मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री.जपे यांचा युक्तिवाद

यनावाला · · काथ्याकूट
श्री.जपे यांचा युक्तिवाद आमच्या सहनिवासात (सोसायटीत) जपे आडनावाचे एक कुटुंब राहाते. दोन मुले आणि त्यांचे आई-वडील अशी चार माणसे. आई-वडील नामांकित कंपन्यांत उच्च पदावर. मुलगी बारावीत, मुलगा दहावीत. लगतचे दोन फ्लॅट जोडून केलेला चार बेड रूम आणि मोठा हॉल असा त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. चारही माणसे चांगल्या स्वभावाची आहेत. श्रीमंतीचा गर्व नाही. प्रदर्शन नाही. जपे कुटुंब सज्जन, सुसंस्कृत आहे. कुटुंबातील माणसे धार्मिक वृत्तीची आहेत. सगळे सणवार साजरे करतात. कधी सत्यनारायण पूजा असते. होम-हवन तर प्रत्येक महिन्याला असते. सकाळी चार पुरोहित येतात. हॉलमध्ये होमकुंड पेटवतात. मोठमोठ्याने आरोह-अवरोह करीत संस्कृत मंत्र म्हणतात. अग्नीत आहुत्या टाकतात. हे हवन अडीच-तीन तास चालते. दार बंद असते . बाहेरच्या खिडक्या उघड्या असतात. त्यांतून धूर निघून जातो. कुणाला तसा त्रास होत नाही. एका रविवारी वृत्तपत्रात माझा लेख छापून आला. त्यात नास्तिक मत मांडले होते. कालबाह्य रूढी, निरर्थक कर्मकांडे यांवर टीका होती. त्या दिवशी श्री.जपे आमच्या घरी आले. "या! या ! ! बसा. आज इकडे येणे कसे झाले ?" मी स्वागत केले. "आजच्या पेपरात तुमचा लेख छापून आला आहे. तो वाचला." " तुम्हांला न आवडणारे विचार त्यांत आहेत." मी हसत म्हणालो. " लेख चांगला लिहिला आहे. तुमची मते तुम्ही मांडली आहेत. मला विचारायचे होते की आमच्याकडे जे कधी कधी होम-हवन चालते त्याचा तुम्हाला काही त्रास होतो का? तुम्ही सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर आहात म्हणून विचारले. " "छे! छे! ! मुळीच नाही. त्यात त्रास होण्यासारखे काय आहे? तुमच्या विरुद्ध कोणी कधी तक्रार केलेली नाही. मला वाटते तुमच्याविषयी सर्वांचे चांगले मत आहे." "तुमचा आजचा लेख वाचून मला आपले वाटले." "छे! असा गैरसमज करून घेऊ नका. लेखात यज्ञासारख्या कालबाह्य कर्मकांडावर टीका अवश्य केली आहे. पण त्या लेखाचा तुमच्या होम-हवनाशी काही संबंध नाही. तसे माझ्या मनातही नव्हते. असे लेख मी लिहितच असतो." "ठीक आहे. या संदर्भातील माझ्या शंकेचे निरसन झाले. तुम्हांला राग येणार नसेल तर आणखी एक शंका विचारायची आहे." "राग ? अहो, राग कसला? अवश्य विचारा. काहीही विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्‍न करीन. " "माणसाने सदाचारी, सद्वर्तनी असावे. सत्य बोलावे. कुणाला फसवू नये. अन्याय करू नये. कुणाचा अपमान होईल असे बोलू नये. आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही हे पाहावे. हे सर्वमान्य आहे. आस्तिक माणूस असा असू शकत नाही काय ?" "असतात . अनेक आस्तिक असे सज्जन असतात. यांत शंका नाही. तुम्ही तसे एक आहातच." "धन्यवाद ! मग सर्वांनी देव-धर्माचा त्याग करावा. कर्मकांडे करू नयेत. कशावर श्रद्धा ठेवू नये. चिकित्सा करावी. सर्वांनी नास्तिक व्हावे. असा प्रचार का करावा ?आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा, त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्‍न का करावा? प्रत्येकाला आपल्या विचारसरणी अनुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे ना?" "हो. तसे घटनादत्त स्वातंत्र्य, किंबहुना अधिकार आहे. याविषयी दुमत नाही. तुम्ही मोजक्या शब्दांत चांगला युक्तिवाद केला. पण असे पाहा, धूम्रपान करण्याचे स्वातंत्र्य (काही नियम पाळून) सर्वांना आहे. असे असता "धूम्रपान करू नये. ते आरोग्याला घातक असते ." असा प्रचार समाजसेवक करतातच ना? किंबहुना शासनसुद्धा करते. ते समाजाचा हितासाठी असते. श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही. आता तुमच्याकडे होणार्‍या होम-हवनाचे उदाहरण घेऊ. त्यात हवी म्हणून जाळले जाणारे उपयुक्त पदार्थ वाया जातात. ते सोडा. त्याचे प्रमाण नगण्य असेल. पण तुमच्याकडे कामासाठी चार बाया येतात. त्या हा हवनविधी पाहातात. मंत्रोच्चार ऐकतात. त्यांना वाटते की या साहेबांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे त्याचे कारण हा होमविधी. आणि हे मंत्र. आपण असे काही केले तर आपल्यावरही लक्ष्मीची कृपा होईल. हा समज त्या वस्तीत सगळीकडे पसरतो. मोठ्या लोकांचे अनुकरण अशी माणसे करतातच. काही जण आपल्या घरात हवनविधी करून घेतात. दोन-चार हजार रुपये वाया घालवतात. ही त्यांच्या कष्टाची कमाई असते. देवा धर्माच्या नावाखाली अनेक जण श्रद्धाळूंना लुटत असतात हे स्पष्ट दिसतेच. आमचा विरोध आहे तो या फसवणुकीला. या लुबाडणुकीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे एकूण समाजाची प्रगती खुंटते." "तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावे असे वाटते. मी यापूर्वी असा विचार कधी केला नव्हता. ऐकला/वाचला नव्हता. " " कल्पना आहे. मी पाहातो की तुम्ही उभयता दिवसभर कामाला जाता. व्यग्र असता. या चक्रात अशा अन्य विषयावर विचार करण्यास तुम्हाला उसंत मिळणे शक्य नाही. हे समजते. आज तुमची जी आर्थिक सुस्थिती आहे त्यामागे तुम्हा दोघांची शैक्षणिक पात्रता, बुद्धिमत्ता, कष्ट, तुमची संयत वागणूक, निर्व्यसनीपणा, ही कारणे आहेत. त्याच्याशी होम-हवनाचा काही संबंध नाही." "आमची देवावर श्रद्धा आहे. लहानपणापासून आहे. परंपरेने चालत आलेले सण-उत्सव आम्ही साजरे करतो. हिच्या माहेरी सत्यनायणाची पूजा बरेचदा होत असे. म्हणून आम्ही करतो. त्यामागे काही ठरलेला हेतू असतो असे नाही. खरे सांगायचे तर होम-हवन करतो ते मुलांच्या भल्यासाठी. त्यांचे आरोग्य चांगले राहावे. सवयी चांगल्या लागाव्या. त्यांनी सद्गुणी व्हावे म्हणून. लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून नव्हे." "तुमची चिंता मी समजू शकतो. पण तुमच्या मुलांना वाईट संगत लागणार नाही. ती सद्वर्तनी होतील. हा आशीर्वाद नव्हे. त्याने काही साधत नाही. केवळ मनाला बरे वाटते. माझ्या विधानामागे आधार आहे. पालकांच्या वर्तणुकीचा परिणाम अपत्यांवर होतोच. घरात मद्यपान होत असेल तर मुले व्यसनी होण्याची शक्यता अधिक असते. पण तुमच्या घरात तसे काही दिसत नाही. म्हणून मुले सद्वर्तनी होण्याचा संभव अधिक आहे. पण त्याचा होम-हवनाशी कांही संबंध नाही. होम-हवन केल्याने मुले सद्गुणी होतील ही तुमची आशावती श्रद्धा आहे. " "आपली चर्चा वेगळ्याच विषयाकडे वळली." "अहो, विषयाला धरून बोलायचे म्हणजे ही काय वादविवाद स्पर्धा आहे का परिसंवाद आहे ? तिथे व्यासपीठावरसुद्धा वक्ते विषय सोडून भरकटतात. हे आपले साधे बोलणे आहे. विषय निघेल तसे बोलायचे. असो. मघाशी तुम्ही म्हणालात की आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्‍न का करायचा ? तर तसे नव्हे. माझ्या बुद्धीला जे विचार पटलेले असतात आणि जे लोकांच्या हिताचे आहेत असे प्रामाणिकपणे वाटते ते विचार लेखात मांडतो. त्यांच्या समर्थनार्थ युक्तिवाद लिहितो. लोकांनी ते वाचावे. त्यांच्या बुद्धीला पटेल ते घ्यावे. अशी अपेक्षा असते. त्यात कुणावर काही लादण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा असे लेखात लिहिलेले असते. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला तर्कबुद्धी असते. बालपणापासून देवा-धर्माविषयी झालेल्या संस्कारांमुळे ती दूषित होते. पूर्व संस्कार प्रयत्‍नपूर्वक बाजूला सारून शुद्ध तर्काने विचार केला तर जे सत्य आहे, वास्तव आहे तेच माणसाला पटेल. असा विश्वास वाटतो." "तुमच्या या विचारसरणीची मला कल्पना नव्हती. " "विवेकवादी विचारसरणी अशीच असते. कोणतेही तत्त्व केवळ वेदांत आहे, पुराणांत आहे, गीतेत भगवंतांच्या मुखी आहे म्हणून ते सत्य असले पाहिजे असे मानू नये. जे बुद्धीला पटेल, आपल्या अनुभवांशी सुसंगत असेल , कॉमनसेन्सला खरे वाटेल तेच सत्य मानावे. तसेच माणसाच्या अधिकृत ज्ञानभांडारातील तत्त्वे नियम खरे मानावे." "माणसाचे अधिकृत ज्ञानभांडार म्हणजे काय ?" " भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." "आता लक्षात आले माझ्या. अद्यापि असा विचारच केला नव्हता. शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे." "विचारा ना. प्रश्नांची उत्तरे देणे आवडते. इतकी वर्षे शिकवत होतो. तेव्हा अनेक विद्यार्थी प्रश्न विचारायचे. मेंदूत प्रश्न उद्भवणे आणि तो विचारणे ही चांगली गोष्ट आहे." "बहुसंख्य लोक देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात. तुमची तशी श्रद्धा का नाही ?" "माझी कशावरच श्रद्धा नाही. अनेक जण देवावर श्रद्धा ठेवतात म्हणून मी ठेवावी असे नाही. ते असो. देवाच्या अस्तित्वाविषयीं सांगायचे तर त्या संदर्भात अनेक प्रश्न मेंदूत उद्भवतात. पण एकाचेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. म्हणून देवाचे अस्तित्व सत्य मानत नाही. देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना नि:संदिग्धपणे पटेल असा पुरावा तो दाखवत का नाही ? तो इतका दडून, गुप्त का राहातो ? म्हणजे तो सर्वांना दिसायला हवा असे नव्हे. पण त्याचे अस्तित्व पटावे. त्याच्या ज्या गुणधर्मांचे वर्णन करतात त्यांचा प्रत्यय यावा. तो कधीच कसा येत नाही? देव सर्वज्ञ आहे. सर्वसाक्षी आहे. सर्वसमर्थ आहे. म्हणजे त्याला सर्व समजते. दिसते. तो काहीही करू शकतो. तसेच तो दयाळू आहे. अनाथांचा वाली आहे. न्यायी आहे असे सांगतात. मग:, * देवाच्या समोरील दानपेटी फोडून त्यांतील पैसे कसे चोरता येतात.? * देवाच्या अंगावरील दागिने, मुकुट चोरीला कसे जातात ? * निष्पाप, निरपराध बालिकेवर अत्याचार होतो तेव्हा देव काहीच करू शकत नाही हे कसे? * समाजात अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक असतात. त्यांचे देव निर्दालन का करत नाही ? मग देव न्यायी कसा? * देवदर्शनाला गेलेले भक्त कधी देवळातील गर्दीत चिरडून कसे मरतात ? देव आपल्या भक्तांना वाचवू शकत नाही हे कसे ? असे अनेक प्रश्न आहेत. पण सर्वांत गहन प्रश्न असा की हे सगळे धडधडीत सत्य दिसते त्यावर काही विचार न करता तुमच्यासारखे उच्चशिक्षित लोक देवाचे असित्व खरे कसे मानतात ? " "मी प्रश्न विचारायला आलो आणि तुम्हीच अनेक प्रश्न उपस्थित केले ! मेंदूत प्रश्न उद्भवले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधायला हवीत. हे तुमचे म्हणणे मला पटले. तुमच्या या सर्व प्रश्नांवर विचार करीन. बरे. आता तुमचा अधिक वेळ घेत नाही. येतो. " "अवश्य यावे. आपले सदैव स्वागत आहे." ..........................................................................

