मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपेक्षित सावरकर

भोचक · · जनातलं, मनातलं
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं. त्यातही त्यांना 'स्वातंत्र्यवीर' या उपाधीत बांधून ठेवलं, पुढे 'हिंदूत्ववादी' म्हणून त्यांचं कार्य अधिक संकुचित करण्याचा प्रयत्न आपणच केला. राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. बंगालमधील अनेक क्रांतीकारकांना सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांचे 'मॅझिनी'चे चरित्र अनेक तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून गेले. गांधी, सुभाष यांच्यासारख्या नेत्यांनाही त्यांना भेटावे वाटले एवढे त्यांचे महत्त्व त्या काळात होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. मणिशंकर अय्यर नावाचा एक कॉंग्रेसी उटपटांग मंत्री अंदमानमध्ये असलेल्या सावरकरांच्या काव्याच्या ओळी पुसायचे धाडस करतो, तरी सत्ताधारी कॉंग्रेस सदस्यांपैकी कोणीही हे चुकीचे केले म्हणून मान ताठ करून सांगत नाही. म्हणजे राज्यात सावरकर गुणगान करणारे कॉंग्रेसचे खासदार हायकमांडसमोर मान तुकवून पिचलेल्या कण्याचे दर्शन घडवतात. थोडं मागे जायचे झाले तर गांधीहत्येला सावरकरांचा कथित आशीर्वाद होता, म्हणूनही त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या या स्वातंत्र्यसूर्याने स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षाची शिक्षा झाली पण आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतरही त्यांना कोठडी चुकली नाही. गांधी हत्येच्या निमित्ताने हेही घडले. सावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. मुळात सावकरांनीच हिंदू महासभा नावाचा वेगळाच पक्ष काढला होता. पुढे संघप्रणित जनसंघ हा राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतरही हिंदू महासभेचे स्थान कायम होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठाही संघीयांना अडचणीत टाकणारी होती. 'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार पुराणमतावादाला धरून चालणार्‍या संघाला परवडणारे नव्हते. त्यामुळेच संघाने सावरकरांना दूर ठेवूनच चालायला सुरवात केली. समाजवाद्यांना सावरकरांचे हिंदूत्ववादी धोरणच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सावरकरांची तळी उचलून धरण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे समाजवाद्यांनी कायमच सावरकरांना दूरच ठेवले. त्यामुळे सावकर उपेक्षितच राहिले. कम्युनिस्टांच्या दृष्टीने सावरकर आणि इंग्रज सारखेच होते. सुभाषचंद्र बोस व सावरकरांवर त्यांनी कायम टीकाच केली. इतकेच नव्हे तर अंदमानच्या तुरूंगातून राजकीय आंदोलनात न पडण्याच्या अटींवर सावरकर बाहेर पडले ही बाबही बिनडोक कम्युनिस्टांसाठी सावरकरांच्या राष्ट्रभक्तीत न्यून दाखविणारी ठरली. मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडून रहाणे त्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे तिथे खितपत पडून रहाण्यापेक्षा बाहेर काही कार्य करत रहाणे जास्त महत्त्वाचे हे सावरकरांनी महत्त्वाचे मानले. त्याचवेळी आपल्यापेक्षा आपल्या इतर सहकार्‍यांची सुटका करावी यासाठी ते जास्त आग्रही होते, हेही कागदपत्रातून पुढे आले आहे. पण हे