मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(आरोळ्या जालीय फेरीवाल्यांच्या)

खेडूत · · जनातलं, मनातलं
प्रेरणा (सदर धाग्याच्या लेखिका आदरणीय आणि सिनियर मिपाकर आहेत. आम्ही त्यांच्या लेखनाचे पंखा आहोत - त्यामुळे धागा टाकताना दोन दिवस विचारच करत होतो - पण आशा आहे की त्या स्वतः आणि ज्यांच्याकडे कळत नकळत निर्देश होते ते सगळेही ह.च घेतील.) पूर्वी निवडक संस्थळे सोडली तर इतर चेपू समूह , संस्थळांवर आतासारखी जिलब्यांची बाजारपेठ खूप कमी होती. मिपा तर अस्तित्वातच नव्हते. पण एकदा मिपा सुरु झाल्यावर मग काही नित्य गप्पांसाठी मिपावर येणार्‍या फेरीवाल्यांची - आय मीन आयडींची आतुरतेने वाट पाहिली जायची. बहुतेक आयडी तेच ठरलेले असल्याने ह्या लोकांबरोबर चांगला परिचय होऊन एक आपलेपणाही तयार होत असे. त्यांच्या येण्याच्या नेहेमीच्या वेळेनुसार कुठल्या गावातून अथवा देशातून कोण कोण आयडी आता येईल, हे आधीच कळायचे. कुठल्या कुठल्या दूरवरच्या देशातून निव्वळ मराठीच्या प्रेमामुळे मिपावर यायचे. गप्पा मारता मारता ते त्यांचे सुख,दुःखही आपल्याबरोबर शेयर करायचे त्यामुळे पुढच्यावेळी आल्यावर, 'कसे आहात?, अलीकडे काय नवीन वाचले ? किंवा 'काय गं आता कशी आहे तुझी लेक', 'का रे बाबा काल उसात- किंवा तुमच्या गावात चांगला बर्फ पडला ना'? अशा प्रकारची विचारपूस आवर्जून व्हायची. माझ्या आठवणीतल्या काही जालीय फेरीवाल्यांच्या आठवणी मी खाली देत आहे. तुमच्या आठवणीही येऊद्या. १. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच खरडफळ्यावर येऊन हुर्रर्रर्र , सूप्रभात किंवा सुप्परभात अश्या आरोळीने दिवसाची सुरुवात होत असे. कांही नाचणाऱ्या स्मायल्या, फोटू किंवा रांगोळ्या टाकून ते कामाला निघून जात असत. तिकडे जाता-जाता केलेल्या खादाडीचे फोटू कधीमधी टाकून इतरांना जळवत असत. २. कांही फेरीवाले मजेशीर असत. त्यांच्याकडून घेण्यासारखे काहीच नसे. फक्त दिवसरात्र गल्लीत फिरून ' मयतरी करणार का मयतरी...' असे ओरडत. कांही जण मैत्री करत पण पुन्हा जरावेळाने 'अन-मैत्री' करत. पण बहुतेक जण किलकिल्या खिडकीतून बघत आणि दुर्लक्ष करत. हे ओळखून मग मैत्रीवाले एखाद्या धाग्यावर जाऊन प्रतिसादात 'व्यनि करा' असे काही सांगत. गल्लीतले इतर लोक म्हणत, '' व्यनि कशाला ? काय ते इथंच बोला की !'' मग परत दोनेक आठवडे दिसत नसत. काही काळाने परत दुसरा फेरीवाला आला असे वाटे, म्हणून बघावं तर त्या आरोळीचा आवाज ओळखीचा वाटे. ज्याम गोंधळून जात गल्लीतले लोक! पण कांही अनुभवी लोक सांगत, 'अरे ! हा तर डू आयडी !' ३. गणपती ते दिवाळीच्या सुमारास मला खास आकर्षण असायचे ते पाककृतींचे. एकापेक्षा एक सुरस फेरीवाल्यांच्या पाककृती वाचून अन फोटू पाहून जळजळ होत असे. कांहीजण फोटू टाकत नसत, त्यावेळी जागरूक मिपाकर त्याला वेळीच फोटूची आठवण करून देत. अन्यथा 'पाकृ काल्पनिक आहे' असे म्हणून हिणवत असत. पुढच्यावेळी ते फेरीवाले फोटूशिवाय पाकृ टाकताना दहादा विचार करीत असत. ४. वीकांताला तर खूप फेरीवाले यायचे. ते रोज नाही पण आठवड्याने वगैरे फेरी असायची प्रत्येकाची. एकदम साठ सत्तर जण आले की नुसती मज्जा सुरु होई. खफवर अन विविध धाग्यांवर जी काय सुसाट बॅटिंग सुरू होई की ज्याचं नाव ते! मोठ्या सुट्ट्या असतील तर ही संख्या खूप वाढायची. गल्ली कशी भरून