Skip to main content

प्राचीन भारतः नासिक लेणी (पांडवलेणी): भाग १

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 11/10/2011 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा. नासिक हे माझे आजोळ असल्याने पांडवलेणी तशी असंख्य वेळा बघितली होतीच, पण तिचे महत्व मात्र माहित नव्हते. यावेळी ३ दिवस सुट्टी घेउन नासिकला जायचा उद्देशच होता की पांडवलेण्याची निवांत भेट. मामेभावाला घेऊन सकाळी ७ वाजताच पांडवलेणी पायथ्याला पोहोचलो. पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे. १५ मिनिटांची उत्तम पायर्‍या असणारी झाडीभरली चढण चढून पांडवलेण्यांपाशी पोहोचलो. मधून मधून मोरांची केकावली ऐकू येत होती. १. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले. २. अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले. पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन. ३. नहपान विहाराचे प्रथमदर्शन ४ व ५. गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत) इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात. इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता. ६ व ७. ग्रिफिन पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स. स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्‍या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्‍यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते. ८,९, व १० स्फिंक्स हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे. ११. नहपान विहाराचा अंतर्भाग. आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्‍या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे. १२. देवीलेणीचे मुखदर्शन इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत. १३. लेणीचा भार वाहणारे यक्ष १४. इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो. गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता. त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस' असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे. १५. गौतमी बलश्रीचा शिलालेख गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते- गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे. वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे. १६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार) याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे. हा एक शिल्पपटच आहे. या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे. १७ व १८. १९ व २० २० व २१ . शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत. २२. देवीलेणीचा अंतर्भाग विहारातील स्तूपाची रचना हे सर्व पाहातच बाहेर आलो व आजूबाजूची लेणी पाहायला लागलो. क्रमशः हा भाग प्रवासवर्णन आणि इतिहास यांची नीटशी सांगड घालता न आल्यामुळे विस्कळीत झाला आहे तरी आपण तो गोड मानून घ्यावा. पुढील भागात पांडवलेण्यातील इतर लेण्यांचे फक्त फोटो व थोडेसेच वर्णन टाकेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 95162
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

हे सर्व बघावंसं वाटतंय. सोबतच्या माहितीमुळे परिपूर्ण लेख झालाय. आणि हे एक "क्रमशः" जे पाहून किती बरं वाटलं सांगता येत नाही!

In reply to by पैसा

नवसंपादिकाबाईंशी १००% सहमत ...

>>>>पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे ते एक मोठं गार्डन आहे तिथे. तिथुन ईतक्या जवळ आहे का ही पांडवलेणी? मुंबईवरुन नाशिकला जाताना उजव्या हाताला अंबड( एमायडीसी) नंतर आहे तेच का?

धन्यवाद. माझे थोडे विस्कळित विचार. नहापण आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे समकालीन होते का याबद्दल थोडा संशय आहे. पण सातकर्णीने नाहपण किंवा त्याच्या जावयाकडून म्हणजे ऋषभदत्ताकडून बरेच राज्य मिळवले होते असे नक्की. मौर्यांनंतर उदयाला आलेल्या या घराण्याने मौर्यांच्या नाण्यांवरचे टेकड्यांसारखे चिन्ह स्विकारलेले दिसते. गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे? तेच वसिष्ठीपुत्र श्री पुलुमावी या नावाचे. ही घराणी मातृसत्ताक असावी असे नाही. पण राण्यांची नावे नद्यांना दिली गेली असतील का? किंवा उलटेही असू शकते. गौतमी हे नाशिकच्या प्रसिद्ध गोदावरीचे नाव आहे (किंवा तिच्या एखाद्या उपनदीचे) आणि तसेच वसिष्ठी हे चिपळूणजवळील नदीचे नाव आहे. अर्थात ही नावे कधीपासून प्रचलित आहेत कल्पना नाही, पण सातवाहनांच्या राज्यामधील नद्यांची नावे त्यांच्या घराण्यातून आली असतील का असा एक प्रश्न पडला. ( ह्या ठिकाणाहून राज्य करणार्‍या राजांनी नद्यांची नावे मातेसमान स्विकारलेली असू शकतात का? ) सातवाहनांच्या राण्यांपैकी नागनिका आणि गौतमी या दोघींची नावे प्रसिद्ध आहेतच. सातवाहनांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. पण आपल्याला फार थोडे माहिती असते एवढेच वाटते. जे धागेदोरे लागतात ते तत्कालिन समाजपद्धतीवर जेमतेमच प्रकाश टाकतात, एकसलग, एकसंध चित्र उभे करू शकत नाहीत असे वाटते. त्यासाठी तत्कालिन साहित्यही वाचावे लागेल असे वाटते.

