मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्वेच्या समुद्रात- १

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मुंबईच्या आश्विनी रुग्णालयात काम करीत असताना एप्रिल १९९८ मध्ये एक दिवस मला विशाखापट्टणम च्या तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर पोस्टिंग झाल्याचे पत्र मिळाले. मुळात मुंबईत येउन मला एक वर्ष सुद्धा झालेले नव्हते (१० महिनेच झाले होते). शिवाय मी क्षकिरण तज्ञ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर परत एम बी बी एस चे काम करण्यासाठी का पाठविले ते कळत नव्हते. आमच्या एका महानिदेशकाच्या (DIRECTOR GENERAL) डोक्यातील सुपीक कल्पनेची हि फलश्रुती होती कि प्रत्येक बढती नंतर डॉक्टरने सुद्धा परत समुद्रावरील नोकरीचा अनुभव घ्यायला पाहिजे. ( या सर्व मूर्खपणाची लक्तरे पुढे मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात निघाली ते पुढे केंव्हातरी येईल) परंतु आलीय भोगासी असावे सदर म्हणून मी त्याबद्दलची चौकशी करण्यास सुरुवात केली तर हे जहाज मुंबईतच असल्याचे कळले. मग मी तटरक्षक दलाच्या मुंबईच्या मुख्यालयात चौकशी केली तेंव्हा असे कळले कि हे जहाज आता मुंबईत असून ते आपला तळ हलवून विशाखापट्टणमला जाणार आहे. आणि हि तळ हलवण्याची प्रक्रिया १ जून पासून सुरु होईल. मी जेंव्हा वरळीच्या मुख्यालयात आदेश घेऊन गेलो कि मला वज्रवर नोकरीवर हजार होण्याचा हुकुम मिळाला आहे तेंव्हा त्यांनी सांगितले कि वज्र सध्या १० दिवस गुजरात समुद्रात गस्तीसाठी गेली आहे. तेथील अधिकार्यांनि माझी खातिरदारी करण्याचा प्रयत्न केला कारण माझ्या इतका वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तटरक्षक दलात कधी आला नव्हता. पहिला दिवस मी इकडे तिकडे करण्यात काढला. मला देण्यासारखे त्यांच्याकडे काम नव्हते आणी मला एक वेगळी खोली देऊन त्यांना अडचणच होत होती. शेवटी मी तेथील मुख्य अधिकार्याला म्हटले कि मी इथे असेच टंगळ मंगळ करण्यापेक्षा अश्विनीत काम तरी करतो. त्याने सुद्द्धा निश्वास टाकत मला सांगितले कि डॉक्टर तुला इथे देण्यासारखे काम माझ्याकडे नाही फक्त तुझा तेथील फोन देऊन ठेव म्हणजे काही लागले तर मी तुला बोलावीन तेंव्हा तुला येथे वरळीला खेपा घालण्याचे कारण नाही. असो वज्र मी महिन्याच्या अखेरीस २५ मे च्या आसपास मुंबईत परत आले तेंव्हा मी तेथे जाऊन रुजू झालो. हे म्हणजे दोन वर्षे नोकरी केल्यावर मी विक्रांत सारख्या प्रचंड जहाजावर( २०,००० टन वजन) विभागप्रमुख म्हणून होतो. तेथे १२५ अधिकारी आणी १००० नौसैनिक होते. आणी आता १० वर्षे नोकरी त्यात एम डी आणी नंतर ५ वर्षे विशेषज्ञ म्हणून काम केल्यावर १२०० टनाच्या बारक्या जहाजावर जेथे ७ अधिकारी आणी ४० नौसैनिक असलेल्या ठिकाणी मला वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते.या जहाजाचा (कमांडिंग ऑफिसर) अधिशासी अधिकारी कमांडर प्रीतपाल सिंग नावाचा एक तर्हेवाईक आणी विक्षिप्त अधिकारी होता हा अगोदर कोचीनला SOO (staff operations officer) म्हणून होता आणी त्याची कीर्ती अशी होती. कोचीनला ओपेरेशनस विभागात एक ए पी सिंग होता आणी एक पी पी सिंग(वरील अधिकारी) होता. ए पी सिंग म्हणजे आधा पागल सिंग आणी पी पी सिंग म्हणजे पुरा पागल सिंग. त्यामुळे तेथे "आधीच मर्कट तशातची मद्य प्याला" अशी अवस्था होती. दिवस भर करायला काहीहि नाही. (जूनचा अक्क्ख्या महिन्यात मी १५ रुग्ण पाहिले होते आणी विक्रांत वर रोज ४५ ते ५० रुग्ण असत). याचा मला आयुष्यात एक मोठा फायदा झाला. कुठेही न जाता विपश्यना अज्ञातवास याचा फुकट अनुभव मिळाला आणी दिवसेंदिवस काहीही न करता कसे काढावे याचे प्रशिक्षण मिळाले. आयुष्यात अत्यंत कमी गोष्टीत आनंदी कसे राहावे याचे एक फार महत्त्वाचे प्रशिक्षण सुद्धा या काळात मिळाले. १ जून रोजी आमचे जहाज मुंबई सोडून विशाखापट्टणम च्या दिशेने निघाले. मुंबई बंदर सोडून बाहेर पडताच मॉन्सूनचे वादळ आमच्या स्वागताला हजर होतेच. मी ब्रिजवर जहाज कसे चालते ते पाहत उभा होतो. माझ्या बरोबर कमांण्डण्ट राजकुमार विश्वकर्मा म्हणून कार्यकारी अधिकारी(EXECUTIVE OFFICER - EXO) तेथे उभा होता. पुलंच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हा पाताळविजयम सारख्या मद्रासी नाटकात दैत्याचे काम करेल असा १२५ किलो वजनाचा सहा फूट चार इंच उंचीचा बलदंड अधिकारी होता. आम्ही येणाऱ्या एका एका लाटेकडे पाहत होतो. अलिबागच्या दक्षिणेला भर समुद्रात गेल्यावर वादळाचा जोर वाढला. आणी दहा फुटाच्या वर लाटा येऊ लागल्या. आणी थोड्याथोड्या वेळाने लाटा इतक्या मोठ्या येऊ लागल्या होत्या कि त्या पार जहाजाच्या ब्रिजच्या वरून जाऊ लागल्या. जहाजाला पूर्ण समुद्र स्नान घडत होते. अशा परिस्थितीत एका लाइफ बोटीचा (१५ -१७ फूटाची लाकडी बोट) बांधलेला पुढचा दोर तुटला आणी ती समुद्रात जाणार एवढ्यात राजकुमार सरांना ते दिसले त्या बलदंड माणसाने त्या बोटीचा पुढचा भाग धरून ठेवला आणी ओरडून तेथे असलेल्या इतर नौसैनिकांना दोर आणण्य़ास सांगितले. तीन सैनिकांना न झेपणारे ते काम या माणसाने एकट्याने केले होते.त्याने आणी इतर सैनिकांनी मिळून ती बोट परत आपल्या जागेवर बांधून टाकली. जहाज भरपूर वरखाली होतच होते. हा अनुभव मला नव्याने परत ८ वर्षांनी मिळत होता अर्थात तो काही आनंददायक मुळीच नव्हता.शेवटी दोन तास ब्रिज वर काढून मी आपल्या केबिन मध्ये गेलो. पोटात डचमळत होतेच. काही खावेसे वाटत नव्हते.भूक नव्हतीच पाणी प्यावे तरी किती वेळा. सारखे हलत असल्याने धड वाचता येत नव्हते. थोडावेळ वोकमन वर संगीत ऐकत होतो. पण तोही आवाज नकोसा होत होता.जहाजाच्या यंत्रांचा कायम येणारा आवाज लोखंडी जहाजाच्या सांगाड्यात सर्वत्र घुमत राहतो. साधी शांतता किती सुखद असते त्याची कल्पना अशा वेळेस येते. टीव्ही नव्हताच (म्हणजे असून प्रक्षेपण पकडता येत नव्हते). बोलायला माणूस नव्हता. बाकी पाच अधिकारी आपापले काम करीत होते.एक सुटीवर होता. मला एक निसर्गाचे वरदान आहे ते म्हणजे मला भरपूर झोप येते(आजही). त्यामुळे मी तेथे केंव्हाही तास दोन तास झोपत असे. तरीही दिवसात बारा तास कसे काढायचे हा मोठाच प्रश्न होता. जहाज चालते कसे याचा अनुभव मी विक्रांतवर २ वर्षे काढल्याने पुरेपूर होताच, ब्रिजवर जाऊन समुद्राकडे किती वेळ पाहत बसणार. रात्री वर गेले तर समुद्राचा आवाज आणी भयाण अशी ढगांची काळी सावली.पावसाळी वातावरणामुळे तारे किंवा चंद्र सुद्धा दिसत नसे. अशी मला दोन वर्षे काढायची होती या विचाराने सुद्धा उदास होत असे. क्रमशः

