लेकरू
Taxonomy upgrade extras
लेकरू
========================
ती इतकी निरागस!
ती इतकी सुंदर!
ती इतकी बोलकी!
ती इतकी चंचल!
तिच ते खट्याळ हसणं,
तिच ते सशावाणी उड्या मारणं,
तिच ते फुलपाखरा सारखं
कुणाही भोवती भिरभिरणं.
तिचं आई बरोबर
बोट धरून फिरणं..
तिच देवळात
तल्लीन होवून डोलणं..
तिच कुणाला ही
आपलंसं करणं...
तिच कुणात ही
मिसळून जाणं...
तिच माझ्या दिशेनं धावत येणं..
माझं घाबरत पुढे सरकणं
तिच्या आईच्या डोळ्यात
डोकावणारी उदास खंत
एकदा बोलली ती माझ्याशी...
आता मी आहे. पण माझ्या पुढं?
चाळीस पंचेचाळिशीचं लेकरू
सांभाळू तरी कसं!!
========================
स्वाती फडणीस ................... ११-०३-२००८
वाचने
6317
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
फारच सुंदर आणि सहज ओळी आहेत, ज्यांनी असं दु:ख जवळून पाहिलंय त्यांना नक्कीच भावेल.
:)
सशक्त कल्पना.. मात्र ठिक उतरलीय! का कोण जाणे शेवटचा धक्का जाणवला पण जोरात बसला नाहि
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
In reply to सशक्त कल्पना by ऋषिकेश
ही कल्पना नाही वास्तव आहे.
शब्दबंबाळ नसलेल भयाण वास्तव.
In reply to आभार by स्वाती फडणीस
मला कविता-विषयाची कल्पना असे म्हणायचे होते.
बाकी शब्दबंबाळ व्हायची गरज नाहि.. तुमच्याच १२-१३ वर्षांच्या तीच्या कवितेतही शब्दबंबाळपणा नव्हता पण नेमकी शब्द योजना होती. ती इथे जाणवली नाहि इतकंच
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
In reply to मला by ऋषिकेश
हा कमीतकमी ७० वर्ष वय असलेल्या आईला पडलेला प्रश्न आहे.[त्याहुन जास्तच]
इथे तिच वय ती दिसत नाही.[हव होत का?]
त्या मुळे.. वय वर्ष साठ-पासष्ठ धरून बघा. मग हाच प्रश्न खुप मोठा वाटेल!
In reply to आता मी आहे. पण माझ्या पुढं? by स्वाती फडणीस
अहो स्पष्टीकरण वगैरे नका हो देऊ.. आहे ती कविता छान आहे मात्र
सांगायची गोष्ट मला या कवितेतील भावना पोचल्या तरी मात्र टोचल्या नाहित
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
In reply to भा पो by ऋषिकेश
याला नेहमी कविताच जवाबदर असते अस नाही
असो
In reply to कवितेतील भावना पोचल्या तरी मात्र टोचल्या नाहित by स्वाती फडणीस
याला नेहमी कविताच जवाबदर असते अस नाहीअगदी बरोबर!! म्हणूनच तर मला बोल्ड केला आहे :) -(दगड) ऋषिकेश
कवितेतून मोठाच प्रश्न मांडला आहेत. अशी स्थिती असलेल्या एका कुटुंबाला जवळुन पाहिले आहे. त्या पालकांची व्यथा मी चांगलाच ओळखुन आहे. त्यात असे अपत्य मुलगी असेल तर अजूनच प्रश्न असतो.
पण कवितेच्या शेवटच्या कडव्यात धक्का बसायला हवा होता तसा बसला नाही. बहुधा आत्ता तुम्ही ज्या मुलीला भेटलात ती ४०-४५ वर्षांची आहे हे मला वाचताना समजले नाही. तर मला असे वाटले की.. आई म्हणते आहे ... आज ठीक आहे, उद्या ही मुलगी मोठी झाल्यावर मी कसे करु असे काही.
