मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमच्या विवाहाची कहाणी - ४

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588 आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631 आमच्या विवाहाची कहाणी - ३- http://www.misalpav.com/node/30795 गुरुवारी हा निर्णय आला होता कि मुलीला पण मुलगा पसंत आहे. म्हणजे आता लग्न ठरले होतेच. रविवारी काय होते याची मला फारशी चिंता नव्हती. शुक्रवार आणि शनिवार आपण तिला फोन करावा कि न करावा या बद्दल मी विचार करत होतो. तिला मला फोन करणे शक्य नव्हते कारण माझ्या खोलीत फोन नव्हता. आणि क्ष किरण विभागाचा फोन तिच्या कडे दिलेला नव्हता. मग मी रविवार संध्याकाळ पर्यंत थांबण्याचे ठरवले. उगाच उतावळा नवरा आणि …। व्हायला नको. रविवारी आई, वडील, भाऊ आणि वहिनी दुपारी जेवायला त्यांच्याकडे पनवेलला गेले. संध्याकाळी फोन केला तेन्व्हा आईकडून साग्रसंगीत हकीकत कळली. तिकडे गेल्यावर भावी सासुबाइंकडून मुलाच्या घटस्फोटाची हकीकत कळली मुलीला तिच्या भावाने रिलायंस पाताळगंगा येथे असलेली नोकरी सोडून पुण्याला स्थायिक व्हावे असे वाटत होते. तेथे नोकरी मिळाली नाही तर काहीतरी धंदा कर पण पुण्यालाच ये. अशा तर्हेच्या दुराग्रही स्वभावामुळे त्यांचे वितुष्ट आले होते. आई वडिलांनी तुमच्या मुलाच्या घटस्फोटाचा मुलीच्या पसंतीशी काहीही संबंध नाही हे सांगितल्यावर सासूबाईंचा बांध फुटला आणि त्यांना रडू कोसळले. त्यांना एक असा अतिशय वाईट अनुभव आला होता. त्यांच्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम पुण्याच्या एका प्रथित यश कुटुंबात झाला होता. मुलाचे आई वडील पुण्यात यशस्वी उद्योगपती होते. पुण्यात त्यांचा बंगला होता. मुलगा इंजिनियर होऊन अमेरिकेत ग्रीन कार्डहोल्डर होता तीन बैठका झाल्या होत्या. मुलाच्या आणि मुलीच्या वेगळ्या तीन भेटी झाल्या होत्या. बंगल्याच्या गच्चीवर मुलाने मुलीबरोबर आपल्या भावी संसाराबद्दल बरीच चर्चा सुध्धा केली होती. यानंतर एक दिवस मुलाच्या आत्याच्या सांगण्यावरून त्यांनी हे लग्न मोडले होते. का तर सासू आणि सुनेचे पटत नाही मग अशा आईची मुलगी कशाला करून घेतोस? (अशा छप्पन्न मुली मी तुझ्यापुढे आणून उभ्या करते) यामुळे मुलीच्या मनावर ओरखडे उठले होते. अशा मुळे तिचे आई वडील फार तणावाखाली होते. आई वडिलांनी ते सर्व ऐकून घेतले. त्यांना सांगितले कि आम्हाला यामुळे काहीच फरक पडत नाही.मुलीच्या भावाच्या घटस्फोटात मुलीचा दोष काय आहे ? असो. हि सर्व कहाणी सांगितल्यावर शेवटी आईने सांगितले कि तू तिथे एकदा फोन कर आणि मुलीला तुझ्या तोंडून निर्णय सांग. है शाबास. म्हणजे मी ज्याची वाट पाहत होतो कि फोन करू कि नको त्याऐवजी एकदम लायसन्स च मिळाले. मग काय हा फोन ठेवला आणि तो फोन केला. पहिल्यांदा काय बोलावे हा विचार आता मागे पडला. पहिल्यांदा इकड तिकडचे बोलणे झाले. आणि मी माझा निर्णय तिला सांगितला. आणि आमच्या संवादाला सुरुवात झाली. एक दिवसाआड मी रात्री दहा वाजतो फोन करत असे. यानंतर आम्ही काय बोलायचो हे फारसे महत्त्वाचे नाही. ( ते तसे नसतेच) पण समोर एस टी डी च्या बूथ वर दर ३६ सेकंदानी मीटर पुढे सरकत असलेला दिसे. मी अर्धा तास बोलत असे. अर्ध्या तासाचे ५० रुपये होत. ( तेंव्हा माझा पगार ६४००/- रुपये होता). यानंतर पुढच्या बोलण्याची बैठक आमच्या घरी झाली. बैठकीनंतर माझ्या मामेभावाचा( हा माझ्या वर्गातच होता) साखरपुडा पार्ल्याला होता. तेथे सायंकाळी ६ वाजता जायचे होते. मी स्कुटरने येणार हे जाहीर केले. वडिलांनी आपण सगळे ट्याक्सीने जाऊ इ इ सुचवत होते पण मी स्कुटरनेच येणार म्हणून आग्रह धरला. शेवटी आई बडील सगळे ट्याक्सीने गेले. आणि मी आणि आमची चि. सौ.कां. कायनेटिक होंडाने गेलो. तिला असा घरात प्रत्येकाने स्वतंत्र विचार करण्याची सवय नव्हती. तिने विचारले कि आपण ट्याक्सीने का गेलो नाही. मी डोळा मिचकावून विचारले कि मग तुला माझ्या जवळ बसायचा चान्स कसा मिळाला असता?. त्यावर ती झक्क लाजली. मुलुंडहून पार्ल्याला जाताना मध्ये साकी नाक्याच्या आसपास स्कूटर पंक्चर झाली. जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन स्टेपनीचा टायर टाकून घेतला. ( इतर वेळेस मी स्वतः ते केले असते पण साडी नेसून बायको जवळ असताना आणि साखरपुड्याला जायचे असताना हात कशाला काळे करा? ) हे होईस्तोवर मध्येच पाऊस आला. त्यासाठी आम्ही थांबलो. आणि पार्ल्याला पोहोचेपर्यंत आई वडील पोहोचलेलेच होते. सगळ्यांनी उशीर का झाला? असे विचारले तेंव्हा मी खरी असलेली कारणे सांगितली ती कुणीच ऐकून घेतली नाही. सगळे हेच म्हणत होते कि याना फिरायला चान्स मिळाला आहे मग उगाच इतरांची अडचण कशाला? शेवटी मी कारणे देणे सोडून दिले. नातेवाईकांची तिची ओळख करून दिली. खेळीमेळीत दिवस गेला. शेवटी तिला दादर पनवेलच्या बस मध्ये बसवून दिले. साडी नेसण्याच्या गडबडीत तिने तिच्या बाबांकडून पैसे घेतलेच नव्हते. पर्स मध्ये जेमतेम ३०-४० रुपये होते. मी तिला शंभरच्या दोन नोटा काढून दिल्या. पावसापाण्याचे दिवस आहेत, जवळ असावेत म्हणून. ती पण अशी वेडी कि लग्न होईपर्यंत मी दिलेल्या नोटा म्हणून तिने पर्स मध्ये जपून ठेवल्या होत्या कुठेही खर्च केल्या नव्हत्या. यानंतर साखरपुडा ठरला १६ ऑगस्टला रविवारच होता. पनवेलला सकाळी आमचे अगदी जवळचे असे नातेवाईक मिळून ४० -५० माणसे होती. आता लग्नाची तारीख ठरवण्याची आणि पुढच्या तयारीची बैठक झाली. लग्नात मोठ्या जेवणावळी घालून पैशाचा अपव्यय करावा हे मला न पटणारे होते. सुदैवाने मला हि आणि तिलाही मोठा भाऊ आहे आणि त्यांच्या दोघांच्या लग्नात घरच्या मंडळींची हौस फिटली असल्याने थोडक्यात विवाह करावा या माझ्या मताला विरोध असा फारसा झालाच नाही. त्यामुळे मी आमच्या कुल्गुरुना विचारलेले होते कि गोरज मुहूर्तावर लग्न करायला काही शास्त्रात आडकाठी आहे का? त्यांनी असे काही धर्म शास्त्रात नाही. असे सांगितले. मुंबईत लग्नाच्या चार अक्षता टाकून पहिल्या पंगतीला जेवून पळणे या प्रकाराबद्दल मला तिडीक आहे.