मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

पुस्तकमित्र · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.

वाचने 38074 वाचनखूण प्रतिक्रिया 137

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 02:30
न आवडणारे पुस्तक पूर्ण वाचवलेच जात नाही, मग त्याविषययी लिहिणार तरी कसे ? त्यातून " समग्र ग्रंथ पाहिल्याविण, उगाच देई दूषण, मनुष्य नव्हे पाषाण, मनुष्यवेषे" असे समर्थ सांगून गेलेतच... तस्मात पसार. हां, मात्र असे कधीकधी होते, की विशीत आवडलेले पुस्तक चाळीशीत नावडते ठरते वगैरे...

कंजूस Sat, 07/05/2014 - 02:55
पक्षीकोष ,मारुति चितमपल्ली यांचे .मोठे जाडजूड पुस्तक ,अगोदर काही पुस्तके आली आहेत म्हणून हाती घेतले .पण नाही आवडले .रंगीत चित्रे नाहीत .पक्षांची संस्कृत /मराठी नावे शोधण्याचा खटाटोप वाटला .थोडेसे पक्षी घेऊन प्रथम लहान पुस्तक काढायला हवे होते .

अजया Sat, 07/05/2014 - 08:48
नुकतच जॉन ग्रीनचं लूकिन्ग फॉर अलास्का वाचलं. फॉल्ट ईन युअर स्टार्सचा फेमस बेस्ट सेलर लेखक.त्याची ही पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. अमेरिकेतल्या बोर्डींग स्कूलमध्ये राहणार्‍या टीन एजर मुलांची ही गोष्ट आहे. मला त्यातला न आवडलेला भाग म्हणजे सतत हे मुलं दारू पीत असल्याचे,स्मोकींगचे, आणि शारिरीक आकर्षणाचे उल्लेख. ते इतक्या वेळा येतात की ही मुलं हे सोडून दुसरं काही करत नाहीत की काय असं वाटायला लागतं. कथाही उल्लेखनीय वाटली नाही. अर्थात ती आवडणारेही लोक असणारच. मला मात्र अत्यंत कंटाळवाणी वाटली एवढं खरं!!

पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमातील सगळ्या विषयांची सगळी पुस्तके. त्या वेळी अभ्यास करताना तरी कधीच आवडली नाहीत आणि नंतर वाचायचा कधी प्रयत्न केला नाही. (इथे पुस्तके म्हणजे कादंबरी असे अपेक्षीत असेल तर अवांतरा बद्दल क्षमस्व) पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

प्रसाद प्रसाद Sat, 07/05/2014 - 09:57
पी. एच. डी. चा प्रबंध असावा असेच युगंधर आहे किंवा मोठी कांदबरी लिहायची म्हणून बरीच माहिती काढली आहे पण अजून अंतिम स्वरूप आलेले नाही. माहिती ठासून भरली आहे. पण लेखकाचा अनुभवसंपन्न अंतिम हात फिरलेला नाही असं युगंधर वाचून वाटलं होतं. मृत्यंजयप्रमाणेच आकृतिबंध पण चुकीच्या व्यक्ति कथा सांगताहेत असं का कुणास ठाऊक वाचताना वाटलेलं आठवतं.

In reply to by प्रचेतस

कवितानागेश Sat, 07/05/2014 - 10:21
मोठा सेटबॅक!! :D मी कशीबशी २५ पाने वाचली, मग चाळलं... आणि दुसर्‍य दिवशी ज्यानी कौतुकानी दिले होते त्याची अजूनच 'कौतुक' करुन त्याला परत दिलं. एकतर असं खूप वर्णन वर्णन वाचलं आणि नाटकी डायलॉग्ज वाचले की नासी. फडकेंची कादम्बरी वाचल्याचं फीलिन्ग येते. सगळंच प्लास्टिकचे. खरी माणसं दिसतच नाहीत. पुन्हा मूळ संहितेत बदल केले की रस्ताच चुकल्यासारखं वाटतं.

In reply to by कवितानागेश

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 12:18
सहमत. 'युगंधर' कादंबरी फसण्यामागे शिवाजी सावंत आणि प्रकाशकांची 'मृत्युन्जय' चे यश 'युगंधर' मध्ये एन्कॅश करण्याची व्यावसायिक गणिते कारणीभूत असावीत असं सारखं वाटत राहतं.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 15:34
'युगंधर' हे पुस्तक उत्कृष्ट असल्याचे अधून-मधून उल्लेख वाचनात येत असल्याने उत्सुकता होती. मागे दिवाळी मिपा अंकातली 'नरकचतुर्दशी' ची कथा लिहिताना लायब्ररीत युगंधर दिसले, ते चाळल्यावर निराशा झाली, त्यामुळे पुस्तक घरी आणलेच नाही. तात्पर्य, हे पुस्तक न आवडणारांपैकी मीही एक (अर्थात 'समग्र ग्रंथ वाचल्याविण') यावरून आठवले, रणजीत देसाईंचे 'राजा रविवर्मा' फार वर्षांपूर्वी वाचले होते. चित्रकारांबद्दल कादंबर्‍यांची मराठीत वानवाच असल्याने मोठ्या उत्सुकतेने (पूर्ण) वाचले. परंतु त्यात रविवर्मावरील कोर्टातले खटले, वगैरेवरच फार लिहिलेले होते, आणि प्रत्यक्ष चित्रकलेबद्दल विशेष काहीच नव्हते, म्हणून निराशा झाली होती. अवांतरः रविवर्मा वरील केतन मेहता यांनी बनवलेला सिनेमा 'रंगरसिया' कुणी बघितला आहे का? हा मुळात रिलीज झाला की नाही, याची डीव्हीडी मिळते का, वगैरे बराच शोध घेऊनही समजलेले नाही.