वाचने 23728 वाचनखूण प्रतिक्रिया 89

विजय पुरोहित Mon, 02/01/2016 - 22:03
श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय... शिरडी माझे पंढरपूर साईबाबा रमावर... बाबा रमावर साईबाबा रमावर... या हो या हो अवघे जन करा बाबांसी वंदन... साईंसी वंदन करा साईंसी वंदन... शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा... पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा...

सतिश गावडे Mon, 02/01/2016 - 22:57
तुम्ही असेच लिहित रहा. ज्याना तुमचे विचार पटतील ते स्विकारतील. ज्याना तुमचे विचार नाही पटणार ते स्विकारणार नाहीत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Tue, 02/02/2016 - 11:30
हा सगळ्यात संयुक्तीक आणि "म"कार मुक्त वाटला नितवाचक नाखु

विवेक ठाकूर Tue, 02/02/2016 - 00:40
देव ही माणसाची कल्पना आहे इतकी उघड गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून उपयोग नाही. ज्याला समजली त्याच्या जीवनातून कर्मकांड, पूजा-अर्चा, तिर्थयात्रा संपल्या. तरी तुम्ही नशीबवान आहात, पूर्वी अशा लेखावर `तुम्ही शहाणे आणि उपासना करा सांगणारे थोर संत वेडे का?' अशा विचारणा झालेल्या आहेत. अर्थात, तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे (उदा. देवाच्या समोरील दानपेटी फोडून त्यांतील पैसे कसे चोरता येतात?...वगैरे) तर्काच्या दृष्टीनं तितकेच बाळबोध आहेत. कारण देव अशी कोणी अंमलबजावणी करणारी व्यक्ती नाही. कधी असाही विचार करुन पाहा, आपला श्वास कशामुळे चालू आहे? आपलं हृदय धडकतंय ते कशामुळे? सूर्य कशामुळे प्रकाशमान आहे? मुळात त्याच्या असण्याचं प्रयोजनच काय? पृथ्वी एवढ्या अनंत अवकाशात सूर्याभोवती, इतर ग्रह-तार्‍यांशी टक्कर न होता युगानं युगं कशी फिरते आहे?....मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्याचा अभिमान बाळगतायं त्या शास्त्रापलिकडे, तर्काच्याही पलिकडे, काही तरी अज्ञात आणि अतार्किक आहे. मग तुम्हाला ज्ञानाच्या मर्यादा उघड होतील. विचारांची दिशा विज्ञानाकडून अज्ञेयाकडे होईल....पुन्हापुन्हा तेच ते लॉजिक मांडून लेखन करणं कमी होईल, तुमच्या विचारांना एक नवा आयाम येईल. कदाचित या समग्र अस्तित्वाच तुम्हाला देवत्त्व दिसायला लागेल.