In reply to by चित्रा

नहापण आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे समकालीन होते का याबद्दल थोडा संशय आहे.
नहपान हा गौतमीपुत्राचा समकालीन, पण गौतमीपुत्रापेक्षा वयाने मोठा होता. नहपानाचा जावई हा उज्जैनचा क्षत्रप रूद्रदामन आणि रूद्रदामनाचा जावई हा ऋषभदत्त (प्राकृत नाव-उषवदत्त) रूद्रदामनाने आपल्या मुलीचा विवाह गौतमीपुत्राच्या मुलाशी म्हणजे वासिष्ठिपुत्र पुळुमावीशी करून दिला होता. वर्णसंकर न करणार्‍या सातवाहनांसाठी हा विवाह म्हणजे राजकारणाचाच एक भाग. गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर बर्‍याच काळाने रूद्रदामनाने परत नासिक भाग जिंकून घेतला व पुळुमावीचा पराभव केला परंतु सोयरसंबंधांमुळे त्यांचे संपूर्ण उच्चाटन केले गेले नाही. यांनत्र मात्र सातवाहन पैठण, आंध्र आणि दक्षिणेकडे सरकत गेले. त्यामुळेच नंतर त्यांना आंध्रभृत्य हे नाव पडले.
गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे
गौतमीपुत्राच्या आधी सातवाहन राजे हे वैदिक नावे लावत. उदा. वेदिश्री, स्कंदश्री, हकुश्री. शक्तीश्री इ. गौतमीपुत्राच्या वेळी आईचे नाव लावण्याची प्रथा सुरु झाली असावी. गौतमीपुत्र महान मातृभक्त होता यात शंकाच नाही त्याच्या शिलालेखांवरूनही हे दिसते. तीच प्रथा त्याच्या पुढच्या पिढ्यांकडूनही पाळली गेली. उदा. वासिष्ठिपुत्र, कौशिकिपुत्र, मढारीपुत्र. नद्यांना नावे पण बहुधा ह्याच राजांवरून दिली गेली असावीत.

In reply to by प्रचेतस

माझे विकीपांडित्य सांगते की नहापणाचा जावई ऋषभदत्त, आणि रुद्रदमनाने आपली मुलगी पुळुमावीला दिली. http://en.wikipedia.org/wiki/Nahapana http://en.wikipedia.org/wiki/Rudradaman_I रुद्रदमन आणि ऋषभदत्ताचे नाते काय होते हे विकीवरून कळलेले नाही.

In reply to by चित्रा

बरोबर आहे. माझी समजण्यात काही चूक झाली. नहपानाचा जावई हा ऋषभदत्त. आणि रूद्रदामनाचा पुळुमावी. रूद्रदामन हा महाक्षत्रप होता आणि त्याचा महाअमात्य हा ऋषभदत्त. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)

In reply to by प्रचेतस

चूक फारशी नाही. ही सर्व नावे गोंधळात टाकणारीच आहेत. काही नावांचा उल्लेख तर आपल्या राज्याच्या क्रमिक (बालभारती) पुस्तकांमधून वगळलेलाच दिसतो. (उदा. नहपान - नहापण किंवा गौतमी बलश्री).

छान फोटोसहीत माहीती. पुढच्या भागात जमल्यास, पांडवलेण्याच्या डोंगरावरुन दिसणार्‍या नाशिक शहराच्या फोटोचा सामावेश करावा. अतिशय सुंदर दृश्य दिसते. (अवांतरः कृपया नासिक ऐवजी नाशिक असा उल्लेख करावा)

In reply to by शिल्पा ब

मी तर बहुतांशी वेळा 'नाशिक' असेच ऐकले आणि वाचले आहे. आणि जर उच्चार 'नासिक' असेल तर शाळेतील भूगोलाच्या पुस्तकात नेहमी 'नाशिक' का बरे असते?

In reply to by मिहिर

मूळ संस्कृत अथवा प्राकृत शब्द नासिकच आहे. खुद्द नासिकच्या पांडवलेण्यातील शिलालेखातही नासिक असाच उल्लेख आहे जे मी वर लिहिलेही आहे. जुन्नरच्या एका लेण्यातही नासिक असाच उल्लेख आढळतो. नासिक हे नाव शूर्पणखेची नासिका जिथे कापली त्या स्थानावरून आले आहे अशी आख्यायिका आहे. कालौघात त्याचे नाशिक असे रूपही प्रचलित झाले.

पुर्वकल्पना दिली असून सुध्दा न बोलावल्याबद्दल वल्लीचा निषेध.. :stare: अंकाई टंकाईला जाणार होतास ना, गेला नाहीस काय?

एकदम झकास. छान जागा आहे रे. मुंबई नाशिक प्रवासात प्रत्येक वेळी पाटी पाहिली. डोंगरही पाहिला पण गेलो कधी नाही. मिस केलं असं वाटतंय. स्फिंक्सचं दर्शन आणि उल्लेख स्तिमित करणारा आहे. पूर्वीच्या काळी इजिप्तशी काय कनेक्शन असेल आपल्या कल्पनेपलीकडचं आहे सगळं. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

In reply to by गवि

इथला स्फिंक्स हा ग्रीक दंतकथांवरून आलाय. महाराष्ट्रातील काही लेण्यांचे विहार हे ग्रीकांनी (यवन) दिलेल्या दानातून खोदलेले आहेत. येथे इजिप्त कनेक्शनचा तसा काही संबंध नाही. @किसनः निषेध मान्य आहे. :) अंकाई टंकाईला जाणे जमले नाही.

