मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिट्टी

जव्हेरगंज · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भानू कुत्रं आज तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. बाभळीच्या झाडाखाली आज त्याला निवांत झोप लागली होती. तसंही करण्यासारखं काही नव्हतं. दिवसभर रानावनात उंडारल्यावर तळ्याकाठी येऊन शांत पडण्याचा त्याचा दिनक्रमच होता. बरेच दिवस जवानीचा हिसका न दाखवल्यानं खरंतर तो तुंबला होता. सोय म्हणून त्यानं डोंगरपायथ्याच्या चार-पाच कुत्र्या बघून ठेवल्या होत्या. पण सुगीचा हंगाम नसल्याने त्या याला विशेष दाद देत नसत. उन्हाची तिरीप डोळ्यावर आली तसं भानू कुत्रं उलथापालथा होत जागं झालं. आता वर्षाविहार करून पुढील उद्योगास लागावे म्हणून ते आंग झाडून पुढं चाललं, तर त्याला तळ्यावर पाणी पिताना एक करडू दिसलं. 'कोण बरं ही?'म्हणून त्यानं नीट बघितलं. तर ते शालन करडू होतं, रंगा बोकडाची धाकली लेक. खरंतर त्याला ती आवडायची. आडोश्याला उभा राहून तो शालनला निरखत राहिला. ते काळेभोर केस, ती घाटदार शिंगं, ते भरीव पोट, तो गंध. तो सुगंध. तेवढ्यात वातावरणात एक जोरदार 'शिट्टी' घुमली. शालन करडू बिथरलं. भानू कुत्र्यानं कान टवकारले. समोरच्या झाडीत थोडी सळसळ झाली. झाडपाल्यातून वाट काढत एक दाढीधारी रांगडा सिंह बाहेर आला आणि त्याने काहीच विचार न करता पुन्हा एकदा जोरदार शिट्टी मारली. "शाले, पळ पळ लवकर पळ, त्या सिंव्हाला मी बघतो नंतर " भानू कुत्रं मागल्या मागे उडी टाकत पळालं सुध्दा. शालन करडान पण त्याच्यामागे धूम ठोकली. जीव मुठीत धरून भानूकुत्रं रंगा बोकडाच्या घरापर्यंत पळालं. मागोमाग शालन करडू उधळत आलं. "रंग्या, भाईर यी रंग्या" धपापून भानू कुत्रं वराडलं. "काय झालं रं भान्या?" दाढीवरनं हात फिरवत रंगा बोकड पहिल्या खेपेतच भाईर आलं. "सरपंच आसला म्हणून काय झालं, आयघाला शिट्टी मारतूय आपल्या शालीकडं बघून " "कोण प्रतापसिंव्ह? थांब मी कोयत्या आणतू आतनं, कापतूच आयघाल्याला" "तुला एकट्याला नाय झेपायचं, आपुन वाघुबाच्या कानावर घालू, त्योच काय ती निवाडा करल " भानू कुत्र्यानं त्याला योग्य दिशा दाखवली. तशी ती तिघं भर दुपारी उन्हातानात बाघोबाकडं निघाली. रंगा बोकड पेटून उठलं होतं. भानू कुत्रं चेकाळलं होतं. शालन करडू अजूनही बिथरलेलंच होतं. झऱ्यातून पाणी धो धो कोसळत होते. कपारीतून खाली जोरदार फेसाळत होते. वाघोबा ऐन दुपारी जलक्रीडा करत होते. यथेच्छ डुंबल्यावर एका दगडावर ते ऊन शेकत बसले, तेवढ्यात हे तिघे दाखल झाले. "वाघोबा, न्याय हवाय वाघोबा, तुमच्या राज्यात आयाबहिणींच्या इज्जतीवर हात घातला जातोय वाघोबा " रंगा बोकड धाय मोकलून वाघोबाच्या पायावरच पडलं. "रंगा, शांत हो रंगा, काय झालं जरा नीट सांगशील का?" एवढा मुलायम बोलणारा वाघोबा आज एखाद्या ऋषीमुनीसारखा भासत होता. "प्रतापसिंव्हानं शिट्टी मारली वाघोबा, माह्या पोरीकडं बघून, बोला आता काय करु त्यझं?" वाघोबा सावरुन बसला. आळीपाळीनं त्यानं भान्याकडं बघितलं. शालीकडं बघितलं. मग जरा विचार करुन म्हणाला, "इलेक्शनला मतं देताना बरं प्रतापसिंह दिसला रं तुमाला, आमी काय मेलतो का?" जुने दिवस आठवून वाघोबा खवळला. "चुकी झाली सरकार, आपलं म्हणून पदरात घ्या" रंगा बोकडानं गयावया करत हातच जोडले. "बरं, तुमी जावा, मी बघतो काय करायचं ते, भले तो सत्तेत असू दे, इरोधी पार्टी म्हणून आमीबी काय कमी न्हाय, तुमी काळजी करु नका, जाताना तेवढं गेटवरच्या माकडांना आत पाठवा " वाघोबा आता शड्डू ठोकूनच उभा होता. गेटवरची माकडं आत आली तशी वाघोबानं भराभरा सुत्रं हालवली. फौजेला तयार राहण्या सूचना दिल्या. कोल्ही, कुत्री, गेंडे, म्हशी, रानडुकरे, हत्तींना आवताने धाडली गेली. त्यांना आपल्या बाजूला वळवून वाघोबानं आघाडी उघडली. ढोल बडवले जाऊ लागले. मशाली पेटवल्या गेल्या. आरोळ्या ठोकत वाघोबा प्रतापसिंहावर पुर्ण ताकतीनीशी चालून गेला. सिंहाचे धाबे दणाणले. नैऋत्येकडून लांडग्याची फौज वाघोबाने निम्मी कापून काढली. जंगलभर वणवा पेटला. सिंहाच्या बालेकिल्ल्यात हाहाकार माजला. रणांगणात ऊसळत्या तोफा उतरवून वाघोबाने मुसंडी मारली. नंतरचे आठ दिवस जंगलातून धुराचे लोट बाहेर पडत होते. जंगल नुसते धुसमुसत होते. या घनघोर युध्दात सिंहाने शेवटी पांढरे निशान फडकवले. आणि युध्दाचा अंत झाला. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. सिंहाने आपला मुकुट वाघोबाच्या मस्तकावर ठेवला. वाघोबाचा जयजयकार झाला. जंगलभर बुंदीचे लाडू वाटले गेले. गुलाल ऊधळला गेला. ग्रामपंचायतीत बिस्लऱ्यांचे वाटप झाले. हालग्या वाजवून राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. वाघोबा सरपंच झाले आणि जंगलावर राज्य करु लागले. आज पुन्हा भानू कुत्रं तळ्याकाठी एकटंच बसलं होतं. नुकत्याच झालेल्या युद्धाची झळ त्यालाही बसली होती. डोगरपायथ्याच्या चारही कुत्र्या शत्रूपक्षानं पळवल्या होत्या. बरेच दिवसांपासून तो तुंबला होता. 'आता पुढे काय?' याचा विचार करत असतानाच त्याला शालन करडू जंगलात भराभर जाताना दिसलं. तसे भानू कुत्र्याचे कान टवकारले. शालीच्या मागे मग तो ही दबकत जाऊ लागला. शालन करडू झाडीत शिरलं. उंच गवतात लपलेल्या प्रतापसिंहाला शालीशं कचकचून मिठी मारली. बराच वेळ आतमध्ये खुसफूस चालली. शाली तुरा शोधण्यात गुतली. मग सिंहानं बरंच गवत उपटलं. गवताचे भारेच्या भारे उपटले गेले. भरपेट झाल्यावर जाताना सिंह म्हणाला, " त्या भान्या कुत्र्यापास्नं सावधान, गेल्यावेळी शिट्टी काय मारली, झौन्यानं माजी सत्ता उलथवली " "सॉरी डार्लिंग सॉरी, मला माहीतच नव्हत की तो मागे आहे, नेक्स्ट टाईम शिट्टी मारु नको, मीच येत जाईन ईकडे " शाली पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. यावेळी सिंहानं मग पुन्हा राहिलेलं गवत मुळासकट उपटलं. सिंह निघून गेला. मग शाली हात झटकत गवतातनं बाहेर आली. जेव्हा तिनं झुडपं क्रॉस केली तेव्हा भानू कुत्रं दत्तं म्हणून तिच्यासमोर उभं होतं. " त्याचं कायेय शाले, तुमचं चालू द्यात, पण आडचणच आशी हाय की, डोंगरपायथ्याच्या चारीपण कुत्र्या पळवल्या गेल्यात, त्यात मी आसा सोंड्या " भान्या कुत्र्यानं जिभल्या चाटल्या. शाली काय ते समजून गेली आन पुन्हा गवतात शिरली. यावेळी भानू कुत्रं जे काय आसल ते उपटणार होतं.

