मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

!! एक स्वप्नपूर्ती !! झिरो बजेट नैसर्गिक शेती

अजित पाटील · · कृषी
तिन वर्षापूर्वी शेतीमध्ये नवीन काहीतरी सुरू करायच्या उद्देशाने शोध घ्यायला सुरुवात केली. इंटरनेट वर बरीच काही नवीन प्रोजेक्ट्स उपल्बध होते त्याचा अभ्यास सूरु झाला पण कोणाचा प्रोजेक्ट सध्याच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीला अनकुल असा मला तरी वाटत नव्हता, कारण आपला शेतकरी बांधव कर्जाच्या अजगराच्या विळख्यात अडकला आहे तो जितका त्यातून सुटण्याचा प्रयन्त करेल तितका जास्त त्याच्या घट्ट अश्या विळख्यात अडकत आहे असे मला वाटते पण याला काहीतरी उत्तर असेल का म्हणून माझी शोध माहीम सुरूच ठेवाली. एक दिवस इंटरनेट वर शून्य खर्चाची नैसर्गिक शेती बदल माहिती मिळाली . पहिल्यादा वाचल्यावर थोडे मनाला पटलेच नाहीं करण आपण एकीकडे शेतकरी आत्महत्या बदल दररोज मीडिया न्यूज पेपर इंटरनेट वर वाचतो, की शेती खर्चिक असल्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मला सुरवातीला हे थोडे जादूच्या गोष्टी सारखे वाटले. कारण जो तो नवीन काहीं शोधून शेतकरायला लुबाडण्याचे षड्यंत्रत विकत होते. अमुक एक आमच्या कढून विकत घ्या आणि भरगोस फायदा मिळवावा जो की शेतकऱ्याला कधीच मिळाला नाहीं, पण या सर्वाचे मात्र भरगोस फायदा झाला असो.... उचुकता म्हणून वाचन सुरू केले आणि आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजीनि शोधलेल्या या अनोख्या आशा शेती प्रणाली वाचून भारावून गेलो. पण पुस्तकात शेती ही नेहमी सोपी वाटते प्रत्यक्षात कुठे आणि हे सर्व कसे समजेल याचा शोध सुरु झाला. एक दिवस असेच माझा मित्र विनोद पाटील शी बोलताना त्याने त्याचा मित्र संतोष याच्याबद्दल माहिती दिली जो काही दिवसांपासून याचा अभ्यास आणि अवलंब सुरू केला आहे . मग काय लगेच फोन करून मी , विनोद पाटील आणि विजय भेटायला गेलो. आमची चर्चा सुरू झाली संतोष ने प्रथम त्याचा या प्रवासाबद्दल माहिती दिली आणि नंतर या शेती प्रणालीबद्धल माहिती द्यायला सुरुवात केली आम्ही सर्व काही ऐकत होतो एक एक गोष्टी जादू सारखी वाटत होती. संतोष भारावून सर्व काही सांगत होता आम्ही मध्ये मध्ये आमचे प्रश्न विचारत होतो व संतोष त्याला योग्य ते उत्तर देत होता . 2 ते 3 तास कसे गेले समजलेच नाही संतोष ने आम्हाला त्याच्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये सामील करून घेतले व युट्युब (Youtube) वरील मिलिंद काळे यांनी रेकॉर्ड केलेली गुरुजीच्या शिबिराच्या विडिओ चा लिंक दिल्या . हे विडिओ म्हणजे जणू अल्लीबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडावा आणि आतील हिरे माणिक दिसावे असे झाले . मग काय वेळ मिळेल तसे विडिओ बघायला सुरवात झाली. मी शेतीमध्ये खुप काही काम केले नसल्यामुळे समजायला थोडे अवघड जात होते पण गुरुजी एक एक मुद्दे पूर्ण मुद्देशीर समजवत होते.ऑफिस मध्ये मी आणि सत्यजित आणि विश्वचेतन चहाच्या सुटीत आम्हाला न समजलेल्या गोष्टी बदल बोलू लागलो संतोष ला कॉल करू लागलो ग्रुप मध्ये विचारू लागलो ग्रुप मध्ये केशव जी आम्हाला मार्गदर्शन करू लागले आणि आमचा प्रवास सुरु झाला.

