मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक अपघात........ न केलेला.

नूतन सावंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोल्हापूर,गणपतीपुळे, मालगुंड पिकनिक करून काल म्हणजे १५ जून २०१५ ला पहाटे ४-३० ४-४५ च्या पंधराजण गणपतीपपुळ्याहून निघालो.त्यात पुरुष दोघेच त्यातले एक श्री दाभोलकर हे दोन महिन्यापूर्वी बायपास झालेलेआणि दुसरा माझा नवरा. बाकी सगळ्या वय वर्ष तीन ते अठ्ठ्याहत्तर मध्यल्या स्त्रिया. माझी नणंद सौ. सीमा इंदुलकर हिच्या मैत्रीणी आणि त्यांचे नातेवाईक अशी ही सारी मंडळी.सीमा ठाण्याच्या सिटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चीफ फार्मासिस्ट म्हणून काम करते .तिच्या मैत्रीणीही आरोग्य सेवेशी संबंधित क्षेत्राताल्याच.आम्ही दोधेही त्यांच्याबरोबर बऱ्याच पिकनिक केलेले.त्यांचेही दादा वहिनी. येताना आम्ही मीरा रोडहून तर बाकी सगळ्या, कुणी अंबरनाथ कुणी बदलापूर तर कुणी शहापूरहून ठाण्याला एकत्र आल्या होत्या.तीन चार ठिकाणीची खरेदी करून आता प्रत्येकीचे एखाद् दोन बोजे वाढलेले होते.आता प्रत्येकीला घराच्या आसपास सोडत कर्जत मार्गे ठाणा आणि नंतर मिरारोड असे यायचे ठरले.यासाठी सकाळी लवकर नुसते तोंड धुवून निघयचे ठरले.त्याप्रमाणे निघालोही. आणि पालीमार्गे एक्स्प्रेस वेवर यायचे ठरवून मुंबई-गोवा महामार्गावरून पालीचे वळण घेतले. वाकण नावाच्या गावाजवळच्या ब्रिजवर आलो आणि पुढे दहा ते पंधरा फुटावर एक सायकलस्वर डाव्या बाजूने चालला होता,त्याला काय झाले ते समजलेच नाही तो अचानक रस्त्याच्या मध्ये येऊन कोसळला.आमच्या चालकाने तातडीने ब्रेक मारून गाडी थांबवली.आमच्याशिवाय दुसरे कोणीही तेव्हा तिथे नव्हते. आम्ही दोघे नवरा बायको बाकी कुणीही खाली उतरू नका असे सांगून खाली उतरून पहिले तर त्याच्या डोक्याला जखम झालेली,डोळे उघडे,जीभ दातातून बाहेर आलेली,त्यामुळे तोंडातून रक्तस्राव होत असलेला. रस्त्यात आडवी झालेली सायकल एव्हाना आमच्या गाडीचा जवळ आलेली पण तिचा गाडीला स्पर्श झाला नव्हता.चालक म्हणू लागला,”इधरके लोग बडे खराब होते है.हम पुलिसको खबर देके निकलते है.सब लेडीज लोग है.” पण आम्ही पडलो जागरूक नागरिक.’आपण ह्याला घेऊन दवाखान्यात पोचू,तिथे पोलिस असतीलच.’असा विचार करून रुग्णवाहिकेसाठी १०८ला फोन लावला तो पुण्याला जाऊ लागला.इतक्यात सीमाने पाली आरोग्यकेंद्रात फोन करून तिथल्या डॉक्टराना फोन लावून अपघाताची कल्पना देऊन तयार राहायला सांगितले.यावेळपर्यंत एकदोन वाहने पसार झाली. कोणी थांबायला तयार नाही. एका गाडीताल्यानी ओरडून आम्हाला सल्ला दिला.’यहा रुको मत.निकाल जाव.’ ’इतक्यात एका स्कुटीवरून दोघे आले त्यांनी अपघात पाहताच ते थांबले.आणि त्यातला एक मोबाईल वर फोटो काढू लागला तर दुसरा अपघातग्रस्त माणसाकडे पाहू लागला.तोपर्यंत फोटो काढणाऱ्याला माझ्या नवऱ्याने त्या माणसाला आरोग्यकेंद्रात नेण्यासाठी आमच्या गाडीत ठेवण्याची विंनंती केली. तो हो म्हणून पुढे आला. इतक्यात अपघातग्रस्त माणसाची ओळख पटल्याने दुसरा तोंडाने अर्वाच्य शिव्या देत,गाडीवर लाथाबुक्क्याने हाणू लागला, चालकाला मारू लागला.फोटो काढणारही आम्हाला मदत करायची सोडून त्याच्या मदतीला धावला. इथे आमच्यातल्या सीमा, सुषमा, शोभा, निमा ,राजश्री अशा चौघी-पाचजणी खाली उतल्या. माझा नवरा त्यांना आवरण्यासाठी,”अरे,अरे ऐका तरी ,आमच्या गाडीने त्यांना अपघात झाला नाही.ते सायकल चालवता चालवता चक्कर येऊन पडले.म्हणून आम्ही मदत करायला थांबलो.’त्यावर ते दोघे माझ्या नवऱ्याच्या अंगावर धावून आले.,”हां,फिट आली सांगतोय भे****.” माझी नणंद सीमा आणि तिची मैत्रीण सुषमा चटकन मध्ये घुसल्या आणि नवऱ्याला बसमध्ये घेऊन गेल्या.इतक्यात काही दुचाकी गाड्या विरुद्ध दिशेने आल्या.इतकी गडबड पाहून त्यांचा वेग मंदावला आणि दुसऱ्याने त्यावर बसलेल्या लोकाना हाक मारून उतरवले. “ए विलास,ए ललित थांब रे..काकाला उडवला यांनी.”ते उतरले आणि चालकावर धावून आले. गाडीवर, गाडीच्या काचांवर हाणूलागले.जमाव वाढू लागला.जो येत होता तो चालक आणि गाडीवर हाथ धुवून घेत होता.परत काही जणींनी मध्ये पडून चालकाला गाडीत नेले”.गाडीची चावी काढून घ्यारे.”कोणीतरी फर्मावले.आता मात्र मी संतापून त्यांना आवाज दिला,”तुम्हाला या माणसाचा जीव वाचवण्यात इंतरेस्ट आहे की नाही?त्या माणसाला उचलून गाडीत ठेवा नाहीतर मीच तुमच्यावर तुम्ही उशीर करता आहात म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेन.”तोपर्यंत त्या जखमी माणसाची बायको तिथे आली होती.ती गहिवर घालून रडू लागली.मी त्या तिलाच सांगितले.हे तुमचे नातेवाईक फक्त मारामारी करताहेत तर त्यांना यांना उचलून गाडीत घालायला सांगा.”तीही यांच्या विनवण्या करू लागली.शेवटी एकदाचे त्या जखमी गृहस्थाना उचलून आमच्या गाडीत घालून पाली आरोग्य केंद्रात घेऊन आलो.पण मोलाचा अर्धातास वाया गेला होता. तिथेही सगळे आमच्यामागोमाग तिथे पोचले.तिथेही जमाव होताच.अगोदर रुग्णवाहिका का नाही आली म्हणून तिथे वाद सुरु करून डॉक्टरला मारहाण करण्यात आली.त्यातही काही वेळ गेला.पण तिथे काही स्वयंघोषित नेते आले त्याच्याशी बोलल्यावर रुग्णावर उपचाराला सुरूवात झाली.सीमा आत जाऊन डॉक्टरांशी बोलली. रुग्णाला प्रथमोपचार करून पुढे अलिबागला पाठवावे लागेल कारण येथे बाकी काही सोयी नाहीत.काहीतरी रस्त्याच्या कामामुळे पाण्याची लाईन फुटल्यामुळे तिथे पाणीही नव्हते.हे कळल्यावर सीमाने अलिबाग सिव्हील सर्जनना फोन करून कल्पना दिली.रुग्णाच्या पत्नीला रक्ताने भरलेले हात धुवायलाही पाणी नव्हते.स्पिरीटच्या बोळ्याने त्यांचे हात स्वच्छ करावे लागले.तिला धीर देउन अलिबागला न्यावे लागेल असे सांगितले एव्हाना तीही जनमावाच्या नावाने बोटे मोडू लागली होती. नवऱ्याने गाडीत बसून काही ओळखीच्या लोकांना फोन केले.लोक बाहेरून त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते.ज्याने जखमीला ओळखून मारहाण सुरु केली होती तो त्यांचा पुतण्या असल्याचे समजले तो तिथेही लोकभावना भडकावत होता. त्याचे नाव होते राहुल ठोंबरे.”तो ढापणी आहे न,तो आय*** सांगतोय की फिट आली म्हणून त्याला काढा बाहेर.”त्यातले दहापैकी पाच लोकांच्या तोंडाला दारूचचा वास येत होता.माझ्या पोटात गोळाच आला होता.पण माझ्या आजीची शिकवण आहे की,पोटात कितीही भीती असली तरी ती तोंडावर दिसत कामा नये,तुम्ही घाबरला आहात हे समोरच्याला समजत नाही तोपर्यंत तोही टरकून असतो.मी पुन्हा राहुलला सांगितलं,”ए भ**.तू माझ्या नवऱ्याला जी शिवी दिली त्याचा अर्थ कळतो का तुला? तू तुझ्या आईची इज्जत काढतोयसआणि मग माझा नवरा तुझा बाप लागतो.तो काय भित्रा आहे म्हणून आत बसला नाहीये. तू जर आता गडबड केलीस तर मी तुला खुनाचा प्रयत्न केला म्हणून पकडून देईन.आणि तुझी पण मेडिकल करायला लावते बघ आता. तो ललित ,विलास आणि तू तुम्हा तिघांचीही मी नावानिशी तक्रार करते आता.” तसे काही लोक मागे सरकले. माझी नणंद आत अडकली होती.नवऱ्याला लोक गाडीबाहेर ओढू पाहत होते.त्याचा जीव ते मला किंवा सीमाला काहीतरी करतील म्हणून तळमळत होता.पण मी त्याला शपथ घातली.”तू काही झालं ना तरी खाली उतरू नकोस.या सगळ्या मुलींची जबाबदारी तुझ्यावर आहे.माझं मरण इथेच असाल तर ते इथे येईल. पण मला मी बाईमाणूस आहे म्हणून तरी ते हात लावणार नाहीत.” माझ्या नवऱ्याचे सहकारी असलेल्या एका अधिकाऱ्यांनी यांनी पाली पोलिस स्टेशनला फोन करून जमाव हिंसक झाल्याची खबर दिल्यावर पोलिस अपघातस्थळी रवाना झाले होते पण आम्ही तिथे नव्हतोच.आम्ही इथे अडकलो होतो.मी सगळ्यांना गाडी लॉक करून आत बसा. मी सीमाला घेऊन येते.” त्या मॅडम कुठे आहेत.?अलिबाग सिव्हील सर्जनना फोन करताहेत त्या ,”असे मोठ्याने बोलत मी आत शिरले.लोकही बाजूला सरकत होते.सीमाला अगदी आतल्या खोलीत ठेवल्याचे सांगितले.मी तिथे जाऊन तिला हाक मारली.तशी तीही दार उघडून बाहेर आली.तिचा हात धरून मी मी पुन्हा बसमध्ये येऊन बसले. आता मात्र आम्हाला कोणीही अडवले नवहते . बसमध्ये बघते तरचालकाला जास्त मारहाण झाल्याचे कळले.कोणीतरी त्याला पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे असं सांगितल्याने तो तिथे जात असता पुन्हा बाईक तिघांनी वरून जाऊन त्याला मजबूत मारला होता.त्याच्या डोक्यात काठी घातली होती.पण आता आम्ही सर्व एकत्र होतो.नवऱ्याचा एक बालमित्र मुंबई पोलिसात आहे.त्यानेही पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता.अदिती दामोदर या सीमाच्या मैत्रीणीच्या राजश्रीच्या मुलीचे सासर पाली हेच असल्याने तिनेही त्याच्याशी संपर्क साधला होता.तिथूनही काही ओळखीच्या लोकांशी संपर्क साधण्यात आला होता. नंतर एका उंचीपुरी व्यक्ती बस मध्ये शिरली.”तुम्ही काय कारताय?पोलीसठाण्यात येणार का?”आम्ही सगळ्यानी एका सुरात होकार दिला”.ठीक आहे तिथे यायला तयार आहात तर मी तुमची जबाबदारी घेतो घेतो.”असे आम्हाला सांगून ते खाली उतरले.आम्हाला आधी ते त्यांच्यापैकीच वाटले पण ते होते पाली पोलीसठाण्याचे हेड कॉन्स्टेबल.एका बाईकवाल्याला आम्हाला रस्ता दाखवायला सांगून ते निघून गेले. सगळा जमाव आमच्या मागोमाग पोलीस ठाण्यात घुसला.नवरा आणि मी चालकाला घेऊन आत शिरलो.एक लेडी पी. एस. आय. आणि एक लेडी कॉन्स्टेबल यांनी खास पोलिसी आवाजात त्यांनी सांगितले की, ‘साहेब,तुम्ही बसा. मॅडम तुम्हीपण बसा.बाकीच्यांनी बाहेर व्हा,ज्यांनी अपघात पाहिलाय त्यांनीही बाहेर थांबा.पंचनाम्यावर सही करणार असतील त्यांनीच थांबा. फक्त फिर्यादी आत येतील.’एक एक करून सगळे गायब.चालकाला ए तू तिकडे बस.असे सांगितले. फिर्यादीने आमच्या गाडीनेच अपघातग्रस्त माणसाला उडवल्याची फिर्याद दिली.माझे व नवऱ्याचे जबाब घेतेवेलळी मी जेव्हा नावासहित कोणी कोणी मारहाण केली ते सांगितल्यावर, तुम्ही यांना ओळखत नाही मग नावे कशीसांगू शकता?असा प्रश्न विचारला.तेव्हा मी राहुलने त्यांना हाक मारून थांबवून घेतले.म्हणून नावे कळली.आणि ते जखमींना मदत न करत मारहाण करण्यातच धन्यता मानत असल्याने लक्षात राहितेत व आमच्या गाडीतील लोकांनी त्यांचे छायाचित्रण केल्याचे सांगितले.ज्यांनी फिर्याद दिली होती तेही गडबडल्याचे दिसून येत होते. अलिबागहून रुग्णाला मुंबईला पाठवण्यात आले आहे आणि अजून गंभीर अवस्थेत आहेत तर चालकाला सोडणार नाही कारण तो मालक नाहीय.आणि आता त्याला सुरक्षेच्या कारणामुळे सोडू शकत नाही.शिवाय गाडी सोडणार नाही आता आर.टी,ओ.ने पाहिल्याशिवाय ,असे समजले. वचालकाकडे मूळ कागदपत्रे नसल्याने मालकाशी संपर्क साधण्यात आला.गाडी नवी असल्याने कागदपत्र बँकेत असल्याचे संगीताले व मी उदया तिथे पोचेन असे सांगितले.त्या गृहस्थांची सायकाळी पोलीसठाण्यात आणली होती.तीच एक स्पोकही वाकडा झाला नव्हता,त्यावरूनच समजत होते की आमच्या गाडीने अपघात केला नव्हता पण स्थानिकांचे दडपण पोलिसांना लघेच झुगारून देता येत नव्हते आणि निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकही ठाण्यात नव्हते, ते अलिबाग येथे क्राईम मीटिंगसाठी गेले होते. इतक्यात एक वार्ताहर तिथे आले.गावातल्या लोकांचे ऐकून त्यानीहि अपघात आमच्याच गाडीने केल्याचे गृहीत धरले होते.आणि बातमी लिहायला ते तिथे आले होते.त्यांच्याशी आम्ही बोललो मग त्यांनी गाडी व सायकलचे निरीक्षण केले आणि गेले. एव्हाना समीर काळभोर यांनी पर्यायी बसची व्यवस्था केली होती.स्थानिक चालक नौशाद यांनीही खूप मदत केली.चालकाची मेडिकल आणि जबाब झाल्यावर आम्ही निघालो. कारण चालक तमिळ होता.त्याला मराठी येत नव्हते. आम्ही तिथून निघालो. तेव्हा पाच वाजून गेले होते.अपघात सव्वाबाराला झाला होता..तसेच पारोसे देवळात जाऊन दर्शन घेऊन प्रवास पुढे सुरु झाला.आज गाडी मालक जाऊन त्याला घेऊन आले आहेत. दरम्यान यापुढे अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत करू धजेन का?याचा विचार मला पडला आहे..