वाचने 9279 वाचनखूण प्रतिक्रिया 28

हकु Mon, 05/23/2016 - 00:40
हाहा ! वा. आवडली! शेवट काहीतरी गंभीर असेल असा वाटत होतं, तितक्यात अचानक पलटवलात!

अभ्या.. Mon, 05/23/2016 - 00:52
अयायाया नाद केल्यास बाद केले जाईल अस्सल तडका फुल्ल शाखारी आन मौसाहारी . प्रतू डार्लिंग. आहाहाहा

धडपड्या Mon, 05/23/2016 - 02:54
लोकशाही स्विकारलेल्या जंगलात युद्ध का म्हणे? आणी दरबार वगैरे?

चांदणे संदीप Mon, 05/23/2016 - 12:48
शिट्ट्याच वाजलेल्या जव्हेरभौ! ;) ते गवतबिवत उपटून टाकणे प्रकार तर फ़ुल्ल बॉलीवुड/कॉलीवूड/हॉलीवूड आणि असेल नसेल त्या वूडाच्या तोंडात मारेल असाच वाटला! ग्रामपंचायतीत बिस्लेर्या वगैरे कॉमिक गोष्टी आवडल्या! Sandy

स्वप्नज Mon, 05/23/2016 - 16:05
लय भारी लिहलेय जव्हू भाऊ.... बाकी, तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो.

मी-सौरभ Mon, 05/23/2016 - 18:45
नुसती गोष्ट म्हणून आवडल्या गेली आहे. ह्याचा अजुन काही अर्थ असल्यास ज्ञानी लोकांनी आम्हाला व्यनीमार्गे दृष्टांत द्यावा ही णम्र ईणंती..