सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा
इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला.
त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे. युनिव्हर्सिटी, कॉलेजं इत्यादी होती, पण तुरळकच. ज्योर्दानोचे विचार प्रस्थापित विचारांच्या विरोधात होते. त्याचा विश्वास होता की आकाशात दिसणारे तारे हे सूर्याप्रमाणेच आहेत, पण लांबवर आहेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपल्या ग्रहाप्रमाणेच इतर अनेक अनंत विश्वं आहेत. हे विचार आणि मेरीचं अनाघ्रातपण, जीजस, ट्रिनिटी या व इतर ख्रिश्चन कल्पनांच्या विरोधात मतं व्यक्त करणं आणि विश्वाविषयी असल्या कल्पना बाळगणं यापायी रोमन इन्क्विझिशनने त्याला 'हेरेटिक' (प्रस्थापित कल्पनांपेक्षा वेगळा विचार बाळगणारा) ठरवलं. त्याला त्याचे शब्द जाहीरपणे मागे घेण्याची संधी दिली गेली. पण त्याने ती नाकारली व आपल्या वेगळ्या विचारांवर शिक्कामोर्तब केलं. या गुन्ह्याबद्दल अर्थातच वेगवेगळ्या प्रकारे मृत्यूदंडाची सोय होती. पण बर्निंग अॅट स्टेक किंवा खांबाला बांधून जाळणं ही शिक्षा विशेष लोकप्रिय होती. ती त्याला मिळाली.
गॅलिलिओ गॅलिलिइलादेखील 1635 मध्ये याच रोमन इन्क्विझिशनचा असाच अनुभव आला. गॅलिलिओ आणि ज्योर्दानो यांच्यात तशी बरीच साम्यं आहेत. दोघांनाही सुरूवातीला त्यांच्या कर्तृत्वामुळे उच्च स्थानावरच्या लोकांचा पाठिंबा मिळाला होता. दोघांनाही अनेकविध विषयांचा अभ्यास करण्याची हौस होती. गॅलिलिओ त्याच्यापेक्षा थोडा लहान असला तरीही त्यांचा कर्तृत्वाच्या काळात थोडा ओव्हरलॅप आहे. 1591 साली ज्योर्दानोला ज्या गणित विभागाचं चेअरमनपद हवं होतं ते त्याला मिळालं नाही, तर पुढच्या वर्षी गॅलिलिओची त्या पदासाठी निवड झाली. काळ, परिस्थिती आणि विचारपद्धती सारखी असली तरी त्यांच्या स्वभावात फरक होता असं म्हणता येईल. ज्योर्दानो परखड आणि फटकळ म्हणून प्रसिद्ध होता. तर गॅलिलिओ जाहीरपणे तरी विशिष्ट मर्यादा राखून होता. मात्र गॅलिलिओलादेखील पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हटल्याबद्दल इन्क्विझिशनकडून बोलावणं आलं. त्याने मात्र शहाणपणा करून आपली विधानं मागे घेण्याची शिक्षा स्वीकारली. म्हणून त्यांनी दयाळूपणा दाखवून फक्त त्याच्या सर्व (आजवरच्या आणि आगामी) पुस्तकांवर बंदी घातली. आणि गॅलिलिओला नजरकैदेची अत्यंत मवाळ शिक्षा दिली.
या पार्श्वभूमीवर आजच्या काळातली एक घटना उठून दिसते - 2008 सालची. रिचर्ड लेन्स्की नावाच्या जीवशास्त्रज्ञाने त्याआधीची वीस वर्षं एक प्रयोग चालू ठेवला होता. या प्रयोगाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे प्रयोगशाळेत उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पहाणं. यात त्याला घवघवीत यश आलं. हे पाहून बायबलच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवणारांना राग आला. याचं कारण उघड आहे. जगन्निर्माता, जगन्नियंता अशी देवाची प्रतिमा आहे. पृथ्वी हा सामान्य ग्रह आहे, तो सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणाने फिरतो हे एव्हाना सर्वमान्य झाल्यामुळे देवाने त्यात काही विशेष केलं नाही हे मान्य करावं लागलं होतं. मात्र सजीवांची निर्मिती आणि त्यांच्यात होणारे बदल हेही आपोआप होतात हे मान्य झालं तर देवाचं उरलंसुरलं कर्तृत्वही नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे येनकेनप्रकारेण या प्रयोगाच्या निष्कर्षाला बट्टा लावण्याचा प्रयत्न श्लाफ्ली नावाच्या गृहस्थाने केला. हा माणूस होता एक वकील. त्याने या प्रयोगात खोडा घालण्यासाठी त्याच्या खास वकिली खाशाने लेन्स्कीकडे या सर्व प्रयोगाचा विदा मागितला. लेन्स्कीने प्रथम त्याचं अज्ञान दाखवून नम्रपणे 'आधी आमचे पेपर नीट वाचा' अशी सूचना केली. तरीही श्लाफ्लीने बेमुर्वतखोरपणे दुसरं पत्र लिहून 'आम्हाला विदा तपासून बघण्याचा कायदेशीर अधिकार आहे, तेव्हा तुम्ही हा विदा आम्हाला दिलाच पाहिजे' असं म्हटलं. मग लेन्स्कीने त्याला पुढच्या पत्रात म्हटलं 'माझा विदा फुटकळ निरीक्षणात नाही, आमच्याकडे असलेल्या सॅंपल्समध्ये आहे. ती तुम्हाला मी जरूर पाठवेन. पण तुम्हाला ती हाताळता येणार आहेत का?' हे मी फारच त्रोटकपणे लिहिलेलं आहे. संपूर्ण कथा फारच रंजक आहे. मुद्दा असा आहे की हे वाचून बावचळलेला श्लाफ्ली पुन्हा उत्तर देण्याच्या फंदात पडला नाही.
