हि मी दहावी पास झाल्याच्या वेळेची गोष्ट आहे. माझा भाऊ बारावीत गेला होता आणि त्याचे कॉलेज चालू झाले होते त्यामुळे तो आणि आई आले नव्हते मी आणि आमचे वडील आमच्या गावी कोकणात गेलो होतो. परशुराम येथे आमचे वडिलोपार्जित घर आहे. मागच्या अंगणात फणसाचे झाड आहे त्या झाडाचे दोन फणस आणि गावात विकत घेतलेले शेकडा हापूस आंबे( तेंव्हा ६५ रुपये पक्का शेकडा म्हणजे शंभर (अधिक १२) म्हणजे ११२ आंबे असे एका पाटीत टाकून चिपळूण ठाणे एस टी च्या टपावर चढवले( परशुराम तिठ्ठायेथे ) आमच्या नेहेमीच्या शिरस्त्याप्रमाणे आम्ही मुंब्र्याला उतरलो.तेंव्हा नवी मुंबई चा रस्ता नव्हताच. मुंब्रा येथे उतरून लगेच क्रमांक दोन फलाटावर येणारी मुंबईकडे जाणारी गाडी आम्ही पकडत असू. म्हणजे ठाणे स्टेशन पर्यंत जाण्याला एस टी ला लागणारा वेळ वाचत असे आणि परत तेथे पूल चढण्याची कटकट हि वाचत असे.आणि कमीत कमी तिकीट मुलुंड ते मुंब्रा असेच होते. असो
ते दोन फणस आणि आंबे मी मुंब्र्याला एस टी च्या टपावर चढून वडिलांकडे खाली दिले. आम्ही ते मुंब्रा स्टेशन वर आणले. तिकीट काढले आणि गाडीची वाट पाहू लागलो तेवढ्यात एक उद्घोषणा झाली कि क्रमांक दोन च्या फलाटा पासून दूर उभे राहा एक जलद गाडी जाणार आहे. कोणीही रेल्वे लाइन पार करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही आमची बोचकी जर मागे आणून उभी केली. आणि फलाटाच्या किनार्या पासून दूर उभे राहिलो. एवढ्या वेळात क्रमांक एक च्या फलाटावरून एक वयस्क स्थूल साडी नेसलेली (सिंधी किंवा मुसलमान) बाई (साठीच्या आसपास) रूळ पार करण्यास रुळात उतरली. केवळ पूल चढायला लागू नये म्हणून ती बाई फलाटावर बसली आणि रुळात उतरली आणि सावकाश एक क्रमांकाचा रूळ ओलांडून दोन क्रमांकाच्या रुळावर आली. मुंब्र्याचा रूळ बहिर्गोल आहे त्यामुळे कल्याणकडून येणारी धीमी गाडी आपल्याला उजवीकडे वळून येताना अगोदर दिसते आणि जलद गाडी असेल तर पारसिक बोगद्याकडे सरळ जाताना दिसते. मी आणि आमचे वडील आम्ही हि बाई आता काय करते आहे हे पाहत होतो तेवढ्यात टिटवाल्याकडून येणारी जलद गाडी दोन क्रमांकाच्या रुळावर जोरात येताना दिसली. त्याच्या मोटरमनने जोरात भोंगा वाजवायला सुरुवात केली.पण हि बाई मुर्खासारखी परत एक क्रमांकाच्या रुळाकडे जायच्या ऐवजी फलाट चढायचा प्रयत्न करू लागली. आमचे वडील म्हणाले कि हि मूर्ख बाई बहिरी आहे काय? येणारी गाडी सत्तर ते ऐंशी किमी वेगाने येत होती आणि ती फलाटाच्या एका टोकापर्यंत पोहोचली. आमच्या बरोबर समोर ती बाई फलाट चढायचा प्रयत्न करीत होती आणि उजवीकडून वेगाने जोरात भोंगा वाजवत गाडी येत होती. आता काही सेकंदात ती बाई गाडी खाली येणार आणि तिच्या चिंधड्या उडणार हे आम्ही पाहत होतो. माझे हृदय जोरात धडधडू लागले. यापूर्वी आयुष्यात मी असा मृत्यू समोर कधीच पाहिलेला नव्हता. आता फक्त काहीच क्षण बाकी होते. तेवढ्यात एक