समजण्याइतकी कम्युनिस्टांची बुद्धी कधी प्रगल्भ झालीच नाही. रत्नागिरीला अज्ञातवासात असतानाही सावरकरांनी राजकीय कार्य लपून छपून केलेच. त्याकडे त्यांचे अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष होते. मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. त्यामुळे सावरकरांच्या या निर्णयात चुक काय? तेच कळत नाही. कम्युनिस्टांपैकी कोणत्या नेत्याला शंभर वर्षे तुरूंगवास झाला? कोणी कोलू ओढणे, अतिशय विपरीत स्थितीतही जगण्याची लालसा जिवंत ठेवत ठामपणे जिवंत रहाणे हे कुणी सहन केले? सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्यही याच काळात केले, हेही कम्युनिस्ट विसरतात. धर्म ही अफूची गोळी मानायची आणि येऊन जाऊन मुस्लिमांचे लांगुलचालन करायचे हा कम्युनिस्टांचा उद्योग राहिला. त्यांना जाती व्यवस्था संपवून टाकण्यासाठी झटत असलेले सावरकर कधी दिसलेच नाहीत. गांधींच्या अस्पृश्यता निर्मुलन चळवळीचे गोडवे गायले जात असताना गांधी चार्तुवर्ण्यावर विश्वास ठेवणारे होते, याकडे दुर्लक्ष होते आणि 'जातीजातीतील मानवी जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे या जातीजातीतील मानवी उच्चनीच भावनेचा व तदअनुषंगिक विशिष्टाधिकारंचा तेवढा उच्छेद करायचा' असे मत मांडणारे सावरकर 'हिंदूत्वाचा' मुद्दा मांडतात म्हणून प्रतिगामीही ठरविले जातात. दुसरीकडे सावरकरभक्तांनी नेहमीच गांधींवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झाले असे की गांधी मोठे होतेच, पण त्यामुळे दुर्देवाने सावरकर उगाचच छोटे ठरविले गेले. समाजातही कट्टर सावरकरभक्त व विरोधक असे दोन गटच तयार झाले. सावरकरभक्तांचा एक गट कायम वेगळाच राहिला. त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही विकसित झाली. सावरकर या देशासाठी झटले असतील पण त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, अशा प्रकारे सरकारी पातळीवर ते कायम उपेक्षित राहिले. त्याचा परिणाम समाजावरही आपसूक पडला. कारण ते काही 'सरकार प्रायोजित' स्वातंत्र्यवीर ठऱले नाहीत. देशपातळीवर उंची गाठलेला एक नेता आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत ठरवला गेला. त्यातही 'स्वातंत्र्यवीर' या 'कोंदणात' आणि 'मार्सेलिस'च्या उडीत त्यांचे कर्तृत्व आटोपले. त्यापलीकडेही सावरकर आहेत, हे फारसे कधी पुढे येतच नाही. त्यांचे काही विचार कदाचित न पटणारेही असतील. मग याच न्यायाने गांधी तरी कुठे पूर्णपणे पटणारे होते? सावरकरांचे विविध विषयासंदर्भातील चिंतन, दूरदृष्टी, मते याविषयी समाजात सातत्याने चर्चा होणेही कधी घडत नाही. किंबहूना असे विचार करणारे लोक प्रतिमागी ठरवले जातात. सावरकर विज्ञाननिष्ठ हिंदूत्ववादी असले तरी हल्ली 'हिंदूत्ववाद' मात्र प्रतिगामी ठरलाय. दुर्देव दुसरे काय. सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. ब्रिटिश, कम्युनिस्टांच्या नजरेतील इतिहासाला त्यांनी भारतीय दृष्टी दिली. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला. दुर्देवाने या उठावाची दीडशे वर्षे दोन वर्षापूर्वीच सरकारी पातळीवर झोकात साजरी झाली, पण गेले वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड होते. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा.