जबराच रे, इथे एकदा फक्त फोटो काढण्यासाठी जाउ या, माझ्या एका मित्राने परवाच फुजीचा ३ डि कॅमेरा घेतला आहे, त्याला पकडतो एकदा, बाकी वल्ली यांनी काढलेले फोटो आणि माहिती जबरदस्तच. अतिशय धन्यवाद.

वल्ली द ग्रेट ... फोटो तर नेहमीप्रमाणे सुंदर आहेच.. पण प्रत्येक गोष्टीचा येव्हडा बारीक आभ्यास करणे म्हणजे ग्रेटच.. मस्त एकदम.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत

In reply to by गणेशा

तेच म्हणतो. पांडवलेण्यासाठी तिन दिवस देवून सखोल अभ्यास करणे हे सर्वसामान्यांना जमणारे नाही. लेख लिहून आपण योग्य तो न्याय दिला आहे. आपली अभ्यासूवृत्ती आत्मसातकरण्याजोगी आहे. आम्हीही या पांडवलेण्याला भेट दिली असता आमच्या नजरेतून दिसलेले काही फोटो येथे पाहता येतील. या फोटोंत काही जणांनी मागणी केल्याप्रमाणे पांडवलेण्यावरून दिसणारे नाशिकशहर दिसत आहे. वरील फोटोत अगदी समोर दुरवर मध्यभागी जो त्रिकोणाकृती डोंगर दिसतो आहे त्यात 'चांभारलेणी' खोदलेली आहेत. त्यावर जैनांचे प्रार्थनास्थळ आहे. सटाणा (बागलाण) तालूक्यात साल्हेरमुल्हेर, मांगीतुंगी डोंगर आहेत. अनेक नद्या या डोंगररांगात उगम पावतात. जर येथे जाण्याचे प्रयोजन असेल तर आता पावसाळ्यानंतर जाण्याचे ठरवावे. या काळात निसर्गाची हिरवाई असते.

पण पांडव लेणी का म्हणतात ? महाराष्ट्रामधे काहिही अवघड किंवा कोरीव मंदीर किन्वा गुंफा दिसली कि हे पांडवांनी केली असा म्हणण्याची पद्धत आहे , असे अनुभवास आले आहे

In reply to by शाहिर

मग कांग्रेसी घोटाळा का म्हणतात, भारतामध्ये काहिही लपडेबाज किंवा संशयास्पद किंवा घोटाळा किंवा भानगड दिसली कि हे कांग्रेसवाल्यानी केले असे म्हणण्याची पद्धत आहे, असे अनुभवास आले आहे बिगरराजकिय शाहिर.... (हजारो अण्णा.)

In reply to by ५० फक्त

मग डु आय डि का म्हणतात, संस्थळावर काहिही एकतर्फी, आग लावणारे, टुकार आणि प्रतिसाद्खेचक धागा आला की लेखक डु आय्डि आहे असे म्हणतात असे अनुभवास आले आहे वाचनमात्र माहिर...

In reply to by वपाडाव

हा एक फार ज्वलंत विषय आहे....याची चर्चा ईथे नको... बादवे: सगळ्या लेण्यांना पांडवलेणी म्हणतात का? या वाक्यावर वल्लींचे अनुभवांती आलेले मत महत्वाचे आहे.... -स्पष्टविचार जाहिर

फारा वर्षांपुर्वी नाशिकला जाताना ही लेणी पाहिली होती. पण तुम्ही दिलेली माहिती तेव्हा माहित नव्हती. धन्यवाद. :)

अजोनतरी नाशकाला पाय नाही लागलेत..... बरंच काही आहे नाशकात पाहण्यासारखे..... ही माहिती न्यानात फारच मोठी भर पाडुन गेली.... अवांतर :: मांगी-तुंगी या सटाणा तालुक्यातील पर्वतांविषयी काही ऐकलंय का?

In reply to by वपाडाव

५/६ वर्षांपूर्वी सटाण्याजवळ जाणे झाले होते. तेव्हा मांगी तुंगीची दोन उत्तुंग शिखरे पाहिली आहेत. त्या दोन सुळक्यांमध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. जैनांचे ते महाराष्ट्रातले मोठे तीर्थस्थान आहे असे ऐकून आहे.

In reply to by मी-सौरभ

मग करायचा का आता साल्हेर, मुल्हेर, मांगी, तुंगी असा जंबो ट्रेक.? डिसेंबरात जाउयात.

In reply to by प्रचेतस

करा, पण तो ट्रेक ३ ते ४ दिवस खाइल.... इतक्या सुट्ट्या दिसेंबरात कुणाला गटायच्या नाहीत..... पुन्हा अ‍ॅड्जस्ट्मेंट कराव्या लागतील त्या वेगळ्याच........

In reply to by वपाडाव

लेको, थोडी डावीकडे उजवीकडे अ‍ॅडजस्टमेंट करुन जमवूया... त्र्य त्र्य बुत दोन्त च्र्य असं विंग्रजीत म्हणतातच ना......