वाचने 28175 वाचनखूण प्रतिक्रिया 38

कंजूस Mon, 11/10/2014 - 06:08
आवडलं. एक सुचवू का ?थोडे संवाद अधूनमधून पेरता येतील का ?'फुकटची विपश्यना' मजेशिर तुमच्या माध्यमातून आम्हालाही सैन्यदलाचा अनुभव मिळतोय. मनुष्यस्वभावाचे क्षकिरण तुमच्या फिल्मवरचे रंगित आहेत.

समीरसूर Mon, 11/10/2014 - 12:01
छान लेखन! दोन वर्षे अशी काढायची म्हणजे कसोटी असेल. मला कालचा रविवार खायला उठला होता. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वेळ कसा काढला माझं मला माहित. आणि अशी दोन वर्षे काढायची...कमाल आहे. दोन-चार जणं मिळून काही पार्टी वगैरे नाही करता येत का जहाजावर? अर्थात पार्ट्या तरी किती करणार म्हणा. नाहीतर जहाजाच्या डेकवर मस्त चार जणं बसलेत, चांदण्यांनी डवरलेलं आकाश आहे, समुद्रावरून येणारा गारवा अंगाला गुदगुल्या करतोय, हातात स्कॉचचे ग्लासेस आहेत, खायला काहीतरी मस्त चमचमीत आहे, मधूनच कुणीतरी "रंजीश ही सही..." किंवा "कल चौदहवी की रात थी..." चे रेशमी सूर छेडतोय, सगळ्या गात्रांवरून जणू एखादे मोरपीस फिरते आहे, कुणीतरी गिटारवर एखादी रोमँटिक धून वाजवतोय, मग शाळा-कॉलेजच्या आठवणी निघतायेत, कुणाला तरी त्याची शाळेतली एखादी आवडणारी आठवतेय, आठवणींच्या गर्द रानात हरवून तो त्याच्या त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी जागवतोय, मग सगळ्यांनाच हळूहळू आपापली खास ठेवणीतली प्रेयसी आठवतेय, माहोल एकदम रेशमासारखा मऊ-मुलायम झालाय...वा वा...पण असं काही करण्याची परवानगी नसावी बहुधा. एकदम काही एमर्जन्सी आली तर चटकन कृती करणं अवघड होऊन बसायचं. :-) अर्थात हा माझा तर्क आहे. मला नक्की माहित नाही. पुढील भागांची वाट पाहतोय...

In reply to by प्रभाकर पेठकर

समीरसूर Mon, 11/10/2014 - 15:29
अरे हो, हे विचारायचेच राहिले. मी वर्णन केल्याप्रमाणे मैफिली जमतात का अशा सफरींवर? म्हणजे तसे अलौड असते का? कुणी असे करते का? आपण कुठल्या अशा मैफिलीमध्ये सहभागी झाला आहत का?

In reply to by समीरसूर

सुबोध खरे Mon, 11/10/2014 - 18:45
समीर साहेब आम्ही "घेत" नसलो तरी अशा अनेक मैफिलीत आम्ही सक्रीय सहभागी झालो आहोत आणी होत आहोत. आमच्या नागरी (सिव्हीलीयन) मित्रांचे अनेक तीर्थप्राशनाचे कार्यक्रम आमच्या मदतीने झालेले आहेत. विक्रांत या जहाजावर संध्याकाळी निलकक्ष (BLUE ROOM) मध्ये बसून संध्याकाळी ७ ते १० ( मद्यालायाची वेळ - BAR ) अशा अनेक मैफिली अनुभवल्या आहेत.त्यानंतर जेवण झाल्यावर उड्डाण तळावर(FLIGHT DECK) वर मित्रांबरोबर शतपावली करणे हा नित्याचा कार्यक्रम असे. परंतु बाहेर वादळ चालू असताना आणी आभाळात फक्त काळे ढग आणी पाऊस असताना शिवाय जहाज ३० अंशाच्या कोनात दोन्हीकडे आणी वरखाली हेलकावे खात असताना अशी मैफिल जमवणे केवळ अशक्य असते. याचे अधिक वर्णन पुढे येईलच. (मद्य न पिताच आपण झिंगल्यासारखे चालत असलो आणी तशीच उलटीची भावना असेल तर कोण मद्य पिण्याच्या नादाला लागेल)

In reply to by विशाखा पाटील

बहुगुणी Wed, 11/12/2014 - 03:27
सुरूवात कंटाळ्याने झाली असेल तरी पुढे रोचक होत जाणार याची खात्री आहे.

सुधांशुनूलकर Mon, 11/10/2014 - 15:30
छान सुरुवात झाल्यामुळे पुढचे लेखही मस्तच होणार! आम्हाला इथून रेवसपर्यंतच्या प्रवासात आख्खं आतडं कंठाशी येतं, तुम्ही - सवयीमुळे का असेना - कित्येक महिने या वातावरणात राहिलात... या विचाराने कंठ दाटून आला. कंजूस यांनी म्हटल्याप्रमाणे, तुमच्या फिल्मवरचे मनुष्यस्वभावाचे क्षकिरण रंगीत आहेत.... १००% सहमत.

प्रसाद१९७१ Mon, 11/10/2014 - 16:00
असे म्हणतात की तुमच्या मित्रा ला जर तुमचे शत्रु बनवायचे असेल तर त्याला बोटीच्या लांबच्या प्रवासाला घेउन जा. सतत तोच तोच माणुस बघुन त्याच्या चांगल्या गोष्टी/कृती सुद्धा तुम्हाला नकोश्या वाटायला लागतात.

In reply to by प७९

सुबोध खरे Mon, 06/03/2019 - 09:15
दोन जहाजांवर काम केलं होतं. तारुण्याची तीन वर्षे या जहाजांवर काढली होती. दोन्ही निवृत्त झाली. अगोदर विक्रांत आता वज्र. कालाय तस्मै नम: