मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध

माहितगार · · काथ्याकूट
http://scroll.in नावाच्या संकेत स्थळावर Eric M Gurevitch यांचा लेख (· Jul 25, 2015 · 09:15 am ) वाचण्यात आला. Eric M Gurevitch त्यांच्या लेखाच्या सुरवातीस म्ह्णतात The West doesn't have a copyright on proper attribution. Here's what Sanskrit commentators and anthologists have to say on the subject. Eric M Gurevitch यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे. दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला. (म्हणजे बेसीकली पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य होत असल्याकडे सोमदेव सुरीचे लक्ष गेल्याचे दिसते) सोमदेव सुरीनेखालील श्लोकातून काव्यचौर्याचा निषेध व्यक्त केला आहे. (संस्कृतप्रेमी जाणकारांकडून या श्लोकांचा अनुवाद करून हवा आहे) कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः। तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३ ११व्या शतकातील काश्मिरी पंडीत भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे. साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः । यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११ १४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै । अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६ उपरोकत संस्कृत श्लोकांचे मराठी अनुवाद करून हवे आहेत. * ह्या धागालेखातील प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पांसाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे ते प्रताधिकार मुक्त समजले जातील * आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आभार

वाचने 14155 वाचनखूण प्रतिक्रिया 24

अरुण मनोहर 23/08/2015 - 12:48
दहाव्या शतकात देखील प्रताधिकार आणि काव्य चौर्य साठी जागरूकता होती हे वाचून आश्चर्य वाटले! माझे एक मित्र श्री निरंजन भाटे संस्कृत चांगले जाणतात. त्यांनी तीनही श्लोकांचे मराठी श्लोक करून दिले आहेत.
कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः। तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३ उपयोगिता काव्य दुसर्‍याचे अपुल्या कवनामध्ये, करा प्रस्तुत परीक्षणा त्यांच्या समोर। आणि करावे श्रेयनाम संबोधन, अन्यथा जाणावे असे काव्यचोर आणि पातकी घोर॥
साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः । यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११ साहित्यनिधीचे करीता मंथन, उसळे काव्यामृत जे, रक्षावे हे कवीश्वर। कारणे काव्यचोर बैसले दैत्याप्रमाणे ते चोरण्या तत्पर॥
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै । अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६ परशब्द उचलती जे, संदर्भाच्या खुणेविना। न ही वदती श्रेयनाम, ऐशा कवींना चोर जाणा॥ हे श्लोक प्रताधिकार मुक्त असण्यास कवीची परवानगी आहे.

In reply to by अरुण मनोहर

माहितगार 23/08/2015 - 15:05
दहाव्या शतकात देखील प्रताधिकार आणि काव्य चौर्य साठी जागरूकता होती हे वाचून आश्चर्य वाटले!
सहमत आहे, मलाही हे वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला म्हणूनच मिपावर शेअर केले. आपले मित्र श्री निरंजन भाटे यांनी उपलब्ध केलेले अनुवाद मराठी विकिपीडियाच्या साइट नोटीसमधून आलटून पालटून दाखवल्या जाणार्‍या प्रताधिकार सजागता संदेशमालिके आंतर्भूत केले आहेत. याबद्दल त्यांना कल्पना देऊन आमचे धन्यवाद कळवावेत. आपण आणि श्री निरंजन भाटे यांच्या सक्रीय अनुवाद साहाय्याबद्दल खूप खूप आभारी आहे.

In reply to by अरुण मनोहर

मांत्रिक 23/08/2015 - 15:20
एकदम सुंदर भाषांतर केलेले आहे. खरे तर पद्यांतर म्हणावे लागेल! समस्या किती का मोठी असेना, शेवटी माहितगार साहेबांना कुठून तरी माहिती मिळतेच! हाती घेतलेले कार्य चांगले असल्याची पावती ही!

In reply to by मांत्रिक

माहितगार 23/08/2015 - 18:48
शेवटी .... कुठून तरी माहिती मिळतेच!
हो हे खरे आहे अर्थात हे सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य होते.

प्रचेतस 23/08/2015 - 15:47
नरेन्द्रपण्डिताचे रुक्मिणीस्वयंवर ऐकून रामदेवरायच्या मनात ते आपल्या नावावर असावे अशी अभिलाषा उत्पन्न झाली होती त्याबदल्यात प्रत्येक ओवीसाठी त्याने सुवर्णमुद्रा देऊ असे नरेन्द्रपंडितास सांगितले. पण इतर कवीलोक मला बोल लावतील असे म्हणत नरेन्द्राने त्यास नम्रपणे नकार दिला व् एकूणच प्रसंगांमुळे व्यथित होऊन देवगिरीच्या राज्यदरबारचा त्याग करुन तो महानुभव पंथात सामील झाला.

In reply to by प्रचेतस

माहितगार 23/08/2015 - 18:31
रोचक आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद. तुमचा प्रतिसाद वाचून बुकगंगा डॉटकॉमवर शोध घेतला तर महानुभाव पंथीय गद्यपद्य स्मृतीस्थळ या ग्रंथात आपण वर्णीलेल्या प्रसंगाचे वर्णन आलेले दिसते. संदर्भ: [नरेंद्रकृत आद्य मराठी काव्य- डॉ.सुहासिनी इर्लेकर (बुकगंगा डॉट कॉम) व्हाया: डॉ.वि.भी कोलते व्हाया:स्मृतीस्थळ]

In reply to by प्रचेतस

हा प्रसंग १०वी कुमारभारतीच्या पुस्तकातल्या नरिंद्रबासा भेटी अनुसरणं या पाठातही होता. त्यातली खालील ओळ वरील प्रसंगात नरेंद्राने उत्तर देण्यासाठी वापरल्याचा उल्लेख होता. देवाचिया दादूलेपनाचा उबारा, न साहावेची साता ही सागरा, भेण वोसरोनी राजभरा, दीधली द्वारावती.

