एखाद्या किल्ल्याला ईतिहासातील एखादे झुंज, एखादी कथा, निसर्गरम्य परिसर, चढण्याच्या सोप्या वाटा, बर्यापैकी शाबुत असलेले अवशेष, एखादे आधुनिक आकर्षण असे बरेच काही लाभलेले असते. साहजिकच हा गड नुसता दुर्गभटक्यांची राबता असणारा न रहाता सर्वसामान्य पर्यटकांनासुध्दा आकर्षित करतो. असाच एका गडावर आज आपण पावसाळी भटकंती करणार आहोत, तो म्हणजे "कोराईगड". लोणावळ्याच्या दक्षिणेस पवनमावळात कोरबारस नावाचा भाग आहे. याच परिसरात आहे, कोराईगड. यालाच कोरीगड, कुंवारीगड आणि पेठ शहापुर या पायथ्याच्या गावामुळे शहागड अशी नावे आहेत.कोरी हे एका कोळ्यांच्या पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. ह्या गडावर असलेली कोरीव गुंफा आणि परिसरात असणारी कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी पहाता गडाचे वयोमान किमान तेराशे वर्षाचे निश्चित, पण आपल्याला ज्ञात ईतिहास आहे, निजामशाहीपासून.गडाची उभारणी तैलबैल्या, घनगडाजवळून चढणार्या घाटवाटा आणि कोरीगडाजवळचा सव घाट यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणार. मलिक अंबरच्या ताब्यात हा गड होता. शिवाजी महाराजांनी १६५६ च्या सुमारास ढमाले देशमुखांकडून हा गड घेतला. पुढे पुरंदरच्या तहात या परिसरातील तुंग, तिकोणा, लोहगड व विसापुर मोगलांना दिले तरी कोराईगड आपल्याच ताब्यात ठेवला. ३ व ५ ऑगस्ट्च्या केरीदुर्ग (Kerridurg ) शिवाजीराजांनी मोघलांकडून ११ जुन १६७० ला घेतल्याचा उल्लेख आहे पण तो चुकीचा आहे, कारण केरिदुर्ग म्हणजे कुर्डूगड, कोराईगड नाही. सन १६९४ मधे औरंगजेबाच्या स्वारीत मोंगलानी गड घेतला, पण लगेच तो पंताजी शिवदेव, कदम, दामाजी नारायण यांनी परत घेतला. ११ मार्च १८१८ ला कर्नल प्रॉथर सिंहगड्,पुरंदर, लोहगड, राजमाची आदी बलदंड किल्ले जिंकून ईथे आला. ११,१२ व १३ मार्च असे तीन दिवस धडका देउन ईंग्रजांचे सैन्य चांगलेच वैतागले. अखेरीस १४ मार्च रोजी नेमका एक तोफगोळा दारुच्या कोठारावर पडला आणि प्रचंड स्फोट झाला. ज्याच्या जिवावर लढायचे ते दारु कोठार नष्ट झाले आणि कोराईगडाने शरणागती पत्करली.
हा झाला ईतिहास पण या कोराईगडावर एक दंतकथाही सांगितली जाते. महाड जवळ पिंपळवाडी या गावी लुमाजी भोकरे हा कोळी प्रमुख होता. त्याला मोठे ईनाम आणि संपत्ती पाहिजे होती. यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे काही पराक्रम करणे आवश्यक होते. तेवढ्यात त्याला कोरीगडावर एक तगडा अरबी घोडा असल्याचे समजले. आपण तो घोडा बादशहाला नजर करतो असे त्याने सांगितले.लुमाजीने कोळ्यांना मदतीला घेउन कोराईगडाला वेढा घातला. जवळपास तीन महिने झाले पण काही उपयोग होईना. अश्यातच महाडच्या मुसलमान सरदाराने त्याला खलिता पाठविला कि ,'तु कबुल केल्याप्रमाणे बादशहाला अजून घोडा दिलेला नाही. जर लवकरच काही हालचाल केली नाहीस तर तुला शिक्षा करीन'. हे एकून वेढ्यातील बरेच कोळी पळून गेले, मात्र काहीजण लुमाजीच्या पाठीशी राहिले. तेव्हा लुमाजीने वेष पालटून लाकुडतोड्याच्या रुपात गडावर शिरकाव केला व त्या घोड्याचा माग लावला. काही दिवस त्याने गडावर राहून पहार्याचा अंदाज घेतला आणि एके रात्री गडावरून माळ म्हणजे ठराविक अंतरावर गाठी बांधलेली दोरी सोडली, मात्र ती माळ खाली उभारलेया कोळ्यापर्यंत पोहचत नव्हती. लुमाजीने युक्ती केली आणि एकाच्या खांद्यावर दुसर्या उभे करून अखेरीस तो वर चढला आणि त्या घोड्यापर्यंत पोहचून त्याने तो पळविला, पण नेमके हे एका पहारेकर्याच्या लक्षात आले. त्याने लुमाजीवर गोळी झाडली, पण ती लागली त्या घोड्याला आणि तो घोडा मेला. लुमाजी मात्र गडावरुन निसटला आणि गावी परत आला. पण त्याला काळजी वाटु लागली कि आता आदिलशहा शिक्षा करणार. पण लुमाजीने केलेल्या धाडसी प्रयत्नाबध्द्ल खुश होउन आदिलशहाने त्याला ईनाम दिले.