त्यामुळे लग्न हे संध्याकाळी करायाचे आणि त्यानंतर स्वेच्छा भोजन( बुफे) असेच असावे याबद्दल मी आग्रही होतो. त्यावर गुरुजी ना हेही विचारले कि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लग्न होण्यासाठी कोणते विधी आवश्यक आहेत/ त्यावर ते म्हणाले कन्यादान, सप्तपदी आणि ( बहुतेक लाजाहोम) हे तीनच विधी आवश्यक आहेत बाकी सर्व फापट पसारा आहे असे सांगितले. त्यामुळे आमचे लग्न हे फक्त त्या तीन आवश्यक विधीनुसार संपन्न झाला. ७ ऑक्टोबर १९९२ बुधवार रोजी आमचे लग्न झाले.एम डी करत असल्याने मला फक्त चार दिवस (बुधवार ते शनिवार) रजा होती. ७ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता आम्ही सर्व मुलुंड च्या महाराष्ट्र सेवा संघाच्या कार्यालयात गेलो घरची अगदी जवळची नातेवाईक मंडळी ५०-६० लोक फक्त. अडीच ते सव्वा चार असे विधी होऊन चार बावीस च्या मुहूर्तावर आमचे लग्न लागले. चहा पाणी होऊन पाच वाजता आमची सौ. ब्युटी पार्लर मध्ये गेली. पावणे सहा वाजता परत हॉलवर आली. सहा ते नऊ असा स्वागत समारंभ साधारण तीनशे माणसे आली. देणे घेणे, आहेर, पुष्प गुच्छ काहीही नाही. खेळीमेळीच्या वातावरणात लग्न पार पडले. यानंतर आम्हीच आमच्या सासरच्या माणसांची "पाठवणी" केली. माझा मेहुणा बहिणीची पाठवणी करताना खूप रडला. एक तर आपल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे बहिणीचे लग्न जुळत नाही याचा खूप ताण त्याच्या मनावर होता तो उतरला आणि आता बहिण दुसर्या घरी गेली याचे दुःख होतेच. शेवटी रात्री दहा वाजता आम्ही रिक्षात बसून घरी परत आलो. लग्न घरी आम्ही दोघे, भाऊ वहिनी आणि आईवडील असे सहा जण फक्त होतो. परत येताना हातात फक्त बायकोची एक कपड्यांची बैग होती. भाऊ आणि वहिनीने त्यांची बेडरूम आम्हाला सजवून दिली होती. दुसर्या दिवशी सकाळी १० च्या विमानाने आम्ही मधुचंद्रासाठी कुणूर (उटी) ला रवाना झालो. तीन दिवस तेथे राहून चौथ्या दिवशी रविवारी दुपारी विमानाने मुंबईत आलो. रविवारी रात्री २१. ०० च्या मद्रास एक्स्प्रेसने आम्ही दोघे तिची एक आणि माझी एक अशा ब्यागा घेऊन पुण्यास रवाना झालो. पुणे स्टेशन वर माझे जवळ जवळ २५ मित्र त्यांच्या दुचाक्या घेऊन अनपेक्षितपणे आमच्या स्वागतासाठी रात्री साडे बारा वाजता हजर झालेले होते. त्यांनी आमचे सामान आपल्या ताब्यात घेतले आम्हाला एक मोटार सायकल दिली आणि सर्वजण ए एफ एम सी च्या मेस वर आलो.या अशा स्वागतामुळे सौ. भारावून गेली.कारण लष्करातील माणसाशी लग्न झाले आहे पुढे काय असेल याची कोणतीच कल्पना नव्हती. अर्थात ती स्वतः डॉक्टर असल्याने मित्रांबरोबर गप्पा मारताना मोकळेपणा होताच. तेथे एका मित्राच्या खोलीवर याच्या त्याच्या कडून कपबशा, 'मग' उधार आणून कॉफी पानाचा कार्यक्रम झाला. आणि आम्ही आमच्या एका खोलीच्या घरामध्ये परत आलो. दोन ब्यागा घेऊन संसाराला सुरुवात झाली. ब्रम्ह्चार्याच्या मठीत जे असावे ते सामान माझ्याकडे होते म्हणजे एक टी व्ही., एक म्युझिक सिस्टीम, स्कूटर, ढीगभर पुस्तकं आणि चहा करता येण्यापुरती भांडी आणि दोन कपबशा . एक सरकारी कपाट, एक बेड अन एक टेबल खोलीत होते. पुढच्या पाच दिवसांनी आम्हाला २ बेडरूमचे सरकारी घर मिळाले. मग पुढचे दोन महिने रोज स्कूटरने तुळशी बागेची चक्कर करून संसाराची भांडी कुंडी जमविली. फ्रीज घेतला. अशी आमच्या विवाहाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

