मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खानदेश सफर

त्रिवेणी · · जनातलं, मनातलं
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर ! अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं ! अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार ! अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार ! निरक्षर असुनही जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा असलेली खानदेश कन्या. अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी एक साधी शेतकरी महिला. तसेच ना धो महानोर शेती, माती, पाणी, पीक आणि निसर्गाशी नाते जपणारे कवी अशा मातीशी जोडलेली, निसर्गाशी जोडलेली, रोजचे जीवन काव्य रूपात आपल्या समोर उभे करणारे खानदेशचे हीरे. या अशा माझ्या खानदेशची मला जमेल तशी सफर सगळ्यांना घडवने कधी पासून मनात होते. तर मंडळी जसे शक्य होईल तशी माझ्यापरीने सुरवात करते. दख्खन पठाराच्या उत्तरेला विविध वैशिष्ट्यांनी नटलेला व गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला भूप्रदेश म्हणजे खानदेश. अगदी प्राचीन काळापासून तर आतापर्यंत खांडववन, सेऊणदेश, ऋषिक, दानदेश, स्कंददेश, कान्हदेश (खान्देश) अशा वेगवेगळ्या नावांनी हा भूप्रदेश ओळखला गेला आहे. 'कान्ह देश'पासून खान्देश शब्दाची उत्पत्ती झाली आहे. आता जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे खान्देश म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेने या जिल्ह्यांची सांस्कृतिक, सामाजिक अशी स्वतंत्र ओळख आहे. या भागाची कृषी संस्कृती खाद्य संस्कृती वेगळी आहे. येथे प्राचीन परंपरा आहे. अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी बरोबरच जळगाव जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेली पाटणादेवी, मुक्ताईनगर, चांगदेव, कोथळी, मनुदेवी, उनपदेव, रामेश्वर अशी अनेक तीर्थस्थळे, पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांची बर्‍याच लोकांना माहिती नाही. गहू हे मुख्य अन्न असलेली उत्तरेकडचा भाग तसेच तांदूळ हाच मुख्य अन्न घटक असलेला दक्षिण भाग यांच्या मधोमध असलेल्या आपल्या महाराष्ट्रात चौरस खाद्यसंस्कृती आहे. आणि ही खाद्यसंस्कृती ही आपल्या रोजच्या जेवणात आपण आंगीकरली आहे. सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. सगळ्याप्रकारची फळं, धान्य, कडधान्य, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने नटलेली आहे. पोळा आणि अक्षयतृतीय हे दिवाळी इतकेच महत्वाचे सण प्रत्येक खानदेशी माणसाच्या जिवाहळ्याचे. पोळा हा पोळा हा सर्वच खानदेशी शेतकरी बांधवांचा सण. तर अक्षयतृतीयेला जावयाचा मान. ह्या सर्वच सण उत्सवांसाठी आणि एरवी कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी खीर, आंब्याचा रस, हरभर्‍याच्या डाळीची रस्सी म्हणजे मसालेदार आमटी, भात, नागलीचे पापड, कुरडय़ा कांद्याची भजी असा भरगच्च बेत ठरलेला असतो. मातीचे खापर चुलीवर ठेवून पुरणाचे सारण भरून तळहातावर रूमाली रोटीसारखी केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी किवा मांडे. अक्षयतृतीयेला जावयाला याच मांड्यांचा पाहुणचार असतो. आम्हा खान्देशी मंडळींना तिखटाचे वावडे नाहीच. अगदी भाकरी किंवा पोळीवरही आम्ही तेल, तिखट व मिठ घालून खातो. तसाच अजून एक पदार्थ – दाळ बट्टी/ बाटी. ज्या प्रमाणे भरीत पार्टी होते तशीच खानदेशात बट्टी चे जेवण ही कोणी टाळत नाहीत. मस्त शेतात एक मोठा खड्डा करून त्यात गोवार्‍यांवर भाजलेल्या खरपुस बट्ट्या एका कापडाने पुसून गवराण तुपात बुडवून मग डाळीबरोबर खाणे म्हणजे स्वर्गसुखच. यालाच काहीजन रोडगा असे म्हणतात. ठसकेबाज शब्दसंपदा असलेली आणि ऐकायला गोड अशी अहिराणी भाषा, कष्टमय जीवनशैली आणि तितकीच अस्सल गावरान व झणझणीत शेवभाजी व वांग्याचं भरीत, ही खानदेशची खाद्यसंस्कृती. हिरव्या वांग्याच भरीत हे सुद्धा आमचे जीव की प्राण. रोजच्या जेवणात मसालेदार, तिखट व चमचमीत पदार्थांचा समावेश असतो. "वांग्याचं भरीत आणि शेवभाजी म्हणजे खानदेश' असं समीकरणच आहे .नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जळगाव जिल्ह्यातील बामणोद, भालोद, ममुराबाद, असोदा, भादली येथे या वांग्यांचे उत्पादन घेतले जाते. या परिसरांतील माती व वातावरण भरताच्या या विशिष्ट वांग्यासाठी पूरक आहे. तूर व कपाशीच्या काड्यांवर खरपूस भाजलेली वांगी, कांद्याची हिरवीकंच पात, लसूण, लवंगी मिरच्यांचा हिरवा ठेचा आणि तेलाचा सुयोग्य वापर करून तयार केलेलं चटकदार भरीत केळीच्या हिरव्या पानावर पाहताच भूक नसणाऱ्यालाही सपाटून भूक लागते. p मला अजुनही आठवते लहान असताना हट्टाने सुकलेल्या काड्या कोलोनीत कुठे मिळतात का हे शोधायला जात असे नाही मिळाल्या की कामाला असलेल्या आजीची रवानगी काड्या शोधायला पाठवत असे. वडिलांची बदली काही वर्ष सवखेडा नांदेड या गावी झाली होती तेव्हा बँक बंद होण्याआधी काही वेळ तिथले स्नेही काड्यांवर भाजलेले वांगे पाठवत असत कारण कितीही झाले तरी कड्यांची चव गॅसवर येत नसे. जिभेला आलेला तिखटपणा कमी करण्यासाठी देशी साजूक तुपात तयार केलेला रव्याचा दराबा आणि गुळापासून बनवलेली गोडीशेव हा रास्त उतारा.. या दिवसात शेवभाजी व भरताच्या या खानदेशी मेनूचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर-पुणेकर जळगावच्या नातेवाइकांकडं हक्कानं येतात; तर मुंबई-पुण्याकडे असलेल्या आप्तांकडं जळगावकरांच्या वाऱ्या वाढतात. या प्रत्येक वारीत जर त्यांच्याबरोबरच्या सामानाची तपासणी केली तर त्यात भरताची वांगी, कांद्याची हिरवीकंच ताजी पात, शेवभाजीसाठी लागणारी जाड तिखट शेव आणि या दोन्हींना लज्जत आणणारा खास मसाला नक्की सापडेल. होळीला खांदेशात बहुताश घरातून फुणके, कैरीचे पन्हे आणि लाडवे असतात. फुणके- म्हणजे मिश्र डाळींचे मुटके. लाडवे- हे गव्हाच्या पीठाचे छोटे छोटे शेंगोळ्या वळून खडखडीत वाळवून गुळाच्या पाकात शिजवलेला पदार्थ.(याचा फोटो होळीच्या वेळा देईन). त्याच प्रमाणे हिवाळ्यात हिरव्या मिरच्यांची दाणे कूट घालून पातळ भाजी केली जाते. हिवाळ्यातील अजुन एक आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे कळण्याची भाकरी. ज्वारी किवा बाजारी+ अकखे उडीद समप्रमाणात घेवुन केलेली भाकरी त्याबरोबर मिरचीचा झणझणीत ठेचा. तसेच काळ्या उडीद डाळीची पातळ भाजी हे सर्व हिवाळा स्पेशल खानदेशी पदार्थ आहेत. patodya bhaji पातोड्याची भाजी modak मसला मोदक भाजी क्रमश:

वाचने 14089 वाचनखूण प्रतिक्रिया 55

मितान Tue, 02/17/2015 - 13:25
ज्जे ब्बात ! माझ्यासाठी खूप नवी माहिती या लेखात आहे. कान्हदेशी सफर खूप आवडली. शेवटात उगाच हात आखडता का घेतला?

गणेशा Tue, 02/17/2015 - 14:16
मस्त .. लेख आवडला. पुरण पोळी हा माझा २ नंबरचा ( १ नंबरचा लिहिण्याची गरज नसेलच ) आवडता प्रकार आणि त्यातही ते मांडे जबरदस्त. परंतु एकदाच मांडे खाल्ले आहेत. अजुन खाण्याच्या प्रतिक्षेत ( मित्रांच्या गावाला एकदा भेट दिली पाहिजे असे वाटते आहे वरील सर्व प्रकार बघुन) बाकी काळा रस्सा आमच्या घरी पण रोज असतो, पुण्यातील नातेवाईक किंवा मित्र घरी आले की त्यांना फक्त लाल रस्श्याचीच भाजी माहीती असते, पुरणपोळी नंतर करण्यात येणारी आमटी ( रुममेट्स होते तेंव्हा त्यांच्या भाषेत कटाची आमटी) . बाकी इअतर नविन पदार्थांचा नक्कीच आस्वाद गेह्तला जाईन. नुकतेच अजिंठा ला जाणे झाले तेथुन जळगाव येव्हड्या जवळ आहे वाटले नव्हते. छान वातावरण वाटले या भागाचे.. आणि आवडले पण.