या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत
१ ) लोणावळ्यावरून भुशी डॅम- लायन पॉईंट-घुसळखांब मार्गे पेठ शहापुर किंवा आंबवण्याला यायचे. इथून दोन्ही गावातून गडावर चढणार्या वाटा आहेत.
२ ) पुणे-मुळशी-ताम्हिणी घाटातून एक रस्ता येकोलेमार्गे आंबवण्याला येतो. ईकडूनही कोराईगडाला येता येईल.
कोराईगड परिसराचा नकाशा
स्वताची गाडी असेल तर फारच सोयीचे कारण या परिसरात खुपच कमी बससेवा आहे. थोड्याफार खाजगी जीपही या रस्त्यावर धावतात. १०.३० ला तिसकारी आणि १२.३० भांबुर्डे या बस सोयीच्या आहेत.
लोणावळ्यावरून पेठ शहापुर २० कि.मी.वर आहे. घुसळखांब ओलांडून आपण पेठ -शहापुरच्या जवळ आलो कि एखाद्या पाचरीसारखा जमीनीत रुतून बसलेल्या ताशीव खडक, तटबंदीचे शेला पागोटे लेवून कोराईगड सामोरा येतो. हा रस्ता अँबी व्हॅलीमुळे खुपच चांगला आहे.
दुतर्फा घनदाट झाडी, झुळझुळीत रस्ता आणि वाटेत लागणारे शिवलिंग, लायन यासारखे पाँईट यामुळे हा प्रवास कधी संपला ते कळतच नाही. पायथापासून गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१ ) पेठ शहापुरपासून एक वाट मोठा वळसा घेउन सोप्या पायर्याच्या वाटेने साधारण पाउण तासात गडावर पोहचवते. ह्या वाटेने पुर्व बाजुच्या दरवाज्याने आपण गडावर प्रवेश करतो.
२ ) आंबवणे गावातून एक वाट थेट गडाच्या पश्चिम दरवाज्याकडे गेली आहे, पण हि वाट काहीशी अडचणीची आणि फारशी वापरात नाही.
आपण पुर्व दरवाज्याच्या वाटेने जाउ. सुरवातीला पायवाट सहारा अँबी व्हॅलीकडे जाते. ईथे आजुबाजुच्या परिसरातील गावकर्यांना रोजगार मिळाला आहे. साधारण वीस-पंचवीस मिनीटे चालले कि उजवीकडे पायर्यांची वाट दिसते.
एन पावसात आल्यास या पायर्यांवरून धबधब्यासारखे पाणी वहात असते.
या वाटेने पंधरा मिनीटे चढून गेल्यानंतर एक कोरीव लेणे आणि शेजारी नव्याने जीर्णोध्दार केलेले गणपतीचे मंदिर दिसते. गणेशाचे दर्शन घेउन पुढे निघायचे. या कोरीव लेण्याचा उपयोग पहारेकर्यांची कोठी म्हणुन होत असावा. कोरीव लेण्याच्या शैलीवरून गडाचे प्राचीनत्व लक्षात येते, मात्र नक्की काळ समजला नाही.
गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ईथल्या टाक्यातील पाणी भरुन घ्यावे किंवा शहापुरमधून देखील पाणी भरुन घेता येईल किंवा उत्तम म्हणजे स्वताचे पाणी सोबत आणणे.
दहा मिनीटातच गडाचा दक्षिणमुखी दरवाजा सामोरा येतो.
ईथे दरवाज्याजवळच डाव्याबाजुला तटावर एक मानवी चेहरा कोरलाय. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर गवताळ लांब पसरलेले पठार पहाण्यास मिळते. खालून गडाचे भेदक दर्शन झाल्यानंतर एवढी मोठी सपाटी पाहून आपण थक्क होतो. समुद्रसपाटीपासून ९२० मीटर उंचीचा ह्या गडमाथ्यावरून बराच मोठा परिसर दिसतो. मुख्य म्हणजे ईतक्या लढाया होउनही अजुनही तटबंदी खणखणीत आहे.
