मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

राजेश घासकडवी · · काथ्याकूट
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती. धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे. - दररोज पूजा करणं - मंदिरात नियमितपणे जाणं - देवाला नवस बोलणं - तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं - विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं - पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं - शिवाशीव, विटाळ पाळणं - मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं. - घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं. - घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा. १. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.) २. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.) ३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.) उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.

वाचन 51281 वाचनखूण प्रतिक्रिया 205

वरील दोन्ही प्रतिसादांशी तंतोतंत बाड़ीस , तुम्ही जे जे दिले आहे लिस्ट मधे ते आस्तिक/सश्रद्ध वगैरे पेक्षा देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधी जास्त वाटतात

राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 05:37
धर्म, श्रद्धा आणि रुढीप्रियता ह्यां सर्वात फरक आहे, असे वाटते.
या सगळ्या गोष्टीन्चा आणि श्रद्धेचा काही संबंध नाही हो.
हे आक्षेप योग्य आहेत. सश्रद्ध, धार्मिक मन आणि पाळल्या जाणाऱ्या रुढी यांच्यात थोडंफार कोरिलेशन असेल, पण रुढीप्रियता म्हणजेच धार्मिकता नाही हे उघड आहे. मला अनेक उदाहरणं माहीत आहेत, जिथे 'माझी आई पूजा आपली प्रथा म्हणून करायची, पण देवावर तिचा फारसा विश्वास नव्हता. ते तिच्यासाठी एक करण्याचं काम होतं' असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मी दिलेल्या निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तरी काही हरकत नाही. ते वापरा म्हणण्यापेक्षा 'या या गोष्टींचा तुम्हाला विचार करता येईल' या स्वरूपाची मदत म्हणून होते. मुलांनी आपल्या आईवडिलांबरोबर इतका वेळ घालवलेला असतो की त्यांना आपल्या आईवडिलांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत हे व्यवस्थित माहीत असतं. स्वतःविषयीही तेच. त्यामुळे आईवडिलांशी स्वतःची तुलना ही बऱ्यापैकी बरोबर असेल अशी आशा आहे. तेव्हा तुम्ही नक्की कुठचे निकष वापरता हे महत्त्वाचं नाही. कदाचित वेगवेगळे निकष लावून तुम्ही आत्तापर्यंत निष्कर्ष काढलेलाही असेल. तो सरळ वापरला तरीही चालेल.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा Sun, 09/13/2015 - 05:44
मुळातच स्वतः सोडून दुसर्‍या एखाद्याची - अगदी आई, वडिल असले तरी - श्रद्धा, विश्वास ह्याचे योग्य आणि अचूक मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न पडला आहे. हे सारे फारच सापेक्ष होईल असेही वाटते आहे, म्हणजे मूलभूत असे निष्कर्ष निघणार नसतील तर कितपत अचूकता असेल असेही वाटते आहे. तरीही कोणी लिहिणार असेल तर वाचायची उत्सुकता आहेच.

In reply to by यशोधरा

प्यारे१ Sun, 09/13/2015 - 10:05
ओक सरांची आठवण आली. त्यांची नाडीची कट्टर चिकाटी, यांची कट्टर नास्तिकतेची. नास्तिक करून सोडेन सकलजन हा यांचा दावा दिसतो. असो. शुभेच्छा मास्तुरे!

In reply to by प्यारे१

राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 17:36
अहो मी मिपावर जवळपास शंभर लेख लिहिलेले आहेत. त्यातले नास्तिकतेची भलामण करणारे किती ते तपासून बघा जरा.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ Sun, 09/13/2015 - 22:11
बस्स काय मालक? या विषयावर किति तरी वेळा चर्चा झाल्या आहेत की. http://misalpav.com/node/24879 ही तुम्हीच सुरु केलेली चर्चा पुन्हा एकदा वाचाल काय? उगा उतरणीला लागलेली भारतीय टीम जिंकायला कुणा लिंबू टीम बरोबर खेळून जिंकते तसं वाटायला लागलं आहे. टीआरपी कमी झाला की असले विषय काढून स्कोअर करायचा.

In reply to by प्यारे१

राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 23:54
म्हणजे तुम्हाला शंभरात एक लेख सापडला... आणि तुम्ही माझी तुलना शशिकांत ओकांशी करता! काहीही हं, प्यारे१!

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ Mon, 09/14/2015 - 00:15
एक उदाहरण दिलं साहेब... बाकीची तुम्हाला माहिती आहेत की. लेख आणि प्रतिसाद सुद्धा वाचण्यासारखे असतात हो आपले. :)

मुक्त विहारि Sun, 09/13/2015 - 06:41
मी तरी देवाचा उपयोग करून घेतो. चांगले यश मिळाले तर देवाने दिले आणि अपयश आले तर, ते मात्र माझ्या चुकीने, अशीच मानसिक धारणा आहे. त्यामुळे माझ्या मते तरी, देव हा उत्तमच, कारण तो नेहमीच माझ्या यशाचा धनी. राहता राहिला तुमचा प्रश्र्न. "तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?" थोडा जास्तच. आमचे माता-पिता, तीर्थक्षेत्री जातात ते पदभ्रमण करायला.गर्दी नसेल तर देवाला दर्शन पण देतात.चुकुन कधी वडीलांनी अभिषेक केला असेल तरच. त्यामानाने आम्ही थोडे बरे. गुहागरला व्याडेश्र्वरला अभिषेक घालतो आणि त्याच दिवशी साग्रसंगीत भोजन पण करतो. एकाच दगडात २ पक्षी, अभिषेक केला म्हणून बायको खूष आणि चिपळूणच्या "दीपक"ची तीर्थयात्रा पार पडली म्हणून आम्ही पण खूष. तुमच्या अज्जून काही प्रश्र्नांची माझी उत्तरे......कंसातील उत्तरे मिपाच्या बाबतीत, कारण मिपा हाच आमचा देव आणि मिपाकर हेच आमचे सगे-सोबती. - दररोज पूजा करणं ====> अजिबात नाही.वाचनातूनच वेळ मिळत नाही.(आणि मिपा-मिपा खेळतांना तर नाहीच नाही.) - मंदिरात नियमितपणे जाणं ====> अजिबात नाही.आमच्या दर्शनाने उगाच त्याचा दिवस खराब जायचा.(मिपाच्या मंदिरात मात्र जमेल तशी हजेरी लावतोच) - देवाला नवस बोलणं ===> हमखास.पण अजिबात फेडत नाही.आपल्या संकटाचा भार त्याच्यावर टाकायचा आणि संकटाचा सामना आपला आपणच करायचा. (आमच्या मिपाला उत्तम-उत्तम लेखांचा अभिषेक क्षणो-क्षणी मिळू दे, असा नवस मात्र रोजच बोलतो.) - तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं ===> त्याचा उल्लेख केला आहे. (मिपाकरांबरोबर कट्टा करणे ही पण एक प्रकारची तीर्थयात्राच) - विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं ====> विवाह-मुंज-वास्तूशांत, ह्याबद्दल परत कधीतरी...पण आमचे सत्यनारायण पण वेगळेच असतात.मिपाकरंना ह्याबाबतीत वेगळे सांगायला नको. - पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं ====> प्रचंड जागरूक असतो. अद्याप तरी कुणालाही एका नव्या पैशाने फसवले नाही, की कुणाला मानसिक-शारिरीक आणि आर्थिक त्रास दिलेला नाही.जमेल त्याला जमेल तशी मदतच केली. हेच आमचे पुण्य. आणि पापाच्या बाबतीत म्हणाल तर, रोज मिपावर बैठक टाकून बसणे. - शिवाशीव, विटाळ पाळणं ===> अजिबात नाही. (आम्ही डू-आडींच्या लेखाला पण कधी-कधी प्रतिसाद देतो.) - मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं. ====> अजिबात नाही. (काही डु-आय-डींना इथले संमं, योग्य त्यावेळी, त्याच्या कर्माचे फळ देतातच. नाना प्रकारे, गहन-विचार करून फुकाचा हितोपदेश करणारे बरेच जण जागो-रे-जागो-रे करत गेले.) - घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं. ====> अजिबात नाही. (मिपावर मात्र जमेल तसा प्रतिसाद देतोच.) - घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं ====> आमचे देवा=विषयी एकूण मत, देवाला पण ठावूक असल्याने, तो पण बिचारा एका भिंतीवर जागा पकडून असतो. (मिपा साठी २ स्थाने आहेत.एक हॉल मध्ये आणि दुसरा शयन-खोलीत.) थोडक्यात तर आम्ही, "कुठे शोधिशी रामेश्र्वर अन कुठे शोधिशी काशी...." आणि "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले....." अशा मिपाकरांच्या पंक्तीतले.

एस Sun, 09/13/2015 - 07:46
आईवडिल - १ मी - ३ दोन्हीही पक्ष एकदम कट्टर! ;-) त्यामुळे आमच्या घरात रोजचीच महायुद्धे व्हायची. हेहेहेहे!

अजया Sun, 09/13/2015 - 11:49
३:४;) विषय गंडलाय पण ट्यार्पीसाठी बराय!

In reply to by जेपी

सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 12:19
प्रचलित असलेले मात्र घासूगुरुजींच्या यादीत नसलेले दोन प्रकार आहेत: नास्तिक आणि अज्ञेयवादी. तू कोणत्या प्रकारात येतो?

In reply to by सतिश गावडे

अभ्या.. Sun, 09/13/2015 - 13:18
एक्क़ा काकानी ती फेयर अन लव्हली स्टाइल ची स्ट्रीप काढली होती ना काही दिवसापूर्वी? नास्तिक ते आस्तिक ची?

In reply to by सतिश गावडे

जेपी Sun, 09/13/2015 - 13:55
परिवार गरजेपुरते धार्मिक आहे(उदा.वेळ वाचवण्यासाठी चटश्राद्ध चालेल.) मी आस्तिक कडुन पुर्ण नास्तिक होत गेलो.(उदा.कर्मकांडावर पैसे आणी वेळ वाया घालवण्यापेक्षा इतरत्र सत्कारणी लावेन)

मारवा Sun, 09/13/2015 - 12:54
वरील यादित ४- नास्तिक ५- अज्ञेयवादी या दोन अजुन जोडल्या पाहिजेत कारण नाहीतर वरील यादित उत्तर कसे देणार ? हे म्हणजे तृतीयपंथीया ला मेल किंवा फिमेल एकपैकीच निवड कर असे विचारण्यासारखे आहे ? तर वरील यादि त ४ कींवा ५ जोडले तर माझे उत्तर आई वडिल -१ मी- ५ असे देइल घासकडवींनी त्यांच्या सोयीसाठी मला ३ मध्ये बसवुन घ्यावे. वर्गीकरणाची व्याप्ती वाढणे आवश्यक आहे मात्र. हे शेपुट फार वाढेल असे वाटत असेल तर ६- इतर असे म्हणुन ब्लँकेट मध्ये इतर सर्व कॅटेगरीज टाकाव्यात पण बेसीक तीन धार्मिक नास्तिक व अज्ञेयवादी त कॉम्प्रोमाइज करण्यात अर्थ नाही

त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा. १. तुमच्या यादीत वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे नास्तिक आणि अज्ञेयवादी यांचा समावेश हवा. २. अजून एक, यादीत "काय म्हाय्त नाय बुवा" यांनाही स्थान दिले पाहिजे. वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो... कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 16:41
वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो...
हे काहींना लागू होते त्यामुळे सहमत.
कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)
हे काहींना लई येळा लागू होते म्हणून लई येळा सहमत.

