मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चौदहवी कि रात

सुबोध खरे · · भटकंती
चौदहवी कि रात १९९२ साल आठ ऑक्टोबर सकाळ एक तरुण युगुल आदल्या दिवशी (०७ ऑक्टोबर १९९२) लग्न झालेलं. अत्यंत उत्साहात आणी आनंदात मुलुंडहून बसने मरोळपर्यंत आणी त्यापुढे रिक्षाने सांताक्रूझ विमानतळावर सकाळी १० च्या मुंबई कोईम्बतूर विमानाने निघाले. विमान १२ ला कोईम्बतूर ला पोहोचले. विमानातील एक मध्यमवयीन गृहस्थाने विचारले तुम्ही उटी ला जात आहात? ते हो म्हणाले. असेच एक दुसरे नाव परिणीत जोडपे त्यानाही त्याने विचारले. तो उटीच्या एका हॉटेलचा मालक होता त्याला उटीला जायचे होते. दोन जोडपी आणी तो असे पाच जण माणशी ५० रुपये देऊन मारुती व्हान ने निघाले. २५० रुपये देऊन वेगळी टैक्सी करायला लागली नाही म्हणून आनंदात त्या हॉटेल मालकाने सर्वाना थंड गार नारळ पाणी पाजले. ते दोघे कुणूरला उतरले. तेथे सिम्स पार्क जवळ नौदलाचे एक डनमोअर हाउस म्हणून विश्राम गृह आहे तेथे पोहोचले. तेथे त्यांना तीन बाजूनी काच असलेलं एक दालन (SUITE) राखीव ठेवलेलं होतं. आतापर्यंत आपल्याला लक्षात आला असेलच ते युगुल म्हणजे मी आणी माझी पत्नी. या विश्राम गृहातील पाच दालनात तिन्ही दिवस आम्ही दोघंच होतो. हॉटेलच्या खोल्यांपेक्षा बरीच मोठी अशी खोली, मोठे अटैच्ड बाथरूम आणी कपडे बदलायला वेगळी खोली असे असल्याने त्याला दालन म्हणतो आहे. . . २०१५ साल ८ ऑक्टोबर( पूर्ण २३ वर्षांनी) तेच युगुल ( म्हणजे आम्हीच दोघं- युगुल म्हटलं की कसं एकदम तरुण झाल्यासारखा वाटतं ) मुलुंडहून मेरू टैक्सीने त्याच १० च्या मुंबई कोईम्बतूर विमानाने निघालो. कोईम्बतूर हून कुणुरला टैक्सीनेच गेलो( मार्गे ध्यानलिंग). आम्ही कोईम्बतूरवरून प्रथम ध्यानलिंग या जागी गेलो अतिशय स्वच्छ, शांत आणि सुंदर जागा आहे. तेथे फोटो काढायला परवानगी नाही परंतु खालील दुव्यावर सर्व माहिती फोटोसकट उपलब्ध आहे. रस असेल त्यांनी जरूर पहावी आणि भेट द्यावी अशी जागा आहे. http://www.dhyanalinga.org/ त्याच डनमोअर हाउस मध्ये दालन राखीव ठेवले होते. आश्चर्य म्हणजे आतापण अख्ख्या विश्राम गृहात आम्ही दोघेच होतो. तेवीस वर्षांनी त्याच ठिकाणी तेच आम्ही दोघे त्याच दिवशी त्याच दालनात मधुचंद्रासाठी आलो होतो. ( कितव्या ते विचारू नये) २३ वर्षापूर्वी ८ ते ११ ऑक्टोबर त्रयोदशी चतुर्दशी आणि कोजागरी पौर्णिमा असे दिवस होते.तेंव्हा चौदहवी कि रात होती आणी माझी नवपरिणीत बायको, रात्री जवळ जवळ पूर्णत्वाला पोहोचलेला चंद्र हवेत सुखद गारवा, अख्ख्या विश्राम गृहात आणी बाहेरच्या बागेत आम्ही दोघेच. . . . त्याच आठवणीना परत उजळवण्यासाठी मी त्याच तारखा निवडल्या होत्या. यावेळेस मात्र आम्ही इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे ८-११ ऑक्टोबर २०१५ ला गेलो होतो. नौदलाच्या विश्रामगृहात परत त्याच खोलीत राहायला मिळावे हा योगायोग. हा योग जुळून यावा हा प्रयत्न वर्षे करीत होतो. पण मुलांच्या परिक्षी मुळे ते जमून येत नव्हते. या वर्षी कसेही जमवायचे हे मी ठरवले होते. याचे खास कारण म्हणजे २३ वर्षापूर्वी बायको २३ वर्षाची होती आता ४६ झाली म्हणजे आता तिच्या आयुष्यातील जास्त काळ आईवडिलांपेक्षा माझ्या बरोबर गेला होता. इतक्या सुंदर सहवासाचा समारंभ साजरा केला पाहिजेच म्हणून या वर्षी जाणे आवश्यक होते. त्यावेळेस असलेला सहायक डेव्हिड दुर्दैवाने ख्रिस्तवासी झाला होता पण तेंव्हाच खानसामा फिलिप मात्र अजून तेथेच होता. असो. आम्ही विश्रामगृहाच्या बाहेर असलेल्या बागेत, सिम्स पार्क मध्ये आणी उटीच्या बोटानिकल गार्डन मध्ये काढलेल्या फुलांचे फोटो इथे देत आहे. . . . . . तेंव्हा आमच्या मधुचंद्राचा खर्च रुपये ११०००/- झाला होता.