इथे पर्यंत सर्व काही सुरळीत सूर होते पुढील लढाई अवघड होती ज्याची कल्पना संतोष ने आधीच दिली होती, की आपल्या घरच्यांना हे सर्व समजून सांगणे आणि शेती मध्ये अवलंब करणे. पण जेव्हा तुमचो इच्छा शक्ती असते तेव्हा मार्ग मिळतो. लॅपटॉप वर सर्व विडिओ डाउनलोड केली आणि गावी गेल्यावर आमचे मोठे बंधू आनंद पाटील याला ते दाखवू लागलो. त्याचा शेती माधील अनुभव खुप आहे तो खुपच पद्धशिर रित्या शेती करतो पण रासायनिक तो गुंठ्याचा अडीच ते 3 टन उसाचे उत्पन्न घेतो. त्याला त्याबद्दल बक्षीसीज पण मिळाले आहे. गावातील आणि भागातील बरीच शेतकरी त्याचा शेतीसाठी मार्गदर्शन घेतात . त्याला माझ्या सारख्या सॉफ्टवेअर मध्ये काम करण्याने ज्याला शेती मध्ये कधीच आवड नव्हती त्याने शेती बदल सांगणे खुपच अवघड गोष्ट होती. प्रत्येक वेळी थोडे थोडे विडिओ दाखवू लागलो त्याचें प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयन्त करत होतो काही उत्तरे आमच्या ग्रुप मधून संतोष केशव देत होते. भाऊ मला बरेच उदाहरणे देत होता की अश्या सारख्या पद्धती कश्या गावातील लोकांनी अवलंबून त्याचा तोटा झाला आहे . आपल्या समाजात चांगली गोष्ट प्रसार व्हायला वेळ लागतो पण अपयशाची गोष्ट लवकर प्रसार होती . मी त्याला विचारले कि ज्याचा तोटा झाला त्याने सर्व पद्धतीचा अवलंब योग्य पद्धतीने केला होता का ? ही वरील लढाई सुरू असताण मी माझ्या फ्लॅट मधील गच्चीवर माझे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला माझ्या मंडळींना तयार करणे अवघड होते तिला तशी आवड होती पण फुलाच्या बागेची पण मी त्याला विरोध केला होता करण ती झाडे फार काळ टिकत न्हवती. मग तिनेच आणलेल्या कडीपत्याच्या बियापासून सुरवात केली कारण दररोज नेहमी फोडणी देताना त्याची आवर्जुन आठवण यायची कारण तो एक तर सुकलेला असायच किंवा नसायचा. गावाकडून माती आणली होती बिया टाकल्या या अनोख्या प्रोयोगाची सुरवात झाली. आता जीवामृत कोठून कसे आणायचे हा मोठा प्रश्न होता पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा निसर्ग तुम्हाला आवश्यक गोष्टी चा पुरवठा करू लागतो. माझे सायकलिंग नुसतेच सुरू झाले होते आणि आम्ही घोरवडेश्वर ला जायला सुरवात केली होती तिथे तेथील एक रहिवाशी दररोज त्याच्या देशी गायी डोंगरावर चरायला सोडत होते. त्याची ओळख करून त्याच्या कडून शेन आणि गोमूत्र मिळाले ते घेऊन पहिल्यादा फ्लॅट मध्ये जिवामुर्त तयार झाले मला शेणाच्या वासाची सवय हाती पण सौ ना थोडा त्रास झाला. आमचा कडीपत्ता चे रोप तयार होते वांगी टॅमोटो भेंडी लावली होती सर्वाना जीवामृत दिले आणि काहीच दिवसात आम्हाला या पद्धतीची प्रचीती यायला सुरुवात झाली मुलांना पण खुप आनंद होत होता घरी असे काहीतरी पाहायला मिळत होते.