वाचने 25987 वाचनखूण प्रतिक्रिया 102

तुषार काळभोर Tue, 06/16/2015 - 17:23
दरम्यान यापुढे अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत करू धजेन का?याचा विचार मला पडला आहे..
असाच प्रश्न आता मला पडला आहे. :(

गिरकी Tue, 06/16/2015 - 17:33
खूप वाईट अनुभव आहे हा. मदत करणाऱ्यांना कायद्याने संरक्षण असून तरी काय उपयोग? या असल्या उपद्रवी लोकांमुळे मदत न केल्याने किती अपघातग्रस्तांचे जीव जात असतील काय माहित. पण आपल्याच जिवाची शाश्वती नसेल तर कोण जाईल दुसऱ्याला वाचवायला?

यशोधरा Tue, 06/16/2015 - 17:42
किती वाईट अनुभव सुरंगीताई.. आपल्याला त्रास होईल हे ल़क्षात घेऊनही तुम्ही त्या माणसाला दवाखान्यात हलवलेत ह्याबद्दल तुमचे खूप कौतुक.
यापुढे अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत करू धजेन का?याचा विचार मला पडला आहे..
खरंच गं..

सौंदाळा Tue, 06/16/2015 - 17:45
भयंकर याच कारणामुळे हल्ली लिफ्ट द्यायचे पण बंद केले आहे. पुर्वी माझ्या दुचाकीची मागची सीट कधीच मोकळी नसायची कोणी हात केला की मी थांबलोच. नंतर एका मित्राकडुन ऐकले की एकाने लिफ्ट दिली होती आणि त्याचा अपघात छोटा झाला ( बाईक स्लिप झाली) लिफ्ट दिलेल्याला जरा खरचटले तर त्याने फोन करुन मुले बोलवुन लिफ्ट देणार्‍याला बेदम मारले. अशा अनेक घटना बघुन अनोळखी माणसांवर उपकार करु नयेत या निर्णयावर आलोय.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मोदक Tue, 06/16/2015 - 17:57
मला माहिती असलेला असाच एक प्रसंग.. गावाकडेच.. जेथे सर्वजण सर्वांना ओळखतात. एक जण दुचाकीवर चालला होता. दुसर्‍याने लिफ्ट मागितली. रोजच्या बघण्यातला असल्याने याने लिफ्ट दिली. पुढच्या चौकात पोलीसांनी दुचाकी थांबवली व चेकींग सुरू केले. लिफ्ट घेवून पाठीमागे बसलेल्या हिरोच्या पिशवीत हातभट्टी / देशीदारूचा अवैध स्टॉक सापडला. लिफ्ट देणारा हातपाय जोडून सांगत होता की "मी फक्त लिफ्ट दिली" पण मुद्देमालासकट रंगेहात सापडल्याने पोलीसांनी कारवाई सुरू केली. अवैध दारूची वाहतुक केली म्हणून गाडीसकट दोघांना आत टाकले.

@दरम्यान यापुढे अपघातग्रस्त व्यक्तीला मी मदत करू धजेन का?याचा विचार मला पडला आहे..>> केलाच पाहिजे विचार्,आता चार वेळा. खरच विचार करायला शिकवणारी घटना आहे ही.