In reply to by प्रचेतस

नक्कीच जा पण त्यात सापुतारा(थंड हवेचे ठिकाण) जायचे विसरू नका.रस्त्यात चांदवडला रेणुकामातेचे जागृत देवस्थान आहे त्यालाही भेट देवू शकाल, बाजूलाच डोंगरावर चंद्रेश्वर म्हणून शंकराचे मंदिर पण आहे छोटासा ट्रेक होवून जाईल.आणि जर चांदवड गावात गेलात तर अहिल्याबाई होळकरांचा महाल/राजवाडा आहे रंगमहाल म्हणून.

नाशिकच्या पाण्डवलेण्याची फोटोंसहित ओळख आवडली. एकदा जाऊन यावं म्हणतो..... धन्यवाद! :-)

सुंदर लेख.. प्रवासवर्णनाबरोबर, ऐतीहासीक माहीती म्हणजे सोनेपे सुहागा..

ही लेणी पाहीली आहेत पण त्यामागचा इतिहास माहीत नव्हता. छान माहीती. खवचटपणे नाही तर गंभीरपणे विचारते की तुम्ही देत असलेल्या माहीतीचा सोर्स काय? नै म्हणजे कीतपत विश्वास ठेवायचा म्हणुन. कृपया रागाउ नये.

In reply to by शिल्पा ब

लिटररी अ‍ॅन्ड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडोलोजी -वा. वि. मिराशी' सार्थवाह-मोतीचंद्र, सातवाहनास अ‍ॅन्ड वेस्टर्न क्षत्रप्स् - अजय शास्त्री, महाराष्ट्राची कुळकथा - मधुकर ढवळीकर, विकिपेडीया, थोडासा गूगल शोध. आणि सातवाहनकाळाविषयीची अपार उत्सुकता. बाकी विश्वासावर इतिहास बदलतो थोडाच. :)

सचित्र माहिती देणारा लेख आवडला. १. आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद इतरत्र वाचला आहे. त्यात उल्लेखित संशोधनावरून आंध्रभृत्य हे नाव मुळात पुण्याजवळील एका भूभागावरून आले आहे असे वाटते.सातवाहनांच्या इतिहासाची ती चर्चा महत्त्वाची आहे. २.
सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियनिर्दालक' असेही येथे म्हटले आहे.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?

In reply to by विसुनाना

तिकडची सविस्तर चर्चा वाचली, बरीच नविन माहितीही समजली.
आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद इतरत्र वाचला आहे.
हे मत आहे ते सह्याद्रीकार स. आ. जोगळेकरांचे. अर्थात हा फक्त तर्कावर आधारीत पुरावा असून त्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा (नाणी, शिलालेख, उत्खनने) इ. स्वरूपात अजून मिळाला नाही. पण सातवाहन हे महाराष्ट्रीय यात काहीच संशय नाही. ते आंध्राकडे सरकल्यानंतर (पुळुमावीनंतर) बर्‍याच कालावधींनी पुराणे तयार झाली (साधारण इ.स. ४/५ व्या शतकात) त्यामुळे आधीच्या घटनांचा धांडोळा पुराणांकडून न घेतला जाता सातवाहनांच्या शेवटच्या निवासावरून त्यांना आंध्रभृत्य ठरवले गेले.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?
खतियनिर्दालक हा शब्द माझ्याकडून चुकीचा लिहिला गेला. मूळ शिलालेखातील शब्द आहे 'खतियदपमानदमन' अर्थात क्षत्रियांचा गर्व हरण करणारा (निर्दालन करणारा/नष्ट करणारा अशा अर्थाने नव्हे) ब्राह्मणनस, खतियदपमानदमन ही बिरुदे सातवाहन ब्राह्मण आहेत असे सिद्ध करतात. अर्थात यावरही बरीच मतमतांतरे आहेतच. संदर्भः १. शास्त्री के.एन.ए.-मौर्यास ऑफ सातवाहन इन हिस्टरी ऑफ साउथ इंडिया -ऑक्सफर्ड १९५८, २. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख-मिराशी वा. वि. १९७८.

In reply to by ५० फक्त

>>>>आपण मिपावरील ब-याच अभ्यासक मेंबरापैकी एक आहात याचि आज खात्री पटली. फक्त अभ्यासाचा 'विषय' वेगळा इतकंच....! ;)

In reply to by ५० फक्त

आपण मिपावरील ब-याच अभ्यासक मेंबरापैकी एक आहात याचि आज खात्री पटली. असेच म्हणतो. फोटोसुद्धा मस्त आहेत.

छान. माहितीपूर्ण लेखन. नाश्काला इतक्या वेळेस गेलो पण आम्हाला सालं कोणी पांडवलेणी फिरून दाखवली नाही. अर्थात आपल्या लेखनाने तीही इच्छा पूर्ण झाली. पुढील भागात अधिक माहिती येईलच. ”ब्राह्मणनस’ उल्लेख असलेला शिलालेखाचा फोटो काढलाय का ? मला केवळ उत्सूकता म्हणून बघायचा आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद प्रा.डॉ. शिलालेखांचे काही फोटो तर काढलेले आहेतच पण दुर्दैवाने मला ब्राह्मी येत नसल्याने हाच तो शिलालेख असे नक्की सांगता येत नाही. ३ र्‍या क्रमाकांच्या देवीलेणीतील ओसरीवरच्या संबंध भिंतीवर गौतमीपुत्राची महती गाणारे शिलालेख लिहिले आहेत त्यातीलच एक तो असावा.