चमत्कार घडला. मी अत्यंत तिरीमिरीने पुढे झालो. त्या बाईच्या पुढे उभा राहिलो तिचे दोन्ही हात दंडाला धरून पकडले आणि इतक्या प्रचंड जोराने तिला मी वर खेचले कि मी आणि ती बाई फलाटाच्या या किनार्यापासून त्या किनार्यापर्यंत अक्षरशः फेकले गेलो. मी माझ्यापाठीवर पडलो आणि ती बाई माझ्या अंगावर पडली. अतिशय जोरात त्या स्त्रीला मी ढकलून उभा राहिलो. यावर ती स्त्री हे हे करीत ओशाळवाणे हसत म्हणाली." पहले भी एक बार ऐसे हुआ था. मला संतापच आला आणि त्या तिरीमिरीतच मी तिला मुस्कटात मारली आणि पुढे आलो. वडिलांनी माझ्याकडे कौतुकाने बघितले आणि विचारले तुला लागले का कुठे ? तोवर माझ्या डोक्यात असा काही विचार आलाच नव्ह्ता. अर्थात मला फारसे लागले नव्हतेच पण माझे सर्व अंग थरथर कापत होते. तोंडाला कोरड पडली होती पण त्या बाई बद्दल संताप मात्र अजून गेला नव्हता एवढ्यात पुढची गाडी येताना दिसली आम्ही घाईघाईने आमचे दोन फणस आणि आंब्याची पेटी गाडीत चढवली मिळालेल्या स्थानावर स्थानापन्न झालो. वडिलांनी मला पाणी दिले ते पिउन मी थोडासा शांत झालो आणि आता शांत पणे विचार करू लागलो. माझे वजन तेंव्हा सेहेचाळीस ते सत्तेचाळीस किलो होते.( दोन वर्षांनी मी ए एफ एम सी त प्रवेश घेतला तेंव्हा माझे वजन ४७ किलोच होते) त्या बाईचे साठ किलोच्या आसपास असेल तिला मी रुळातून तीन फुट वर उचलून फलाटावर खेचले आणि या प्रक्रियेला अक्षरशः दोन सेकंद उशीर झाला असता तरी आमच्या डोळ्यासमोर एक स्त्रीच्या चिंधड्या झालेल्या आम्हाला पाहाव्या लागल्या असत्या.आणि या भीती आणि संताप अशा मिश्र भावना कल्लोळात मी तिला इतक्या शक्तीने उचलले जे मला सावध किंवा व्यक्त अवस्थेत नक्कीच जमले नसते.
मला त्यावेळी एकच जाणीव झाली कि माणसाचे सामर्थ्य हे त्याच्या केवळ स्नायुत नसून त्याच्या मेंदूत असते. याचा मला पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला. मनोरुग्णांना काबूत ठेवण्यासाठी माणसे बोलावून शक्ती व्यय करण्यापेक्षा मी औषधांचा उपयोग केला. किंवा आवाज आणि नजर याचा उपयोग करून अवघड प्रसंगातून बाहेर पडलो.
प्रतिक्रिया
15 Jun 2014 - 12:23 am | संजय क्षीरसागर
प्रसंग निवेदन आवडलं.
15 Jun 2014 - 9:48 am | पुण्याचे वटवाघूळ
आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी शक्य होतील अगदी असाच विश्वास कोणाला प्रत्यक्षात असलेल्या (किंवा नसलेल्या) सुपरनॅचरल पॉवरपुढे हात जोडून निर्माण होत असेल आणि अशा गोष्टी खरोखरच साध्य करता येत असतील तरी त्याला तुमच्यासारखे लोक नावेच ठेवणार.म्हणजे मनाची एकाग्रता आणि आपल्यामागे कोणीतरी आहे आणि त्या जोरावर आपण कोणतेही संकट पार करू शकू हा विश्वास यातील पहिलीच गोष्ट (संक्षी म्हणतात म्हणून) चांगली आणि दुसरी गोष्ट (संक्षी म्हणतात म्हणून) वाईट असे म्हणायला काही कारण आहे असे वाटत नाही.
बाकी अनुभव आवडला. एकदम भन्नाट.