In reply to by विवेक ठाकूर

उगा काहितरीच Tue, 02/02/2016 - 01:41
क्या बात है ! मस्त प्रतिसाद . रच्याकने या आस्तीक नास्तीक च्या वादात डोक्याचं भजं होतंय . त्या यनावाला सरांचही म्हणणं पटतेय ! तुमचेही पटतंय सध्या आस्तीकता अन् नास्तीकतेच्या प्रचंड मोठ्या भोवर्यात सापडलोय. आता पहायचंय आस्तीक किनारा लाभतो का नास्तीक ते.

In reply to by विवेक ठाकूर

लंबूटांग Tue, 02/02/2016 - 07:40
तुम्ही तरी प्रत्येक लेखात आपलीच थिअरी मांडून काय साधताय. त्यांनी देवाचे अस्तित्व खोडून काढायला ते उदाहरणे दिली कारण लोक देव असे करेल तसे करेल म्हणतात म्हणून. त्यांचे मुद्दे बाळबोध म्हणता आणि तुमचे मुद्दे काय?थोडक्यात शास्त्रज्ञांनी कैक दशकांपूर्वीच ज्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत ह्या प्रश्नांची. गूगल केले तर ही काही सापडली.
आपला श्वास कशामुळे चालू आहे?
http://wonderopolis.org/wonder/why-do-we-need-to-breathe
आपलं हृदय धडकतंय ते कशामुळे?
http://my.clevelandclinic.org/services/heart/heart-blood-vessels/how-does-heart-beat
सूर्य कशामुळे प्रकाशमान आहे?
https://www.highlightskids.com/science-questions/how-does-sun-light http://www.universetoday.com/75803/how-does-the-sun-produce-energy/
पृथ्वी एवढ्या अनंत अवकाशात सूर्याभोवती, इतर ग्रह-तार्‍यांशी टक्कर न होता युगानं युगं कशी फिरते आहे?
गुरुत्वाकर्षण. ग्रह तार्‍यांशी टक्कर न होता काय. धूमकेतू येउन आदळले की इतके. उल्का पृथ्वीच्या वातावरणात येता येता जळून जातात म्हणून आदळत नाहीत. तार्‍यांशी टक्कर कशी होईल आणि? गुरुत्वाकर्षणाबद्दल वाचावे ही विनंती. बाकी सूर्याच्या असण्याचे प्रयोजन काय वगैरे प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. पण मग तसे कोणाच्याच किंवा कोणत्याही वस्तूचे असण्याचे प्रयोजन काय?
पुन्हापुन्हा तेच ते लॉजिक मांडून लेखन करणं कमी होईल
आपण काय वेगळे करत आहात का सर?

In reply to by लंबूटांग

उगा काहितरीच Tue, 02/02/2016 - 09:26
ठीक आहे पण का ? पण का? असे विचारत गेले तर निश्चितच एक वेळ अशी येते की विज्ञानाकडे याचे उत्तर नसते.एक साधा प्रश्न आहे, गर्भाशयात असतांना पाचव्या की सहाव्या आठवड्यात (नक्की माहीत नाही.)एकाएकी भृणाचे हृदयाचे स्पंदने चालू होतात. यामागे कोणाती प्रेरणा असते विज्ञान नेमकेपणाने सांगू शकत नाही. सूर्य का तापतो? हायड्रोजनचे हेलीयम मध्ये रूपांतर होताना...वगैरे वगैरे! पण असे का होते? याला विज्ञानात उत्तर नाही हे मान्य करावेच लागेल लंबुटांगजी!

In reply to by उगा काहितरीच

सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 09:37
परंतू विज्ञान म्हणजे जादूची कांडी नव्हे किंवा कुणी ज्ञानी व्यक्ती नव्हे. विज्ञान म्हणजे निसर्गाच्या नियमांचे ज्ञान, त्यातील अद्भुत वाटणार्‍या गोष्टींमागील कार्यकारणभाव. आणि हे ज्ञान मिळवणारी, अद्भुताच्या मागील कार्यकारणाभाव शोधून काढणारी तुमच्या-आमच्या सारखीच माणसेच असतात. त्यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या हे ज्ञान मिळते. तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आज जरी आपल्याला माहिती नसली तरी ती भविष्यातही मिळू शकणार नाहीत असेही नाही. कदाचित अगदी या क्षणी सुद्धा जगाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात कुणी झपाटलेला माणूस आपल्या प्रयोगशाळेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मग्न असेल. मागील दोन शतकांपासूनचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. आज आपल्याला ज्ञात असलेल्या गोष्टींपैकी किती गोष्टी आपल्या चार-पाच पीढयांपुर्वीच्या पुर्वजांना माहिती होत्या?

In reply to by सतिश गावडे

उगा काहितरीच Tue, 02/02/2016 - 11:53
तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आज जरी आपल्याला माहिती नसली तरी ती भविष्यातही मिळू शकणार नाहीत असेही नाही. कदाचित अगदी या क्षणी सुद्धा जगाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात कुणी झपाटलेला माणूस आपल्या प्रयोगशाळेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मग्न असेल.
काय सांगावे कदाचित अजून ५० वर्षांनी एखादा शास्त्रज्ञ देवाचेही अस्तित्व प्रयोगाने सिद्ध करूनही दाखवेल ! ;-) आजच्या घडीला ना आस्तीकांकडेही पूर्ण प्रश्नांची उत्तरे आहेत , ना नास्तीकांकडेही. आता हे तर मान्य करावेच लागेल.

In reply to by उगा काहितरीच

सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 22:46
काय सांगावे कदाचित अजून ५० वर्षांनी एखादा शास्त्रज्ञ देवाचेही अस्तित्व प्रयोगाने सिद्ध करूनही दाखवेल ! ;-)
असं झालं आणि तोपर्यंत जगलो वाचलो तर आमच्या आत्मबंध गुरुजींकडून मी सत्यनारायण घालेन. :)
आजच्या घडीला ना आस्तीकांकडेही पूर्ण प्रश्नांची उत्तरे आहेत , ना नास्तीकांकडेही. आता हे तर मान्य करावेच लागेल.
हे वरच्याच प्रतिसादात मी मान्य केलंय.

In reply to by लंबूटांग

विजय पुरोहित Tue, 02/02/2016 - 09:44
@ लंबूटांग तुम्ही देताय ती उत्तरे "कसे" या स्वरुपाची आहेत तर वि.ठा. विचारताहेत "कशामुळे?" या दोन्हीत सूक्ष्म फरक आहे. वि.ठा. सरांना तो सूक्ष्म फरक अपेक्षित आहे.