In reply to by प्रचेतस

गौतमीच्याच शिलालेखात हा उल्लेख आहे. http://www.preservearticles.com/2011092013668/short-notes-on-gautamiput… पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे. (उपक्रमावरील प्रियाली यांच्या लेखात सिमुकाआधी बरेच राजे होऊन गेले आहेत असा उल्लेख आढळला. कदाचित तसे असेलही, पण माझ्या वाचनाप्रमाणे) या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. कण्व हे कुळ ब्राह्मण होते. तेही यापूर्वीच्या शुंग राजांचा घात करून सत्तेवर आले होते. शुंगही ब्राह्मणच कुळ असावे. ब्राह्मण राजांना मारून सत्तेवर आल्याने परत ब्राह्मणांना आश्वासित करणे गरजेचे वाटलेले असू शकते असा माझा एक कयास :) त्यामुळे या केवळ एका लेखात (तेही गौतमीच्या) तिच्या स्वतःच्या मुलाचा उल्लेख "एकब्राह्मण" असा एक उल्लेख केलेला असावा. ( इतर कुठेही असे लिखाण दिसत नाही). याचा अर्थ हे सातवाहनांचे कुळ ब्राह्मण असले पाहिजे असा असेलच असे वाटत नाही. हा शिलालेख हा गौतमीपुत्र मरण पावल्यानंतर किंवा आजारपणाने सत्तेपासून दूर असताना त्याची आई गौतमीने कोरून घेतला आहे. कदाचित गौतमी ब्राह्मण कुळातली असावी आणि प्रतिष्ठित घरातली असावी. . याच कुळातली दुसरी एक राणी नयनिका/नागनिका ही 'नाग' कुळातली होती असे समजले जाते. या स्त्रीने श्रौत इ. वैदिक रितीभाती नवरा गेल्यानंतरही पाळलेल्या दिसतात (हे स्त्रीने करण्याची पद्धत नाही, पण तरी केले/करवून घेतले आहेत असा उल्लेख आढळतो). परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा कारण लग्ने क्षत्रपांशी, नागांशी आणि कदाचित ब्राह्मणांशीही होत असावीत. तेव्हा हे राजे तोंडाने (एखाद्या शिलालेखात) काही बोलत असले तरी करताना राज्यविस्तारासाठी काही लागेल ते करत होते (म्हणजे वर्णसंकर!) असे दिसते. दुसरे एक आपण असे तपासू शकतो की जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती तशी ब्राह्मण राजांमध्ये स्वतःच्या मूर्ती करून घेण्याची पद्धत होती का? कल्पना नाही. याआधी (ब्राह्मण) शुंगांनी स्वतःच्या अशा मूर्ती केल्या होत्या का हे बघावे लागेल. उदा. (ब्राह्मण नसलेल्या) कनिष्काचा पुतळा आढळतो. तसेच शुंगांनी जरी बरेच बांधकाम/शिल्पकाम करवून घेतले असले तरी मूर्ती तयार करून घेतल्या आहेत का हे पहावे लागेल. सातवाहनांनी (राणीसकट) सर्वांच्या मूर्ती दगडात तयार करून घेतलेल्या दिसतात. यावरूनही काही अंदाज बांधता येईल असे वाटते. [ अन्य टीपः कदाचित याचा काळाप्रमाणे काही संबंध असेल असे नाही. पण कुळकर(णी) हे पद सोपारा इ. भागात ऋषभदेवाच्या काळापासून जैनांमध्ये माहिती होते अशी माहिती कळते. जैनांच्या आदिनाथाचा (किंवा ऋषभदेवांचा) पिता नाभि राजा हा कुळकर होता असे समजले जाते. (आज आपल्याला माहिती असलेली 'कर्णी' याने अंत असलेली आडनावे ब्राह्मण असणे सूचित करू शकतात असे वाटते, पण म्हणून केवळ ब्राह्मणच असतीलच असे नाही). ]

In reply to by चित्रा

>>>> कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. सातवाहन राजांच्या एकूण संखेबाबात वाद आहेत म्हणतात. कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करुन शुंगाची सत्ता नष्ट करुन सिमुख (क) सातवाहन हा सिंहासनावर आला. सिमुखाआधी किती राजे होऊन गेलेत काही माहिती मिळाली तर मला सांगा. सातवाहन साम्राज्यात भर घालण्याचे काम निनाद ने सुरु केले होते. थोडा हातभार आम्ही लावला आहे, अधिक भरीव काम करेन म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे सांगणे थोडे कठीण आहे. काही आधीचे आणि काही नंतरचे असतील. :) मुळात सातवाहन कुळात सातवाहन नामक राजा होऊन गेला, हे देखील काही थोड्या (आणि बिरुदामुळे) सिद्ध केले आहे असे समजते. कोंडापुरम येथे असे एक नाणे आहे, मला वाटते वरंगळ येथे अजून एक आहे (चट्टोपाध्याय). अन्यथा पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आंध्र म्हणून आहे. सातवाहन या नावाने नाही. सिमुकाआधीचे राजे कोण होते ते माहिती करून घेण्यासाठी नाण्यांचे विश्लेषण करता आले पाहिजे. तूर्तास तुम्ही मिसळपावावरच्या आणि उपक्रमावरच्या चर्चा/लेखांची लिंक मराठी विकिपिडियावर देऊ शकता.