आता पावणेचारशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा लेन्स्की आणि श्लाफ्ली यांच्यात घडलेल्या पत्रव्यवहाराशी काय संबंध? गॅलिलिओ आणि ज्योर्दानो दोघेही भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते, लेन्स्की जीवशास्त्राचा. श्लाफ्लीने लेन्स्कीकडे पुरावे मागितले तर रोमन चर्चतर्फे त्या दोघांना चौकशीसाठी बोलावलं. त्यांना शिक्षा देण्याची शक्ती रोमन इन्क्विझिटर्सकडे होती, तर श्लाफ्लीकडे तसे काही व्यापक अधिकार नव्हते. वरवर बघता फरकच जास्त दिसतात. आणि हे फरकच खरे तर महत्त्वाचे आहेत.
भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र असो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा दावा असो की उत्क्रांती घडताना प्रत्यक्ष पाहिली असं म्हणणं असो - दोन्हीची जातकुळी काही महत्त्वाच्या पातळींवर सारखी आहे. ज्योर्दानोचे विचार आणि लेन्स्कीचे निष्कर्ष हे दोन्ही, जग कसं चालतं याबाबतच्या निरीक्षणांतून आलेले होते. दोघेही विज्ञानवादी दृष्टिकोनातून जे सत्य गवसलं आहे ते जगापुढे मांडत होते. याउलट विचारसरणी म्हणजे आंधळ्या विश्वासाची. रोमन इन्क्विझिटर्स आणि श्लाफ्लीची. बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते ज्ञान आणि बाकीचं सगळं पाखंड ही आंधळी विचारसरणी दोन्हीतही दिसते. एका अर्थाने हा विचारसरणींमधला लढा आहे. श्रद्धा विरुद्ध विज्ञानामधला लढा. निरीक्षणांमधून दिसणारं ते सत्य मानणारे आणि पुराणपुस्तकात लिहिलेलं, ते देवाने सांगितलेलं आहे म्हणून सत्य मानणारे यांच्यातला झगडा. हा शतकानुशतकं चालू आहे. सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरूवातीला हा लढा देणाऱ्यातले ज्योर्दानो आणि गॅलिलिओ. त्यांच्यानंतर चारशे वर्षांनी तीच जागा लेन्स्कीने घेतलेली आहे.
या चारशे वर्षांत या लढ्याच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेला दिसतो. ज्योर्दानोच्या काळात बायबलची शक्ती महाकाय होती. नवीन विचार मांडणं हे धोकादायक काम होतं. गॅलिलिओ, ज्योर्दानो या दोघांनाही आपल्या विचारांतून बायबलच्या सत्यांना धक्का लागत नाही असं त्यांच्या विचारांबरोबरच सांगण्याची जबाबदारी होती. पण एका विशिष्ट मर्यादेबाहेर कोणी बायबलविरुद्ध बोललं तर चर्च ते खपवून घेत नसे. त्यांच्या स्वतःच्या कोर्टात अशा पाखंड्यांना खेचून त्यांना शिक्षा देत असे. बायबलमध्ये सांगितलेलं 'सत्य' प्रस्थापित होतं. सर्वांचा त्यावर विश्वास असो नसो, विरुद्ध विचार हे तणांप्रमाणे निपटून काढले जायचे. त्यामुळे तेच प्रस्थापित सत्य अजूनही पुढे प्रस्थापित राहील अशी काळजी घेतली जात होती. याचं कारण उघड आहे. या विचारांना उचलून धरण्याचं, जनतेत पसरवण्याचं कार्य करणाऱ्या धर्मसंस्थेला प्रचंड शक्ती प्राप्त होत होती. राज्यसत्तेतला काही हिस्सा धर्मसंस्थेच्या पुढाऱ्यांना मिळायचा. आर्थिक फायदाही प्रचंड होता. या सगळ्याचा पाया होता तो म्हणजे सामान्य जनतेत पसरलेले विशिष्ट विचार - देवाने या विश्वाची निर्मिती केली, मानवाची निर्मिती केली, प्राण्यांची निर्मिती केली. तो सर्वशक्तिमान आहे. आणि त्याच्याशी बोलायचं असेल तर ते आमच्यामार्फतच बोललं पाहिजे. या बोलण्याच्या अधिकारासाठी जो पैसा लागतो तो जनतेकडून, श्रीमंतांकडून उकळून घेण्याचा अधिकार धर्मसत्तेकडे आला. त्यामुळे हे सगळं खोटं आहे, खरं नाही असं सांगणारांकडून या संस्थेच्या पायावरच हल्ला होत होता. आणि तो धोका निवारण्यासाठी जागोजागी इन्क्विझिशनची क्रूर व्यवस्था निर्माण झाली होती.
