स्वप्नांचे पान मुंबई
लेखनविषय:
काव्यरस
प्रस्तावना :
आमचे परम मित्र गडप्रेमी वल्ली यांचा कवितेस आग्रह आहे, पण काय करणार कविता करणे २-३ वर्षे झाले सोडले आहे, आणि आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये..
तरीही गेल्या महिन्यात ७ वर्षांनंतर मुंबई सोडली.. आणि जिवनाची एक खरीखुरी मज्जा.. एक अप्रतिम लज्जत.. याला आपण यापुढे मुकनार असे वाटत आहे.
लोकांची माणुसकी .. मदत करण्याची तत्परता.. एक आपुलकी. असे बरेच काही मुंबई देवुन गेली.
मुबई .. आय मीस यु. म्हणुन माझी ही जूनी कविता येथे देत आहे. जी की मी मंबईत गेल्या गेल्या केली होती.
तो काळ वेगळा होता. आज काल दुसर्यांच्या कविता आणि लेख वाचण्यातच जास्त मजा येते. तरीही पाहु पुढे मन काय म्हणते ते.
स्वप्नांचे पान मुंबई
------------------------------------------
स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई
तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई
वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई
मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई
प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई
लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई
नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई
लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई
क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई
भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई
व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई
ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई
कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई
जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई
मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई
महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई.........
- शब्दमेघ
वाचने
3427
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अगदी छान ! मस्त.
आवडली.
एक सहज सल्ला: सुचेल तेंव्हा आणि सुचेल ते लिहा. ठरवून नको. त्यात मजा नाही.
काव्य खूप सुंदर आहे. मुंबईशी खूपच जास्त भावनिक जवळीक दिसते.
अरेरे... मुंबई म्हटल्यावर उगाचंच "हा गाव मिठीच्या काठी" वगैरे आठवून जातं... कृ.ह.घे.
खुपच म्स्त रे
म्हणून इतर गावांचे गोडवे किती गायले तरी मुंबई सोडवत नाही
कविता मस्तच आहे, पण
आता खरेच कविता लिहिण्यासच आवडत नाहिये..हे फार फार वाईट आहे.
सुन्दर
In reply to . by hitesh
हितेसभाई, जरा दमानं!
कविता आवडलीच.
जिवाचे रान, वेळेचे भान, व्यवहाराचे ज्ञान, हाताचे त्राण या उपमा अगदी चपखल आहेत.
मुंबई आवडतेच आणि आवडत्या मुंबईवरची म्हणून ही कविता अधिकच आवडली.
गणेशा, छान लिहिली आहेस कविता !!
क्या बात है गणेशा.
सुरेख कविता. वाक्यरचना आवडली.
@व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई>>> 
मुंबईकर व्यवहार कुशल आहे, त्यांना फक्त घेणे माहित असते, देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतो. संपूर्ण महाराष्ट्राला पिळून मुंबईकर चैन करतात.
In reply to मुंबईकर व्यवहार कुशल आहे, by विवेकपटाईत
अतिशय चुकीचा प्रतिसाद
वाह सुरेखच