(कदाचित विषयांतर होईल पण तरीहि हे चिटकवतोय हे वाचून वडील अन म्या ३ नंबरला आहे याचे समाधान वाटते.) श्री. गिरीष लाड यांची पोष्ट ( डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांचे सहकारी ) लहानपणापासून मी देव मानणारा, कुंभ रास असल्याने नियमितपणे शनिवारी शनिमंदिरात जावून तेल वाहणारा आणि इतर सगळे धार्मिक कर्मकांड करणारा होतो. जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती आली तेव्हा तेव्हा देवाशी भावचाल पण केली. हे झाल तर ते देईन, अस झाल तर तस करीन वगैरे वगैरे प्रत्येक वेळी हि शंका होतीच कि असे खरच होत असते का? देव खरच आहे का? पण गांभीर्याने विचार कधीच केला नव्हता. वाटायचं कि इतकी वर्ष सगळे देव देव करताहेत, सगळी मोठी, थोर मानस देव मानताहेत, म्हणजे असेल. आपण कशाला नसत्या उद्योगात पडायचे. नुकसान काय आहे? झाला तर फायदाच आहे. आणि शिवाय गरज पडल्यावर शेवटी देव सोडून कुठे जाणार आपण? परत मेल्यानंतर खरच देव असला, स्वर्ग नर्क असला तर? कशाला चान्स घ्या. म्हणून सगळे सुरळीत चालले होते. माझी आणि माझ्या आजीची (ती आत्ता ८५ वर्षांची आहे) नेहमी जुगलबंदी चालायची. मी एन सी सी मध्ये होतो आणि नेहमी शनिवारीच दाढी केली नसल्याची आठवण यायची, परत रविवारी सकाळी एन सी सी ला उशीर झाला तरी शिक्षा आणि दाढी नाही केली तरी शिक्षा, त्यामुळे शनिवारी माझी आणि आज्जीची चकमक ठरलेली. ती नेहमी ओरडायची कि शनिवारी दाढी करू नये, मग मी तिला कारण विचारायचो आणि ती म्हणायची कि शास्त्रात लिहिलंय. मग माझा पुढच प्रश्न, कुठाय शास्त्राच पुस्तक, आणि तू कधी वाचाल? अशी आमची अनेक भांडणं व्हायची, प्रत्येक वेळी हे असे का, ते तसे का? आणि एकच उत्तर मिळायचे कि शास्त्रात लिहिले आहे. प्रश्न विचारू नको, सांगते ते गपचूप कर. प्रत्येक वर्षी दिवाळीला लवकर उठून अंघोळ कर नाहीतर नरकात जाशील, याच्यावरून तर गमती जमती ठरलेल्या. मी तिला चिडवायचो, कि अमेरिकेतील सगळे लोक नरकातच भेटतील. २०१० साली दाभोलकरांना पहिल्यांदा भेटलो. साधना साहित्य संमेलन कोल्हापुरात भरल होत आणि तिथे मी पाणी प्रश्नावर एक ऑडियो पुस्तक बनवले होते त्याचे प्रकाशन अमोल पालेकरांच्या हस्ते होते. तेव्हा डॉक्टरांची आणि माझी पहिली भेट झाली. तो पर्यंत खरतर अंधश्रद्धा निर्मुलन वगैरे काही माहित नव्हते. मग डॉक्टरांशी अजून परिचय झाला आणि पुढे बरच वाचण्यात पण आल. माझ्या गर्भलिंग निदान रोखण्याच्या कामाला पाठबळ देणारे डॉक्टर एकमेव सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती होते. बाकीचे विरोधच करत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी कौतुक आणि कुतूहल जास्तच वाढले. पुढे त्यांच्या व्याख्यानांच्या ऑडियो सीडी बनविण्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही त्यांच्या १० व्याख्यानांची ऑडियो सीडी काढायचे ठरवले. १० दिवसांकरता एक स्टुडियो बुक केला आणि आम्ही रोज सकाळी स्टुडियोत भेटू लागलो. ते एकसंध व्याख्यान करायचे आणि मी एकमेव श्रोता. त्या १० व्याख्यानाचा माझ्यावर खूपच परिणाम झाला आणि मी स्वतः विचार करू लागलो. डॉक्टर नेहमी म्हणायचे कि माझ पटत नसेल तर हरकत नाही, पण मी काय म्हणतोय ते एकाल तरी? विचार तर कराल? हळू हळू एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मी विचार करण्याबरोबरच इतरांशी चर्चाहि करू लागलो. एक प्रश्न शेवटी नेहमी सगळे विचारायचे कि देव आहे कि नाही? मी पण सगळे तर्क लावून विचार केला, डॉक्टरांचेहि मत एकले. त्यापुढे मला उत्तर सापडले ते असे कि ....... देव हि संकल्पना आहे. कुणी गणपतीला देव म्हणतात, कुणी तिरुपती, कुणी अल्ला, कुणी जिजस इत्यादी इत्यादी. म्हणजे देव म्हणून तुम्हाला कुणीतरी सांकेतिक स्वरुपात म्हणजे मूर्ती स्वरुपात हवा असतो. मग नुसती मूर्ती असून उपयोग नाही, त्याला नाव पाहिजे आणि त्याने माणसाला अशक्य असणाऱ्या सर्व गोष्टी केलेल्या असल्या पाहिजेत आणि त्याची कथा असली पाहिजे. (त्याचे पुरावे नसले तरी चालतील) म्हणजे अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर ज्ञानदेवाने उडवलेली भिंत! गेल्या १०० २०० वर्षात विद्यानाने खूप प्रगती केली. गेल्या ३० वर्षात तर विद्यानाचा प्रसार आणि प्रभाव खूपच वाढला. साधारण २० वर्षांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट आता काहीच वाटत नाही. म्हणजे घरी बसून परदेशातील क्रिकेटचा सामना लाइव्ह बघणे, (संदर्भ महाभारतातील संजय), विमानात बसून हवेत उडणे (अनेक संदर्भ), अशी अनेक उदाहरणे देत येतील. आज जर एका लहान मुलीला हे सांगितले कि विमान आपोआप किंवा चमत्काराने उडते, देव उडवतोय, तर ती देखील हसेल. कारण त्यामागचे कारण कळले आहे. म्हणजे जी गोष्ट आधी चमत्कार होती, ती करणारा देव होता. त्या गोष्टीचा खुलासा आज विद्यानाने केला आणि कारण कळले कि तिथून देवाची सुट्टी होते. आधी संतान किंवा मुलबाळ हे देवाच्या कृपेने व्हायचे, पण आज कारण कळले आहे, त्यामुळे आज जर कोणी असे म्हटले कि आपला काय नाय बाबा, सगळी देवाची कृपा, तर लोक हसतील किंवा वेगळाच अर्थ काढतील. याही पलीकडे अजून अनेक अशा गोष्टी आहेत कि ज्या का आणि कशा घडतात ह्याची कारणे कळलेली नाहीत. त्यामुळे ते देवच करतोय असे जरी मानले तरी हरकत नाही. पण देवाच्या नावावर ज्या काही भाकड कथा आणि देवाचा जो काही धंदा मांडलाय तो तरी थांबवायला पाहिजे कि नाही? पण तसे होतांना दिसत नाही कारण देव म्हणजे भीती. हे केल तर पाप लागेल, ते केल तर पाप लागेल, नरकात जाल इत्यादी इत्यादी. मग त्यासाठी उपायाचा धंदा. म्हणजे कालसर्प योग आहे, हि पूजा करावी लागेल, सत्यनारायणाची पूजा करा, (आजकाल सत्यानारायनाचे branded पूजेचे साहित्य मिळते), बर सत्यनारायणाची कथा ऐकल्यावर तर जास्तच भीती वाटते. सत्यानारायनाचा प्रसाद घेतला नाही तर नौका पाण्यात बुडते, द्रव्याचा कचरा होतो, आणि पूजा करून "ब्राम्हनास खान पाण आणि दान केले" कि सत्यनारायण प्रसन्न होतो आणि कचरा परत द्रव्यात रुपांतरीत होतो. मला एक साधा प्रश्न पडतो, जर तो देव असेल, तर तो असा खुनशी कसा काय असू शकतो? एकतरी शांत देव आहे का? कि ज्याची पूजा नाही केली तरी त्याला राग येत नाही? बर प्रत्येक पूजेचा लाभार्थी हा ब्राम्हणच कसा काय? देवाने अस कधी का नाही सांगितल कि चांदीची गाय एका शोशितला, गरिबाला दान करा? सगळे सुके मेवे ब्राम्हणालाच का द्यायचे? फक्त ब्राम्हणानेच का पूजा करायची? जसे आजकाल बरेच दवाखाने भीतीचा धंदा करतात, तसाच देवाचा धंदा करणारे वाढतच चालले आहेत. कोण लाल किताब तर कोण हनुमानाचे लोकेट विकतोय. म्हणजे लोकांच्या वाईट परिस्थितीचा गैरवापर करून देवाच्या उपायाचे लालूच दाखवणारे धंदे आज बोकाळत चालले आहेत. कारण देव नीतीने वागायला शिकवत नसून अनीतीने केलेल्या कामांतून सुटका कशी होईल ह्याचा पर्याय झाला आहे. ११ वर्षे पाप करा आणि एकदा कुंभ मेळ्यात स्नान केले कि अकौंट नील, म्हणजे परत पाप करायला मोकळे, दोन नंबरचा पैसा कमावला कि एकदा शिर्डीला त्यातला हिस्सा समर्पित केला कि काळा पैसा पांढरा! बर आजच्या लोकशाहीच्या काळात देवानेही परत जन्म घेवून दाखवावा आणि निवडणूक लढवून जिंकून दाखवावी. परत देवाचीच गोष्ट सांगायची तर अनेक प्रश्न पडतात. देव आहे तर कुणाला दिसत कसा नाही, गणपती फक्त भारतातीलच लोकांना कसा माहित, किंवा भारतातील देव परदेशात का नाहीत, मग ज्यांना इतर देशातील लोक ओळखताच नाहीत, त्यांनी हि सृष्टी कशी काय निर्माण केली? आणि केली तर त्यांना साधे ओळखत पण का नाही? फक्त एकच देव का नाही? का अल्ला, जीजस, इतकी वेगवेगळी देव निर्माण झालीत? बर सगळ्यात मोठी अंधश्रद्धा हि आहे कि "सगळे धर्म एकच सांगतात!" साफ खोट आहे, जर सगळे धर्म एकच सांगत असतील, तर वेगवेगळ्या प्रथा, पद्धती का? हिंदूला जाळतात आणि मुसलमानाला पुरतात का? श्रावण आणि गटारी गटारी अमावस्या किती विरोधाभास आहे बघा , म्हणजे रात्री १२ च्या आत पी पी दारू प्यायची आणि लगेच सकाळी पूजेला बसायचे? श्रावण संपला कि परत सगळा सुरु? बर गम्मत बघा उपवासाला काहीच खायचं नाही, अगदी निरंकार, पण सिगरेट पिला तर चालते, तंबाखू खाल्ली तर चालते, कस काय? आज गुरुवार आहे, आज पार्टी नको? इतर दिवस चालते. म्हणजे दारू पिणे हे दिवसानुसार चांगले आणि वाईट कस काय असू शकते? म्हणजे देव फ़्लेक्जिबल आहे अस म्हणायचं का? कि आज शनिवार आहे ह, आज माझा दिवस आहे, आज दारू पिलास तर बघ, अस कुठे असते का? सरते शेवटी, इतकी वर्षे हा प्रकार चालत आलेला आहे, त्यामुळे काळत पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. हे सगळ मी शिकलेल्या लोकांबद्दल बोलतोय. कि ज्यांना हे सगळ पटत, पण कृतीत आणणे कठीण जाते. कारण फक्त अनाहूत भीती. म्हणूनच म्हणतो कि देव म्हणजे भीती. आणि म्हणूनच मी पठडीतल्या देवाला मानत नाही. देव आहे कि नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असू शकतो. जी लोक देव मानतात कि देवाची पूजा अर्चना करतात ती लोक वेडी आहेत किंवा वाईट आहेत अस मी मुळीच म्हणत नाही. देव मानणे आणि देवाचे चमत्कार आणि अंधश्रद्धा मानणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बर इतक्या वर्षांची सवय आहे कि कुणी तरी पाहिजे ना आधाराला? मग जर देवच मानायचा ना तर सोप सांगतो, आपल्या आई वडिलांना देव माना, जे काही तुम्ही देवासाठी करता, ज्या निष्ठेने करता, त्याच्या ५०% जरी तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी केल तरी बघा चमत्कार तुमच्या घरातूनच होतील. मंदिरात दक्षिणा देण्यापेक्षा आई वडिलांना द्या, कठीण प्रसंग आला तर देवाकडे धाव घेण्यापेक्षा आई वडिलांकडे जा, बघा नुस्त उत्तरच मिळणार नाही तर धीर पण मिळेल, शक्ती पण मिळेल आणि समाधान पण. हे सगळा देवानेच निर्माण केलाय न, मग तुम्हाला निर्माण करणारे तुमचे आई वडिलाच आहेत न, मग तुमचा देव म्हणजे तुमचे आई वडील. ते सोडून कुठे इकडे तिकडे पळता? देव जरूर माना पण मूर्तीला नाही, तर जिवंत आई वडिलांना. मग सत्यानारणाची भीती नाही, कि शनीची साडेसाती नाही.

In reply to by सत्याचे प्रयोग

काळा पहाड Sun, 09/13/2015 - 16:28
मला या "देव नसतो" वाल्या लोकांचा माजोरडेपणा आवडत नाही. जणू काय देव आहे किंवा नाही हे सिद्ध करायचा मक्ता फक्त आस्तिक लोकांनीच घेतलाय. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर चा हा प्रकार आहे. "कारण कळले कि तिथून देवाची सुट्टी होते" हे फक्त अर्ध-शिक्षित लोकांसाठी खरंय. जोपर्यंत प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणार्‍या गोष्टी आहेत, तोपर्यंत माझा देवावर विश्वास आहे.

In reply to by काळा पहाड

माझे आजोबा म्हणायचे माणूस चंद्रावर गेला की माझा देवावरचा विश्वास उडेल .

In reply to by सत्याचे प्रयोग

प्यारे१ Mon, 09/14/2015 - 17:09
मग गेला का माणूस चंद्रावर? निळु भुजबळ अमेरिकेतल्या वाळवंटात फिरुन आला होता ना? -नानाडोंगरकर

राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 17:27
वर अनेक लोकांनी 'नास्तिक व अज्ञेयवादी अशा कॅटेगरी हव्या होत्या' असं म्हटलेलं आहे. पण कौलाच्या सोयीसाठी, सोपेपणासाठी फक्त ३ उतरत्या भांजणीचे गट केलेले आहेत. उतरत्या भांजणीचे ५ गट केले असते तर त्यांची २५ कॉंबिनेशन्स होऊ शकली असती. ३ च गट केल्याने फक्त ९ कॉंबिनेशन्स होतात - संकलन करून नंतर त्याचा गोषवारा मांडायला सोपं जाईल. मी तयार केलेले गट हे थोडे तोकडेच आहेत हे मला माझं स्वतःचं मत नोंदवताना जाणवलं. कारण माझे आईवडील कमी धार्मिक गटात असले तरीही मी शून्य धार्मिक आहे. आमच्या घरी वडील कमी आणि आई किंचित धार्मिक स्वभावाची. अधूनमधून सत्यनारायण, घरातल्या देवांची नोकरी सांभाळत आठवड्यातून एकदोनदा पूजा यापलिकडे आईने फारसं काही केलं नाही. तरीही काही कठीण प्रसंगी तिला नवस बोलावासा वाटतो. याउलट मी पूर्णपणे सास्कृतिक हिंदू आहे. देवळात जायला नकार देत नाही, प्रथा म्हणून कोरडेपणे हातही जोडतो. गणपतीच्या आरत्या म्हणतो, आणि तो प्रसंग म्हणून एंजॉय करतो. पण देवाविषयी श्रद्धा, पावित्र्य वगैरे काही वाटत नाही. मुलाला अनेक वर्षं देव म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. आता तो जवळपास आठ वर्षांचा होईल. परवाच त्याने एक प्रसंग सांगितला. तो कोणाकडे गेला असताना त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान मुलगी त्याला काहीतरी गॉड वगैरेविषयी सांगत होती. हे सांगून तो आम्हाला म्हणाला 'आय वॉज लाफिंग इनसाइड माय हेड. देअर इज नो गॉड. अॅंड शी डझंट नो दॅट!' म्हणजे हे प्रकरण तर आमच्याही पुढे आहे. मी शाळेत होतो तेव्हा देव-भूत वगैरे कल्पनांचा बऱ्यापैकी पगडा होता. तो मला स्वतःलाच प्रश्न विचारून उडवावा लागला होता. इथे तर काहीच ओझं नाही. आमच्याकडे तरी आमचे आईवडील ३, मी ४ आणि मुलगा ५ अशी स्थिती दिसते आहे.

In reply to by राजेश घासकडवी

सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 17:44
देवळात जायला नकार देत नाही, प्रथा म्हणून कोरडेपणे हातही जोडतो.
मी तर देवळात जाऊनही नमस्कार करत नाही. मस्त रांगेत उभा राहतो. मुर्ती न्याहाळतो. भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पाहतो. आणि तसाच बाहेर पडतो. मी देवाला नमस्कार न करताच रांगेत सरकत आहे हे जर कुणाच्या लक्षात आले तर ती व्यक्ती मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहते. एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)

In reply to by सतिश गावडे

एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :) निवांत ???!!! डोळे भरून ???!!! गर्दी नसतानाही भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्काबुक्की करणार्‍या (माझ्या मते केवळ सवयीने गुंडगिरी करणार्‍या... हे मी त्यांना तोंडावर सांगितले आहे) मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा ! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 18:02
मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा !
हे मी पूर्वी आळंदीच्या मंदिरात करत असे. गेले ते दिवस. राहिल्या त्या आठवणी. ;)

In reply to by सतिश गावडे

खटपट्या Sun, 09/13/2015 - 18:08
+१ मला दूर, एकदम शांततेत असलेली देवळे/प्रर्थनास्थळे आवडतात. तीथली शांतता मनाला भावते. कधी कधी एखादी गुहा जीथे पीनड्रॉप सायलेन्स असतो तीही देवळासारखीच भासते. बाकी लाईन लाउन देवदर्शन करणे खूप कंटाळवाणे वाटते.

In reply to by खटपट्या

सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 18:16
मला दूर, एकदम शांततेत असलेली देवळे/प्रर्थनास्थळे आवडतात. तीथली शांतता मनाला भावते. कधी कधी एखादी गुहा जीथे पीनड्रॉप सायलेन्स असतो तीही देवळासारखीच भासते.
श्री. वल्ली उर्फ मा. प्रचेतस सर यांच्याशी संपर्क साधावा.

In reply to by सतिश गावडे

द-बाहुबली Sun, 09/13/2015 - 18:32
मी तर देवळात जाऊनही नमस्कार करत नाही. मस्त रांगेत उभा राहतो. मुर्ती न्याहाळतो. भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पाहतो. आणि तसाच बाहेर पडतो.
खिक्क... आपलं सामान बघायला आमीबी हे करायचो लय मज्या यायची. सतत लक्ष सामानाकडंच असल्याने भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पहायला मात्र वेळ मिळायचा नाही. तुम्ही लै नशीबवान.
मी देवाला नमस्कार न करताच रांगेत सरकत आहे हे जर कुणाच्या लक्षात आले तर ती व्यक्ती मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहते.
ह्म्म.. हे मात्र अनुभवलं आहे. आम्ही आमच्या सामानासाठी मंदीरात आलो होतो त्या एकनीश्ठेची बाकीच्या लोकांना साली किंमतच नसते :(
एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)
पाहुन झाल्यावर जर भक्तीभावाने त्याच्यापुढे नतमस्तक झाला नाहीत... भलेही तुम्हाला कौतुकाने पहाणारा कोणीही तिथे नसेल तर बात कुच जमी नही असेच खेदाने म्हणावे लागेल. पुन्हा प्रयत्न करायचा. विठठल जरा लाजाळु दैवत आहे.. त्याला आर्जव करावे लागते पण एकदा ते झाले की तो त्याच्या अरतीत म्हटल्या परमाने जिवलग झालाच म्हणून समजा.