In reply to by चित्रगुप्त

एस Sun, 07/06/2014 - 14:58
ज्या चित्रामुळे त्यांच्यावर खटला दाखल होतो ते चित्रच कादंबरीत दिलेले नाही. इतर चित्रे मात्र दिलीयेत. पण असा प्रयत्न मराठीत होणेच कौतुकास्पद वाटले.

In reply to by एस

यशोधरा Sun, 07/06/2014 - 15:25
राजा रविवर्मा कादंबरी मला आवडली नाही. रविवर्म्याचा चित्रकार होण्याच्या प्रवासापेक्षा इतर फापटपसारा अधिक वाटला. भाषाही फारशी जमलेली नाही, हे वै म.

In reply to by प्रचेतस

चिगो Wed, 07/09/2014 - 16:39
युगंधरबद्दल सहमत.. अत्यंत शब्दबंबाळ कादंबरी.. पाच दहा पानातच दमलो आणि लेखकाला "अरे, काय सांगायचं आहे ते स्पष्ट बोल ना जरा.." असं म्हणावंसं वाटलं, पण ते शक्य नव्हतं.. :-( "मृत्युंजय"पण कधीकाळी वाचणीय वाटलं होतं, तरी आता शब्दबंबाळ वाटतं.. संभाजीपण जरा ह्याच कॅटेगिरीतलं.. वपुंची "बाई, बाटली आणि कॅलेंडर", "वन फॉर द रोड", "कर्मचारी" इत्यादी बरी वाटत असली तरी नंतरनंतरची बरीच पुस्तके बोथड, बोजड वाटतात.. पुलं मात्र कधीच बाळबोध वाटले नाहीत. उलट हा माणूस जगणं एवढं कसा रसरसून एंजॉय करु शकतो, ह्याचं नेहमीच कौतुक वाटत आलंय.. माझ्यामते, "विनोदी"च्या नावाखाली ज्याच्या लिखाणाची अनेक अंगे दुर्लक्षीत करण्यात आली असा लेखक म्हणजे पुलं..

In reply to by प्रसाद प्रसाद

यशोधरा Sat, 07/05/2014 - 10:13
हो लिहिन सविस्तर वेळ झाला की, पण थोडक्यात म्हणायचे झाले तर मला ते लिखाण पटले नाही. फार एकांगी असे वाटले. मागे कुठेतरी मी थोडेफार लिहिलेही आहे त्याबद्दल. ठोस असे काही आढळले नाही मला त्या कादंबरीत.

In reply to by यशोधरा

कवितानागेश Sat, 07/05/2014 - 10:24
मी एका मित्राकडून असंही ऐकलं की यातली भाषाही वाईट आहे. मध्येमध्ये हिन्दी शब्द, हिन्दी क्रियापदं वाचताना दाताखाली खडा आल्यासारखं होतं.. त्यामुळे मी वाचायला घेतलच नाही.

प्रसाद प्रसाद Sat, 07/05/2014 - 10:01
विजया मेहता लिखित झिम्मा वाचले होते. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे जास्त लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले. झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात. वयाच्या पंचविशीपर्यंत बाई आत्मचरित्र रूढ अर्थाने आत्मचरित्रासारखे सांगतात, बालपणीचे किस्से येतात, मुख्यत: आठवणी आई-वडील-आजी-गावाकडचे घर अशा घरगुती स्वरूपाच्या, शाळेच्या, शाळूसोबतींच्या, शाळेतल्या शिक्षकांच्या फारशा आठवणी बाई सांगत नाहीत. बाई आठवणीने त्यांच्या नात्यातील शोभना समर्थ आणि नुतनचा उल्लेख एक दोन प्रसंगापुरता करतात. बाईंचे घर विचाराने आचाराने पुढारलेले होते असे जाणवते, घरातील मुलगी म्हणून त्या काळी (बाईंचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४) असणारी फारशी बंधने त्यांच्यावर आहेत असे दिसून येत नाहीत. त्यामुळेच बाईंचे चरित्र सदैव खळखळत वाहणाऱ्या अल्लड प्रवाहासारखे घडत गेले असे वाटते. मात्र येथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की सुरुवातीला विजयाबाईंच्या आईचा म्हणजेच बायीजीचा बाईंच्या नाटक प्रकरणाला विरोध होता. बाई लहानपणापासून अत्यंत चळवळ्या आणि मनस्वी त्यामुळे इतर तात्कालिक वेडाप्रमाणेच हे ही तात्पुरते वेडच असे घरात समज होता असे आठवणीने बाई नमूद करतात. कॉलेजमध्ये गेल्यापासून मात्र बाईंचे हे आत्मचरित्र थांबते आणि सुरु होते त्यांचे नाट्यचरित्र. वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून इब्राहिम अल्काझीपासून सुरु झालेलं नाट्यशिक्षण पीटर ब्रूक पर्यंत, वयाची पन्नाशी उलटून गेली तरी सुरूच राहिले असे बाई अभिमानाने सांगतात. आणि ह्यादरम्यानचा त्यांचा नाट्यप्रवास म्हणजेच – झिम्मा. ह्यामध्ये रंगायनची स्थापना, रंगायनचे सुरुवातीचे सहकारी अरविंद देशपांडे, नाटककार विजय तेंडुलकर यांच्यासोबत केलेली सुरुवात त्याचबरोबरच रंगमंचाची, संहितेची, नाट्याविष्काराची येत गेलेली समज याचे साद्यंत वर्णन बाईनी केलेले आहे. मध्येमध्ये विजयाबाई आपल्या खाजगी आयुष्याबद्दल त्रोटक माहिती पुरवत राहतात. जसे वयाच्या पंचविशीपर्यंत लग्न न करता राहण्यासाठी बाईनी घेतलेला नाटकाच्या, त्याच्या तालमीचा आधार. अचानक नाटकाच्या संदर्भातूनच झालेली दुर्गाबाई खोटेची ओळख, रंगायनला त्यांनी मुघल-ए-आझमच्या कपडेपटातून नाटकासाठी दिलेली ड्रेपरी यांचा प्रासंगिक उल्लेख येतो, त्यातून दुर्गाबाईंनी त्यांच्या मुलासोबत दिलेला लग्नाचा प्रस्ताव मग हरेन खोटेशी लग्न, दुर्गाबाईंचा हौशी स्वभाव, त्यानंतर लगेच विजयाबाईंचे नवऱ्याबरोबर जमशेदपूरला स्थलांतर, रोजच्या रुटीनने आलेला कंटाळा आणि हे लक्षात घेऊन हरेन खोटेनी परत मुंबईत हलवलेले बिऱ्हाड. परत बाईंचा रंगायनशी पर्यायाने नाटकाशी आलेला संबंध. पु. ल. देशपांडेंच्या नाटक निमित्ताने झालेला परिचय, नव नाट्याच्या ध्यासाने बाईनी केलेला ब्रेश्तच्या चेअर्स या न-नाट्याचा फसलेला प्रयोग आणि पु.ल नी त्याचे केलेले विडंबन (मला वाटते खुर्च्या नावाने पुलंच्या उरलंसुरलं ह्या पुस्तकात हे विडंबन आहे.). बाई अगदी स्पष्टपणे पुलंनी त्यांच्यावर केलेले हे विडंबन आवडले नाही हे सांगतात. त्याचबरोबर रंगायन टीम आणि बाई यांचा पहिला परदेश दौरा पुलंनी दिलेल्या वाईट अभिप्रायामुळे रद्द झाला हे ही बाई खेदाने सांगतात. (खरेतर पुलंचे नाट्यप्रेम आणि नवनिर्मितीचे त्यांचेही चाललेले प्रयोग पहाता पुलं असं काही करतील असं मला तरी वाटत नाही). ह्यानंतर मात्र बाईंच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले आणि बाई नवऱ्याबरोबर इंग्लंडमध्ये बोर्नव्हिलला गेल्या. परत दोन वर्षाने भारतात आल्यावर बाईंना जाणवलेली कटू सत्य - रंगायनच्या नाट्यचळवळीत बाईंची अनुपस्थिती रंगायनला मारक ठरली होती, रंगायन फुटायला सुरुवात झाली होती त्यातच भारतात परत आल्याबरोबर सहा महिन्यात अचानक हरेन खोटेचा हार्टअॅटॅकने झालेला मृत्यू होतो. त्यावेळी दोन मुले बाईंना झालेली असतात. बाईंचे आयुष्य नवऱ्याच्या अपमृत्युने आणि रंगायनच्या फाटाफुटीमुळे भोवऱ्यात सापडते. कसलेही प्रसंग, व्यक्ती न सांगता बाई सांगतात की मी चुकले आणि ह्या चुकीमुळे दुर्गाबाई खोटे दुरावल्या. एका परिच्छेदात बाई परत खाजगी आयुष्य अत्यंत त्रोटकपणे सांगतात त्यावरून बाईंच्या आयुष्यात कोणी तरी पुरुष येऊन गेला आणि बाई चुकल्या इतकेच कळते (विजयाबाई स्वत: ह्या प्रसंगाचा उल्लेख मी चुकले असाच करतात). ह्यानंतर परत अगदीच थोडक्यात फरोख मेहताची नाटकाच्या संदर्भातूनच भेट आणि लग्न. फरोख मेहता पारशी पण त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांनी बिना अगदी मनापासून स्वीकारले तसेच मुलांना ही सावत्र बाप कधीही न जाणवू देता फरोखनी प्रेम केले अगदी स्वत:ची मुले असल्यासारखे आणि त्यांचे आडनाव मात्र खोटे असेच राहू द्यावे ह्याबाबत फरोख मेहता आग्रही होते. विजयाबाईना फरोख मेहता पासून अनाहिता नावाची मुलगी आहे. अनाहिता न्यूयॉर्कच्या ब्रॉंडवेला सात वर्ष कार्यरत राहून न्यूयॉर्कमधीलच आणि ब्रॉंडवेत काम करणाऱ्या भारतीयाशी संसार थाटते, अशी परत त्रोटक माहिती आणखी एके ठिकाणी बाई देतात. ह्यानंतर सुरु होते जर्मनी पर्व. विविध संकृत नाटकांचा नाट्याविष्कार प्रथम मुंबईत आणि नंतर जर्मनीमध्ये जाऊन जर्मन भाषेत. विजयाबाई शाकुंतल, मुद्राराक्षस, हयवदन अशी संकृत नाटके जर्मनीत जाऊन केली. एकूणच झिम्मामध्ये विजयाबाई नाटकासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, मिळालेले यश, क्वचित चाखावे लागलेले अपयश अशा भरघोस आयुष्याचा नाट्यआलेख अत्यंत सुरेख मांडतात. त्यांच्या हाताखाली तयार झालेला प्रत्येक मराठी कलावंत आता प्रतिथयश आहेत जसे विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, नाना पाटेकर (काही तालीम ह्याला बाईकडून मिळाली आहे), रिमा लागू इ. विजयाबाई चेष्टेने हे आमचे घराणे (गाण्यात असते तसे) असे सांगतात. स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र हातचे राखूनच सांगतात. बालपणीच्या विस्तृत आठवणीनंतर परत अशा घराच्या आठवणी, किस्से त्या क्वचितच सांगतात. कदाचित आत्मचरित्राकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन तयार झालेला असतो, त्यांत सामाजिक घटनांबरोबरच वैयक्तिक आयुष्यही काही प्रमाणात असावे असे वाटत असते. विजया मेहतांचे पुस्तक म्हणून खूप अपेक्षेने घेतले होते पण फारसे आवडले नाही (पूर्व प्रकाशित)

In reply to by प्रसाद प्रसाद

यशोधरा Sat, 07/05/2014 - 10:23
हे तर आत्मचरित्र आहे, कादंबरी नव्हे. पण मला आवडले होते हे आतमचरित्र, उगाच काहीतरी सनसनाटी लिहिण्यापेक्षा अतिशय संयत भाषेत विजयाबाईनी आपले आयुष्य उलगडले आहे. कोणावरही आगपाखड केली नाही, जिथे स्वतःचे चुकले, तिथे तसे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. एक त्रयस्थ दृष्टीने त्या स्वतःचा जीवन उलगडून दाखवू शकल्या आहेत असे वाटते.