In reply to by चित्रा

मूळ 'सातवाहन' असे नाव असलेले नाणे उत्खननात सिमुकाच्या आधीच्या थरांत सापडलेले आहे त्यामुळे सिमुकाच्या आधीही सातवाहन राजा होता हे मान्य करण्यास काहीच हरकत नाही. राहिला मुद्दा आंध्रांचा, तर सातवाहनांचे सर्व शिलालेख हे पाकृतात आहे आणि तेलगूत एकही नाही. वासिष्ठिपुत्र पुळुवामी नंतर सातवाहनांनी पश्चिम महाराष्ट्र गमावून दक्षिणेत स्थलांतर केले होते. त्यानंतर श्री यज्ञ सातकर्णीने परत गेलेला प्रदेश परत मिळवला. यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या र्‍हासाला सुरुवात होवून पैठणही गमावले गेले व त्यांना कायमस्वरूपी आंध्रात जावे लागले. पुराणांचा काळ त्यानंतरचा त्यामुळे सातवाहनांचा उल्लेख हा पुराणांत आंध्रभृत्य असाच येतो.

In reply to by प्रचेतस

' सातवाहनकालीन महाराष्ट्र' हे डॉ.रा.श्री.मोरवंचीकरांचे एक पुस्तक हाती लागले आहे. चर्चेत आपली आणि चित्रा यांची माहिती अगदी बरोबरच आहे. अधिक माहितीसाठी आणि आपल्या प्रतिसादांना पुरक अशी माहिती डकवता आली तर डकवेन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्याकडेही हे पुस्तक आहेच. लेखातले काही संदर्भ तेथूनच घेतले आहेत. अर्थात त्या पुस्तकातली मोठी त्रुटी म्हणजे शिलालेखांचे प्राकृत भाषांतर त्यात फारसे नाही शिवाय सातवाहनकालीन किल्ल्यांचे वर्णनही त्यात नाही. पण एकंदरीत त्याकाळचा महाराष्ट्र समजून घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहेच. शिलालेखांसाठी वा. वि. मिराशींचे 'सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप-इतिहास आणि कोरीव लेख' हे पुस्तक अतिशय उत्तम आहे पण सध्या कुठेच मिळत नाही.

In reply to by चित्रा

या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते.
सिमुख सातवाहन हा आद्य सातवाहन समजला जात असे, पण सातवाहन असे नाव असलेली तांब्याची आणि शिशाची नाणी नासिक आणि नेवासे येथील उत्खननात मिळाली असल्यामुळे सातवाहन हाच या घराण्याचा मूळ पुरुष होय असे अलीकडे मानले जाते. याच्याच नावावरून सातवाहन कुलाची सुरुवात झाली. सिमुखाचा हा पिता अथवा आजा असावा तथापि त्यांचे नक्की नाते तसेच आद्य सातवाहनाचा राज्यविस्तार याबद्दल नक्की सांगता नाही. कण्वाला पराभूत मूळ सातवाहनानेच केलेले असावे किंवा त्यानंतर सातवाहनांचा राज्यविस्तार कण्वांना पराभूत करून सिमुकाने केलेला असावा. पण कालमापनाने पाहिल्यास हेही जुळत नाही. कण्व सत्ता ही साधारण इ.स.पूर्व७५ ते इ.स.पूर्व २६ अशी आहे तर सातवाहनांचा काळ त्याही आधीचा म्हणजे साधारण इ.स.पूर्व २३० असा येतो. पुराणे आणि काही शिलालेखांवरून हा काळ निश्चित केला आहे. म्हणजे कण्वांचा पराभव हा सातवाहनांच्या नंतरच्या पिढीच्या काळात झाला असावा. अशोकाच्या मृत्युनंतरच्या दशकभरातच सातवाहन मौर्यांचे मांडलिकत्व झुगारून देउन सत्तेवर आले. कण्व-सातवाहन यांत संघर्ष झाल्याचे कधी कुठल्याही शिलालेखात आलेले नाही हेही विशेष.
पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे.
याबद्दल बरेचसे वाद आहेतच. सातवाहन ब्राह्मणच होते असा सबळ पुरावा त्या शिलालेखाशिवाय दुसरा मिळालेला नाही हेही खरे. पण त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. पांडवलेणीतल्या त्याच लेखात गौतमीपुत्राचे खतियदपमानदमन हे बिरुदही कोरलेले आहे. स्वतः क्षत्रिय असताना तो असे बिरुद धारण करेल हे तसे असंभवनीयच वाटते.
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला म्हणजे त्याच्या काळात वर्णसंकर होत नसे. त्याच्या आधी वर्णसंकर होताच. उदा. नागनिका. वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा विवाह राजकारणाचाच भाग हे निश्चितच पण हा विवाह कदाचित गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर झाला असावा. नक्की काळ माहित नाही. (कान्हेरी लेण्यामध्ये वाशिष्ठिपुत्राच्या पत्नीचा शिलालेख आहे त्यात तिच्या पित्याचा-रूद्रदामन क्षत्रपाचा उल्लेख आहे.)
जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती
जैनांबद्दल माहित नाही पण बौद्धांमध्ये मूर्ती कोरण्याची पद्धत कनिष्काने सुरु केली असे मानण्यात येते. बहुधा चौथ्या धम्मपरिषदेमध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला गेला. सातवाहनांच्या प्रतिमाही फक्त नाणेघाटातच आढळतात, इतरत्र कुठेही नाही तेव्हा नाणेघाटाचे हे महान कार्य लोकांवर ठसवण्यासाठीच या मूर्ती कोरण्यात आलेल्या असाव्यात. पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.

