Skip to main content

पश्मीना

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शनिवार, 09/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवाकल्या पाउसचिंब झाडाला वा-याने ढुशी द्यावी अन सारे तुषार पाण्यावर झंकारून तरंग उमटावे तसं काहीसं आठवणींच असतं, कुणीतरी समोरून जातं मग सारी आठवणींची वर्तुळं आयुष्य व्यापून टाकतात. सतत स्वप्नात दिसणारं कुणीतरी समोर दिसतं अवचित तसं ते तिथच असतं मग जाणवतं अरे हे तर तेच ! मग पानगळाल्या हिवाळ्यातल्या झाडावर साठलेल्या दवांसारखं उन्हात चमचमून सारं प्रकाशोत्सवासारखं होतं. अंग झोब-या गार वा-यात कुणीतरी समोर येतं, पश्मीना शालीसारखं मग काश्मीर झाली भावना विस्तवदुरडी होवून सारं जगणं उबदार बनवते, जेव्हा ते अकस्मात निघून जातं तेव्हा पश्मीना शालीसाठी मारली जाणारी हरणं आठवतात तडफडणारी. उन्हाळ्यात सुकवल्या तेंदूची गोठल्या हिवाळ्यात बिडी करावी, तसा तो सहवास सारा सुगंधीत तंबाखूचा धूर छाती भरून घेते, थरथरणारं शरीर गच्चगोठलं धुरांड होवून फक्त बघत राहतं. कधीतरी महाबळेश्वरच्या हिमपावसात भिजल्यावर ग्रेपवाईन मध्ये घेतलेला तो आश्वासक पेग अन मग सा-या थंडीचा केलेला विस्तव, समुद्रकाठावरच्या विषम शहरातसुध्दा चटके देत राहतो. चटक्यानंतर टम्म फुगलेल्या फोडातून लालसर पाणी वाहतं मग जाणवतं संपलेला तो सहवास, मस्तकात उरलेली ती थंडीची नशा, बारच्या वातानुकुलीतात फक्त भास होतात थंडपणाचे ! उष्णता तिथेच राहिली आहे ह्याचे प्रत्यंतर सतत येत रहाते कारण आता तू फोनसुध्दा उचलत नाहीस ! विजयकुमार......... ०८ . ०२. २०१०, मुंबई
लेखनविषय:

वाचने 2428
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

शेवटच्या ओळी खासच आहेत. जी लोक सालं लै जीव तोडुन प्रेम करतात त्यांच्या वाटेला असा त्रास नक्की. काही लोकांची प्रेमाची ओढ आटली की ते प्रॅक्टीकल होतात आणि काही लोक पहिल्या क्षणाचीच भावना घेऊन तितकच प्रेम करत शेवटपर्यंत भावनिक होऊन जगतात. प्रेम भावना कठीणच असते, आम्हाला बोलायला काय लागतं.
मिला था एक दिल जो दे दिया तुमको हजारो भी होते, तो तेरे लिये होते...
-दिलीप बिरुटे

तडफड खोलवर उतरली आहे! (अवांतरः विस्तवदुरडी म्हणजे 'कांगडी' का? सुरेख शब्द आहे.)

कविता आवडली. विस्तवदुरडी, समुद्राकाठचं विषम शहर, गच्चगोठलं धुरांड हे सारे शब्द आणि त्यांची प्रयोजने अगदी युनिक आहेत.

____/\____ Sandy

फारच सुंदर.. लिहीत रहा...