In reply to by विजय पुरोहित

विवेक ठाकूर Tue, 02/02/2016 - 10:39
आणि त्यांनी तितकीच बाळबोध उत्तरं शोधलीयेत : आपला श्वास कशामुळे चालू आहे? याला त्यांनी फिजिकल प्रोसेस काय आहे याची लिंक दिली आहे. मूळात ही फिजिकल प्रोसेस कशामुळे चालू आहे? आपल्या अस्तित्त्वाचं कारण काय ? आपलं हृदय धडकतंय ते कशामुळे? याला How Does the Heart Beat ची लिंक देऊन आणि सूर्य कशामुळे प्रकाशमान आहे? ला, How does the Sun light up? पुन्हा तीच चूक केलीये. प्रश्न प्रोसेसचा नाही, हाऊ नाही..., व्हाय? काय कारण आहे हृदय धडकण्याचं आणि सूर्यप्रकाशमान असण्याचं ? असा काय या अस्तित्त्वावर आपला उपकार आहे की आपण आहोत ? पण शेवटी त्यांच्या लक्षात आलंय : बाकी सूर्याच्या असण्याचे प्रयोजन काय वगैरे प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. पण मग तसे कोणाच्याच किंवा कोणत्याही वस्तूचे असण्याचे प्रयोजन काय? तोच तर खरा सूज्ञ प्रश्न आहे ! या इतक्या रहस्यमय अस्तित्त्वाचं प्रयोजन काय? आपण आत्ता जीवंत आहोत याचं कारण काय ? या दिशेनं विचार केला की माझ्या प्रतिसादाचा आणि प्रयत्नाचा अर्थ कळेल. चालू असलेल्या प्रोसेसचा उलगडा विज्ञान करेल आणि त्याची उपयोगीता आहे. पण मूळात हे सर्व रहस्यमय अस्तित्त्व असण्याचं प्रयोजन काय, याचा उलगडा विज्ञान आणि तर्काच्या पलिकडे आहे. आणि या रहस्यमयतेप्रती उत्सुकता जागृत झाली की मग अस्तित्त्वाच्या दैवत्त्वाचा साक्षात्कार होतो. कृतज्ञता दाटून येते. मग `देव आहे किंवा नाही' असे बाळबोध प्रश्न निव्वळ तर्कानं सोडवून किंवा प्रोसेसचा उलगडा करुन, आपण काही मोठा तीर मारत नाही हा उलगडा होतो.

In reply to by विवेक ठाकूर

संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 10:45
जाउ द्या ठाकूरसाहे, ते घासकडवीसर परत आपली लेखमाला सुरुवातीपासून टाकायला सुरुवात करतील...

In reply to by विवेक ठाकूर

सतिश गावडे गुरुवार, 02/04/2016 - 10:24
या इतक्या रहस्यमय अस्तित्त्वाचं प्रयोजन काय? आपण आत्ता जीवंत आहोत याचं कारण काय ? या दिशेनं विचार केला की माझ्या प्रतिसादाचा आणि प्रयत्नाचा अर्थ कळेल. चालू असलेल्या प्रोसेसचा उलगडा विज्ञान करेल आणि त्याची उपयोगीता आहे. पण मूळात हे सर्व रहस्यमय अस्तित्त्व असण्याचं प्रयोजन काय, याचा उलगडा विज्ञान आणि तर्काच्या पलिकडे आहे.
सहमत.
पण मूळात हे सर्व रहस्यमय अस्तित्त्व असण्याचं प्रयोजन काय, याचा उलगडा विज्ञान आणि तर्काच्या पलिकडे आहे. आणि या रहस्यमयतेप्रती उत्सुकता जागृत झाली की मग अस्तित्त्वाच्या दैवत्त्वाचा साक्षात्कार होतो. कृतज्ञता दाटून येते.
जे माहीती नाही त्याला "अस्तित्वाचे दैवत्व" असे तरी लेबल का लावायचे? मग आस्तिकांचा "देव" आणि तुमचे हे "अस्तित्वाचे दैवत्व" यात फरक तरी काय राहीला? हा तुम्ही स्वतःपुरता एक नविनच देव तयार केला आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आणि जर अस्तित्वाचे प्रयोजनच माहीती नाही तर त्याप्रती कृतज्ञता का वाटावी? वी आर हियर जस्ट बिकॉज वी आर हियर. व्हाय टू बी ग्रेटफूल अबाऊट इट?
मग `देव आहे किंवा नाही' असे बाळबोध प्रश्न निव्वळ तर्कानं सोडवून किंवा प्रोसेसचा उलगडा करुन, आपण काही मोठा तीर मारत नाही हा उलगडा होतो.
हाच युक्तीवाद तुमच्या प्रतिसादांसाठीही लावता येईल. :)

In reply to by सतिश गावडे

विवेक ठाकूर गुरुवार, 02/04/2016 - 12:40
त्याला तुम्ही नांव काय देता यानं काही फर्क पडत नाही. आणि जर अस्तित्वाचे प्रयोजनच माहीती नाही तर त्याप्रती कृतज्ञता का वाटावी? वी आर हियर जस्ट बिकॉज वी आर हियर. व्हाय टू बी ग्रेटफूल अबाऊट इट? अतित्त्वाचं प्रयोजन नाही कारण त्याला स्वतःच्या असण्यातून काही साधायचं नाही. इट इटसेल्फ इज इनफ. अस्तित्त्वाचं असणं अमर्याद आहे पण आपण स्वतःच्या अस्तित्त्वाविषयी तसं म्हणू शकत नाही. हा देह केंव्हाही लयाला जाईल, कोणत्याही क्षणी आपला श्वास बंद पडू शकतो. तरीही, आत्ता या क्षणी आपण जीवंत आहोत, अस्तित्त्वा समवेत आहोत. जगायचा आणि उपभोगायचा आनंद घेऊ शकतो याबद्दल कृतज्ञता का नसावी? मग `देव आहे किंवा नाही' असे बाळबोध प्रश्न निव्वळ तर्कानं सोडवून किंवा प्रोसेसचा उलगडा करुन, आपण काही मोठा तीर मारत नाही हा उलगडा होतो....हाच युक्तीवाद तुमच्या प्रतिसादांसाठीही लावता येईल. प्रतिसादाचा अर्थ लक्षात आला तर फरक कळेल. आपलं जीवंत असणं ही इतकी महत्तम घटना आहे की आपण ती गृहितच धरुन जगतो. आपल्या असण्यामागे अस्तित्त्वाचा असलेला उपकार एखाद्या बुद्धालाच जाणवतो, जेंव्हा त्याला कळतं की `अरे, आपला श्वास चालू आहे, काहीही कारण नसतांना चालू आहे!' कृतज्ञतेनं त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहातात. आणि सामान्य माणूस काय करतो? निव्वळ तर्क आणि विज्ञानाची शेखी मिरवत, सगळ्या रहस्याचा उलगडा आज ना उद्या होईल अशा भ्रमात, अस्तित्त्वाची बदलणारी नित्यनूतन नवलाई, ऋतूंचे बदल, पक्ष्यांचे किलबिलाट, हवेची झुळूक, पावसाची रिमझिम, निसर्गानं निर्माण केलेल्या फळांचे स्वाद, त्याच्या अन्नाचा आस्वाद, त्यानं निर्माण केलेल्या सौंदर्यवती ललना, अनंत आकाशात रहस्यमयतेनं विहरणारे कोट्यावधी ग्रहतारे....याचा विस्मयच विसरुन जातो. अस्तित्त्वाच्या या निष्कारण आणि रहस्यमय, आत्ता, या क्षणी समोर असण्याला मी देवत्त्व म्हणतो... नाव काहीही द्या त्यानं फरक पडत नाही. आणि इतक्या प्रत्यक्ष आणि प्रकट असणार्‍या वस्तुस्थितीला आणखी पुरावा काय हवा? श्रद्धा अंधाला ठेवावी लागते, सूज्ञाला फक्त नजर पुरेशी आहे.

