Skip to main content

वीरधवलचे लेखक कोण???

लेखक वडापाव यांनी बुधवार, 30/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वीरधवल हे पुस्तक माझ्याकडे होते, पण २६ जुलैच्या प्रलयात ते खराब झाले. मला ह्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आठवत नाही. एखाद्या व्यक्तीला माहिती असल्यास त्यानी जरूर कळवावे.

वाचने 15604
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

या पुस्तकाचे लेखक बहुतेक नाथमाधव आहेत. हे तेच पुस्तक का कि इंग्रजी "रे नाल्ड" च्या कादंबरी वरून घेतले आहे? तर मग माझे बरोबर आहे.

मी वीरधवल हे पुस्तक वाचलेले नाही, परंतु वि वा हडप हे त्याचे लेखक असावेत असे मला पुसटसे आठवते.. मर्मभेदकार शशी भागवत हेही एक नांव डोळ्यासमोर येते. असो, चूभूद्याघ्या. नक्की मलाही माहीत नाही. आपला, (वाचक) तात्या.

या पुस्तकाचे लेखक नाथमाधव आहेत माझ्याकडे हे पुस्तक आहे नाना

In reply to by अवलिया

नानांचे बरोबर आहे माझ्याकडेही हे पुस्तक आहे तुम्हाला अशा प्रकारची अत्भुत आणि वीर रस युक्त पुस्तके आवडत असतील तर खालील पुस्तके नक्की वाचा लेखक : गो. ना. दातार - इंद्रभुवनगुहा - कालिकामूर्ती - शालिवाहन=शक - विलासमंदीर लेखक : वा.गो.भिडे - मायावती लेखक : शशी भागवत - मर्मभेद - रत्नप्रतिमा - रक्तरेखा सागर

गो ना दातार यांच्या कादंबर्‍या आता वरदा बुक्स पुणे यांनी नुकत्याच पुन्हा प्रकाशित केल्या आहेत प्रकाश घाटपांडे

नाथमाधव ऊर्फ द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार (जन्म - ?? १८८२ मृत्यू - २१ जून १९२८) काही प्रकाशित साहित्य- वीरधवल विमलेची ग्रहदशा : सामाजिक कादंबरी गजेंद्रसिंग नाटक स्वराज्यावरील संकट : इ. स. 1680 पासून इ. सं. 1689 पर्यंत स्वराज्याची स्थापना : ख्रिस्ताब्द 1662 पासून ख्रिस्ताब्द 1674 स्वराज्याचें परिवर्तन : इ॰ स॰ 1689 पासून इ॰ स॰ 1700 स्वराज्याचा कारभार : इ॰ स॰ 1674 पासून इ॰ स॰ 1680 स्वराज्याची स्थापना : ऐतिहासिक कादंबरी : इ॰ सन 1662 पासून इ॰ सन 1674 श्रीशिवाजी महाराजांचें आरमार, अथवा सांवळ्या तांडेल : ऐतिहासिक सचित्र कादंबरी श्रीनिवास राव (पहिली मराठी वै़ज्ञानिक कादंबरी ?) आंतरजाल आणि विकीवरून साभार!

In reply to by विसुनाना

नाना, विसुनाना, श्री.सागर व श्री.घाटपांडे, आपण दिलेल्या माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मला वाचनाची खूप आवड आहे व त्याबद्दल मला अधिक माहिती मिळाल्याने ही पुस्तके मिळाल्यास मी ती आवर्जून वाचेन

In reply to by विसुनाना

विसुनाना, माहितीत थोडीशी भर घालू इच्छितो नाथमाधवांची ही २ पुस्तकेही बरीच प्रसिद्ध होती - सोनेरी टोळी - सावळ्या तांडेल

In reply to by सागर

त्यांच्या वर उल्लेख केलेल्या ऐतिहासिक कादंबर्‍या चौथीच्या सुट्टीत वाचल्या... अत्यंत ठराविक पॅटर्न असे गोष्टीचा...( बॅकड्रॉप सगळा स्वराज्यातल्या घडामोडींचा आणि मुख्य नायक सैन्यात शिलेदार / मावळा / गुप्तहेर वगैरे आणि त्याचा लव्ह इन्ट्रेष्ट ...).. एकूण सगळं सेम वाटलं तरीही इन्ट्रेष्टिंग नक्कीच.... वाचनालयात मी आणि माझा मोठा भाऊ जाऊन पुस्तक आणत असू आणि दोघे एकत्र वाचत असू.. माझे भरभर वाचून सम्पत असे आणि मी भावाला लवकर पान उलटण्यासाठी घाई करत असे..... काही काळाने भावाला माझी ट्रिक कळाली की मी ते जुन्या पद्धतीने निसर्गवर्णने लिहिलेले टिपिकल लांबचलांब परिच्छेद सोडून देत असे...किंवा उड्या मारत मारत वाचत असे.( सूर्य ..ढगाआडून किरण .. झरा.. निष्पर्ण वृक्ष...थंडगार वारा...तापलेली माती वगैरे वगैरे...) तेव्हापासूनच मला फक्त गोष्टीत इन्ट्रेष्ट, बाकी सब सजावट.. शिवाय महत्त्वाच्या क्षणी त्यांचे प्रकरण संपत असे... मग पुन्हा दोन प्रकरणांनंतर सुरुवात अशी... वाचकांना आठवत असेलच की आपला नायक उदाजी / रायाजी यवन घोडेस्वारांनी घेरला गेला होता, पण अशा संकटातही शांत चित्ताने मार्ग काढणार तो उदाजीच... शिवाय वीरधवल एकदम भन्नाट आहे... पण बाकी कोणत्या वाचल्या नाहीयेत... नाथमाधव .. या धाग्यामुळे खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मज्जा आली... धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