In reply to by प्रचेतस

सिमुकाबद्दल सहमत आहे, तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल. अर्थात त्याचे आधी सत्ताकेंद्राजवळ असणे (म्हणजे मांडलिकत्व) अध्याहृत आहे. (पण आद्य म्हणजे अनेकदा आपण म्हणतो आमच्या घराण्याचा मूळ पुरुष अमूक. त्याआधी घराणे होतेच, पण नावारुपाला आले ते या काळापासून, म्हणून आद्य). नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का? >पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत. मी ते पाहिलेले नाहीत. फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन. धन्यवाद.

In reply to by चित्रा

तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल
सिमुक या कुळातील मुख्य राजा होताच हे मान्य. पण आद्य सातवाहन हाही मुख्य राजा असावा.ज्याअर्थी त्याची स्वतंत्र नाणी आहेत त्याअर्थी त्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले होते हे निर्विवाद. अर्थात सिमुकापासूनच सातवाहन घराणे नावारूपाला आले यात काहीच संशय नाही.
नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का?
नेवाशाचा संदर्भ वा.वि. मिराशींच्याच पुस्तकात आला आहे. बहुधा सांखलियांच्या पुस्तकातही तो आहे.
.फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन
फोटो वर दिलेलेच आहेत. फोटो क्र. १७,१८,१९,२० यात गौतमीपुत्राचा जीवनपट रूपकार्थाने कोरलेला आहे.

In reply to by प्रचेतस

मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे. माझ्या अजून थोड्या वाचनातून लक्षात आले की - त्रिपिटकामध्ये बुद्धाचे म्हणणे I call "a brahmana" (एकब्राह्मण), who is free from moral corruption and from attachment. (बाकीचे भोवडी ब्राह्मण! ) ह्याच्याशी गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा. गौतमीला बुद्धाचे त्रिपीटक माहिती होते किंवा महत्त्वाचे वाटत होते असे दिसते. ( आपण सध्या ज्या अर्थाने हे ब्राह्मण आणि क्षत्रिय धरतो तसेच अर्थ सातवाहनांच्या काळी धरले जात नसावेत असे वाटते, ब्राह्मण आणि क्षत्रिय वेगवेगळे असले तरी "जाती" तयार झालेल्या नव्हत्या असे दिसते. ).

In reply to by चित्रा

मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे.
नाणेघाटातल्या गुहेत ही सर्व शिल्पे आहेत/होती पण दुर्दैवाने त्यांचे आज फक्त पायच शिल्लक आहेत. वर लिहिलेल्या शिलालेखांतील नावावरूनच ही शिल्पे नेमकी कोणाची हे ओळखता येते. हा पहा मी काढलेला नाणेघाटातल्या गुहेतील शिल्पाचा पाय शिल्लक असलेला फोटो
गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा.
सातवाहन ब्राह्मण नसतीलही. ते ब्राह्मण असण्याचा किंवा नसण्याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही. पण ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता. त्याकाळी जाती नव्हत्याच. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही व्यवस्थाच सर्वसामान्यपणे प्रचलित होती. बरेचसे वैश्य मात्र बौद्ध झाले असावेत असे विविध दातृत्वाच्या शिलालेखांवरून दिसते.