In reply to by राजेश घासकडवी

मारवा Sun, 09/13/2015 - 19:40
तुमच्या मुलाला एका विशीष्ट बाजुनेच तुम्ही वाढवत आहात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. मी कदाचित चुक असेन. पण त्याला तुम्ही देव या बाजुने काहीच ( एक संकल्पना किंवा बघ बाबा काही काही लोकांच अस मत आहे की अस अस असत या अर्थाने पण तुम्ही त्याला जाणीवपुर्वक दुर ठेवत आहात) म्हणजे जस धार्मिक लोक आपली धार्मिकता आचरणातुन पुढे आपल्या मुलाबाळांना कंडीशनींग साठी वापरतात अगदि त्याच रीतीने तुम्ही तुमची नास्तिकता तुमच्या मुलापर्यंत ( त्याचे इतर ऑप्शन्स ऑदर साइड हाइड करुन करत आहात.) त्याचा परीणाम ही स्वाभाविकतेने तुम्ही एन्जॉय करत आहात. पण मग तो पुढे जाऊन कट्टर नास्तिक झाला तर तो जेन्युईन स्वतःच्या वैचारीक प्रवासाने एका विशिष्ट ट्प्प्यापर्यंत ( खाचखळगे अनुभव चिंतन चुक सुधारत हळुहळु वैचारिक प्रगती साधत उत्क्रांत होत ) जसा तुम्ही प्रवास केलेला दिसतोय तसा न होता जसे कट्टर धार्मिक घरात वाढलेले मुल रेडीमेड भुमिकेची चादर पांघरुन सुरक्षिततेची उब मिळवतात तशा मुलांचा तो फक्त दुसरी बाजु असेल. कारण आठ वर्षांचा मुलगा वरील प्रकारच विधान त्याला एका विशिष्ट दिशेने कंडिशनींग केल्याशिवाय बोलत असेल यावर विश्वास बसण अवघड आहे. हे सर्व माझ कल्पनारंजन ही असेल अस प्रत्यक्षात नसेलही प्रामाणिकपणे सांगतो अशी काही कट्टर नास्तिक पालक बघण्यात आहेत म्हणुन वाटल म्हणुन बोलतोय. राग मानु नका.

In reply to by मारवा

काळा पहाड Sun, 09/13/2015 - 19:57
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. कारण देव नसतोच हे काही वैश्विक सत्य नव्हे (जसं देव असतो हे ही नव्हे. त्या दोन्हीपैकी सत्य अजून पुढे यायचं आहे). २) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं. ३) त्याचबरोबर त्याला कुठल्याही मानसिक आधार नसेल. देव हा आपली गरज आहे. ते आपलं अल्टीमेट सेफ्टी नेट आहे. सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.

In reply to by काळा पहाड

मारवा Sun, 09/13/2015 - 20:15
त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन आस्तिक बनला असेल तर ती आस्तिकता कणा नसलेली आस्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते. तशीच आणि तितकीच जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन नास्तिक बनला असेल तर ती नास्तिकता देखील कणा नसलेली नास्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते हेच म्हणायच होत एका विवेकी पालकाने मुलांना दोन्ही बाजु तिसरी बाजु अधिकाधिक बाजु केवळ परीचीत करुन दिल्या पाहीजेत. डेटा देऊन मागे व्हायला हवं अस माझ व्यक्तीगत मत आहे इतकचं बाकी तुम्ही जे नास्तिंकावर आक्षेप घेतले आहेत ते प्राचीन च आहेत आशा आहे तुम्हाला त्याचा प्रतिवाद माहीत असेल

In reply to by काळा पहाड

आदर्शवादी मुद्दा आहे की नाही माहिती नाही पण या जगात सगळ्यात जास्त जीव देव आणि धर्माच्याच् नावाने गेलेयत, हे नम्रपणे नमूद करते...

In reply to by स्वप्नांची राणी

काळा पहाड Sun, 09/13/2015 - 22:40
यात काही गोष्टींचा गोंधळ झालाय. १. जीव घेणारे लोक देवावर आणि (तथाकथित) धर्मावर श्रद्धा असणारे आहेत असं तुम्ही गृहीत धरताय. २. धर्म सांगतो ते देवाचं सांगणंच असतं असं बर्‍याच लोकांना वाटतं. धर्मावरची आणि देवावरची श्रद्धा एकच आहे असंही तुम्ही गृहीत धरताय. ३. ज्या देवावर श्रद्धा असायला हवी तो देव खराच देव आहे असं तुम्ही गृहीत धरताय. माझ्या मते ही गृहीतकं पूर्णपणे चुकीची आहेत. तुम्ही कुणाची तरी पापं कुणाला तरी चिकटवताय. आता ही गृहीतकं सोडून "खर्‍या देवावरच्या खर्‍या श्रद्धेनं" (धर्मावरच्या नव्हे) किती माणसं मारली ते सांगा.

In reply to by काळा पहाड

राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 21:15
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.

In reply to by राजेश घासकडवी

काळा पहाड Sun, 09/13/2015 - 22:58
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
नाही. कारण देव ही एक खरी की खोटी माहिती नाही पण चांगली संकल्पना आहे. आपल्यातल्या चांगुलपणाचं देव हे एक प्रतिक आहे. पण ही संकल्पना अमूर्त असल्यामुळे, किंवा एकूणच जीवनातल्या अनुभवामुळे बरेच आस्तिक लोक नंतर नास्तिक होतातही. तुमचा स्वतःशी संवाद "देव आहेच" या संकल्पने नंतर "तो खराच आहे का" अशा प्रकारे सुरू होतो. कारण त्याला कुणीच पाहिलेलं नाही. पण "देव नाहीच" या संकल्पने मध्ये मनावर पडदा टाकला जातो आणि स्वतःशी संवाद होतच नाही. जिथे कठोर मतं असतात तिथे संवाद होत नाही. मध्यपूर्वेमध्ये उगम पावलेल्या एका धर्माबद्दल ("बाकीचे काफीरच") आपण ते पाहतोच, नाही का?
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
गुन्ह्याचं स्वरूप भयंकर प्रमाणात बदललेलं आहे असं मला वाटतं. दुर्योधन तेव्हाही होता. पण निर्भयाची केस पाहिली तर दुर्योधन म्हणजे अगदी मवाळ वाटायला लागतो. बाकी धार्मिक दंगली या फक्त आस्तिकच करतात असा काय पुरावा आहे? नास्तिक हे देवावर श्रद्धा न ठेवणारे पण धर्माचा अभिमान असणारे असू शकतात.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.
ठीक आहे. ज्याचा त्याचा विचार. पण समाजातले बहुतांशी 'जन' मनाने दुर्बळ असतात. त्यांच्याकडे हा वैचारिक प्रगल्भ पणा असेलच असं नाही. समाजातला प्रत्येक घटक तेवढा प्रगल्भ होईपर्यंत देवाचा प्लासिबो वाईट नाही असं मला वाटतं.

In reply to by काळा पहाड

सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 22:45
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. कारण देव नसतोच हे काही वैश्विक सत्य नव्हे (जसं देव असतो हे ही नव्हे. त्या दोन्हीपैकी सत्य अजून पुढे यायचं आहे).
देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं.
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
३) त्याचबरोबर त्याला कुठल्याही मानसिक आधार नसेल. देव हा आपली गरज आहे. ते आपलं अल्टीमेट सेफ्टी नेट आहे. सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.

In reply to by सतिश गावडे

काळा पहाड Sun, 09/13/2015 - 23:24
देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
वैयक्तिक मत हे अनुभवातून येतं. इतक्या लहान वयात वैयक्तिक मत असेल असं मला वाटत नाही. या वयात आपली मतं आपण आई वडिलांवरूनच ठरवतो. आईवडिलांचा कल बघून आपलं मत ठरवायला मुलं शिकतात. म्हणून टीनएजर्स होईपर्यंत पालकांचे आणि त्यांचे खटके उडत नाहीत. एकदा बाहेरचं वारं लागलं की मगच महायुद्ध सुरू होतं. तेव्हा एक मुद्दा म्हणून मी माझं वेगळं मत मांडलं. बाकी मोठ्या माणसांच्या बाबतीत हे ठीकच आहे. पण लहान मुलांना थोडं देव, भुतं, पर्‍या वगैरे जगात राहू द्यावं असं माझं मत आहे. उगीच त्यांना जगातल्या भीषण गोष्टींची जाणीव करून द्यायची काय घाई आहे?
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
दारू पिवू नये असं माझ्या पालकांचं मत आहे. त्यांचं मॉरल दडपण माझ्यावर असल्यामुळे मी दारू पीत नाही. नाहीतर मी प्यालोच असतो. हे फक्त उदाहरण म्हणून. दारू चांगली की वाईट हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की देव हा फॅक्टर माणसाच्या स्वच्छंदीपणावर नियंत्रण ठेवणारा फॅक्टर आहे. कशाची तरी भिती आहे म्हणून माणूस स्वतःवर बर्‍याचदा नियंत्रण ठेवतो. मानवी स्वभाव वगैरे आहेच. पण जिथे to be or not to be असा बॉर्डरलाईन वरचा प्रश्न असतो तिथे देव हा घटक चांगलं वागण्याच्या बाबतीत निर्णायक ठरत असावा असं मानायला बरीच जागा आहे.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.
हे बोलायला ठीक आहे. मानवी मन हे मशीन नव्हे. "मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल" हा इथे मुद्दा आहे. तो आवाका संपला की माणूस कोसळतो. अशा वेळी मनावरचं अतिप्रचंड दडपण आस्तिक कदाचित त्या सेफ्टी व्हॉल्व्ह मुळे सहन करील. नास्तिक लोकांना ती संधी नाही. जे काही करायचे आहे ते करून झाल्यावर काय?

In reply to by काळा पहाड

मारवा Sun, 09/13/2015 - 23:25
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं. याचा सर्वात प्राथमिक प्रतिवाद एक माणुस धार्मिक आहे म्हणुनच फक्त तो रेप हत्या करत नाही अस म्हणणं म्हणजे त्याला मुलभुत संवेदनशीलता च नाहीये असा होतो. उद्या धर्माने आज्ञा दिल्यावर तो हे सर्व बिनदिक्कत करेल. यात मानवी संवेदनशीलतेच मुलभुत अस्तित्व नाकारण झाल. संवेदनशीलता जीने एक माणुस दुसरया माणसाच्या सफरींग वा वेदनेशी रीलेट करतो ती. एखाद्या बेटावर एखाद्या मुलाला पुर्ण गॉडलेस वातावरणात वाढवलं तर तो ईश्वराविषयी प्रश्न विचारणार नाही पण तो अस्तित्व विषयक प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. मी कोण आहे ? माझ्या सभोवतालाचा माझ्या अस्तित्वाशी काय संबंध आहे ? माझ्या जगण्याच प्रयोजन काय आहे ? इ. तो मुलगा कुठल्याही देवाने धर्माने आज्ञा जरी दिली नाही तरी त्याच्या मित्राला सहकारयाला पुर्ण मानवी कारणांनी प्रेरणांनी नैतिक प्रतिसाद देइल. एक प्रयोग सर्व्हे घेऊन पीटर सींगर आणि मार्क हॉसर यांनी केलाय तो वाचण्यासारखा आहे. तीन वेगवेगळ्या मोराल सिच्युएशन्स त्यांनी धार्मिक व नास्तिक लोकांना दिल्या व त्याची उत्तरे देण्यास सांगितले त्यात आस्तिक व नास्तिक असल्यामुळे उत्तरात फरक पडलेला नाही असे आढळुन आले. डिटेल इथे वाचता येईल. १-http://www.utilitarianism.net/singer/by/200601--.htm फ्रान्स डे वाल यांचे नैतिकतेच्या उत्क्रांती वरील संशोधन Primates and Philosophers: How Morality Evolved हे एक अप्रतिम पुस्तक धार्मिकतेच्या हि अगोदर अस्तित्वात असलेली मानवी अंगभुत नैतिकता कशी उत्क्रांत होत गेली.

स्त्रियांच्या बाबतीत सासरचे घर हा ही एक फॅक्टर असावा. कारण कित्येकदा तुम्ही ज्या घरातून आलात आणि ज्या घरात पोचलात यामधे धार्मिक-अधार्मिक वातावरणात जमिन-अस्मानाचा फरक असु शकतो. माझ्याच बाबतीत पहा ना; आई १ : रोजची पुजा-अर्चा, रामरक्षा ईत्यादी स्तोत्रे नियमीत. वैभवलक्ष्मीचे व्रत बरीच वर्शे करत होती...(कधी फळलं नाही ते सोडा..!!), आम्हां तिन्ही मुलींनांही गणपतीस्तोत्र, शुभंकरोती, मारुतीस्तोत्र, मोरया मोरया मी बाळ तान्हे ई.ई. स्तोत्रे रोज संध्याकाळी नियमीत म्हणायची सक्ती करायची. आमची लग्ने जुळावीत म्हणून कसली कसली व्रते उदा. रुक्मिणी व्रत (?) असे काही काही आम्ही करावीत अशी तिची मनापासून ईच्छा असे. वस्तू हरवली की कार्तविर्यर्जुनाचा मंत्र अजुनही म्हणत राहते. ती पण भरपुर वाचन करते पण जरा योगिनी जोगळेकर टाईप. तरिही विटाळ - शिवाशीव ईत्यादी पाळत नव्हती. दादा २ : संशयीत धार्मिक. देवावर फारसा विश्वास नाही. पण कधी स्पष्ट बोलले नाहीत. पुजा करणे मात्र टाळायचे. मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... (डोळा मारत) . वाचन भरपुर. शक्यतो ईंग्लिश. मी ३ : खरं म्हणजे ४ आणि ५ : पण हे पर्याय नसल्याने तिसरा निवडला. माझ्या अश्या असण्याचे श्रेय पुर्णपणे घरातूनच आलेल्या वाचनाच्या आवडीला आहे. आधी अर्थातच धार्मिक होते. स्तोत्रे म्हणायचे. एकदा पाचवी सहावीत असतांना तर कुठेतरी बाहेर जायचे होते तेंव्हा अचानक भरपुर पाऊस पडू लागला. तो थांबावा म्हणून मी देवासमोर मांडी घालून बसले आणि 'शरण तुला..." मंत्राचा अखंड जप सुरू केला. पाऊस आण्खीन वाढला आणि पुढचे ४ दिवस थांबलाच नाही.... विचार हळु-हळू वळत गेलेत. पुजा करण्याचा कंटाळा होताच. तरिही परी़क्षेला जातांना देवाला नमस्कार व्हायचाच. हे ही प्रयत्नपुर्वक थांबवले. आणि त्यामुळे निकालावर काही फरक पडत नाही हे पण यथावकाश लक्षात आले. एकदा परिक्षेच्या आधी एका अंगात आलेल्या बाईच्या पाया पडायला आईने पाठवले होते. मी नमस्कार केल्यावर त्या म्हणाल्या "पहीला नंबर येणार आहे हां...पण अभ्यास भरपुर करावा लागेल" . अर्थात हे काही रॉकेट सायंन्स नाहिये. हा प्रसंग बहुतेक माझ्या मनात नास्तिकतेची पहिली ठिणगी पाडून गेला. तसेच त्या बाईंच्या अशिर्वादाने निपुत्रीकांना मुले व्हायची अशी त्यांची ख्याती होती. पण त्यांना स्वता:ला मुल-बाळ नाहीये, यातला विरोधाभासही पहील्या नास्तिक दर्शनाचे कारण ठरला असावा. आता फारच शेफारलेय मी!! सासु-सासरे -१ (उणे एक) : हि पण एक श्रेणी हवी होती ईथे. सासु-सासरे अतिप्रचंड धार्मिक. मुळ नागपुरचे आणि त्यातून देषस्थ असे डेडली काँबो असल्याने घरात पुर्ण वर्षाचे सगळे सण-वार! कुळाचार, करंज्या, पात्या बारा भानगडी !! नागपंचमीचा सण माहित होता. पण त्यादिवशी झाडून सगळ्यांच्या नावाचे, अगदी चुलत घराच्या नावाचेही दिवे बनवायचे, हा अतिप्रसंगच होता. एक एक वेळेला त्या दिवशी घरात २२ गोड पदार्थ बनायचे ! प्रत्येक कुळाचाराला पुरणपोळीचा अत्याचार असायचाच. वर्षातून १२-१५ वेळा तरी पुरणपोळ्या बनत असाव्यात. आधी गणपती १० दिवस असायचे. ते दिड दिवसावर आणले. पण त्या दिड दिवसात १० दिवसांची झाडून सगळी कर्मकांडं ! श्रावण आणि चातुर्मास म्हणजे तर उत नुसता. सणावारांना शिवा-शीव, विटाळ आवर्जून पाळला जायचा. ईथे माझी मतं जाहीर करणं म्हणजे पराकोटीचा संघर्ष होता. तसच वयातल अंतर पाहता ते लोक बदलणही अशक्य होतं. पण तरिही धीमेपणाने का होईना माझ्यापुरता बदल मी घडवलाय. विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच. ईतक्यातच मला सवाष्ण म्हणून जेवणाचे आमांत्रण आले होते. त्या जेवणाच्या आधी अर्धा दिवस उपास ठेवायचा होता. मी सवाष्ण म्हणून जाणे साफ नाकारले. (सवा ष्ण ही संकल्पना मला व्यक्तिश: पटत नाही) छोटा प्रसंग वाटला तरी सवाष्ण जाण्याचे नाकारणे म्हणजे काय असते हे स्त्रीच्या जागी असल्याशिवाय नाही कळू शकणार. चक्क त्यांच्या मुलाच्या आयुष्याशीच खेळ की !! सर्व्हे साठी: पालक - मी = २ - ३

In reply to by स्वप्नांची राणी

मांत्रिक Mon, 09/14/2015 - 22:47
मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... लग्न जुळावे म्हणून शनीमहाराजांची प्रार्थना? अहो तो वैराग्याची देवता आहे. मंद, शनीचर म्हणून प्रसिद्ध आहे. लग्न उशिरा झाले यात काही आश्चर्य नाही मग! किमान देवीची तरी उपासना करायची. असो.