In reply to by यशोधरा

प्रसाद प्रसाद Sat, 07/05/2014 - 10:33
य्येस.... पण आत्मचरित्र कादंबरीसारखेच लिहिले आहे की! पु. लं वर केलेली ती आगपाखड नाही तर काय आहे? सनसनाटी लिहिले तरचं आत्मचरित्र चांगले असे कुठे आहे?

In reply to by प्रसाद प्रसाद

यशोधरा Sat, 07/05/2014 - 10:44
सनसनाटी लिहिले तर चांगले पुस्तक असे नक्कीच म्हणायचे नाहीये, तसेच एखद्याने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल किती सांगायचे हे केवळ ती व्यक्तीच ठरवणार आणि तिचा तो हक्क आपण मान्य करायला हवा. पुलंवर आगपाखड केली आहे असे काही मला वाटले नाही, जे जसे घडलेय ते सांगितले आहे, असे माझे मत. मला बाईंनी कादंबरीसारखे काही लिहिल्याचे वाटले नाही, उलट दुर्गाबाई खोट्यांबद्दल किती जिव्हाळ्याने लिहिले आहे. खूप आवडला होता तो भाग. :) पण पुन्हा एकदा जमल्यास तुमची चिकित्सा समोर ठेवून पुस्तक वाचून पाहते. :)

भुमन्यु Sat, 07/05/2014 - 10:29
ह्या भागाने खुप निराशा केली. खरं तर पहिल्या दोन भागांमध्ये जी उत्कंठा वाढली होती ती ह्या भागात कुठेही वाटली नाही. हा भाग खुप लांबवल्यासारखा देखील वाटला. सतीच्या मृत्युनंतर अतिषय रटाळ होतं....

In reply to by भुमन्यु

सागर Sat, 07/05/2014 - 17:56
मी सध्या वायुपुत्रांची शपथ हेच वाचतोय. वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईनच. पण निम्मे पुस्तक वाचून झाले आहे. अजून तरी छान चालू आहे. आवडत आहे. बहुदा सती मेल्यानंतर (हा मला धक्का आहे कारण मी तेथपपर्यंत अजून आलेलो नाहिये. मराठी अनुवाद प्रत्येक भागागणिक बहरत गेला आहे. त्याचे प्रत्यंतर या तिसर्‍या भागांतही येत आहे. फिक्शन वाचताना माहिती असलेला इतिहास डोक्यातून पूर्ण काढून टाकावा लागतो तरच फिक्शनची मजा घेता येते. मला हे जमत असल्यामुळे असेल कदाचित. पण अतिशय उत्कृष्ट नसली तरी ही शिवा ट्रिलॉजी मला आवडली. सध्या सतीच्या जळालेल्या गालावरचा व्रण पाहून कार्तिक शांत असला तरी गणेशाने सूड घ्यायची प्रतिज्ञा केली येथपर्यंतच मी आलो आहे.

In reply to by भुमन्यु

मृत्युन्जय Mon, 07/07/2014 - 15:23
खरंय शपथ वायुपुत्रांची अपेक्षे एवढे नाही जमलेले. पुस्तके उतरत्या श्रेणीने दर्ज गमावुन बसलेली आहेत. रहस्य नागांचेही चांगले होते पण मेलुह एवढे नाही. पण मला तिन्ही पुस्तकांची मांडणी आणि संकल्पना आवडली. पहिल्या २ पुस्तकांमुळे आमिष प्रथितयश लेखकांमध्ये जाउन बसला. त्यामुळे त्याला बहुधा सहज सोप्पी कथा सोडुन थोडे फिलोसोफिकल लिहुन साहित्यक्षेत्रात भरीव योगदान द्यायची हुक्की आल्ली असावी. तिथेच तिसरा भाग गंडला. पण तरीही हे पुस्तक न आवडलेल्या यादीत न घालता निराशा करणार्‍या यादीत घालीन.

In reply to by प्रचेतस

सागर Sat, 07/05/2014 - 17:58
छावा मला आवडली. एका वेगळ्या उंचीवर नेते ही कादंबरी. अनेक वाचनांतून काही वेगळे पैलू लक्षात येतात हे छावाचे अजून एक वैशिष्ट्य. शब्दांच्या पेरणीबाबत मात्र बर्‍यापैकी सहमत आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 14:14
अंशतः सहमत. नेहमी असते तितकेच शब्दबंबाळ आहे. :) पण रणजित देसाई आणि विश्वास पाटील या दोघांचाही शब्दबंबाळपणा अंमळ वेगळ्या पद्धतीचा आहे, नै ;)

कंजूस Sat, 07/05/2014 - 11:16
कादंबरीचा धागा पण चुकून पक्षीकोषचे लिहिलं .रंगीत चित्रे सर्वाँची नाहीत . 'पण लक्षात कोण घेतो ' शाळेत असतांना वाचायला घेतली परंतू लवकरच कंटाळा आला .कोसला मला काही समजली नाही .त्या वातावरणाची ओळख नाही म्हणून असेल .

In reply to by कंजूस

यशोधरा Sat, 07/05/2014 - 11:24
आता प्रसिद्ध झालेल्या दुसर्‍या आवृत्तीमध्ये सर्व चित्रे रंगीत आहेत. प्रकाशकांच्या मनोगतात त्यांनी म्हटले आहे की पहिल्या आवृत्तीत फक्त ३२ पाने अशी होती. तेह्वा ह्या नव्या आवृत्तीत बर्‍याच सुधारणाही आहेत. सुरुवातीचे चितमपल्ली ह्यांचे मनोगतही उत्तम उतरले आहे.

