मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्रेकिंग न्यूज!!

चिनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे. नेमके कोणते वाद्य वापरून ते संगीत निर्माण केलं असेल हे एक कोडं आहे.पण सातच्या बातम्या म्हणजे आमच्या दृक्श्राव्य जीवनातला एक महत्वाचा भाग आहे. दिवसभरातल्या घडामोडी फक्त पंधरा मिनिटात सांगून होऊ शकतात यावर आजकालच्या पत्रकारांचा कदाचित विश्वास बसणार नाही. त्यांना तर आजकाल एक बातमी सांगायला अख्खा दिवसही पुरत नाही. एखादी गोष्ट सांगावी तशी बातमी रंगवून रंगवून सांगतात. आपले प्रदीप भिडे बातमी द्यायचे तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचे. अलीकडे वृत्तनिवेदक अभिनय केल्यासारखी बातमी देतात. बातमीचे गांभीर्य जेवढे कमी तेवढे यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य जास्त !एखाद्या सकाळी आपण बातम्या बघायला म्हणून टीवी लावतो. न्यूज च्यानेल वर बातम्यांचा भडीमार सुरु असतो. म्हणजे असं की , स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक बातमी, खाली ब्रेकिंग न्यूजवर दुसरी बातमी, सगळ्यात खाली एकामागून एक वेगवेळ्या बातम्या , कुठेतरी कोपऱ्यात क्रिकेटचा स्कोर, एका बाजूला जाहिरात, आणि स्क्रीन च्या मधात तो निवेदक मोठमोठ्याने ओरडत असतो. तो नेमकी कोणती बातमी सांगतो आहे हे कळेपर्यन्त जाहिराती सुरु होतात. कंटाळून आपण दुसरं च्यानेल लावतो. तिथे फक्त वृत्तनिवेदक बदलला असतो. बाकी तेच ! ११ सप्टेंबर च्या हल्ल्यानंतर भारतीय मिडीयाला "ब्रेकिंग न्यूज" हा शब्द सापडला. तेंव्हापासून देशात ब्रेकिंग न्यूज चा पूर येतोय.कुठे काही खुट्ट वाजलं की मिडीयाच्या दृष्टीने ती ब्रेकिंग न्यूज होते. आणि खुट्ट नाही वाजलं तर जास्त मोठी ब्रेकिंग न्यूज होते. ("स्कोर्पियो ची कुत्र्याला धडक" हीसुद्धा ब्रेकिंग न्यूज होऊ शकते.त्यात जर स्कोर्पियो किंवा कुत्रा दोघांपैकी कोणीही एखाद्या सेलेब्रिटीच्या मालकीचं असेल तर विचारूच नका. कुत्र्याची जन्मकहाणी सांगण्यात येते. "कुत्ते का क्या कसूर" किंवा "विनाशक स्कोर्पियो" नावानी एखादी स्टोरी दाखवतात.) असं वाटतं दिवसभरात किती ब्रेकिंग न्यूज दिल्या यावर पत्रकारांचा पगार ठरत असावा. नेत्यांच्या किंवा सेलेब्रिटीच्या घरासमोर हे टपूनच बसले असतात. बर्याच वेळ कोणी घराबाहेर नाही आलं तर इकडे लगेच ब्रेकिंग न्यूज : शाहरुख घर से बाहर नही आये. क्या मिडीया से बचना चाहते हैं शाहरुख ? तो घराबाहेर आला की त्याच्या तोंडाजवळ माईक नेउन इकडे दुसरी दुसरी ब्रेकिंग न्यूज : शाहरुख घरसे बाहर निकले. सकाळी सकाळी यांना बघून जर तो वैतागला तर तिसरी ब्रेकिंग न्यूज : शाहरुख ने की मिडीया से बदसलुकी !! काही च्यानेल्स वर तर बातमीचे एपिसोडस सुरु असतात. कदाचित एखाद्या नेता किंवा सेलेब्रिटी कडून हे बातम्यांचे कंत्राट सुद्धा घेत असतील. (हिरो–हिरोईनचं लग्न, तिची मंगळागौर(!), डोहाळजेवण, बाळाचं बारसं इ. सगळ्यांसाठी अमुक अमुक कोटी ! देव न करो पण घटस्फोट झालाच तर त्याचा वेगळा चार्ज लागेल ! ). बातमी फिरवणं, अर्थाचा अनर्थ लावणं ह्यात तर मिडीयाचा हात कोणीच धरू शकणार नाही. (याविषयी एक काल्पनिक किस्सा नेहमी सांगितला जातो. एक धर्मगुरू पहिल्यांदाच एक गावाला भेट द्यायला गेले. विमानतळावर त्यांचे आगमन होताचं पत्रकार त्यांच्या भोवती गोळा झाले. एकाने प्रश्न विचारला ,"या गावातल्या वेश्यावस्तीला आपण सदिच्छा भेट देणार आहात का?".यावर धर्मगुरुंनी प्रतिप्रश्न केला," या गावात वेश्या आहेत का?”