वाचने 10459 वाचनखूण प्रतिक्रिया 34

मृगनयनी गुरुवार, 02/26/2009 - 10:59
अक्षरक्ष: अक्षरन् अक्षर खरे आहे! :) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला मानाचा मुजरा! :) राष्ट्राचे चैतन्य मूर्त तु.... नीति सम्पदांची | स्वतंत्रते भगवति, त्वामहं राज्ञी तू त्यांची....|| वन्दे त्वामहं यशोयुता वन्दे!...... :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

मिंटी गुरुवार, 02/26/2009 - 11:04
मृगनयनीशी एकदम सहमत !!!!! स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझाही मानाचा मुजरा! :)

In reply to by मिंटी

दिपक गुरुवार, 02/26/2009 - 11:10
सहमत! आमचाही महानायकास मानाचा मुजरा ! पु.लंचे हे भाषण आठवले. पुन्हा वाचुन काढले..

अभिष्टा गुरुवार, 02/26/2009 - 11:25
माझाही स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा. सुर्याला कुणा काजव्याच्या "आहेस बाबा तू तेजःपुंज" अशा सर्टिफिकेटची गरजच नाहिये. सावरकरांना, कुणी उपेक्षा करो किंवा सन्मान करो काहीही फरक पडत नव्हता, ते खर्‍या अर्थाने कर्मयोगी होते. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

In reply to by अभिष्टा

धमाल मुलगा गुरुवार, 02/26/2009 - 17:54
वा:! अगदी चपखल. पुर्णतः सहमत. बाकी, भोचक यांचा लेख नेहमीप्रमाणेच उत्तम :) हजार सुर्यांची प्रखरता एकवटून बनलेल्या हिंदुस्तानाच्या ह्या क्रांतीसुर्याच्या चरणि विनम्र अभिवादन. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

गुरुवार, 02/26/2009 - 11:37
अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन.

In reply to by

अनिल हटेला गुरुवार, 02/26/2009 - 11:54
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांप्रति माझेही विनम्र अभिवादन. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by दिपक

शितल गुरुवार, 02/26/2009 - 22:08
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर.. बरेच दिवसांनी बाणाने फोटो दिलेत मिपाकरांना. :)

In reply to by मदनबाण

माझी दुनिया Fri, 02/27/2009 - 13:16
ही जी क्षणचित्रे दिली आहेत, ती कुठे संग्रहीत केलेली आहेत ? प्रत्यक्ष जाऊन पहायची झाल्यास काय करावे ? ____________

माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !

_____________ माझी दुनिया

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/26/2009 - 12:55
पुण्यातील डॉ अभिराम दिक्षित हे सावरकर विचारांच्या जागृतीचे कार्य करतात. त्यांचे अभिनव निर्माण प्रतिष्ठान पहा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आनंद घारे गुरुवार, 02/26/2009 - 18:30
"अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला। मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।।" असे प्रतिपादन करणारा स्वयंप्रकाशी स्वातंत्र्यसूर्य 'तेजस्वी' आहे असे कोणी सांगावे लागत नाही. त्यांच्या तेजाच्या झळाळीने पाहणार्‍याचे डोळे आपोआप दिपतात. ज्यांनी त्यांचे चरित्र आणि लेखन वाचले असेल, त्यांचे स्फूर्तीदायक काव्य ऐकले असेल, त्यांना मनापासून त्यांचा अतीव आदर वाटल्याशिवाय राहणार नाही, इतके ते उत्तम, उदात्त, उन्नत वगैरे सर्वगुणांनी युक्त आहे. त्यांच्याबद्दल मनात आदरभाव बाळगणार्‍या लोकांची संख्याही अपरंपार आहे. त्यांच्या जीवनकार्याबद्दल सकारात्मक माहिती देणारे अनेक स्फूर्तीदायक लेख प्रसारमाध्यमात येत राहतात, तसेच विविध क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती वेळोवेळी विनम्र भावाने त्यांना आदरांजली वहात असतांना प्रत्यक्ष कार्यक्रमात आणि टीव्हीवर दिसत असतात. त्यामुळे सर्वसामान्य वाचक किंवा प्रेक्षक स्वातंत्र्यवीरांना 'उपेक्षित' अशी उपाधी देणार नाही. या लेखातील फक्त खाली दिलेली मोजकी वाक्ये स्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी आहेत. त्यांचा विस्तार करून एक सुंदर लेख लिहिता आला असता. पण त्यासाठी थोड्या अभ्यासाची गरज आहे. या लेखाचा निम्म्याहून अधिक भाग कोणाला ना कोणाला दूषणे देण्यात खर्ची घातला आहे. पण इतर शंभर लोकांचा हजार प्रकारचा क्षुद्रपणा दाखवण्यामुळे कोणाचेही मोठेपण कधीच वाढत नसते हे सावरकरांच्या तथाकथित 'भक्तां'ना कधीतरी उमजेल अशी आशा आहे. "सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते. राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. बंगालमधील अनेक क्रांतीकारकांना सावरकरांची प्रेरणा होती. सावरकरांचे 'मॅझिनी'चे चरित्र अनेक तरूणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला पेटवून गेले. मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडून रहाणे त्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे तिथे खितपत पडून रहाण्यापेक्षा बाहेर काही कार्य करत रहाणे जास्त महत्त्वाचे हे सावरकरांनी महत्त्वाचे मानले. त्याचवेळी आपल्यापेक्षा आपल्या इतर सहकार्‍यांची सुटका करावी यासाठी ते जास्त आग्रही होते, हेही कागदपत्रातून पुढे आले आहे. मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. ब्रिटिश, कम्युनिस्टांच्या नजरेतील इतिहासाला त्यांनी भारतीय दृष्टी दिली. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला." आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

