मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तीन किस्से

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तीन किस्से शनिवारी माझ्या दवाखान्यात जरा गर्दीच होती. त्यातीलच हे तीन किस्से. नावे काल्पनिक आहेत पण घटना सत्य आहेत. १)- एक ३६ वयाचा तरुण (रुपेश भोईर) आला होता. पोटदुखी साठी. सोनोग्राफी केल्यावर लक्षात आले कि बाहेर खाल्ल्यामुळे त्याचे पोट बिघडले होते आतड्याला सूज अली होती अन्न विषबाधा सारखा प्रकार. मी त्याला म्हणालो कि साहेब तुमचे बहुधा बाहेरच्या खाण्यामुळे किंवा बाहेरच्या पाण्यामुळे पोट बिघडले आहे. त्यावर रुपेश म्हणाला डॉक्टर आमच्या कंपनीचे कॅन्टीन चांगले नाही म्हणून मग रोज बाहेर खावे लागते. मी त्या विचारले कि मग तुम्ही घरचा डबा का घेऊन जात नाही. त्यावर तो आढेवेढे घेऊन कडू तोंड करून म्हणाला डॉक्टर माझी बायको सकाळी लवकर उठत नाही. मी विचारले त्या नोकरी करतात का? रुपेश :- नाही. मी:- तुम्ही घरातून किती वाजता निघता ? रुपेश :- आठ वाजता. पण ती उठतच नाही. आणि रात्री झोपायला अकरा वाजतात.काय करणार? मी ;- तुम्ही चांगले पोळीभाजी केंद्र पाहून तेथून साधा पोळी भाजीचा डबा नेत जा. हॉटेलचे मसालेदार आणि तेलकट जेवण रोज खाणे दूरवरचा विचार केला तर फायद्याचे नाही. यानंतर आम्ही दोघेही गप्प बसलो २)- पोटात कसंतरी होतंय म्हणून सायली मांजरेकर वय वर्षे ४४ आल्या होत्या. पूर्ण तपासणी केल्यावर पाहिले तर कुठेच काही नव्हते. मेनोपॉज पण जवळ आलेला नव्हता. पाळी पण व्यवस्थित येत होती. आतडी फक्त जोरात हालचाल करत असताना आढळली. परत पूर्ण तपासणी करून मी त्याना म्हणालो कि हा कदाचित तुमच्या मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर होत असावा. मी त्यांना म्हणालो तुम्ही इथे झोपला आहेत तर तुमच्या डोक्याखाली उशी आहे त्याचा स्पर्श तुम्हाला जाणवतो आहे. हाच जर अजगर आहे असे तुम्हाला समजले तर काय होईल? तुमचे तोंड कोरडे पडेल, छातीत धडधडायला लागेल, हातापायाला कापरे सुटेल. स्पर्श तोच आहे मग असे का होते? तर तुमच्या मानसिक ताणाचा शरीरावर होणार परिणाम आहे. (somatisation) त्यावर त्या एकदम बांध फुटल्यासारख्या बोलायला लागल्या. आमचे "हे" एका प्रथितयश कंपनीत "सी इ ओ" आहेत. पण त्याना माझ्यासाठी वेळच नाही. मला काय आजार आहे कुठे दुखतंय ते सांगितले तर म्हणतात माझा डोकं खाऊ नको आपल्या फॅमिली डॉक्टरना दाखव. आता प्रत्येक बारीक बारीक गोष्ट मी डॉक्टरना कशी सांगणार? तुम्हीच आमच्या "ह्यांना" काहीतरी समजवा. आता मी त्यांच्या "ह्याना" काय समजावणार? मुळात ते आलेलं नव्हतेच, त्यातून मी त्यांना ओळखत नाही आणि माझा काय अधिकार आहे त्यांना काही सांगायचा? मी केवळ मान डोलावत होतो. त्या चार पाच मिनिटे बोलून शांत झाल्या. मी त्यांना समजावत म्हणालो कि तुम्ही जेंव्हा मिस्टरांना वेळ असेल तर त्यांच्याशी शांतपणे "तक्रार न करता" बोला. हा प्रश्न तुम्हाला चर्चेद्वारेच सोडवायचा आहे. मानसिक ताण कुणाला नाही पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मानसिक तणावाचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ न देणे तुमच्या हातात आहे. मग त्यासाठी तुम्ही सद्गुरूंचा आधार घेऊ शकता, ब्रम्हविद्या, ध्यानधारणा, योगिक क्रिया, प्राणायाम किंवा मनोविकार तज्ञ यांच्यापैकी जे तुम्हाला पटेल रुचेल त्याकडे तुम्ही जाऊ शकता. त्यांनी मग रिपोर्ट घेतला पैसे दिले आणि म्हणाल्या डॉक्टर सॉरी हं तुमच्या "बिझी" वेळेत मी जास्त वेळ घेतला. मी हसून त्यांना समजावले कि काही वैयक्तिक प्रश्न असतात ते डॉक्टर सोडवू शकेलच असे नाही पण कुठे जायचे त्याचा मार्ग कदाचित दाखवू शकेल. त्यांनी परत दिलगिरी व्यक्त केली आणि त्या गेल्या. ३) एक एकोणीस वर्षांची लग्न न झालेली मुलगी पाळी चुकली म्हणून आली होती. तिला चार पाच महिने झाले होते आणि तीचा गर्भपात करायचा होता. तिची आई आणि आत्या तिच्या बरोबर आलेल्या होत्या. मी तिला पाहिले तर तिचे १९ आठवडे आणि २ दिवस झाले होते. मी बाहेर आलो तिच्या आईला आणि आत्याला समजावत होतो कि तुमच्या हातात फक्त ५ दिवस आहेत कारण २० आठवड्यानंतर तुम्हाला कायद्या प्रमाणे गर्भपात करता येणार नाही. तिची आई ओक्सबोक्शी रडत म्हणाली डॉक्टर काय सांगणार? हिने नोव्हेंबर मध्ये पण सोनोग्राफी केली होती तेंव्हा पण कळले होते कि ती गर्भार आहे. पण तिने आम्हाला सांगितलेच नाही. पाळी आली /येते आहे असे खोटे सांगत होती.आता पोट दिसायला लागले तेंव्हा विचारल्यावर म्हणाली कि मी गरोदर आहे. तिचा "मित्र" ३५ वयाचा लग्न झालेला आहे आणि दोन पोरांचा बाप आहे. त्याने तिला सांगितले कि मी या मुलाला पण पोसेन. तू काळजी करू नको आणि गर्भपात करायची गरज नाही. आणि हि पण अक्कलशून्य आहे ती पण म्हणते कि तो मला फसवणार नाही.कशी फशी पडली ते समजत नाही. आणि अजूनही समजून घ्यायला तयार नाही. तिला विचारले कि तो लग्न करायला तयार आहे का? त्यावर ती म्हणाली की आम्ही मनाने लग्न केलेच आहे मग काय फरक पडतो. तिला पुढच्या आयुष्याबद्दल सांगून कसे तरी तयार केले आहे. एकदा "मोकळी" केली कि आम्ही सुटलो. मी हतबुद्ध झालो. काय बोलणार? त्यांचे कसे तरी सांत्वन केले.