In reply to by विवेक ठाकूर

संदीप डांगे गुरुवार, 02/04/2016 - 14:28
श्रद्धा अंधाला ठेवावी लागते, सूज्ञाला फक्त नजर पुरेशी आहे. बास... अचूक. मराठी ग्राफिटीसाठी एक जबरदस्त वाक्य दिल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by विवेक ठाकूर

लंबूटांग गुरुवार, 02/04/2016 - 22:13
आणि सामान्य माणूस काय करतो? निव्वळ तर्क आणि विज्ञानाची शेखी मिरवत, सगळ्या रहस्याचा उलगडा आज ना उद्या होईल अशा भ्रमात, अस्तित्त्वाची बदलणारी नित्यनूतन नवलाई, ऋतूंचे बदल, पक्ष्यांचे किलबिलाट, हवेची झुळूक, पावसाची रिमझिम, निसर्गानं निर्माण केलेल्या फळांचे स्वाद, त्याच्या अन्नाचा आस्वाद, त्यानं निर्माण केलेल्या सौंदर्यवती ललना, अनंत आकाशात रहस्यमयतेनं विहरणारे कोट्यावधी ग्रहतारे....याचा विस्मयच विसरुन जातो.
हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा? उलट असे म्हणता येईल की तुमच्या युक्तिवादाप्रमाणे पक्षी किलबील का करतात (Why?) ह्यातच गुंतून पडून त्याचा आस्वाद घ्यायचेच विसरायला होईल. सारखे सारखे सगळ्या गोष्टींना why विचारत बसण्यात कसली नवलाई?

In reply to by विवेक ठाकूर

सतिश गावडे गुरुवार, 02/04/2016 - 23:39
त्याला तुम्ही नांव काय देता यानं काही फर्क पडत नाही.
ठीक आहे.
अतित्त्वाचं प्रयोजन नाही कारण त्याला स्वतःच्या असण्यातून काही साधायचं नाही. इट इटसेल्फ इज इनफ. अस्तित्त्वाचं असणं अमर्याद आहे पण आपण स्वतःच्या अस्तित्त्वाविषयी तसं म्हणू शकत नाही. हा देह केंव्हाही लयाला जाईल, कोणत्याही क्षणी आपला श्वास बंद पडू शकतो. तरीही, आत्ता या क्षणी आपण जीवंत आहोत, अस्तित्त्वा समवेत आहोत. जगायचा आणि उपभोगायचा आनंद घेऊ शकतो याबद्दल कृतज्ञता का नसावी?
अस्तित्व आणि "स्वतःचं अस्तित्व" या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? सश्रद्ध जसे परमात्मा आणि आत्मा मानतात तसे? "आपण अस्तित्वासमवेत असतो" असं तुमचं म्हणणं आहे. हे कोणतं अस्तित्व? नुसतंच "अस्तित्व" की "स्वतःचं अस्तित्व"? आणि हे अस्तित्वासोबत (ते कोणतेही असो) असणारे "आपण" कोण?
प्रतिसादाचा अर्थ लक्षात आला तर फरक कळेल. आपलं जीवंत असणं ही इतकी महत्तम घटना आहे की आपण ती गृहितच धरुन जगतो. आपल्या असण्यामागे अस्तित्त्वाचा असलेला उपकार एखाद्या बुद्धालाच जाणवतो, जेंव्हा त्याला कळतं की `अरे, आपला श्वास चालू आहे, काहीही कारण नसतांना चालू आहे!' कृतज्ञतेनं त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहातात.
आपलं जीवंत असणं हा अस्तित्त्वाचा आपल्यावर असलेला उपकार आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तसं असेल तर हे तुमची ही अस्तित्वाची संकल्पना सश्रद्धांच्या देवाच्या संकल्पनेहून वेगळी कशी? त्यांचे जीवन त्यांना देवाने उपकार म्हणून दिलेले असते. तुमचे जीवन तुम्हाला अस्तित्वाने उपकार म्हणून दिलेले आहे असाच याचा अर्थ नाही का?
निव्वळ तर्क आणि विज्ञानाची शेखी मिरवत, सगळ्या रहस्याचा उलगडा आज ना उद्या होईल अशा भ्रमात, अस्तित्त्वाची बदलणारी नित्यनूतन नवलाई, ऋतूंचे बदल, पक्ष्यांचे किलबिलाट, हवेची झुळूक, पावसाची रिमझिम, निसर्गानं निर्माण केलेल्या फळांचे स्वाद, त्याच्या अन्नाचा आस्वाद, त्यानं निर्माण केलेल्या सौंदर्यवती ललना, अनंत आकाशात रहस्यमयतेनं विहरणारे कोट्यावधी ग्रहतारे....याचा विस्मयच विसरुन जातो.
कशावरून हे सारे निसर्गाने "निर्माण केले" आहे? "आहे हे असं आहे" असं म्हणणं जास्त संयुक्तिक नाही का?
अस्तित्त्वाच्या या निष्कारण आणि रहस्यमय, आत्ता, या क्षणी समोर असण्याला मी देवत्त्व म्हणतो... नाव काहीही द्या त्यानं फरक पडत नाही. आणि इतक्या प्रत्यक्ष आणि प्रकट असणार्‍या वस्तुस्थितीला आणखी पुरावा काय हवा?
कसल्या पुराव्याबद्दल बोलत आहात तुम्ही? काही बोध होत नाही.
श्रद्धा अंधाला ठेवावी लागते, सूज्ञाला फक्त नजर पुरेशी आहे.
अप्रत्यक्षपणे तुम्ही सुज्ञ आहात त्यामुळे तुमच्यासाठी तुमची नजर पुरेशी आहे हेच सुचवायचे आहे ना तुम्हाला? :)

In reply to by सतिश गावडे

खटपट्या Fri, 02/05/2016 - 03:14
आपलं जीवंत असणं हा अस्तित्त्वाचा आपल्यावर असलेला उपकार आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तसं असेल तर हे तुमची ही अस्तित्वाची संकल्पना सश्रद्धांच्या देवाच्या संकल्पनेहून वेगळी कशी? त्यांचे जीवन त्यांना देवाने उपकार म्हणून दिलेले असते. तुमचे जीवन तुम्हाला अस्तित्वाने उपकार म्हणून दिलेले आहे असाच याचा अर्थ नाही का?
सहमत

गामा पैलवान Tue, 02/02/2016 - 03:43
यनावाला, वरवर वाचू जाता तुमच्या लेखात भाष्य करावी अशी दोन विधाने सापडली. अधिकही सापडावीत. पण सध्या ही दोन बघूया. १. >> या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात. प्रचंड आक्षेप. शाळेत शिकवलेलं सगळं विज्ञान खरं नसतं. हवं असल्यास उदाहरण देऊ शकेन. २. >> देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना नि:संदिग्धपणे पटेल असा पुरावा तो दाखवत का नाही ? हाच नियम इलेक्ट्रॉनलाही लागू करता येतो. जर इलेक्ट्रॉन अस्तित्वात आहे असं मानलं तर त्याला वस्तुमान आहे. हे वस्तुमान स्थिर इलेक्ट्रॉनचं म्हणून मोजलं जातं. पण व्यवहारात इलेक्ट्रॉन कधीही स्थिर नसतो. मग स्थिरवस्तुमान ही केवळ काल्पनिक संज्ञा नव्हे काय? मग जोसेफ जॉन थॉमसन यांना नोबेल पारितोषिक उगीचंच दिलं का? इलेक्ट्रॉन अस्तित्वात असल्याचा कुठलाही नि:संदिग्ध पुरावा कुणालाही मिळालेला नाही. याचं कारण म्हणजे संदिग्धता हा सृष्टीचा नियम आहे. नेमक्या याच कारणासाठी देव स्वत:च्या अस्तित्वाचा नि:संदिग्ध पुरावा देत नसतो. आ.न., -गा.पै.