जायची! अश्या काळात धागे शतकी आणि सहस्रकी होत असत. मनोरंजनासाठी दुसरं काहीच करायचे नाहीत लोक - फक्त मिपा, मिपा आणि मिपाच ! ५. अध्यात्मिक फेरीवाले आले की खूप लांबवरूनच कळायचे. त्यांची प्रतिभाच इतकी अफाट असायची. प्रत्येकाच्याच मनात एक 'स्व' असल्याने ह्याला खूपच डिमांड असायचं. सालं या 'स्व' ची ओळख होणे सोप्पे नाहीच! अतिशय दुर्बोध पण उद्बोधक अशी अध्यात्मावर चर्चा व्हायची. ज्यांनां कांहीच घ्यायचं नसेल तरी तेही घोळका करून घासाघीस बघत बसत. गल्लीत नव्यानं राहायला आलेल्या अनेकांना हे सगळे नवीनच असे. हे कळायचे असेल तर 'व्यासंग वाढवायला हवा भौ' असं ते मनात ठरवत असत. मग खूप ठोकाठोक करून अध्यात्मवाला सगळं ठीक ठाक तरी करून जायचा किंवा एकदम अदृश्य व्हायचा. जाणकार त्यालाच हेवनवासी होणे म्हणत. ६. दोनतीन फेरीवाले तर असे होते की ते फेरीवाले वाटतच नसत- जालीय मित्र असूनही इतके मित्रत्वाचे नाते साऱ्या गल्लीशी- प्रत्येकाचे नातालगच जणू. त्यांच्याकडे ज्ञान अन अनुभवाचा मोठा साठा असूनही गर्व मुळीच नसे. आपली स्वतःची वेळकाळ, गैरसोय न पहाता सतत मदतीला उभे. इतरांना हेवा वाटावा अशी मैत्री झालेली उभ्या गल्लीशी. कधीही फोनवा- त्रासणार नाहीत. मला त्यांचं फार कौतुक वाटतं! अन मिपावर आल्याचं सार्थक वाटतं. ७. संस्कृतीरक्षक आयडी म्हणजे तर कहरच. त्यांच्याकडे आपापल्या स्पष्ट कल्पना असत आणि बिनतोड प्रतिवाद करण्याइतके गाडीभर दुवे-पुरावे आणि विदा घेऊनच ते आपली गाडी गल्लीच्या एका टोकाला लावत. आठवडाभर धंदा मिळण्याची खात्री असल्याने तयारीनिशी येत. गिऱ्हाइके पण वस्ताद असत. घासाघीस करून झाली की माल बाजूला ठेवा- उद्या घ्यायला येतो म्हणत. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कालच्या ठरलेल्या भावाच्या पुढे घासाघीस सुरु करत. एकावेळी अनेक गिऱ्हाईकांना तोंड देताना या फेरीवाल्याच्या नाकी ९ येत असत. मग कधी त्याचाही तोल जाई. पण गल्लीतल्या जुन्याजाणत्या मंडळींना याची सवय आणि अंदाज असल्याने ते मध्यस्थी करून वाद मिटवत असत. शेवटी वेगवेगळे फेरीवाले येणे ही गल्लीचीही गरज होतीच. ८. कांही अनुभवी फेरीवाले काका अतिशय चांगल्या-चुंगल्या कथा आणि कविता घेऊन यायचे. वाचणाऱ्याच्या मनात कायमचं घर करायची ताकद होती त्यांच्यात. प्रसंग जिवंत होत असत. एकेक कथा एकाच दिवशी तीन-तीनदा वाचली जायची. कुठल्या मार्केटातून आणायचे काय माहीत, पण अनुभवसमृद्ध अन अफाट शब्दरचना असायची. आपल्याच स्वतःच्या, आजूबाजूच्या व्यक्ती अन नातलगांच्या कहाण्या वाटत, इतक्या नैसर्गिक, की वाचता वाचता डोळ्यांत टचकन पाणी आणायचे. 'का वाचली ही कथा ?' असं वाटत राहायचं. पण हलकेच वाखु साठवली जायची. पुन्हा एकटे असताना वाचायला अन एकटंच रडायला ! अशा प्रकारे अनेकआयडी पूर्वी मिपावर येत असत- ज्यांचे नवे नवे असताना आपल्याला कुतूहल वाटायचे. आताही भटकंतीवाले, स्मरणरंजनवाले, परीक्षणवाले, आप- भाजपवाले येतात पण आता ते कुतूहल राहिले नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी बोलायलाही आपल्याला वेळ नसतो. तुमच्याकडे येणाऱ्या, खास लक्षात राहिलेल्या, तुमच्या आठवणीतल्या फेरीवाल्यांविषयी... आय मीन आयडींविषयीही नक्की शेयर करा. श्री श्री खेडूतराव हाss त रे ! (इतर ठिकाणी लेख शेयर करताना नावासकट शेयर करु नये ही नम्र विनंती.)