हवा स्वच्छ असेल तर गडमाथ्यावरून उत्तरेला नागफणीचे टोक, त्याचा मागे राजमाचीचे जुळे बालेकिल्ले, ढाकचा किल्ला, ईशान्येला सरसगडाची कातळटोपी, पश्चिमेला कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, ईर्शाळगड, माणिकगड, दक्षिणेला मुळशी धरणाचे पाणी, लांबवर तोरणा आणि पुर्वेला तुंग, तिकोणा आणि मोरगिरी दिसतात.
आधी आपण उत्तर टोकाशी जाउया.
या बाजुला दोन मोठी तळी आहेत. ह्या दोन्ही तलावात काळे पाणविंचू आणि स्पंज जातीच्या प्राण्यांच्या वसाहती आहेत.
गडाच्या उत्तर पश्चिम टोकाशी तीन छोट्या गुहा आहेत, यातील मधल्या गुहेत चतुर्भुज विष्णुची मुर्ती आहे. या बाजुला पाण्याचे एक टाके आहे, त्याला गणेश टाके म्हणतात.
ईथेच जवळ गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. आतमधे गणेश मुर्ती आणि ईतरही काही मुर्ती आहेत.
उत्तर टोकाशी जाउन उभारले की खाली गडाची पेठ, म्हणजे जिथून गडाला रसद पुरविली जाते, ते पेठ शहापुर दिसते.
एन पावसाळ्यात ईथे आल्यास या बाजुच्या तटबंदीतून वहाणारे पाणी पावसाळ्यात धबधब्याच्या स्वरुपात बाहेर पडताना दिसते.
पशिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने आपण उत्तर टोकाकडे जाउया.
याच दक्षिण बाजुला चार तोफा व्यवस्थित लोखंडी स्टँडवर मांडून ठेवलेल्या दिसतात.
यापैकी कोराई मंदिराजवळ असलेली सर्वात मोठी तोफ आहे, "लक्ष्मी तोफ".
या नंतर गडाचा आंबवण्याकडचा दरवाजा आपल्याला दिसतो. एकूण त्याचे स्वरुप पहाता, हा नक्कीच मुख्य दरवाजा नसणार.
याच बाजुला खाली आंबवणे गाव दिसत असते.
शेवटी आपण दक्षिण टोकाला पोहचतो. हि बाजु तुलनेने नाजुक, त्यामुळे ईथे दुहेरी तटबंदी, म्हणजेच चिलखती तटबंदी घातलेली आहे.
जर आपण ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत आल्यास गडमाथा सोनकीच्या पिवळ्या फुलांनी भरून गेलेला असतो. या बाजुला आणखी काही तोफा आहेत. या नंतर गडाच्या पुर्व तटबंदीच्या कडेकडेने चालु लागल्यास खाली दरीत एक आधुनिक मानवनिर्मीत पण मुग्ध करणारी गोष्ट पहायला मिळते, " सहारा सिटी, अँबी व्हॅली".
साधारण २००० साली असे आधुनिक शहर उभे करावे असे असे श्री. सुब्रतो राय यांच्या मनात आले आणि लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरापासून जवळ सहारा ग्रुपने हे शहर वसविले. बरीच मोठी प्रवेश फि भरुन आपणही हे शहर आतून पाहु शकतो, पण ते शक्य नसेल तर चिंता नाही. कोराईगडावर विनाखर्च आपण याचा आनंद घेउ शकतो, ते ही बर्ड आय व्ह्युने.
खाली दिसणारे कारंजे, ऑडीटोरीयम, बंगले, जलतरण तलाव, पाण्याचे मोठे तलाव अतिशय विहंगम दिसतात.
कोराईगड बघायला जेमेतेम दोन-अडीच तास पुरतात, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री कोराई देवीच्या मंदिरात मुक्काम करून याच सहारा सिटीचा रात्रीचा नजारा बघता येईल.
मी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.
गडफेरी पुर्ण करुन आपण पुन्हा महादरवाज्यापाशी परत येतो.