वाचने 17334 वाचनखूण प्रतिक्रिया 45

In reply to by णरुअ

नमकिन Wed, 12/28/2016 - 14:39
सहमत ३-किती तरी तरुण लग्नाचे वय सरेपर्यंत ताटकळत, स्वतःला वाम:मार्गाला चकवत उभे आहेत तेव्हा याच मावशा / आत्या काड्या घालत असतात. टीप- मी चतुर्भुज आहे २- सुखाची अॅलर्जी. नव-याला व्याप असतील तर तो हिचे "हट्ट" कसे पुरवेल, ४४ वयात स्वतःला आपल्या नव-याला सांगण्याची एक परिणामकारक पद्धति सापडत नसेल तर सोपा मार्ग द्या दोष १- काही काम न करता घरी पडून रहाने, ९-१०वा पर्यंत पसरणे, अशा वेळी कुठलीच जबाबदारी अंगावर न घेण्याचे प्रशिक्षण माहेरी पूर्ण केलेले असते व त्याला व्यक्ति स्वातंत्र्य, स्त्रीपुरुष समानता, कुठल्या स्त्रीमुक्ती संघटनांचा कथित आधुनिकता बाबी, चूल व मुल यात अडकून पडू नये इ इ चा परिपाक. बिचारा नवरा.