पहिली परीक्षा पास झालो होतो पुढील लढाई अवघड होती मागील वर्षी योगायोगाने एक 4 ते 5 गुंठाचा प्लॉट रिकामा होता संधी चालून आली होती मी भावाला बोललो आपण या प्लॉट मध्ये zbnf ने ऊस आणि भाजीपाला घेऊ. मी त्याला विचारले तुझा या शेतात रासायनिक शेतीत किती ऊस निघेल तो बोलला 5 ते 6 टन मी बोललो जर हा प्रयोग जर काही कारणामुळे यशस्वी झाला नाही तर मी त्याचे पैसे देईन कारण माझ्या मनात विश्वास होता कि आपला हा प्रयन्त यशस्वी होणार. मग काय झाली ना या अनोख्या अशा प्रवासाची सुरवात, सुरवातीला बऱ्याच अडचणी होत्या कारण कुंडीमध्ये झाडे लावने आणि मोठया शेतीमध्ये हा प्रोयोग करणे खुपच फरक होता आणि प्रथम ही पद्धत अवलंब होत होता त्यामुळे नेमके कसे आणि कधी हे प्रश्न होतेच. परंतु केशव आणि संतोष आणि इतर ग्रुप मेंबर्स चे अनुभव आणि मार्गदर्शन सुरूच होते एक एक गोष्टी स्वप्नासारखे घडत होत्या. सुरवातीला एक आश्चर्याचा धक्काच बसला माझ्या वर्ग मित्र मानशिंग कडे गावी घनामृत मिळाले त्याला प्रदशनात गुरुजींची पुस्तके मिळाली होती ती वाचून त्याचा प्रयत्न सुरू होता गोमूत्र पण त्याने गोळा करून ठेवले होते त्यामुळे जिवामुर्त चा प्रश्न सुटला होता.

जे काही उपलब्ध आहे आणि जसे जमेल तसे सुरवात झाली आढकळत सावरत प्रवास सुरु झाला आई बाबाची मदतीला आले. 7*2 उसाचे मॉडेल ठरले आणि मध्ये भाजीपाला घायचा ठरला . थोड्याच दिवसात आमचा प्लॉट सुंदर असे रूप घ्यायला लागला हे पाहून मनात आनंद होत होता पण हि नुसती सुरवात झाली होती. प्रथमच नैसर्गिक भाजी मिळणार होती, कधी नाही इतके भाजीचे उत्पादन झाले होतं 16 ते 18 प्रकारची भाजीपाला इतक्या छोट्या शेतातून मिळत होता हे सर्व करताना कष्ट तर होते कारण भाजीपाला नियोजन काढणी इत्यादी सुरू होतेच परंतु बाजारातून भाजी विकत आणणे पूर्ण बंद झाले होते. आता गुरुजींच्या शून्य खर्च च्या नैसर्गिग शेतीची प्रचिती येत होती.

भाजीपाला चांगला आला होता पण ऊस काही वाढ होत नव्हती बरोबरची रासायनिक उसाची वाढ झपाट्याने होत होती, त्यामुळे भावाकडून टोमणे मिळत होते मग केशव जी ना विचारणा केली त्यांनी सांगितले सुरवातीला यामध्ये उंची कमी वाढते करण मुळाची वाढ जास्त होते मग थोडे हायसे वाटले.