मित्रहो Tue, 02/17/2015 - 14:34
मी डोंंबिविलीला राहत असताना ज्या मावशींकडे जेवायला जायचो त्या खानदेशातल्या होत्या. तेंव्हा तिथे पाटोड्याची भाजी फार आवडायची. माझा जवळचा मित्र पण खानदेशातला, तेंव्हा खास असे खानदेशी भरीत, दाळ बाटी आणि शेवेची भाजी बऱ्याचदा खाण्यात आली. मस्त. मसाला मोदक भाजी खाण्याचा योग कधी आला नाही.

विशाखा पाटील Tue, 02/17/2015 - 16:39
मस्त लिहिलंयस! हिवाळ्यातला बाजार आठवला. मेहरूणची टपोरी बोरं, काळा ऊस, ताजी हिरवी वांगी, वालाच्या शेंगा... (वालाच्या दाण्यांची मसाले भाजी राहिली यात :) भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांमध्ये इथल्या बोलीभाषेतले शब्द सापडतात. बहुतेक 'हिंदू' मध्ये 'आरपट्टी' आणि 'पारपट्टी' हे शब्द आहेत. तापी नदीच्या दोन्ही काठावरचे लोक एकमेकांना पारपट्टीचे म्हणतात. स्वत: राहतात ती आरपट्टी, समोरच्याची पारपट्टी :)

Mrunalini Tue, 02/17/2015 - 19:10
वा मस्त झालाय लेख. पातोड्याचा रस्सा काय सही दिसतोय. भुक लागली तो फोटो बघुन. माझी आई पण खानदेशातली.. त्यामुळे बरेच पदार्थ लहानपणा पासुन खाल्ले आहेत. माझा सगळ्यात फेवरेट फोडणीची खिचडी आणि कढी. :)

येऊ द्या...येऊ द्या...येऊ द्या... अजुन अजुन.. येऊ द्या... :clapping: शेवटच्या दोन फोटूंनी पोटात भुकेचा आगडोंब उसळला आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/feed-me.gif अत्ता असलं कुटे खायला मिलणार! :-/

In reply to by त्रिवेणी

अन्या दातार Tue, 02/17/2015 - 22:30
चि व डा स मि र ने आ ण ला हो ता. ला डू चा न झा ले हो ते की छा न झा ले हो ते ते सां गा. मि पा व र दो न्ही चे अ र्थ वे ग ळे आ हे त. ;)

In reply to by अन्या दातार

त्रिवेणी Fri, 02/20/2015 - 10:50
मोबाइल वर प्रतिसाद लिहिताना जाम त्रास होतो. एक जरी शब्द डिलिट करायचा असेल आणि बॅक स्पेस दिली की सगळीच वाक्य रचना बिघडते. म्हणुन मी लिहितानाच एक स्पेस जास्त टाकते. आणि लाडू छानच होते. चिवडा तेवढा राहिला बघा खायचा. समीर आता पुढच्या कट्ट्याला पण जरूर आणा ह चिवडा.

प्रचेतस Tue, 02/17/2015 - 22:39
मस्त. सेउणदेश हा उल्लेख पाहून हेमाद्रीची राजप्रशस्ती आठवली.

स्पंदना Wed, 02/18/2015 - 05:35
क्या बात है!! क्या बात है!! वाह त्रीवेणी ! खानदेशची चव आणि माणसं सगळच एकदम चविष्ट असावं अस राहून राहून वाटतयं. परवा भरीताची चर्चा अजुन संपली नाही तोवर आता हे आख्खं दालन उघडलस खानदेशी चविंच. अस कर प्रत्येक लेखात एक एक पाककृती व्यवस्थीत सांग.