लंबूटांग Tue, 02/02/2016 - 07:52
अस्तित्वात असण्याचा पुरावा मिळाला नाही तर तुम्ही दिलेल्या लिंकवरच जो cathode ray tubeचा प्रयोग दिला आहे तो काय? तसेच इलेक्ट्रॉनचं स्थिर वस्तुमान ही जरी काल्पनिक संज्ञा असली तरी तो कोणाच्या कल्पनेतून आलेला नाही तर काही समीकरणे वापरून शोधलेला अंक आहे. असा एक स्थिरांक (constant) आहे ज्यावर पूर्ण भौतिक आणि रासायनिक शास्त्रांचा डोलारा उभा आहे. आणि हा स्थिरांक वापरून बरीच इतर समिकरणे बनवली गेली आहेत ती सिद्ध करण्याजोगी आहेत. देव हा जर का असा स्थिरांक मानला तर मग ह्या संकल्पनेचे तसे सिद्धांत नाहीत जे नेहमीच सारखे रिझल्ट देतील. उदा. तुम्ही १०८ वेळा असे केलेत तर तुम्हाला देव यश देईल.

In reply to by लंबूटांग

गामा पैलवान Wed, 02/03/2016 - 03:08
लंबूटांग, १. >> देव हा जर का असा स्थिरांक मानला तर मग ह्या संकल्पनेचे तसे सिद्धांत नाहीत जे नेहमीच >> सारखे रिझल्ट देतील. उदा. तुम्ही १०८ वेळा असे केलेत तर तुम्हाला देव यश देईल. आहेत. श्रद्धेने साधना केली तर आत्मतत्त्वाची अनुभूती निश्चितच येते. असंख्य उपासकांनी अनेक वेळा अनुभूती घेतल्या आहेत. एकसमान रिझल्ट न मिळण्याचं कारण म्हणजे कुठल्याही दोन माणसांची मनं वेगवेगळी असतात. साधना हाही एक प्रयोगच आहे आणि तो बाह्य जगावर करण्यासाठी नसून प्रत्येकाने तो स्वत:च्याच शरीर आणि मनावर करायचा आहे. २. >> असा एक स्थिरांक (constant) आहे ज्यावर पूर्ण भौतिक आणि रासायनिक शास्त्रांचा डोलारा उभा आहे. >> आणि हा स्थिरांक वापरून बरीच इतर समिकरणे बनवली गेली आहेत ती सिद्ध करण्याजोगी आहेत. कर्रेक्ट ! म्हणजे इलेक्ट्रॉन नामक कल्पनेच्या सहाय्याने रोखठोक अनुभव आणून देणारं तंत्रज्ञान विकसित करता येतं. अगदी तस्संच आत्मतत्त्व ही एक कल्पना मानून त्यापासून योग, आयुर्वेद, इत्यादि तंत्रे उत्पन्न झाल्याचं प्रत्ययास येतंच की ! आ.न., -गा.पै.

In reply to by संदीप डांगे

लंबूटांग गुरुवार, 02/04/2016 - 22:16
दारूचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. देवाची साधना शरीर बळकट करण्यासाठी करतात का?
त्याच माणसाने तेवढीच दारु प्रत्येक वेळेस घेतली तर सारखीच चढते का?
उत्तर किती वारंवारितेने घेता यावर अवलंबून असावे. माझ्यासारख्या क्वचितच थोडीशी पिणार्‍याला प्रत्येक वेळेस तिच दारू तेवढ्याच प्रमाणात घेतली तर सारखीच चढते.

In reply to by लंबूटांग

गामा पैलवान गुरुवार, 02/04/2016 - 13:15
लंबूटांग, साधनेचं अंतिम फलित आत्मबोध आहे. जो कोणी साधना करेल त्याला हा रिझल्ट मिळेलंच. हे माझे उद्गार नसून अनेक आत्मप्राप्त माणसांनी काढलेले आहेत. याची अनुभूती घेतलेले शेकड्याने सापडतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सतिश गावडे गुरुवार, 02/04/2016 - 09:58
श्रद्धेने साधना केली तर आत्मतत्त्वाची अनुभूती निश्चितच येते. असंख्य उपासकांनी अनेक वेळा अनुभूती घेतल्या आहेत. एकसमान रिझल्ट न मिळण्याचं कारण म्हणजे कुठल्याही दोन माणसांची मनं वेगवेगळी असतात. साधना हाही एक प्रयोगच आहे आणि तो बाह्य जगावर करण्यासाठी नसून प्रत्येकाने तो स्वत:च्याच शरीर आणि मनावर करायचा आहे.
मला काही प्रश्न पडले आहेत. १. आत्मतत्व म्हणजे काय? २. साधना केल्याने आत्मतत्वाची अनुभूती येते म्हणजे नेमेके काय होते? ३. साधना स्वतच्या शरीरावर आणि मनावर करायची असते असं तुमचे म्हणणे आहे. तर साधना करणे म्हणजे नेमके काय करणे? मी रुढार्थाने निरिश्वरवादी असलो तरी श्रद्धेकडे मानवी अनुभव म्हणून पाहतो. त्यामुळे वरील प्रश्न वादासाठी नसून प्रामाणिकपणे उत्तरे मिळवण्यासाठी आहेत. त्यामुळे "त्याची प्रचिती ज्याची त्याने घ्यायची असते" अशा धाटणीची उत्तरे न दिलीत तर उत्तम.

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव गुरुवार, 02/04/2016 - 12:47
आपण सर्वांनी पंखा बघितला आहे. पंखा फिरताना पात्याच्या शेवटी स्पीड सर्वाधीक असते. सेण्टर कडे जावं तशी स्पीड कमि होते. सेण्टरपासुन परत लांब जावं तर स्पीड वाढत जाते. सेण्टरवर स्पीड शुण्य असते. तो सेण्टर पॉईण्ट म्हणजे आत्मतत्व.
साधना केल्याने आत्मतत्वाची अनुभूती येते म्हणजे नेमेके काय होते?
स्थीर आणि फिरणारे, सगळेच पॉईण्ट्सच आहेत हे कळतं.
साधना स्वतच्या शरीरावर आणि मनावर करायची असते असं तुमचे म्हणणे आहे. तर साधना करणे म्हणजे नेमके काय करणे?
उपर्निर्दिष्ट एक विशिष्ट प्रकारचा कंड शमवणे म्हणजे साधना.

In reply to by अर्धवटराव

गामा पैलवान Fri, 02/05/2016 - 03:13
अर्धवटराव, कसलं समर्पक उदाहरण दिलंय तुम्ही. तुमच्या ताजमहालास माझी वीट लावू इच्छित नाही. धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.

In reply to by अर्धवटराव

सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 09:21
तुम्ही दिलेल्या उदाहरणाने दोन प्रश्नांची उत्तरे मिळाली.
उपर्निर्दिष्ट एक विशिष्ट प्रकारचा कंड शमवणे म्हणजे साधना.
या वाक्यातील "कंड" ह शब्द साधना, आत्मतत्व आणि अनुभूती यांच्या "गटात न बसणारा" शब्द आहे. :) शिवाय "साधना करणे म्हणजे नेमके काय करणे?" या प्रश्नाचे उत्तर त्यात नाही.

In reply to by सतिश गावडे

अर्धवटराव Fri, 02/05/2016 - 12:47
धाग्याच्या अनुषंगाने कंड शब्द वापरला... सदर धाग्यावर तसंही आत्मानुभूती वगैरे गोष्टी काहि कामाच्या नाहित.
शिवाय "साधना करणे म्हणजे नेमके काय करणे?" या प्रश्नाचे उत्तर त्यात नाही.
ऑन सियीयन नोट, साधना 'करणं' असा काहि प्रकार नाहि. कारण साधना न करण्याचं ऑप्शनच अव्हेलेबल नाहि. तुमच्या खिशातल्या पैशाचं मुल्य तुम्ही काहि प्रयत्न करा वा न करा, कमि जास्त होत असतं. प्रत्येक श्वासागणिक आपलं आरोग्य बरं किंवा वाईट होत असतं. काहि लोक प्रयत्नपूर्वक संपत्ती वाढावतात, आरोग्य कमावतात हा भाग वेगळा. त्याच प्रमाणे साधना आपसूक होतच असते. वर म्हटल्याप्रमाणे स्थीर आणि अस्थीर बिंदुंमधलं अंतर कापण्याची प्रक्रीया प्रत्येक सजीवात सतत सुरु असते. तिची इंटेन्सिटी वाढवायला काहि उपचार आहेत. ते काय व कसे आहेत हा निराळा विषय आहे (आणि मला वाटतं तुम्हाला ते ठाऊक आहे). असो.

