गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - डॉ. एस. एल. भैरप्पा.* आजवर त्यांनी 21 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले हे नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात. भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात. "पर्व' ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.
कोट्यवधी हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस कोटी लोक जातात पण तिथे जी मस्जीद आहे तेच मूळचे काशी विश्वनाथाचे मंदीर आह.आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते.
कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी "आवरण ' या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली.कन्नड भाषेत पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.
फेब्रुवारी 2007 मध्ये "आवरण' प्रकाशित झाली. 2009 पर्यंतच हिची *22 पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर 10 चर्चासत्रे झाली. या पुस्तकावर 10 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी 4 पुस्तके ही "आवरण'वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.
वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.
गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.
सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. 'हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन'चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात "दा-विंची कोड' या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.
कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅक पद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. 1992 साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.
रझिय ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव. आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.
रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन् आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी पोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे.ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.
दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात.सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.
याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट* होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.
स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे.
लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. आता तो खोजा छ. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी "आवरण'च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे. *आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.
आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते.136 ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.
भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू.आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशारीतीने करतात, हे "आवरण'मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी "आवरण'वर तुटून पडताना दिसत आहे. "आवरण'मधील भूमिका ही 136 ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.
मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते.पुढील काही उद्धरणे पाहा...
"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला "आवरण' म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला "विक्षेप' असे म्हटले जाते. *व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या' आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "माया' म्हटलं जातं.''
""...आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही,असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?''
"" औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.''
""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''
पुस्तकाचे नाव : आवरण
लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा
अनुवाद : उमा कुलकर्णी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
आभार :पुस्तक परिचय - सिद्धाराम भै. पाटील.
साभार :शेखर बेहेरे
प्रतिक्रिया
16 Sep 2018 - 10:00 pm | ट्रम्प
पुरोगामी हिंदू गिरीश कर्नाड ,आनंतमूर्ती चा चेहरे उघडे पडल्याचा उल्लेख आवडला .
""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.'' या वाक्याला मनापासून दाद .
16 Sep 2018 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर परिक्षण. वाचावी लागेल ही कादंबरी.
16 Sep 2018 - 10:28 pm | यशोधरा
सुरेख आहे ही कादंबरी. परीक्षण आवडले.
16 Sep 2018 - 11:09 pm | टवाळ कार्टा
उत्सुकता चाळवली गेलीय
17 Sep 2018 - 10:47 am | अथांग आकाश
उत्तम परीक्षण! वाचावीच लागेल हि कादंबरी!
17 Sep 2018 - 11:14 am | संजय पाटिल
हि कादंबरी वाचली आहे. भैराप्पांच्या सर्व लेखनाचा दुवा कुठे मिळेल?
17 Sep 2018 - 3:39 pm | तेजस आठवले
हे वाक्य अतिशय अप्रतिम आहे.
शांतताप्रिय धर्माला शांतता आवडते, पण ती इतर सर्वांना ठार केल्यानंतर... शिल्लक राहिलेली... भयाण आणि विकृत शांतता.
17 Sep 2018 - 4:30 pm | शाम भागवत
बुकगंगावर नोंदणी केली. भिमच्या सहाय्याने पुस्तक विकत घेणे खूप सोपे झालय. कोड स्कॅन केला की झाले. आपली कार्डाची कोणतीही माहिती बाहेर जायची भीती नाही ₹२७ जास्त घेताहेत. पण पेट्रोललाही तेवढेच गेले असते.
17 Sep 2018 - 5:04 pm | प्रचेतस
भैरप्पांची जवळपास सर्वच वाचली आहेत, जवळपास सर्वच संग्रहीही आहेत.
आवरण सुरेखच आहे, पण तिला भैरप्पांची बेस्ट किंवा एकमेवाद्वितीय म्हणावे का? तर नाही. वंशवृक्ष आणि जा ओलांडूनी ह्या कादंबऱ्या भैरप्पांच्या सर्वोत्तम म्हणाव्या लागतील. तुलनेने दुर्लक्षित राहिलेली 'सार्थ' ही पण एक जबरदस्त कादंबरी आहे. भैरप्पा अगदी सहजपणे एका मोठ्या इतिहासकाळाची सफर घडवून आणतात.