विकास गुरुवार, 02/26/2009 - 20:18
लेख आवडला आणि योग्य वेळेस लिहील्याबद्दल आभार! थोडे वेगळे थोडे लेखासंदर्भात... थोर नेत्याचा पराभव हा त्यांच्या विरोधकांपेक्षा बहुतांशी त्या नेत्याचे अनुयायीच करतात... वडाच्या झाडाखाली नवीन झाड येऊ शकत नाही पण फांद्यांना बांडगुळे मात्र येतात. तशीच काहीशी "कमी-अधिक" फरकाने अवस्था आहे. शिवाजीने दूरदृष्टीने स्वतःच्या नावाऐवजी हिंदवी स्वराज्य स्थापले पण त्याच्या आजतागायतच्या पुढच्या पिढ्यांनी "शिवाजी", हेच एक घराणे करून टाकले. टिळकांनी "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." अशी सिंहगर्जना केली, पण सहा वर्षाच्या तुरूंगवासात एक अनुयायी नव्हता ज्याने त्यांचे काम पुढे तितक्याच मुत्सद्दीपणे, लोकसंग्रह करत चालवले. टिळकांच्या जाण्यानंतर तर काय त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून त्यांच्या मुलाला आत्महत्या करावी लागली. गांधीजींबद्दल तर बोलायला नको इतके दुर्दैव आहे. त्या नथुरामने गांधींना मारायचे जितके घोर पातक केले त्यापेक्षाही गांधींजींच्या विचाराला, आचाराला आणि त्यातील मूळ गाभ्याला (तत्वज्ञानाला) दरोज मारायचे अघोरी पाप गेले ६० वर्षे चालू आहे. हे सर्व लिहायचे कारण काय? - सावरकरांच्या बाबतीतही तेच घडले. आज काही संकेतस्थळावर (मिपा आणि तत्सम नाही) जेंव्हा सावरकरांचे छायाचित्र दिसते, त्यांचे विचार/कथा वगैरे दिलेल्या दिसतात तेंव्हा वास्तवीक खिन्न होयला होते. असल्या महाभागांना ना धड हिंदूत्ववाद कळला ना धड सावरकर. मात्र स्वतःच्या "कर्तुत्वाने(?)" त्यांचे नाव आणि त्याहूनही महत्वाचे, विचारच बदनाम करतात हे लक्षात येत नाही. .... >>> म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. या संदर्भात आधीपण लिहीले आहे. संघाच्या व्यासपीठावर फक्त संघाच्या उत्सवाच्या वेळेस अथवा विशेष कार्यक्रम (अभ्यासवर्ग वगैरे) असतात तेंव्हाच छायाचित्रे असतात आणि ती फक्त तीनच - संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक श्री गोळवळकर गुरूजी आणि मध्यभागी शिवाजी. संघ चालू केला तेंव्हा व्यक्तिनिरपेक्ष संस्था केवळ दूरगामी राष्ट्रनिर्मिती हा उद्देश ठेवून झाला होता. सावरकरांना सुरवातीस ते मान्य नव्हते असे वाचल्याचे आठवते कारण त्यांच्या दृष्टीने नजीकच्या काळातील ताबडतोब