In reply to by मांत्रिक

स्वप्नांची राणी गुरुवार, 09/17/2015 - 00:53
अहो मांत्रिकबुवा, जसं तुम्ही अजुनही शनी ला महाराज, वैरागी, मंद, शनीचर ई.ई. समजताय ना, तशी त्याच्या कृपेने लग्न जूळतात ही माझ्या आईची त्यावेळी कल्पना होती. पण मला माहितेय की शनी हा एक ग्रह, गॅसचा गोळा आहे. त्याच्या आत अर्थातच लोह, निकेल ई.ई. बरच काही आहे....आणि मंदचर बिंदचर म्हणू नका हां त्याला, पृथ्विपेक्षा बराच फास्ट आहे तो.... (प्लीज...कुठे नेऊन ठेवल्यात स्मायली माझ्या!!! लोकं शब्द-न-शब्द खरा मानत सुटलेत....)

In reply to by स्वप्नांची राणी

मांत्रिक गुरुवार, 09/17/2015 - 10:36
चुकीच्या हेतूने चुकीच्या उपासना केल्या तर त्याचा फायदा न होता त्रासच होतो असा तंत्रशास्त्रातील संकेत आहे. हां, तुम्ही काहीच मानत नसाल तर गोष्ट वेगळी! माझा पूर्ण विश्वास (ईश्वरी अस्तित्वावर) असल्याने माझे मत मी मांडले.

In reply to by स्वप्नांची राणी

गुलाम Wed, 09/16/2015 - 18:57
प्रतिसाद आवडला!!!
विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच.
तुमच्या पुढच्या लढ्यांसाठी शुभेच्छा.

सह्यमित्र Sun, 09/13/2015 - 22:09
आस्तिकता किंवा नास्तिकता ह्याचा आणि नौतिकतेचा फारसा संबंध नाही. पण नास्तिक असणे ह्यापेक्षा त्याचा जाज्वल्य अभिमान मिरविणे हे जास्त होत आहे. येथील काही प्रतिसाद देखील हेच दाखवित आहेत.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Sun, 09/13/2015 - 22:28
हम्म्म. लॉजिकल थिंकिंग. कधीतरी केलं गेल्यानं 'जाज्ज्वल्य' अभिमान वाटणं स्वाभाविक असावं. ;) हलकं घ्या ओ काकी.

In reply to by सह्यमित्र

नीलमोहर Mon, 09/14/2015 - 10:26
' आस्तिकता किंवा नास्तिकता ह्याचा आणि नौतिकतेचा फारसा संबंध नाही. पण नास्तिक असणे ह्यापेक्षा त्याचा जाज्वल्य अभिमान मिरविणे हे जास्त होत आहे' - १००% सहमत

In reply to by मारवा

प्यारे१ Sun, 09/13/2015 - 22:41
नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध नसला तरी 'खरा' आस्तिक आपोआप नैतिक असतो एवढं नक्की.

In reply to by प्यारे१

"नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध नसला तरी..." चला ...आस्तिकही लॉजिकल थिंकिंग करू शकतात हे पटलं रे पुतण्या...

राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 00:09
या कौलावर आस्तिक विरुद्ध नास्तिक असं चर्चेला का वळण लागलं कोण जाणे. मिपासारख्या संस्थळावर वावरणारे सुशिक्षित/उच्चशिक्षित, कॉंप्युटर/इंटरनेट सॅव्ही, बऱ्याच प्रमाणात शहरी आहेत. हा सध्याच्या काळात छोटा गट असला तरी ते झपाट्याने वाढणारं डेमोग्राफिक आहे. या गटात धर्माकडे, देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन; खर्च होणारा वेळ यांची आधल्या पिढीशी तुलनात्मक मोजमापं केली तर पन्नास वर्षांनी एकंदरीत समाज कुठच्या दिशेला जाऊ शकेल याचा अंदाज बांधता येईल. यासाठी हा साधा कौल होता. त्याचबरोबर आपले काही अनुभव लोकांनी सांगावेत अशी इच्छा होती. तर मी विनंती करतो की चर्चा नास्तिक विरुद्ध आस्तिक अशी घरंगळत नेऊ नये. या लेखात आस्तिकता की नास्तिकता चांगली असा मुद्दा नसून गेल्या पिढीच्या तुलनेत आजची पिढी कुठे आहे एवढंच आपापसात तपासून बघायचं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

तसहि, आस्तिक-नास्तिक हल्ली outdated झालय. 'कालच्या पेक्षा तुम्हाला आज जास्ती पुरोगामी वाटतंय का...' असा पुढचा कौल लावूया. आई-वडिलांनाही मधे आणायची गरज नाही...

In reply to by स्वप्नांची राणी

राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 09:00
ही भन्नाटच कल्पना आहे. खरं तर आजकाल पुरोगाम्यांना रोज आपण फारच पुढे पुढे जात असल्यासारखं वाटत असणार. आसपासचं सगळं मागे सरकत असेल तर आपणच पुढे जात असल्याचं फीलिंग येतं तसं....

कपिलमुनी Mon, 09/14/2015 - 01:25
मिपा रंजल्या गांजल्यांना निराश करत नाही. जुने जुने भक्त अजुनही दर्शनाला येतात

पैसा Mon, 09/14/2015 - 09:12
आधी धार्मिक, निधर्मी, धर्मवेडे, आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी, सश्रद्ध, अश्रद्ध, अंधश्रद्ध इत्यादीच्या व्याख्या सांगा. पुन्हा त्या व्याख्या सगळेजण स्वीकारतील का? किंवा त्यानी का स्वीकाराव्यात? फ़क्त इंटरनेट वापरणाऱ्या लोकांपर्यंत तुम्ही पोचाल. त्यापालिकडे लालबागच्या राजासमोर लायनी लावणारे आणि हजला किंवा वैलांकिनीला जाणारे फार मोठे पब्लिक आहे. त्यांचा अभ्यास कसा करणार आहात? आणि करणार नसाल तर हा सर्वे प्रातिनिधिक आहे असे म्हणता येईल का?

In reply to by पैसा

राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 09:30
मी कसल्याच व्याख्या करत नाहीये. प्रत्येकाला विचारतो आहे की तुमच्या व्याख्येप्रमाणे तुमची धार्मिकता-सश्रद्धता तुमच्या आईवडिलांपेक्षा अधिक आहे की कमी आहे. ज्या समाजाला विचारतो आहे तो छोटा गट आहे हे वर म्हटलेलंच आहे - पण तरी ते वाढतं डेमोग्राफिक आहे. सध्या त्याचं भारतातलं प्रमाण पंधरावीस टक्के असलं तरीही जसजशी सुशिक्षितता आणि संपन्नता वाढेल तसतसं ते पन्नास ते सत्तर टक्के होईल. या समाजात धार्मिक आईवडिलांची मुलं त्यांच्यापेक्षा अधिक धार्मिक बनतात का? की नास्तिकतेकडे त्यांचा कल झुकतो? हे शोधून काढलं की पंचवीस-तीस वर्षांनी धार्मिकता कमी होईल की जास्त याविषयी काही विधानं करता येतील. आणि या सर्वेच्या मर्यादा मान्यच आहेत. पण कुठेतरी सुरूवात करायला हवीच.

In reply to by राजेश घासकडवी

पैसा Mon, 09/14/2015 - 10:49
व्याख्या नसतील तर तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते मला कसं कळणार? आणि मुळात गृहीतक बरोबर असल्याशिवाय निष्कर्ष कसा बरोबर येईल? इंटरनेट वापरणारे मराठी लोक कितीसे आहेत? त्यावरून संपूर्ण मराठी लोकच नव्हे तर भारतीय लोकांबद्दल तुम्ही अंदाज लावू पहात असाल तर ते फारच अपुरे निरीक्षण ठरेल. प्रत्यक्षात बघता, सिद्धिविनायक आणि लालबागच्या राजासमोरच्या रांगा वाढतच आहेत. पंढरीच्या वार्‍या चालू आहेत, त्यात साईबाबांसाठी पदयात्राही सुरू झाल्या आहेत. नवे देव, व्रते, पूजा सुरू झाल्या आहेत. हे फक्त महाराष्ट्रातले झाले. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, केरळ, तमिळनाडु यांच्याबद्दल न बोललेले बरे. महाराष्ट्रात तरी पौरोहित्यावर उदरनिर्वाह करणारा आता गरीब बिचारा ब्राह्मण राहिलेला नही. तो अतिशय उत्तम प्रकारे ऑर्गनाईझ झालेला व्यवसाय आहे, हे सगळे तुम्हाला हामेरिकेत बरीच वर्षे राहिल्यामुळे माहीत नसावे. तसे पाहिले तर धार्मिकता एकूण वाढलेली दिसते. त्यासाठी फार खोलात जायची गरज नाही. मात्र निव्वळ धार्मिकता वाढली की कमी झाली या गोष्टीमुळे माझ्या दृष्टीने समाजजीवनावर फार फरक पडणार नाही. मात्र इसिस, जमाते इस्लामी, वगैरे कट्टरपंथीयांची संख्या वाढताना दिसत आहे ही माझ्या दृष्टीने जास्त चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.

In reply to by पैसा

राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 18:34
व्याख्या नसतील तर तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते मला कसं कळणार?
तुमची स्वतःची व्याख्या वापरलीत तर एकाच निकषावर तुम्ही व तुमचे आईवडील जोखले जातील. यातून अॅब्सोल्यूटली पूर्वीची पिढी कशी होती, यापेक्षा पूर्वीच्या पिढीपेक्षा आजची पिढी या दिशेला झुकली आहे, त्या दिशेला की जैसे थे आहे याबद्दल निश्चित विधानं करता येतात.
इंटरनेट वापरणारे मराठी लोक कितीसे आहेत? त्यावरून संपूर्ण मराठी लोकच नव्हे तर भारतीय लोकांबद्दल तुम्ही अंदाज लावू पहात असाल तर ते फारच अपुरे निरीक्षण ठरेल.
हा सर्वे सर्व लोकांसाठी नाहीच. 'भारतात धार्मिकता वाढते आहे का' यापेक्षा 'भारतातल्या सुशिक्षित, बुद्धिजीवी, कॉंप्युटर सॅव्ही, उच्चमध्यमवर्गीयांत काय परिस्थिती आहे' हे जोखण्याचाच प्रयत्न आहे. आणि तसंही हे निष्कर्ष काही मी एखाद्या समाजशास्त्रीय जर्नलमध्ये पब्लिश करू शकण्याइतके रिगरस नाहीतच. पण आपल्या संस्थळावरचे इतर कसे वाढले, त्यांच्यात काय बदल झाला याचं चित्र आपल्यापुढेच उभं राहील अशी आशा आहे.
तसे पाहिले तर धार्मिकता एकूण वाढलेली दिसते. त्यासाठी फार खोलात जायची गरज नाही.
तीच तर गंमत आहे. धर्माचं स्तोम आत्ता वाढलं असं म्हणतो आपण, पण मी ज्या चाळीत राहायचो तिथे उत्सवांना मोठ्ठा कर्णा लावून ढाणढाण गाणी उशीरापर्यंत लावली जायचीच. आणि हे प्रत्येक बिल्डिंगमध्ये, वाडीमध्ये - उत्सवांना, लग्नाला व्हायचं. त्याकाळी गर्दी कमी होती म्हणून आवाजही किंचित कमी असेल. पण आजकाल दहा वाजता आवाज बंद करण्याचे नियम त्याकाळी नसायचेच किंवा पाळले जायचे नाहीत. सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात फरक असतो हे मान्यच. फक्त एका विशिष्ट गटाचं धार्मिकतेच्या अवडंबराबद्दलचं प्रेम कमी होत चाललं आहे. आणि हा गट झपाट्याने वाढतो आहे. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मांत्रिक Mon, 09/14/2015 - 22:56
तुमची स्वतःची व्याख्या वापरलीत तर एकाच निकषावर तुम्ही व तुमचे आईवडील जोखले जातील ऑ! इतकं पर्सनल व्हायचं कारण काय?