वाचने 22967 वाचनखूण प्रतिक्रिया 59

टवाळ कार्टा 09/04/2015 - 21:31
ईतक्यातच संपवला पिच्चर :( मला वाटलेले....इतक्या दिवसांनी लेख आलाय तर मस्त लां .....बलचक असेल बरीच काटछाट झालेली वाटतेय ;)

रामपुरी 09/04/2015 - 21:34
अशा सरळ साध्या 'आपल्या' वाटतील अश्या गोष्टी हल्ली फार वाचायला मिळत नाहीत.

In reply to by रामपुरी

नंदन 09/04/2015 - 23:41
असेच म्हणतो. कहाणीचे चारही भाग आवडले.

In reply to by पिवळा डांबिस

नाखु 10/04/2015 - 08:32
मिपकरांशी सहमत. साधी सोपी सरळ (अगदी "शन्ना कथा" वाचतोय असे उगा ओढून ताणून चढ्-उतार नाहीत याचा जास्त आनंद !!)

श्रीरंग_जोशी 10/04/2015 - 00:37
अनुभवकथन मनापासून आवडले. आटोपशीर विवाहसोहळ्याची पद्धत अनुकरणीय आहे.

अभिजीत अवलिया 10/04/2015 - 02:15
मस्त !!! तुमचे लग्न साध्या पद्धतीने झाले हे ऐकून बरे वाटले. बर्‍याच वेळा साधेपणात गोडी असते.

उगा काहितरीच 10/04/2015 - 10:10
छान लेख! लग्न कसे करावे याबद्दल तुमच्या विचारांशी सहमत . पाहु अस्मादिकांचे काय होते ते ;-)

आजानुकर्ण 10/04/2015 - 16:23
छान

In reply to by आजानुकर्ण

सूड 10/04/2015 - 16:59
+१

नगरीनिरंजन 10/04/2015 - 18:25
गोष्ट आवडली. पण विवाहाची गोष्ट म्हणायचं आणि लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंतच्या गुलाबी दिवसांचं वर्णन चटावरच्या श्राद्धासारखं उरकायचं याला काही अर्थ नाही बघा.

In reply to by सुबोध खरे

रुस्तम 10/04/2015 - 21:51
:D

जुइ 10/04/2015 - 18:26
खुप साधी आणि सुटसुटीत विवाहाची कहाणी ऐकायला मिळाली!!

जगप्रवासी 10/04/2015 - 18:38
तुमच लिखाण साध सरळ असत, एकदम मनाचं ठाव घेणारं, खूप आवडल

अर्धवटराव 10/04/2015 - 20:53
ऋषीकेश मुखर्जीचे जुने अमोल पालेकर चित्रपट आणि हम आपके है कौन चा सुरेख मिलाफ झाल्यासारखी वाटली हि सत्यकथा. एक नंबर डॉक्टरसाहेब.