 

11 महिन्यांनी उसाची उंची चांगली वाढली त्यामुळे भाजीपाला बंद झाला. पुढील अव्वान होते ते चांगले गुळाळ शोधणे जो नैसर्गिक पद्धतेने गुळ तयार करेल जसे वरती बोललो तसे गावापासून जवळच गुळाळ असलेले समजले आणि आनंदाला पारावार उरला नाही. मग ठरले गुळ बनवायचा आव्हाने तर भरपूर होते ऊस तोडणे, घेऊन जाणे पण भावाने हे आव्हान खुबीने पेलून 20 जानेवारी 2018 शनिवार रात्री 11 वाजता ऊस गुळाळावर घेऊन गेला. दुपारी आईचा फोन आला पुण्यात भरपूर कामे होती पण सर्व बाजूला ठेऊन रात्रीच्या बस ने कोल्हापूर ला रवाना झालो आणि रविवारी सकाळी घरी पहाटे 5 वाजता हजर झालो.. दुपारी आमचा नंबर होता थोडी झोप घेऊन शेतात जाऊन आलो मग गुळाळावर जाऊन आलो. 3 वर्षाच्या प्रतिक्षेचे आज प्रत्येक्षात घडणार होते दुपारी 2 ला सगळे साहित्ये घेईन परत गेलो आणि सुरू झाली ती लागभग उसाचे वजन झाले 2750 किलो ऊस झाला थोडा ऊस 2 घाण्याला कमी पडत होता एकाला जास्त होता भाऊने गुळाळाच्या मालकाशी विचार करून 2 घाणे घ्यायचे ठरवले एक 1350 आणि एक 1400 किलो. शेतातून भेंडीची झाडे आणली होती ऊस फोडणी सूर झाली रस गोळा होऊ लागला होता आनंदाला पारावार च नव्हता सर्व गोष्टी डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये बंद करण्याचे सुरू होते रस कायली मध्ये आला आणि उखळू लागला चुना आणि भेंडी टाकली तशी उसाची मळी वरती येऊ लागली गुळवे काका आपले काम खुबीने सुरू होते मध्ये मध्ये रस उखळी देऊन रसाची अवस्था तपासून पाहत होते आणि टेस्ट करून सर्वाना इशारा देण्यासाठी तयार होते. जशी युद्धाला सैनिक नायकाचा इशाऱ्याची वाट पाहत असतात तशी सर्व जण आपापली आयुधे घेऊन तयार होती. इशारा झाला उखळती कायली रोलर वर उचलून वाफ्यामध्ये रस ओतला आणि कायली मागे सरकली, तसे सगळी मंडळी रस फवाड्याने घोटण्यामध्ये गुंग होती कोणी इकडे कुणी तिकडे रस ढकलत होते आणि गूळ भरायची सुरवात झाली काही मिनिटातच सर्व ऊस 1 किलो च्या भांड्यानमध्ये भरून झाला 161 किलो गूळ तयार झाला होता सर्व काही होत होते त्यावर विश्वास बसत न्हवता पण हो स्वप्न पूर्ण झाले होतं सर्वांच्या कष्टाचं चीज झाले होते दुसर्या घाण्यातून 187 किलो असा ऐकून 348 किलो गूळ तयार झाला होता.

 

 

या प्रवासमध्ये खुप काही शिकायला मिळाले सुरवात होती त्यामुळे चुका ही झाल्या त्या येत्या प्रवासात सुधारण्याचा प्रयत्न करेन माझे यामध्ये फारच कमी सहभाग होता माझा भाऊ आनंद पाटील आई बाबा वहिनी भावाची मुले यांचे कष्ट या मागे होत तसेच माझी बायको आणि मुले आणि या माझा वेडा ला समजून घेतले आणि साथ वेळ दिला. मी प्रथम आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजींचे आभार मानतो ज्यांनी सुंदर अशी शेती पद्धती शेतकऱ्यांना शोधून दिली आहे मला वाटते हीच पद्धत शेतकऱ्याला या आत्महत्येच्या अजगराच्या विळख्यातून सुटका करू शकेल तसेच संतोष केशशवजी याच्या अमूल्य अश्या मार्गदर्शन आणि कौतुकबद्दल मनपूर्वक आभार मानतो मिलिंद काळे यांचे खुप खुप आभार ज्यांनी zbnf ची विडिओ इंटरनेट वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत सत्येजीत पाटील आणि विश्वाचेतन याची या प्रवासमधील मोलाची साथ मिळाली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार तसेच प्रत्येक्ष वा अप्रत्येक्ष ज्यांनी या प्रवासात मदत कौतुक आणि साथ दिली त्याचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानून माझ्या या स्वप्न प्रवासाचे लेखन पूर्ण करतो

