मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जीव झाडाले टांगला...!

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला..! यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि उत्तरा केळकरांनी गायलेलं हे अप्रतीम गाणं इथे वाचा, इथे ऐका! खोपा हे वास्तविक सुगरणीचं घर, घरटं! त्या घरट्याला झोक्याची किती सुंदर उपमा बहिणाबाईंनी दिली आहे! एखाद्या घरट्याला तुम्हीआम्ही झोका, झोपाळा असं म्हणू शकतो का हो? परंतु बहिणाबाई त्याला किती सहजपणे झोक्याची उपमा देतात! क्या केहेने..! पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला झुलता बंगला?!! :) एखाद्या झाडावरील सुगरण पक्ष्याच्या घरट्याला बहिणाबाई 'बंगला!' असं संबोधतात! किती ही शब्दांची श्रीमंती, मनाची श्रीमंती! तुम्हीआम्ही एखादा बंगला बांधतो आणि 'आमचा काय, बंगला आहे बॉ!' म्हणून स्वत:चं आणि स्वत:च्या बंगल्याचं कित्ती कित्ती कौतुक करत बसतो..! परंतु बहिणाबाई मात्र त्या खोप्याला अगदी सहजपणे बंगला असं संबोधून जातात! प्रत्यक्षात एखाद्या बंगल्यात स्वत: बहिणाबाई तरी कधी गेल्या असतील का हो?! :) आणि बंगला कसा? तर झुलता बंगला! बहिणाबाईंनी सुगरणीला नुसत्या नव्हे तर झुलत्या बंगल्याचं आर्किटेक्ट बनवलं आहे! :) तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला नि:शब्द...!!! 'जीव झाडाले टांगला' ह्या ओळीतील 'झाडाले' या शब्दात यशवंत देवांनी किती सुरेख आस ठेवली आहे! क्या बात है...! अहो त्या सुगरणीची पिल्लं असतात हो त्या खोप्यात! का नाही तिचा जीव टांगणीला लागणार? एखादी चाकरमानी स्त्री जेव्हा स्वत:च्या चार सहा महिन्याच्या पिल्लाला एखाद्या पाळणाघरात ठेऊन आठ आठ दहा दहा तास घराच्या बाहेर असते तेव्हा तिचा जीवही त्या पिल्लाकरता टांगणीला लागतच असेला ना? मग सुगरणीचा का बरं लागू नये? भले मग ती पिलं एखाद्या झुलत्या बंगल्यातच का असेनात! जीव झाडाले टांगला ह्या ओळीतली आस, ममत्व यामुळे गाण्यात ही ओळ ऐकतांना क्षणात डोळ्यात पाणी येतं, क्षणभर का होईना, परंतु जिवाची घालमेल होते! चित्रसौजन्य : मिपाकर झकासराव यांचा हा लेख! त्या सुगरणीचा खोपा हा शब्दश: झाडाला टांगलेला असतो.. 'लौकर ये बाबा, उगाच जीव टांगणीला लावू नकोस..' असं आपण नेहमी म्हणतो. इथे बहिणाबाईंनी हा वाक्प्रचार किती सुंदररित्या कवितेत वापरला आहे! असो... पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी! आज जरा मूड लागला म्हणून तात्याने ह्या वेड्यावाकड्या चार ओळी खरडल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर छानच, नाय आवडल्या तर राहिलं! :) जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..! बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो.. पुढची कविता तात्यामास्तरांकडून पुन्हा केव्हातरी शिका! :) घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! -- तात्या अभ्यंकर.

