मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अवधूत (भाग-१)

मांत्रिक · · जनातलं, मनातलं
शारद पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने सारं जग भरून गेलेलं होतं. त्या प्रकाशात तारका मात्र फार क्षीण दिसत होत्या. नेहमीच्या सरावाने त्याची पावले त्या दुधाळ प्रकाशात गडवाटेवर पडत होती. जवळपास ११ वर्षांपासूनचा परिचित रस्ता. कधीही मनात लहर येईल तेव्हा जायचं जगदंबेच्या भेटीला गड चढून. हवेत मंदसा प्रसन्न गारवा. वर्षाकाळात तरारून उगवलेल्या गवताचा आणि रानफुलांचा मादक सुगंध मात्र सगळीकडे दरवळत होता. कधी कुठे तरी एखाद्या चुकार रात्रिंचराची फडफड नाहीतर बाकी सर्व शांत शांत. मागे वळून पाहिलं तर खाली गावात घरोघरी लागलेल्या दिव्यांची नाजुकशी रांगोळी. पुढे वर पाहिलं तर आईच्या देवळातून बाहेर झिरपत येणारा समयांचा दिसणारा न दिसणारा असा मंदसा प्रकाश. एरवी भयानक आकार धारण करणारी झाडेझुडुपे आज मात्र बरीचशी निरुपद्रवी वाटत होती. पलिता घ्यायची गरज नव्हती म्हणून त्याने उजव्या हातात पानांचा द्रोण धरून त्यात रानफुलं भरून आणलेली होती, त्याच्या आईच्या चरणांवर अर्पण करायला. डाव्या हातात स्वसंरक्षणासाठी म्हणा किंवा अवघड गडवाटेवर आधारासाठी म्हणा, एक लांब आणि जाडजूड काठी. कमरेला एक जुनाट मळकट भगवं वस्त्र राहिलेलं फक्त. केसांच्या कधीच जटा झालेल्या. अन्नाच्या आबाळीने शरीराची खोळ हाडाचा सापळा म्हणावी अशीच दिसणारी. पण मन मात्र एका अनोख्या शक्तीने भरुन गेलेलं. तीच शक्ती डोळ्यांतून डोकवायची, बोलण्यातून बाहेर पडायची आणि कृतीतून पण दिसून यायची. पावलं नेहमीच्या सवयीने वाट चालत होती, पण मनात मात्र आईच्या मंत्राचा अखंड जप आणि डोक्यात असंख्य विचारांची आवर्तने. ११ वर्षांपूर्वीच त्यानं माणसांचं जग सोडून दिलं होतं. आता त्याच्या मनात कशालाच, कुणालाच काही स्थान उरलेलं नव्हतं. तसा पण तो लहानपणापासून बराचसा वेगळा. कुणाच्यात फारसं न मिसळणे, सतत कशाचा तरी विचार करणे, शून्यात नजर लावून बसणे यामुळे तो लवकरच इतर मुलांच्या चेष्टेचा विषय बनला. घरात देखील परिस्थिती फारशी बरी नव्हतीच. त्याच्या एकलकोंड्या प्रवृत्तीला कंटाळून घरच्यांनी त्याची कुंडली इकडे तिकडे दाखवायला सुरुवात केली. बरेच जणांनी काहीतरी नेहेमीसारखी गुळमुळीत उत्तरं दिली. एक साधू मात्र फार वेगळा निघाला. त्या कुंडलीकडे आणि मग त्या मुलाच्या डोळ्यांत पहात तो उत्तरला, “हा पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट आहे. मागच्या जन्मीचा शोध पूर्ण करायलाच तुमच्या पोटाला आलाय. तुमचं याचं नातं फार थोडे दिवस! एके दिवशी सर्व काही टाकून देऊन त्याच्या ख-या आईबापाच्या शोधात निघून जाणार. याची काळजी करू नका. ती जगदंबाच करेल!” हे ऐकून आईवडिलांना फारसा फरक पडला नाही. त्याच्या पूर्वीच जन्मलेली ६ भावंडं. ह्या एकट्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे? थोरला तर चांगल्यापैकी शेतीवाडी आणि गाईगुरांचं बघू लागलेला होता. दोन बहिणी देखील लग्नाच्या वयात आलेल्या. याला मात्र अत्यानंद झाला. माझा शोध पूर्ण होणार तर! मला आई भेटणार तर! काळ झपाट्याने बदलत गेला. वडील आता घरीच जास्त राहू लागले. थोरल्या भावंडांनी याच्याविरोधात कुरबुरी सुरु केल्या. आईबापांनी जबरदस्ती लग्नाचा घाट घातला. याला तर प्रपंच, पोरेबाळे वगैरे सांसारिक पाश पहिल्यापासूनच नको होते. एके रात्री कुणालाही कळू न देता घराबाहेर पडला तो कायमचाच! काही दिवस सतत चालत राहिला. गावांमागून गावं. चेहे-यांमागून चेहरे. प्रश्नचिह्न, सहानुभूती, हेटाळणी आणि संशय यांनी भरलेले. दिलं कुणी अन्न तर खायचं नाहीतर आईवर विश्वास ठेवून पुढच्या गावाला चालू लागायचं. हळूहळू अंगावरील तारूण्याची रया पार निघून गेली. अन्न न मिळाल्याने शरीर कृश झालं. पोटाला देखील उपाशी राहण्याचीच सवय झाली. असाच चालत चालत एके दिवशी सप्तशृंगास पोहोचला. पायथ्याच्या वणी गावात रात्रीचा मुक्काम करून सकाळी गड चढून देवीच्या दर्शनास उपस्थित झाला. तेव्हांपासून ११ वर्षं तिथेच राहतोय तो. त्या अद्भुत ठिकाणाच्या ओढीने त्याला पुन्हा कुठे जाऊच दिलं नाही. सप्तशृंगाच्या पुढे मार्कंडेयाचा डोंगर आहे. तिथेच याचा जास्तीत जास्त वेळ उपासनेत जायचा. दोनेक दिवसांनी भूक लागायची. मग आजूबाजूच्या पंचक्रोशीत फिरलं तर थोडीफार भिक्षा आयाबाया वाढायच्या. काहीच नाही मिळालं तरी मंदिरातील पुजारी केळी, खोबरं-खडीसाखर देत असे. कधी आईच्या दर्शनाची लहर आली की सप्तशृंगावर जायचं. एरव्ही अखंड नामस्मरण फक्त! (क्रमशः)