17 Sep 2018 - 6:30 pm | शाम भागवत
बुकगंगावर
वंशवृक्ष प्रती संपल्या.
जा ओलांडूनी, सार्थ अजून आल्याच नाहीत
17 Sep 2018 - 6:53 pm | प्रचेतस
पुण्यात असलात तर मेहतामध्ये सार्थ आणि वंशवृक्ष मिळू शकेल (सार्थची नवी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालीय). जा ओलांडूनी मिळणे मात्र खूप अवघड आहे.
17 Sep 2018 - 8:33 pm | शाम भागवत
ओके.
18 Sep 2018 - 4:06 pm | लई भारी
आवरण, वंशवृक्ष आणि पर्व वाचलं आहे आणि फ्यान झालो आहेच.
"जा ओलांडूनी" विषयी कधी ऐकलं नव्हतं. सध्या प्रिंट मध्ये नाही का हे?
18 Sep 2018 - 6:56 pm | प्रचेतस
जा ओलांडूनी हा दातू ह्या कन्नड कादंबरीचा अनुवाद. ह्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक मला जवळपास १०/१२ वर्षांपूर्वी फोर्टला किताबखान्यात मिळालेलं होतं. त्यानंतर कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात किंवा पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक दिसलेलं नाही.
17 Sep 2018 - 8:48 pm | ट्रेड मार्क
परवाच एका कायप्पा ग्रुप वर हे ढकलपत्र आलं होतं. त्या ग्रुप मधल्या एकदोघांचं म्हणणं होतं की भैरप्पा आधी चांगलं लिहायचे पण आता ते उजव्या विचारांकडे झुकलेत त्यामुळे आता त्यांची पुस्तकं वाचनीय राहिली नाहीत. विशेषतः आवरण मध्ये तर शांतताप्रिय समुदायाबद्दल जरा वाईट लिहिलंय त्यामुळे आवरण तर अजिबात चांगली नाहीये. :)
17 Sep 2018 - 9:05 pm | प्रचेतस
भैरप्पा पहिल्यापासून उजव्या विचारांचेच आहेत हे उघड आहेच पण म्हणून ते काहीही लिहितात असं नव्हे. धर्मश्री, आवरण, सार्थ ही काही प्रमुख उदाहरणे, पण कादंबऱ्या अतिशय समतोल आणि डाव्यांच्या दांभिकापणावर प्रहार करणाऱ्या आहेत.
त्यांची फसलेली कादंबरी एकच वाटते ती म्हणजे मंद्र. संगीताच्या विषयावरील ही कादंबरी बरीचशी रटाळ आहे.
17 Sep 2018 - 9:08 pm | यशोधरा
मला आवडली मंद्र. रटाळ वाटली नाही.
17 Sep 2018 - 9:10 pm | ट्रेड मार्क
मी भैरप्पांची एकही कादंबरी वाचलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही सांगाल ते बरोबर असेल. वरील प्रतिसाद लिहिण्याचा माझा उद्देश म्हणजे वाचक विचारसरणीवरून कसे फिरतात हे दाखवायचं होतं.
18 Sep 2018 - 12:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
"पर्व"वाचल्या पासून भैरप्पांचे नाव आवडत्या लेखकांच्या यादीत बरेच वर आहे.
या कादंबरी बद्दल या आधिही वाचले होते पण इथे "दा-विंची कोड" बरोबर तुलना केल्याने अपेक्षा लैच वाढल्या आहेत.
जमले तर आजच विकत घेतो.
पैजारबुवा,
19 Sep 2018 - 9:02 am | मूकवाचक
+१
18 Sep 2018 - 2:18 pm | श्वेता२४
भैरप्पा यांच्या लेखनाची चाहती आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांचे बरेच वाचन झाले आहे. त्यांचे सर्व लेखन पुन्हा वाचून काढायची इच्छा आहे. तुमच्या धाग्यामुळे पुन्हा आठवण झाली.