अद्द्या Mon, 09/14/2015 - 10:20
घरातल्यानाही आणि मलाही कधी रोज पूजा करावी आणि अभिषेक / सत्यनारायण वगेर घालावेत कधी वाटलं नाही . मुंज सुद्धा आज्जीने हट्ट केला म्हणून केली आहे . घरात सण म्हणून जे होतात ते फक्त ४ लोक घरी येतात आणि त्या निमित्ताने सुट्टी काढून दंगा मस्ती घालता येते म्हणून "साजरे " होतात इथे . कधीच कुठल्याच धार्मिक गोष्टीचा बाऊ केलेला आठवत नाही . आणि माझ्या पुढल्या पिढी वर हि केला जाइल असं वाटत नाही. त्यामुळे सगळ्याच मुद्द्यांना पास

नाखु Mon, 09/14/2015 - 10:20
प्रश्नः
  • मी जाहीर रीत्या फोरमवर्,ऑफीसात , मित्रमंडळीत अगदी पुरोगामी ( छ्या देव बिव काही नसतो नसती थेरं आहेत ही सनातन्याची अशी नेमस्त पिंक टा॑कत असेन आणि प्रत्यक्षात नित्य नेमाने सकाळी संध्याकाळी देवाला नमस्कार करणार्यांचा विनाकारण उपहास्/तिरस्कार्/हेटाळणी करीत असेल तर मी नक्की कोण ? पुरोगामी,अनिस का देव नाहीच आहे आणि हे स्गळे अज्ञ आहेत "याच पोथीला" चिकटून्/कवटाळून बसलेला नव प्रतीगामी?
  • श्रीमंत जशी ही सापेक्ष आणि व्य्क्तीनुरूप बदलणारी व्याख्या आहे म्हणजे २ वेळेची भ्रांत असलेल्याला कायम नोकरीवाला श्रीमंर वाटतो. कायम नोकरीतला देशी बाबू परदेशीला श्रीमंत समजतो. परदेशी वाला चार ठिकाणी पान तीन वर आलो की आणि विचारवंताचे नामावळीत्/प्रभावळीत नाव आलेल्यांना श्रीमंत सम्जतो. तसेच काहीसे श्रद्धेचे/आस्तीकतेचे नाही का?
का फक्त देवाला नमस्कार करणारे, आणि ताप आला म्हणून+ जत्रेला देवाला प्राणी कापणारे सारखेच श्रद्धाळू/आस्तीक्/पुरोगामी?(अगदी एकाच तागडीत टाकण्यासाठी) ही जुनी कढी किती जरी नक्षीदार भांड्यातून (निर्लेप आणि आंतरराश्ट्रीय दर्जेदार) भांड्यातून आणली तरी मूळ आंबूस्पणा कायम राहील आणि त्याची कितीही आटवून+तापवून

रबडी-बासुंदीत

रूपांतर होणार नाही हे उच्च्भ्रू विचारवंतांना माहीत नाही काय? अगदी "ढ"गोळा प्रत्येक श्रद्धाळूला आंधळेपणाने विरोध कराय्लाच पाहीजे असा तिरपागडा बुद्धीभेद नसलेला,काहीसा गांवढळ, मीच तो दुसरा कोण? नाखुस

प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 10:42
आस्तिक आणि नास्तिकपेक्षा कर्मकांडाला फाटा देणार्‍यांची, कर्मकांडामागील तर्कशास्त्र शोधणार्‍यांची संख्या वाढते आहे. कर्मकांडाला स्वच्छ नकार देणारे अजूनही कमीच आहेत तर कर्मकांड पटत नाहीत पण 'न जाणो उगीच पाप लागण्याची भानगड नको, एव्हढे केल्याने काय मोठे नुकसान होणार आहे' असा विचार करून पटत नसूनही कर्मकांड करणारे बरेच आहेत. शिवाय कर्मकांडाच्या प्रभावातच भक्तीचे मोजमाप करण्याची हल्ली प्रथा आहे त्यामुळे 'दाखवायला' भक्ती करणारे दांभिकही असंख्य आहेत. एकीकडे, पूर्वीच्या पिढीची डोळे झाकून (वडीलधार्‍यांचे ऐकून) देव-देव करणार्‍यांची लोकसंख्या घटते आहे आणि 'लिमिटेड' भक्तीभाव बाळगणारे वाढत आहेत तर दूसरीकडे नव्या जमान्यातील आर्थिक विवंचना, स्पर्धा आणि ऐहीक गरजा पुरविण्याची अक्षमता ह्या सर्वाचा परिपाक म्हणून वैफल्यग्रस्तांची एक पिढी सिद्धीविनायकापुढे रांग लावताना दिसते. कमी अधिक प्रमाणात दोन्ही प्रकार वाढीस लागल्याचे दिसते. राजकारणी, इव्हेंट मॅनेजर्स स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी (..आणि तीही अशी तशी नाही तर सढळ हाताने घरच्या तुपाची धार सोडलेली पुरणपोळी) वैफल्यग्रस्तांच्या कमकुवत मनावर प्रभावपाडून त्यांना पुन्हा कर्मकांडाकडे ओढत आहेत. शिर्डीच्य फकीराला सोन्याने मढवत आहेत तर लालबागच्या बुद्धीदात्यासमोर भक्तांवर अत्याचार करीत निर्बुद्धतेचं प्रदर्शन मांडत आहेत. अधिक 'खर्चीक' भक्तीला मानाचे पान मिळते आहे आणि दोनहात आणि मस्तक ही भक्तीची संकल्पना मोडीत काढली जात आहे. बहुतांश लोकं प्रवाहपतित आहेत. हाती पैसा आल्यामुळे देवालयांमधून 'पैसा' दान करून स्वतःची पापं, चुका 'धुवायचा' सोयीचा मार्ग अवलंबित आहेत. काय बरोबर, काय चुकीचे, कशाला पुण्य म्हणावे कशाला पाप समजावे ह्यावर विचार करायला आजच्या धावपळीच्या युगात ना कोणाला वेळ मिळतो आहे ना कोणाला गरज भासते आहे. ह्या सर्व गदारोळात कोण किती खराखुरा धार्मिक, आस्तिक आणि सश्रद्ध आहे हे शोधणे दुरापास्त आहे. माणसाच मन हा एक महासागर आहे. त्याच्या तळाशी काय आहे हे त्या त्या व्यक्तीलाही माहित नसतं तिथे आपल्याला आपल्या आई-वडीलांच्या मनाचा थांगपत्ता कसा लागावा? माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले. म्हणजे तिचा प्रवास सश्रद्ध कडून अश्रद्ध अवस्थेकडे होत गेला का? कळायला मार्ग नाही कारण तशी विस्तृत चर्चा तिच्याशी कधी झाली नाही. मग ती धार्मिक, आस्तिक की सश्रद्ध ह्याचे मुल्यमापन मी (किंवा कोणीही) कसे करावे? मुल्यमापन करायचा प्रयत्न केला तर तो फक्त वरवरच्या दृश्य परिणामाचा असेल. मूळ व्यक्ती तिच्या अंतर्मनात कशी आहे हे त्या व्यक्तीलाही कधी सांगता येणार नाही किंवा ते तिला सोयीचे नसेल. जे असेल ते तिची (त्या व्यक्तीची) एक व्यक्तिगत आणि अपूर्ण 'जाणीव' असेल. त्यामुळे, घासकडवी साहेब, मला वाटतं असा कौल कधीच अचूक असू शकणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी Tue, 09/15/2015 - 07:00
तुमचा एकंदरीत प्रतिसाद मनापासून आवडला. हे धार्मिकतेचं लचांड वाटतं तितकं सोपं नाही हे मान्यच आहे. यात व्यक्ती कालानुरुप बदलते हे तर तुम्ही उदाहरणासकट सांगितलेलं आहेच.
त्यामुळे, घासकडवी साहेब, मला वाटतं असा कौल कधीच अचूक असू शकणार नाही.
अचूकतेचा दावा इथे नाहीच. अचूकता ही फारच ओव्हररेटेड संकल्पना आहे. आपण उद्या जीवंत असू की नाही हेही अचूकपणे सांगता येत नाही, तिथे बाकीच्या अचूकतेला काय अर्थ राहातो? पण म्हणून आपण आसपासचं जग काय आहे, आत्ता काय चित्र दिसतं आहे, याचा अंदाज बांधायचे थांबत नाही. हे अंदाजही बऱ्याच वेळा चुकतात. पण तरीही आपण त्या चुकांतूनही शिकतो. या कौलाचा हेतू अचूक अंदाज बांधण्यापेक्षा प्राथमिक चित्र मांडणं हा आहे. आपल्या आईवडलांच्या मानाने आपण अधिक धार्मिक आहोत की नाहीत हे सर्वसाधारण माणसाला सांगता येतं. कारण त्यात त्याच्या व्याख्या, त्याचे निकष असतात. असं जर शेकडो लोकांनी केलं तर काहीनाकाही उत्तरं दिसून येऊ शकतात. आता तुम्ही रेस्टॉरंट व्यवसायात आहात म्हणून समांतर उदाहरण देतो. धार्मिकतेप्रमाणेच 'चांगली चव' हीही व्याख्या करायला कठीण आहे. पण जर तुम्ही काल शेफ बदललात आणि तुमच्या जाणकार खवैय्यांना विचारलंत, की बाबा परवा तुम्ही खाल्लंत आणि आज खाताहात, त्यातल्या चवीच्या फरकाबद्दल तुमचं काय मत आहे? प्रत्येकाची चवीची जाण, पारख वेगळी असली तरी शंभरपैकी पंच्याऐशी लोकांनी तुम्हाला सांगितलं की 'हो, आजची चव मला जास्त आवडली' तर याचा अर्थ नवीन शेफ काहीतरी जास्त चांगलं करतो आहे - तुमच्या कस्टमरांसाठी. हे उत्तर अचूक आहे का? नाही. कदाचित तुमचे कस्टमर नसलेले इतर हजार लोक म्हणतील की परवाची चव जास्त चांगली होती. पण आपल्याला हे सर्वे घ्यावे लागतात, आणि त्यातून मर्यादित का होईना अर्थ काढावे लागतात. आणि असे मर्यादित अर्थ पुरेशा वेळेला एकमेकांना समान निघाले की ते सत्य म्हणून स्वीकारावं लागतं. आजची पिढी कालच्या पिढीपेक्षा कमी धार्मिक आहे का? हा असाच अनेक अंगं असलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर विशिष्ट गटासाठी वेगळं तर दुसऱ्या गटासाठी वेगळं असू शकेल. पण म्हणून हा प्रश्न गटागटाला विचारूच नये असं नाही.

In reply to by राजेश घासकडवी

प्रभाकर पेठकर Tue, 09/15/2015 - 11:53
धार्मिकतेप्रमाणेच 'चांगली चव' हीही व्याख्या करायला कठीण आहे. मला वाटतं धार्मिकता आणि चव दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक मनाशी निगडीत (धार्मिकता) तर दुसरी शरिराशी, जिभेशी (चव) निगडीत आहे. धार्मिकतेच्या भावनेतून देवाला घातलेल्या साकड्याचा आणि साफल्याचा अनुभव हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. एखाद्याला ताबडतोब प्रत्यय येतो दूसर्‍यला आयुष्यात कधीच प्रत्यय येत नाही. पण एकाला गोड लागणारा 'गुलाबजाम' प्रत्येकाला गोडच लागतो. आणि एकाला तिखटजाळ लागणारी मिसळ सर्वांनाच तिखटजाळ लागते. भलेही तो तिखटपणा प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार भावतो. धार्मिकतेत प्रत्येकाच्या विश्वासानुसार सत्य आणि बकवास ही दोन टोकं दिसतात तर चवीत फक्त इंटेंसिटी बदलेल. गुलाबजाम तिखट आहे असे म्हणणारा कोणी भेटणार नाही किंवा मिसळ कोणी स्वीट डिश आहे म्हणणार नाही. असो. राहता राहिला प्रश्न धार्मिकता वाढते आहे की कमी होते आहे. त्याचे उत्तर मी माझ्या आधीच्या प्रतिसादात दिले आहे. कर्मकांडं म्हणजेच धार्मिकता असेल तर, त्यातील फोलपणा जाणवून, त्यापासून दूर जाणारे जितके आहेत तितकेच आजूबाजूच्या परिस्थितीने वैफल्यग्रस्त भाविक(?) एक सोयिस्कर आधार म्हणून देवाची भक्ती, धार्मिकता ह्याकडे वळताना दिसतात. दोन्ही (+) (-) परिणाम विचारात घेतले तर परिस्थिती जैसे थे च असावी.

विजुभाऊ Mon, 09/14/2015 - 12:26
आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारी , फसवी आणि दांभीक संज्ञा अजूनतरी पहान्यात नाही. "अंधश्रद्धा नको पण श्रद्धा असायला काय हराकत आहे" हे इतके निसरडे वाक्य आहे की भलभलत्यांची त्यावर विकेट जाते. काळापहाड यांना उत्तर द्यायचेच झाले तर तथाकथित आस्तिकांचा " आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील. धर्म हे सर्व अधर्मांचे मूळ आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 12:28
>>>> " आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील. काहीही हं श्री. (विजूभाऊ).

In reply to by विजुभाऊ

प्यारे१ Mon, 09/14/2015 - 12:32
आस्तिक चा खरा अर्थ 'वेदप्रामाण्य मानणारा' असा आहे. बाकी अग्गदी बरोबर आहे. पैशाच्या किंमतीवर, तलवारीच्या धाकावर, भाकरीच्या लाचेवर पोसले गेलेले तथाकथित धर्म झूठे आहेत.

In reply to by विजुभाऊ

द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 12:37
" आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील.
आम्ही देवाला मानतो पण तुम्ही मानत नाही म्हणून आमच्या देवाला मानण्याची थट्टा उडवु नका हे कळकळीचे सांगणे ज्या दिवशी माजोरड्या नास्तिकांना पटेल त्या दिवशी जगातील सर्व आस्तीक-नास्तीक सुखाने नांदतील.

In reply to by द-बाहुबली

प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 12:56
आस्तिकांच्या वागण्याला 'माजोरडेपणा' म्हणणे हे जितके चुकीचे आहे तितकेच नास्तिकांच्या वागण्याला अशी नांवे ठेवणेही अत्यंत चुकीचे आहे. भाषाशुद्धता, वर्तनशुद्धता, सामंजस्य, सहिष्णुता हे इश्वरचरणी भक्ती व्यक्त करण्याचेच विविध मार्ग आहेत. आस्तिकांनी आपले आस्तिकत्व वर्तनातून जोपासावं.

In reply to by प्रभाकर पेठकर

द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 13:05
माजोरडेपणा आस्तिकता नास्तिकता बघत नाही म्हणून अस्तिकांबाबत तो जेव्हडा खुपतो तेव्हडाच नास्तिकांबाबतही खुपला पाहिजे..

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ Mon, 09/14/2015 - 14:24
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा शब्द मलाही खटकतो. आस्तिकतेला किंवा त्यांच्या आग्रहाला माजोरडेपणा हा शब्द अयोग्य आहे. मात्र माझा आक्षेप होता तो श्री/श्रीमती काळापहाड महोदया यांच्या http://misalpav.com/comment/741834#comment-741834 या विधाना संदर्भात. अर्थात देववादी / शाकाहारी लोक ज्या प्रमाणात इतराना शाकाहारी होण्याचा उपदेश देत असतात त्या प्रमाणात मांसाहारी इतरानांसाठी मांसाहाराचा आग्रह धरताना कधीच पाहिले नाही. ज्याप्रमाणे इतराना अमुक एक ठिकाणी गेल्याने सर्व कामे पूर्ण होणार आहेत असा आग्रह धरताना लोक पहातो तद्वत बुद्धीप्रामाण्यवादी उगाच स्वतः होऊन मूर्ती तोडत बसणार नाही. किंबहुना तो त्या मूर्तीतील सौंदर्य शोधेल. घरात ठरावीक देवाचीच पूजा व्हावी असा दुराग्रह धरणारे लोक इतर देवतंचा प्रसादही घेत नाहीत.एका धर्मात बाळ कृष्णाची पूजा केली जाते तेथे कृष्ण हा मोठा झाल्यावरचे कार्यच अमान्य करन्यात येते हा किती विरोधाभास म्हणायचा. तेच लोक गणपतीच्या आरतीला अमान्य ठरवतात, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारताना पाहिले आहेत. अशा लोकाना अडमुठे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे. स्वतःचे म्हणणे तेच बरोबर दुसर्‍यानी सुद्धा तेच अंगीकारावे असे म्हणणारात आणि औरंगजेबात फरक तो काय. त्याने तलवारीच्या बळावर केले हे लोक इतराना भावनीक ब्लॅकमेल करत करतात इतकाच.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 15:30
जेव्हढा 'माजुरडे' हा शब्द खटकला, तितकीच 'औरंगजेबाशी' केलेली तुलना खटकली. बाकी प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे आणि मतप्रदर्शनाचा अधिकार आहे ह्याचा स्विकार करून हा वाद माझ्याकडून इथेच संपवितो.