गड फेरी उरकून आपण गडमाथ्याच्या मधोमध असणार्या कोराई देवीच्या मंदिरात जाउ. गडाच्या मध्य भागी काही उध्वस्त घरांचे चौथरे पहाण्यास मिळतात.खरं तर ह्याठिकाणीच थोडी दुरुस्ती करुन भटक्यांना रहायची सोय करुन देता येईल. सध्या तरी जीर्णोध्दार केलेले कोराई मंदिर हाच एकमेव निवारा गडावर आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर अंदाजे ४ फुट उंचीची कोराई देवीची त्रिशुळ, डमरु, गदा आदी धारण केलेली मुर्ती पहाण्यास मिळते. या कोराई देवीसंदर्भात एक कथा सांगितली जाते.जेव्हा १८१८ च्या युध्दानंतर ईंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा कोराई देवी दागिन्यांनी मढलेली त्यांच्या नजरेस पडली, त्यांनी हे दागिणे ईथुन हलवून मुंबईच्या मुंबादेवीला अर्पण केले. सध्या मुंबादेवीच्या मुर्तीवर हेच दागिने आहेत असे मानले जाते.मलातरी हि कथा पटत नाही. लुटमार करण्यासाठीच या देशात आलेल्या ईंग्रजाना ईतके मोठे घबाड मिळाल्यावर ते असे दागिने दुसर्या देवीच्या अंगावर चढवतील यावर माझा विश्वास नाही.असो.
या शिवाय गडावर शिवमंदिरही आहे.
एकंदरीत फारशी दमणुक न करता, लोणावळ्याच्या पर्यटकांनी गजबजलेल्या परिसरात असलेला हा किल्ला एक दिवसाची सवड काढून नक्कीच पहाण्यासारखा आहे. फक्त गडावर किंवा पायथ्याशी खाण्यापिण्याची फारशी सोय होण्याची शक्यता नसल्याने वाटेत घुसळखांब किंवा लोणावळ्याला जेवण्याच्या वेळेत पोहचू असे प्लॅनिंग करावे.
ईच्छा असल्यास तैलबैल्याच्या पाषाण भिंती आणि घनगडही पहाता येईल किंवा तुंग किल्ला पाहून परत जाता येईल.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड कोटांची
संदर्भग्रंथ :-
१ ) पुणे जिल्हा गॅझेटियर
२ ) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !!-प्र.के. घाणेकर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) शोध शिवछ्त्रपतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
६ ) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर
वाचने
21349
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती आणी फोटो
मस्तच
प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद.
In reply to मस्तच by स्वच्छंदी_मनोज
खरेय
In reply to प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद. by दुर्गविहारी
अनघाई
In reply to मस्तच by स्वच्छंदी_मनोज
नाही हो मुनीवर, अनघाईला जायला
In reply to अनघाई by कपिलमुनी
अगदी आमच्या सारखेच
In reply to नाही हो मुनीवर, अनघाईला जायला by दुर्गविहारी
माझाही अनघाई राहीलाय, करुया
In reply to अगदी आमच्या सारखेच by स्वच्छंदी_मनोज
प्लान झालाच तर आमास्नी बी
In reply to माझाही अनघाई राहीलाय, करुया by दुर्गविहारी
नक्कीच.आणखी कोणी ईंटरेस्टेड
In reply to प्लान झालाच तर आमास्नी बी by सूड
नाही अजुन
In reply to अनघाई by कपिलमुनी
मी २००२ साली गेलो होतो तेव्हा
मी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.याबाबत असे ऐकले आहे की, सहारावाल्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे असे कारण देऊन मुंबईच्या एका ट्रेकर ग्रुपला गडावर जाणास मज्जाव केला गेला.. मग प्रकरण कोर्टात गेले आणि लाईट्स व वॉचटॉवर बेसहारा झाले. ;) खखोसजा.कदाचित हे खरे असावे. असो.
In reply to मी २००२ साली गेलो होतो तेव्हा by मोदक
हे खरेय
In reply to मी २००२ साली गेलो होतो तेव्हा by मोदक
तैलबैलावर राहिलो आहे, तिथे
कोरीगड एकदम सोपा आहे.
In reply to तैलबैलावर राहिलो आहे, तिथे by कंजूस
मोदक, ते प्रकरण झालेले. वरून
काहींना..?? २००३
In reply to मोदक, ते प्रकरण झालेले. वरून by कंजूस
नेहमीप्रमाणेच तपशिलांसह वर्णन
माहिती आणि फोटो फार सुंदर...
कोरीगडावर वर्षानुवर्षे जातोय.
खुपच महत्वाची माहिती दिलीत
In reply to कोरीगडावर वर्षानुवर्षे जातोय. by प्रचेतस
फोटो अप्रतिम
आमचे शरीर नाही पण मन मात्र
शरीरानेही जाउन या. ( हलकेच
In reply to आमचे शरीर नाही पण मन मात्र by सोमनाथ खांदवे
फोटो
छान!
मस्त लेख. जुलै मधे या गडावर