काळा पहाड Tue, 06/16/2015 - 18:11
भारतीय अतिशय थर्ड क्लास दर्जाचे लोक असतात असा माझा समज पक्का झाला. उगीच जनरलाय्झेशन करू नये असा मुद्दा कोणीतरी काढणार असेल तरी बहुतांश भारतीय हे अशिक्षित, माजोरडे आणि काहीही स्किल वगैरे नसताना दुराभिमानी असतात हा मुद्दा आहेच. गावाकडचे लोक खास करून त्यात पुढचं पावूल आहेत. तेव्हा मदत वगैरे काही करण्याची गरज नाही. हे स्थानिक लोक मरतील तर उलट बरंच. किंबहुना सरकारने यांच्या जमिनी ताब्यात घेवून यांना भिकेला लावण्याची गरज आहे. त्या दृष्टीने मोदी सरकारला जमिन अधिग्रहणाबद्दल आणि जैतापूर बद्दल पाठिंबा. तरी सुद्धा हा लेख सर्व मराठी वृत्तपत्रांत (आणि खास करून कोकणातल्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध - त्यांच्या नावासकट) - वाचकांच्या पत्र वगैरे सदरात होईल असं पहा.

In reply to by काळा पहाड

स्रुजा Tue, 06/16/2015 - 22:06
हा आपल्या मॉब मेंटॅलिटी चा दोष आहे. कुठे तरी वाचलं होतं की भारतीय समाज मन १३ वर्षाच्या मुलाचं आहे. तितकंच अस्थिर, प्रतिक्रिया द्यायल उतावीळ, आणि अधीर ! एकेकटे आपण अतिशय सहिष्णु आहोत पण एकत्र आलो की कुणीतरी ठोकायला लागतंच. भारतीय मेडियाची म्हणुन च चलती आहे. सुरंगी ताई, अतिशय अस्वस्थ करणारा अनुभव आहे हा. म्हणुन च आधीच्या गाड्या तुम्हाला थांबु नका म्हणुन सांगत होत्या बहुदा . आता तर १० वेळा विचार करावा लागेल कुणाला मदत करताना. एक अमिताभ बच्चन चा सिनेमा आठव्ला यावरुन. यात तो एका जखमी माणसाला उचलुन हॉस्पिटल मध्ये नेतो, तो नेमका गुंड निघतो. त्याची गँग याला सळो की पळो करते की तू आता आमचं उरलेलं काम कर आणि त्याला मारुन टाक, पोलिस त्याला जीव नकोसा करतात कारण तो एका गुंडाला घेऊन येतात. फार चांगला सिनेमा होता, नाव आठवलं तर टाकते.

In reply to by स्रुजा

प्रभाकर पेठकर Wed, 06/17/2015 - 01:51
माझ्या आठवणी प्रमाणे तो एक पत्रकार असतो आणि एका राजकारण्याचे ( प्रेम चोप्रा) कांही तरी गुपित त्याला मिळते आणि तो ते प्रसिद्ध करेल ह्या भीतीपोटी त्याला संपविले जाते. हे रस्त्यात घडताना अमिताभ (एक सामान्य माणूस) पाहतो आणि त्या पत्रकाराचा जीव वाचवायला हॉस्पिटला पोहोचवतो आणि कथानक सुरु होतं.

In reply to by कंजूस

चिगो Tue, 06/16/2015 - 18:41
यालाच म्हणतात अनुभव. रस्त्यावर अपघात झालेल्यांस मदत न करता गाड्या भरधाव निघून जातात याचे कारण हेच आहे.
तसंही आपल्या देशात गरीब/ग्रामिण/अपघातात तुलनेने लहान वाहनाचे चालक/मालक ह्यांची कधीच चुक नसते.. आणि मग 'समाजातील माणुसकीचा अभाव'वगैरे टाईपातले लेख लिहायला फावतं.. असो.. अनुभव अत्यंत त्रासदायक आहे. मात्र अश्या प्रसंगी स्त्रीया जास्त स्मयोचित धैर्य आणि धारिष्ट्य दाखवतात हे खरं.. तुमचे कौतुक तर आहेच, पण आता मदत करायला कचरणार हे नक्की..

In reply to by चिगो

बॅटमॅन Wed, 06/17/2015 - 12:16
तसंही आपल्या देशात गरीब/ग्रामिण/अपघातात तुलनेने लहान वाहनाचे चालक/मालक ह्यांची कधीच चुक नसते.. आणि मग 'समाजातील माणुसकीचा अभाव'वगैरे टाईपातले लेख लिहायला फावतं..
मिलियन डॉलर कमेंट!!!!!

गणेशा Tue, 06/16/2015 - 18:35
ओह.. अनुभव वाईट होता.. अश्यामुळे कोणी मदत करु शकणार नाही.... ज्यांना खरेच गरज आहे ते ही कदाचीत अश्यामुळे मदतील मुकतीलच... तुम्ही अश्या परिस्थीत ही मदत केली या बद्दल आदर आहे.. पुढे तो सायकलवरुन पडलेला माणुस जिवंत आहे ना.. अआणि असल्यास त्याने काही सांगितले आहे का निटसे ?

भीमराव Tue, 06/16/2015 - 19:21
कॉलेज मधे असतानाचा एक अपघात आठवला, आमची मेस कॉलेज च्या समोरच्या बाजुला रस्त्यापलीकडे होती, रस्त्यावर एक भलामोठा खड्डा पडला होता. लांबुन हा खड्डा दिसत नसे, त्यामुळे भरधाव वेगाने येनारे दुचाकीस्वार हमकास अपघाताचे बळी होत आसत. एक दिवस एका दुचाकीवरून चालक मागे बसलेली एक स्त्री अन तिची ३ मुले, असे ५ जन त्या खड्ड्यामुळे ऊडुन बाजुला पडले. चालकाला अन मुलांना थोडेफार लागले, पन त्या स्त्री च्या मात्र कानातुन रक्त येऊ लागले. ते पाहुन तिची पोरे रडायला लागली. त्याचातली मुलगी आम्हा पोरांना मदतीसाठी विनवत होती, तिच्या लहान भावंडांना धीर देत होती, अन आई काय नाही होनार तुला काय नाही होनार तुला हे सुद्धा चालु होतं. चालक मात्र एका बाजुला डोके पकडुन बसला होता. त्याची एवढीच काय ती प्रतिक्रीया. गाडी पाहुन तिला पोहोचवेपरीयंत फार ऊशिर झाला.

पद्मावति Tue, 06/16/2015 - 19:23
काय भयंकर लोक असतात. तुझ्या मात्र हिंमत आणि माणुसकी ची दाद द्याविशी वाटते. काहीही संबंध नसतांना फक्त माणुसकीच्या नात्याने तुम्ही लोक तिथे थांबलात आणि जखमीची मदत केली याच कौतुक वाटतं. पण आता कोणाला अशी मदत करण्याच्या आधी मी तरी पुन्हा पुन्हा विचार करीन हे नक्की.