लै भारी प्रतिसाद मास्तरांचा. उड्या मारत मारत वाचत असे.( सूर्य ..ढगाआडून किरण .. झरा.. निष्पर्ण वृक्ष...थंडगार वारा...तापलेली माती वगैरे वगैरे...) तेव्हापासूनच मला फक्त गोष्टीत इन्ट्रेष्ट, बाकी सब सजावट.. हा हा !!! हे बेष्ट्च. शिवाय महत्त्वाच्या क्षणी त्यांचे प्रकरण संपत असे... हे बरीक खरं. प्याटर्न माहीत झाला होता. :) ....बबलु

मर्मभेद अद्भुतरम्य, वीररसपूर्ण फार वाचनीय पुस्तक आहे (अ‍ॅज फार अ‍ॅज आय रिमेंबर) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

खरे आहे मर्मभेद अगदी खिळवून ठेवते शशी भागवतांच्या रुपाने मराठी साहित्याला पुन्हा एकदा गो.ना.दातार यांचा प्राचीन टच असणार्‍या कादंबर्‍यांचा वारसा चालवणारा लेखक मिळाला :)

In reply to by पांथस्थ

पांथस्थबुवा आपल्या स्वदेशातील प्रत्येक कलाकृती विदेशातील हिट झालेल्या कलाकृतीशी केलीच पाहिजे का? साम्य असेन तर एक वेळ ते ही मान्य. पण लॉर्ड ऑफ द रिंग चे कथानक ( हे ही माझ्या भन्नाट आवडीचे आहे ) आणि वीरधवल पूर्णपणे भिन्न आहेत. वीरधवलचा बाज अस्सल आपल्या मातीतला तर आहेच पण कथानकही लॉर्ड ऑफ द रिंगच्या तुलनेत कोठेही मिळत नाही. लॉर्ड ऑफ द रिंग मधे सैतानी ताकदींचा खेळ जास्त आहे तर वीरधवल मधे जे गूढ आत्म्यांचे दर्शन आहे ते केवळ चांगल्या गोष्टींसाठी आहे. दोन्ही कलाकृती आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत यात वाद नाही पण त्यात तुलना नको एवढेच मला वाटते. :)

In reply to by सागर

आपली तळमळ समजु शकते. :D पण हि तुलना नाहिये मालक. ज्यांना वीरधवल माहित नाही अश्या लोकांना झटकन समजता यावे याकरीता हा (व्यर्थ) खटाटोप. - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

In reply to by पांथस्थ

मग हरकत नाही पांथस्थबुवा आणि सहमत ही आहे. वीरधवलचा महिमा सांगण्यासाठी सगळ्या गोष्टींना पाठिंबा :) बाकी गो.ना.दातारांच्या कादंबर्‍या पण भन्नाट आहेत. ( मला इंद्रभुवनगुहा आणि शालिवाहन=शक फार आवडली) शशी भागवतांची मर्मभेदची भट्टी पण वीरधवलसारखी तगडी झाली आहे वाचल्या नसतील तर अवश्य वाचा

माझ्या कादंबरी वाचनाची सुरुवात या पुस्तकापासुन झाली. विरधवल, शशीधरा? चण्डवर्मा लेखक नाथमाधवच. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

अशोक सराफ यांची भूमिका असलेला चित्रपट 'ठकास महाठक' बहुधा नाथमाधवांच्या 'राय क्लब उर्फ सोनेरी टोळी' या पुस्तकावर बेतलेला आहे. चित्रपटाला संवादलेखन - द. मा. मिरासदार यांचे आहे चित्रपट धमाल आहे. पण कादंबरी अगदी अफलातून आहे.

