आपल्या आईवडिलांना क्षमा करा !
चिगोंची मार्गाथा व वपाडाव यांची व्यथा , त्यांच्या कथा ह्रुदयद्रावक आहेतच पण आईवडिलांची बाजू पण समजून घेतली पाहीजे.
सर्वसाधारणपणे असे दिसते की थोरली मुले जास्त मार खातात. मी पण थोरला, व बापाचा मजबुत मार खाल्लेला. त्यामानाने धाकटी पोरे फारशी शिक्षेला सामोरी जाता दिसत नाही. मला वाटायचे की धाकटे लाडके व आम्ही दोडके. पण स्वतः बाप झाल्यावर अपत्यसंगोपनाची पारंपारीक सत्ये व त्यांची पॉवर लक्षात आली. आमच्या तीर्थरुपांचे एक लाडके तत्त्व होते. इंजीन रुळावर नीट असले की बाकीचे डबे पण नीट येतात. त्यामुळे रुळावर नीट रहाण्यासाठीच्या सर्व यातना आमच्याच वाटेस आल्या, पण त्यामुळे धाकट्या दोघांना माराची वेळ क्वचितच आली. वडिलांनी नुसता आवाज लावला की चिडीचुप, ही वेळ येण्यासाठी मला बलीदान द्यावे लागले.
शिवाय थोरल्या पोराच्या बाबतीत एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे अननुभव. पोरगे नवीन असते तसेच आईबाप पण नवीनच असतात. किंबहुना ते आईबाप, आईबाप म्हणून त्या मुलाच्याच वयाचे असतात व हे सर्वजण चुकतमाकत, एकमेकांना सहन करीत मोठे होत असतात. साधारणपणे सरासरी २५ व्या वर्षी लग्न होते, आणि पूर्वपरिचय असो वा नसो, नवराबायको म्हणून एकमेकांना समजून घेईपर्यंत बाळराजे यायचे म्हणतात. त्यात विभक्त कुटुंब आणि दोघेही नोकरी करणारे असतील तर प्रॉब्लेम्स विचारूच नका. दुसर्याच्या वेळेस अडचणी त्याच असल्या तरी अनुभवामुळे आता एवढी चिडचिड होत नाही. बरं अशा अननुभवी आईबापांना पोरांनी तरी सांभाळून घ्यावे की नाही? पण ती आपापल्या परीने प्रॉब्लेम वाढण्यास मदतच करतात. साधारण पालथे पडण्यापर्यंतचे तीनेक महीनेच जरा सु़खाचे असतील. एकदा डोके उचलून जगाकडे यांनी पाहीले की यांचे खोड्यांचे प्लॅनींग सुरु होते व रांगता येवू लागले की एक्झीक्युशन. कुकरमध्ये डोकेच अडकव (मी फोटो काढून ठेवला आहे), अंगावर काहीही सांडून घे, गरम वस्तूच ओढून घे इथपासून ते थोडे मोठे झाल्यावर नाकात शेंगदाणा अथवा पेन्सील घाल इत्यादी. नाकात एकदा तरी काहीतरी घालणे हा तर जवळ जवळ प्रत्येक पोराचा हातखंडा खेळ असतोच. आणि वर अगणित हट्ट. प्रत्येक दिवस अॅक्शनपॅक्ड. त्यात आजारपणांची वेगळीच तर्हा. यांना काय दुखते ते सांगता येत नाही, नव्या आईबापांना कळत नाही. (तरीही मुलांच्याप्रती यांची सेन्सेटीव्हीटी जबरदस्त. थोरला लहान असताना कॉटवरुन पडला तर तो ढिम्म, पण बायकोच रडली. कालांतराने धाकटा जिन्यावरुन गडगडला, मला वाटले आता ही पुढचे आठ दिवस रडणार, तर ती शांतपणे त्याला उचलून घेवून आली. अनुभव दुसरे काय?)
साधारणपणे शालेय कालखंडात ही पोरे तर कहर करतात (दोन स्वानुभव -स्वत:चा व पोरांचा). आईबापांना शेंड्या लावून छोट्या मोठ्या खोड्या करणे, न ऐकणे यांचा अतिरेक झाला की मार्गाथेत एका व्यथेची भर पडते. त्यात पहील्या पोराच्या वेळी तर आईबाप तरुणच असतात, अंगात अजून रग असते. त्यामुळे जस्ट टॅप केले तरी पोरगं चुकून पडू शकते. (टार्या, लक्षात घे रे बाबा.) डोक्याला खोक पाडणे हा उद्देश नसतो तर तो एक अपघात असतो. जर पुन्हा पुन्हा खोक पाडण्याचा इतिहास नसेल तर त्याचे कडे अपघात म्हणूनच पाहीले जावे, लगेच आईबापांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करू नये असे वाटते.
बालमानसशास्त्र काहीही म्हणो, मुलांना फार समजावून सांगणे हे मुलांना पालकांच्या दुर्बलतेचे लक्षण वाटते व त्याचा फायदा मुले फार चटकन उठवतात. त्यातून जर पन्नास पन्नास वयाच्या माणसांना पण समजावून सांगितलेले कळ्त नाही व आडमुठेपणा करतात तर अननुभवी लहान मुले कशी समजून घेणार? त्यामुळे ढूंगणावर वेळीच दिलेले दोन सणसणीत रट्टे हे इफेक्टीव्ह स्टॉपर म्हणून काम करतात व आईबापांचे आणि मुलांचे श्रम वाचवितात. जर मागण्या योग्य असतील तर मुलांना फार हट्ट न करता त्यांची पुर्तता होते व अवाजवी मागण्या मान्य केल्या जात नाहीत हे ठामपणे कळायला हवेच. जर आईबापांकडून लाड करून घेताना तक्रार नसेल तर शिस्तीसाठी दिलेले दोन दणके पण घ्यायलाच हवेत. विपश्यनेत गुरुजी सांगतात - वेळी दोन फटके देण्यात गैर काही नाही. मारा, पण कुंभारा सारखे. घटाला आकार यावा म्हणून कुंभार थापटण्याने मारतो, पण एक हात आतून ठेवतो. हा प्रेमाचा एक हात आतून असेल तर आकार देण्यासाठी अवश्य मारा.