In reply to by माहितगार

माझी दुसरी बॅच होती. तो पाठ ज्या ग्रंथातून घेतला होता त्याचे लेखन नेमके कोणी केले याबाबत संशोधकांमध्ये मतभेद होते असा उल्लेख पाठाच्या सुरुवातीला जी ओळख असायची त्यात होता. माझ्या मते मराठी व सेमी इंग्रजी माध्यमांतून महाराष्ट्रात शिकलेले बहुसंख्य (किंवा बरेच) मिपाकर या दहा वर्षांत दहावी उत्तीर्ण झाले असतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 24/08/2015 - 10:55
इंटरेस्टींग.
तो पाठ ज्या ग्रंथातून घेतला होता त्याचे लेखन नेमके कोणी केले याबाबत संशोधकांमध्ये मतभेद होते असा उल्लेख पाठाच्या सुरुवातीला जी ओळख असायची त्यात होता.
डॉ.सुहासिनी इर्लेकरांचे लेखन पुन्हा पाहिले, तुम्ही म्हणता तसे या प्रसंगाबाबत नोंदी नेमक्या कुणी केल्या या बाबत नेमक्या स्वरूपाची स्पष्टता नसावी असे दिसते.

In reply to by माहितगार

हे लेखन स्वतः नरेंद्र किंवा त्या पाठात उल्लेख असलेले इतर दोघे (बहुधा एक जण नरेंद्रचा भाऊ) यापैकी एकाने केले असावे असा संशोधकांचा अंदाज होता असेही त्या ओळखीत लिहिले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 24/08/2015 - 11:20
रोचक माहितीसाठी धन्यवाद. अवांतरः शाळेत शिकलेले एवढे छोटे बारकावे माझ्यातरी सहसा विस्मरणात गेले आहेत. एवढे बारकाव्यासहीत कसे काय लक्षात ठेवलेत ! तुमच्या स्मरणशक्तीच कौतुक आधीच्याच प्रतिसादात करणार होतो मोह आवरला होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

आम्हालाही होते हे प्रकरण. आणि बहुतेक ऑप्शनला टाकले होते. नंतर अकरावीला बहुतेक ' गुळहारियाचा दृष्टांत' आणि बारावीस 'म्हाइंभटी सिक्षापणी' होते वाटते.

In reply to by स्वामी संकेतानंद

सूड 24/08/2015 - 18:34
नंतर अकरावीला बहुतेक ' गुळहारियाचा दृष्टांत' आणि बारावीस 'म्हाइंभटी सिक्षापणी' होते वाट
+१

In reply to by स्वामी संकेतानंद

१०वी कुमारभारतीच्या पुस्तकात हे पहिलेच प्रकरण होते. ११वी-१२वीत व्होकेशनल घेतल्यामुळे मला मराठी विषय नव्हता.

बॅटमॅन 24/08/2015 - 14:23
नरींद्रबासां भेटि: अनुसरणः नरेंद्र कवि: साळ कवि: नृसिंह कवि: हे तिघे भाऊ: नॄसिंह कविन नलोपाख्यान केले: साल कविन रामायण केले: ते आपुलाले रामदेवरायापुढां म्हणितले: तेथे नरेंद्र कवि बैसले होते: यैसा द्वारकेचा रामहाठु वर्णितेती तरि तुमचेया पापां पुरश्चरण होते: यैसे रायांदेखतां निभर्षिले: यावरि राये म्हणितले: तुम्हीं एक कवीत्व करा: मां तुमची युक्ती पाहो: मग नरेंद्रबासीं तेणें सळें अठरासते रुक्मिणीसैंवर ग्रंथु केला:.... :वाचिता वाचिता ये वोवीपासी आले: देवाचेया दादुलेपनाचा उबारा: न साहावेचि साता ही सागरां: भेण वोसरोनि राजभरा: दीधली द्वारावती: यावरि रायें म्हणितले: या ग्रंथाचा अभंगु मज देयावा: म्यां जेतुकीया वोवीया तेतुके सोनटके अन चौथरीया आसू वोवाळणि घालीनः नरेंद्रबासी म्हणितले: ना राजेहो: आमुचेया कविकुळा बोलु लागैलः रायासी थोर चमत्कारु जाला:.........: "सकळां कवीपरीस हा कवी चतुर".... अधले मधले काही काही आता स्मरणातून निसटले आहे. बाकी संस्कृत उदाहरणांबद्दल माहितगार यांचे आणि नेमकी यादवकालीन आठवण काढल्याबद्दल वल्ली यांचे अनेक आभार!!!!

In reply to by बॅटमॅन

सूड 24/08/2015 - 18:38
शाब्बास रे ब्याट्या!! ती द्वारावतीची ओळ काही कवींना बोल लागेल म्हणून वापरली नव्हती हे आठवत होतं, पण मग शिंची खरी ओळ कोणती ते आठवेना.