In reply to by अर्धवटराव

सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 22:53
अगदी नेमके उत्तर.
ते काय व कसे आहेत हा निराळा विषय आहे (आणि मला वाटतं तुम्हाला ते ठाऊक आहे). असो.
होय. :)

सुबोध खरे Tue, 02/02/2016 - 09:47
श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही. हीच गोष्ट कॉम्प्लान,बुस्ट, फ्यारेक्स/ लाक्तोजन,फ़ेअर आणि लव्हली इ अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल. याबद्दल आपले काय मत आहे?

In reply to by सुबोध खरे

सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 09:55
हीच गोष्ट कॉम्प्लान,बुस्ट, फ्यारेक्स/ लाक्तोजन,फ़ेअर आणि लव्हली इ अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल.
डॉ. खरे, तुमचे म्हणणे खरे आहे. :) मार्केटींगवाल्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असतो.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Tue, 02/02/2016 - 09:59
श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही.
त्याने काही साध्य होत नाही हे चुक आहे. हे सर्व जो कोण करतो त्याला त्यातुन काहीतरी मिळतच असते. मानवजात पक्की स्वार्थी आणि हिशोबी आहे. काहीतरी फायदा होत नसेल तर अजिबात खर्च वगैरे करणार नाही कोणी. ज्या अर्थी लोक खर्च करतात त्या अर्थी त्यात त्यांना काहीतरी परतावा मिळत असतोच ( किंवा मिळेल असे वाटत असते )

In reply to by प्रसाद१९७१

गवि Tue, 02/02/2016 - 13:39
परफेक्ट लिहीता तुम्ही. अगदी मनातलं बोललात. जे काळासोबत नष्ट झालं नाही ते सर्वांना गरजेचं असल्यामुळेच टिकवलं गेलं. योग्य अयोग्य हा भाग वेगळा.

सुबोध खरे Tue, 02/02/2016 - 10:11
साहेब मानसिक शांतीची किंमत काय? अन्यथा साईबाबांच्या मूर्तीला हिरेजडीत मुकुट लोक का अर्पण करतात? चोरी केली तरी दानधर्म करून त्यातून होणार्या पापाच्या टोचणीतून मुक्ती मिळवण्यासाठीच लोक असे करतात. कोणतीही गोष्ट मानसिक समाधानासाठीच होत असते. माणसे कर्मकांड का करतात? आपण सर्वांचे सर्व चांगलेच करत आहोत मग आपले चांगलेच होणार हा एक विश्वास( कदाचित अंध) त्यामागे असतो. मी माझ्या मुलाला कॉम्प्लान देते कारण त्याने त्याचे चौरस आहार मिळून पोषण होईल हा "विश्वास" असतो. एखादी गोष्ट महाग म्हणजे चांगली हा हि एक (अंध) विश्वासच. शिलाजित, स्टे ऑन, "एनर्जी फोर्ट", "बैद्यनाथ व्हीटा एक्स गोल्ड सुपर स्ट्रॉंग", सारख्या गोळ्या घेणारे लोक सुद्धा याच विश्वासाने घेत असतात कि यामुळे आपल्याला तारुण्य जोम आणि स्टेमिना( भरपूर वेळ संभोग करण्याचा) मिळेल. यांच्यावर कोणी टीका करताना आढळत नाही. दुर्दैवाने बहुसंख्य नास्तिक लोक "मन" हा भाग गृहीत धरतच नाहीत. कर्मकांड करणारे बहुसंख्य लोक हे या मनाच्या शांती साठीच करीत असतात.आणि त्याला लागणारा पैसा हा ते मिळवत असलेल्या पैशाचा एक छोटासाच भाग असतो. त्यामुळे अशा टीका करणाऱ्या लोकांकडे बहुसंख्य लोक दुर्लक्ष करतात.

In reply to by सुबोध खरे

सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 22:57
श्रद्धा ही जोपर्यंत तुम्ही फारसा विचार करत नाही तोपर्यंत जगण्याला नक्कीच आधार देते. मी वयाची जवळपास पंचवीसेक वर्ष सश्रद्ध होतो. अगदी "ईश्वराच्या ईच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही" या कॅटेगरीतला सश्रद्ध. काहीही प्रसंग आला तरी "देवा, वाचव रे बाबा" असं तोंडून निघायचे. किंबहूना देव आपल्याला या प्रसंगातून तारून नेईल अशी श्रद्धा असायची. प्रत्येक वेळी काही निभावून जायचंच असं नाही. पण "तो आपल्या सोबत आहे" ही भावना परिस्थितीला सामोरं जायचं बळ द्यायची. पुढे वर्षागणिक माझे विचार निरिश्वरवादाकडे झुकू लागले. प्रसंग यायचे थांबले नाहीत. आता असा प्रसंग आला की मी स्वतःलाच विचारतो, "भेंडी आता कुणाला हाक मारायची?" :)

सौंदाळा Tue, 02/02/2016 - 12:23
पण तुमच्याकडे कामासाठी चार बाया येतात. त्या हा हवनविधी पाहातात. मंत्रोच्चार ऐकतात. त्यांना वाटते की या साहेबांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे त्याचे कारण हा होमविधी. आणि हे मंत्र. आपण असे काही केले तर आपल्यावरही लक्ष्मीची कृपा होईल. हा समज त्या वस्तीत सगळीकडे पसरतो. मोठ्या लोकांचे अनुकरण अशी माणसे करतातच. काही जण आपल्या घरात हवनविधी करून घेतात. दोन-चार हजार रुपये वाया घालवतात. ही त्यांच्या कष्टाची कमाई असते. देवा धर्माच्या नावाखाली अनेक जण श्रद्धाळूंना लुटत असतात हे स्पष्ट दिसतेच. आमचा विरोध आहे तो या फसवणुकीला. या लुबाडणुकीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक प्रगती होत नाही.
हे काही पटले नाही बुवा. आम्ही एलीडी टीव्ही घेतला. घरात येणार्‍या कामवालीने किती / केवढ्याला वगैरे विचारुन २ महिन्यात तीस हजाराचा टीव्ही घेतला. मग आमच्यामुळे तिची आर्थिक प्रगती खुंटली की काय? कोण्त्याही प्रकारची लुबाडणुक थांबवायची असेल तर डोके ताळ्यावर ठेवण्याची गरज असते. आपल्याला जे आवडेल, पटेल, झेपेल, परवडेल आणि ज्याचा इतरांना त्रास होणार नाही त्या गोष्टी अवश्य कराव्यात. मग ते देव धर्म असेल, दारु असेल किंवा इतर काही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 12:27
असं काय करता सौंदाळाभौ, बुद्धीवादी आहेत ते, त्यांचं सगळं पटायलाच पाहिजे. उन्हे बोले ना, खुंटती करके, तो खुंटतीच!