वाचने 14570 वाचनखूण प्रतिक्रिया 43

आपला अभिजित Fri, 02/27/2009 - 00:27
तात्या, झकास लेखन! बाकी, तुमचे मुखप्रुष्ठावरचे रसग्रहण (आणि नाठाळांच्या पार्श्वभूमीवरील लत्ताप्रहारही!) उत्तमच असते. पण दरवेळी प्रतिक्रिया देणे जमत नाही. बाकी, सुगरण पक्ष्याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं. एवढं सुंदर घरटं तिथे नर बनवतो आणि मादीला आकर्षित करू पाहतो. मादी मग त्या घरट्याचं `इन्स्पेक्शन' करून त्यात राहायचं की नाही, हे ठरवते. राहिली, तर पटली. नाही, तर बसा बोंबलत!! आणि आपण क्रेडिट मात्र सुगरणीला (मादीला) देतो. कलीयुग आहे बाबा!!!

In reply to by मुक्तसुनीत

अवलिया Fri, 02/27/2009 - 08:12
हेच म्हणतो उत्तम लिखाण --अवलिया

In reply to by अवलिया

मस्त आणि उत्कट लिखाण. पण थोडक्यात आटोपलंस रे भाऊ..... पूर्ण लिही ना... बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन Fri, 02/27/2009 - 09:27
घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! क्या बात है ! सही तात्या.. सुंदर वाक्य ! हे आठवलं बघा.. लगेच. निळा पारवा वसुंधरेच्या माथ्यावरती घुमतो आहे आभाळाचा निळा पारवा. डोळ्यावरती राखी ढापण, लक्ष सदाचें धनिणीपाशी अन धनिणीच्या पायामधल्या रुणझुणणाऱ्या नादापाशी. -अवचित काही घडलें आणि दचकला निळा पारवा; टपोरल्या डोळ्याच्या गुंजा. जाती त्याच्या अगदी जवळून किलबिलणारे कुणी मुशाफिर रंगित पक्षी… कुणी घासली चोच तयावर; कुणी घातली शिळ तयाला; ऐकवैली…पंखाची फडफड; दाखविले चित्रांकित वैभव पंखावरचे. गिरकी घालुन त्याच्या भवती निघुन गेले.. धुंद मुशाफिर; झुलवित अपुले पंखे, झुलवित त्याला. पुन्हा दचकला निळा पारवा’ मनात भरले वारे–\ पिसा पिसातुन थरथरणारे; फुगली पंखे; उचलुन धरला पोटापाशी पाउ एकुटा; मान ताठली जरा खालती झेंप भाराया… तोच वरी ये वसुंधरेचा तांबुस गोरा कोमलसा कर. भरवई त्याच्या टोची मध्ये एकच मोती शुभ्र टपोरा, एकच माणिक , झगमगणारे. पुन्हा टेकले पाउल खाली; नितळाई ये पुन्हा पिसांवर -आणि लागला पुन्हा घुमाया आभाळाचा……. निळा पारवा. इंदिरा संत. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

समिधा Fri, 02/27/2009 - 00:55
खुपच मस्त लिहीलाय लेख तुम्ही तात्या, तुमच लिखाण कायमच चांगल असत. :)

शितल Fri, 02/27/2009 - 01:04
तात्या, बहिणाबाईंची अप्रतिम काव्य ओळी घेऊन सुंदर लिखाण. :) बहिणाबाईंच्या ह्या काव्यात आईच्या प्रेमाची उब जाणवते.

प्राजु Fri, 02/27/2009 - 01:07
बरेच दिवसांनी लेखणी सरसावली तात्या! उत्तम.. ! उत्तम रसग्रहण! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे Fri, 02/27/2009 - 02:25
लहानपणी सुगरण पक्ष्याचं घरटं पाहिले होते. त्यातली कप्प्यांची रचना, कलाकुसर पाहिलं की थक्क व्ह्यायला होतं बहिणाबाईंच्या कवितेचा तर आनंद लुटायचा .... भरभरून.

मनीषा Fri, 02/27/2009 - 06:32
पाखराची कारागिरी देख रे मानसा .... किती सोप्या शब्दात...केव्हढी मोठी गोष्ट सांगीतली आहे . मानवाला स्वतःच्या बुद्धीचा, कर्तुत्वाचा इतका अभिमान/गर्व आहे ...पण हे लहानसे पाखरु सुद्धा कमी नाही .. कविता सुंदरच आहे आणि त्याचं रसग्रहण सुद्धा सुरेख ..