माझ्या लहानपणी वडीलांनी मला चांगले बुकलले. (आणि माझ्या वडीलांनी मला मारले किंवा काहीही इतर कारणांमुळे सुद्धा मी माझ्या बायकोला अजून पर्यंत तरी मारलेले नाही. किंबहुना गेल्या चोवीस वर्षात साधी चापट बायकोला मारली नाही म्हणजे माझे बायकोवर खरे प्रेमच नाही, असे आमच्याकडे शेतीकामाला येणार्या बायका (आपापल्या नवर्यांचा मनसोक्त मार खावून) माझ्या बायकोला सांगतात.) (टीप : हा विनोदाचा क्षीण प्रयत्न आहे. लगेच पाशवी शक्तींनी हल्लाबोल करु नये)
तेव्हा बाप राक्षस वाटायचा. त्यावेळी त्यांचा आतुन असलेला प्रेमाचा हात समजून घेण्याचे वय नव्हते पण आज समजते आहे. माझ्या वडीलांची तत्त्वे मला योग्य वाटली म्हणून माझ्या मुलांच्या वेळी मीही ती वापरली आणि प्रसंगी दोन सणसणीत रट्टे देताना अजिबात हयगय केली नाही. हे सांगताना कोणताही गर्व अथवा अपराधी भावना नाही तर फक्त त्यावेळी बाप म्हणून जे कर्तव्य वाटले ते केले एवढीच भावना आहे. हे करताना कधी अपघात घडले असतील मात्र आतून हात प्रेमाचा होता हे नक्की. त्यामुळे जरी मला माझ्या वडिलांचा त्यावेळी संताप आला असला तरी आज मी त्यांच्या भूमिकेत गेल्यावर त्यांनी केले ते योग्यच केले असे वाटते आहे. आज ते नाहीत, नाहीतर त्यांना सांगायला मला आनंद झाला असता की, माझ्या बर्याच प्रमादांना तुम्ही क्षमा केलीत, तशीच आज मीही तुम्हाला क्षमा करुन तुमच्यावरचा राग विसरुन जात आहे. कदाचित माझी मुलेही मी त्यांना दु़खावलेले विसरुन जातील व मला क्षमा करतील हि आशा. नाहीतरी मोठ्यांना क्षमा करायची संधी आपल्याला नेहमीच मिळत नसते.
प्रतिक्रिया
लेख आवडला.
धाकटा असुन लहान असताना सपाटुन मार खाल्लाय. (दीदी मोठी असुनही तिने तशी संधी कधी दिली नाही.) आणि आम्ही दोघं असल्याने आई बाबांनी त्यांचा हट्ट माझ्या वर पुर्ण केला. ;) माझेच उपद्व्याप कारणीभुत असायचे म्हणा. पण थोडा मोठा झाल्यावर त्यांनी कधी हात उगारला नाही. त्यांच्या नजरेतली जरबच पुरेशी असायची. :)
पण स्वतः बाप झाल्यावर वडलांचे वागणे पटु लागले. त्यांच्या वर नाराजी नव्हतीच कधी त्यामुळे जो काही आहे तो केवळ आदर आणि प्रेमच.
जबरी लेखण !! आवडलेच नाही तर पटले देखील ...
बाकी आमचं पॅरेंटिंग कसं असेल तर "पछाडलेला " ह्या चित्रपटातल्या इणामदारासारखे. पोराकडे नुसते डोळे मोठे करुन बघत ... " हे बघ .. डोळे बघ डोळे .. " म्हणायचे :) जोक्स अपार्ट , पण विचार करण्या सारखा लेख लिहील्या बद्दल अभिणंदण :)
नाकात एकदा तरी काहीतरी घालणे हा तर जवळ जवळ प्रत्येक पोराचा हातखंडा खेळ असतोच.आम्ही णाकात काही घातलं नव्हतं .. पण लहाणपणी णाकातुन खुप काही काढायचो असे आमचे पालक म्हणतात :)
लेख उत्तम जमलाय!
चांगलं लिहिलं आहे.
मारा, पण कुंभारा सारखे. घटाला आकार यावा म्हणून कुंभार थापटण्याने मारतो, पण एक हात आतून ठेवतो. हा प्रेमाचा एक हात आतून असेल तर आकार देण्यासाठी अवश्य मारा.
विशेष.
आणि तितकेच मारा, की आतल्या प्रेमाच्या जाणीवरूप हाताला मुलाच्या मनात धक्का पोचणार नाही.
>>शिस्तीसाठी दिलेले दोन दणके पण घ्यायलाच हवेत. विपश्यनेत गुरुजी सांगतात - वेळी दोन फटके देण्यात गैर काही नाही. मारा, पण कुंभारा सारखे. घटाला आकार यावा म्हणून कुंभार थापटण्याने मारतो, पण एक हात आतून ठेवतो. हा प्रेमाचा एक हात आतून असेल तर आकार देण्यासाठी अवश्य मार>><<
एकदम पटले !तुमच्या विचांरांशी पूर्णपणे सहमत!
तसा मीही लहाणपणी खूपच मार खाल्ला आहे अर्थात माझ्या आगाऊपणामुळे पण वेळीच आईने शेपालुन काढल्यामुळे जरा सुधारीत आवृत्ती झाले आहे थॅन्क्स टू आई !