अजून खुप मोठा प्रवास आहे ही नुसती सुरवात आहे!! !! एक पाऊल पुढे !! अजित पाटील पोखले For more information about zbnf Please visit http://www.palekarzerobudgetspiritualfarming.org/zbnf.aspx

वाचने 221595 वाचनखूण प्रतिक्रिया 112

चामुंडराय Sun, 02/18/2018 - 04:26
खूपच छान आणि स्पृहणिय उपक्रम. तुम्हाला उत्तरोत्तर असेच यश लाभो हि जगन्नियंत्याकडे प्रार्थना. एक प्रश्न : शेण किंवा गो मूत्राची उपलब्धता नसल्याने कुंडीतील रोपांना फक्त साखर पाणी दिले तर फायदा होईल का?

In reply to by चामुंडराय

काजुकतली Sun, 02/18/2018 - 13:27
कुठली माती वापरताय? जर आजूबाजूच्या टेकडीवरची माती उचलून आणली असेल तर निश्चित फायदा होईल. त्या मातीत सूक्ष्म जीवजंतू असणार, जे साखरेतून मिळालेला कार्बन खाऊन मातीतली सुक्ष्मद्रव्ये मुळांनी शोषण्यायोग्य करतील. आजूबाजूला पडलेल्या सुक्या पानांचा वापर कुंडीत करा. मुळाभोवती पाने गच्च पसरून ठेवा. कुंडीत ओलावा राहील, व पाने कुजून ह्युमस तयार होईल, त्याच्यातून सूक्ष्मद्रव्ये मातीत मिसळतील.

In reply to by चामुंडराय

टर्मीनेटर Sun, 02/18/2018 - 23:20
अनुभव नाही, पण वाचलेल्या माहितीनुसार साखर पाणी देण्यापेक्षा जर काकवी पाण्यात मिसळून दिली तर नक्की फायदा होतो. अर्थात हा प्रयोग लवकरच करून बघणार आहे. निष्कर्ष काळवीनच.

सुधीर कांदळकर Sun, 02/25/2018 - 07:10
प्रत्येक प्राण्याचा इन्टेस्टीनल फ्लोरा वेगळा असतो की नाही हे ठाऊक नाही. परंतु प्राण्याचा आहार वेगळा असेल तर तो वेगळा असण्यची दाट शक्यता आहे असा तर्क निघू शकतो. विदेशी गायीला आपल्या हवेत ती आजारी पडल्यामुळे बरीच औषधे द्यावी लागत असतील तर काही विशिष्ट औषधामुळे इन्टेस्टीनल फ्लोरा वेगळा असू शकतो. जर वेगळा असेल तर तिच्या मलमूत्राच्या शेती उपयोगाचा वेगळा प्रयोग करावा लागेल असे वाटते. पाळेकर विदेशी गायीला गाय न म्हणता गायीसारखा प्राणी म्हणतात. त्यांच्या लिखाणात जीवामृत फक्त सव्य गतीने ढवळावे उलट दिशेने ढवळू नये अशा काही वरकरणी अशास्त्रीय वटणार्‍या गोष्टी आहेत. जे आपल्या तर्काला आणि पायाभूत विज्ञानाला पटत नाही तेवढे टाळून जे चांगले तेवढे घ्यावे. आज विज्ञानाची कास धरणारे जेवढे लोक आहेत त्यापेक्षा धर्माची कास धरणारे लोक जास्त आहेत. त्यमुळे पाळेकरांनी विज्ञानाला तत्त्वज्ञानाची डूब दिली हे बरेच झाले. जे शास्त्रज्ञाने सांगितले ते एक वेळ पटणार नाही पण पुजार्‍याने, वैदूने वा मांत्रिकाने सांगितले तर लोक नक्की ऐकतात असाच आपला समाज आहे. तेव्हा पाळेकरांचे तत्त्वज्ञान जरी बुद्धीजीवींना पटले नाही तरी सर्वसामान्यांना नक्कीच पसंत पडेल. जमीन पहेलवान कशी बनवावी, पिकांचे पोषणशास्त्र, पिकांचे सहजीवनशास्त्र इ. पुस्तकांतून पाळेकरांनी पिकांसाठी उपयुक्त अशा विविध जीवजंतूंची, आणि त्या जीवजंतूंच्या उपयुक्त कार्याची शास्त्रीय माहिती दिलेली आहे. केवळ काही मोजक्या अशास्त्रीय गोष्टींमुळे संपूर्ण झीबनैशे कुचकामी ठरवणे धोक्याचे आहे. असो. एक सुरेख माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