In reply to by रामदास

असेच म्हणतो. सुरेख रसग्रहण तात्या. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

लवंगी Fri, 02/27/2009 - 07:04
एकदा गावाला गेले होते तेंव्हा वाडीमध्ये एका झाडाखाली सुगरणीचा खोपा पडलेला मिळालेला.. रिकामा होता. तेंव्हा तो बाबांनी मध्ये कापून दाखवला होता. अतिशय सुंदर वीण होती. आत कप्पे होते. इवलासा जीव इतके सुंदर घरटे बांधतो हे खरच वाटत नाही. बहीणाबाईंनी थोडक्या शब्दात या पाखराचे आईपण दाखवले आहे.

विकास Fri, 02/27/2009 - 07:11
एकदम मस्त! या गाण्याचे चित्रीकर्‍ण मला वाटते भक्ती बर्व्यांवर झाले होते. या पारंपारीक-अधुनीक मिश्रीत सुरेख चालीबरोबरच मला आठवतेकी बहुदा आशाच्या आवाजात पण एका वेगळ्याच चालीत हे गाणे आहे. ती चाल पण खूप छान आहे. कदाचीत सुधीर फडक्यांची असावी. मानिनी मधे होते का ते आठवत नाही...

सहज Fri, 02/27/2009 - 07:12
ह्या रसग्रहणात फक्त बहिणाबाईंच्या काव्याचाच भाग आहे, (रागदारी) संगीतातील उल्लेख जवळजवळ नाहीच. तात्या तुम्ही कविता का बरे लिहीत नाही? :-)

सुक्या Fri, 02/27/2009 - 07:15
सहजसुंदर रसग्रहण आवडले. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

छोटा डॉन Fri, 02/27/2009 - 09:33
सुंदर रसग्रहण तात्या, मजा आली ... >>घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! वाह .. क्या बात है ...!!! बाकी बहिणाबाईं विषयी काय बोलायचे, अगदी वेचक साध्यासोप्या शब्दात योग्य तो संदेश पोहचवण्यात त्यांचा हातखंड. यानिमीत्ताने आपण टाकलेल्या मुखपॄष्ठावरील भाईकाकांचा किस्सा आठ्वला ... मस्त आहे, चालु द्यात ..!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सुप्रिया Fri, 02/27/2009 - 10:25
उत्तम रसग्रहण!!! असेच म्हणते. अशा सुंदर काव्याची आठवण करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

वेताळ Fri, 02/27/2009 - 10:29
बहिणाबाईंच्या सर्वच कविता खुप सोप्या पण आशयपुर्ण आहेत. प्रत्येक कविता त्यानी वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवल्या आहेत. ह्या अगोदर तुम्ही अरे संसार संसार ह्या कवितेचे मुखपृष्ठ तयार केले होते ते देखिल खुप छान होते. वेताळ

In reply to by वेताळ

मृगनयनी Fri, 02/27/2009 - 10:35
घरट्याची उब ती घरट्याचीच उब! मग ते उबदार घरटं कुणा तुमच्याआमच्यासारख्यांचं असो, काऊचिऊचं असो, वा बहिणाबाईंच्या लाडक्या कुण्या सुगरणीचं असो. पंचतारांकीत हाटेलातल्या सुसज्ज खोल्यांना त्याची सर नाही! तात्या... खूप छान ! आवडलं! :) आपलं घर ... ते आपलं घर.... मग ते चंद्रमौळी झोपडी का असेना! युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by मृगनयनी

मिंटी Fri, 02/27/2009 - 10:37
+१ सहमत........ तात्या नेहमीप्रमाणेच उत्तम लिखाण..... :) मनापासुन आवडलं.... :)

In reply to by मिंटी

आनंदयात्री Fri, 02/27/2009 - 12:44
खुप छान लिखाण. आत्ता कुठे त्या विवेचनाचा आनंद घेतोय असे झाले की लेख संपला.