In reply to by कंजूस

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:36
"पण लक्षात कोण घेतो" मी पण नुकतीच वाचली.. एकतर मला शेवट पर्यंत हे समजलं नाही की ह. ना. आपटेंनी ती लिहीली म्हणजे कल्पना आहे की शेवटी जे उल्लेख आहेत जसे की तळटीपः- हे छापत असतानाच कळाले की अमुक अमुक दिवशी आमचे मित्र वारले, किंवा लेखिकेच्या भावाने लिहीलेले प्रकरण, ते वाचुन वाटतं की हे अगदी डिट्टेल मध्ये आले म्हणजे हे खरे आहे, कल्पना नाही.. दुसरं असं की बाळबोध आहे फार, तेच तेच बर्‍याचदा लिहीते लेखिका, पण गोष्ट घडते तो काळ पहाता स्त्रिया लिहितात हेच खुप मोठे आहे हे समजुन मी वाचत राहिले. सस्पेन्स फारच ताणला आहे, त्यामानानी मला शेवटी काही तरी फारच भयंकर होणार असे वाटले, पण तितकेसे परिणामकारकपणे लिहीता आले नाहीये.. एका स्त्रीने स्वतःच्या स्थितीकडे बघायचा दृष्टिकोन आणि त्याबद्दलचे विवेचन मात्र चांगले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:49
अहो काका, लेखकच आहेत.. पण कादंबरी लिहीलेली आहे एका स्त्रीने.. स्वतःचे आत्मचरित्र म्हणुन.. म्हणुन तर मला समजत नाहीये ना की ही हनांची कल्पना समजावी की शेवटचे इतके लहान लहान डिटेल्स पाहुन खरंच सत्यकथा आहे ते मला कळालेलं नाही..

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Tue, 07/15/2014 - 23:25
बहुतेक १८८०. त्यामुळे भाषा अशी बोजड आणि पाल्हाळिक आहे. तंत्र वगैरे काही बघायचं नाही. विषय त्या काळाच्या मानाने फार धाडसी होता हे महत्त्वाचं. जेव्हा भाषेबद्दल काही समजत नव्हतं तेव्हा आम्ही अशा भाषेला 'टिळक-आगरकरी भाषा' म्हणून हसायचे. पण नंतर या लिखाणाचं महत्त्व कळलं.

In reply to by पैसा

कंजूस Wed, 07/16/2014 - 05:49
आठवीत गेल्यावर आता वाचनालयातून तुम्ही पुस्तके मिळू शकतील कळल्यावर तिकडे गेलो .सिनिअर लोकांनी टारगटपणाने 'पण लक्षात ..'ची भलामण केली .पुस्तकाची मागणी केल्यावर बाईंनी आदराने पाहिले .पुस्तकाचा ठोकळा पाहिल्यावर लक्षात आले की आपल्याला बनवले आहे .निमूटपणे पुस्तक दप्तरात कोंबून घरी आणले .दहा पानांतच मिटले .दुसऱ्याच दिवशी परत केले ."झाले वाचून ?" नाही आता सुटीच्या अगोदर नेईन म्हणून थाप ठोकली .

सागर Sat, 07/05/2014 - 13:52
पुस्तकमित्रा, सुंदर धागा काढला आहेस. अती अजीर्ण झालेले पुस्तक म्हणजे नातिचरामि. कितीही बेकार पुस्तक असले तरी ते शेवटपर्यंत वाचायची माझी क्षमता आहे. पण आयुष्यात वाचू न शकलेल्या पुस्तकांत या पुस्तकाचा क्रमांक खूप वरचा आहे. पुढे कधीतरी परत प्रयत्न करेन. पण भयंकर या सदरात मोडणारी ही कादंबरी आहे. मी ४ प्रयत्न करुनही ही कादंबरी पूर्ण वाचू शकलो नाही. या कादंबरीचे वाचन केल्यावर मला जेम्स हॅडली चेस, सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांच्या वाचनाचे डोस तब्बल ३-४ महिने घ्यावे लागले तेव्हा बाकीची पुस्तके वाचू शकलो. :P

In reply to by सागर

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:45
नातिचरामी बद्दल सांगायचं तर अगदी नावडतीच असं नाही.. पण बोल्ड नायिका वगैरे असुनही डोक्यात गेलं होतं.. मग अजुन १-२ दा वाचलं.. मग वाटलं आपलीच अक्कल कमी पडत असेल समजुन घ्यायला..पण मला अजुनही लेखिकेला म्हणायचय काय हे समजलेलं नाहीये.. सो सध्यातरी "आवडत नाही" लिस्ट मध्येच आहे..

In reply to by लव उ

चित्रगुप्त Sat, 07/05/2014 - 15:43
नेमाड्यांचे 'हिंदू' अतिशय आवडले आणि अलिकडे दुसर्‍यांदा पुन्हा वाचले. (सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो).

In reply to by चित्रगुप्त

सोत्रि Sat, 07/05/2014 - 21:21
सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो
+१ - (अडगळ आवडणारा) सोकाजी

पैसा Sat, 07/05/2014 - 14:38
गौरी देशपांडेचं विंचुर्णीचे धडे वाचलं. ते प्रचंड आवडलं. नंतर एकेक पान गळावया वाचलं. तेही आवडलं. म्हणून गौरी देशपांडेची इन्फिबीमवर जेवढी पुस्तकं होती ती सगळी घेतली. त्यातलं पहिलंच वाचलं ते उत्खनन. अरारारारा! हिंदी सिनेमात शोभून दिसतील असे योगायोग, सगळी माणसं अजीर्ण व्हावं इतकी गोड. मुलीची जबाबदारी टाकून पळालेला प्रियकरही चांगला असणे, त्याने मरण्यापूर्वी ऑपरेशनसाठी नायिकेकडेच परत येणे, नायिकेची मुलगी आणि नवरा यांनी त्याचे ऑपरेशन आणि नंतर शुश्रूषा करणे इ. इ. वाचून डॉकं ऑऊट झालं. शिकलेला धडा, निव्वळ लेखकाच्या नावावरून पुस्तके विकत घेऊ नका. लायब्ररीतून आणलं असेल तर निदान २ दिवसांत परत करता येतं. पण न आवडलेली आणि विकत घेतलेली पुस्तके घरात बरीच जागा अडवून बसतात आणि त्यावरची धूळ पण साफ करत रहावी लागते.