याच संस्था अजूनही बदललेल्या स्वरूपात दिसतात. पण त्यांच्या शक्तीत प्रचंड फरक पडलेला आहे. गॅलिलिओच्या काळात धर्मसंस्था ही एखाद्या महाबलाढ्य किल्ल्याप्रमाणे होती. आणि तीवर एखाद दुसरा शास्त्रज्ञ आपल्या विचारांच्या घोड्यावर बसून हल्ला करत असे. त्या किल्ल्याच्या फार जवळ यायला लागला तर तोफा डागून त्याचा खात्मा सहज केला जायचा. किंवा अगदीच ठार मारायचं नसेल तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला नामोहरम केलं जायचं. पण ही परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. लवकरच पाश्चिमात्य राष्ट्रांत चर्चचा पगडा कमी व्हायला लागला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सामान्यांमध्ये स्वीकारलं गेलं. इन्क्विझिशनचे सर्व अधिकार आपोआप कमी होत जात एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला या संस्था संपुष्टात आल्या. रोमन इन्क्विझिशन ही संस्था तत्वतः जिवंत आहे, पण 'कॉंग्रेगेशन ऑफ डॉक्ट्रिन ऑफ फेथ' या गुळमुळीत नावाखाली. अर्थातच त्यांना कोणाला चौकशीसाठी बोलवण्याचे अधिकार नसावेत. असल्यास गेल्या कित्येक दशकांमध्ये ते वापरले गेलेले नाहीत. त्यांनी सुनवलेल्या शिक्षा सरकारं अमलात आणतील याची शक्यता शून्य आहे.
आता वैज्ञानिकांना रास्त संरक्षण आहे. जगभर असलेल्या सेक्युलर सरकारांनी कायद्याचा भरभक्कम पाठिंबा वैज्ञानिक पद्धतींना दिलेला आहे. जगभर - किमान जिथे धार्मिक राज्यकर्ते नाहीत तिथे - प्रमाण सत्य म्हणून वैज्ञानिक पद्धतींनी शोधून काढलेलं सत्य शाळांमध्ये शिकवलं जातं. न्यायपद्धतीत वैज्ञानिक पुरावे ग्राह्य धरले जातात. श्लाफ्लीची इन्क्विझिशन मनोवृत्ती असणाऱ्यांना लेन्स्कीच्या वैज्ञानिक विचारांचं तोंड बंद करण्याची शक्ती नाही. फारतर थोडाफार उपद्रव देण्याची क्षमता आहे. उलट लेन्स्कीसारख्या मान्यवर शास्त्रज्ञांना कायद्याचं संरक्षण आहे. त्याच्या शेवटच्या पत्रात जी अरेरावीची भूमिका लेन्स्कीला घेता आली ती या सुरक्षिततेच्या भावनेतूनच. रोमन इन्क्विझिशनला ज्योर्दानोने अत्यंत कळकळीने 'माझं सत्य बायबलला विसंगत नाही' असं सांगण्याचा प्रयत्न केला, करावा लागला. आजच्या काळात श्लाफ्लीसारख्यांकडून पाखंड्यांना शिक्षा देण्याचा अधिकारच काढून घेतला गेला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते की नाही, यावर तर आता चर्चाही होत नाही, इतकं ते सत्य प्रस्थापित झालेलं आहे. लेन्स्कीकडे सत्य होतं, आणि बायबलच सत्य मानणाऱ्यांच्या तोंडावर ते फेकून मारून तो त्यांचा पराभव करू शकला. ज्योर्दानो किंवा गॅलिलिओला ते करणं शक्य नव्हतं.