ह्म्म बरोबर आई-वडील दुश्मन थोडेच आहेत.
विजुभौ उगीच बिथरवुन टाकतात ;).
मिपावर मार खाणार्या बिचार्यांचे भवितव्य धोक्यात आणुन ठेवले त्यांनी.
अवांतर-- @विजुभौ ह.घे
पाठीशी उभे राहील्याबद्दल "कौतिक"...
आणी आणंद..
@मुलूखावेगळी : ह. घे. न.
तुमच्या विचारांशी सहमत.
बहुतेक मुले आईवडीलाना माफच करतात. जे घडले त्याबद्ल डूख धरून रहात नाहीत.
सर्वसामान्य आईवडील मुलाना आवडम्हणून मारत नाहीत. पण रागाचा आतिरेक हा वाईटच.
चुकून रागाच्या भरात एखादा फटका मारणे वेगळे आणि मुलीचे डोके भिंतीवर आपटणे वेगळे.
मुलाला पंख्याला उलटे लटकावून पंखा फिरवणे वेगळे
आईबापानी मुलांच्या हातापायावर उदबत्तीने चटके दिलेले मी पाहिलेले आहेत.कानावर हाणलेल्या फतक्याने मुलांच्या कानाला दुखापत झालेली पाहिलेली आहे.
मुलांचे हात पाय पिरगाळून तो कायमचा वाकडा झालेला देखील मी पाहिलाय.
हे असले आईबाप राक्षस याच कॅटेगरीत जमा होतात.
या उलट आईबापाला मारहाण कर्नारा मुलगा दुद्धा मी पाहिलाय
चेळ निघून जाते पण मुलांच्या मनावर आघात कायमचा रहातो.
अश्या कोणत्या ठीकाणी राहत असावेत हो विजुभौ?
की सामान्य मार खाणार्या केसेस पाह्यल्यावं नाहीत.
१०० पोरांत एखादं तसं मार खात असेल.
का नेहमीच असं अपवादात्मक स्थळी उपस्थित राहणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
मान्य आहे असं व्हायला नको, पण काही गोष्टी त्या त्या व्यक्तीच ठरवतात.
आपण यात फक्त सजेशन देउ शकतो.
बाकी चालु द्या.
(विजुभौ ह. घ्या.)
का नेहमीच असं अपवादात्मक स्थळी उपस्थित राहणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
मी काउन्सिलिंग करायचो. त्या वेळेस असे बरेच अनुभव नजरेस आलेले आहेत.
खूप अस्वस्थ व्हायला होते काहींचे अनुभव आठवले तरिही.
पोरगे नवीन असते तसेच आईबाप पण नवीनच असतात. किंबहुना ते आईबाप, आईबाप म्हणून त्या मुलाच्याच वयाचे असतात व हे सर्वजण चुकतमाकत, एकमेकांना सहन करीत मोठे होत असतात.
अतिशय योग्य सुंदर आणि सहानुभव देणारे लिखाण.
आपल्याच आयुष्याविषयी बोलताहेत असे वाटले...
पंख्याचे उदाहरण उगीच निव्वळ तांत्रिक दृष्ट्याही पटले नाही. झाडताना सहज थोडा जास्त धक्का लागला तरी पाती वाकडी होतात. पंख्याचे छतातले फिक्सिंग कितीही मजबूत असले तरी मधली मोटर आणि तिचा अक्ष काही वजन पेलण्यासाठी सक्षम नसतात. दहाएक किलो वजनाचे (दोन वर्षावरील किरकोळ शरीरयष्टीचे मूलही किमान तेवढे असते.) (नवजात वगळता) त्या पंख्याची वाट न लागता त्यावर बांधून फिरवता येईल हे अतिशयोक्त वाटते.
अर्थात हे खूप क्लेशदायक आहे म्हणून फार कीस पाडण्यात इंटरेस्ट नाही. प्रात्यक्षिक करुन पाहणे तर मूर्खपणाच ठरेल.. असो.
पंख्याला लटकुन आत्महत्या केलेले फोटो / बातम्या वर्तमानपत्रात पाहीले नाही काय? आमच्या माहीतीतल्या एकाने पंख्याला गळफास बांधुन आत्मह्त्या केली आहे.
शा़ळेत असताना मी मजा म्हणुन (टारझन सिनेमा बघुन) बंद पंख्याला लटकुन पाहीले आहे. नंतर मार खल्ला ते वेगळे.
मुलांना पंख्याला लटकवलेले मी ही ऐकले आहे.
yes. ,maybe..I didnt intend to go into finer details. Just aa question that came to my mind.
I hv seen many such incidences of suicide by fan hanging. But dont know whether it deems fan disfunctional.
Punishment,if true must be kind of routine in nature,unlike suicide.
But yes.better agree than drill into it..
चिगोंची मार्गाथा व वपाडाव यांची व्यथा , त्यांच्या कथा ह्रुदयद्रावक आहेतकोणतंर भेटलं ज्याला हे असं काही वाटलं. पंच्यामारी... हामाला कदी आसं वाटाय न्हाई !!! बाकी.. मायबाप थोर म्हुनशिन्या हामी हितं हावं. आमचं लई पुन मागच्या जन्माचं, अशे प्यारंट भ्यटलं
हेच तर ना, राव... मी तर मला मार दिल्याबद्दल माझ्या आईचा आणि समस्त गुरुजनांचा अतिशय आभारी आहे.. (क्षमा करण्याचा प्रश्नच नाही.) त्यामुळे दगड बनण्यास आम्हाला प्रचंड फायदा झाला आणि ह्याचे फायदे (मानसिकदृष्ट्या) आता कळताहेत. त्यामुळे आमचे मडके घडवणार्यांचे लय लय धन्स...