In reply to by टवाळ कार्टा

अत्रुप्त आत्मा 11/04/2015 - 23:44
अविची इच्छा प्रीती रस्त्यात भेटूदे??? >> थांब हो कार्ट्या! तुला ना आता... फट्कूटवाळ-बॅटुकातृप्त http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/spank.gif

In reply to by सूड

बॅटमॅन 13/04/2015 - 16:09
येप्स यू आर रैट्ट. प्रीति मधील ति ही संस्कृतात ह्रस्व*** असते, मराठीत दीर्घ असते. ***मराठी उच्चाराप्रमाणे पाहता र्‍हस्व, (र ला ह जोडलेला) तर संस्कृतप्रमाणे पाहता ह्रस्व. (बरोब्बर उलटा क्रम)

असंका 11/04/2015 - 09:11
एकदम प्रसन्न केलंत वातावरण!! अगदी शं ना नवरेंची आठवण झाली!(आधी पण कुणीतरी हेच म्हणलं होतं....१००% सहमत) सुंदर!! धन्यवाद!!

पैसा 12/04/2015 - 11:50
साधी सरळ कहाणी! आवडली!!!

चिनार 13/04/2015 - 11:10
छान लिहिलंय ! लग्न ठरल्यावर पहिल्यांदा फिरायला निघालेल्या प्रत्येक जोडप्याच्या गाडीचे चाक कसं काय पंक्चर होतं हे एक न उलगडलेलं कोडं आहे राव ! मलाही हाच अनुभव आलेला आहे

In reply to by चिनार

सुबोध खरे 01/08/2015 - 13:38
चिनार साहेब, स्कूटर खरंच पंक्चर झाली होती. आमच्या घरी कोणत्याही गोष्टींची कारणे दाखवा असे कधीच नव्हते किंवा कोलेजात असताना पैसे खर्च कसे केले याचाही हिशेब वडील विचारत नसत. त्यामुळे खोटे बोलायची मला किंवा माझ्या भावाला कधी गरज पडलीच नव्हती. आजही माझे आयुष्य साधे सरळच आहे. पुढच्या बैठकीला आम्ही उशिरा गेलो तेंव्हा मी सरळ सांगितले कि आम्ही कोल्ड ड्रिंक घ्यायला हॉटेलात थांबलो होतो. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतले.पारदर्शकता हा आमच्या घरातील एक गुण आजही आहे. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या स्पष्टपणे सांगितल्या जातात. पण निर्णय लादला जात नाही.

In reply to by चिनार

राही 01/08/2015 - 15:15
कारण तोपर्यन्त स्कूटरला अशी अति मह्त्त्वाची दमदार व्यक्ती मागच्या सीटवर बसवून घ्यायची सवय नसते. उत्सुकतेच्या आणि काळजीच्या भारामुळे चाक पंक्चर होते. लेख बाकी छान. सरळ, सहज, सोपा, सुबोध.
सहसा लेखनाच्या दोन शैली असतात- १. स्वतःस पोलिटिकली करेक्ट प्रोजेक्ट करणे. २. स्वतःचे आहोत तसे प्रकटीकरण करणे. पैकी ही लेखमाला कुठेही शैली १ ची वाटली नाही. ------------------------------------------------------------------ आपण ज्या प्रकारे इथे प्रसंगांचं डीटेलींग केलं आहे आणि कितीतरी सब्जेक्टीव मतं मांडली आहेत ते पाहता ते करताना काही वाचकांच्या वाचाळ प्रतिक्रियांना सामोरे जावे लागेल याची कल्पना आपणांस अगोदरपासूनच असावी. तेव्हा आपले मनोगत आमच्यासमोर मांडत असताना आपण जो मोकळेपणा आणि आत्मियता दाखवली आहे तीच आपण प्रत्यक्ष आयुष्यातल्या लोकांसही (यात वहिनी देखिल आल्या) दाखवत असाल असा विचार सुखावून गेला.

स्वीत स्वाति 16/04/2015 - 12:28
चार हि भाग छान...

सरल मान 12/04/2018 - 17:22
चारही भाग एका दमात वाचून झाले. लग्न करताना इतक्या सार्‍या गोष्टींचा विचार केलात हे खूप आवडलं. तुमचे कामाविषयी लेख नेहमीच वाचण्यात येतात आणि आवडतात सुध्दा पण ही मालिका म्हणजे तूमच्या स्वभावाचा आरसा वाटला......