In reply to by विजुभाऊ

काळा पहाड Mon, 09/14/2015 - 18:58
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा शब्द मलाही खटकतो. आस्तिकतेला किंवा त्यांच्या आग्रहाला माजोरडेपणा हा शब्द अयोग्य आहे. मात्र माझा आक्षेप होता तो श्री/श्रीमती काळापहाड महोदया यांच्या http://misalpav.com/comment/741834#comment-741834 या विधाना संदर्भात.
माझ्या मते बहुतांश तथाकथित आस्तिकांना उगीचच 'देव दाखव नाहीतर नास्तिक हो' प्रकारचे खेळ खेळायची आवड नसते. ते त्यांच्या देवकार्यात मग्न वगैरे असतात. बहुतांश तथाकथित नास्तिकांना ती आवड, वेळ वगैरे सगळं असतं. (मुख्य म्हणजे जर आस्तिक हिंदू असेल तर मुसलमान, ख्रिश्चन, दलित, बौद्ध, ब्रिगेडी आणि तत्सम लोक जरी ते त्यांच्या तथाकथित देवाला मानत असतील तरी केवळ हिंदूंशी वाद करण्याकरिता त्यात उडी घेतात, ते वेगळंच). मुख्य म्हणजे देव कसा नाही हा वादविवाद आस्तिक कधीच जिंकू शकत नाहीत कारण एकतर त्यांना पुरावा देता येत नाही, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे प्रतिगामी म्हणून बघितलं जातं. तथाकथित नास्तिक लोकांच्यात तथाकथित पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी आणि वर उल्लेख केलेल्या सगळ्यांचा भरणा असल्यानं आस्तिकांशी वाद करताना तो माजोरडेपणा जाणवतोच. आणि इथे माजोरडे पणा ला दुसरा शब्दच नाही. खास करून हिंदूंच्या श्रद्धांवर हल्ला करण्यासाठी लॉजिकचा आसरा घेणार्‍यांना दुसरं काय म्हणायचं ते सांगा मग. बाकी दाभोळकरांचं उदाहरण घेवू. आस्तिक लोक दाभोळकरांना तुम्ही आस्तिक व्हा म्हणून मागे लागले होते का हो? अनंतमूर्तींनी मूर्तीवर मूत्र विसर्जन करायला काही हरकत नाही असं म्हणताना आस्तिक लोकांवर जो मानसिक हल्ला केला त्या मध्ये माजोरडं कोण होतं?
ज्याप्रमाणे इतराना अमुक एक ठिकाणी गेल्याने सर्व कामे पूर्ण होणार आहेत असा आग्रह धरताना लोक पहातो तद्वत बुद्धीप्रामाण्यवादी उगाच स्वतः होऊन मूर्ती तोडत बसणार नाही. किंबहुना तो त्या मूर्तीतील सौंदर्य शोधेल.
उगीच कुणाला आस्तिक करण्यात कुणालाही इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही. ती मनाची अवस्था आहे. ती जबरदस्तीनं बदलता येत नाही. जसं देव नाही हे जबरदस्तीनं पटवता येत नाही तसंच.
घरात ठरावीक देवाचीच पूजा व्हावी असा दुराग्रह धरणारे लोक इतर देवतंचा प्रसादही घेत नाहीत.एका धर्मात बाळ कृष्णाची पूजा केली जाते तेथे कृष्ण हा मोठा झाल्यावरचे कार्यच अमान्य करन्यात येते हा किती विरोधाभास म्हणायचा. तेच लोक गणपतीच्या आरतीला अमान्य ठरवतात, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारताना पाहिले आहेत.
तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय माहिती नाही पण एखाद्या घरात फक्त शिवाला मानणारे किंवा विष्णूला मानणारे असू शकतात. बहुतांश आस्तिक लोक असं करतील असं वाटत नाही पण तसं न करणं ही चुकीचं नाही. श्रद्धा ही गोष्ट विज्ञानाच्या आणि लॉजिकच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यांना वाटतं, ते करतात. तुम्ही का त्यांना जबरदस्तीनं प्रसाद देताय?
अशा लोकाना अडमुठे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे. स्वतःचे म्हणणे तेच बरोबर दुसर्‍यानी सुद्धा तेच अंगीकारावे असे म्हणणारात आणि औरंगजेबात फरक तो काय. त्याने तलवारीच्या बळावर केले हे लोक इतराना भावनीक ब्लॅकमेल करत करतात इतकाच.
पुन्हा एकदा. डॉक्टर लागू म्हणतायत की देवाला रिटायर करा. आस्तिक लोक त्यांना पूजा करायला सांगतायत का? नक्की कोण कुणाच्या श्रद्धांवर हल्ला करतोय एकदा तपासून पहा.

In reply to by काळा पहाड

प्रभाकर पेठकर Fri, 09/18/2015 - 13:06
डॉक्टर लागू म्हणतायत की देवाला रिटायर करा. आस्तिक लोक त्यांना पूजा करायला सांगतायत का? नक्की कोण कुणाच्या श्रद्धांवर हल्ला करतोय एकदा तपासून पहा. काळापहाडसाहेब, डॉक्टर लागूंचे ते विधान तपशिलात मला माहित नाही. त्या विषयावरील त्यांचे पुस्तक मी कधी वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर कांही भाष्य करणार नाही. पण मला आजवरच्या माझ्या अनुभवातून जाणवलं आहे की हा विषय २ +२ = ४ इतका गणिती नसल्याने वादाला अनेक फाटे असे फुटतात की ज्याला कुठलेही अंतिम ठिकाण नसते. आस्तिकाला चर्चा भरकटविण्याचे सहज सुलभ मार्ग त्यातून सापडतात. त्यातून 'श्रद्धा' नांवाचं संरक्षक कवच आणि 'माझी श्रद्धा' हे नास्तिकाला बाहेरच ठेवण्यासाठी 'मेन गेट' असतं. ते एकदा बंद करून घेतलं की नास्तिक त्याच्या जगात आणि आस्तिक आपल्या जगात अशी स्वच्छ विभागणी होते. पण ते गेट बंद करून न घेता चर्चा चालू राहीली तर आस्तिकाला अनेक प्रश्नांची उत्तरे देणे अवघड होते. उत्तरे माहित नसतात किंवा अस्तित्वातच नसतात. त्याने तो निरुत्तर होतो आणि आपली 'हार' होते आहे असे मानून श्रद्धेची कवचकुंडले परिधान करतो. नास्तिकाचे तसे नसते एखाद दुसर्‍या प्रश्नाने तो निरुत्तर होऊ शकतो पण ९८ टक्के चर्चा तो व्यवस्थितपणे हाताळू शकतो. आपण निरुत्तर होऊ अशी भिती नसल्याने तो चर्चेला तयार असतो पण तशी खात्री नसल्याने आस्तिक असतो तो 'श्रद्धेवर हल्ला होतो आहे, श्रद्धेवर हल्ला होतो आहे' असा आरडाओरडा करून चर्चा टाळतो. कुणीही तथाकथित नास्तिक, आस्तिकाच्या श्रद्धेवर हल्ला करून ती बदलू शकत नाही. कोणी तसा प्रयत्न जरी करीत असेल तरी तो दखलपात्र गुन्हा ठरावा. आस्तिकाला तर्कशुद्ध विचारांसाठी प्रवृत्त करावा, जेणे करून तो स्वतःच स्वतःशी वाद घालून आपल्या धारणा तपासू शकेल आणि कांही प्रमाणात त्यांत बदल (त्याला तसे वाटले तर) करू शकेल, असा प्रयत्न नास्तिक करू शकेल. श्रद्धेवर हल्ला करणं काय पण, श्रद्धा अजिबात नसावी असेही मी कधी म्हणत नाही. जसे शरिकाला पोषक अन्नाची गरज असते आणि अती तेलकट, तुपकट, तिखट, मसालेदार आणि आरोग्यासाठी अहितकारी मानले गेलेले अन्न वर्ज्य असते पण तरीही जिभेचे चोचले म्हणून आपण थोड्याबहुत प्रमाणात वडापाव, बर्गर, पिझ्झा खातच असतो. तशीच श्रद्धा मनाच्या पोषणासाठी पोषक असते. मग ती देवावर असू दे, साधू संतांवर असू दे, समाजातील थोर व्यक्तीमत्वांवर असू दे किंवा अगदी आपल्या माता-पित्यांवर असू दे. ती जरूरी असते. सतत आजूबाजूला वावरणार्‍या गैर प्रलोभनांपासून स्वतःला वाचविण्यासाठी जे मनोबळ लागते ते मिळवून देण्याचे काम श्रद्धा करते. दोलायमान मनाला स्थिर करण्यासाठी श्रद्धा उपयोगी पडते. श्रद्धा मनाचे आरोग्य जपते. पण श्रद्धा व्यक्त करण्याचे साधन म्हणून जो कर्मकांडाचा आधार असतो/घेतला जातो त्याचा अतिरेक मनाचे आरोग्य बिघडविणारा असतो. ते करू नका असे माझे म्हणणे असते. ही अतिश्रद्धा, अंधश्रद्धा एखाद्याच्या जिवावरही उठू शकते. माझ्या शेजारी एक मुलगा राहात होता. असेल तेंव्हा २०-२२ वर्षाचा त्याला रात्री घरातच साप चावला. कुणाच्या तरी सांगण्यावरून घरच्यांनी त्याला मांत्रिकाच्या घरी (१०-१२ किलोमिटर लांब, डोंगरात) नेला त्या मांत्रिकाने २-३ तास मंत्रोपचार केला पण मुलाची तब्येत ढासळत गेली शेवटी घरच्यांनी त्याला केईएम इस्पितळात नेला तो पर्यंत ८-१० तास उलटून गेले होते. केईएमच्या डॉक्टरांच्या हाताबाहेर केस गेली होती. तरणाताठा, कमवता, शांत, सुस्वभावी मुलगा हातचा गेला. मांत्रिकाकडे न जाता लगेच केईएम ला गेले असते तर डॉक्टर त्या मुलाला वाचू शकले असते. माझा एक कर्मचारी आहे. त्याच्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला. कोणाच्या तरी सांगण्यावरून (आणि त्याचाही त्यावर विश्वास आहे) नाशिकला कोणा 'वीट बाबा' कडे बायकोला न्यायचा विचार करत होता. तो बाबा त्याच्या हातातली मंतरलेली वीट रुग्णाच्या डोक्याला लावतो आणि रुग्ण खडखडीत बरा होतो अशी त्याची प्रसिद्धी आहे. मी माझ्या कर्मचार्‍याला झापला आणि डॉक्टरी उपाय करायला सांगीतले. नंतर ऑपरेशनवगैरे करून आता ती बरी आहे. आपल्या आजूबाजूला अशा देव, तांत्रिक-मांत्रिक, बाबा, माँ, साधू वगैरे अनेकांच्या यशस्वी कथा पसरविणारे अनेक जण असतात. त्याला कोणी बळी पडता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात - नवसे कन्या पुत्र होती, मग का कारणे लागे पती? देवावर विश्वास ठेवा पण त्याचा अतिरेक करून हातावर हात ठेवून विसंबून कृतीहीन होऊ नका. अशा प्रकारच्या 'श्रद्धेच्या' आहारी जाऊ नका. देव चराचरात भरलेला आहे ही आपल्या धर्माची शिकवण असताना, मुंबईहून शिर्डी पदयात्रा करण्याची आवश्यकता नसते. तो श्रद्धेचा अतिरेक आहे. दोन हात आणि मस्तक एव्हढीच सामग्री पुरते श्रद्धा व्यक्त करायला. आस्तिकांच्या अशा प्रकारच्या श्रद्धेच्या अतिरेकाला माझा विरोध आहे. ह्या अतिरेकातील फोलपणा मी समजाविण्याचा प्रयत्न करतो पण जर त्या आस्तिकाला(?) पटत नसेल तर त्याचे मन/विचार बदलण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण हा अतिरेक टाळण्याचा प्रयत्न करावयास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एखाद्याच्या श्रद्धेवर 'हल्ला' आहे का? श्रद्धा नक्कीच, असावी, मुर्तीपुजाही करावी पण अतिरेक करू नये. बोलण्यात, आचरणात शुद्धता बाळगा त्याहून मोठी इश्वर आराधना कुठली नाही. हा प्रतिसाद वैयक्तिक तुम्हाला उद्देशून नसून एकूण अतिरेकी सश्रद्ध लोकांना उद्देशून आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी Fri, 09/18/2015 - 17:56
उत्तम प्रतिसाद. निव्वळ प्रश्न उपस्थित केल्यामुळे 'श्रद्धेवर हल्ला' होत नाही. त्यावर शांत, संयत उत्तर देता येतं की 'बाबारे, मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण या या गोष्टींवर माझा ठाम विश्वास आहे. तुझ्या युक्तिवादाने दोलायमान होईल इतकी ती कमकुवत निश्चित नाही.' पण श्रद्धेपोटी कोणी तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे आपल्या आप्तांचे जीव धोक्यात घालत असेल तर मात्र काहीतरी कृती करावी लागते. आपल्या आसपास दिसणाऱ्या, मिपावर वावरणाऱ्या, सुशिक्षित मंडळींचा - कधी श्रद्धेवर अवलंबून राहाण्याऐवजी वैद्यकीय मदत घ्यायची, तसंच वैद्यकीय उपाय खुंटले की कधी श्रद्धेचा आधार घ्यायचा - याचा समतोल चांगला साधलेला दिसतो. त्यामुळे एकमेकांना न ओरबाडता शांत चर्चा होऊ शकेल अशी आशा वाटते.

गॅरी ट्रुमन Mon, 09/14/2015 - 13:05
मी स्वतः अस्तिक आहे. पण कुठल्याही व्रतवैकल्यांना, पूजाबिजांना न मानणारा आहे. स्वतःहून देवळात कधीच जात नाही पण इतर कोणी बरोबर असेल आणि बरोबरच्या व्यक्तींना देवळात जायचे असेल तर माझीही जायला काही ना नसते. मुंज झाल्यानंतर पूजा घरच्यांच्या सक्तीमुळे २-३ वर्षे केली. त्यानंतर एकदाही घरातल्या देवांची पूजा केलेली नाही.मी कॉलेजात असताना माझी आई माझ्या बहिणीकडे मस्कतला २-२.५ महिने गेली होती आणि मी घरी एकटाच होतो.त्यावेळी मी माझ्या आईला निक्षून सांगितले होते की मी पूजाबिजा काही करणार नाही.तुला हव्या असतील तर मूर्ती बरोबर घेऊन जा आणि तिथेच पूजा कर. तरीही देवावर माझा नक्कीच विश्वास आहे (आणि तो का, कशाबद्दल वगैरे गोष्टींविषयी कोणतीही चर्चा करण्यात मला स्वारस्य नाही). आता मग मी या तीनपैकी नक्की कुठच्या कॅटेगिरीमध्ये आहे? म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्‍या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन. आणि लोक गैरवापर करतात म्हणून 'देव' हा प्रकारच रद्दड आहे असे नास्तिक लोक नक्कीच म्हणतात पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चुथडा करणे हा मनुष्यस्वभाव झाला.त्यामुळे चुथडा झाला म्हणजे मुळातली गोष्टच बेकार आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. एकूणच माझ्यासारख्यांची नेहमी पंचाईत होते.याचे कारण म्हणजे मी अस्तिक आहे असे म्हटले तर कर्मकांडवाले मला त्यांच्यातलाच एक समजतात आणि मी कर्मकांडांच्या विरोधी आहे असे म्हटले की स्वयंघोषित बुध्दीप्रामाण्यवादी मला त्यांच्यातलाच एक समजतात. एकूणच या नास्तिक लोकांविषयीचे एक निरिक्षण लिहितो. आपली अस्तिकता घराच्या चार भिंतींआड ठेवावी असे ते इतरांना म्हणतात तेव्हा मुळात ते अस्तिकतेची व्याख्या रस्त्यावर चाललेल्या धांगडधिंगा खरोखरच 'देवासाठी' चाललेला असतो हे गृहित धरून इतरांना उपदेश करतात हे वर लिहिलेच आहे. पण त्याहूनही थोडे अधिक म्हणजे इतरांनी आपली अस्तिकता घराच्या चार भिंतींआड ठेवावी असे म्हणताना आपली नास्तिकता पण तशीच चार भिंतीआड ठेवावी हे का विसरतात? आपण नास्तिक असल्याचा काय अभिमान असतो अशांना. आपण जन्माला हिंदू आलो म्हणून त्याचा अभिमान, अमुक एका जातीत जन्माला आलो म्हणून त्याचा अभिमान वगैरे अभिमान धरणार्‍यांचे अभिमान त्यापुढे बरेच फिके पडतील.समजा तुमचा देवात विश्वास नाही असे असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा ना. जगभर त्याचे डिंडोरे पिटत फिरायची काय गरज आहे?