मृत्युन्जय Tue, 02/02/2016 - 13:30
किती प्रभावी अणि मुद्देसूद बोलता हो तुम्ही. मला तर वाटले होते की चर्चेअंती जपे घरी जाउन देवघर घण घालुन फोडणार आणि सगळे देव टॉयलेट मध्ये नेउन फ्लश करणार. असो. पुढच्या चर्चेच वृत्तांत देखील द्या बरं का प्लीज. तोपर्यंत तरी जप्यांना देवबाप्पा बुद्धी देइल अशी अपेक्षा (अर्र देव नाहिच नाही का? मग जप्यांना आपोआप ब्रह्मज्ञान प्राप्त होइल अशी अपेक्षा)

मारवा Tue, 02/02/2016 - 22:13
" भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." इतका जरी नीट समजला तरी फार मोठा बदल होइल. गोष्ट छोटी...... डोंगराएवढी.............

palambar Tue, 02/02/2016 - 23:35
चांगला लेख , मला पटला. कर्मकांड करण्याचि जरुरि नाहि , पण मन ताब्यात ठेवण्यासाठि , मानसिक आधारासाठि काहितरि उपाय लागतो त्या साठि श्रद्धा हा एक सोपा उपाय आहे असे वाट्ते .

याॅर्कर Wed, 02/03/2016 - 21:04
यनावाला सर, तुम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार देता बुवा!!! म्हणजे कोणाला न डिवचता,सयंत भाषेत,छान छान

यनावाला गुरुवार, 02/04/2016 - 13:53
हार्दिक आभार सर्वश्री ...प्रचेतस, ...संदीप चंदने, ...रामपुरी, ...सतीश गावडे, ...आत्मबंध, ...नादखुळा, ...पगला पयोधर,...लंबूटांग,...आनंदा,...मारवा,...पलंबर,...यॉर्कर , तसेच ...अजया या सदस्यांनी "जपे...." लेखाला अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! अन्य काही सदस्यांचे या लेखाविषयी प्रतिकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. त्याविषयी ना खंत ना खेद. "कोणी निंदा, कोणी वंदा । असे हा लोकहिताचा धंदा ।"

In reply to by प्रचेतस

यनावाला गुरुवार, 02/04/2016 - 21:00
श्री.पगला गजोधर यांचे नाव पगला पयोधर लिहिले ही माझ्या हातून मोठी चूक घडली. श्री.गजोधर यांची क्षमा मागतो. श्री.प्रचेतस यांनी ती चूक निदर्शनाला आणून दिली. त्यांचे आभार.

तर्राट जोकर गुरुवार, 02/04/2016 - 15:10
लेखाला अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! अन्य काही सदस्यांचे या लेखाविषयी प्रतिकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. त्याविषयी ना खंत ना खेद. "कोणी निंदा, कोणी वंदा । असे हा लोकहिताचा धंदा ।"
काही सदस्यांचे या लेखाविषयी अनुकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. असे नाही वाटत का?

In reply to by तर्राट जोकर

यनावाला Fri, 02/05/2016 - 20:49
@ तर्राट जोकर .......... काही सदस्यांनी अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. ते त्यांच्या विचारसरणी अनुसार स्वाभाविक आहेच. तसेच त्या सदस्यांना धन्यवाद देणे हे सुद्धा स्वाभाविकच आहे..

आनन्दा गुरुवार, 02/04/2016 - 16:23
बाकी यनावालांना मिपाचे "राहुल द्रविड" पुरस्कार द्यावयास काय हरकत आहे? मागचे २-३ महिने ते सलग बॅटिंग करत आहेत. चौकार षटकार न मारता संथपणे २ शतकी ३ शतकी ़हेळ्या केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव मी मांडत आहे.

प्रदीप साळुंखे गुरुवार, 02/04/2016 - 23:21
डिस्कवरी सारख्या चॅनेलवर पण आता प्रेतआत्मा/भूत वगैरेच्या खर्या घटना(?) दाखवतात,आणि तेही अमेरिकेमधल्या बर का!!! मग प्रेतात्मा असेल तर देवही असणार कि,

गामा पैलवान Sat, 02/06/2016 - 03:29
बाकी काही म्हणा, यनावाला यांची श्रद्धा वादातीत आहे. ती नास्तिपक्षावर आहे म्हणून त्यांना नास्तिक म्हणायचं. अन्यथा ते कट्टर आस्तिकाहून कोणत्याही प्रकारे कमी नाहीत! श्रद्धा असणं महत्त्वाचं. मग ती अस्तिपक्षावर असो वा नास्तिपक्षावर! कीप इट अप. -गा.पै.

यनावाला Sat, 02/06/2016 - 21:20
श्री.गामा पैलवान लिहितात,
,"....यनावाला यांची श्रद्धा वादातीत आहे."
"माझी कशावरही श्रद्धा नाही" असे लेखात स्पष्ट म्हटले आहे.ते सत्य आहे. सर्वसाधारण बोलण्यात आपण "श्रद्धा, निष्ठा,विश्वास" हे तीन शब्द सामान्यपणे समानार्थी वापरतो. ते ठीक आहे. पण या तीन भिन्न संकल्पना आहेत. प्रत्येकाचा विशिष्ट अर्थ आहे, असला पाहिजे. श्रद्धा आख्यानात हे अर्थ स्पष्ट करण्याचा यथामती प्रयत्‍न केला आहे. त्यांतील श्रद्धाव्याख्या अशी: ....... "१: श्रद्धेची परिभाषा (व्याख्या) सर्वसमर्थ सर्व व्यापक । संकटमोचक अलौकिक । जगनिर्माता जगच्चालक । देव ऐसे नाम तया ॥१॥ आहे तो हे मानणे सत्य । पूजा-पाठ-प्रार्थना नित्य । करी विघ्नांचे पारिपत्य । जाणावी मूळ श्रद्धा ही ॥२॥ श्रद्धेची परिभाषा परिसा । जे कुठे न दिसे माणसा । जयाचा काही प्रत्यक्षसा । अनुभव न ये कधीही ॥३॥ ज्याच्या सत्यतेची शक्यता । तर्कबुद्धीने शोध घेता । युक्तिवाद काही करिता । निघे निष्कर्ष नकार। ॥४॥ ज्ञानक्षेत्रीं वैज्ञानिकांनी । निसर्गनियम संशोधुनी । पुन:पुन्हा ते तपासोनी । ज्ञानभांडार निर्मियले ॥५॥ मानवी ज्ञानसंचयीं या । नाही स्थान श्रद्धाविषयां । आत्मा-पुनर्जन्म-ब्रह्म-माया । आदि विषय श्रद्धेचे ॥६॥ हे सत्यज्ञानाचे भांडार । यांतील तत्त्वांचा आधार । घेवोनिया केला विचार । तरी बुद्धीस पटेना॥७॥ ऐसे तत्त्व सत्य मानणे । पूर्वसंस्कारांच्या कारणे । ही तर्कहीन वृत्ती जाणे । श्रद्धा नामे प्रसिद्ध ॥८॥ असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते मानणे भावनाबळें । सोपी व्याख्या श्रद्धेची ॥९॥

गामा पैलवान Sun, 02/07/2016 - 14:51
यनावाला, श्रत् म्हणजे ऐकलेले (वा अनुभवलेले) ते धा म्हणजे धारण करायची शक्ती अशी श्रद्धा या शब्दाची फोड आहे. साहजिकच श्रद्धा ही मनाच्या क्षमतेची निदर्शक आहे. हिचा विश्वासाशी थेट संबंध नाही. विश्वास नसलेले श्रद्धावान असू शकतात. याचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते नरेंद्र असतांना नास्तिक आणि ब्राह्मोसमाजी होते. मात्र असं असलं तरी देवासंबंधी काही ऐकलं तरी त्यावर मनन चिंतन केल्याखेरीज त्यांना चैन पडंत नसे. थोडक्यात तुम्ही ज्याला श्रद्धा म्हणता त्याला मी विश्वास म्हणतो. फक्त इतकाच फरक आहे. त्यामुळे तुमची नास्तिपक्षावरची श्रद्धा (= मनोक्षमता) तशीच राहू द्यावी. आ.न., -गा.पै.