सुपीक जमीन, अनुकूल हवामान यामुळे महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अधिक संपन्न आहे. सगळ्याप्रकारची फळं, धान्य, कडधान्य, तेलबिया यांचे उत्पादन घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने नटलेली आहे. सहमत रावेर तालुक्यातील एका गावातील अर्ध्याहून जास्त जमीन कूळ कायद्यात गेली , आमचे गावातील घरावर पाणी सोडावयास लागले .आजोबांच्या सोबत गावात आमचा छोटासा वाडा पाहण्यासाठी गेलो तेव्हा एसटी स्टेन्ड पासून काही मैल चाललो तेव्हा गावात पोहोचलो, केळी व वर्षाला इतर धान्ये पिकवणारे शेतकरी घरटी एक बुलेट असणारे आमचे एकेकाळचे कूळ पहिली तेव्हा ह्यांनी मिळालेल्या जमिनीचे सोने केले हे पाहून समाधान वाटले. कायदा येण्याच्या हाती पणजोबांनी ह्या जमिनी विकल्या असत्या तर मुंबईत एखादी चाळ व अजून बरेच काही करता आले असते, पण जे झाले त्याची प्रत्यक्षात कोणीच कल्पना केली नव्हती , आमची आजी जळगाव मधील बळीराम पेठेत जन्मली तेथे तिचा भाऊ अजून राहतो , आणि आजीचे बरेच नातेवाईक राहतात व लग्न कार्यात जळगावात अधून मधून जाणे होते , मुंबईत कोणी आले तर पांढरी वांगी बोर मिळतात. लेवा पाटील समाजाने मिळालेली शेती व व्यापारी व संघटीत वृत्तीने खानदेशात किंवा आमच्या डोंबिवली मध्ये सुद्धा चांगलेच बस्तान बसविले आहे . नुकतेच गाजत असलेले साहित्यकार नेमाडे सुद्धा लेवा पाटील समाजाचे खानदेशी साहित्यिक आहेत आमच्या डोंबिवलीत सामंत व चौधरी ह्या खानदेशी लोकांच्या अनेक डेर्या आहेत ,

सुचेता Wed, 02/18/2015 - 13:12
तर आत एक ट्रीप काढाय्लाच हवी म्हणते खानदेशात, अंमळ जळजळ शांत होणार नाही

इशा१२३ Wed, 02/18/2015 - 14:39
त्रिवेणी छान सफर घडवलीस खांदेशाची.चविष्ट पदार्थांचे वर्णन वाचुन तो.पा.सु. प्राथमिक शाळेची चार वर्ष नंदुरबारला काढली आहेत.लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत तिथल्या.प्रचंड चटका लावणार ऊन्,लाल मिरच्या पसरलेली कॉलनीमागची मैदान आणि संध्याकाळी आजुबाजुच्या घरातून येणारा खिचडीचा सुगंध.बहुतेक घरात खिचडी आणि नाचणीच्या पापडाचा बेत असायचा.तो वास इतकी वर्ष झाली तरी आठवणीत. पोळा सणहि असाच.तिथल्या एवढे सजवलेले,रंगीत बैल परत कुठे पहाण्यात आले नाहित.ऐट असायची त्या बैलांची अगदि.मजा वाटायची फार.

ओल्द मोन्क Wed, 02/18/2015 - 15:37
अहिराणी भाषेतील काही म्हणी भरेल घर मा घोड …. घरनी मोरि… मुतानी चोरी … जवाई न पोर…हरामखोर स्मिता पाटील यांचे गाव धुळे जिल्ह्यातिल दहिवद. तसेच लता मंगेशकर यांच्या मामाचे गाव धुळे जिल्ह्यातिल थाळनेर …

In reply to by आरोही

त्रिवेणी Fri, 02/20/2015 - 14:05
तुले काई दमधीर शे की नाई. बट्ठा कामे मलेच देख्ना शेतस. दम धर. बार्बोड्या मोबाइल कै काम नै शे. नीट लिखाताच नै येत त्यावर. चुलीम्हास टाकी दिसु एक दिन.

आम्ही खान्देश चेच , त्यामुळे अधिक माहिती लिहिणे आवश्यक वाटते. पुरणपोळीसाठी जी हरभर्‍याची डाळ शिजत घालावी लागते , तिचे डाळ शिजविल्यानंतर चे वरवरचे पाणी काढुन त्याची मसाले घालून रस्सा बनविला जातो. त्याला आम्ही " रश्शी " म्हणतो. पुरणपोळीच्या जेवणात , भाताबरोबर हीच रश्शी वरुन टाकतो आणि मजेत खातो. त्यादिवशी भातावर वरण नसते. शेणाच्या पेटत्या गोवरींवर , निखारा तयार झाल्यानंतर भाजलेल्या बट्ट्या खायला खूपच खरपूस लागतात. पण आता मुंबई सारख्या शहरात गोवर्‍या आणुन त्यावर बट्टया भाजणे शक्य होत नाही . आता बट्ट्या तशाच घडवितो आणि कढईत मंद आचेवर तुपात तळून घेतो. अशा बट्टया आणि त्यावर तुरीच्या डाळिचे वरण , वर साजुक तुपाची धार, मग काय ? त्यापुढे पंचपक्वानाचे जेवण सुद्धा फिके वाटते. अशा ह्या जेवणानंतर , पाणी खुप प्यावेसे वाटते.तहान खूप लागते.