15 Jun 2014 - 3:23 pm | सुबोध खरे
हे मनाची एकाग्रता किंवा सुपरनॅचरल पॉवर किंवा संकट पार करणे इ वगैरे पंधरा सोळा वर्षाच्या मुलाला काही माहिती नसतं.( निदान मला तरी नव्हतं). माझ्या आयुष्यात तेंव्हा संकट म्हणजे काय असतं हेच माहित नव्हतं. मी अभ्यासात तसा हुशार होतो ( पहिला किंवा दुसरा नंबर असे) आणि आई वडिलांची फारशी अपेक्षाहि नव्हती आणि घरात बर्यापैकी मुक्त वातावरण होतं.
जे झालं ते जसंच्या तसं मला डोळ्यासमोर आजही लख्ख पणे दिसतं आहे आणि तसाच लिहिलं आहे. त्यावेळी मनात एवढाच होतं कि एका बाईच्या चिंधड्या उडणार आहेत आणि हे अत्यंत वेदनादायक दृश्य टाळण्यासाठी मेंदूने क्षणार्धात घेतलेला तो निर्णय होता.reflex (प्रीतीक्षिप्त क्रिया) त्यामागे एका बाईचा जीव वाचवतो आहोत असला उदात्त हेतू काही नव्हता. त्यामुळे आजही मी एका बाईचा जीव वाचवला याचे मला फार काही वाटले / आजही वाटते आहे असे नाही.
या विरुद्ध मी डॉक्टर म्हणून काही प्रसंगात कुणाचा जीव वाचवू शकलो तर कर्तव्य केल्याचे समाधान मला जरूर वाटले.
ते प्रसंग मी मागे लिहिले आहेत किंवा पुढे लिहीनही
15 Jun 2014 - 8:49 pm | पुण्याचे वटवाघूळ
जरूर लिहा डॉक्टरसाहेब. तुमच्याकडून जबरदस्त लेखनच होणार याची खात्री आहे. तेव्हा वाट बघत आहे.
वरील मनाची एकाग्रता विरूध्द नमस्कार हा भाग संक्षींना उद्देशून होता (कारण सांगायलाच पाहिजे का? :) )
(निराकार गाढवाचा मोठ्ठा फॅन) पुण्याचे वटवाघूळ
16 Jun 2014 - 1:22 pm | मृगनयनी
सुबोध'जी..... ________/\________ .... ग्रेट्ट्ट्ट आहात!!!!.... खरोखर मनाचे सामर्थ्य हे अफाट असते आणि शारिरीक सामर्थ्यापेक्षा कितीतरी अचाट असते.... या मनःशक्तीमुळेच एका मूर्ख, अज्ञानी जीवाचे तुम्ही प्राण वाचवू शकलात!!!!!!!
***..***
प्रत्येक सजीवाची मन:शक्ती निर्माण करणार्या त्या गुरुकृपा- अंबिकेला, जगदंबिकेला शतशः प्रणाम!!!!! ___/\___
15 Jun 2014 - 12:35 am | आयुर्हित
प्रसंग अगदी डोळ्यादेखत घडतोय, असेच सुंदर लिखाण आहे आपले. वाचतांना छातीत अगदी धस्स झाले.
पण केवळ आपण त्या ठिकाणी होतात म्ह्णुन त्या बाईंचे प्राण वाचले.
यामुळे आपल्या हातून एक मोठ्ठे सत्कार्यच घडले.
धन्यवाद.
15 Jun 2014 - 1:22 am | भृशुंडी
आपल्या वजनाचा, किंवा momentumचा वापर करून जास्त वजन विस्थापित करणे- हा योग्य पद्धतीने force apply केल्याचा परिणाम आहे. राफ्टिंग करताना बहुतेक वेळा जर कुणी पाण्यात पडला, तर त्याला वर खेचताना जवळपास असंच करावं लागतं.
तुम्ही तिला खेचू शकलात त्यात मनाच्या ताकदीपेक्षा, भौतिकशास्त्राचा योग्य वापर हे कारण आहे, असं वाटतं.
अर्थात तुम्ही तिला खेचण्याचा निर्णय घेतलात, ही तुमच्या मनाची ताकद!
15 Jun 2014 - 1:48 am | काळा पहाड
आपण हे जरा विस्ताराने का समजावून देत नाही? म्हणजे ४५ किलो वजनाच्या माणसाला ६० किलो वजनाच्या माणसाला जर उचलायचे असेल, तर किती बल लावावे लागते? ते कशा पद्धतीने अशक्य असते आणि कोणती पद्धत वापरल्यास शक्य होते? आमच्या बोली भाषेत सांगायचं तर जरा "इस्कटून" सांगा.