In reply to by नमकिन

विशुमित Wed, 12/28/2016 - 15:05
१. साठी - लग्नाची सुपारी फोडल्यानंतर जेव्हा आम्ही दोघे फोन वर बोलायला सुरवात केली होती त्यावेळेस तिने माझ्या अपेक्षा विचारल्या होत्या. तिला म्हंटलं माझी एकच अपेक्षा आहे म्हंटलं 'मी ७-८ वर्ष बॅचलर लाईफ जगलो आहे आणि बाहेरचे (मेस) खाऊन जाम वैतागलो आहे, मला तेवढं २ टाईम स्वतःच्या हातचे खाऊ घाल बाकी वाटले तर घरातील सगळी कामे मी करतो'. तिची पण अपेक्षा एकच अपेक्षा व्यक्त केली ' आयुष्यात कसलेच व्यसन करायचे नाही, सुपारीचे पण नाही, तुज्या जवळ बंगला गाडी नसली तरी चालेल'. आम्ही बिचारे अजून आपला शब्द पाळत आहोत. जेव्हा घरचा डब्बा बंद होईल...

In reply to by कपिलमुनी

विशुमित Wed, 12/28/2016 - 16:07
माझ्या बाबतीत संभावित कारणे ही असावीत- - त्यावेळेसच्या अभ्यास आणि नोकरीच्या ऑड वेळा. - शेअर/कॉट बेसिसवर राहत असल्या कारणाने स्वयंपाकाचा सरंजाम मांडणे अवघड होते. - सहचार्यांचा कामे वाटून देण्याचा मेळ न बसवता येणे. - वारंवार प्रयत्न करून ही चपाती नीट गोलाकार न जमणे/ व्यवस्थित भाजता न येणे - सर्वात कंटाळवाणं काम भांडी घासणे.

अनन्त अवधुत Tue, 12/27/2016 - 05:57
भरपूर वेळेस पाहिला आहे. आमंत्रण पण असे देतात , 'तुम्ही आमच्या घरी या, मग आपण पार्सल मागवू.' आठवड्यातून ४ -५ वेळेस तरी आम्ही बाहेरूनच मागवतो, हे वर.

मराठी कथालेखक Tue, 12/27/2016 - 17:56
पहिल्या किस्स्यातील तरुण जो सहकारी रोज डबा आणतो अशा एखाद्या सहकार्‍याकडून डबा मागवू शकतो, असे करणारा एखादा गरजू सहकारी त्याला नक्कीच मिळू शकतो, त्याला थोडा अर्थिक हात्भार होईल, याचे पोट ठीक राहिल. बायकोला सक्ती करण्यात अर्थ नाही.

Nitin Palkar Tue, 12/27/2016 - 18:27
१) रुपेश भोईर - पत्नीसत्ताक कुटुंब पद्धतीचा बळी. २) सायली मांजरेकर - कुटुंबातील सुसंवादाचा अभाव. समुपदेशक/मानसोपचार तज्ज्ञाची गरज. ३) एक एकोणीस वर्षांची लग्न न झालेली मुलगी - शरीर सुखाला चटावलेली मूर्ख मुलगी. आजकाल एवढी साधने सहज उपलब्ध असताना, गर्भारपण नक्की आहे हे माहित असतांना चार महिने जाऊ देणे याला मूर्खपणा शिवाय काय म्हणता येईल.

In reply to by Nitin Palkar

सुबोध खरे Tue, 12/27/2016 - 18:56
गर्भारपण नक्की आहे हे माहित असतांना चार महिने जाऊ देणे याला मूर्खपणा शिवाय काय म्हणता येईल. मला वाटतं कि ३५ वर्षा च्या माणसाची पहिली बायको आणि दोन मुले असताना त्याची दुसरी बायको(?) म्हणून राहणे आणि अनौरस मुलाला वाढवणे याची तयारी दाखवणे हा जास्त मूर्खपणा आहे.

In reply to by सुबोध खरे

वामन देशमुख गुरुवार, 12/29/2016 - 13:08
हा मूर्खपणा आहे की शूरत्व (Shourya), आत्मसमर्पण, व्याभिचार, प्रेम, वासना, फसवणूक, मज्जा की अजून काही हे आपण मर्त्य मानव आपल्या वकुबानुसार ठरवणार, नाहीतरी लॉर्ड बायरन म्हणूनच गेलाय, “What men call gallantry, and gods adultery, is much more common where the climate's sultry.” ―Lord Byron हघ्याहेवेसांन

पैसा Tue, 12/27/2016 - 18:54
एकाच दिवसात असे तीन तीन अनुभव ऐकणे डॉक्टरच्याच नशीबात असते. कुटुंबात कोणाची चूक अन कोणाला भोगावे लागते. लोक खूपदा कौटुंबिक भावनिक ब्लॅक मेलिंग सहन करतात.