. लगेच टीव्ही वर ब्रेकिंग न्यूज : विमानतळावर उतरताक्षणी धर्मगुरूंचा पहिला प्रश्न ! या गावात वेश्या आहेत का ? दोघांच भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण मिडीयाने सगळ्यात जास्त उपयोगात आणली आहे. एखाद्या नेत्याच्या भाषणातलं किंवा मुलाखतीतलं वाक्य उचलायचं. आधीचे संदर्भ काढून भलत्याच संदर्भात ते वाक्य जनतेसमोर आणायचं. मग दुसर्या पक्ष्यातल्या नेत्यांची त्यावर प्रतिक्रिया घ्यायची. झालं भांडण सुरु ! यात आणखी एक प्रकार आहे. चार टाळकी गोळा करून कोणत्याही विषयावर चर्चा सुरु करायची. (त्यात चेतन भगत सारखे थोर विचारवंत सुद्धा येतात). चारही टाळकी विषय बाजूला ठेऊन एकमेकांच्या यथेच्छ उखाळ्यापाखाळ्या काढतात. एक वेळ अशी येते की कोण कोणाच्या प्रश्नाला उत्तर देतंय (का देतंय?) हेच कळत नाही. मग वृत्तनिवेदक रेफ्री असल्यासारखे त्यांच भांडण सोडवतात. तो अर्णव गोस्वामी तर देशाचा सरन्यायाधीश असल्यासारखा चर्चेचा निकाल जाहीर करून मोकळा होतो. आजकाल मिडीयाने एक नवीन प्रकार सुरु केला आहे. एखाद्या घटनेची बातमी न देता त्या घटनेवरच्या वक्तव्यांची /प्रतिक्रियांची बातमी देतात. जिभेला हाड नसलेल्या नेत्यांनी भरलेल्या आपल्या देशात अश्या बातम्या मिळणं काही फार कठीण नाही. मग त्यावरून वाद सुरु होतात. मिडीयावाल्यांची दिवाळी सुरु ! रेड्यामुखी वेद वदता, मिडीयाची पेटली फ्युज ! ज्ञानियाची वाळीत झोपडी अनं रेड्याची ब्रेकिंग न्यूज !! देशात किंवा एखाद्या राज्यात निवडणुका असल्या किंवा क्रिकेटचा सामना असला की ब्रेकिंग न्यूज सुरु. तिकडे खेळाडू प्रात:विधी आटपत असतात तेंव्हापासून यांचे क्यामेरे सज्ज असतात. सेहवाग की मां किंवा धोनी के पडौसी यांच्या मुलाखती चालू होतात. निखिल चोप्रा / साबा करीम सारखे क्रिकेट तज्ञ येतात. ते द्रविडच्या तंत्रातल्या चुका सांगतात, झहीर खान ला टिप्स देतात. अश्यात जर भारत सामना हारला तर काही खरं नाही. सगळ्या टीम ला कोर्टात उभं करून परस्पर शिक्षा सुनावून मोकळे होतात. निवडणुकीच्या काळात उमेदवारांना सळो की पळो करून सोडतात. उत्साहाच्या भरात एखादा उमेदवार किलोभर आश्वासनं देतो. इकडे लगेच हे ती आश्वासनं पक्षाचा जाहीरनामा म्हणून दाखवतात. मतदार विचारत नसतील इतके प्रश्न हे त्या उमेदवाराला विचारतात. निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेची घाई विजयी पक्षाएवढीच मिडीयाला झाली असते. शपथविधीनंतर चोवीस तासात ,सरकार दिलेली आश्वासनं कधी पूर्ण करणार यावर चर्चा सुरु होते. आणि आठ दिवसात सरकार निष्क्रिय असल्याची पावती दिली जाते. देशात सगळ्यात जास्त अफवा मिडीया द्वारे पसरत असतील. क्रिकेट वैगेरे ठीक आहे पण एखाद्या गंभीर घटनेचं मिडीयाकडून होणारं थिल्लरीकरण बघून वाईट वाटतं. रेल्वे अपघात, भूकंप, दंगल यासारख्या दुर्दैवी घटनांच्या चित्रफिती वारंवार दाखवल्या जातात. याविषयी एक नमूद करावसं वाटते. ११ सप्टेंबर च्या हल्ल्यात जवळजवळ ३००० लोकं मारले गेले. पण हल्ल्याची एक चित्रफीत सोडली तर दुसरी कोणतीही चित्रफीत किंवा फोटो अमेरिकन मिडीयाने दाखवले नाहीत. आपल्याकडे मृतदेहांचे फोटो दाखवतात , मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतात,आपको कैसा लग रहा हैं वगैरे प्रश्न विचारतात !! जनतेला बातम्या हव्या असतात. इथे त्यांना वादाचे विषय पुरवले जातात. आपल्याकडे मंगलकार्यानंतर देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत आहे. आजकाल कोणत्याही घटनेनंतर मिडीयाचा गोंधळ घालण्याची पद्धत रूढ होते आहे. फरक एवढाच की देवीचा गोंधळ यजमानांच्या इच्छेने होतो. पण मिडीयाचा गोंधळ यजमानांवर लादला जातो !! "गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता" ह्या म्हणीत थोडासा बदल करून असे म्हणता येईल गाढवांनीचं वाचली गीता जणू कालचा गोंधळ पुरे नव्हता , म्हणे कृष्ण सावळा गोंधळी ,अरे आमचा काळ बरा होता !!