बाकी सातबारांचा लेख एकदम जबरा आहे.. ते आई-बापाचे वय पोराएवढे वाले वाक्य तर "वाह!" आहे येकदम..
(बाप झाल्यावर योग्य वेळी कार्ट्यांना झोडण्याचे दुष्ट प्लान्स असलेला) चिगो
आणखी एक राहीलंच...
मी आम्हां तिन्ही भावांमधे सगळ्यात धाकटा (का धाटका? ल्हानपनापासुन घोळ आहे च्यामायला.. तसाच गरोदर ला गदोदर म्हणायचो आम्ही... माझ्या मधल्या भावानी तर एकाला "तुमची बायको गाभण आहे का?" विचारुन फेफरं आणलं होतं) तरी लै जबरा मार खाल्लाय. पण मजा आली राव, तेव्हाही आणि आता तर गुदगुल्या होतात ते आठवलं की..
(माराच्या आठवणीने उल्हासित होणारा (विकृत?)) चिगो
सहमत. :)
असेच म्हणतो. :)
(फक्त,)
******************************************
आमच्या कडे रजनीकांतच्या चड्ड्या धुण्याची WASHING MACHINE नाहीये...
======================================
;)
(ता.क. : जोवर एखाद्याच्या कॄतीमागचा कार्यकारणभाव कळत नाही, तोपर्यंत त्याची ती कॄती चुकीची वाटते, पण म्हणून लगेच कुणी कुणाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करत नसते, तसा त्याचा उद्देशही नसतो. याला Mutual Mis-understanding म्हणता येइल का?)
मी स्वःता मला योग्य कारणांसाठी मारणार्यांचा मनापासून आभारी आहे, At Least, त्यांनी मला मारण्यापुरता का होईना, मला तेवढा भाव दिला. आणि त्यांच्या मारण्यात कोणतीही कटुता किंवा कोणतेही वैमनस्यही नव्हते, हे माहीत आहे. मी स्वःता, मार खाल्ल्यानंतर मिळणार्या "जादू की झप्पी" साठी आणि त्यातून जाणवणार्या भावनिक मायेसाठी, ओलाव्यासाठी अजूनही मार खायला तैयार आहे.
-सूर्यपुत्र.
सुन्दर लेख.
पटलच एकदम!
लेखाचा शेवट तर एकदम मनातलाच.
लेखाचा शेवट भावला
मी सुद्धा माझ्या वडिलांचा मार खाल्लाय , बेदम, धाकटा असूनही. पण प्रत्येक वेळी त्यांनी उगाचच मारले असे म्हणवत नाही आता कारण बहुतेक वेळा आगळीक माझ्याकडून्च घडलेली असायची. शिक्षेचा प्रकार मात्र त्यांच्या त्यावेळ्च्या मूड्वर अवलंबून असायचा. ते मारकुटे होते किंवा राक्षस होते किंवा दुष्ट किंवा विकृत होते आणि हात साफ करुन घ्यायला ते यथेच्छ झोडपून काढत आहेत असे त्यावेळीहि कधी वाटले नव्हते आणि आज तर अजिबातच वाटत नाही. त्यांचा आवाजच इतका जरबेचा होता की अनेकदा मार खायची पाळी टळली आहे त्यामुळे. :)
समजावून सांगणे एका ठराविक सीमेपर्यंत चालते पण ती सीमा ओलांडली की शारिरीक शिक्षा देण्याशिवाय पर्याय राहात नाही. लहान मुले बारकीच असतात पण प्रचंड हुशार असतात, बारकी असली तरी बेरकी असतात ;) कोणाशी कसे वागावे याचे त्यांना मोठ्यांपेक्शा जास्त चांगले ज्ञान असते. माझी बायको, आई आणि वडिल माझ्या मुलाला (तो ३ वर्षाचा असताना) एक दिवस दुपारभर समजावत बसले होते आणि तो ऐकत नव्हता. पण मी ऑफिसमधून आल्यावर काय विषय चालला ते पाहून वॉश घ्यायला जाता जाता सहज सांगितले की आजोबा म्हणत आहेत ते कर की. इतक्या एका क्षणात तो कबूल झाला की ते तिघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघतच राहीले. म्हणजे आख्खी दुपार त्याची समजूत पटत नव्हती ती एका साध्या सूचनेमुळे झाली. कारण मी वायफळ ऐकून घेणार नाही ह्याची नोंद त्याच्याकडे पूर्वीच झालेली असणार.
लहान मुलांच्या दृष्टीने त्याने एक अधिकाराची उतरंड ठरवून दिलेली असते, त्याच्यावर अवलंबून असते कुणाला जुमानायचे आणि कुणाला नाही.
मारझोड करणे नक्कीच योग्य नाही पण कधी कधी जरा धाक दाखवल्याशिवाय चालतच नाही.
माझा एक मित्र गमतीने म्हणतो, मी भारतात आहे म्हणून बरे, अमेरिकेत असतो तर मुलाला मारल्याबद्दल मला एव्हाना ४ जन्मठेपी आणि २ वेळा फाशी मिळाली असती. =)) आमचे पोरगे बिघडले तर काय सरकार येणारे का त्याला सुधरायला ?
मार बसला म्हणजे आई वडिलांचे मुलावर प्रेम नसते असे नाही तर "कधीकधी " शारिरीक शिक्षा गरजेची ठरते.
पोरगे नवीन असते तसेच आईबाप पण नवीनच असतात. किंबहुना ते आईबाप, आईबाप म्हणून त्या मुलाच्याच वयाचे असतात व हे सर्वजण चुकतमाकत, एकमेकांना सहन करीत मोठे होत असतात.