In reply to by पैसा

सुबोध खरे Tue, 12/27/2016 - 19:03
पैसा ताई खरं तर असे अनुभव सगळ्या डॉक्टरना रोजच येत असतात पण ते लिहीत नाहीत. काल संध्याकाळचीच गोष्ट-- एक लग्न न झालेली गरोदर मुलगी आली होती २ महिने झाले( ८ आठवडे) म्हणून. पण सोनोग्राफी केल्यावर ती सव्वा तीन महिने(१३ आठवडे) गरोदर आहे हे समजले. (१० आठवड्यनंतर गर्भपात करण्यासाठी दोन स्त्रीरोग तज्ञाची संमती लागते) तिचा मित्र (बॉयफ्रेंड) मला नंतर विचारत होता असं कसं शक्य आहे? कारण आमचा "संबंध" दोन महिन्यापूर्वीच आला होता? मी शांतपणे त्याला सांगितले कि मुलाचे हात पाय मेंदू पहिला कणा इ स्पष्टपणे दिसत आहेत जे ११-१२ आठवड्यानंतरच दिसतात. मुलाची लांबी डोक्याचा पोटाचा परीघ आणि मंदीच्या हाडाची लांबी हे सर्व १३ आठवडे दाखवत आहे तेंव्हा मूळ १३ आठवड्याचे आहे यात मला शंका नाही. बाकी तुमचे संबंध कधी आले याबाबत मी काय सांगणार?

In reply to by सुबोध खरे

मराठी कथालेखक गुरुवार, 12/29/2016 - 13:56
तिचा मित्र (बॉयफ्रेंड) मला नंतर विचारत होता असं कसं शक्य आहे? कारण आमचा "संबंध" दोन महिन्यापूर्वीच आला होता?
म्हणजे तिचा एक्स-बॉयफ्रेंड असेल.. सध्याच्या बॉयफ्रेंडने 'सुटलो' म्हणत निश्वास टाकायला हरकत नाही :)

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे Fri, 12/30/2016 - 20:06
मागे एका धाग्यावर मी लिहिले होते कि एका लग्न न झालेल्या मुलीने माझ्या स्वागत सहायिकेस विचारले होते कि माझे दोन बॉय फ्रेंड्स आहेत त्यापॆकी कुणाचे हे मूल आहे हे सांगता येईल का? यावर मिपावर काही लोकांनी गहजबही केला होता.

रेवती Wed, 12/28/2016 - 02:56
खटपट्याजींशी सहमत. पहिल्या किश्श्यातील समस्या सुटण्यासारखी आहे. पोळीभाजी केंद्रातील डबा किंवा अदल्या रात्रीचा ताजा स्वयंपाक जास्त करून आपला आपण डबा भरून नेणे. सकाळी लवकर उठून डबा करणे, तोही रोज हे काहीजणांना जमत नाही. दुसरी समस्या डॉ. नी सांगितल्याप्रमाणे चर्चेने सुटण्याची शक्यता व तिसरी समस्या अजून जन्माला यायचिये.

In reply to by रेवती

नरेश माने Wed, 12/28/2016 - 13:24
अदल्या रात्रीचा ताजा स्वयंपाक जास्त करून आपला आपण डबा भरून नेणे.>>>>>>> हे सहज शक्य आहे. मी आठवड्यातून दोनदा तरी रात्रीची उरलेली भाजी सकाळी गरम करून कार्यालयात घेऊन जातो.

बाजीप्रभू Wed, 12/28/2016 - 10:02
या पहिल्या किस्स्यावरून माझ्या लग्नाळू वयातलं आईचा सल्ला आठवला. मी एखादी फटाकडी मुलगी दाखवली कि आईचा पहिला प्रश्न असायचा कि तुला शो पीस हवाय कि वेळेवर डबा देणारी हवीय याचा आधी विचार कर आणि मग निर्णय घे.