15 Jun 2014 - 12:45 pm | आदूबाळ
Clean and jerk या प्रकारात अशा टेक्निक वापरल्या जात असाव्यात.
15 Jun 2014 - 2:59 am | प्रभाकर पेठकर
आणिबाणीच्या परिस्थितीत एक प्रकारची राखीव शक्ती (reserved force) अचानक कार्यान्वित होते. ती तशी कार्यान्वित होण़्यासाठीचा चाप (Trigger) कदाचित अंतर्मनात असावा ज्यावर आपले नियंत्रण नसते. अशी ही राखीव शक्ती आपल्याकडून, अन्यथा होऊ न शकणारे, शारीरिक ताकदीचे काम करून घेते, जसे स्वतःचे किंवा दूसर्या कोणाचे प्राण वाचविणे.
15 Jun 2014 - 4:49 am | रेवती
बापरे! अवघड प्रसंग्!पूर्वी असे मन:सामर्थ्य क्वचित वापरावे लागत असल्याने त्याची जाणीव प्रसंगानेच होत असेल. आजकाल भारतात रोजच वापरावे लागते की काय अशी परिस्थिती आहे (किंवा मला तसे वाटते).
15 Jun 2014 - 7:34 am | खटपट्या
भन्नाट अनुभव !!!
15 Jun 2014 - 9:19 am | मुक्त विहारि
आवडला..
15 Jun 2014 - 9:37 am | चित्रगुप्त
अनुभव कथन आवडले.
याबद्दलही काही अनुभव लिहा ना.
15 Jun 2014 - 9:37 am | एसमाळी
चांगला अनुभव.
फक्त मनसामर्थ्य का अड्रिलीन रश ?
15 Jun 2014 - 9:49 am | विकास
अनुभव खूप छान सांगितला आहे. त्या बाईचे जीव वाचवल्यानंतरचे उद्गार ऐकून धक्काच बसला!
15 Jun 2014 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे
रोचक अनुभव !
आवाज आणि नजर याचा उपयोग करून अवघड प्रसंगातून बाहेर पडलो.
याबाबतही वाचायला आवडेल.15 Jun 2014 - 10:52 am | ज्ञानोबाचे पैजार
मनाच्या शक्तीचे प्रत्यय अशा अवघड प्रसंगीच येतात. आणि अशा प्रतिक्रीया क्षणार्धात घडतात. मेंदुला घाबरायला / विचार करायला सवडच मिळत नाही.
त्या बाईची प्रतिक्रीया अजब होती. पण अशा प्रसंगातुन बाहेर पडणारे बहुदा अशीच प्रतिक्रीया देत असावेत. कारण असाच एक बावळट शिवाजीनगरच्या प्लॅट फॉर्मवर १/१० सेकंदांनी वाचलेला पाहिला आहे. त्या वेळी त्याची प्रतिक्रीयाही साधारण त्या बाई सारखीच होती. आपण फार मोठी मर्दुमकी गाजवली आहे अशा थाटात तो इतरांकडे पहात निघुन गेला आम्ही मात्र दिवसभर त्याच विषयावर चर्चा करत होतो.
15 Jun 2014 - 11:13 pm | पुतळाचैतन्याचा
माझ्या बाबतीत २-३ किस्से तरी आठवत आहेत...नवी दिल्ली स्टेशन वर एक्स्प्रेस गाडी सुटली आणि एक भिकारीण त्यातून उतरायचा प्रयत्न करत होती आणि फार जोरात पाउस होता...ज्या मुळे तिचा हात घसरला आणि सरळ ती गाडी आणि फलाटाच्या मधील जागेतून खाली पडली...ती पडणार असे जवळ जवळ ४-५ सेकंद दिसत असताना मी पळत जाउन तिला धरू का नको या मोड मध्ये होतो कारण पावसात मी देखील घसरून पडायचा धोका होता आणि हातातले सामान टाकून पळणे हि रिस्क होती...तरीही मी पळालो पण गाडी पर्यंत जाई पर्यंत ती बाई पडली होती...मग मात्र माझी हिम्मत होईना...खाली वाकून तिची काई अवस्था झाली असेल याचा विचार करवेना...तो वर एका माणसाने तिथे जाऊन पहिले आणि चमत्कार म्हणजे ती बाई रेल्वे रूळ आणि बाजूची भिंत या मध्येपडलि होती ...त्याने दंगा करून गाडी थांबवली आणि त्या बाई ला बाहेर काढले..
