रसज्ञ नरभक्षक
कां उगीच घाबरतोय आम्ही?
कां उगीच गळा काढून रडतोय?
कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय?
तो नरभक्षक चटावलाय
आपला क्रुस
आपल्याच खांद्यावरून वाहणार्या
महात्म्यांच्या रक्ताला
तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी
खांदे मजबूत लागतात
ख्रिस्तासारखे
गांधीबाबासारखे
दाभोलकरांसारखे
पानसरेंसारखे
आजन्म व्रतस्थ जनसेवेतून
बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन
अशा निर्धारी आचारातून
ऋशींनाही लाजवेल
अशा निर्मोही चारित्र्यातून
मजबूत होतात असे खांदे
आमची जनसेवा
सोयीची आणि सवडीची
थोडेसे दमल्यावर
कुणी लालूच दाखवल्यावर
कुणी धमकावल्यावर
क्रुस टाकून पळून जाणारे भेकड आम्ही
आमचे रक्त चालत नाही त्याला
भुकेला तरी
चवीचा रसज्ञ आहे तो
- देवदत्त परुळेकर
वाचने
1846
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अगदी खरे !
रचना आवडली!
विचारांनी विचारांची शिकार करणारे शिकारी आहेतच कुठे ह्या देशात?
In reply to विचारांनी विचारांची शिकार by मार्मिक गोडसे
+++१११
खिक्
अंतर्मुख करणारी कविता... गोळीने माणूस मरेल हो, विचार कसे काय मरतील?
त्याला मरणदंड द्यावा म्हणून धर्मरक्षक आणि त्यांची संघटना त्याच्याविरूद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले. परंतु त्याला जिवे मारण्याचे काहीही कारण संघाटनेला सापडेना. शेवटी धर्ममार्तंडातील दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली,
“हा मनुष्य असे म्हणाला की, सारासार विचारांनी, धर्ममार्तंडाचे मंदिर, सामान्य-मनुष्य पाडू शकतो.”
तेव्हा प्रमुख धर्ममार्तंड उठून त्याला म्हणाला, “याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे! आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. ह्याला देवाची निंदा करताना सर्वांनी ऐकले!
तुम्हांला काय वाटते?” संघटनेने उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”
तेव्हा त्यांनी त्याला गोळ्या घालून मारले. यावेळी सामान्य-मनुष्य वाड्याच्या अंगणात बसला होता. धर्मरक्षक संघटनेचा कार्यकर्ता त्याला पाहून म्हणाला , “तू सुद्धा मिठाच्या सत्याग्रहात त्याच्याबरोबर होतास.”
पण सामान्य-मनुष्यने जीवाच्या भीतीने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!”
मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका कार्यकर्ताने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, “अंधश्रद्धानिर्मुलनात त्याच्याबरोबर हा होता.”
पुन्हा एकदा सामान्य-मनुष्य शपथ घेऊन त्याला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”
काही क्षणानंतर तेथे असलेले इतर कार्यकर्ते सामान्य-मनुष्याकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर टोलविरोधीलोकांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”
मग तो सामान्य-मनुष्य,स्वत:ला शाप देऊ लागला, व जोराने म्हणाला, “मी शपथ घेउन सांगतो, हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!”
सामान्य-मनुष्य असे म्हणाला तोच कोंबडा आरवला.......................
अगदी खरे ! रचना आवडली!