---- एकदम पटले .. जबरदस्त बोलला भाउ.
---
मी मोठा आणि ताई लहान .. मुलगी लोकाच्या घरी जाणार म्हणुन खुप लाड( गावाकडे असेच असते मुलगी २०-२५ वर्षा नंतर सासरी जाणार्या मुलीचे लहानपणापासुनच लाड असतात ) आमच्याकडे मात्र फक्त मार ...
तरीही तसा आईचा मी लाडकाच होतो आणि आहे..
वडील मारतायेत म्हनुन तेंव्हाच राग यायचा .. पण पुढे सनासुदी ला .. विशेष वेळी पण स्वताला काही न घेता सगळॅ आम्हालाच घेतात म्हणुन खुप वाईट वाटायचे ...
एव्हडेच काय एकदम लहान होतो तेंव्हा आम्ही कार्यक्रम बघतो हे कामाला जातात.. यांना नाही का टीव्ही पहायला मिळावा असे वाटत असे ही वाटत होते ..
त्यामुळे त्यांच्यावरील राग कुठला कुठे निघुन जायचा ..
अजुनही त्यांचे विचार पक्के पटत नाही.. तरीही मान त्यांना देतोच देतो ..
भले काही वेळेस मन नाराज होत असले तरी त्यांच्यासाठी हे म्हणुन मन नंतर कायम आनंदीच राहते...
अगदी या दिवाळी ला एकदम भारी कपडे आणली तरी .. ती खुप भारी आहेत म्हणुन लवकर शिवलेच नव्हते यांनी.. शिवा ते कपडे बोललो तरी नाही .. शेवटी थोडी मीच बोलणी खावुन त्यांचे कपडे शिवुन झाले..
आई बद्दल तर शब्दच कमी पडतील ..
खरेच मी खुप भाग्यशाली आहे .. नका का शहरात जन्माला येवुदे आणि नको ते तसली कार- ऐषोआराम ,,
पण जे त्यांनी दिले ते खरेच खुप मोठे आहे ... लहानपणी म्हणायचो मी आपल्याकडे हे नाही .. ते नाही.. पण आज म्हणतो आहे बरे झाले जे मिळायला पाहिजे ते ओतप्रोत दिले .. खुप ऋणी आहे त्याबद्दल ....
(तुमच्या या लिखानामुळे नकळत माझेच लिहुन गेलो छान वाटले .. धन्यवाद )
लेख नि प्रतिसाद लै टेरिफीक. :)
मी ही लहानपणी शेंडेफळ असुनही आई-वडील, भाऊ यांचा सड्कुन मार खालेला आहे. कारण आम्ही छत्रपतीच तेवढे होतो.
बाकी मी मुलांना कधीच मारत नाही. ते डिपारमेंट सौ. कडे आहे.
आवडले !
लेखन आवडले.
रसल पीटर चा 'सम्म्बडी गोन्ना गेट हर्ट' वाला एपिसोड आठवला.
लेख आवडला. पण मोठी मुले जास्त मार खातात हे पटले नाही.
बाकी आजकाल गधड्या आणि उर्मट मुलांच्या मनाला फुलांसारखे जपणारे मुळुमुळु बाप पाहिले की त्या बापांना आधी फोडावसं वाटतं.
-((भला)थोरला) चौदावे रत्नपारखी
सर्व वाचक व प्रतिसादकांचे प्रोत्साहनाबद्दल आभार.
वळण लावण्यासाठी मारायची वेळ आलीच तर एखादी चापट वा धपाटा टीक आहे.पण डोके आपटणे, रक्त येणे, टेंगळे येणे, अंगावर वळ उठेपर्यंत मारणे, चटके देणे अशाप्रकारची मारहाण त्या वेळेपुरती तरी विकृतीच आहे.
मुलांना शिस्तीचे महत्व समजण्यासाठी positive enforcement महत्वाची . मुलांशी वेळोवेळी आणि योग्य रितीने संवाद साधणे ही तितकेच महत्वाचे.
वळण लावण्यासाठी मारायची वेळ आलीच तर एखादी चापट वा धपाटा टीक आहे.पण डोके आपटणे, रक्त येणे, टेंगळे येणे, अंगावर वळ उठेपर्यंत मारणे, चटके देणे अशाप्रकारची मारहाण त्या वेळेपुरती तरी विकृतीच आहे.
किंचितसा असहमत. त्याला अविचार म्हणता येईल पण विकृती म्हणता नाही येणार. आई वडीलांमधेही कधी कधी काही इश्यूज असतात त्याचाही राग मुलांवर निघू शकतो. म्हणजे मग त्या रागाने मारलेला फटका कदाचित जरा जोराने बसून रक्त टेंगळे वगैरे येऊ शकतात.
जसं मी एकद्या ओट्यावरची घागर तिरकी करून त्यातून पाणी काढू पहात होतो. माझ्या तेव्हाच्या आकारानुसार मला ते जमणार नाही हे आईला ठाऊक होते तिने मला सांगितले २ मिनीटे थांब येवढी भाजी चिरून मी देते. परंतु आम्हाला खाज भारी; मी घागर वाकडी केलीच आणि पटकन वाकडी होऊन ती न सावरल्याने घागर ओट्यावरून खाली पडली(नशिबाने माझ्या पायावर वगैरे नाही पडली नाहीतर पायच चेचला गेला असता) . त्या धक्याने जे पाणी उडालं ते सगळं आईच्या दिशेनेच. मग काय आईने बाजूला असलेले पाणी प्यायचे भांडे (फुलपात्र) भिरकावले माझ्या दिशेने. मी शिताफीने तो आघात पाठीवर झेलला (वाह काय पण शूर आम्ही). भांडे पाठीवरून बाऊन्स होऊन परत आईसमोर पडले; आईने पटकन घागर सरळ केली. मग काय २-३ वेळा त्या रिबाऊंड झालेल्या फुलपात्राने हाणल्यावर आईने मोर्चा सांडलेल्या पाण्याकडे वळवला. आणि संधी साधून मी तिथून पळून गेलो. आता घागर तिरकी करू नको हे सांगितलेले असूनही आमचा पराक्रम तिला किती त्रासदायक ठरला हे वेगळे सांगायला नको. पाणी कपाटाखाली, ओट्याखाली ठेवलेल्या डब्यांखाली, कांद्याबटाट्याच्या जाळीच्या पिशवीखाली अगदी सगळीकडे गेले. ते ते बाहेर काढून खालचे पाणी पुसून काढावे लागले ती भांडी साफ करायला लागली. त्यामुळे कदाचित त्यावरून ती इतकी का चिडली ते मला आता कळते. आणि ते ही आधी सांगितलेले असताना.