In reply to by प्रचेतस

फोटोसाठी धन्यवाद. हा फोटो थोडा मोठा लावला असता तर बरे झाले असते की साहेब. असो. गौतमीने म्हटलेल्या एकब्राह्मणाचा उगम त्रिपिटकांत असावा ही माझ्या स्वतःच्या विचारांची निष्पत्ती आहे. कुठच्याही पुस्तकात मी आतापर्यंत हे वाचलेले नाही (मिराशींचे पुस्तक मला उपलब्ध नाही). मिराशी यावर काही म्हणतात का हे जाणून घ्यायला आवडेल. उद्देश ते ब्राह्मण नव्हतेच हे सिद्ध करण्याचा नाही. माझे म्हणणे खरे असले तर आता गौतमीचे लिहीणे असे दर्शवते की - १. तिला बौद्ध साहित्य आणि विचार माहिती होते. २. आपला मुलगा स्वच्छ मनाचा आणि मोहजालापासून दूर आहे (म्हणून बौद्ध विचारांजवळ आहे) असे सिद्ध करायचे असावे. पण म्हणजेच बौद्धांना जवळ ठेवणेही ती महत्त्वाचे समजत असावी. म्हणजे तो बौद्ध नसावा, ब्राह्मणही असावा. :) अजून काही तुमच्या लेखात आले आहे की - "स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे. " मला हे वाक्य असेच्या असे भांडारकरांच्या भाषांतरात दिसलेले नाही. वरील वाक्यावरून तेव्हा जाती होत्या आणि तो केवळ ब्राह्मणांचे रक्षण करत होता असे वाटण्याचा संभव आहे. भांडारकरांनी दिलेल्या भाषांतरात he protected all who sought asylum with him and regarded the happiness and misery of his subjects as his own स्वजाती म्हटलेले नाही. गौतमीच्या लेखाचे इतर कोणी केलेले भाषांतर (मिराशी?) वाचायला आवडेल. पण माझ्या मते (आणि इतर काही अभ्यासकांच्या मते) आपण ज्याला आता ब्राह्मण म्हणतो तशा त्या जाती गौतमीपुत्राच्या काळी नव्हत्या, शिवाय ब्राह्मण हे वैदिक धर्माचे (म्हणजे यज्ञ वगैरे) आचरण करत असा अर्थ असल्याचे दिसते, बाकी मुख्य बेटीबंदी नव्हती, समुद्रबंदी नव्हती, हे तर सर्व दिसतेच आहे. >ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता. वर लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.

In reply to by चित्रा

गौतमीला त्रिपीटकांचे ज्ञान असावे. पण त्याविषयी नक्की माहित नाही शिवाय कुठला संदर्भही मिळत नाही. पांडवलेण्यातील गौतमी बलश्रीच्या मूळ ब्राह्मी लेखाचे देवनागरीतील प्राकृत लिप्यंतर तसेच मराठीतील मिराशींचे पुस्तक सध्या तरी माझ्याजवळ नाही. ते लवकरच मिळवण्याचा प्रयत्न करेन. त्याआधारेच मग नेमके शब्द त्या लेखात काय आहेत ते सांगता येईल. मूळ शिलालेख हा थोडासा खंडित असल्याने वाचणे अवघड आहे. माझ्याजवळच्या संदर्भात अशीच वाक्ये दिलेली आहेत. (मोरवंचीकर रा. श्री.) जातीव्यवस्था त्याकाळात नव्हतीच. अशोकानंतरच्या काळात काहिश्या खंडित झालेल्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन सातवाहनांनी केले होते. नाणेघाटावरील शिलालेखाविषयीच्या जयंत कुलकर्णीच्या या लेखात सातवाहनांच्या यज्ञयागाचे उल्लेख विस्ताराने मांडलेले आहेत. समुद्रबंदी तर नव्हतीच नव्हती. सातवाहन-क्षत्रप संघर्षाचे मूळ कारणच मुळात समुद्रावरून चालत असलेल्या व्यापारावर अधिकार गाजवण्यावरून आहे.
लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.
ते पुढच्या भागात येणारच आहे. या पहिल्या भागाचा उद्देश फक्त नासिक लेण्यांतील ३ व १० क्रमांकाच्या सर्वात महत्वाच्या अनुक्रमे नहपान आणि गौतमी बलश्रीच्या लेण्यांची माहिती करून देणे हाच होता. दुसर्‍या भागात इतरही काही शिलालेखांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

खूप छान फोटो आणि वर्णन. धन्यवाद !! पुंन्हा एकदा जुन्या आठवणी जाग्या झल्या. कॉलेजला असतांना मी माझ्या ग्रुपसोबत अनेकदा येथे जायचे हा आमचा आवडता स्पॉट होता. पायर्या चढतांना उजव्या बाजूला एका आजीची टपरी आहे तिथे खूप छान बटाटेवाडे मिळायचे (आता बरीच वर्ष जाने नाही त्यामुळे आता तिथे ती टपरी आहे कि नाही माहित नाही) आणि आमच्या ग्रुपचा प्रत्येकाचा वाढदिवस आम्ही तिथेच साजरे करायचो खूप मज्जा यायची. त्यावेळी बौद्ध विहार झलेले नव्हते छान वनराई होती. आता मात्र चित्र पूर्ण बदलले आहे. छान बौद्ध विहार आहे, दादा साहेब फाळके स्मारक आहे ते खूप सुंदर आहे. काही पुरातन अवजारे तेथे ठेवण्यात आलेली आहे तसेच जुन्या फिल्म इंडस्ट्रीचे छान छान फोटो पाहण्यास मिळतात. पांडव लेणीच्या बाजूलाच नेहरू गार्डन आहे ते देखील खूपच सुंदर आहे. तसेच नाशिक मध्ये बघण्यासारखी खूप छान छान ठिकाणे आहेत. त्यात प्रामुख्याने त्र्यंबकला जातांना अंजनेरी, गुरुपीठ प्रकल्प (श्री स्वामी समर्थ - दिंडोरी प्रणीत), पुढे ब्रम्हागिरी, सोमेश्वर, सीतागुंफा, पंचवटी, काळाराम मंदिर, असे स्पॉट आहेत. कधी मिपाकारांपैकी कुणी गेलीच नाशिकला तर या ठिकाणांना नक्कीच भेट द्या.