कंजूस Tue, 06/16/2015 - 19:52
कुर्ला स्टेशन प्लॅटफॅाम नं पाचवर नेहमीच पलिकडच्या हार्बरचे प्रवासी रूळ ओलांडून गाडी पकडण्यासाठी खालून येतात आणि एखादी फास्ट गाडी भोंगा वाजवत येते,लोकांचा ओरडा होतो "गाssडी !!!". एकदा दोन तीशितल्या स्त्रियांपैकी एक वर फलाटावर आली .दुसरीला मी पटकन एका हाताने मनगट पकडले आणि दुसय्रा हाताने दंडाखाली धरून वर खेचले.ती वर आली आणि गाडी क्षणातच धडधडत गेली.त्या बाईने हात झटकले आणि म्हाणाली" किती जोराने खेचता बांगड्या फुटल्या ना ." मराठीत बोलल्याने मला किती समाधान वाटले.

प्रभाकर पेठकर Tue, 06/16/2015 - 20:13
असाच प्रसंग माझ्या ओळखितल्या एकाने अनुभवला आहे. रस्त्यावर, एका बेशुद्ध अपघातग्रस्ताला हॉस्पिटलला पोहोचविल्यावर त्याच्या खिशातील पत्यावरून घरच्यांना कळविले. ते धावतच आले. पण तो गृहस्थ शुद्धिवर यायच्या आधीच गतप्राण झाला. झालं. नातेवाईकांनी ह्यालाच तूच उडविलं असणार. आता मात्र दुसर्‍या कोणीतरी उडविल्याचे खोटेच सांगतो आहेस असे म्हणून ह्याच्या विरुद्धच पोलीसात तक्रार दिली. पोलीसांनी ह्याला लगेच आंत टाकला. ह्याच्या घरच्यानी ह्याची जामिनावर सुटका करून घेतली. आणि तो रजा संपल्यामुळे परत मस्कतला आला. काहीतरी बाँड वगैरे लिहून घेतला होता. पुढे त्याचा वकील केस लढवत होता. केसची तारीख आली की हा धावायचा मुंबईला आणि पुढे त्याच्या गावी. जवळ जवळ वर्षभर दर गुरुवार शुक्रवारी (महिन्याला चार) मस्कत-मुंबई-मस्कत वार्‍या करून ती केस लढविली. शेवटी सुटला त्या झंझटीतून पण मस्कत-मुंबई ५२ फेर्‍यांचा खर्च आणि मनःस्ताप माथी बसला. दुसर्‍या एक ओळखिच्या डॉक्टरांनी, जे सौदी अरेबियात होते, एका इजिप्शियन असिस्टंट डॉक्टरला आपल्या गाडीतून नेताना. रस्त्यात एका अरबाला दुसर्‍याच गाडीने उडवून पळालेलं पाहिलं. त्या गाडीचा नंबर घेऊ शकले नाहीत. पण दोघेही डॉक्टर असल्यामुळे जवळच्या हॉस्पिटलला त्या अपघातग्रस्ताला घेऊन गेले. तो माणूस मेला. पोलीसांनी ह्याला आंत टाकलं. तूच अपघात केला म्हणून. सोबतचा इजिप्शियन डॉक्टर सांगत होता ह्याने अपघात केला नाही दुसर्‍याच गाडीने केला आहे. पण त्याला त्या पोलीसांनी काय पट्टी पढविली काही कळलं नाही पण नंतर त्याने स्टेटमेंट बदलून ह्या भारतिय डॉक्टरनेच त्याला उडविल्याचे शपथपूर्वक सांगितले. त्याच्या 'बयान' वर केस उभी राहीली. हा मराठी डॉक्टर जन्मभराकरता सौदी जेल मध्ये सडला असता. पण त्याच्या कंपनीने त्वरित हालचाल केली. थेट राजघराण्यापर्यंत ओळखी लावून ह्याच्या वरची केस काढून घेतली आणि त्याला मो़कळा केला. तरी सर्व प्रकारात त्याला २-३ महिने जेलात काढावे लागलेच. बाहेर आल्यावर तो जिथे काम करित होता त्या गव्हर्न्मेंट हॉस्पिटलने त्याची नोकरी त्याला पुन्हा बहाल केली. पण ह्याने स्वच्छ नकार देऊन सौदी सोडून भारताकडे प्रयाण केले. जान बची लाखो पाए।

तिमा Tue, 06/16/2015 - 20:42
रस्त्यांत अपघात झाला तर कधीच तिथे थांबू नये. पोलिस स्टेशनला स्वतः जाऊन माहिती द्यावी. तसेच स्वतःच्या वाहनाचा काही संबंध नसेल तर पोलिस स्टेशनलाही जाऊ नये. कारवाल्यांवर तर यांचा फारच राग असतो. अडाणी पण बिलंदर अशी आपल्या देशांतली बहुतांशी प्रजा आहे.

संजय माळी Tue, 06/16/2015 - 21:01
माझा अनुभव त्यामानाने किरकोळ आहे तरीही शेअर करतो. गेली २०-२५ वर्षे मी एकाच रूटवरून दुचाकीने ये-जा करतो. लगतच्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांची दया आली म्हणून येत-जाता हात करतील त्या किंवा बरेच लहान आहेत असे दिसणाऱ्या मुलांना मी लिफ्ट द्यायला सुरुवात केली. दोन वर्षे मी हे करीत होतो . एकदा एका छोट्याला stop वर नेणारी महिला मला पाहून थांबली आणि माझ्या गाडीवर मागे बसवून टाटा बाय करून गल्लीत गायब झाली. संध्याकाळी परतताना तोच मुलगा गोडीवर बसला. त्याचे ठिकाण आल्यावर मी लगेच डावीकडे घेवून थांबण्या ऐवजी मागे दुसरे वाहन असलेने थोडे अंतर तसेच पुढे गेलो . तर सकाळचीच ती त्याची आई गाडीमागे धावत आली . धापा टाकत डोळे मोठे करून माझ्यावर खेकसली - ' माझ्या मुलाला पळवून नेता का काय हो ?' ------- आता बोला !