वाचने 20305 वाचनखूण प्रतिक्रिया 39

In reply to by मांत्रिक

द-बाहुबली Wed, 08/26/2015 - 12:10
आपली लेखन शैली ओघवती आहे, वाचताना कंटाळा येत नाही. परंतु मला कथाबीजच लक्षात येत नाहीये म्हणून विचारले की हे काय आहे. (मला अवधुत कोणाला म्हणतात याची जुजबी माहिती आहे).

In reply to by द-बाहुबली

प्रवाही लेखनशैली कथाबीज पहिल्या भागात लक्षात न येणे हे देखील लिखाणाचे वैशिष्ट्ये आहे म्हणजे पुढे कथा भय गूढ रहस्य सामाजिक कोणत्याही अंगाने पुढे जाऊ शकते आता दुसरा भाग वाचायला घेतो आयडी च्या नावास साजेसे कथानक दिसत आहे.

In reply to by एस

प्यारे१ Sun, 08/23/2015 - 22:31
प्रतिभा देखो श्रीमान.... हमारे लिए इतने सालोंके बावजूद इस श्रेणी का लेखन असंभव है| आम्र फलोंका ग्रहण करे, शाखाओं और पर्णों के गणन से क्या लाभ? ;)

स्पंदना Tue, 08/25/2015 - 09:53
सप्तशॄंगी!! कसली भव्य देवी आहे ती!! __/\__!! लेखन सुंदर!! लेखाचं नाव सुद्धा आवडलं. अवधुत!! मस्तच!

In reply to by स्पंदना

मांत्रिक Wed, 08/26/2015 - 07:16
धन्यवाद! अवधूत हा नाथपंथी शब्द. आत्मशोधार्थ मोहमाया त्याग करून सतत भ्रमणशील राहणार्या उपासकांसाठी हे नाव वापरले जाते. याचा एक अर्थ दत्तात्रेय देखील आहे. काही दिवसांपूर्वीच सप्तशृंगीला जाऊन आलो. तेव्हाच या कथेने मनात आकार घेतला. जमल्यास सप्तशृंगी येथील फोटो व व्हिडिओ देखील टाकायचा प्रयत्न करेन.

नीलमोहर Sat, 08/29/2015 - 10:39
लिखाणामधील अध्यात्मिक भाग खूप छान मांडता आपण, सप्तशृंगी माता कुलदैवत असल्यामुळे बरयाच वेळा जाणं होतं, दरवेळेस गेलं की एक वेगळंच समाधान मिळतं, असाच अनुभव सज्जनगडावरही येतो. हल्ली बरीच धार्मिक ठिकाणं देवालय कमी आणि बाजार जास्त अशी स्थिती असते त्यामूळे तिथे गेल्यावर समाधान मिळत नाहीच,चिडचिड जास्त होते.

In reply to by नीलमोहर

मांत्रिक Mon, 08/31/2015 - 12:59
धन्यवाद, बरेच ठिकाणी झालंय असं ख्ररं. म्हणून फारसं देवालयांच्या वाटेला जात नाही. कधी गेलोच तर नुसतं दर्शन घेणे. उगाच ते अभिषेकांच्या रांगेत उभे राहणे आवडत नाही. देवालय कमी आणि बाजार जास्त अशी स्थिती असते त्यामूळे तिथे गेल्यावर समाधान मिळत नाहीच,चिडचिड जास्त होते. अगदी सत्य आहे. म्हणून घरीच काय ते भजन पूजन बरे वाटते. पण अजूनही अशी काही देवस्थानं आहेत, जिथं अद्याप माणसांची वर्दळ व वाढलेली नाही. अशा ठिकाणी मात्र जायला आवडते.