वाचने 9805 वाचनखूण प्रतिक्रिया 29

In reply to by मुक्त विहारि

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 13:33
१. मालिका बघा.
थोडक्यात स्वतःच्या डोक्याला "भुंगा" लावुन घ्या असचं की नाही. =))

In reply to by हाडक्या

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 21:28
कधीतरी ती ५००-६०० सासवांच्या बरोबरीनी असलेल्या ५-६ सासवा असलेली सिरिअल बघा...किंवा तो देसाई कुटंबियांचा रेशिमगुंता बघा...किंवा ती जावै विकत घ्यायची सिर्यल बघा....डोक्याला बरेचं प्राणी लागतात =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या Fri, 02/20/2015 - 16:35
लग्नाआधीच बायकोला विचारलं होतं "एकही मालिका बघत नसशील तर बोहल्यावर उभे राहू". ठ्ठो हसत ती हो म्हणाली आणि आजतागायत घरात एकही मालिका पाहिली जात नाही. घरात समाधान आहे, जान्हवीची चिंता नाही की कोणा श्रीबाळाची काळजी नाही. बादवे, लग्नाळू लोकांनी हा सल्ला (सुखी संसाराची १०१ रहस्ये वगैरे वगैरे) शिरेसली घ्यायला हवा असं आता स्वानुभवावरून म्हणू शकतो .. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 02/19/2015 - 13:31
एखादं आवडणारं गाणं जसा त्याच्या संगीतासहित आपल्याला पाठ असतं. तसंच सातच्या बातम्या सुरु होताना ऐकू येणारं संगीत माझ्या आजही लक्षात आहे. त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे.
खिक्कं...!!! बातम्यांचं संगीत एवढंही वाईट नाही बरं का.

राही गुरुवार, 02/19/2015 - 14:05
धर्मगुरूसंबंधित किस्सा काल्पनिक नव्हे तर खराच घडलेला आहे. सध्याचे पोप यांच्याविषयीचा तो किस्सा आहे.

मदनबाण गुरुवार, 02/19/2015 - 14:33
हल्ली डिबेट नावाचा जो काही कॉमन राडा कम वायझेडपणा चालु असतो तो पाहुन टाळकच सरकत माझं ! नुसती आरडा-ओरडी ! त्यातही डिबेटचा सुत्रधार { अर्णब पासुन सगळे } दुसर्‍याला बोलण्याचा पूर्ण वेळ देतच नाहीत. अर्णबच्या आरडा-ओरडीची स्टाईल बाकीच्या मंडळींनीपण आत्मसात केली आहे ! { झी-न्यूजचा कोण एक मोटु आहे, तो वेळा वेळाने विचारत असतो, व्हॉट्स युअर टेक ऑन धिस ? } डिबेट संपल्यावर डिबेटचा विषय काय होता ? हेच तुम्हाला समजणे कठीण जाईल इतका शाब्दिक गोंधळ घातला गेलेला असतो... न्यूज चॅनल आणि सासू-सुन मालिका यात काही अंतर नाही, कारण यांच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि अंत यात काही संबंधच सापडत नाही ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