In reply to by बाजीप्रभू

मराठी कथालेखक गुरुवार, 12/29/2016 - 13:59
(माझ्या निरिक्षणातून) मला वाटतं सुंदर मुली नीट काम करतात, नम्र असतात. त्याउलट कुरुप स्त्रिया आक्रमक , रागीष्ट , आळशी आणि हेकेखोर देखील असतात (अपवाद वगळून)

दिपुडी Wed, 12/28/2016 - 12:41
मला माहित आहे माझा प्रश्न सदर धाग्याशी संबंधित नाही परंतु प्रश्न कुठल्या धाग्यावर विचारावा हे न कळल्यामुळे इथे विचारत आहे मिपावर गरोदरपणसंदर्भातील व्यायाम वा इतर प्रश्न यासाठी एखादा धागा आहे का

In reply to by विशुमित

अप्पा जोगळेकर गुरुवार, 12/29/2016 - 12:29
कशाला ? त्यापेक्षा खाजकुयलीची तुसे बायकोच्या अंगावर टाकून हपिसात पळून जावे. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सची केस पण होणार नाही. आणि दुसर्‍या दिवशी डबा मिळेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 12:54
खाजकुयलीची तुसे अंगावर टाकल्याने दुसऱ्यादिवशी डब्बा कसा मिळेल हे नाही समजलं.

गामा पैलवान Wed, 12/28/2016 - 18:09
Nitin Palkar,
शरीर सुखाला चटावलेली मूर्ख मुलगी. आजकाल एवढी साधने सहज उपलब्ध असताना, गर्भारपण नक्की आहे हे माहित असतांना चार महिने जाऊ देणे याला मूर्खपणा शिवाय काय म्हणता येईल.
एकोणिसाव्या वर्षी वाहवत जाण्याचा धोका असतो. तो वेळच्या वेळी ध्यानात न येणं हे चूक झाली. मात्र ती मुलगी चटावलेली वाटंत नाही. मूर्खपणा म्हणाल तर तसंही दिसंत नाही. भोळसटपणा (naivety) म्हणा हवं तर. आवडत्या पुरुषाचं बीज रुजवायची इच्छा प्रत्येक बाईला असतेच. सांगायचा मुद्दा काये की मुलगी चटावलेली असती तर अशी भोळसटपणे वागली नसती. पुरुषसुखाला चटावलेल्या मुली चांगल्याच चालू असतात. आ.न., -गा.पै.

चिनार Fri, 12/30/2016 - 16:28
पहिला किस्सा परिचित आहे. मी यापेक्षाही विचित्र परिस्थिती बघितली आहे. प्रेमविवाह झालेल्या माझ्या एक मित्राच्या बायकोला स्वयंपाक करता येत नाही. अर्थात ही बाब त्याला आधी माहिती होतीच. पण लग्नाआधी ह्या गोष्टी फार किरकोळ वाटतात. लग्नानंतर काही दिवस बाहेर जेवण्यात गेले,काही पार्सल मागवण्यात गेले. मग दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाला बाई ठेवण्यात आली. मित्र बायकोला म्हणाला, त्या बाईंकडून स्वयंपाक शिकून घे थोडासा संध्याकाळच्या वेळी येतात तेंव्हा. काही दिवसांनी बायकोने त्या बाईंचे येणे बंद केले. कारण खालीलप्रमाणे, "त्या संध्याकाळी ५ वाजता येतात त्यावेळी मी झोपली असते. माझी झोपमोड होते. मला जमणार नाही."

फारएन्ड Sat, 12/31/2016 - 03:58
डॉ - पहिल्या किश्श्यात १. त्यानेच स्वतः सकाळी काहीतरी डब्याकरता तयार करणे (सॅण्डविच ई) किंवा २. आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवणे हे दोन्ही पर्याय नव्हते का? आठ वाजता बाहेर पडणार्‍याला तेवढे अवघड नसावे (पोट बिघडून घेण्यापेक्षा). तसेच दुसर्‍या बाजूने हे ही - नवर्‍याचे पोट बिघडत आहे हे कळाल्यावर सुद्धा त्याची बायको काही करायला तयार नव्हती का हे कळत नाही. आधी केवळ "बाहेर खायचा पर्याय आहे" म्हणून काही करत नसेल तर एकवेळ ठीक आहे. तिसर्‍या किश्श्यात दोघेही सज्ञान आहेत. त्यांना जज करणे आपले काम नाही. पण 'काळजी' का घेतली नाही कळत नाही.