लेन्स्कीच्या सत्याचा विजय हा व्यापक अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विजय आहे. हे युद्ध गेली अनेक शतकं चालू होतं. त्यात अनेकांचे बळी पडले. 1540 ते 1794 या कालखंडात लिस्बन, पोर्टो, कोइंब्रा आणि एव्होरा इथल्या स्पॅनिश इन्क्विझिटर्सनी 1175 लोकांना जाळून मारलं. जाळून मारण्यासाठी अर्थातच जे अपराध कबूल करून घेतले जात ते त्या व्यक्तीने कबूल करावे म्हणून महाभयंकर छळ करणारी सामुग्री मुक्तहस्ताने वापरली. हे फक्त चार शहरांमध्ये. संपूर्ण युरोपभर आणि त्यांच्या वसाहतीत कमी अधिक प्रमाणात त्या काळी असले प्रकार चालू होते. पण तरीही यथावकाश जनसामान्यांमध्ये हे आधुनिक ज्ञानाचे विचार मुरले. ज्ञान पसरलं. आणि ते इतकं फैलावलं की शेवटी पाखंडाला अशी शिक्षा करण्याचा प्रयत्नच सामान्य जनतेला खटकायला लागला. आणि चर्चला हे प्रकार गुंडाळून ठेवावे लागले. चर्चचा ज्ञानावरचा पगडा नष्ट झालेला आहे. बायबलमधलं ज्ञान हेच सर्वोच्च या भूमिकेचा किल्ला ढासळून पडला आहे.
मर्ढेकरांनी म्हटलेलं आहे -
या जगण्यातुन या मरणांतुन
हसण्यातुन अन् रडण्यातुन या
अशाश्वताच्या मुठी वळूनी
अपाप चढतिल वरती बाह्या
अखेर घेता टक्कर जरि मग
युगायुगांचा फुटेल भाल
अशाश्वताच्या तलवारीवर
शाश्वताचिही तुटेल ढाल.
बायबलमधलं लिखाण हे शाश्वत सत्य करण्याच्या प्रयत्नांची ढाल अनेक अशाश्वत वाटणाऱ्या पण अस्सल सत्याच्या प्रहारांनी मोडून पडली आहे. हा खरा सत्याचा विजय आहे. हळूहळू पेटणाऱ्या ठिणग्यांनी, एकमेकांना भेटून पेटणाऱ्या ज्योतींनी, अंधाराच्या इतिहासावर मिळवलेला!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फार उत्तम लेख आहे. आवडला.
+१
"तसेही असू शकते"
धार्मिक ग्रंथांच्या
+१
+१
लेख आवडला.
उत्तम लेख!
चांगला लेख.
उत्तम लेख
मुद्द्याला धरुन, सुरवातीपासून
लेखाबद्दल अनेकानेक धन्यवाद!
लेख चांगला आहे पण विज्ञान
सहमत..
मी गोंधळले नाहीये श्रद्धा हा
+१
श्रद्धा आणि विश्व्वास.
विज्ञान विरुद्ध अंधविश्वास वा
अतिशय संतुलित आणि छान लेखावर
अतिशय संतुलित आणि छान लेखावर
अतिशय संतुलित आणि छान लेखावर लेखकाचा तितकाच सुंदर प्रतिसाद !!!+७८६ अवांतर - "विज्ञानाने कितीही शोध लावले तरी या विज्ञानाचीच निर्मिती करणारी शक्ती या जगात आहे जिला देव म्हणतात" अशी श्रद्धा असणारा एक भलामोठा म्हणजे ९०-९५ टक्के लोकांचा समूह आजही या जगात आहे आणि उद्याही राहणार.बर्याच वेळानं एक यथार्थ प्रतिसाद आला!
पण ते लोकांच्या धारणा
तुमचा निष्कर्श पाहा :
जरा स्पष्ट सांगा
त्यावर तुम्ही बायबल मोडीत निघू शकत नाही
सत्य आणि वास्तविकता (अ
माझ्या मते ....हा परिच्छेद पहा
ते 'त्यांच्या धर्माचा' मार्ग
नैतिकतेसंबंधीचा कुठल्याही
अवांतर शंका.
बरोबर
"धर्माच्या मार्गावर चालणार्
अच्छा, म्हणजे आता तुमची सत्याचीच व्याख्या वेगळी आहे.
अतिशय संतुलित आणि छान लेखावर
ओके.
एखादी गोष्ट खरी आहे का/ असू
एखादी गोष्ट खोटी असेल अशी
सहमत आहे
ज्योताय, (श्रेयअव्हेरः यशो)
>>>अर्थात अशा चर्चांमधूनच
प्रतिसाद आवडला
या प्रश्नाचं उत्तर ज्याचं
पिडां :)
जरूर!
समजले नाही.
वरच्या प्रतिसादात एक
अय्या!! तिकडच्या संपादकांना
'शब्दकोष' हे माझ्या
नेटवर पाहिले तर कोश आणि कोष
हो ना..म्हणूनच तर या शब्दांची