मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्राम"पंचायत" लागली..!! -1

विशुमित · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता घरी जायला हडपसरच्या बस स्टॉप वरून पंढरपूरला निघालेला लाल डब्बा पकडला. दार उघडून बघतोय तर गाडी खचाखच भरलेली. "आयला एकादशी वगैरे नसताना पण पंढरपूरला लोक रोज का जात असतील?." मनात पहिला विचार आला. सासवड- जेजुरी पर्यंत उभं राहून जावे लागणार हे पक्क होतं. खांद्यावरचं धोपटं काढून वरच्या जाळीत टाकणार तेवढ्यात 'सोन्या' ने हाक मारली. "पाव्हणे या मागे. तिघं बसू ". बाबू मांढरेला पलीकडे ढकलून सोनावणे म्हणाले. बाबू आणि सोन्या माझ्या शेजारच्या गावची, डेली अप डाऊन करणारे.! सोन्या अप डाउन मधला सगळ्यात सिनियर बडबड्या खेळाडू मेंबर म्हणा. १३ वर्ष झाले. स्वारगेटलाच माझ्यासाठी कधी कधी जागा पकडून ठेवतात दोघे. बूड टेकवले. तशी सोन्याची चुळबुळ चालू झाली. धोपटयात वानवळा मिळालेलं डाळिंब होतं. काढलं आणि दिले 'सोन्या'च्या हातात सोलायला. सासवड पर्यंत काळजी मिटली वळवळीची! सोन्याबद्दल अधिक पुन्हा कधीतरी. आमच्या गावचा नाही ना ! ---- गुरुवारी भयाण उकडत होतं. वेगळंच उकडत होतं. त्यात 'भेकराई'चे खड्डे. खिडकीतून बाहेर बघितले तर फुरसुंगी चौकात हे भला मोठा फ्लेक्स. सगळ्या नात्या गोत्यातले. किलो किलो सोने घातलेले. कुठल्यातरी सोसायटीची निवडणूक जिंकल्याबद्दल जनजागृती. फ्लेक्स वॉर! एवढे फोटो होतं की प्रत्येकाने घम्याले घम्याले माती टाकली असती तरी चौकातील सगळे खड्डे बुजले असते. अतिशोयक्ती नाही करत. खरंच एवढे फोटो होतं....! --- टुंग करून मोबाईल वाजला. व्हॉट'स अप होता. 'टिंगल्या टोळी' ग्रुपचा. मन्याने टाकला होता. तो गावातच असतो. फक्त सोडला नाही अजून गावावर. ** ""आता जो साऱ्या गावासोबत वागेल नीट, त्यालाच मिळणार सरपंचाची सीट.""" ** 'ताण्या'ने लगेच सरकारच्या जीआर ची पीडीएफ पाठवली. आमच्या बंधूंचा पण एक टुंग वाजला. गट निहाय आरक्षण. मग काय पंजे, अंगटे, मुक्के, दात पडकी थोबाडं. उमेदवार उमेदवार म्हणून खिल्ल्या. नुसते टुंग वर टुंग पण जे-५ (prime बरका) काही गरम झाला नाही. चांगला मोबाईल आहे. दिवे घाट ओलांडून सासवड आले. आमची एक पण प्रतिक्रिया नाही. लय अभ्यासू असल्याचा आव आणत 'साहेबां'सारखी शेवटी प्रतिक्रिया द्यायची म्हंटल. विषय क्लोज. नेहमीच्याच झाक्या. 'झाक्या': आमच्या वाडीचा गोलातला c असणारा कॉपीराईटेड शब्द. ग्रामपंचायीतचे वारे सुटले वाटतं. 'यमाई-शिवरी'त आल्यावर आमच्या डोक्यात वीज चमकली. ---- बाबू ने खिडकीची काच बंद केली. तुफान सुटले होतं. विजेचा लखलखाट. ढगांचा गडगडाट. मुसळासारखाच पाऊस पडत होता. जेजुरी-वाल्हे करत निरेत पोहचलो. निरेत गाडी ठेवली होती. किक मारली. एकाच किक मध्ये गाडी उठली. कंडिशन मधेच असते सारखी. वाडी जवळ आलो. आमचं घर वस्तीवर. २ किलोमीटर. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेला १० वर्ष मागे लागून झालेला रस्ता. दादांनी ऐकले नाही (दुर्लक्षिले) म्हणून वहिनींनाच गाठले पोरांनी. म्हंटले "गर्वार या रस्त्यावरून नेली तर गाडीतच प्रसवेल". ४ दिवसात काम चालू झाले. एकच चर्चा. वहिनींचा दादांवर लय रोब दिसतोय. असो. जास्त नाही लिहीत. कारण 'ताई' मिपाच्या नियमित वाचक आहेत. ऐकून आहे. घेतील बोलवून नाहीतर. ह्या घराण्याचे एक विशेष. तालुक्यातील प्रत्येक घराला चांगले ओळखतात. खडा ना खडा माहिती असते. असो..!! रोड शेजारून इंग्रज काळातला वाहणारा ओढा. ओढ्याची कहाणी लय खत्री आहे. सांगतो पुढे. ओढ्याला पूर आलेला. कमरे इतके पाणी. लहानपणीचे दिवस आठवले. २५ वर्षे झाली तरी ह्या ओढ्याचा प्रश्न सोडवला नाही गावपुढाऱ्यानी? वीज चमकली. खरोखरची. घरात पोहचलो. हात पाय धुवून जेवायला बसलो. (कपडे बदलून) जेवण झाले. आयते अंथरून टाकून ठेवले होतं. पाऊसाची पुण्याई म्हणायची. टिंगल्या टोळीचा टुंग वाजलाच. रतीब घातल्या गत. मन्याचाच होता. " नानांनी सांगितलंय यंदा बिनविरोध नाही. मंगळवारी मीटिंग आहे. उमेदवार निवडायचे आहेत." ---- बायकोला विचारले, "नाना कुठेत?" "ते जेवून खाऊन ७.३० लाच रग अन वाकळ पांघरून झोपले आहेत." शेजारच्या खोलीत नाना घोरत होतं. एक शंका आली. मन्या तर ओढ्याच्या पलीकडे राहतो. ओढ्याला पाणी आहे. नानांकडे अँड्रॉइड नाही. नाना ७.३० ला झोपले आहेत. आता खात्री पटली. मन्या गावालाच सोडलेला आहे. गावचं राजकारण ????? (म्हणजे बिन डाळीचे वरण) ----- क्रमश: (लेखक : विशुमित. (गावचे पाव्हणे) सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. सत्य घटनेवर आधारित कुठे कुठे. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.) (ज कु काका सॉरी. तुमचे वाक्य उचल्याबद्दल. प्लिज माघारी मागू नका.)