काळा पहाड गुरुवार, 02/19/2015 - 14:44
त्या आवाजाला संगीत म्हणणं म्हणजे आशिष नेहराला गोलंदाज म्हणण्यासारखंच आहे.
ब्रेकिंग न्यूज१: आशिश नेहराका अपमान ब्रेकिंग न्यूज२: मिसळपाव नामकी साईट पे हुआ अपमान ब्रेकिंग न्यूज३: मिसळपाव मराठी की जानीमानी साईट ब्रेकिंग न्यूज४: 'आशिश नेहरा की बॉलिंग विवादास्पदः चिनार' ब्रेकिंग न्यूज५: चिनार मराठी के जाने माने खेल पत्रकार ब्रेकिंग न्यूज६: '६ बजे: क्या कहते हैं राज ठाकरे विवादास्पद मुद्दे पे'.

In reply to by काळा पहाड

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/19/2015 - 23:11
बाकी काय म्हाय्त नाय, पन... ब्रेकिंग न्यूज३: मिसळपाव मराठी की जानीमानी साईट ह्ये यकदम बराबर हाय आसं अंतर्गत गोटातूण कळ्ते :) ;)

तिमा गुरुवार, 02/19/2015 - 14:47
टी.व्ही.,स्मार्टफोन, दुचाकी,चारचाकी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा. मग बघा, जीवन किती सुखद होईल.

In reply to by तिमा

हाडक्या गुरुवार, 02/19/2015 - 20:49
वळलो होतो. मागच्या येळला निसर्गाकडं वळलो हुतो तेव्हा आबा बोल्ले "त्ये "सुलभ" बांधलंय नव्हं, तिकडं वळा.." आता तवापासून समदं आवगड झालय बगा. :))))

In reply to by तिमा

अमित खोजे गुरुवार, 02/19/2015 - 22:57
खरं सांगायचं तर टिव्ही या माध्यमापासुन दूर असल्याने माझे जीवन खरंच खूप छान चालू आहे. भरपूर पुस्तके वाचता येतात. बाहेर फिरता येते. घरातल्यांशी गप्पा मारता येतात. मी अमेरीकेत रहातो. त्यामुळे तसं पहायला गेलं तर भारतीय टिव्ही तसाही माझा सुटलाच आहे परंतु मी इथलाही टिव्ही बघत नाही. कोणतेही चॅनल घेतलेले नाही. पण याचा अर्थ असा नाही कि मी टिव्ही बघतच नाही. घरी नेट कनेक्शन आहे. त्यावरती नेट्फ्लिक्स आहे, युट्युब आहे. हवे ते कार्यक्रम हव्या त्या वेळेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विनाजाहिराती - व्यत्यय न येता बघता येतात. भारताची क्रिकेट्ची मॅच बघायची आहे? इ.एस.पी.एन.वर हव्या त्या मॅचेस तुम्हाला अगदि नाममात्र किंमतीमध्ये बघण्यासाठी उपलब्ध आहेत. नविन प्रदर्शित झालेला सिनेमा बघायचा आहे? प्रदर्शनानंतर थोड्याच आठवड्यात तो अधिक्रुत (चुकिचा क्रु आहे. बरोबर कसा टाइप करायचा इथ?) वेबसाईटवरती येतो. अगदी नाममात्र पैसे भरून तो बघता येतो. मग कशाला हवंय त्या भरमसाठ जाहिराती मध्येमध्ये? अगदी जाहिरातीच बघायच्या आहेत का? त्यापण जालावर मिळतील. मराठी मालिका बघायच्या आहेत? भारतात प्रदर्शित झाल्याच्या दुसर्या दिवशी त्या युट्युबवरती आलेल्या असतात. आता कुणी म्हणेल कि काय राव! जगात काय चाललंय ते माहिती करायला तरी टिव्ही बघायलाच पाहिजेच कि. त्यावर माझे स्पष्ट म्हणणे आहे की जगात रोज काय चाललंय ते रोज माहिती करून घ्यायची मला माझ्यापुरती तरी गरज वाटत नाही. जर खरंच काही खूप महत्वाची घटना असेल तर ती या ना त्या मार्गाने आज नाही तर उद्या कशीही तुम्हाला कळेलंच. अशा घटना आपल्याला जेव्हा च्या तेव्हा मिनिटाच्या फरकाने कळायला आपले जीवन काही संपूर्णपणे शेअर मार्केट्वरती अवलंबून नाही.