In reply to by गॅरी ट्रुमन

नाखु Mon, 09/14/2015 - 14:06
निव्वळ पंखा लिखाण : डायरेक धोतराला हात घातलात तुम्ही !!!!(स्वगत इतके मुद्देसूद कधी लिहिता येईल मज-पामराला)
म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्‍या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन. आणि लोक गैरवापर करतात म्हणून 'देव' हा प्रकारच रद्दड आहे असे नास्तिक लोक नक्कीच म्हणतात पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चुथडा करणे हा मनुष्यस्वभाव झाला.त्यामुळे चुथडा झाला म्हणजे मुळातली गोष्टच बेकार आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. एकूणच माझ्यासारख्यांची नेहमी पंचाईत होते.याचे कारण म्हणजे मी अस्तिक आहे असे म्हटले तर कर्मकांडवाले मला त्यांच्यातलाच एक समजतात आणि मी कर्मकांडांच्या विरोधी आहे असे म्हटले की स्वयंघोषित बुध्दीप्रामाण्यवादी मला त्यांच्यातलाच एक समजतात.
अहो असं नाही काय, एखादा डॉ.चुकला निदानात/उपचारात आणि त्याचा गंभीर परिणाम झाला तर वैद्यकशात्रच फालतू/फडतूस आहे असे म्हणने म्हणजे पुरोगामीत्व धरले जात नाही पण रस्त्यावरच्या धांगडदिग्याला, घरात शांतपणे कुणालाही त्रास न होता (आणि आप्ल्या जबाबदार्या-कर्तव्ये पार पाडून) केलेल्या जपालाही एकाच तागडीत टाकून मिपावर हेटाळणी प्रतीसाद दिला की तुम्ही पुरोगामी झालाच म्हणून समजा.
मी करतो ती श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.
मुकाट नाखु

In reply to by नाखु

मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.
मुकाट का झालात नाखु ? अपल्या मित्राची आठवण आली का हो टुम्हाला ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु Mon, 09/14/2015 - 14:22
तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते पहात जावे चित्ती असू द्यावे समाधान ! "मुका" ट नाखु

In reply to by नाखु

गॅरी ट्रुमन Mon, 09/14/2015 - 14:22
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.
यासंदर्भात "आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रद्धा" असे कुठेतरी वाचले होते. मला तरी ते वाक्य भलतेच आवडले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 14:15
अत्यंत बाळबोध गृहीतकांवर आधारलेले लेखन. नास्तिक असणं ही अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे वगैरे मुक्ताफळे उधळणार्‍यांकडून अजून कसली अपेक्षा ठेवायची म्हणा.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Mon, 09/14/2015 - 17:10
नास्तिक असणं ही अभिमान बाळगण्याची गोष्ट आहे
हा हा हा. गर्व से कहो सारखे हेही असते हे माहीत नव्हते ब्याट्या.... पण असायला प्रत्यवाय नसावा. नाही का! एकुणातच चर्चा गंडत चाललीय्ये. आस्तिक असण्याचा कर्मकांडाशी संबन्ध का जोडला जातो? बहुतेक कर्मकांडाच्या शोऑफ शिवाय आस्तिकतेचा ट्यार्पी कमी पडत असावा.

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 17:38
स्वतःला अमुक एका विचारसरणीच्या नावे आपण लै भारी आहोत असे प्रदर्शन करायचे असले की "मी भारी तर बाकीचे आपोआपच येडे" ठरतात, सबब आस्तिकता = कर्मकांड अशी अडाणी समीकरणे जोडली जातात. ते चालायचेच, असते एकेकाची गरज.

In reply to by गॅरी ट्रुमन

वामन देशमुख Mon, 09/14/2015 - 14:47
समजा तुमचा देवात विश्वास नाही असे असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा ना. जगभर त्याचे डिंडोरे पिटत फिरायची काय गरज आहे? +१

In reply to by गॅरी ट्रुमन

ऋतुराज चित्रे Mon, 09/14/2015 - 16:23
समजा तुमचा देवात विश्वास नाही असे असेल तर ते तुमच्यापाशी ठेवा ना. जगभर त्याचे डिंडोरे पिटत फिरायची काय गरज आहे? अगदी बरोबर बोललात. आस्तिकांनी आपला देव रस्त्यावर आणुन रहदारीला अडथळा आणायचा, ट्रेनमध्ये मोठ्याने देवाच्या आरत्या म्हणायच्या, रस्त्यावर लाउड्स्पिकर लावून ध्वनीप्रदुषण करायचे, कोणी विरोध केला की त्याला नास्तिक ठरवायाचे, नास्तिकता 'शो ऑफ' करतो म्हणायचे. आस्तिकांनी सार्वजनीक ठिकानी आपल्या आस्तिकतेचा 'शो ऑफ' बंद केल्यावरही एखाद्या नास्तिकाने रस्त्यावर 'शो ऑफ केल्यास त्याला जोड्याने मारा.

In reply to by ऋतुराज चित्रे

नाखु Mon, 09/14/2015 - 17:40
ऋतुप्रमाणे न वाचता नीट वाचा
म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्‍या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन
आपण सगळ्यांना एकाच प्रवर्गात टाकल्याबद्दल आपले जाहीर अभिनंदन. आता पुढील ग्रुहितिइके लिहून आम्हाला कृतकृत्य करा ही विनंती. घरात गुमान जप करणार्या-पूजा करणार्या आस्तीकास (देव भोळ्या नाही):
  • रस्त्यातला मंडपाचा त्रास होत नाही.
  • तो वर्गणी-झुंडशाहीला घाबरत नाही.
  • त्याला धार्मीक स्थ्ळांची ठिकाणची अनागोंदी आणी अस्वच्छता आवडते
तसेच जे या धाग्यात इतरांना आस्तीक्=देव आराधना करणारा=कट्टर दुराग्रही धार्मीक=वरील चोर मंडळी= चंगळी बुवां-बाबांचे खंदे समर्थक यांना एकाच प्रवर्गात कोंबण्याचा अट्टाहास्+आटापिटा करतात ते कधीही कंपनीत्,सोसायटीत कुठलीही धार्मीक वर्गणी देत नाहीत.त्याच्या वैयक्तीक आयुष्यात कुठलीही पूजा करीत नाहीत. किंवा पूजेस जात नाहीत. त्यांचे परिसरात कुठलीही सार्वजनीक प्रार्थनास्थळे नाहीतच.(असूच शकत नाहीत) ६ मंगल कार्यालयाचे परिसरात रहात ,दांडीया आणि मंगल कार्यालयाच्या* उपद्रवाची संबधीतांकडे तक्रार करणारा, तरीही घरी नित्यपूजा करणारा जुनाट नाखु

In reply to by ऋतुराज चित्रे

बॅटमॅन Mon, 09/14/2015 - 17:40
योग्य प्रतिसाद, पण फोकस वेगळ्या गोष्टींवर आहे. आस्तिकांनाही धड अक्कल नाही आणि नास्तिकांनाही नाही. वैचारिक माज असा फिजिकली दिसत नाही म्हणून तो निरुपद्रवी वाटतो इतकेच.

In reply to by बॅटमॅन

नाखु Mon, 09/14/2015 - 17:47
कसे विशुद्ध पुरोगामी आहेत हे दाखविण्याच्या अट्टाहासापायी इतर सगळ्यांकडेच पूर्वग्रह दूषीत नजरेने बघणे आणि प्रतिसादात त्याची मौक्तीके उधळणे डोक्यात जातात हे खरे. आमटेंच्या सिनेमात यावर व्यवस्थीत भाष्य आहे. अति अवांतर : सध्या काय वाचन चालू आहे. उत्सुक नाखु.

माझा गोंधळ ह्या इथे धार्मिक ( रीलीजीयस ) आणि अध्यात्मिक ( स्पिरितुअल) ह्या दोन मधे माझा घोळ होत आहे. एखादा अजिबात धार्मिक नसणारा ( सत्यनारायणादिक कर्मकांडे न करणारा ) माणुस प्रचंड अध्यात्मिक असु शकतो , अन सतत कर्मकांडे करणारा धार्मिक मनुष्य प्रचंड आधिभौतिक असु शकतो . देव मानण्याचा अन धर्म मानण्याचा एकामेकाशी काही संबंध नाही . माझे बाबा एका मंदीरात पुजारी आहेत , पण त्यांनी एकदा मला स्पष्ट पणे सांगितले होते की देव अशा काही त्रयस्त सुपरनॅचरल पावर च्या अस्तित्वा बाबत ते साशंक आहेत , स्केप्टीकल आहेत पण जोवर देव नाहीच असा खात्रीशीर पुरावा मिळत नाही तोवर जर तो आहे असे मानुन मनाला शांती लाभत असेल , आनंद लाभत असेल तर त्याचे अस्तित्व मानायला काय हरकत आहे ? बाबा सारी कर्मकांडे करतात पण आजही देवाच्या नसण्याच्या सबळ पुराव्या अभावी असणे त्यांनी मान्य केले आहे ! आई देवापुढे रांगोळी काढणे , फुले आणणे निर्माल्य टाकणे वगैरे अगदी भक्ती भावाने आनंदाने आनंदासाठी करते पण देव आहे की नाही ह्याने तिला फरक पडत नाही ( आणि उद्या देव नाही ह्याचा खात्रीशीर पुरावा मिळाला तरीही ती हे सारे करत राहीलच अशी मला खात्री आहे ! ) आणि माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ' न हि मनुष्यात श्रेष्ठतरम विद्यते किंचित । ' असा माझा ठाम विश्वास आहे . देव असं काही नसतं ! ज्याला लोकं देव देव म्हणतात तो तुच आहेस " तत्वमसि " !! एकदा हे कळाले की कसलेच कर्मकांड करायचा प्रश्नच येत नाही आणि मी करतही नाही ! आचार्यांनी म्हणल्या प्रमाणे " योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः । यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव || " आणि ह्यामुळे माझ्या लेखी देवापेक्षा कर्मसिध्दांत जास्त महत्वाचा आहे ! मार्कस ऑरेलियस च्या शब्दात सांगायचे झाले तर : 5. Every moment think steadily as a Roman and a man to do what thou hast in hand with perfect and simple dignity, and feeling of affection, and freedom, and justice, and to give thyself relief from all other thoughts. And thou wilt give thyself relief if thou doest every act of thy life as if it were the last, laying aside all carelessness and passionate aversion from the commands of reason, and all hypocrisy, and self-love, and discontent with the portion which has been given to thee. Thou seest how few the things are, the which if a man lays hold of, he is able to live a life which flows in quiet, and is like the existence of the gods; for the gods on their part will require nothing more from him who observes these things प्रतेक क्षणी विचार कर , एक रोमन म्हणुन , एक माणुस म्हणुन - जे कर्म तुमच्या हातात आहे ते अत्यंत पर्फेक्शनने , आदराने स्वतंत्रपणे , प्रेमाने न्यायाने आणि सर्वात महत्वाचे की संपुर्ण एकाग्रतेने कोणत्याही दिस्ट्रॅक्ट्शन शिवाय , पार पाडले पाहिजे . आयुश्यातील प्रत्येक क्षण असा जग की जणु काही तो आयुष्याचा अंतिम क्षण आहे निष्काळजी पणा दुर सारुन , अहंकार स्वार्थ विरोधाभास दुर सारुन , केवळ तर्काला धरुन आणि सर्वात महत्वाचे की जे कर्म हाती आले आहे त्याविषयीची अतॄप्तीची भावना दुर सारुन ! आणि मग लक्षात येईल की साधे सोपे आयुष्य जगण्या साठी किती कमी गोष्टींची गरज असते ते ! अशा प्रकारे आयुष्य जगणार्‍या माणसांकडुन प्रत्यक्ष देवांनाही अजुन कसलीच अपेक्षा रहात नाही !! असो .

तुडतुडी Mon, 09/14/2015 - 15:03
मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक आहे . त्यामुळे वरचे प्रश्न मला गैरलागू वाटतात . मुळात ह्या लेखाचं प्रयोजन काय आहे ? धार्मिकता आणि देव , पाप , पुण्य ह्यांचा संबंध नाही .तुम्ही कुठल्याही धर्माचे असा . तुमची कर्म महत्वाची . म्हणजे आता जैनांमध्ये अहिंसेला फार महत्व आहे . इतर लोक मारे nonveg चा पुरस्कार करतात . पण हिंसा ती हिंसाच . जैनांनी केली म्हणून त्यांना जास्त पाप आणि हिंदू किवा मुसलमानाने केली म्हणून कमी पाप असं थोडंच असतं . वैश्विक नियम सगळ्यांसाठी सारखेच आहे .
'देवबाप्पा पाप देईल'
देवबाप्पा पाप देतो ? अहो पाप पुण्य आपण करतो . देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस देतो .
माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले.
हे सर्व करून देव अप्रसन्न होत नसेल पण प्रसन्न होतो का ?लोक वरच्या सगळ्या गोष्टी करतात पण कर्मांचं काय ? कितीही पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले तरी त्याची फलं चांगल्या वाईट कार्मान्नुसारच मिळणार आहेत . आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातो .पाप पुण्याची यादी दाखवली जाते . आणि मग आयुष्यभर जे केलं ते चांगलं होतं कि वाईट , पाप होतं कि पुण्य , अर्थपूर्ण होतं कि निरर्थक ह्याचा उलगडा होतो . पण सावरण्याची वेळ निघून गेलेली असते

In reply to by अत्रुप्त आत्मा

एष .. धर्म: .. टन्ना टन:
मस्त प्रतिसाद ! अवांतर : बाकी परवा हॉटेल समाधानला मटन भाकरी आवडली की नाही ते सांगितलेच नाही तुम्ही . ह्या धाग्यावर लिहायचे होते ना काहीतरी ...

In reply to by तुडतुडी

देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस देतो .
देवबाप्पा शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही .... नमस्यामो देवान्ननु हतविधेस्तेऽपि वशगा विधिर्वन्द्यः सोऽपि प्रतिनियतकर्मैकफलदः । फलं कर्मायत्तं यदि किं अमरैः किं च विधिना नमस्तत्कर्मभ्यो विधिरपि न येभ्यः प्रभवति । । ९४ । । भर्तृहरिनीतिशतकम्

In reply to by तुडतुडी

प्रभाकर पेठकर Tue, 09/15/2015 - 12:11
तुडतुडी, माझ्या प्रतिसादातील माझ्या आई विषयी मी जी वस्तुस्थिती सांगितली आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही केलेले भाष्य मला कळलेच नाही. कितीही पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले तरी त्याची फलं चांगल्या वाईट कार्मान्नुसारच मिळणार आहेत. ह्याचा अर्थ माझ्या आईच्या बाबतीत मी काय घ्यावा? कृपया सांगाल का?

मारवा Mon, 09/14/2015 - 16:12
आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातो तुडतुडी जी हा चित्रपट कोण दाखवतो ?

