ नागरी असो वा लष्करी, दोन्ही गटांनी एकमेकाबद्दल आदर ठेवावा. दोघे एकमेकास पूरक सेवा देत असतात.

तु्म्ही रोज तर प्रवास करत नाही ना? आणि असं तुमच्या बाबतीत रोज तर होत नाही ना? तुमच्या आरक्षित स्थानांवर लष्करी जवान बसले आणि एखाद वेळेस तुम्हाला झाला थोडा त्रास तर असं काय मोठं बिघडलं?! बरं, सगळे तरूण मित्रच तर होतात. असंही नाही की कुणी वृद्ध आणि आजारी होतं! पण आमचं असं आहे ना, की आमचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आम्ही जवानांकरता जराही तोशिश पत्करणार नाही..आणि मग त्यानंतरच आम्ही 'येईन तर तिरंगा रोवून किंवा तिरंग्यात गुंडाळून!' असं म्हणणाया कारगील शहीद विक्रम बात्राचं कौतुक करणार! मगच आम्ही दुर्दम्य देशभक्तीच्या जोरावर ६ दिवस बर्फाखाली जिवंत राहणाया हनुमंताप्पाचे कौतुक करणार! पण आम्ही आमच्या एक वेळच्या प्रवासाच्या आरक्षित जागाही खुल्या दिलाने त्यांना देणार नाही! अरेरे..कीव येते आम्हाला आमच्या कोतेपणाची! Vikram Batra

आणि मुळात एक दिवसाच्या प्रवासातली गैरसोय ती काय आणि त्यावर चर्चा ती केवढी भली मोठी! अरे घरदार, आईवडील, बायको, मुलं कशाचीही पर्वा न करता ते जवान आपल्याकरता मरणाला सामोरे जातात! असो. माझी मलाच लाज वाटली आज!

जवानांकरिता तुमची गैरसोय झाली तर त्यात तक्रार कशाला असे म्हणण्यात तथ्य नाही. जवानांची चांगली सोय व्हावी (अधिक रेल्वेगाड्या, डबे ई) हे मान्यच त्याकरिता अनेक सरकारने अधिक बजेट दिले तरी चालेल, रेल्वे तिकिटावर वा इतर कोणत्या सरकारी खर्चावर अतिरिक्त अधिभार लावावा त्याबद्दल बहूसंख्य नागरिक तक्रार करणार नाहीत. सैन्याने आवाहन केले तर मदतनिधीसाठीही अनेकजण पुढे येतील हे नक्कीच.. पण जवानांनी अरेरावी करावी ,इतरांना त्रास द्यावा याचं समर्थन अयोग्य आहे. सर्वसामान्य नागरी सुविधांचा लाभ घेताना वा नागरिकांशी संबंध येत असताना देशातले कायदे , नियम जवानांकरिताही लागू आहेत हे सैन्यातील जवानांनी विसरू नये. किंबहूना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान 'नागरी कायद्याचा आदर करणे त्यांना अनिवार्य आहे' हे त्यांच्या मनावर बिंबविण्यात यावे.

आतापर्यंत सदस्यांनी मांडलेले ठळक मुद्दे: १. नागरी लोकांनी जेव्हा केव्हा गैरसोयीची वेळ येते तेव्हा कायम पडती बाजू घ्यावी व लष्करी लोकांना प्राधन्य द्यावे २. लष्करी लोकांना त्यांच्या गणवेशाची गुर्मी असते. ती अयोग्यच ३. लष्करावरील अवाढव्य खर्च हा योग्य आहे का याचे मूल्यमापन व्हावे ४. जवानांनी अरेरावी करावी ,इतरांना त्रास द्यावा याचं समर्थन अयोग्य आहे ५. भारतातील अशा समस्यांचे मूळ अफाट लोकसंख्या, मुरलेली बेशिस्त, ढिसाळ नियोजन आणि बेपर्वाई यात दडलेले आहे. .