In reply to by अमित खोजे

नाटक्या Fri, 02/20/2015 - 03:40
मी पण अमेरिकेतच रहातो. आणि आपण सांगितलेले सर्व तंतोतंत मला लागू पडते. एक फ़रक म्हणजे माझ्याकडे गेली १२ वर्षे टिव्हीच नाही. जे काही बघायचे, वाचायचे ते संगणकाच्या पडद्यावर. आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर "अशा घटना आपल्याला जेव्हा च्या तेव्हा मिनिटाच्या फरकाने कळायला आपले जीवन काही संपूर्णपणे शेअर मार्केट्वरती अवलंबून नाही."

पिंपातला उंदीर गुरुवार, 02/19/2015 - 14:50
मिडीया , बॉलीवूड , राजकारणी , क्रिकेट खेळाडू यांच्यावर सर्वसामान्य पब्लिक जरा जास्तच खार खाऊन असतात . फेम , पैसा , glamor हे असले पर्क असल्यामुळेच बहुदा या क्षेत्रातले लोक collective jealousy चा निशाणा बनत असावेत अशी एक थेयरि वाचली होती . वास्तविक इतर कुठल्याही क्षेत्राप्रमाणेच या क्षेत्राचे चे आणि इथल्या लोकांमध्ये गुण आणि दोष आहेत . पण प्रसिद्धी च्या प्रकाशझोतात असल्याने यांचे दोष / वाद विवाद पटकन लोकांच्या डोळ्यात भरतात आणि सरसकट करण करणे हा आपला राष्ट्रीय गुणधर्म असल्याने आपण चटकन लेबल लावून मोकळ होतो .

In reply to by पिंपातला उंदीर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/19/2015 - 23:18
फेम , पैसा , glamor हे असले पर्क असल्यामुळेच बहुदा या क्षेत्रातले लोक collective jealousy चा निशाणा बनत असावेत अशी एक थेयरि वाचली होती. याऐवजी; "फेम , पैसा , glamor हे असले पर्क मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जायला कमी करत नाहीत यासाठी ते निशाणा बनत असावेत." ही थिअरी जास्त विश्वासू वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुळात वयाचा आणि अभ्यासाचा काही संबंध नसतो . बर ते जाऊ दे . कुठल्या क्षेत्रात अस पब्लिक नसत ? कळावे

In reply to by पिंपातला उंदीर

मुळात वयाचा आणि अभ्यासाचा काही संबंध नसतो. माझ्या प्रतिसादात "वय अथवा अभ्यास" हे शब्द कुठे दिसले ??? याबाबतीत तुमची गल्ली चुकली आहे :) असो. माझे वरचे म्हणणे अजून थोडे इस्काटून सांगतो... "फेम , पैसा , glamor यापैकी एका अथवा अनेक पर्क मिळविण्यासाठी कुठल्याही थराला जायला कमी न करणार्‍या कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्ती असेच निशाणा बनतात." निशाणा बनण्यासाठी इथे क्षेत्र नाही तर वर्तणूक महत्वाची आहे.

अर्धवटराव गुरुवार, 02/19/2015 - 21:35
इतकं का पेटलाय हो ? बातमांच्या नादात एखादी महत्वाची एनिव्हर्सरी विसरलात कि काय ?? :)

संदीप डांगे गुरुवार, 02/19/2015 - 23:21
दहा बारा वर्षांआधी एकदा सुट्टीत आठ दिवस घरी आलो असतांना दिवसाचे सोळा तास नुसता न्यूज चॅनल बघत लोळत होतो. काय माहिती काय नशा चढली होती. पण त्या आठ दिवसात सगळा इलेक्ट्रोनिक मिडिया कोळून प्यायलो आणि तेंव्हापासून हा प्रकार अजिबात बंद आमच्याकडे. चुकुनही कोणत्याही चॅनलवर स्क्रीनचे २/४/६/८ भाग दिसले की आपोआप पुढे ढकलल्या जातो.

बॅटमॅन गुरुवार, 02/19/2015 - 23:42
बाकी ते ७ च्या बातम्या सुरू होतानाच्या म्युझिकचा व्हिडो हाय काय कुणाकडं? यूट्यूबवर वगैरे असेल तर लिंक द्या की म्हणावं, लय आवडायचं ते म्युझिक.