लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!
लग्न... सवय, गरज की जुळवून घेणे?!
कशी गम्मत असते बघा.... लग्न झालेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारलं की तू लग्न करून सुखी आहेस का तर तो/ती नक्कीच म्हणतात की उगाच या फंदात पडलो/पडले. एकटं असणं जास्त सुखाचं असतं.... आणि तरीही या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या मुलांनी लग्न करायला हवंच असतं. असे किती पालक असतील जे म्हणतात की बाळा, तू अजिबात लग्न करू नकोस.
अगदी धीट मत मांडायचं तर लग्न हे उमेदीच्या काळात शरीरसौख्यासाठी आणि उतरत्या वयात सोबतीची गरज म्हणून केलं जातं. भावनिक गुंतवणूक - आयुष्य जोडीने जगण्यासाठी - तिचे/त्याचे विचार पटले म्हणून एकत्र येण्याचा निर्णय घेतला....... ही सगळी अनेकदा स्वतःला किंवा समोरच्याला फसवण्यासाठी सांगितलेली कारणं असतात. अर्थात लग्नानंतर जोडीदाराची आपल्या आयुष्यात असण्याची सवय आपल्याला होते; आणि मग आपण त्याला 'प्रेम' हे गोंडस नाव देतो. मात्र अनेकदा या नात्याच्या सुरवातीच्या काळातील एकमेकांबरोबरची शारीरिक सुखातील अनुरूपता या नात्याचं भविष्य ठरवते; असं मला वाटतं.
मागील पिढ्यांमध्ये याबाबतीतील स्त्रियांचं मत/गरज/इच्छा/अपेक्षा यांचा विचारच केला जात नसे. आपलं देखील याविषयी काही मत/गरज/इच्छा/अपेक्षा असू शकतात याचा विचार स्त्रिया देखील दुर्दैवाने करत नसत. मात्र आताची स्त्री याबाबतीत विचार करायला लागली आहे. आपलं देखील मत असू शकतं याची तिला जाणीव व्हायला लागली आहे. ....स्त्रीची याबाबतीत होणारी कुचंबणा हा विषय खूप मोठा आहे. याविषयी पुन्हा कधीतरी नक्की लिहीन. मात्र अजूनही तिचं याविषयी काही मत/इच्छा असू शकते; अपेक्षा/गरज असू शकते; याचा विचारही पुरुषांच्या आणि समाजाच्या मनात येत नाही हे दुर्दैवी सत्य आहे!
आज मात्र मला लग्नसंस्था आणि सामाजिक मानसिकता याविषयी थोडं बोलायचं आहे. ज्याप्रमाणे स्त्रीचं शरीर सुखाबद्दल काही मत/गरज/इच्छा/अपेक्षा असू शकते तसंच पुरुषाचं देखील असूच शकतं; हे मला मान्य आहे! अनेकदा पुरुषदेखील स्वतःच निर्माण केलेल्या मानसिक बंधनामुळे आपल्या पत्नीकडे याविषयी मोकळेपणी बोलत नाहीत. दोघांची याबाबतीतली अनुरूपता असणे फार महत्वाची असते. त्यामुळे दोघांनीही याविषयी एकमेकांशी मोकळेपणी बोलले पाहिजे. कदाचित आताच्या पिढीमध्ये हा मोकळेपणा असेल देखील मात्र मागील पिढ्यांमध्ये नव्हता हे खरं.
अर्थात ही अनुरूपता नाही म्हणून किमान भारतीय संस्कृतीमध्ये सहसा लग्न मोडले जात नाही. शक्यतोवर जुळवून घेण्याचा प्रयत्न होतो. पुन्हा एकदा हे देखील योग्य की अयोग्य हा मोठ्या चर्चेचा विषय होऊ शकतो. अनेकदा मनातून कुढत देखील राहिलं जातं; आणि मग कधीतरी चुकून किंवा ठरवून लग्नबाह्य संबंध निर्माण होतात. अनेकदा आपल्या साथीदाराच्या अशा लग्नबाह्य संबंधाबद्दल कळल्यानंतर सुरवातीला बरीच आदळ-आपट केली जाते किंवा जोडीदाराला या संबंधांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यामागील कारण समजून घेण्याची गरज समजून घेतली जात नाही. मग असे लग्नबाह्य संबंध असलेला जोडीदार हा कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जातो. त्याचं मत/गरज/इच्छा/अपेक्षा याविषयी कधीच विचार केला जात नआहि; हे दुर्दैव!
अर्थात असे संबंध होण्यापूर्वी जर पती-पत्नींना एकमेकांच्या सोबतीची; एकमेकांच्या असण्याची सवय झाली असेल; तर या सोबतीमुळे किंवा झालेल्या सवयीमुळे अशा लग्नबाह्य संबंधांकडे काही काळानंतर दुर्लक्ष केलं जातं. याला अजूनही एक कारण असतं. दोघांची मिळून असणारी मुलं, दोघांचेही वृद्ध पालक आणि सामाजिक स्थान! हळूहळू आपल्या साथीदारांची केवळ 'असण्याची' सवय व्हायला लागते. काळ जात राहातो.
त्याचे/तिचे हे लग्नबाह्य संबंध आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत मान्य नसल्यामुळे किंवा त्यादोघांची सोबत असण्याची गरज संपल्यामुळे किंवा आपल्या वयात आलेल्या मुलांमुळे/वृद्ध पालकांमुळे हे संबंध काही कालावधी नंतर संपतात. तो/ती परत एकदा आपल्या लग्नाबांधनाने बांधल्या गेलेल्या जोडीदाराकडे परतात. तोपर्यंत अनेकदा संसार स्थरावलेला असतो.... आर्थिक सुबत्ता आलेली असते... मुलं मोठी होऊन आपापल्या मार्गाने जायला मोकळी झालेली असतात. त्यामुळे मनातून एक वेगळाच एकटेपणा जाणवायला लागलेला असतो. आणि मग स्वतःची गरज म्हणून जोडीदाराचं परत येणं देखील तो/ती स्वीकारतात............. लग्न संस्था पुढे सरकते! अर्थात परत एकदा...... हे योग्य की अयोग्य हे फारच वयक्तिक मत आहे; असं मला वाटतं.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
लग्न आगामि भावी पिढिच ठरवते.
प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवावर आहे.
प्रत्येकच अनुभव वेगळा असू शकतो
+1
प्रत्येक अनुभव वेगळा असतो हे
मला हेच सांगायचे आहे
मत वैयक्तिक असल्याने त्याबद्दल आदरच आहे
थोडा विचार करता विवाहबाह्य
धन्यवाद जॉनविक