फळे हवी होती. संघाचा या विचाराला विरोध नव्हताच फक्त त्यांचे म्हणून त्यांनी जे ध्येय ठरवले होते त्यात ते बसणार नव्हते इतकेच. तरी देखील सावरकरांसंदर्भात अनेक संघियांनी मराठी-अमराठी बरेच लिहीलेले आहे. सावरकर चित्रपट ज्या सुधीर फडक्यांनी काढला ते स्वतः स्वयंसेवकच म्हणवून घेयचे आणि आयुष्यभर त्यासाठी झटून तो तयार केल्यावर जेंव्हा त्यांनी दुसर्‍या स्वयंसेवकाला म्हणजे अटलबिहारी, अडवाणींना त्याचा प्रिमियर शो दाखवला त्यानंतर म्हणले देखील की, "आता मी मरायला मोकळा झालो" >>>'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार... ह्या संदर्भात वास्तवीक मला येथे त्यांचा लेखच चिकटवायला आवडेल. प्रयत्न करेन. कारण निव्वळ त्यांचे एक वाक्य ते पण "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" घेऊन लिहीले जाते तेंव्हा तो त्यांच्या पारदर्शी आणि पुरोगामी विचारांवर अन्याय केला असे वाटते. सरते शेवटी सावरकरांचा काहीजणांना विज्ञानवाद भावला, तर काहीजणांना हिंदूत्ववाद आवडला. मात्र त्यांनी ज्या सप्तबंद्या उठवायला सांगितल्या त्याबद्दल मात्र अजून हवी तशी वैचारीक (कृतीत नंतर) प्रगती झाली आहे असे वाटत नाही. जात हा प्रकार, अनुवंशिकतेच्या नावाखाली चालणारा आचरटपणा (त्यांनीच तसे म्हणले आहे), हे आत्मसात करण्याचे धाडस त्या पिढीतील फारच कमी लोकांनी दाखवले असेल आणि ते कधी प्रसिद्धीस आले देखील नसतील. वास्तवीक गणितातील सेट संकल्पनेत बोलायचे तर त्यांची विज्ञाननिष्ठा, समाजकारण, हिंदूत्ववाद हे वाचल्यास समजेल की "म्युचुअली इन्ल्क्युझिव्ह" होते/आहे. थोडक्यात सावरकर नावाचा एक हत्ती भारतातील तमाम वैचारीक आंधळ्यांनी स्वतःच्या सोयीने त्याची पूजा करायला अथवा झोडपायला वापरला आणि त्या प्रक्रीयेत समाजाला पण आंधळे ठेवायला मदत केली... तरी देखील कधीतरी त्यांच्याबद्दलचे या अर्थी ऐकलेले पटते: सावरकरांना कल्पना होती के ते त्यांच्या काळासाठी खूप टोकाचे विचार सांगत होते. पण त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या वीना आणि विरोधाल तर मोडून...", असे म्हणत ते त्यांचे कार्य करत राहीले. म्हणून त्यांना हवे तसे अनुयायी मिळाले नाहीत. मात्र हे देखील सत्य आहे की त्यांनी टोकाचे विचार सांगितल्याने समाज किमान अशंतः हलला आणि पुढे जाण्यास मदत झाली... असो.