In reply to by संजय माळी

खटपट्या Wed, 06/17/2015 - 10:54
"सल्ला पाहीजे" धागा वाले तुम्हीच ना? आता तुमचे ईंजीनीअरींग चालू आहे, १२ वी 2013 ला झाली, मग गेली २०-२५ वर्षे एकाच रूट्वरून ये-जा कसे करत आहात? (ह.घ्या. शंका आली म्हणून विचारले)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु Wed, 06/17/2015 - 11:16
दोघांना एका माळीत ओवण्याची खटपट करू नै !!! स दा खर्डेघाशे कारकून धागा धागा सल्ला मागा समिती अभामिपामांकामिमसंचालीत

वॉल्टर व्हाईट Tue, 06/16/2015 - 22:40
तुमच्या धैर्याचे कौतुक वाटते. अगदी मान्य आहे आपल्या देशातल्या लोकात फुकट स्टेक मिळणवण्याची प्रवृत्ती आहे आणि पांढरपेशे दिसणारे लोक दिसले सॉफ्ट टारगेट म्हणुन आपल्या मारहाण करण्याच्या विकृत इच्छा हे लोक पुर्ण करुन घेतात. तुमच्या ड्रायवर बद्दल हळहळ वाटली, हकनाक मार खाल्ला त्याने. पण पुढल्या खेपेला चांगला अनुभव येईलया आशेवर मदत करणे थांबवु नये, कदाचित तुमच्या मदतीविना तो सायकलस्वार मेला असता, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. त्याची मदत करुन तुम्ही खरे समाजकार्य केले आहे आणि त्याच्या जवळच्या लोकांचे आशिर्वाद मिळवले आहेत. तुमच्या या आणि इतर लेखांमधुन असे जाणवते की आपण सरकारी उच्चपदस्थ आहात आणि स्वभावाने खमक्याही आहात, तुमच्यासारख्या लोकांनी मदत करणे सोडले तर आमच्यासारख्या सामान्य (बुळ्या आणि घाबरट अर्थाने) लोकांनी कशापासुन प्रेरणा घ्यायची ?

मास्टरमाईन्ड Tue, 06/16/2015 - 23:14
पण यापुढे मी मात्र कधी असा कुणाला मदत करेन ही शक्यता धूसर. कारण लोकांचा मार आणी पोलिसांच्या फालतू चौकशा, उगीचच कागदपत्रांवरुन अडकवण्याचा प्रयत्न (आजपर्यंत एकाही डंपरला कागदपत्रांवरुन अडकवलेलं पाहिलं नाहीये) यापेक्षा मरणारा आपल्या मरणानं मरत आहे, "तो" सर्वशक्तिमान परमेश्वर त्याची नक्कीच काळजी घेईल अशी मनोमन प्रार्थना करून मी बाजूनं निघून जाणं पसंत करेन. तुमच्या जागी जर नवरा, बायको आणी एखादं लहान मूल असं छोटं कुटुंब असतं तर काय झालं असतं याची कल्पनाच केलेली बरी.

श्रीरंग_जोशी Wed, 06/17/2015 - 00:02
काय लिहिणार यावर. एकेकाळी अशी उदाहरणे बिहार, उत्तर प्रदेशच्या नावाने ऐकायला मिळायची. आता आपल्यात अन त्यांच्यात फारसा फरक राहिलेला नाही :-( .

तुम्ही उत्तम नागरिकाचे आणि माणूसकीचे कर्तव्य केले आहे यात काही संशय नाही. त्यासाठी तुमचे अभिनंदन ! (बघा काय दिवस आले आहेत की नागरिकाचे आणि माणुसकीचे काम केले म्हणून कोणाचे अभिनंदन करण्याची पाळी आली आहे ! :( ) तुमचे प्रसंगावधान (गुंडांची नावे लक्षात ठेवणे व फोटो काढणे, इ) तुमच्या बरेच कामी आले. अश्याच प्रकारच्या एका प्रसंगातून गेलो आहे. मी डॉक्टर असल्याचे समजल्यावर, स्थानिक डॉक्टरनेच "तुम्ही ड्रायव्हरला घेऊन निघा लवकर. मी बघून घेतो. इथले लोक चांगले नाहीत." असे सांगून जवळ जवळ हाकलून दिले होते. बर्‍याच गावांत अश्या प्रसंगांवर गिधाडासारखे तुटून पडून स्वतःचे खिसे भरून घेणारे गुंड निर्माण झाले आहेत. ते छोटेमोठे स्थानिक पुढारी किंवा त्या पुढार्‍यांचे पित्ते असतात. त्यांना असलेल्या राजकिय पाठिंब्यामुळे पोलीसही त्यांच्या दबावाखाली असतात. लज्जास्पद पण सत्य वस्तूस्थिती.

प्रभाकर पेठकर Wed, 06/17/2015 - 01:54
>>>> ते छोटेमोठे स्थानिक पुढारी किंवा त्या पुढार्‍यांचे पित्ते असतात. त्यांना असलेल्या राजकिय पाठिंब्यामुळे पोलीसही त्यांच्या दबावाखाली असतात. लज्जास्पद पण सत्य वस्तूस्थिती. करूण आणि निर्लज्य वास्तव.

स्पंदना Wed, 06/17/2015 - 03:47
बाप रे!! सुरंगी ताई तुझा अनुभव आणि लेखावरच्या प्रतिक्रिया अक्षरशः हलवुन गेल्या. हलकट झालाय सगळा समाज!!

अश्या प्रसंगी एक गोष्ट जरुर करावी. जे पिरपीर, शिवीगाळ किंवा हात उचलायचा प्रयत्न करत असतील त्यांचा म्होरक्या हेरायचा. एक झणझणुन कानफटात हाणायची. आपोआप बंद पडतात सगळे. वर्क्स एव्हरीटाईम (ट्वाईस इन माय केस).

अजया Wed, 06/17/2015 - 07:32
डिपेंड्स!तुम्ही कोणत्या एरिआतल्या माणसाच्या कानाखाली देताय.फार वाईट पध्दतीने हे अंगाशी येऊ शकते.मारणार्या माणसाला उचलुन गाववाले गडप करतात जमावासमोर.एकही जण साक्ष देत नाही.त्या माणसाचं काय करत असतील विचार करा. शहरात एक वेळ चालुन जाईल.गाववाल्यांमध्ये अजिबात करु नये असे धाडस आहे हे.विशेषतः एकटं किंवा कुटुंब सोबत असताना.

उमा @ मिपा Wed, 06/17/2015 - 08:38
सुरंगीताई __/\__ तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून माणुसकी आहे. खूप खूप भीती वाटली हे सगळं वाचून, तुम्ही कुठून हे बळ आणलं तुम्हालाच ठाऊक!

