Skip to main content

नक्षत्रांचे देणे

लेखक सूड यांनी गुरुवार, 25/09/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो.. जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड ओटी अंगण ओसरी एक राहिले ना धड हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले उठे मुकाट तिथून मन शिणले भागले क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे काय राहिले तिथेच काय आले मजसंगे काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं. कितपत जमलंय माहित नाही: मजसंगे आला काही जुन्या आठवांचा मेळा माझे सांत्वन कराया जेव्हा दाटलासे गळा याच आठवांनी दिले उभे राहण्यास बळ आली संकटे तरीही जरा कमी झाली झळ आले माझ्यासंगे सारे चाफ्या अनंताचे वास आले भावंडांसवेचे छोटेमोठाले प्रवास आला आजीचा बटवा आली तुपाची तामली मागे वळून पाहता दूर नजर थांबली वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!! -२५-०९-२०१४
लेखनविषय:

वाचने 6735
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!!
फक्कड जमले आहे सूडराव!

सूड, प्रचंड आवडलं रे! खवचटपणाबरोबर हा असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून बरं वाटलं.

कवितांकडे शक्यतो फिरकत नाही. पण ही कविता मात्र खुप आवडली. एकसंध झालीये. शांता शेळकेंची कविता कुठे संपली आणि तुझी कुठे सरु झाली हे तु लिहिलस म्हणुनच मला समजले.

मला साध्या सरळ सोप्या कविता आवडतात. समजायला पटकन अश्या. अर्थात तुझ्या ह्या कवितेचं देणं नक्षत्रागत उतरलयं ह्यात वाद नाहि.

बस नाम ही काफी है. शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा "चौघीजणी" वाचल्यापासुन त्यांच्या साहित्यसंपदेशी जो खरा संबंध आलाय त्याचा रुणानुबंध कधी बनला हे मलाच कळले नाही. तुझी पुरवणी सुधा पूरक.

लहान असताना आजोळी गेलो होतो तिथला मोठा वाडा (खपरेल आणि मातीचा), भरलेलं घर, गायीचा गोठा, मातीचे अंगण, शेणानी घर सारवण, सर्वच आठवले. आता तिथे काहीच उरल नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळे पाणावले. .... धन्यवाद.

सर्व प्रतिसादकांचे आभार !! >>असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून आपल्याला प्रिय असतात अशाच गोष्टी आपण जपून ठेवतो आणि सणसमारंभ, महत्त्वाच्या प्रसंगी वापरतो. ह्याचं पण तसंच म्हणा हवं तर!! मिपावर (आणि अर्थात मिपाबाहेरही) नेहमीच हळूवार राहून चालत नाही. असो. :)

शांताबाईंच्या शब्दांच्या पुढे शब्द जोडण्याचे धाडस करुन ते ऊत्तम पार पाडल्याबद्दल अभिनंदन ! सुरेख जमले आहे.. -पहाटवारा

सुरुवातीला शांताबाईंची कविता आणि तुझी कविता असे वाचले आणि मग शांताबाईंची कविता वाचून सलग तुझ्या कवितेत शिरलो तर मूळ कवितेचाच भाग वाटला इतका सुंदर जमलाय. जियो!! (एका प्रतिभावान कवियत्रीच्या केवळ कवितेच्या परीसस्पर्षाने तुझ्यातल्या कवीला साद घातली आणि सुबक काव्य जन्माला आले!) चतुरंग

आवडली कविता ! आज काल फारश्या कविता वाचतही नाही आणि आवडतही नाहीत. एकूणच ललित साहित्याकडे सध्या डोळेझाकच आहे. वाढत्या वयाबरोबर आणि पिकल्या केसांबरोबर अभिरुची समृद्ध होत आहे असे मात्र म्हणवत नाही. हा हळुवारपणा आणि रसिकत्व जपता यावे अशी परिस्थिती तुम्हा प्राप्त होवो या शुभकामनेसह या कवितेबद्दल अभिनन्दन करतो. असेच लिहित रहा ! वाचे बरवे कवित्व आणि रसिकत्वाचा प्रवास सुखकर होवो !

हे असं काहितरी कसदार लिहा सूडबुवा. कशाला उगाच चिखलात दगड मारायच ? चिखल तसाच राहतो, उगा आपल्या अंगावर दोन शिंतोडे उडतात :)