दुसर्या प्रसंगात ठाणे स्टेशन वर तुडूंब गर्दी मध्ये महालक्ष्मी एक्स्प्रेस शेवटच्या फलाटावर येत होती आणि गाडी २-३ मिनिट थांबत असल्याने लोक स्वताचा डबा पाहून जिकडे तिकडे पळत होते...त्यात एक मुलगी तोल जाऊन खाली पडली पण गाडी अवघ्या ५मीटर मध्ये थांबल्याने ती वाचली...मुंबई मध्ये ट्रेन खाली मरण्याचे प्रमाण फारच जास्त आहे...काळजी घेणे..!!!
असे अजून ४-५ प्रसंग आणि २ मृत्यू तरी मी पहिले आहेत...तिथे तुमचा प्रेझेन्स ऑफ मायिंड, मनाचा शांतपणा, चपळाई या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात...कितीही गडबड असेल तरीही मी मुंबईच्या स्टेशन मध्ये फक्त फर्स्ट गेयर मध्ये चालतो...!!!
त्या मानाने आता बंगलोर मध्ये मी सुखात आहे...!!!
15 Jun 2014 - 11:41 pm | संजय क्षीरसागर
हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते.
16 Jun 2014 - 12:36 pm | टवाळ कार्टा
+११११११११११११११११
16 Jun 2014 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे इंपॉसिबल वाटतं. मुंबईत गर्दी तुमचा गेयर टाकते.
आतापर्यंतचा अनुभव तरी असाच आहे !(मुंबईमधल्या फलाटावर फर्स्ट गिअर मध्ये चालण्याची मनापासून इच्छा असणारा) इए
16 Jun 2014 - 1:40 pm | आदूबाळ
असंच काही नाही. बर्याचदा हळूहळू, रमतगमत चालायची संधी असते.
चर्चगेटच्या फलाटांवरचं छप्पर जिथे संपतं तिथपासून एरॉस थेटर/क्रॉस मैदान हे अंतर चर्चगेट स्टेशनामधूनच चालायला मला तब्बल दहा-पंधरा मिनिटं लागत. रिटायरमेंटला पोचलेले काका लोक, जड भारे वहाणार्या कोळणी, हाय हील्स घातलेल्या तरूणी, गरोदर स्त्रिया असे सगळे लोक मला आरामात मागे टाकून "पौडाहून आलंय बेनं" छाप लुक देत पुढे निघून जात.
16 Jun 2014 - 1:56 pm | पुतळाचैतन्याचा
असे काही नाही...फास्ट लोकल ऐवजी तुम्ही स्लो ने जा अथवा एखाद्या गाडीत गर्दी असेल तर ती सोडून द्या...जास्त सामान असेल तर कमी गर्दीच्या वेळेत प्रवास करा (स.११ ते दु.४)...रोजचे जाणे येणे असेल तर सुरवातीच्या स्टेशन मधून गाडी पकडा..फर्स्ट क्लास चा पास घ्या...भाड्याने राहणाऱ्या लोकांनी घर घेताना ऑफिस च्या दक्षिणेकडे घ्या म्हणजे उलट्या दिशेने कमी गर्दीत प्रवास करता येईल....एक ना अनेक प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता... थोडा अनुभव आणि निरीक्षण महत्वाचे...
16 Jun 2014 - 11:50 am | दिपक.कुवेत
त्या वेळच्या परीस्थीतीत सुद्धा हे करायला सुचणं म्हणजे हॅट्स ऑफ. नाहितर काहि लोक नुसते बघे असतात आणि मग त्यावर तावातावाने चर्चा करत बसतात.
16 Jun 2014 - 11:58 am | योगी९००
सर्व प्रथम हा अनुभव मांडल्याबद्दल आभार...!!
मनाच्या शक्तीचा आवाका किती मोठा आहे ते मोजणे अवघड..असाच एक प्रसंग कोठेतरी वाचला/ऐकला होता. त्यात एका बाईने आपल्या मुलांच्या अंगावर जोरात येणारी जीप (hummer) जाऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी नुसत्या हाताने बाजूला ढकलली होती. ( Extreme fear makes you super human).
आणखी काही उदाहरणे... http://kiriblakeley.blogspot.fi/2012/08/when-fear-makes-you-superhuman.html
16 Jun 2014 - 12:41 pm | श्रीगुरुजी
जबरदस्त अनुभव!