डॉ अनुभवसंपन्न आहेत हे भाकीत मी अगोदरच वर्तवले आहे (मनाशी). त्यांच्या लिखाणात काही उत्तरे मिळतात तर काही प्रशन उभे राहतात.

सुबोध खरे Sat, 12/31/2016 - 10:15
काही गोष्टी आम्ही डॉक्टर व्यावसायिक नैतिकता म्हणून पाळतो. १) न विचारता अनाहूत (किंवा विचारल्यावर ही) सामाजिक किंवा नैतिक सल्ला कधीच देत नाही. (तुमच्या कडे कुणीही नैतिक अधिष्ठान दिलेले नाही.) उदा. नवऱ्याने स्वतः स्वयंपाक करावा कि बायकोने स्वयंपाकासाठी बाई ठेवावी. किंवा कुमारिकेने विवाहपूर्व/ विवाह बाह्य शरीर संबंध ठेवावे कि नाही इ. सामाजिक प्रश्न हे समाजाने सोडवायचे आहेत. डॉक्टरांनी नाही. डॉक्टरांना फक्त वैद्यकीय विषयातच आणि ते हि अत्यंत मर्यादित ज्ञान असते. २) वैद्यकीय सल्ला तुमच्या विषयापुरताच/ तुमच्या समस्येपुरताच मर्यादित दिला जातो. ३) त्रयस्थ व्यक्ती बद्दल (नातेवाईक, वहिनी, बहीण, साडू इ) हि काय करावे याबद्दल सल्ला दिला जात नाही. जाता जाता सल्ला देणे घातक ठरू शकते. ४) दुसरा अभिप्राय ( सेकंड ओपिनियन) दिले जात नाही. फुकट/ दूरध्वनीवर/ जालावर तर नाहीच नाही. ५) इतर पॅथी बद्दल कोणताही (सकारात्मक/नकारात्मक) सल्ला देत नाही( वैयक्तित रित्या त्यावर अजिबात विश्वास नसला तरीही) ६) कोणत्याही रुग्णाबाबतची माहिती आम्ही स्वतःच्याही आई वडिलांना देत नाही ( जरी ते त्यांचे मित्र असले तरीही).

एमी Tue, 01/31/2017 - 08:07
तिसरा किस्सा बर्यापैकी कॉमन असावा. आत्ता परवाच परीयचयातली एक १९ वर्षीय मुलगी गर्भार आहे हे तिच्या घरातल्यांना ४ महिने झाल्यावर कळलं. कोणाचं मुलं आहे ते सांगत नाहीय. आमच्या शेजारीच राहणारी माझ्याच वयाची मुलगी १८ची झाल्यावर लगेच आपल्या चाळीशीतल्या अविवाहीत संगीतशिक्षकासोबत पळून गेलेली. त्यांनी लग्न केल्याच ऐकलं होतं पण लगेच पालकांकडे परतली होती. दबावाखाली की स्वतःहून माहीत नाही. नंतर ४-५ वर्षांनी तिचं लग्न लावून दिलेलं. ते घटस्फोटात मोडलं. मग काही वर्ष NGOत समाजसेवा करत होती. परत तिशीत पोचल्यावर अजुनेक लग्न. आता बहुतेक खुश आहे. नवरा आयटीतला आहे. मुलगादेखील झालाय. बादवे तुम्ही 'सामाजिक प्रश्न हे समाजाने सोडवायचे आहेत. डॉक्टरांनी नाही.' लिहलंय त्यामुळे वाचकांच्या माहितीसाठी: भारतात जवळपास ५०% (४७ की ५३ नक्की आठवत नाहीय) स्त्रियांची लग्नं आणि एक/दोन मुलं १९- वयातच होतात.

In reply to by एमी

सुबोध खरे गुरुवार, 02/09/2017 - 11:41
http://everylifecounts.ndtv.com/almost-half-indian-women-get-married-age-18-says-un-agency-3666 Child marriage is a violation of child rights, which has a negative impact on growth, health, mental and emotional development, and education opportunities. It also affects society as a whole since it “reinforces a cycle of poverty and perpetuates gender discrimination, illiteracy and malnutrition as well as high infant and maternal mortality rates,” says UNICEF.