झेल्या Fri, 02/27/2009 - 10:37
तात्या गुरूजींचा तास आवडला. पण तास पाच मिनिटांतच संपला. अजून असे रसग्रहण वाचायला नक्कीच आवडेल तात्या. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

Fri, 02/27/2009 - 11:27
जीव झाडाले टांगला.. ही ओळीला, त्याच्या चालीला, त्यातल्या गायकीला आपला सलाम..! माझाही सलाम. तात्या, सुंदर रसग्रहण. पुढल्या कडव्यांबद्दलचं रसग्रहण/प्रवचन पुन्हा कधितरी! हे "कधितरी" लौकर येवो ही विनंती.

जागु Fri, 02/27/2009 - 12:58
तात्या खुपच छान लिखाण आहे तुमच. खरच वाचताना जीवाची घालमेल झाली हो. आमच्या सारख्या नोकरदार आयांचा असाच रोज जीव टांगलेला असतो हो. माझी पण ३ वर्षाची मुलगी आहे. म्हणुन मला टांगलेल्या जीवाची स्तिथी चांगली माहीत आहे.

समीरसूर Fri, 02/27/2009 - 15:49
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात कवितेचा गाभारा उलगडून दाखवला आहे तुम्ही तात्या!! खूपच सुंदर! अवांतरः बहुतेक सगळ्यांना ही अहिराणी भाषा आहे असे वाटते. पुण्या-मुंबईकडे बहिणाबाईंच्या कविता अहिराणी भाषेत आहेत असे सर्रास म्हटले जाते पण ते चूक आहे. बहिणाबाईंच्या या गोड कविता खान्देशी (अगदी खास जळगावच्या आणि जळगाव जिल्ह्यात बोलल्या जाणार्‍या) भाषेत आहेत. अहिराणी भाषा ही खूप वेगळी आहे आणि ती नाशिक जवळच्या सटाणा, कळवण, धुळ्याजवळच्या नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या भागात बोलली जाते. अहिराणी भाषा पटकन समजायला अवघड आहे. फार वर्षांपूर्वी किशोरी शहाणेला घेऊन 'सटीना टाक' नावाचा एक अहिराणी चित्रपट प्रदर्शित झाल्याचे स्मरते. त्यात्या, येऊ द्या अजून फर्मास लेख! --समीर

अनामिका Fri, 02/27/2009 - 16:09
तात्या.......... अतिशय सुंदर व अप्रतिम रसग्रहण!!!!!!!!!!!१ कुठे तो सुगरणीचा खोपा आणि कुठे आपली दगड विटांनी बांधलेली घरे! तिच्या त्या सुंदर खोप्याची उब माणसांनी बांधलेल्या आद्ययावत घरांमधे मिळते का आताशा? घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती! त्यात असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती! आपण घरे बांधुन मनात या कविता आणि गाणीच म्हणत बसतो. तो जिव्हाळा ती उब आताशा खरच इतिहासजमाच झाली आहे या स्वार्थी जगात. त्या सुगरणीच्या खोप्यात मनुष्यप्राणी शरीरानेच काय मनाने देखिल मावु शकणार नाही कधीच? "अनामिका"

चतुरंग Fri, 02/27/2009 - 19:30
वरती सर्वांनी सगळे शब्द वापरलेत. तुझ्या लिखाणात अवचित हळवेपणाचा असा काही स्पर्श असतो ना की जणू बेसावधपणे भैरवी ऐकताना काळजात खोलवर घुसणारा एखादाच स्वर, का ते कळत नाही पण जाणवत मात्र रहातं! एवढं तुटपुंजं मात्र नका लिहू बॉ! आम्हा वाचणार्‍यांची घालमेल होत रहाते. :( चतुरंग