मराठे Mon, 09/14/2015 - 20:16
आई-वडील २, मी ३.५ अगदी काही वर्षांपूर्वीपर्यन्त मी देवळात कधी कधी जात होतो; पण आताशा ते-ही बंद झालेय. थोडं इथल्या चर्चेविषयी, (विशेषतः प्रतिसादांविषयी); बर्‍याच लोकांची धार्मिकता, आध्यात्मिकता, अस्तिकता यांमधे गल्लत होते. त्याच्या ऐवजी, साधारण तुमच्या आईवडिलांपेक्षा तुम्ही देवाचं करता का? असा प्रश्न सुद्धा चालेल असं वाटतं. साधारण पणे आजूबाजूला पाहिलं तर असं दिसतं की आजी-आजोंबाच्या काळात (६०-७० वर्षांपूर्वी) ब्रतवैकल्य/पूजाअर्चा/विटाळ वगैरे प्रकार बर्‍यापैकी प्रचलित होते, त्या-मानाने आईवडिलांच्या काळात (३०-४० वर्षांपूर्वी) व्रतवैकल्य/विटाळ बरेच कमी झाले (शहरीकरणामुळे ?) आणी आताच्या काळात वाढत्या जागतिकीकरणामुळे असेल कदाचित पण विटाळ बहुतेकांच्या आयुष्यातून हद्दपार झाला आहे, पूजा-अर्चा नित्यांतून नैमित्तिकांत आल्या आहेत, आणि व्रतवैकल्या।ची जबाबदारी "फक्त आईवडील सांगतात म्ह्णून" करण्यापुरती उरली आहे. थोडक्यात खाजगी जीवनात कर्मकांडांचं महत्व कमी होत जाताना दिसतं (सार्वजनिक जिवनात मात्र उलटं होत आहे असं वाटतं)

In reply to by मराठे

राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 21:35
बरोब्बर, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला नेमकं समजलेलं आहे.
थोडक्यात खाजगी जीवनात कर्मकांडांचं महत्व कमी होत जाताना दिसतं (सार्वजनिक जिवनात मात्र उलटं होत आहे असं वाटतं)
असं दिसतंय खरं. कदाचित वेगळ्या डेमोग्राफिक्समध्ये हा प्रवास वेगळा असेल. इथे जे चित्र दिसतंय ते सुशिक्षित मध्यम किंवा उच्चमध्यमवर्गीय, कॉंप्युटर/इंटरनेट सॅव्ही, बहुतांश शहरी अशा लोकांचं आहे. मात्र हे डेमोग्राफिक जर आज दहा टक्क्यांचं असेल तर दहापंधरा वर्षांनी वीस टक्क्यांचं होऊ शकेल. आकडे निश्चित नाही, पण वाढणार हे मात्र खरं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्रभाकर पेठकर Tue, 09/15/2015 - 12:17
मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला नेमकं समजलेलं आहे. अरेरे! आम्हाला समजलेच नाही. असो. मराठे साहेबांनी दिलेले त्यांचे निरिक्षण हे सर्वांनाच जाणवणारे आहे. मग ह्या सर्वेचा उपयोग आणि उद्देश काय? जे निरिक्षण मराठेसाहेबांनी नोंदविले आहे तेच घासकडवी साहेबांनाही आपल्या आजूबाजूला दिसत असेलच. आणि आईवडिलांबद्दल म्हणाल तर दर पिढ्यांमध्ये वैचारिक उत्क्रांती की काय म्हणतात ती होतच असते. त्यासाठी कौलाची गरज काय? असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठे गुरुवार, 09/17/2015 - 18:35
पेठकरकाका, मला मराठे-साहेब बिहेब म्हणू नका हो, फारच वय झाल्या सारखं वाटतं. अजून पंत्/साहेब वगैरे म्हणण्याएवढा मोठा झालो नाहिये. (मला वाटतं काही काही आडनावं अशी असतात की त्यांना संबोधनं आपोआप चिकटतात.. ) सदस्यनाम बदलून घ्यायला पाहिजे!

रामपुरी Mon, 09/14/2015 - 21:52
पण जाता जाता अवांतर: तुम्हाला "जी उत्तरे अपेक्षित आहेत" ती उत्तरे ऐसीअक्षरे (ऐसीलक्तरे???) वर मिळतील. मिपाकर असल्या धाग्याचा काथ्या करून कुटणार. तेव्हा हा धागा तिथे काढावा हा आगाऊ सल्ला :)

विनोद१८ Tue, 09/15/2015 - 00:13
@ घासकवडी.....
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात ?
याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा द्यायला हवे, ते तुमचे उत्तर काय ?? तुमच्याघरची याबाबतची परिस्थीती काय आहे ?? कारण धागा तुम्ही टाकलाय, लोकांकडून असली माहिती घेण्याअगोदर आपल्याला त्याबद्दल काय वाटते हे प्रथम आपण लोकांना सांगितले पाहिजे.
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं.
म्हणजे नेमक काय हे जरा अधिक विस्ताराने सांगाल का ?? बरे, तुमची धर्माची व्याख्या काय ?? धर्म म्हणजे तुम्ही नेमके काय समजता ?? या विषयावर धागा काढण्याचा व काथ्याकूट घडवून आणण्यामागचा तुमचा मुख्य हेतु काय ?? हे मला पडलेले प्रश्ण.....!!!

In reply to by विनोद१८

राजेश घासकडवी Tue, 09/15/2015 - 00:33
याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा द्यायला हवे, ते तुमचे उत्तर काय ?? तुमच्याघरची याबाबतची परिस्थीती काय आहे ?? कारण धागा तुम्ही टाकलाय, लोकांकडून असली माहिती घेण्याअगोदर आपल्याला त्याबद्दल काय वाटते हे प्रथम आपण लोकांना सांगितले पाहिजे.
उत्तर दिलेलं आहे हो. या प्रतिसादात.
बरे, तुमची धर्माची व्याख्या काय ?? धर्म म्हणजे तुम्ही नेमके काय समजता ?? या विषयावर धागा काढण्याचा व काथ्याकूट घडवून आणण्यामागचा तुमचा मुख्य हेतु काय ?? हे मला पडलेले प्रश्ण.....!!!
आता मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला नको वाटतं, पण प्लीज, जरा प्रतिसाद वाचा हो. मूळ लेखात जे स्पष्ट झालेलं नाही, त्याचं स्पष्टीकरण मी वेगवेगळ्या पद्धतींनी दिलेलं आहे. असं करा, कंट्रोल एफ दाबून त्यात या धाग्यातच 'राजेश' असं सर्च करा, म्हणजे माझे प्रतिसाद एकामागून एक दिसतील. त्यात दिलेली आहेत हो उत्तरं. प्लीज, जरा वाचा एकदा.

चला, आता घासू गुर्जींचं टायटलच क्लिअर करून टाकतो! ;)
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
यातल्या "आहात?" चं उत्तर मिळत आहे/मिळेल. मी "असतात का?" ,याचं उत्तर सांगून टाकतो. मी गेली १७वर्ष पौरोहित्य करताना जे जवळून पाहिलेलं आहे,त्या आधारावर हे उत्तर आहे. किशोर वयापासून ते विवाहपूर्व वयापर्यंत बहुसंख्य मुलं पालकांच्या दबावा खाली पूजेला बसत असतात. स्वत: हौसेनी पूजेला बसणाय्रा मुलांचं प्रमाण २० टक्क्या पेक्षा जास्त नाही. पण हे सर्व पालकांच्या क्रुपा छत्राखाली जगत असतानाचं वर्तन आहे..जेंव्हा मुलं कॉलेज संपवून नोकरी शोधणे,लागणे.. या स्वत:च्या स्व'तंत्र आणि हरेक प्रकारची जबाबदारी अंगावर-पडणाय्रा विश्वात शिरतात तेंव्हा ही नास्तिकांची आस्तिक बनलेली दिसली आहेत , आणि वीस टक्के हौशींपैकी बरीच जणं नास्तिकतेकडे वळलेली पहायला मिळालेली आहेत. आता हे सगळं स्टेडी केंव्हा होतं? तर ते होतं विवाहानंतर. मग मात्र मजा मजा पहायला मिळालेली आहे.. त्याला मी तरी कुठल्याही प्रकारचं "लेबल" लावायचं धाडस करणार नाही. कारण हीच ती मुलं असतात जी विवाहपूर्व आयुष्याच्या दोन टप्प्यात दोन बदल घेउन जगलेली असतात. ती एकाच वेळी नास्तिकंही असतात आणि आस्तिकंही! हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यांमधे डायरेक दोन टोकं आहेत. १) कट्टर सनातनी (म्हणजे आंम्ही ज्यांना टनाटनी म्हंन्तो,त्ये एष धर्म: टन्नाटन्न: वादी.. जे धर्माचा स्वयंलिप्त अर्थ-काढून त्यातून आपलं टन्नाटन्नी जीवण जगतात. ) २) पुरोगामी सेक्युलर ( म्हणजे व्यवहारात - फुर्रोगामी फेक्युलर..ह्यांचं प्रमुख लक्षण म्हणजे हे स्वत:चा वैयक्तिक {शिल्लक असलेला} धर्म सोडून बाकिच्यांच्या धर्मांबाबत अगदी भयंकर निरपेक्ष असतात. एष धर्म: टन्ना टन्न: वाद्यांचे हे सावत्र भाऊच जनू!!! ) ===================== आता यातूून तुम्माला काय घ्यायचा त्यो शोधबोध घ्या हो... घासूकाका! ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Tue, 09/15/2015 - 08:58
मस्त "उत्तर पूजा" बांधली. अभामिपासदाहारीत्जुनीवारूणीनवीबाटलीशिळीकढीउत्मातुच्छ्भ्रूजळमट्निवारक्मिपास्वच्छता अभियानाकडून बुवांना गणपती शुभेच्छा!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

किशोर वयापासून ते विवाहपूर्व वयापर्यंत बहुसंख्य मुलं पालकांच्या दबावा खाली पूजेला बसत असतात.................... आता हे सगळं स्टेडी केंव्हा होतं? तर ते होतं विवाहानंतर. ते स्टेडी होणं असतं की पालकांच्या दबावाखालून निघून बायकोच्या दबावाखाली गेल्यामुळे बदललेलं मत असतं ??? बुवा, करा पुढचा स्टडी याच्यावर ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

@ते स्टेडी होणं असतं की पालकांच्या दबावाखालून निघून बायकोच्या दबावाखाली गेल्यामुळे बदललेलं मत असतं ??? ह्या ह्या ह्या.. ,असेल..असेल हो! :D पण तरिही तो दबाव पालकांच्या इअतका चौफेर नसतो. हे ही पाहिलेलं आहे. अगदी अपवादात्मक केसेस सोडल्या तर.

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यांमधे डायरेक दोन टोकं आहेत.
आणि तिसरं एक टोकं आम्हाला माहीत आहे ३) स्वमतांध दांभिक म्हणजे स्वतःच्या फायद्या करिता जे लोकं कर्मकांडं करतात अन नंतर अगदी त्याच्या विरुध्द मत मांडुन आपणच कसे शहाणे ह्याचा प्रचार करतात ... हे म्हणजे अगदी स्वतः नळ्या ओढत , तांबडा पांढरा रसा ओरपायचा अन नंतर अहिंसा परमो धर्मः , भूतदया वर प्रवचन देत मीच कसा शहाणा म्हणत डिंडोरा पिटत फिरतात !! =))

In reply to by प्रसाद गोडबोले

@३) स्वमतांध दांभिक म्हणजे स्वतःच्या फायद्या करिता जे लोकं कर्मकांडं करतात अन नंतर अगदी त्याच्या विरुध्द मत मांडुन आपणच कसे शहाणे ह्याचा प्रचार करतात ... हे म्हणजे अगदी स्वतः नळ्या ओढत , तांबडा पांढरा रसा ओरपायचा अन नंतर अहिंसा परमो धर्मः , भूतदया वर प्रवचन देत मीच कसा शहाणा म्हणत डिंडोरा पिटत फिरतात !! >> एखाद्या गोष्टीचं महामूर्ख अतिरेकानी कसं एनॅलिसिस करावं,याचं हे उत्तम उदाहरण आहे. यजमान त्याचा काहितरी (धर्मशास्त्रानी सांगितलेला,आणि स्वतः गृहीत धरलेला)फायदा व्हावा ,म्हणून कर्मकांड करत असतो. त्यात पुरोहित हा ते फक्त करवून देणारा(म्हणून) ..तेव्हढाच इन्व्हॉल असतो. त्याला त्याचा कोणताही फायदा अपेक्षित नसतो..तो धर्मानीपण गृहीत धरलेला नाही..(ह्या अचरट टनाटन्यांनी तो स्वमतांध दांभिकतेनी तो गृहीत का धरा ना! ;) )दक्षिणेचे म्हणाल..तर ही जी काहि वेळाची शरीर आणि मेंदूची हमाली यजमानास्तव पुरोहिताकडून केली जाते..त्याचं ते मोल असतं..जे कुणिही घेइल.. हे सर्व कळत असूनही स्वतःवरच्या लागलेल्या दगडाचं निरसन करता नै आलं..की ही अशी चिडचिड होते. या साठी पुरोहिताला जबाबदार धरता येत नाही..(स्वतःच्या अंधमत दांभिकतेनी धरलत तरी..) ते निश्चितच निरर्थक आत्मरंजन आहे.. हे म्हणजे हलवायाला खादाड..खादाड अशी नावं ठेवण्या इतकं महामूर्ख हलकट्पणाचं टनाटनी लक्षण आहे. (ल्लुल्लुल्लुल्लु ! :p )

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 09/15/2015 - 14:24
अररर लैच स्वार्थी हाय की हा हलवाई. फॅमिली डॉक्टर म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवून औषध घ्यायला जावं तर डॉक्टर म्हणतो तू सांग तुला जे औषध हवं ते मी गप्प बसून देतो. अवघड च आहे.

In reply to by प्यारे१

अजून एक स्वमतांध प्रतिवाद. बघा हं.. मी काय म्हणलो ते .. यजमान त्याला हवं असलेलं कर्मकांड सांगून करवून घेतो.. पुरोहित नाही त्याच्या घरात घुसून बोकांडी बसत.. हे हे कर,आणि मला पैसे दे म्हणून.. तद्वतच.. डॉक्टरकडे रुग्ण जातो..आणी त्याला सांगतो, मला हा हा आजार होतोय.. मग डॉक्टरचं काम तपासण्याचं कर्मकांड करून त्याला औषध देणं,आणि त्या मेहनीतीचे पैसे घेणं हेच. @फॅमिली डॉक्टर म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवून औषध घ्यायला जावं तर >> हे बघा फिरवलं स्वतःला हवं तसं..कोणिही रुग्ण डॉक्टरकडून औषध घ्यायला जात नाही..आजार दाखवायला जातो.. त्द्वतच आमच्याकडे कोणीही कर्मकांड मागायला येत नाहीत... हे हे करायचं आहे,आपण करवून देणार का? एव्हढच विचारतात.. @डॉक्टर म्हणतो तू सांग तुला जे औषध हवं ते मी गप्प बसून देतो. अवघड च आहे. >> जाणिव पूर्वक निरर्थक फिरवाफिरवी केलेली आहे.. हे कळत असल्यामुळे.. ह्या निरर्थक स्वात्मरंजनाची आंम्ही उपेक्षा करत आहोत.. ल्लुल्लुल्लुल्लु :p :D

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Tue, 09/15/2015 - 14:47
>>> यजमान त्याला हवं असलेलं कर्मकांड सांगून करवून घेतो.. त्याला हवं असलेलं जरी असलं तरी तुम्ही धर्मामध्ये सुधारणा करणारे पुरोहित असल्यानं सांगायला हवं ना? अमुक एक पूजा करुन काहीही होणार नाही किंवा ही पूजा करु नका ती करा. साध्या भोळ्या यजमानांचा हा फायदा उचलताय कि तुम्ही. ही फसवणूक आहे कि. यजमानांना काय माहिति असते का अमुक एक पूजा करायची आहे . कुणीतरी सांगतं म्हणुन ते तुमच्याकडं येतात. बुवा पूजा करायची आहे. तेव्हा तुम्ही काही सांगता का? अमुक एक कारण असलं तर हे करा अन्यथा नका करु. त्यानंतर समोरच्याची मर्जी.

In reply to by प्यारे१

, औषध घ्यायला जाणं हा नंतरचा अनुषंगिक भाग आहे. रुग्ण डॉक्टरला आधी आजारच दाखवायला गेलेला असतो.. पण हे सत्य मान्य केलं , तर तुमची आरोप करायची गैर सोय होणार.. त्यामुळे , आता "चालू द्या!"| आणी "असोच्च!"| :p