छानच लेख आहे.
वळण लावणे,चुकीच्या सवयींपासून परावृत्त करणे ह्या बद्दल मुलांना मारणे वा शिक्षा करणे हे ब-याच वेळा गरजेचे असते.
परंतु काहि पालक आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे लादताना दिसतात. त्याबद्दल मुलांना शिक्षा करतात ते योग्य वाटत नाही.
लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
अभिज्ञ.
पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख आहे.
अतिशय सुंदर. मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे या लेखामध्ये.
आज लेकाशी संवाद साधताना असं जाणवतं की, (इथे वाढल्यामुळे असेल कदाचित)व्यक्तीस्वातंत्र्याची त्याला फार लवकर जाण आली आहे. त्याला एखादी गोष्ट जेव्हा "तू केलीच पाहिजेस" असं सांगते तेव्हा, "यू आर नॉट माय बॉस" असं ऐकून घ्यावं लागतं. किंबहुना, "आय वील डू इट.. व्हेन एव्हर आय फिल सो.." असंही ऐकवतो. भिती वाटते खूपदा. आवाजही अगदी टिपेला पोहोचतो. कधी कधी थोडासा फटकाही बसतो त्याला.. पण नंतर माझंच मन खात राहतं.
सध्या एक गोष्ट करतेय, त्याने एखादी गोष्ट करायची असेल तर २ वेळा नीट सांगते.. त्यातूनही त्याने दुर्लक्ष केलं तर.. "तुझं तू ठरव, ते ठरवण्या इतका तू मोठा आहेस... इथून पुढे मी काहीही सांगणार नाही, तूही मला विचारू नकोस." असं म्हणून विषय सोडून देते. मात्र नंतर त्याने ती गोष्ट बिनबोभाट केलेली असते.
खूपदा कळत नाही की, मी वागायला चुकतेय की, तो चुकतोय हे मी त्याला समजावून सांगायला कमी पडतेय?? त्याच्या कलाने घेऊन सुद्धा कधी कधी गोष्टी नीट होत नाहीत तेव्हा मात्र पेशन्स संपतो. ..
इतकं मात्र नक्की समजतंय.. की.. माझं पिल्लू मोठं व्हायला लागलंय. :)
या सुंदर लेखाबद्दल आपले अभिनंदन!! :)
लेख मस्त झालाय .
आई वडील हे मुलांवर प्रेम करतात .पण मध्यमवर्गीय आयुष्य जगात असताना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या ताण तणाव हे मुलांवर निघतात .कार्यालयातील बॉस व जग आपल्या मर्जीनुसार चालत नाही .मग माझ्या पोटाच्या गोळ्याने तरी चालावे असे बहुदा त्यांना वाटत असेन .
धकाधकीच्या आयुष्यात मुलांना मारणे हा समस्या निवारणाचा सोपा व राजमार्ग पुष्कळ पालकांना वाटतो . पण एखाद्या समस्येचे मूळ जाणून न घेता म्हणजे उदा मस्ती करणाऱ्या मुलाला जर मार देऊन मस्ती करू नको असे सांगितले तर हळू हळू सरावाने तो मार खाण्यास सराईत होतो .कोडका होतो .(स्वानुभव )
परदेशात लहान मुलाना मारल्यास तेथील सरकार पालकांना समज देते .वेळप्रसंगी जर सरकारी संस्थांना वाटले कि एखादा पाल्य त्यांच्या पालकांकडे सुरक्षित नाही आहे .तर ते त्याला स्वताच्या कस्टडीत घेऊ शकतात .
आपल्याकडे शाररीक व मानसिक घाव पालक जेव्हा मुलांवर घालतात .तेव्हा अतिमारामुळे कितीतरी वेळा अनेक मानसिक विकृती /स्वताविषयी न्यूनगंड / हा पाल्यामध्ये येऊ शकतो .
उदा तोतरे पणा येऊ शकतो
सध्या जेट युगात आधीच पालकांना पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो .त्यात मारामुळे अजून दुरावा नको नात्यात .असे मला वाटते .
''तुम्ही पाल्यासाठी वेळ देऊ शकत नाही .तर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग तरी करावा असे मला वाटते .
सायकोलोजीस्त/ हिप्नोतिस्त / किंवा कौन्सालर असे समाजात अनेक पर्याय आहेत .
मारणे हा विकल्प कधीच असू शकत नाही .
माझ्या आयुष्यात आई वडिलांचा खाल्लेला मार विशेतः पौगुदावस्थेत खाल्लेला मार किंवा नातेवाईक /मित्र /मैत्रिणी ह्यांच्यापुढे झालेले शाब्दिक टोपणे हे त्यावेळी मनात रुतून बसले .