In reply to by विकास

मैत्र Fri, 02/27/2009 - 11:59
विकास, नेहमीप्रमाणेच संयमी आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद. गांधीजी, सावरकर, आंबेडकर सर्वांच्या बाबतीत हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे - त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या नावाचा केलेला वापर आणि तत्वांना / विचारांना सपशेल नजरेआड करणे. हे जसं तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोललात तसं जगातल्या कोणत्याही मोठ्या राजाचं उदाहरण घेतलं तर पुढची पिढी / राजपुत्र / राजे तेवढे कर्तृत्ववान आणि बुद्धिमान नाही निघाले तर काही पिढ्यांत त्या विचारांचा आणि राज्याचा क्षय होतो. हा जगाच्या सर्व इतिहासात एक समान भाग आहे.. तेच सर्व थोर नेत्यांना लागू पडतं. नवीन विचार, नवीन नेतृत्व ज्यामध्ये तेवढी कुवत आहे हे जोवर येत नाही तोवर ही पिछेहाट होतच राहते. आत्ताच्या राजकारणाचा विचार करता हे अशक्यप्राय वाटतं. अवांतरः नगरच्या एका मोठ्या काँग्रेस कार्यकर्त्या जानकी बाई आपटे यांच्या चरित्रवजा पुस्तकात (आपट्याचं पान) ४२ च्या चळवळीआधी पासून आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच काँग्रेस मध्ये मूळ समाज सुधारणा / प्रबोधन / स्वातंत्र्य हे सर्व सोडून फक्त राजकारण कसं स्थापित (एस्टॅब्लिश ?) होत गेलं हे दिसतं... आंबेडकरी चळवळीच्या दशा आणि दुर्दशा स्पष्ट दिसत आहेतच. भोचक - एका समयोचित आणि उत्तम लेखाबद्दल अनेक धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/26/2009 - 20:45
समाजाच्या प्रगतीला अडचणीचे ठरणारे जन्मजात जातिभेद मोडून काढले पाहिजे यासाठी सावरकरांनी जे विविध लेखन केले ते आजही वाचले जातात. हिंदुधर्मातील काही आत्मघाती प्रथांवर त्यांनी लेखणी चालवली. सावरकरांनी जन्मजात आरक्षणामुळे जातिभेद वाढीला लागेल असा एक विचार मांडल्याचे स्मरते..मात्र त्यांची उपेक्षा होते वगैरे तितकेसे पटत नाही. असो, समयोचित लेखाबद्दल अभिनंदन !

विद्याधर३१ गुरुवार, 02/26/2009 - 21:12
केवळ स्वातन्त्रवीर म्हणून नव्हे तर एक उत्तम कवी, भाषाप्रभु, साहित्यिक, विज्ञानवादी, समाजसुधारक अश्या सर्व गुण संपन्न नरशार्दुलाला कोटी कोटी प्रणाम. विद्याधर

कलंत्री गुरुवार, 02/26/2009 - 23:31
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो. द्विराष्ट्राच्या कल्पनेने त्यानी नकळतच जीनांचे हातच बळकट केले. या लेखाचा उद्देश हा वरील प्रकारच्या प्रतिसादासाठी नाही हे मान्य करुनही मला मात्र सावरकरांच्या एका कृतीवर आयूष्यभर नतमस्तक व्हायला आवडेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू असताना अनेक लोक त्यांना बेळगाव महाराष्ट्रात यावा म्हणून चळवळीत सहभागी व्हावे म्हणून विनंती करायला गेले. सावरकरांनी जर चळवळीचे नेतृत्व केले असते तर कदाचित आजचे राजकिय चित्र वेगळे असते. मात्र सावरकरांचा प्रतिसाद असा होता, जोपर्यंत बेळगाव महाराष्ट्रात अथवा कर्णाटकात आहे मला त्याची चिंता नाही, पण बेळगाव जर पाकिस्तानमद्ये जाणार असेल तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनही मला या चळवळीत भाग घ्यायला आवडेल. इतका प्रामाणिक माणूस मी पाहिला नाही असे माझे मत नमूद करतो. मराठी भाषेच्या बाबतीत मला सावरकरांचे कार्य आणि विचारांचा अभिमान आहे असे ही मी नमूद करतो आणि या श्रेष्ठ भाषाप्रेमीसमोर मी नतमस्तक होतो. अवांतर : सावरकरांची आणि माझी जन्मभूमी एकच आहे.