In reply to by कंजूस

पैसा Sat, 07/05/2014 - 15:12
१००% पटलं. एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक लोकांना आवडतं. बरे पैसे मिळतात. मग दुसरं पुस्तक आणखी सफाईदार येतं. तेही खपतं. त्यानंतर लेखकाच्या प्रतिभेपेक्षा बहुधा प्रकाशकाची धंद्याची गणितं लेखकाला लिहिण्यासाठी ढकलायला लागतात!

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 15:18
युगंधर आणि छावा. बाकी विश्वास पाटलांच्या जनरलच ऐतिहासिक कादंबर्‍या आत्यंतिक शब्दबंबाळ वाटतात. तर झाडाझडती सारखी कादंबरी बेक्कार डिप्रेस करते. :( चेत्याचं 'टु स्टेट्स' आणि अमिशची 'शिवा-ट्रायोलॉजी' मधली पहिलं दुसरं नि तिसरं चढत्या क्रमानं नावडतात! आता वपु काळे काका नावडते झाल्यानं त्यांची बरीचशी पुस्तकं.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 16:16
झाडाझडती अत्युच्च दर्जाची आहे. पानिपत पण पूर्णपणे रणांगणावरच अवतरते. संभाजी मात्र भयंकर शब्दबंबाळ.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Sat, 07/05/2014 - 16:29
चांगलं लिहीतात नि त्यामुळंच भिडतं रे! उगाच्च डिप्रेस नाही वाटत कुणाच्याही लेखनामुळं. पानिपत पूर्ण केली होती एवढंच आठवतंय. फार डिटेल्स आहेत. प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं मात्र.

In reply to by प्यारे१

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 16:46
तरीही पानिपत समजावून घ्यायचं असेल तर शेजवलकरांच्या ''पानिपत १७६१' या पुस्तकापेक्षा इतर चांगले पुस्तक पाहण्यात नाही.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Mon, 07/07/2014 - 14:25
सहमत, मात्र अशा कादंबर्‍यांचे एक महत्त्व असते हे नाकारून चालणार नाही. लहानपणी इतिहास इ. ची गोडी लावण्यात राजा शिवछत्रपती, मृत्युंजय, पानिपत, छावा, स्वामी, पावनखिंड, कादंबरीमय शिवकाल, इ. कादंबर्‍यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. एकदा गोडी लागली अन त्या विषयाचं वाचन जरा औरसचौरस झालं, की मग माणूस तिकडे तटस्थपणे बघू शकतो. पण सुरुवातीलाच शेजवलकर, राजवाडे, इ.इ. वाचले तर इंट्रेस पैदा होणेच शक्य नाही. त्यामुळे नंतर या कादंबर्‍या कितीही हास्यास्पद वाटल्या तरी इतिहासाबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात त्यांचा फाआआआर मोठा वाटा असतो. कारण भूतकाळ सर्वतोपरी जिवंत करायचा प्रयत्न त्या कादंबर्‍याच करतात. त्यामुळे पोरवयाइतके नंतर भारावून जायला होत नसले तरी त्या प्रतिमा, ती शब्दसृष्टी कायम मनात राहते. मला आठवतंय, दीडेक वर्षापूर्वी पानपतास गेलो होतो तेव्हा जागोजागी मनात पानिपत कादंबरीतलेच तपशील येत होतो. सुवाखेडी, उगराखेडी, पटपरगंज, इ. नावे ऐकून जो ज्याम नॉस्टॅल्जिक झालो त्याला तोड नाही. दिल्लीच्या जवळच रस्त्यावरून बुराडी गावचा बोर्ड दिसला तेव्हाही तीच अवस्था झाली होती. प्रत्यक्ष पानिपत शहरापासून ५ किमी दूरवर ते लढाईचं मोठं स्मारक उभारलंय तिथे काला आमच्या स्मरणार्थ आंब्याचे दुसरे झाडही लावलेय. ते सर्व बघत असताना जे काही वाटतं त्या भावना जागवण्याचे महत्कार्य या कादंबर्‍यांनी केले असे मी मानतो. शेवटी कारणमीमांसा एकीकडं आणि फ्यांटसी दुसरीकडं हे आवश्यक आहेच, पण हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ गुरुवार, 07/10/2014 - 17:27
>>> हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही. खरंच! ह्या प्रतिसादासाठी बॅट्याला पार्टी.

कंजूस Sat, 07/05/2014 - 15:53
वपु आणि पुलंचा वाचकवर्ग एक ठरावीक उत्पन्नगटातला आणि ठरावीक सामाजिक पार्श्र्वभूमीचाही आहे .इतरांना त्यांचे लेखन डोक्यावरून जाते अथवा निरर्थक वाटते .ग्रामीण बाजाचे कथानकही शहरी लोकांना वाचवत नाही .गाजलेले लेखक सतत झुलवत ठेवतीलच असे नाही ,गाजलेले खेळाडू वल्ड कपात गोल करतीलच असे नाही .निराशही करतात .