16 Jun 2014 - 2:02 pm | स्पा
मस्त अनुभव :)
16 Jun 2014 - 2:07 pm | बाबा पाटील
मनःसामर्थ प्रत्येकाकडेच पण अकस्मात निर्णय क्षमता एखाद्याचीच असते.ती तुमच्यात आहे त्याबद्दल अभिनंदन...!
16 Jun 2014 - 4:03 pm | शिद
+१००००० लाख मोलाची बात आहे.
डॉक्टरसाहेब,
रोमांचकारक अनुभव आवडला व त्या बाईचे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद.
16 Jun 2014 - 3:30 pm | पैसा
खरेच प्रतिक्षिप्त क्रियेसारखी क्रिया घडली असणार तुमच्याकडून! मात्र जीव वाचवल्यानंतर त्या बाईचे उद्गार वाचून धक्काच बसला. किमान कृतज्ञता असावी माणसाकडे!
16 Jun 2014 - 3:46 pm | सुबोध खरे
पैसा ताई
मी जसा तेंव्हा तिरीमिरीमध्ये होतो. तशाच त्या बाई बावचळल्या असाव्यात. त्यातून मी पुढची गाडी आली म्हणून घाईघाईने निघालो सुद्धा. तेंव्हा कदाचित त्या धक्क्यातून सावरून धन्यवाद द्यावेत असे वाटे पर्यंत मी गाडीत बसून गेलो सुद्धा होतो.
16 Jun 2014 - 11:35 pm | पैसा
शक्य आहे की तसे झाले असेल. पण वाचताना विचित्र वाटलं खरं. अर्थात कोणी धन्यवाद म्हणावे म्हणून हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं नव्हतंच! स्वतच्या नजतेतून उतरू नये म्हणून आंतर्मनाने केलेली हालचाल होती ती. विचार करत बसणारा कोणीही असं आपल्यापेक्षा जड दिसणार्या व्यक्तीला उचलायलाचा प्रयत्न करणार नाही. कारण तोच खाली रुळावर खेचला जायची शक्यता!
16 Jun 2014 - 10:31 pm | सस्नेह
आणीबाणीच्या वेळी माणसे खरोखर अचाट काही करून जातात.
हिरकणीचा किस्सा आठवला.
17 Jun 2014 - 5:47 pm | म्हैस
त्या बाईचे प्राण वाचवल्याबद्दल अभिनंदन . पण
असं पाहण्यापेक्षा तुम्ही किवा आजूबाजूच्या लोकांनी त्या बाईला तेव्हाच का नाही थांबवलात? announcement झाली होती न.
17 Jun 2014 - 8:00 pm | सुबोध खरे
स्टेशन वरील सर्व माणसे त्या बाईना परत एक नम्बरच्या रूळा कडे जा म्हणून ओरडून सांगत होती पण ते काही त्यांच्या डोक्यात शिरत नव्हते. का याचे कारण मला माहित नाही. आणी हा सारा प्रकार ३०-४० सेकंदात झाला
17 Jun 2014 - 9:06 pm | सखी
ती बाई ठार बहिरी असावी का, असे सारखं वाटतय किंवा अजुन काही आजार (मानसिक?) असु शकेल का की तिला काय होईल याचे गांभिर्य कळलेच नसावे.
आपले प्रसंगावधान कौतुकास्पद आहे.
19 Jun 2014 - 2:50 pm | सुबोध खरे
त्या बाई नक्कीच बधिर( बहिर्या) नव्हत्या. कारण लोकांनी नंतर त्यांना विचारलेले प्रश्न व्यवस्थित समजत होते पण त्या भांबावलेल्या होत्या. अर्थात समोर गाडी येत असताना त्या उलट्या का गेल्या नाहीत याचे उत्तर देईपर्यंत मी तेथे थांबलो नाही( पुढची गाडी लगेच आली होती).
साप येउन आपल्याला खाणार अशा अवस्थेत बेडूक जसा नुसता बघत बसतो तशा त्या गाडीकडे नुसत्या पाहत होत्या.
18 Jun 2014 - 11:35 am | स्वाती दिनेश
अनुभव वाचताना काटा आला अंगावर आणि त्या बाईंची जीव वाचवल्यानंतरची प्रतिक्रिया वाचून धक्का बसला,
स्वाती