माझ्या मते वरच्या एका प्रतिसादात वीरधवल म्हणजे लॉर्ड ऑफ ... असे वाचले होते ही दोन कांदबरी मधील तुलना नसून नवीन पिढीला वीरधवल ही भव्यता व त्या काळात जनमानसात त्याची असलेली लोकप्रियता सांगण्यासाठी हेरी पोर्टर किंवा हंगर गेम च्या तोडीस तोड कांदबरी आहे , दातार ह्यांच्या सर्व कादंबर्या मी गेल्या भारतभेटीत विकत घेतल्या , त्या नव्याने प्रकाशित झाल्या असून अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत. निव्वळ अप्रतिम त्यांच्या प्रस्तावना लिहितांना त्यांच्या नातीने पूर्वी १९४० च्या सुमारास पूर्वी बायका ही पुस्तके सकाळी ४ ला उठून थोडावेळ वाचून पुढे घरकाम करत . पुस्तकांची आदलाबदल करत असतांना कथानकाच्या वर चर्चा करत असत , त्या काळात अशी कल्पनारम्य कादंबर्‍या गृहिणींना चोरून वाचाव्या लागत एकदा त्यांची कादंबरी वाचतांना चुलीवरील भाकरी करपले म्हणून गृहिणीच्या सासूने पुस्तक चुलीत फेकून दिल्याचे प्रस्तावानेत वाचले आहे. आजही वीरधवल व दातारांच्या पुस्तकंची भाषा मराठी जुनाट पद्धतीची असली तरी कथा मांडणी तिचा विस्तार , पात्र परिचय , कथाकानाची वळणे रहस्य वेगवेगळे प्लॉट अनेक रहस्य व ट्विस्ट अशी अफलातून मांडणी केवळ जागतिक दर्जाची आहेत वीरधवल पूर्वी वाचले आहे , त्याला प्रस्तावना पु ल देशपांडे ह्यांची आहे , ती वाचण्यासाठी ते पुस्तक संग्रही ठेवायचे आहे. पी ल काय चीज आहेत हे त्यांच्या कट्टर चाहत्यांना जाणून घ्यायचे असेल तर ती प्रस्तावना जरूर वाचावी

लहानपणी सुट्टीत मामाच्या गावाला सगळी आते, मामे,मावस भावंडे,पाहुणे म्हणून आलेली इतर मुले आणि काम आटपून किंवा कामे करीत असलेली मोठी माणसे,त्यात गडीमाणसेही असत. रात्री पुढच्या अंगणात बसायची. आणि आई या पुस्तकांचे सार्वजनिक वाचन करीत असे.त्यात ‘वीरधवल’ आणि नाथमाधवांची इतर सर्व’;गो.ना. दातारांची सर्व;ग.ल.ठोकळांचे ‘गावगुंड’;वि.वा.ह्डपांची सारी पुस्तके वाचल्याचे स्मरते.तो एक मोठा इव्हेन्टच असायचा. आदल्या दिवशी कुठपर्यंत वाचलंय,ते सगळ्यांना समजलंय याची खात्री काही प्रश्न विचारून केली जात असे.आणि मगच पुढच्या भागाला सुरुवात होई.एखद्या दिवशी कथानक उत्कंठापूर्ण जागेवर आल्यावर थांबले असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आजी मुली,सुनांना कामे लवकर आटपण्याची तंबी देई.आणि वाचन लवकर चालू होई. हे वाचन चालले असताना झाप वळणे,दोऱ्या वळणे,वळलेल्या दोऱ्यांपासून शिंकी,गुरांची दावी बनविणे,किंवा भाजी निवडणे ही कामे चालत.आताही माझ्या कानात तो आईचा योग्य त्या ठिकाणी चढउतार करीत वाचणारा आवाज घुमतो आहे आणि ते दृश्य नजरेसमोर आले आहे..सगळे मन लावून ऐकत असत. त्यानंतर शाळेच्या वाचनालायातही ही पुस्तके पुन्हा भेटली नि त्याची किती पारायणे झाली याची गणतीच नाही.आता पुन्हा यातल्या काही पुस्तकांचे नव्याने प्रकाशन झाल्यामुळे पुन्हा वाचायला मिळाली.परंतु गावगुंड काही मिळाले नाही.खूप इच्छा आहे ते वाचायची.स्मुतीरंजनात रंगल्याचा आनंद दिल्याबद्दल आभारी आहे.

नाथमाधव यांची 'तरूण रजपूत सरदार ' , 'सोनेरी टोळी' हि पुस्तकेही वाचनीय आहेत. 'वीरधवल'च्याच धर्तीवर लिहिलेले 'चंडांशू आणि सुवर्ण गरूड' हे पुस्तकही वाचनीय आहे . त्याचे लेखक कोण ते माहीत नाही .

In reply to by सिरुसेरि

खालील सायटी वर त्याचे लेखक जोशी हेमंत असे दिसते आहे. http://erasik.com/books/bypub/Suparn%20Prakashan/page1/ या सायटीवर विकतही मिळते असे दिसते.

धन्यवाद ! हि लिंक खुप उपयुक्त आहे . मध्यंतरी मिपावरीलच एका सदस्याने लिहिलेला 'भा. रा. भागवत' यांच्यावरील लेख खुप छान होता .