In reply to by प्रचेतस

यशोधरा Sat, 07/05/2014 - 16:23
वपु, दवणे रटाळशी सहमत, पण पुलंचे लिखाण मात्र बाळबोध नक्कीच नाही. कधीही कोणतेही पुस्तक घ्यावे आणि कोणत्याही पानावरुन पुढे वाचावे. सहजगत्या जमून आलेला असा पुलंचा विनोद आहे. पुलंनी फक्त विनोदी लिखाण केलेले नाही तर त्यांचे ललित लिखाणही तितकेच समृद्ध आहे. त्यातल्यात्यात कान्होजी आंग्रे हा अनुवाद तितकासा जमलेला नाही, असं वाटलं होतं पुस्तक वाचून, पण मूळ पुस्तक मी वाचलेलं नाही, तेव्हा त्याबाबत मतप्रदर्शन करणे बरोबर नाही. त्यांची नंदा, अंतू बर्वा, हरीतात्या, बटाट्याच्या चाळीतल्या एकेक वल्ली, रावसाहेब इत्यादि व्यक्तीचित्रणे कोण विसरेल? वंगचित्रे हे असेच एक सुरेखसे पुस्तक.

In reply to by प्रचेतस

यशोधरा Sat, 07/05/2014 - 16:26
हो की. :) ते मला पटलेलं नाहीये, इतकंच कारणांसकट सांगतेय :) पण पुलंची इतर पुस्तकंही वाचली असशीलच ना तू?

In reply to by यशोधरा

प्रचेतस Sat, 07/05/2014 - 16:41
बरीचशी वाचलीयत. पण आवडली कधीच नाहीत. विनोदी लेखन दमा, शंकर पाटील यांचे जास्त चांगले नव्हे उत्कृष्ट वाटते. कान्होजी आंग्रे चा अनुवाद आवडला होता. बाकी व्यक्तीचित्रणं वाचण्यातच मला फारसा रस नाही. त्यामुळे ते लेखन भिडतही नाही.

In reply to by प्रचेतस

विजुभाऊ Sun, 07/06/2014 - 17:32
वल्लीकाका कान्होजी आम्ग्रे चा अनुवाद पुलंनी उत्तमच केलेला आहे. उत्तम अनुवाद म्हणून पुलंच्या " एका कोळीयाने" या पुस्तकाचा उल्लेख होतो. पण त्या पेक्षाही सर्वोत्तम अनुवाद म्हणून" काय वट्टेल ते होईल" या पुस्तकाला नावाजायला हवे. पुलंची खोगीरभरती , गोळाबेरीज ही पुस्तके वाचा.

In reply to by विजुभाऊ

सागर Mon, 07/07/2014 - 00:31
विजुभाऊ सहमत आहे. एका कोळीयाने आधी खूप छान वाटले होते म्हणून द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड सी मुळात वाचून पाहिले. मग कळाले की अनुवाद चांगला असला तरी तितका ताकदीने मराठीत नाही उतरला. पण माळगांवकरांच्या कान्होजी आंग्रे चा मराठी अनुवाद खरोखर सुंदर केलेला आहे पुलंनी. दुसरे पुस्तक 'काय वाट्टेल ते होईल' हे मात्र मी वाचलेले नाहिये ते आता जरुर वाचेन.

In reply to by कंजूस

पिलीयन रायडर गुरुवार, 07/10/2014 - 16:51
मला तरी पुलंचं कोणतही लिखाण आवडलं नाही असं झालेलं नाही.. पण दमा मिराजदार / व.पु / शंकर पाटील ह्यांचे लेखन मात्र फार क्वचित आवडलय... (वपुंच लिखाण समजा ठिक आहे.. पण कथाकथन एकसुरी वाटलं फार... एकाच टोन मध्ये.. पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र..) हे माझं वैयक्तिक मत आहे..

In reply to by चित्रगुप्त

पिलीयन रायडर Fri, 07/11/2014 - 12:54
म्हणजे अगदी सुस्पष्ट..व्यवस्थित मराठी..ठाशीव बोलणं..सगळ्यांचा एकच टोन.. ह्या पेक्षा जास्त मी नाही सांगु शकत की नक्की मला काय म्हणायचय.. फक्त मला ते विषेश आवडत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

प्रभाकर पेठकर Fri, 07/11/2014 - 13:00
>>>>पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र. असं नाही. वपुंनी भाषेत आणि कथेत कितीही सहजता आणायचा प्रयत्न केला तरी त्यांची भाषा अनेकदा, सहजता सोडून, 'साहित्यिक' होते. विशेषतः जेंव्हा त्यांची दोन पात्रे संवाद, वाद, चर्चा करतात तेंव्हा.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 14:48
थोडक्यात कुठल्याही चित्रपटात 'शारुक खान' शारुक खानच असतो तसं वपुंचं कॅरॅक्टर कुठलंही असलं तरी वपुच बोलतात असं वाटतं. सखी , पार्टनर , अचपुकबाश्रीबुंजिकमोघी (ही कथा आहे), रंगपंचमी, काही खरं काही खोटं , वन फॉर द रोड, मी माणूस शोधतोय, कर्मचारी.... लई लई लई आहेत.

नातिचरामी - मेघना पेठे...चक्क आवडलं, दुसर्‍यांदा-तिसर्‍यांदा तर आणखिनच पटत गेलं. पण मला प्रचंड आवडलेलं आणखीन एक पुस्तक म्हणजे किरण नगरकर यांच अनुवादीत 'प्रतिस्पर्धी', हे ही खूप जणांना आवडलेलं नहिये.

In reply to by स्वप्नांची राणी

सागर Sat, 07/05/2014 - 18:02
नातिचरामीबद्दल असहमत. मी सहा प्रयत्न करुन थकलो. माझी सहनशक्ती भरपूर असूनही या पुस्तकाने माझी केलेली अवस्था खरोखर विसरणार नाही. पण किरण नगरकरांच्या प्रतिस्पर्धी बद्दल पूर्ण सहमत. अफलातून पुस्तक आहे. मराठी अनुवादांच्या गर्दीत अतिशय दुर्लक्षित असे हे पुस्तक आहे.