वाचने 11648 वाचनखूण प्रतिक्रिया 29

आदूबाळ Sat, 07/30/2016 - 12:44
भारी लिहिलंय! वेगवेगळा डिरेस घालून येणारे डु फेरीवाले राहिले का? तसंच काहीतरी अझेंडा खांद्यावर मिरवत सकलमिपाला शाहणं करायला आलेले. आपल्या ब्लॉगवर ताट वाढून मिपावर अन्नाहुती ठेवणारे...

काय निरिक्षण काय निरिक्षण जबरदस्त विडंबन - तो तुमचा समज आहे. - चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . - तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. - आपणास मुद्दा कळलेला नाही हे राहिलेच की पैजारबुवा,

सस्नेह Sat, 07/30/2016 - 13:01
अफाट विडंबन ! खेडूतकाका रॉक्स !! (आपली फेरी हुडकणारी) स्नेहा

किसन शिंदे Sat, 07/30/2016 - 13:01
भन्नाट विडंबन =))
कांही अनुभवी फेरीवाले काका अतिशय चांगल्या-चुंगल्या कथा आणि कविता घेऊन यायचे. वाचणाऱ्याच्या मनात कायमचं घर करायची ताकद होती त्यांच्यात. प्रसंग जिवंत होत असत. एकेक कथा एकाच दिवशी तीन-तीनदा वाचली जायची. कुठल्या मार्केटातून आणायचे काय माहीत, पण अनुभवसमृद्ध अन अफाट शब्दरचना असायची. आपल्याच स्वतःच्या, आजूबाजूच्या व्यक्ती अन नातलगांच्या कहाण्या वाटत, इतक्या नैसर्गिक, की वाचता वाचता डोळ्यांत टचकन पाणी आणायचे. 'का वाचली ही कथा ?' असं वाटत राहायचं. पण हलकेच वाखु साठवली जायची. पुन्हा एकटे असताना वाचायला अन एकटंच रडायला !
लय येळा शमत

सोंड्या Sat, 07/30/2016 - 17:28
एक जुणा फेरीवाला आठवला- टिशर्टाच्या बाह्य वर करुण कायम समोरच्याला शिंगावर घेण्यासाठी उत्सुक व दुसर्या फेरीवाल्यांच्या नावांचे विडंबण करण्यात पटाईत . आनी हो , तोंडात णेहेमीची चितपरीचीत आरोळी- "आमच्याकडे अस्थि-दंत विमा काढून मिळेल होऽऽऽऽऽऽ"

मारवा Sat, 07/30/2016 - 19:35
धमाल धागा मजा आली वाचुन. तुम्ही आंतरजालावरील सीझन्ड प्लेअर दिसता. अनुभव सखोल आहे तुमचा

१. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच खरडफळ्यावर येऊन हुर्रर्रर्र , सूप्रभात किंवा सुप्परभात अश्या आरोळीने दिवसाची सुरुवात होत असे. कांही नाचणाऱ्या स्मायल्या, फोटू किंवा रांगोळ्या टाकून ते कामाला निघून जात असत. तिकडे जाता-जाता केलेल्या खादाडीचे फोटू कधीमधी टाकून इतरांना जळवत असत.
››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif समांतर:- गैगैगैगैगैगैगै..! हे ह्रायलं. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-068.gif

आतिवास Mon, 08/01/2016 - 13:53
:-) मूळ लेख वाचला नाही. पण स्वतंत्र लेख म्हणूनही हा उत्तम जमून आला आहे.

नाखु Mon, 08/01/2016 - 14:03
अखिल मिपा खफ ते खपाखप वाचक्,निमंत्रक्,आमंत्रक आणि संकल्क संघाकडून हार्दीक अभिनंदन आणि पुलेशु . वाचकांची पत्रेवाला नाखु