पिलीयन रायडर Sat, 03/10/2018 - 14:31
फारच उत्तम धागा आणि चर्चा! ह्याचा उपयोग घरात कुंड्यांमध्ये काही लावून करता येतो का ते नक्कीच बघेन. एक अवांतर प्रश्न - अशा शेतीत पिकलेला भाजीपाला पुण्यात कुठे मिळतो का? तसंच देशी गायीच्या दुधाचे तूप कुठे मिळते का?

बऱ्याच लोकांना हे ठाऊक नाही की पाळेकर ज्या गोष्टी सांगत आहेत त्या श्रीपाद दाभोलकरांनी खूप आधीच सांगितल्या आहेत. खूप जणांना दाभोलकर आणि प्रयोग परिवार माहीत नाही. फरक इतकाच की दाभोलकर हे मुळातच हाडाचे वैज्ञानिक असल्याने त्यांनी त्यांचे देव्हारे माजू दिले नाहीत. दाभोलरांनी अमृतजल विकसित केले. यालाच पालेकर जीवामृत म्हणतात. दाभोलकरांनी अमृतमृदा विकसित केली. यालाच पाळेकर घनजीवामृत म्हणतात. बीजसंस्कार सुद्धा दाभोलकरांचेच देणं आहे. natuecho मध्ये दाभोलकरांनी वर्मीकंपोस्ट ला विरोध केलेला आहे. भारतीय गायीला दाभोलकरांनी महत्त्व दिलेले आहे. दाभोलकरांनी पोस्टकार्ड्स पाठवून प्रयोग परिवाराचे नेटवर्क उभं केलं होतं. असं जाळं natuecho चा अविभाज्य भाग आहे. पाळेकर दाभोलकरांचे नाव घेत नाहीत हे पाहून खूप आश्चर्य वाटलं.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विशुमित Tue, 03/20/2018 - 15:17
हे जर खरे असेल तर, उचलेगिरी करून आणि ज्याला त्याचे क्रेडिट मिळाले पाहिजे, त्यांचा नामोउल्लेख टाळणे म्हणजे रोचक आहे सगळे.

In reply to by विशुमित

तासगाव आणि आसपासच्या दुष्काळी भागात दाभोलकरांची तत्वं वापरून खूप शेतकरी संपन्न झाले. तरीही दाभोलकरांनी पायाला हात लावणाऱ्या रोखून शेतकऱ्यांना शेतकरीच राहू दिलं. त्याचा भक्त केला नाही. सतत प्रयोग करत राहिले. सतत.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

पिंगू Fri, 03/23/2018 - 16:00
दाभोळकरांचे प्रयोग मुख्यत्वे द्राक्षशेतीसाठी गाजले. त्यांच्या द्राक्षशेतीच्या प्रयोगांबद्दल बरेच काही पेपरमध्ये आले होते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

तेजस आठवले Mon, 03/26/2018 - 19:29
वर्मीकंपोस्ट ला विरोध का होता ते सांगता का ? गांडूळखत तर चांगले असते ना मातीसाठी.