In reply to by कलंत्री

विकास Fri, 02/27/2009 - 03:21
सावरकरांचे आशिर्वद घेयला काँग्रेसविरहीत सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते ५०च्या दशकात गेले असताना त्यांनी या अर्थी सांगितले होते की देशांतर्गत सीमा कशाही राहूंदेत पण चिनी माओ आपल्या देशाच्या सीमेवर हल्ला करतो आहे त्याच्याकडे त्या नेहरूंना लक्ष देयला सांगा. नंतर काय झाले ते आपल्याला माहीत असेलच... त्या नामुष्कीनंतर सावरकरांची पुन्हा एकदा मला कुठले ते आठवत नाहीत शोधून सांगेन (माझ्याकडे कुठेतरी पुस्तक आहे) पण गोखल्यांनी (दि.वि. नाहीत) मुलाखत घेतली. त्यात सावरकरांनी असेही सांगितले की आता नेहरू ती जबाबदारी मेननवर टाकून मोकळे होतील. मग संरक्षण खाते कोणाकडे असावे याला त्यांनी उत्तर दिले की आत्ता मराठी माणसाची तेथे गरज आहे. काँग्रेसमधे असे संरक्षणासाठीचे नेतृत्व हे यशवंतराव चव्हाण देऊ शकतील. मग त्यांनी काय करावे हे त्यांना वाटलेले विचार त्यांनी सांगितले. सरते शेवटी विनंती केली की हे विचार चर्चा/विचार/लेख स्वरूपात प्रसिद्धीस आणा पण माझे नाव त्यात घालू नका (की सावरकर असे म्हणाले वगैरे...) कारण तसे म्हणाल तर नेहरू उलटे वागतील. आठवणी प्रमाणे चीनच्या हल्ल्याच्या वेळेस सावरकर बेळगावहून कदाचीत मूंबईस येयला निघाले होते का उलट. तर त्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्थानबद्ध केले होते...

In reply to by कलंत्री

सातारकर Fri, 02/27/2009 - 09:40
ह्यासाठी
सावरकरांचा विचार एका तटस्थ नजरेतून करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे भाषा शुद्धी हेच होते असे म्हणावेसे वाटते. राजकिय पुरुष म्हणून सावरकर पूर्णपणे अयशस्वी झाले असे माझे मत आहे. त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या आणि फक्त पुस्तके लिहुन कार्य होईल असा समज असावा असे अतिरेकी मत मांडण्याचाही मला मोह होतो.

समिधा Fri, 02/27/2009 - 01:15
लेख आणी बाणाने प्रतिसादात दिलेले फोटो खुपच सुंदर आहेत. फोटो बघुन शेवटी अपोआप हात जोडले गेले. छायाचित्रांबद्दल धन्यवाद मदनबाण..! तुम्ही लिहीलेल्या लेखातला शब्द आणि शब्द खरा आहे.

विसोबा खेचर Fri, 02/27/2009 - 09:02
पण गेले वर्ष सावरकरांचे १२५ वे जयंती वर्ष असूनही सरकारी पातळीवर सारे काही थंड होते. सावरकरांची उपेक्षा अजूनही संपलेली नाही, याचा हा पुरावा. भोचकगुरुजी, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.. मदनची चित्रेही सुरेख..! तात्या.