नाखु Wed, 06/17/2015 - 08:57
आणी उद्वेग्जनक अनुभव्.त्या राहुल ठोंबरे आदी लोकांची दारूड्या अवस्थेतील फोटॉ च द्यायचे होते त्या वार्ताहराला (नाहीतरी ती गिधाडी वृत्तीच आहे दिसेल त्यात सनसनाटी शोधणारी). आणि हो गावातले लोक अगदी साधी भोळी असतात हे फक्त सिनेमा कादंबरीपर्यंतच ठीक प्रत्यक्षात अतिशय बेरकीपणे गुंडा-पुंडाच्या पाठीशी राहून पराकोटीचा स्वार्थ साधण्यात चलाख असतात. यातले काही राहुल पुढारी बनतात तर काही नेटवर शेतकर्यांच्या कैवार मिरवतात. विधायक कामे दोन्हीकडे नाही. कुठल्याही अपघाताला माणुसकी विसरणेच बरे सुरंगीताई हा लेख स्थानीक पेपरला द्याच ही विनंती कौटुंबीक नाखु

In reply to by नाखु

अभिजित - १ Wed, 06/17/2015 - 20:06
यातले काही राहुल पुढारी बनतात तर काही नेटवर शेतकर्यांच्या कैवार मिरवतात. विधायक कामे दोन्हीकडे नाही.

In reply to by कपिलमुनी

नाखु गुरुवार, 06/18/2015 - 09:27
मुनीवर ते परिस्थीतीचा गैरफायदा उठवण्याबाबत होते. दोन्हीकडे प्रत्यक्ष मदतीपेक्षा दांभीक आणि स्वार्थी कळवळा दिसला म्हणून उदहरण दिले ते फक्त वृत्ती म्हणून धरा. नाही पटले तर आपली सप्शेल माघार, आत्ता ठीक आहे ना! मुनींचा मित्र नाखु

In reply to by पैसा

अजया Wed, 06/17/2015 - 10:28
हो.आम्ही दोन बाजूंनी दोन नॅशनल हायवेजवळ राहातो.पुढे एन एच फोर आणि मागे गोवा हायवे. सायकली असतात रस्त्यावर.एक्स्प्रेस हायवेवर परवानगी नसते.

In reply to by पैसा

खटपट्या Wed, 06/17/2015 - 11:02
नॅशनल हायवेवर सायकली आणू शकतो. एक्स्प्रेस वे वर सायकलीच काय दुचाकीही आणू शकत नाही. मुंबई - गोवा हा नॅशनल हायवे आहे. ज्या गावांमधून जातो त्या गावकर्‍यांना त्याचा वापर करावाच लागतो. अगदी गुरे घेउन जाण्यासाठी सुद्धा. (यामुळेही बरेच अपघात होतात.) खरे तर नियमाप्रमाणे बांधलेल्या हायवेला सर्वीस रोड असावा लागतो. पण मुंबई-गोवा रोड साठी ते एक स्वप्न आहे.

अगम्य Wed, 06/17/2015 - 10:22
त्याची ही अवस्था फिट आल्यामुळे झाली का? "त्याच्या डोक्याला जखम झालेली,डोळे उघडे,जीभ दातातून बाहेर आलेली,त्यामुळे तोंडातून रक्तस्राव होत असलेला." तिथल्या डॉक्टरांनी त्याला पाहिल्याबरोबर हे जाहीर का केले नाही? जर डॉक्टरांनीच सांगितले की हा अपघात नसून फिट आहे, तर जमावाची सर्व हवाच निघून गेली असती.

अगम्य Wed, 06/17/2015 - 10:24
हे वाचून धक्का बसला आणि तुमच्या धैर्याची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे हे सांगायचे राहिले.

मदनबाण Wed, 06/17/2015 - 11:18
काय बोलणार ! आजच्या काळात दुसर्‍याला मदत करणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा /कुर्‍हाड चालवुन घेणेच ठरेल असे दिसते ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aao Raja... ;):-Gabbar Is Back

मितान Wed, 06/17/2015 - 11:25
सुरंगीताई तू खूपच धीराने वागलीस ! प्रसंगावधानाला प्रणाम !! जवळच्या नात्यातील व्यक्ती वेळेवर मदत न मिळाल्याने वारली. मागे बायको न दीड वर्षाचा मुलगा आहे. ते जवळून अनुभवलय. म्हणून असे वाईट अनुभव आले तरी मदत करायचे सोडू नये असेच म्हणेन. अर्थात स्वतःची सुरक्षितता आणि परिस्थितीचे भान ठेवूनच !

सुबोध खरे Wed, 06/17/2015 - 11:28
सुरंगी ताई, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागून बर्याच गावात डांबरट लोक आहेत. खाजगी गाड्यांच्या पुढे कोंबड्या सोडणे आणि कोंडी मेली कि गाजावाजा करीत एका कोंबडीचे २०० रुपया पासून पाचशे पर्यंत पैसे उकळणे, काही बारीकसा अपघात झाला तरी मोठा गहजब करणे आणि गाडीवाल्यांपासून पैसे उकळणे हे धंदे तेथे सर्रास चालतात. माझे वडील रोह्यात पेपर मिल मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक होते तेंव्हा अशा बर्यच घटना त्यांनी पाहिलेल्या आहेत. जमावाची बुद्धी १० वर्षाच्या मुलासारखी असते.त्यात ज्याचे वाहन मोठे त्याची चूक हा नियम मग यात रिक्षावाला हि येतो. श्रीमंतीचा द्वेष करणे हे लहानपणापासून मनावर बिम्बवलेले आहे. श्रीमंत माणूस म्हणजे गरिबाना पिळूनच श्रीमंत होतो हे ब्रम्हवाक्य.त्यातून स्थानिक राजकारणी लोक आपल्याला मदत करतील हि अपेक्षाच चूक आहे. कारण कोणताही राजकारणी आपल्या मतपेटीच्या विरुद्ध जाणारच नाही हे हि ब्रम्हवाक्य. उलट ते समाजाला खुश करण्यासाठी आपल्याला गोत्यात आणण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत हि वस्तुस्थिती. स्थानिक पोलिस सुद्धा यात संधी शोधणार नाहीत हि शक्यता कमीच. कारण तुम्हाला अडकवून ठेवण्यात त्यांना चार पैसे सुटत असतील तर ते तुम्हाला सोडवण्याचा मुद्दाम प्रयत्न करतील असे नव्हे. अशी परिस्थिती असताना आपण आपला जीव धोक्यात घालून समाजकार्य करण्यात कोणताही हशील नाही. तेथे थांबून तुम्ही गोत्यात येण्यापेक्षा पुढे जाऊन पोलीसाना खबर देणे हाच शहाणपणाचा उपाय आहे. हे काम सार्वजनिक दूरध्वनीवरून करावे आणि आपला भ्रमणध्वनी आणि आपल्या स्वतःचे वाहन असेल तर त्याचा नंबर पोलिसांना चुकुनही देऊ नये. चार दिवसांनी आपल्या घरात समन्स घेऊन पोलिस उभे राहिले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नये. आपल्या अत्यंत महत्त्वाच्या वेळेस पाच सात वर्षांनी आपल्याला स्थानिक न्यायालयात उभे राहण्याचे समन्स नक्की येते. (जो माणूस सरकारी नोकरीत असतो/ किंवा ज्याचे वर लागे बांधे असतील त्याच्या मागे पोलिस सहसा लागत नाहीत) आपण केले ते काम प्रशंसनीय आहे परंतु समाजाने आपल्याला बेदम चोपले असते तर आपण स्वतःचा जीव वाचवणार कि त्या व्यक्तीचा. डॉक्टराना होणार्या मारहाणीच्या घटना नंतर भारतभर बर्याच डॉक्टरानी आता रुग्णाला जरा जरी धोका असेल तरीही आमच्याकडे सोय उपलब्ध नाही तेंव्हा तुम्ही मोठ्या/ सरकारी रुग्णालयात घेऊन जा हे सांगायला सुरुवात केली आहे. आपल्या उदाहरणातहि पालीच्या रुग्णालयात डॉक्टरला काहीही कारण नसताना मारहाण केल्याचे आपण म्हटलेच आहे. तेथे सोयी उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. असे काही सुरस किस्से आहेत परंतु धाग्याचे अपहरण होऊ नये म्हणून मी ते येथे टाकत नाही. समाजाची मनोवृत्ती जोवर बदलत नाही तोवर काही निष्पाप माणसांचे असेच बळी जाणार हि खरी शोकांतिका आहे.