वाचने 15124 वाचनखूण प्रतिक्रिया 24

संग्राम 15/09/2017 - 19:14
आमच्या ग्रुपवरचा एक टुंग, गावकी गावकीत, भावकी भावकीत, घरातल्या घरात भांडण लावायचा सरकारी अधिकृत उपक्रम म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक !

मस्तं ! गावाकडच्या यस्टीत बसल्यावाणी वाटलं. :) एवढे फोटो होतं की प्रत्येकाने घम्याले घम्याले माती टाकली असती तरी चौकातील सगळे खड्डे बुजले असते. हे लय भारी ! जास्त नाही लिहीत. कारण 'ताई' मिपाच्या नियमित वाचक आहेत. ऐकून आहे. ही ही ही. उगी कालर टाईट झाली का ते चाचपून पाह्यलं ;) =))

चामुंडराय 16/09/2017 - 07:14
गापा साहेब, गावाच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणात (आणि कार्यकारणात) महिलांचा अलीकडच्या काळातील सहभाग आणि विशेषतः त्यांच्या पतिराजांचा अदृश्य हातभार याबद्दलही लिहा. वाचायला आवडेल.

पगला गजोधर 16/09/2017 - 13:18
मस्त ! वाडी म्हणजे कुठली ? साखरवाडी सुरवडी होळ निंबाळकरवाडी सातसाखळी पाचसर्कल ???

विशुमित 18/09/2017 - 11:08
मार्मिक गोडसे तात्या, पैसे ताई, अभेंद्र शेठ, चिनार भाऊ, खांदवे पाटील, एस साहेब, फॉरएन्ड सर, चामुंडराय अण्णा, यशो अक्का, अॅमी जी , सिरुसेरि जी आणि नाखु बापू आणि इतर समस्त वाचक मंडळींचे हार्दिक आभार आणि असेच पाठीशी उभे राहा.(भले विरोधी गटातील म्हणू देत कंपू गिरी होतीय, स्कोर सेटलिंग होती. जास्त इग्नोर).!! तुमची साथ असेल तर विजय आपलाच आहे, विजय आपलाच आहे आणि 'विजय' आपलाच आहे....!! (या तिसऱ्या "विजय" ने शिवतारे निवडून आले) मिटींगा झाल्या आहेत. वृत्तांत टाकतोच लवकर...!!

In reply to by विशुमित

गामा पैलवान 18/09/2017 - 16:54
विजय शिवतारे यांना ओळखता तुम्ही? निवडणुकीतल्या मतदानाची अंकचिकित्सा करायची त्यांची हातोटी विलक्षण आहे. साथीला भला दांडगा अभ्यास तर आहेच. श्रीगुरुजी व ग्यारी ट्रुमन यांना मेजवानी मिळेल. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विशुमित 18/09/2017 - 17:14
मागच्या विधानसभेला सासवड मध्ये मोठ्या साहेबांची काँग्रेस कडून सभा होती. त्यावेळेस त्यांच्या छोटेखानी भाषणांमध्ये असे म्हणाले की " एक जगताप आमदार झाले तर सगळेच जगताप आमदार झाले म्हणून समजा." जाता जाता म्हणाले, " जगताप प्रचंड मतांनी विजयी होणार. कारण विजय आपलाच आहे, विजय आपलाच आहे आणि ""विजय"" आपलाच आहे." लोकांनी बरोबर शेवटचे वाक्य लक्ष्यात ठेवले. (शब्दशः असेच म्हणले नाही, आशय सांगितला. जाणकार अधिक प्रकाश टाकतील.) बाकी शिवतारे हे साहेबांचाच मोहरा आहे. असो..!!