दिवाळी इथली आणि तिथली

लेखनविषय:
काव्यरस
*दिवाळी इथली आणि तिथली* बंगल्यामधे सगळीकडे विजेची रोषणाई गिफ्ट बाॅक्सेसमधून ओसंडते मेवे मिठाई खातील तरी किती..अर्धे वायाच जाई कशाचीच तमा इथल्या कोणालाच नाही !! झगमगाटात वाहतो पैशांचा महापूर, आसमानात पसरे हजारो फटाक्यांचा धूर ! तिजोरी भरून वाहिली तरी 'अजून' चा सूर, कोण करेल भस्मसात हा लालसेचा असुर !! तिकडे झोपडीमधे घडे रोजचाच उपास, हाती नाही काम, नाही पोरांमुखी घास, कामासाठी वणवण करून लागतो श्वास दिवाळी नाही की मिठाई नाही फटाके कपड्यांची तर बातच नाही एका पणती पुरतेही तेल घरात नाही , पोटाच्या आगीने नी अश्रुंनी जर पणती पेटेल तर अवघी झोपडी प्रकाशाने झगमगून उठेल !! किती भेद जगण्यांमधे..दोन टोकं

अन् मग

लेखनविषय:
काव्यरस
माझ्या क्षणभंगुर कवितेवर प्रतिसाद देणार्‍या क्षमाशील वाचकांनो, या कवितेच्या शवपेटीवर मी शेवटचा खिळा ठोकेन. धन्यवादाचा. अन् मग विस्मृतीच्या विस्कळखाईत कायमची दफनल्यावर ह्या कवितेचं काळंशार मायाळू खत होवो. अन् मग उपेक्षेच्या झळा सोसून, दुर्बोधतेचे आरोप झेलून, कोमेजलेली कुण्या प्रतिभावंताची अस्सल कविता त्या खतावर पुन्हा जीव धरून तरारो. अन् मग विचक्षण वाचकांनो, त्या बावनकशी कवितेचं असणं, गारूड टाकणं, अस्वस्थ करणारे प्रश्न पाडणं, सारं सारं तुमच्यात अनिर्बंध साथीसारखं पसरत जावो.

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

लेखनविषय:
दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो. चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो. काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली. हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो. पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे. तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे. अस्तित्व सांधताना अंधारली निळाई. विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो. माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला. संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला. हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे. स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो. -कौस्तुभ वृत्त- आनंदकंद

आयुष्याच्या वाटेवर..

लेखनविषय:
आयुष्याच्या वाटेवर.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात काही विस्मृतीत जातात ; तर काही मनात घर करतात.. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. मनात घर करणारे खोलवर रुजतात; त्यांची साथ हवीहवीशी वाटत असताना मात्र साथ सोडुनिया जातात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यांच्या परतण्याची वाट पाहत असताना डोळेही पाणावतात. त्यांच्याही मनात तेच असतं ; सांगताना मात्र कचरतात. आयुष्याच्या वाटेवर अनेकजण भेटतात.. त्यातले काहीजणच मात्र मैत्रीला जागतात.. -दिप्ती भगत (२१जून,२०१९)

मरण

लेखनविषय:
काळाच्या उंबरठ्यावर अस्पृश्य सावली हलते. श्वासांच्या झुळूकेसरशी प्राणज्योत मिणमिणते. साऱ्यांच्या अधरांवरती तुझ्या रूपाची नावे. हा प्रवास अटळ माझा नि मागे पडती गावे. इवल्याशा ज्योतीचा विझून भडका झाला. जो इथवर घेऊन आला तो क्षणात परका झाला. -कौस्तुभ

आणि अश्या वेळी

आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

पाऊसवेळा

लेखनविषय:
अस्थीर घरांच्या ओळी नदीच्या हिरव्या काठी. कुणी धरून बसते ओंजळ पाऊस पडण्यासाठी. पाऊस प्राचीन इथला आकांत केवढा करतो. नदीच्या पैलतीरावर काळ जसा गहीवरतो. काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? -कौस्तुभ

प्राक्तनवेळा

लेखनविषय:
क्षितिजाच्या पुसती रेषा अंधार जसा दरवळतो. काळीज कुणाचे रडते चंद्र कुणाचा विव्हळतो. काळाकडे घ्याव्या मागून त्या हळव्या प्राक्तनवेळा. विस्मृतीस कराव्या अर्पण सुगंधी दुःखांच्या माळा. रंगीत करावे डोळे श्वासांना यावी भरती. उगवून पुन्हा जन्मावे पाऊस पडल्यावरती. -कौस्तुभ

हसण्या उसंत नाही

लेखनविषय:
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त
Subscribe to माझी कविता