माझ्या बायकोचा तिच्या आई वडिलांशी जेवढे भावनिक गुंतागुंत आहे .तेवढी माझी नक्कीच नाही .
इतका छान लेख वाचायचा राहून गेला होता. फक्त मोठीच मुलं मार खात नाहीत या वाक्यासाठी इतरांशी सहमत. 'मार खाल्ला' हे सांगताना फक्त तक्रारीचा सूर असतो असे नव्हे तर आम्हीपण किती पराक्रमी होतो(घराच्या खरेदीखतावरच्या नोटा कापून व्यापार-व्यापार म्हणून खेळल्यावर कुठले आईबाप पंचारती ओवाळणार आहेत??) हेही सांगणं असतंच. त्यामुळे कुणी मार्गाथेबद्दल लिहितंय म्हणजे तक्रार करत आहे असं मला वाटलं नाही. (तुम्हाला म्हणायचंय असंही माझं म्हणणं नाही) पण या ना त्या कारणाने असा छानसा लेख तुम्ही लिहिलात हे महत्वाचं..
लेख चांगला आहे.
पण मी स्वतः 'मार' या प्रकाराबद्दल संपूर्ण अज्ञानी आहे.
आईच्या नजरेतच इतकी जरब होती/असते, की कुठलाही चावटपणा कधी केलाच गेला नाही.
माराचा कधी प्रश्नच आला नाही.
लिहिलाय गाववाले.
मी स्वतः शेंडेफळ. लाडका ईतका की मी लहान असुनही मोठ्या तिघांना एकाचवेळी मारत असे तरीही मला शिक्षा होत नसे. आई तरी ओरडायची पन मला मारायचा अधिकार वडिलांनी तिलाही दिलेला नव्हता. मी काहीही पराक्रम केला तरिही मला बोट लावायची ताकत माझ्या आई आनी भावंडाकडे नव्हती. मला आठवतय तिथ्पर्यन्त तरी हे खरं आहे.
काही झालेलं असेल तरी वडील घरी आल्यावर आईने त्यांना सांगायचे मग ते मला विचारायचे , मला ते कधीच मारत्/ओरडत नसल्याने मी जे काहि झाले ते न लपवता त्यांना सर्व सांगत असे. त्यांना असे वाटले की मी सर्व खरे सांगितले आहे तर ते मला जो काय खाउ हवा असेल तो लगेच घेउन द्यायचे. तो खाउन झाल्यावर मग रात्री झोपताना ते मला माझी काही चुक असेल तर ती प्रेमाने समजाउन सांगायचे व परत असं करु नकोस असं सुचवायचे.
मला अभिमान वाटतो की त्यांना एकही गोष्ट मला दोनदा सांगावी लागली नाही. ते एवढ्या प्रेमाने मला सांगायचे की मला कधीही त्यांना दु:ख होईल असे वागावे वाटले नाही.
एकदा मी बारावी सायन्सला गॅप घेतला, परीक्षा दिली नाही, त्यांना सांगितलेही नाही. मस्त सुट्टी घालवली आनी निकालाचा दिवस जवळ आला तशी मला भिती वाटु लागली. परिक्षा दिली नाही यापेक्षा त्यांना सांगितले नाही याचीच जास्त भिती वाटत होती. तरी मला त्यांना सांगायची हिम्मत झाली नाही. निकालाच्या दिवशी नगरला गेलो , मित्रांबरोबर फिरलो, आनि रात्री घरी आलो, फार फार अपराधी भावनेने. माझा चेहरा पाहुन मला त्यावेळेस वडीलांनी काहीच विचारले नाही. त्यांना अंदाज आला काहीतरी घोटाळा आहे म्हणुन. मग रात्री सर्व झोपल्यावर मला काही झोप लागेना . मला रडायला यायला लागल्यावर त्यांनी मला सांगितले रडु नकोस काय झाले ते मला सांग. मी रडतच झाला पराक्रम सांगीतला तर ते हसायला लागले मला म्हणाले हे तर मला आधीच माहीत होते. माझ्यावर ते जराही रागावले नाहीत. उलट मला यावेळेस चांगला अभ्यास कर असे सांगीतले. पुढे मी ईंजिनिअरींग पुर्ण केले.
नंतर माझ्या लग्नाचा विषय पुढे आला त्यांनी मला विचारले , मी म्हणालो मला लग्न करायचे नाही. ते म्हनाले ओके, तुला जेंव्हा वाटेल तेंव्हा मला सांग, मी हो म्हणालो. मी परत कधीही त्यांना सांगितले नाही व त्यांनी मला कधीही विचारले नाही.
आईने तर जे तिला शक्य होते ते सर्व ऊपाय करुन पाहिले मी लग्न करावं म्हणुन पण मी तिला दाद दिली नाही.
माझं एका मुलीवर प्रेम होतं हे माझ्या घरी सर्वांना माहित होतं. पण कधीही घरात यावर चर्चा झाली नाही. पुढे त्यामुलीचे घरचे तिचं लग्न जमवायला लागले तेव्हा मला तिने निर्वानीचे विचारले, मी तिला सांगितले कि तु लग्न कर , माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मी तुझ्याशी लग्न करु शकणार नाही. पण मी तुला कधी विसरुही शकणार नाही. तिला ते पटले नाही, मला भरपुर उणेदुणे बोलली. मी ऐकुन घेतले. तिचे लग्न झाले.
दोनचार वर्षांनी ती एकदा माझ्या वडिलांना भेटली, तिने त्यांच्याकडे माझी विचारपुस केली तर हे महाराज तिला आग्रह करुन घरी घेउन आले, म्हनाले तो घरी आहे तर घरी चल आनी त्यालाच विचार. तिचा नाईलाज झाला. ते घरी आले , चहा नाष्टा जेवन झाले. सगळ्यांनी गपा मारल्या आनी मग माझे वडील स्वतः तिला घरी सोडुन आले. नंतर त्यावर कुठलीही चर्चा घरात झाली नाही.