ते असो.
या पालकांची व्यथा ( मुल मतिमंद असो अथवा मनोरुग्ण ) समोरच्याला भिडते हे खरेच आहे.
--लिखाळ.
विचारांना उद्युक्त करणारी कलाटणी दिलेली आहे.
आणि शेवटची कलाटणी आवडली.
(शेवटच्या कडव्यात - 'एकदा बोलली तिची आई माझ्याशी' असा बदल केला तर वाचताना होणारा संभाव्य गोंधळ टळू शकेल, असे वाटते.)
छोटीची आई
=========================
समस्या खूप आहेत..
अगदी सकाळी उठल्यावर;
दात घासण्यापासून..
रात्री झोपताना;
शू करून आणण्यापर्यंत.
हात थकतात !
पाय लटपटतात!
डोळ्यापुढे अंधार..
तरी होती उभारी!!!
तिच निरागस असणं..
तिच निष्पाप हसणं..
बघितलं की;
सार भरून पावायचं!
आजही ती तशीच असते..
आ़जही ती तशीच हसते..
बघितलं की;रडूच फुटत!
म्हातार्या डोळ्यांना..
तापदायक असती..
कंटाळता आलं असत!
सोडव विनवता आलं असत!
पण नाही...
हात जोडले तरी ..
ओठ हालत नाहीत..!
डोळे मिटायला आलेत..
आणि झोपच येत नाही..!!
माझी लाडी अजून छोटीच आहे.
देवा तिला गोठवलंस.. ठीक आहे!
पण मग मलाही गोठवायचंस..
छोटीची आई म्हणून!!!
=========================
स्वाती फडणीस....................... २६-०९-२००८
In reply to छोटीची आई by स्वाती फडणीस
क्या बात है!
त्यातही
हात जोडले तरी .. ओठ हालत नाहीत..!थेट भिडले.. अतिशय सुंदर -('मिसळ'लेला) ऋषिकेश
'कलाटणी' बाबत ऋषिकेश आणि लिखाळशी सहमत.
(वाचक)बेसनलाडू
In reply to कविता आवडली by बेसनलाडू
मला दुसरी कविता.. "छोटीची आई" जास्ती भावली.
अतिशय हृदयस्पर्शी झाली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कविता भावली.. अशा एका कुटुंबाला जवळून ओळखते म्हणून जास्त भावली. अगदी ४०शी नसली तरी ३०शी ला आली ती मुलगी आता. तिचा भाऊही,जो माझ्याहून १-२ वर्षांनी मोठा असेल त्याचीही हीच व्यथा.. पण चांगली गोष्ट ही, की त्यांना या गोष्टीची जाणीवच नसते! सतत हसतमुख असतात ते. कळायला लागल्यापासून आजपर्यंत एकदाही मला त्यांच्या हसतमुख चेहर्याकडे बघून स्माईल देता आलेली नाहीए. एक विचित्र फिलिंग येतं, नॉर्मल वागता येत नाही, आणि एक्स्ट्रा-काळजी,दया दाखवणंही चांगलं नाही!
वाईट या गोष्टीचं वाटतं की,तो भाऊ बहीणीच्या सहवासामुळे तसाच झाला. लहानपणी आम्ही सगळॅ एकत्र खेळायचो,तेव्हाही थोडा होता तसा. पण आम्ही आकडे म्हणायचो,पाढे म्हणायचो इत्यादी गोश्टींनी त्याच्यात थोडीतरी सुधारणा होत होती.. पुढे मोठे झालो.. खेळ संपले. संवाद कमी झाला. बहीणीबरोबरच खेळ,राग,'संवाद'.. तसाच झाला.. कुठेतरी वाटतं आम्ही जमवून घेतलं असतं त्याच्याशी तर कदाचित चित्र वेगळं असतं.. पण हे सगळं मोठं झाल्यावर उमगतं.. :(
मर्मस्पर्शी!