In reply to by सागर

धन्या Sat, 07/05/2014 - 23:56
आपल्या मनात "बाईच्या जातीने" कसं वागावं याची एक प्रतिमा तयार असते. या कादंबरीची नायिका आपल्या मनातील प्रतिमेला तडा जाईल असं पावलोपावली वागते. कादंबरी न आव्डण्याचं हे एक कारण असावं. :)

In reply to by धन्या

सागर Mon, 07/07/2014 - 00:48
मला नातिचरामि न आवडण्याचं कारण स्त्रीची पारंपारिक प्रतिमा आणि तिचे प्रतिमेला तडा जाणारे वागणेही नाहिये. उलट या मांडणीने कादंबरी फसली आहे. नातिचरामि चा विषय चांगला होता पण मांडणी चुकली आहे असे माझे मत आहे. मला सुदैवाने कोणतेही धक्के पचवता येतात. पण मी वाचन वेगवेगळ्या बाजूंनी व भूमिकांतून करतो. तरीही ही कादंबरी कोणत्याच बाजूने मनांत उतरली नाही. म्हणून माझे नातिचरामि बद्दल अतिशय टोकाचे मत झाले आहे. शक्यता कमीच आहे. पण पुढेमागे कदाचित वाचेनही. कादंबरी म्हणून मला ती पटली नाही.

कवितानागेश Sat, 07/05/2014 - 21:43
पुलंचं पुष्कळ्सं लेखन आवडलय. व्यक्तिचित्रात्मक आणि प्रवासवर्ननं सुद्धा. पण पुन्हा पुन्हा वाचेन असं नाही. त्यांची राजकारणावरची काही विडंबनात्मक पुस्तकं मात्र न वाचताच अर्धीच ठेवली. अजिबात मजा आली नाही. एखाद्या लेखाकचं एक आवडलं म्हणून पुढचं आवडेलच अस्म नाही हे मात्र अगदी हल्लीच पुन्हा अनुभवलं. जेम्स रेड्फिल्ड्चं 'सेलेस्टाइइन प्रोफेसी' वाचलं. सुरुवातीला कशाचेच रेफरन्स लागत नव्हते पण हळूहळू पुस्तक पकड घेत गेलं. शेवट तर फार आवडला. म्हटलं तर सायन्स फिक्शन, म्हटलं तर फिलॉसॉफिकल, थोडा 'मेटाफिजिक्स' चा भाग, पण अगदी खरी वाटणारी माणसं आणि माणसांच्या वागणूकीचा व्यवस्थित आढावा, त्यातल्या त्रुटी, हे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनी मांडलं आहे. म्हणून उत्साहानी त्याचा सिक्वेल 'टेन्थ इन्साईट' वाचायला घेतला. फार बोजड लिहिलय या पुस्तकात. उगीचच फिलॉसॉफी भरलीये आणि 'एनर्जी' या कन्सेप्टबद्दल त्याला खरोखरच जितकं चांगलं लिहिता आलं असतं तितकी महनत घेतली नाही असं वाटलं. कुठल्यातरी वेगळ्याच एनर्जी सोर्सचा वापर करुन तयार करत असलेला जनरेटर आणि त्याचे धोके अशी थीम असताना त्याला पुस्तक सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनी रंगवता आलं असतं असं वाटतय. निदान त्यानी आधी निकोला टेसलाच्या संशोधनाबद्दल वाचलं असतं तरी पुस्तक जास्त चांगल्या उन्चीवर गेलं असतं. मी कसेबसे सम्पवले. ४-४ दिवसनी ५-५ पाने वाचत सम्पवले.

आदूबाळ Sun, 07/06/2014 - 09:23
अरविंद अडिगा. बुकर मिळालं म्हणून सोसासोसाने "द व्हाईट टायगर" वाचायला घेतलं. निव्वळ थुकराट पुस्तक आहे. एक तर भारताविषयीच्या पाश्चात्य गैरसमजांना पद्धतशीर खतपाणी घालायचं सत्कृत्य हे पुस्तक करतं. उदा. अपघात करवून एखाद्या गरीबाला बळीचा बकरा बनवून सुटून जाता येतं, भारतात व्यवसाय करायचा असेल तर गैरमार्ग वापरल्याशिवाय गत्यंतर नाही वगैरे. दुसरं म्हणजे अडिगाचा टोन. प्रचंड डोक्यात जातो. "थांबा, माझ्या गोर्‍या मित्रांनो, आता तुम्हाला उकिरडा दाखवतोच. किळस वाटून घेऊ नका बर्का, आमच्या भारतात हे असंच असतं" असा काहीसा. तिसरं म्हणजे अडिगाची शब्दकळा. डोक्यात कळा येण्याइतपत भिकार आहे. "द व्हाईट टायगर" वाचून पाचेक वर्षं झाली. अडिगावरचा संताप जरा बोथट झाला होता म्हणून "बिटवीन द असॅसिनेशन्स" उचललं, आणि जुन्या आठवणी करपट ढेकरेसारख्या वर आल्या आणि दहा पानांतच पुस्तक भिरकावून दिलं.

In reply to by आदूबाळ

आतिवास Mon, 07/07/2014 - 14:57
माझं आवडतं पुस्तक :-) कधीतरी लिहीन त्याच्यावर - जमेल तेव्हा. आणि पुन्हा वाचताना तुमच्या टीकात्मक मुद्द्यांना ध्यानात ठेवेन - बघू जमतंय का ते! "बिटवीन द असॅसिनेशन्स" हे अद्याप वाचलं नाहीये!

In reply to by आतिवास

आदूबाळ Mon, 07/07/2014 - 17:13
ऐला!!!! नक्की लिहा. कोणती सौंदर्यस्थळं आहेत हे जाणून घ्यायची जब्बरदस्त उत्सुकता आहे.