यातील विमानाच्या तिकिटांचा खर्च १०,०००/- मला सुटीच्या प्रवासाचा भत्ता(एल टी सी) म्हणून परत मिळाला होता. आताचा खर्च रुपये ३०,०००/- ( विमानाच्या तिकिटाच्या खर्चा सहित) झाला. यात तीन दिवस टैक्सीचा खर्च १००००/- झाला. तेंव्हा दोघे तरुण होतो आणि पगार आजच्या मानाने फारच कमी होता पण तरीही चारच दिवसाच्या सुटीमध्ये कुणुरपर्यंत जाऊन आलो होतो. तेथील प्रत्येक गोष्टीची आठवण अजूनही मनात ताजी होती आणि आजही त्यातील बऱ्याचशा जागांचे व्यापारीकरण झालेले नाही हे पाहून फार छान वाटले. दुसर्या दिवशी आम्ही विश्राम गृहाच्या जवळच असलेल्या सिम्स पार्क मध्ये गेलो ३० एकर क्षेत्रफळ असलेले हे उद्यान अतिशय सुंदर आणि कमी गर्दी असलेले छान ठिकाण आहे. जवळ जवळ तिन्ही दिवस आम्ही वेळ मिळेल तसे आत जाऊन शांतपणे बसत होतो. . . . . . . . . . . . पहिल्या दिवशी आम्ही कूणूर मध्येच फिरलो. २३ वर्षापूर्वी उटी मध्ये एका उपाहारगृहात तेंव्हा आम्ही मिनी मील घेतले तेंव्हा १६ रुपये होते ज्यात नारळीभात आणि दही भात होता लोणचे चटणी आणि पापड यासकट. आजही आम्ही मिनी मिल घेतले त्याचे रुपये ६० फक्त ज्यात चिंच भात, नारळी भात आणि बीसी बेळे भात होता लोणचे चटणी आणि पापड यासकट. तेंव्हाही मध्येच पाऊस पडे आणि आताही मध्येच पाऊस पडला.आयुष्यात उत्तम गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी खिशात फार पैसे लागत नाहीत.पण आपली पंचेंद्रिये शाबूत असावी लागतात. सुदैवाने मला किंवा माझ्या पत्नीला कोणताही आजार नाही कि कोणतेही पथ्य नाही. संध्याकाळी कुणुरच्या बाजारात फिरत असताना एका छोट्या टपरीवजा हॉटेलात छान भज्यांचा वास आला. आम्ही आत पहिले तर तेथे एक अण्णा कच्च्या केळ्याची भजी तळत होता. त्याला त्या भजांची मागणी केली आणि मिरचीच्या भजान्बद्दल विनंती केली. त्याचा माणूस बाजारात जाऊन मिरच्या घेऊन आला. मिरच्यांची आणि केळ्याची भजी खाऊन झक्कपैकी दोन कप कडक कॉफी घेतली. साधी सन राईजची कॉफी होती पण ज्या तर्हेने त्याने उंचावरून ओतून फेस आणून दिली त्याने तो फरक पडला. एवढे सर्व होऊन बिल रुपये ३६/- फक्त. त्या कुकला आणि वेटर ला आम्ही १४ रुपये टिप म्हणून दिले त्यावर त्यांनी अतिशय कृतज्ञतेने आम्हाला धन्यवाद दिले. साध्या माणसाना पैश्याची किंमत जास्त असते. ठाण्याला मामलेदार कडे मिसळ खायला गेल्यावर तेथे गल्ल्यावर पैसे भरून दहा रुपये टीप जेंव्हा वेटरला देतो तर त्यांना त्याची खूप जास्त किंमत असते. या विरुद्ध तारांकित हॉटेलात वेटर कमी टीप दिली तर नाराजीने बघतात असे अनुभव आहेत. दुसर्या दिवशी उटीला गेलो, जाताना वाटेत दोडाबेट्टा हे निलगिरीमधील सर्वोच्च शिखर येथेही गेलो. तेथून बोटानिकल गार्डन येथे गेलो आणि शेवटी तेथील तलावात नौकानयन करून संध्याकाळी परत आलो. . . . . . . . . . हि ठिकाणे प्रसिद्ध असल्याने याबद्दल जास्त काही लिहिण्यात अर्थ नाही जिज्ञासूनी गुगलून पाहावे. या लिखाणाचा मूळ मुद्दा असा आहे कि संसारातील जंजाळात कितीही अडकला असाल तरी नवरा बायकोने स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे फार आवश्यक आहे. प्रत्येक पुरुषात एक प्रियकर असतो आणि त्याने आपल्या प्रेयसीकडे परत "वेगळ्या" नजरेने पाहायला शिकले पाहिजे. तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये एक अवखळ तरुणी असते.लग्नात जामानिमा करणाऱ्या एखाद्या केस पिकलेल्या आजीला आजोबांनी चिडवले असता ती लाजताना पहा मग तुम्हाला लक्षात येईल. त्या तरुणीला परत उजाळा देऊन तर पहा. सोन्यासारखी आपली नाती पॉलिश केल्यावर कशी झळाळून उठतात ते. यासाठी लग्नानंतर प्रत्येक थोड्या फार कालावधी नंतर प्रत्येक युगुलाने स्वतःसाठी थोडासा वेळ काढून ठेवला पाहिजे. आपल्यातील या प्रियकराला किंवा अवखळ प्रेयसीला वर आणले पाहिजे आणी आपल्या फिकट होत चाललेल्या चित्रात नवे रंग भरले पाहिजेत.

वाचने 40188 वाचनखूण प्रतिक्रिया 81

रामदास Tue, 10/27/2015 - 11:15
प्रसन्न चित्त हासते बघुनिया मजेत त्यां मुलांत मूल होत मी, फुलांत भृंग होत त्या भरीत रंग बैठकीत, स्नेहसोबत्यांत मी प्रियेस प्रेम होत मी, अजून यौवनात मी फोटो आणि लेख आवडेश हेवेसांन.

नाखु Tue, 10/27/2015 - 11:43
संसारातील जंजाळात कितीही अडकला असाल तरी नवरा बायकोने स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे फार आवश्यक आहे. सोन्यासारखी आपली नाती पॉलिश केल्यावर कशी झळाळून उठतात ते.
या साठी टोपी काढली आहे !!!! या लेखाला रसीक छायाचित्रांची कोंदण दिल्याने बहार आली आहे.

In reply to by कुसुमिता१

गामा पैलवान गुरुवार, 10/29/2015 - 12:43
कुसुमिता१, अहो वहिनींचं सोडा हो. त्या दीर्घपल्ल्याच्या धावपटू आहेत. डॉक्टर साहेबही पन्नाशीजवळ आल्याचे वाटंत नाहीत. आ.न., -गा.पै.

सागरावर इतके फिरलेल्या साहेबांनाही नौकानयनाचा मोह व्हावा ही सहवासाची किमया... डॉक्टर साहेब लेख खूप आवडला. अश्या अनेक मधुचंद्रांसाठी हार्दीक शुभेच्छा...

In reply to by टवाळ कार्टा

सुबोध खरे Sat, 11/07/2015 - 20:08
ट का शेट त्यासाठी पहिल्यांदा लग्न करावे लागते. मुली पाहाव्या लागतात आणि त्यातलीच एक पसंत करावी लागते. आणि येणारे प्याकेज डील स्वीकारावे लागते.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 20:12
=)) स्वतः तर्कशुध्ध विचार करणारी...स्वतःला मेंटेन करणारी ....ड्रिंक्स करु शकणारी...दिसायला कमीत कमी बर्यापैकी...अशी कोणी आहे का नजरेत

In reply to by टवाळ कार्टा

सुबोध खरे Sat, 11/07/2015 - 20:16
मी कधीही कोणालाही लग्नासाठी मुलगी सुचवत नाही. आयुष्यभर एखाद्या मित्राकडून शिव्या खाण्याची मला हौस नाही.( ह घ्या). कितीही चांगली मुलगी असेल तरी ती बायको झाली कि बदलते आणि कितीही चांगल्या काकू असतील तरी सासूबाई झाल्या कि बदलतात.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 20:24
मी कधीही कोणालाही लग्नासाठी मुलगी सुचवत नाही.
हे माहित होते म्हणूनच विचारलेले =))
आयुष्यभर एखाद्या मित्राकडून शिव्या खाण्याची मला हौस नाही.( ह घ्या).
मला मित्र म्हटल्याबद्दल आनंद वाटावा कि मी तुम्हाला शिव्या देईन असे तुम्हाला वाटल्याबद्दल खेद वाटावा यात कंफूजन झालेय
कितीही चांगली मुलगी असेल तरी ती बायको झाली कि बदलते आणि कितीही चांगल्या काकू असतील तरी सासूबाई झाल्या कि बदलतात.
यासाठीच "स्वतः तर्कशुध्ध विचार करणारी" हि पहिली अट आहे

In reply to by टवाळ कार्टा

सुबोध खरे Sat, 11/07/2015 - 20:32
तर्कशुद्ध विचाराने बायकोने मॉव्ह रंगाची साडी आणायला सांगितली तर काय करशील? ( मुदलात मला हा रंग तांबडा कि निळा हेच माहित नाही).तेंव्हा बायकोसमोर तर्क चालत नाहीत. मग नंतर तू मला म्हणणार डॉक्टर, "तुम्ही म्हणालात म्हणून हिच्याशी लग्न केले". मुलगी म्हणून मला एखादी चांगली वाटली तरी बायको म्हणून ती कशी निघेल हे काय आणि कसे सांगता येईल. यापेक्षा तू आमचा मित्रच बरा.

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 20:57
मी म्हणेन... एक काय आपण २ घेउ...एक तुझ्या पसंतीची एक माझ्या...तु तयार होऊन चल....जेवण पण बाहेरच करू...मग आईस्क्रिम / पान...यापुढे....बरेच दिवस डेटसाठी सुध्धा गेलो नाही आपण...जाताना मोगर्याचा गजरापण घेउ की

आनंदराव Tue, 10/27/2015 - 16:00
डॉक्टर साहेब, युगुल म्हटलं की कसं एकदम तरुण झाल्यासारखा वाटतं ) फोटो बघितल्यावर आणि हा लेख वाचल्यावर तुम्हाला कोण म्हातारे म्हणेल सांगा बरे? आणि या लिखाणाचा मूळ मुद्दा असा आहे कि संसारातील जंजाळात कितीही अडकला असाल तरी नवरा बायकोने स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे फार आवश्यक आहे. तुमचा हा मुद्दा पटला लगेच अमलात आणणार

मारवा Tue, 10/27/2015 - 17:50
सुबोध जी या लेखातली फुलांची छायाचित्रे प्रचंड आवडली विशेषतः ते काळ्या रंगाच फुल मध्ये पिवळ्या रंगाचं ते फार विलक्षण वाटलं हे कोणतं फुलं आहे ? नाव माहीतीय का तुम्हाला ? फार नेत्रसुखद लेख त्या पिवळ्या फुलाने तर एका आवडत्या ओवीचा चरण आठवला एकें लसत्कांचनसम पिंवळी

रेवती Tue, 10/27/2015 - 18:11
लेखन व छायाचित्रे आवडली. एक जवळजवळ काळे फूल पाहून मजा वाटली. व्यापारीकरणाबद्दल प्रश्न विचारणारच होते पण तुम्ही लिहिलेय की अजून तितकेसे व्यापारीकरण झाले नाहीये म्हणून बरे वाटले.

In reply to by रेवती

स्रुजा Wed, 10/28/2015 - 02:17
+ १ असेच म्हणते. कुन्नुर ला अद्याप गेले नाही, उटीला जाऊन आले आहे आणि बाजारीकरण उटीचे मात्र झाले आहे. तुमचा लेख आणि फोटो बघुन कुन्नुर ला जायची इच्छा होते आहे.

सुबोध खरे Tue, 10/27/2015 - 18:28
सर्व मित्राना धन्यवाद. वरील फुलांपैकी कोणत्याही फुलाचे नाव मला माहित नाही.त्यात रंगाच्या आणि आकाराच्या इतक्या छटा आहेत कि वेडच लागावे. विश्राम गृहाच्या बाहेर किंवा सिम्स पार्क किंवा बोटानिकल गार्डन मध्ये काढलेल्या फुलांचे भरपूर फोटो आहेत. त्यातील काही निवडक येथे टाकलेले आहेत. व्यापारीकरण कुणूरचे तितकेसे झालेले नाही पण उटीचे झालेले आहे. एक फरक हा आहे कि आत्ता( ऑक्टोबरच्या सुरुवातीला) शाळा कॉलेजांच्या सुट्या सुरु झालेल्या नसल्यामुळे सहलीला जाणार्या लोकांचा मोसम सुरु झालेला नसल्यामुळे गर्दी फार जास्त नव्हती. अजून तेवीस वर्षांनी परत जाऊ तेंव्हा काय परिस्थिती( आमची दोघांची आणि उटी कुणुरची) असेल ते माहित नाही.

बोका-ए-आझम Tue, 10/27/2015 - 19:29
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा! काव्यमय शुभेच्छा देण्यासाठी जी लागते ती प्रतिभा माझ्याकडे अजिबात नाही, त्यामुळे ही गिफ्ट गोड मानून घ्यावी - http://tune.pk/video/2994838/abhi-to-main-jawan-hoon-lata-mangeshkar-film-afsana-1951

इडली डोसा Wed, 10/28/2015 - 01:37
पुर्वी कामाच्या निमित्ताने कोइमतुरला ४ - ५ वेळा जाणे झाले आहे. सुंदर शहर आहे. एका संध्याकाळी काम झाल्यावर आम्ही शहराजवळच एका छोट्या टेकडीवर शिवमंदिर आहे तिथे गेलो होतो. तिथुन दिसणारा नजारा तुमच्या काही फोटोंमध्ये आहे तसाच होता. असेच एक गेस्ट हाऊस काश्मीरला आडु भागात आहे. आम्ही मधुचंद्रासाठी तिथे गेलो होतो त्याचा फोटो देण्याचा मोह आवरला नाही. पुढच्यावेळी तुम्ही या ठिकाणाला भेट द्या असं सुचवते. .

In reply to by इडली डोसा

सुबोध खरे Wed, 10/28/2015 - 13:31
इडो साहेब २००९ मध्ये आम्ही काश्मीरला जाऊन आलो आपण फोटो घेतला हे ठिकाण कोणते आहे?

श्रीरंग_जोशी Wed, 10/28/2015 - 02:23
वाह, काय ते वर्णन अन काय ते फोटोज. भरभरून जगण्याबाबत तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. या लेखासाठी धन्यवाद. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

सुबोध खरे Wed, 10/28/2015 - 09:54
जोशी साहेब आमच्या दोघांच्या आनंदी राहण्याचे एक महत्त्वाचे कारण असे कि आम्हाला दोघांना लोकांचा हेवा/ मत्सर वाटत नाही.सर्वात जवळची उदाहरणे -- माझा भाऊ किंवा तिचा भाऊ दोघेही इंजीनियर आहेत आणि ते आमच्यापेक्षा लौकिकार्थाने जास्त यशस्वी आहेत( जास्त पैसे मिळवतात). असे आमचे बरेच मित्र आहेत ज्यांच्या कडे बराच पैसा आहे. पण त्यांच्या कडे असलेला पैसा किंवा सोयी सुविधा( मोठे घर मोठी गाडी इ) पाहून आम्हा दोघांना कधीही इर्षा किंवा मत्सर वाटत/ वाटलेला नाही. पण त्यासाठी द्यायची किंमत म्हणजे वेळ तो द्यायची आमची दोघांची तयारी नाही. माझ्या मते आनंदी असण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे या भावनेतून माणसे कायम स्पर्धेत पळत राहतात आणि त्यातून एक मत्सर आणि इर्षा जन्माला येते. यातूनच माणूस कायम असमाधानी राहतो असे मला वाटते.

निनाद Wed, 10/28/2015 - 03:53
अभिनंदन आणि लग्नाच्या २३व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वा! डॉक्टरसाहेब, किती छान लिहिता आणि किती छान जगता हे आयुष्य! मस्त वाटले वाचून तुम्हला प्रत्यक्ष जगताना किती मजा येत असेल. तुमचे आयुष्याविषयीचे अमलात आणलेले तत्वज्ञान फार छान आहे...

सुबोध खरे Wed, 10/28/2015 - 09:36
अर्धवटराव साहेब ज्याच्या वर तारीख नाही ते मी भ्रमणध्वनी वर काढलेले आहेत आणि ज्यावर तारीख आहे ते कॅमेऱ्याने काढलेले आहेत. पण सर्व फोटो ऑक्टोबर २०१५ मधीलच आहेत.

चिगो Wed, 10/28/2015 - 15:47
सुंदर धागा आणि सुंदर विचार.. तरुण जोडप्याला शुभेच्छा..

चतुरंग Wed, 10/28/2015 - 18:05
व्यग्र जीवनशैलीतून एकमेकांसाठी आवर्जून वेळ काढा हे सोदाहरण इतक्या उत्तम रीतीने दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद!! ('बोधि'सत्त्व्)रंगा

अभिजीत अवलिया Sun, 11/01/2015 - 13:40
एक नंबर डॉक्टर. तुम्हा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे विचार (ह्या लेखातले) आणी इतर अनेक लेखांवर तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता त्या प्रेरणादायक आणी विचार करायला लावणार्या असतात. तुम्हाला पाहावे अशी माझ्या मनात एक इच्छा होती ती तुम्ही फोटो दिल्याने पूर्ण झाली.

दीपा माने गुरुवार, 11/05/2015 - 21:25
डाॅक्टर, तुमचे जीवनावरती बोलू काहि वरील विचार मला नेहेमीच पटतात. जीवनातला निखळ आनंद पैशांनी कधीच विकत मिळत नसतो. तो तुमच्या अवती भवतीच असतो पण तो पाहण्याची मात्र दृष्टी हवी हे पटते. जसे म्हटले जाते की What you eat is what you are तसेच म्हणावेसे वाटते की What you think is what you are! त्यामुळेच तुम्ही उभयता Ever greenच रहाल. असाच दीर्घारोग्यात अखंड सहजीवनाचा आनंद घेत रहा अशी तुमच्या २३व्या लग्नाच्या वाढदिवशी कामना करते.

pradnya deshpande Sat, 11/07/2015 - 15:38
खरच खूप छान वाटले तुमचा अनुभव वाचून. असे अनुभव म्हणजे फिरुनी नवे जम्नेन मी या गण्या प्रमाणे वाटतात

In reply to by सुबोध खरे

पैसा Sat, 11/07/2015 - 23:41
लग्नाच्या वाढदिवसाला २५ वर्षे होणार म्हणजे रौप्यमहोत्सव ना! ५० झाली की सुवर्ण, ६० झाली की हीरक, आणि ७५ झाली की अमृत महोत्सव.

In reply to by पैसा

सुबोध खरे Tue, 09/05/2017 - 19:34
पैसा ताई आता आमचा "रौप्य महोत्सव" आला आहे. यावेळेस स्वित्झर्लंडला जायचा बेत केला होता. पण फार जास्त थंडी असते म्हणून बायकोने पहिल्यापासूनच नकार घंटा लावली होती म्हणून शेवटी कोडाईकॅनालला हॉटेल कार्लटन मध्ये बुकिंग केले आहे. मुंबई कोईमतूर विमानाचे तिकीट बुक केलं आहे. तेथे कार बुक करून(झूम कार किंवा तत्सम) स्वतः चालवत जाणार आहे. यावेळेस पण ५ -६-७ आणि ८ असे चार दिवस जात आहोत. पाच तारखेस कोजागिरी पौर्णिमा आहे. सात तारखेस लग्नाला २५ वर्षे पूर्ण होतील. आपल्यातील या प्रियकराला किंवा अवखळ प्रेयसीला वर आणले पाहिजे यासाठी

In reply to by सुबोध खरे

पैसा Tue, 09/05/2017 - 19:47
तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!! आता पुढची २५ वर्षे असेच राहा!

Nitin Palkar Tue, 09/05/2017 - 13:57
डॉक्टर तुम्ही अतिशय सुबोध आणि खरे लिहिले आहे. तुम्हा उभयतांना सर्वच बाबींकरता अनेकानेक शुभेच्छा!