मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हा "विजय" कुणाचा?

विकास · · काथ्याकूट
आज महात्मा गांधींच्या आठवणी असलेल्या काही वस्तू भारताला परत एकदा मिळाल्या. याचा आनंद झाला आणि तसा होण्याची कारणे अशी:
  1. ऐतिहासीक व्यक्तींच्या वस्तु या त्या त्या राष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा ठेवा आहे. गांधीजींच्या वस्तू या नक्कीच भारतासाठी ठेवा आहेत त्यामुळे त्या भारतात संग्राह्य म्हणून राहणे महत्वाचे वाटते.
  2. एका भारतीय उद्योगपतीने, "विजय मल्या" ने $1.8 million ला ते विकत घेतले.
अर्थात आता कलगीतुरा चालू झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या अंबिका सोनी म्हणाल्या ते आमच्यामुळेच झाले आणि आम्ही सतत त्याच्या (मल्यांच्या प्रतिनिधीच्या) संपर्कात होतो आणि हे "ठरवून" घडवून आणले. अर्थात विजय मल्याने ताबडतोब हे विधान खोडत सांगितले की सरकार (सरकार पक्ष) कडून कोणीही कधीही संपर्क केला नाही आणि त्यांनी हे स्वतःच्या मनाने केले... आता काही प्रश्न मनात आले:
  • गांधीजींच्या या वस्तू सर्वप्रथम भारताच्या बाहेर गेल्याच कशा? गांधींजींच्या वस्तू हे ते गेल्यावर वास्तवीक तत्कालीन सरकार जे अर्थातच गांधीजींचे भक्त होते त्यांच्या अथवा गांधींजींच्या आश्रमात असायला हव्या होत्या. अर्थात कुठल्याही गांधीजींच्या चेल्याच्या/भक्ताच्या ताब्यात असायला हव्या होत्या.
  • गांधीजींच्या गांधीवादात धंदा, जीवन, राहणीमान यांच्या संदर्भात साधनशुचितेला महत्व आहे. तसे असणारे प्रामाणिक गांधीवादी आजही नक्कीच भारतात असतील, जरी ते प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी. मात्र त्यांना ह्या वस्तु लिलावात विकत घेणे शक्य झाले नाही. तसेच ते गांधीवादी उद्योग घराणे असलेल्या बिर्लासमुहास पण जमले नाही अथवा तसे करावेसे त्यांना वाटले नाही. विजय मल्या नक्कीच गांधीवादी नसावेत. त्यांच्या धंद्यातील साधनशुचिता नक्की कशी आहे ते माहीत नाही. शिवाय त्यांचे उत्पादन गांधीजयंतीस बर्‍याच ठिकाणी साधे विकता देखील येत नाही, त्या दिवशी लोकांनी वापरू देखील नाही अशी अपेक्षा असते. पण अशा विजय मल्यांनी हा लिलाव जिंकून आपला मान परत घरी आणला.
मग मला सांगा हा विजय नक्की कुणाचा?
  1. ज्या गांधीवाद्यांनी ह्या वस्तू देशाबाहेर जायला मदत केली त्यांचा आणि त्यांच्यामुळे आज ज्या परदेशी नागरीकाला $1.8 million मिळाले त्याचा?
  2. ज्या काँग्रेसने आता एका अर्थी गांधीजींच्या संदर्भातील यश स्वत:च्या पदरात खेचून घेत आहे असे असत्य सांगत गांधीवादातील मूळ तत्वालाच धाब्यावर बसवले त्यांचा?
  3. विजय मल्यांचा, ज्यांनी त्यांचा उद्योग, हा उद्योगातील नितीनियम लक्षात घेऊनच चालवला आणि त्यातील यशाचा उपयोग हा परत एका अर्थी ऐनवेळेस धावून देशाला मदत करायला केला त्यांचा? ("एका अर्थी" अशासाठी म्हणले कारण त्यांना यात प्रसिद्धी मिळणार त्याचा ते फायदा घेतीलच. म्हणजे १००% निस्वार्थी नाही, जरी कौतुकास्पद असले तरी)
  4. का गांधीजी आणि गांधीवादाचा? कारण आज ६० वर्षांनी देखील भारतातील जनतेस त्यांचे कसे का असेना पडले होते आणि त्यातील एकाने परत त्यांच्या आठवणी घरी आणल्या.
ह्याचे उत्तर वास्तवीक "कृष्णधवल" नजरेतून पहाता येणार नाही. त्यात अनेक छटा असून शकतात... तुम्हाला काय वाटते?

वाचने 4545 वाचनखूण प्रतिक्रिया 17

सूहास Fri, 03/06/2009 - 20:47
१)त्याचा केवळ एकच ध॑दा नाही,विमान क॑पनीही आहे,ही बाजु ही बघायला हवी २)आता ते जे $1.8 million भारतीय नागरी॑का॑चेच आहेत,असेही मी म्हणु शकतो. विजयाकडे केवळ विजय म्हणुनही बघता येईल..बाकी विजय मल्ल्या काय आणी आणखी कोणी काय्..शेवटी तो भारतीयच ना !! आणी काँग्रेस पक्ष काय आणी तत्कालीन सरकार काय ? वस्तु परत आल्या ह्याचा आ॑नद..बाकी काय सुहास.. आता मी "अजुन"काय करू ?

सुक्या Sat, 03/07/2009 - 00:07
>>काँग्रेस पक्षाच्या अंबिका सोनी म्हणाल्या ते आमच्यामुळेच झाले लाज कोळुन पिणार्‍यांकडुन अजुन काय अपेक्षा असाव्यात. ह्यांना जर इतकी चिंता होती त्या वस्तु भारतात आणायची तर जमवायचा होता निधी. काँग्रेसच्या मंत्र्या/संत्र्याकडे काय कमी पैसा आहे काय. दुसर्‍याच्या जिवावर पोट भरायची यांची खोड आहे, ती काय अशी सहजासहजी जाणार आहे? बाकी ह्या वस्तु भारतात आल्या याचे काही सुखदु:ख नाही. तोच पैसा काही विधायक कार्यात वापरला गेला असता तर अजुन बरे झाले असते. बाकी पैसा माल्यांचा, त्यांनी खर्च केला .. आपण बोलनारे कोण? सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

रेवती Sat, 03/07/2009 - 00:20
अश्या व्यवहारांनध्ये विजय असा कोणाचाच नसतो. वाईट किंवा अतिवाईट यांच्यात काय निवडणार? फारतर असं म्हणता येइल की फायदा कुणाचा झाला? तर विजयसाहेबांचा झाला. करून सवरून शहाणे असतात लोक.... तसे. आत्ता पैसे असल्यामुळे म्हणा, ते काम करणे शक्य असल्यामुळे म्हणा किंवा महान कामामुळे प्रतिमा आधी व व्यापार थोडा नंतर उजळून निघणार असेल तर का पोळी भाजून घेऊ नये? असा प्रकार वाटतोय मला तरी! रेवती

अनामिका Sat, 03/07/2009 - 02:15
ज्या बापुंनी कायम दारुबंदीचा आग्रह धरला त्या बापुंच्या वस्तु विजय माल्या सारख्या दारुसम्राटाने परत मिळवल्या :( ...........याला काय म्हणावे :?. :? ............बापुंच्या वस्तु आधी देशाबाहेर गेल्याच कश्या?आणि जर गेल्याच तर गांधीवादाचे फुका गोडवे गाणार्‍या काँग्रेसला त्या परत मिळवणे का जमु नये?....................स्वतःच्या तुंबड्या भरुन गलेलठ्ठ झालेले काँग्रेसचे नेते इतके निर्धन (भिकरी असे वाचावे)असतिल असे वाट्ले नव्हते. असो बाकी ह्या वस्तु भारतात आल्या याचे काही सुखदु:ख नाही. तोच पैसा काही विधायक कार्यात वापरला गेला असता तर अजुन बरे झाले असते. बाकी पैसा माल्यांचा, त्यांनी खर्च केला .. आपण बोलनारे कोण? हे मात्र अगदी बरोबर्.............. अवांतर-.आता माल्या शिवरायांच्या वस्तु देखिल परत मिळवणार आहेत म्हणे? तो सोनियाचा दिवस उजाडण्याची वाट बघण्यातच हयात जायची बहुदा!!!!!!!!!!! "अनामिका"

मृदुला Sat, 03/07/2009 - 02:58
विजय मल्ल्यांचाच! :-) प्रसिद्धीपरी प्रसिद्धी आणि गुंतवणुकीपरी गुंतवणूक.

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहज Sat, 03/07/2009 - 15:13
+१ गांधीवाद्यांची गोची होणार काय? १) गांधीजींच्या वस्तु दारुनिर्मीती करणार्‍या माणसाने घेतल्या, चालते का गांधीवादात? २) बर परत आपल्या ताब्यात घ्यायच्या तर इतकी रक्कम खर्च होणे गांधीजींना आवडले असते का? चालते का गांधीवादात? पुढे मागे उद्योगपतीसाहेबांना १) सरकारकडून जर काही फायदा मिळू शकला नाही तर वेळ आलीय माझ्यावर म्हणुन परत त्या वस्तु विकायला काढायचा पर्याय समोर असेल व विनाकारण लोकांच्या भावना वर खाली. २) किंवा उद्या सरकारला हे जादा भावाने विकत देउन अजुन फायदा. सध्या तरी फायदा फक्त मल्या यांचाच.

विसोबा खेचर Sat, 03/07/2009 - 09:45
बघा! बापूंच्या वस्तू भारतात परत आणायला शेवटी आमचा दारुवालाच उपयोगी पडला..! पण आम्ही उलट्या काळजाचे. दोन ऑक्टोबरला ड्राय डे पाळतो. साला अजब न्याय आहे जगाचा..! असो... रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम..! आपला, (किंगफिशर प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुचेल तसं Sat, 03/07/2009 - 09:55
>>पण आम्ही उलट्या काळजाचे. दोन ऑक्टोबरला ड्राय डे पाळतो. साला अजब न्याय आहे जगाचा..! वा तात्या!!! पटलं... >>(किंगफिशर प्रेमी) तात्या. किंगफिशर (बिअर आणि कॅलेंडर :)) प्रेमी, सुचेल तसं Finally I will be so matured that I will react to nothing.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम_गटणे™ Sat, 03/07/2009 - 11:52
तात्या, तुमचेच काय सगळ्या दारुप्रेमींचा हातभार आहे, ह्या वस्तु आणायला. तुम्हीच खरे बापु भक्त गांधीवादी बाकीचे नुसते बोलबच्चन :) ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

In reply to by सखाराम_गटणे™

विकास Sat, 03/07/2009 - 19:05
तात्या, तुमचेच काय सगळ्या दारुप्रेमींचा हातभार आहे, ह्या वस्तु आणायला. हे एकदम मस्त! जनतेची संपत्ती, जनतेच्या संपत्तीचा उपयोग करून जनतेच्या "खर्‍याखुर्‍या प्रतिनिधीने" परत आणली! ;)

In reply to by विकास

chipatakhdumdum Sun, 03/08/2009 - 15:04
म्हन्जे काय ? आमी सात पन्चेचालीस चा टायम चूकवत नाय, तो उगाच काय ? पैल्या गलसाच्या भाएर चार ठेम्ब टाकतो, तेवडा तरी आमचा टेकू हाये ना..?

देवदत्त Sat, 03/07/2009 - 11:44
हा नक्की विजय आहे का? काँग्रेसला (आणि सर्वच मोठ्या राजकीय पक्षांना) सवयच झाली आहे झाले त्याचे श्रेय लाटण्याचे. देशाची ज्या गोष्टींत वाट लावली त्याचेही श्रेय जाहीरपणे घेउन टाका, मग सुटतील सगळे. ज्या गांधीवाद्यांनी ह्या वस्तू देशाबाहेर जायला मदत केली त्यांचा आणि त्यांच्यामुळे आज ज्या परदेशी नागरीकाला $1.8 million मिळाले त्याचा? इथे दिलेल्या बातमीनुसार गांधीजींनीच त्या वस्तू प्रेरणा म्हणून दिल्या होत्या. ज्या काँग्रेसने आता एका अर्थी गांधीजींच्या संदर्भातील यश स्वत:च्या पदरात खेचून घेत आहे असे असत्य सांगत गांधीवादातील मूळ तत्वालाच धाब्यावर बसवले त्यांचा? मुळात गांधीजींनी सांगितले होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करा. त्यांच्या ह्या तत्वालाही धाब्यावर बसविले त्यापुढे इतर काय? विजय मल्यांचा, ज्यांनी त्यांचा उद्योग, हा उद्योगातील नितीनियम लक्षात घेऊनच चालवला आणि त्यातील यशाचा उपयोग हा परत एका अर्थी ऐनवेळेस धावून देशाला मदत करायला केला त्यांचा? ("एका अर्थी" अशासाठी म्हणले कारण त्यांना यात प्रसिद्धी मिळणार त्याचा ते फायदा घेतीलच. म्हणजे १००% निस्वार्थी नाही, जरी कौतुकास्पद असले तरी) माझे सध्या काही मत नाही. का गांधीजी आणि गांधीवादाचा? कारण आज ६० वर्षांनी देखील भारतातील जनतेस त्यांचे कसे का असेना पडले होते आणि त्यातील एकाने परत त्यांच्या आठवणी घरी आणल्या. गांधींचा विजय वाटत नाही. त्यांच्या नावाचा उपयोग फक्त फायदा करून घेण्याकरीताच होत असेल तर नक्कीच नाही. गांधी जयंतीलाच जर दारू बंदी असूनही त्याची सर्रास विक्री आणि सेवन चालू असेल तर मग गांधीजी आणि गांधीवादाचाही विजय वाटत नाही.

कपिल काळे Sat, 03/07/2009 - 19:59
ह्या वस्तू सावरकरांच्या असत्या तर इतकी मेहनत कोणी घेतली असती का? त्यांच्या वस्तूंचा लिलाव हा सरकारने गंभीरपणे घेतला असता का?

हेरंब Sat, 03/07/2009 - 22:39
या देशातल्या लोकांना गांघींच्या वस्तु परत आणण्यासाठी जिवाला घोर लागतो. हा शुध्द ढोंगीपणा झाला. गांघींचे आचरण , त्यांची तत्वे या सगळ्यांना तुम्ही कधीच सोडचिठ्ठी दिलीत. आणि आता त्यांच्या वस्तु परत आणण्याची नाटके करताय ? (ढोंगावर प्रहार करणारा) हेरंब