In reply to by सुबोध खरे

हाडक्या Wed, 06/17/2015 - 16:21
समाजाची मनोवृत्ती जोवर बदलत नाही तोवर काही निष्पाप माणसांचे असेच बळी जाणार हि खरी शोकांतिका आहे.
खरेकाका, याला अगदी अगदी सहमत.. मग तिकडे सरकार कोणाचेही येऊ दे ..

शि बि आय Wed, 06/17/2015 - 12:25
अत्यंत मनस्ताप देणारा अनुभव आहे तुमचा. झालेला प्रकार समजून न घेत जे काही त्या जमवणे केले ते अत्यंत अयोग्य आहे. कोणत्याही ठिकाणी जेव्हा जमाव एकवटतो तेव्हा खुपदा जमावाची प्रवृत्तीहि नुकसान करणे, हिंसाचार करणे किंवा लुबाडणे अशा गोष्टींकडे झुकणारी असते. अशा प्रकारची हीन मनोवृत्ती ठेवून लोकांना कोणत्या प्रकारचा आनंद मिळतो किंवा मिळवायचा असतो ? मुंबईच्या बाहेर गेल्यावर असे प्रसंग जास्तच आढळतात. त्याहीपेक्षा हि मुंबई - पुण्याची माणसे चिक्कार पैसा असेल त्यामुळे घ्या लुबाडून त्यांना अशी प्रवृत्ती असते. पण त्याक्षणी तुम्ही जे धैर्य दाखवलेत त्याला तोड नाही.

मनो Wed, 06/17/2015 - 12:45
सत्य हे अनुयायांच्या रक्षणाबाबत पूर्णपणे उदासीन असते. जी. ए. कुलकर्णी मूळ गोष्ट http://www.gakulkarni.info/stories/vidushak/vidushak.html

पिशी अबोली Wed, 06/17/2015 - 13:15
सुरन्गीताई, तुम्हाला खरंच सलाम. हा अनुभव खूपच वाईट आहे. पण कधी कधी खरोखर गरज पण असते. मागच्या वर्षी माझ्या काही नातेवाईकांचा मोठा अपघात झाला. पण तो अपघात झालाय एवढं आम्हाला कळेपर्यंत त्यांना कुणीतरी अज्ञात लोकांनी हॉस्पिटलमधे पोहचवून अ‍ॅड्मिट केलं होतं. आमच्याकडून काही हालचाल होण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु झाले होते. त्यामुळे गाडीतल्या तिघांचे तरी जीव वाचू शकले. कुणी अ‍ॅडमिट केलं हे कळलं का नाही मला माहीत नाही. पण अशाच कुणीतरी सज्जनांनी मदत केल्याचं आम्ही विसरू शकत नाही.

In reply to by पिशी अबोली

चिगो Wed, 06/17/2015 - 14:39
मीही शाळा-कॉलेजात असतांना अश्या जखमी, चक्कर येऊन पडलेल्या लोकांना मदत केलीय. एकदा रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसला, म्हणून नागपूरच्या उन्हाळ्यात दोन-तीन किलोमीटर सायकल हाणत गेलो, पोलिसांना सांगितलं. पोलिस सोबत घेऊन पोहचेपर्यंत तो माणूस तिथून गायब झाला होता, म्हणून पोलिसांच्या शिव्यापण खाल्ल्या.. आणि एकदा एका माणसाला जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलम्ध्ये घेऊन गेलो.. तोपण गरीब आणि आमचेपण खिसे रिकामे तरी तिथल्या डॉक्टरांनी त्याच्यावर मोफत इलाज केले. त्याच्या घरच्यांनी तिथे पोहचल्यावर आमचे हात जोडून आभार मानले, तीच पोचपावती.. पण आता सुरन्गीताईंचा अनुभव आणि इतरांचे प्रतिसाद वाचून वाटतंय की 'या तो हम तब बच्चे थे, या फिर दुनिया इतनी जालिम ना थी'.. आता मात्र एक तर माणुसकी नको दाखवायला किंवा मग स्वॅप्स म्हणताहेत तसं कमरेला बंदुक असल्यासच..

राही Wed, 06/17/2015 - 14:46
आपल्या धाडस आणि प्रसंगावधानाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आपला समाज अजूनही नागरी संस्कृतीच्या पहिल्या पायरीवरच आहे ही अनेकदा मांडली गेलेली स्थिती अशा प्रसंगांतून पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहते आहे. अद्यापही टोळीसदृश म्हणजे ट्रायबल मानसिकतेत वावरणारी आपण माणसे. सदैव एखाद्या टोळीप्रमुखाच्या आज्ञेखाली वावरायचे. व्यक्तिगत मत, व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिवाद यांचा मागमूसही नाही, तेथे व्यक्तिविकासाचे प्रकाशकिरण झिरपायचेच कसे? सिविल सोसायटीचे काही नियम, कायदेकानून असतात हे आपल्या गावीही नसते. गावकी, भावकी, पंचायत यातच आपण गुंतून राहाणार. आमचे जंगल, आमची गल्ली, आमचे राज्य या मिजाशीतच वावरणार. झुंडशाही हीच आमची सिस्टिम. त्यालाच हवंतर तुम्ही लोकशाही म्हणा. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या महत्तेच्या आत्मगौरव-गुंगीतून आम्ही कधी बाहेर पडू? खर्‍याखुर्‍या सिविल सोसायटीच्या निर्माणाची पहाट आमच्याकडे कधी उगवेल?