पुढे २००३ ला ते खुप आजारी होते. शेवटच्या टप्प्यावर होते आयुष्याच्या. मला गावी थांबने शक्य नसायचे. मी एकटाच कमवत होतो घरात. मग मी शविवारी रविवारी त्यांना भेटायला जायचो. असंच एकदा मी मुंबईला निघताना मला त्यांनी जवळ बसायला सांगितले. म्हनाले परत कधी येणार? मी -शनीवारी. मग म्हणाले ही आपली शेवटचीच भेट. मला भरुन आले, मि म्हणालो मग मी इथेच थांबतो. ते म्हनाले नको थांबुस. तुला कामाला जायला पाहि़जे. तुला जे माझ्यासाठी करने शक्य होते ते सर्व केले आहेस हे मला माहीत आहे. माझ्या आयुष्याबद्द्ल मि पुर्ण समाधानी आहे. माझी काहीहि तक्रार नाही आयुष्याबद्दल. तु लग्न केलेले नाहीस काहीहि हरकत नाही पण पुढे चालुन जरी कधी तुला लग्न करावे वाटले तर तु ते कर. कशाचाही विचार न करता. नाही वाटले तर करु नकोस. मग माझ्या डोक्यावर हात ठेवुन आशिर्वाद दिला. तोंडावरुन हात फिरवला माझ्याकडे एकदा पाहीले आनी मला निघायला सांगीतले. आई भाउ मला थांब म्हनत होते, मलाही वाटत होते. मग मला ते म्हनाले तु ईथे असल्यावर मला त्रास होईल, त्यापेक्षा तु जा. मग मी निघालो , कामावर आलो. गुरुवारी फोन आला ते गेले. मग गावी जाउन सर्व विधी करुन आलो. दहाव्याला पारंपारीक विधि करताना केशवपन करावे लागते त्याला मी नकार दिला. बाकी घरातले / नातेवाईक नाराज झाले पण मी पर्वा केली नाही.
आगोदर आमच्या गप्पा व्हायच्या तेंव्हा मी एकदा त्यांना या विषयावर विचारले होते. तेंव्हा आमची बरीच चर्चा झाली होती. मग मी त्यांना सरळच सांगीतले की तुमच्यानंतर माझ्यावर ही वेळ येईल तेव्हा मी काय करावे? ते म्हनाले तुला काय वाटते?
मी म्हनालो मी करणार नाही. ते म्हणाले काही फरक पडत नाही. नको करुस. मी केशवपन नाही केले. कुणी काहीही म्हणा.
असे हे माझे वडिल. विशयांतर झाल्याबद्दल माफि असावी. पन मला आठवले ते मी लिहिले. कुठलीहि अतिशयोक्ती मी लिहिली नाही . सर्व काही जसे होते तसेच लिहिले आहे. त्यांनी नेहमी मला स्वःतचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवले. कधीहि रागावले नाहीत , मारले तर कधीही नाही. नेहमी आनी नेहमी प्रेमानेच समजावुन सांगितले त्याचा माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम झाला. मी कधीही त्यांना दुखावले नाही. आज मला त्यांच्या शिकवणीचा खुप उपयोग होतोय आणी होत राहील.
सातबारा तुमचा लेख आवडला , पटला आनी अगदीच रहावले नाही म्हनुन हा प्रतिसाद.
साला विलासरावांचा लेख वाचुन डोळे भरुन आले राव.
" बारकी असली तरी बेरकी असतात" विनायक हे लई भारी लिहिलं आहे. असो, एकुणच लेख खुप छान आहे, पण पोरं ही त्यांच्या जन्मदात्यांपेक्षा एवढी मोठि कधिच होउ शकणार नाहीत कि त्यांना क्षमा करु शकतील त्यापेक्षा असा मार खाण्याबद्द्ल किंवा वळ्ण लावण्याबद्द्ल पोरांच्या मनात राग असेल तो त्यांनी काढुन टाकावा हे निश्चित.
आम्हाला मारण्याचा अधिकार बापाशिवाय अनेक जणांनी हक्कानं बजावला आहे... आईचं काय आठवत नाय..
पण पोरांनाच काय कुणालाही मारण्याआधी सरळ, तिरक्या शब्दात कार्यकारणभाव समजावुन सांगण्यावर विश्वास आहे.. पोरांशीही बहुतेक असेच करेन..
अनुभवावरून सांगतो.. मारमारुन पोर कोडगं होणार असेल तर काय उपयोग आहे त्याचा..
आपल्या शक्तीचे प्रयोग आणि आपला उद्वेग घालवण्यासाठी अनेक मार्ग बाहेर उपलब्ध असतात.. उगाच पोरांना त्रास कशाला..
सहमत आहे ... मी तर त्या वेळी एक बॉक्सिंग किट च विकत घेणार आहे ... पोरासमोर त्या बॉक्सिंग किट ची चांगली तिंबवणुक करणार म्हणजे पोरावर वचक पण राहिल आणि त्याला शारिरीक अपाय होणार नाही ... हे म्हणजे दिपिकाजींसारखे , आपकी पारखी नजर और निरमा सुपर .. दोनो :)
लेख खुपच आवडला. पण,
आपल्या आईवडिलांना क्षमा करा !अजुन इतका मोठा झालेलो नाहीये मी. माझ्या बाबतीत आई वडीलांनी काही चुक केलेलीच नसेल. चुका माझ्या हातुनच झाल्या असतील. त्याबद्दल त्यांनीच मला क्षमा करावी.
शेवटचे ४ वाक्य भिडले हो !!!