सागर द. Mon, 12/31/2018 - 12:06
काही दिवसापूर्वी हे फार्मिझेन अप्प मोबाइल वर इन्स्ताल केल. सध्या बेन्गलुरु, हैदराबाद आणि सुरत ला शेतात प्लॉट भाड्याने घेउन त्यात नैसर्गिक शेती करु शकता. तसेच इतर शेतकर्यानी पिकवलेले धान्य, फळे आणी भाजीपाला विकत पण घेउ शकता जे घरपोच मिळते. https://www.farmizen.com/

सुधीर कांदळकर Tue, 01/01/2019 - 19:54
बऱ्याच लोकांना हे ठाऊक नाही की पाळेकर ज्या गोष्टी सांगत आहेत त्या श्रीपाद दाभोलकरांनी खूप आधीच सांगितल्या आहेत. खूप जणांना दाभोलकर आणि प्रयोग परिवार माहीत नाही. फरक इतकाच की दाभोलकर हे मुळातच हाडाचे वैज्ञानिक असल्याने त्यांनी त्यांचे देव्हारे माजू दिले नाहीत.
या कोणत्या गोष्टी आहेत ते कळले तर बरे होईल. आपल्या दुव्यातील लेख वाचला. त्यावरून असे दिसते की दाभोलकरांचे कार्य हे मुख्यत्वेकरून द्राक्षशेतीबद्दल असावे. अर्थात एका लेखावरून त्यांच्या कार्याची व्यापकता तसेच मर्यादा मोजता येणार नाही. दाभोलकरांचे संशोधन कोणत्या कालावधीत झाले हे कळले तर चांगले होईल. तसेंच त्यांनी लेखन केले असल्यास पुस्तकांचेबद्दल प्रकाशक इ. ची माहिती द्यावी अशी नम्र विनंती. पाळेकरांवर कोणतेही आरोप करण्याआधी आपण त्यांची पुस्तके वाचली असतील असे गृहीत धरतो. सूक्ष्मजीवशास्त्र, सेल्यूलर बायॉलॉजी आणि मोलेक्यूलर बायॉलॉजी यांची जोड त्यांनी वनस्पतीपोषणशास्त्राला दिली आहे तशी दाभोलकरांनी दिली आहे का? कृपया मी आपल्याला वा दाभोलकरांना आव्हान देतो आहे से समजू नका. विषय समजून घेऊन ज्ञानसंपादन एवढाच माझा उद्देश आहे. एका सुरेख लेखाबद्दल लेखकांस अनेक धन्यवाद.

काजुकतली Sat, 03/23/2019 - 11:32
आजपासून गुरुजींचे 2 दिवसांचे शिबिर नव्या मुंबईत, आगरी कोळी संस्कृती भवन, नेरुळ पश्चिमेला भरत आहे. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.

काजुकतली Sat, 03/23/2019 - 11:49
दाभोलरांनी अमृतजल विकसित केले. यालाच पालेकर जीवामृत म्हणतात. दाभोलकरांनी अमृतमृदा विकसित केली. यालाच पाळेकर घनजीवामृत म्हणतात. बीजसंस्कार सुद्धा दाभोलकरांचेच देणं आहे.>>>> पूर्णपणे चुकीची माहिती. अमृतमिटी ही मातीसारखी बनवतात, 6 महिने लागतात बनायला. मी हा प्रयोगही केला आहे. श्रीमती प्रीती पाटील यांच्या उपक्रमाला मी हजेरी लावून हे शिकले आहे. याचेही फायदे भरपूर आहेत पण ही थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे. ही पद्धत शेतीतही वापरता येते. श्री. दीपक सचदे ही पद्धत शेतकऱ्यांना शिकवतात, 6 महिन्याचा कोर्स होता. गुरुजींची पद्धत पूर्ण पणे वेगळी आहे. त्यांनी ती कुठूनही चोरलेली नाही. हजारो वर्षे शेती सुरू आहे, तिची एकच एक पद्धत नसणार. प्रत्येकजण स्वतः प्रयोग करून पद्धती शोधतो.