मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुफे,अथवा खड भोजन

राजा सोव्नी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा , आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा , भोजनासी गर्दी झाली भारी , करती पहा कैसी मारामारी , गर्दी करती अन्ना भोवती , जैसी गिधाडे भक्षा भोवती , कोणी करेना कोणाची पर्वा , भोजन हवे आधि सर्वा , पहा भोजनाचा देखावा कैसा , घेऊन कटोरा उभा याचक जैसा, कोठे लोपली ती पूर्वीची पंगत, भोजनाची पहा गेली रंगत, पाट ,ताट रांगोळी छान , भोजनाचा कैसा राखती मान , होते कसे श्लोकांचे गुंजन , भोजन वाढती आग्रहे स्वजन, पैजेने ते लाडू खाणे , मौजेने हसणे गाणे, नशिबी आले उभ्याने भोजन , घेऊन थाळी रांगेत स्वजन

वाचने 3046 वाचनखूण प्रतिक्रिया 9

चित्रगुप्त Sat, 05/04/2013 - 15:57
कवितेत मांडलेल्या विचारांशी अगदी सहमत. अनेक वर्षांपूर्वी इंदुरातून दिल्लीत आलो, तेंव्हा जेवणाचा हा अजब प्रकार बघून चक्रावून गेलो होतो, त्याची आठवण झाली.

तिमा Sat, 05/04/2013 - 18:11
बूफे म्हटला की खाणार्‍याला खूपच लिमिटेशन्स येतात. एक तर पदार्थ इतके असतात की एकावेळेस, चव बघण्याइतकेही सर्व वाढून घ्यायला डिशमधे जागा नसते. थोडेच वाढून घेतले तर, परत मध्येच रांगेत घुसून एखादाच पदार्थ घेणे अप्रशस्त वाटते. उभ्याने खाताना इतरांपासून जपावे लागते. फॅनसमोरुन जाताना नेमका पापड उडून जातो आणि कधीकधी दुसर्‍याच्याच ताटात जाऊन पडतो. जेवताना मधेमधे पाणी प्यायची ज्यांना संवय असते त्यांची पंचाइत होते. थोडक्यात निवांतपणे जेवता येत नाही.आणि इतके चांगले पदार्थ खुणावत असतानाही समाधान असे मिळत नाही. म्हणून कवितेतल्या आशयाशी पूर्ण सहमत.

बॅटमॅन Sun, 05/05/2013 - 04:15
सहमत आहे. बुफे पद्धतीने जेवणे म्हंजे कसरतच असते. सवय होऊनही मला अजून "पंगतम ष्टाईल" च जास्त आवडते. लग्नाबिग्नात तरी बुफे ठेवू नये असे माझे स्पष्ट मत आहे.

प्रभाकर पेठकर Sun, 05/05/2013 - 09:51
बफे पद्धत पाश्चिमात्यांची. त्यांच्या जेवणात मोजकेच आणि बहुतांश कोरडे पदार्थ असतात जे चमच्याने खाल्ले जातात. आपले जेवण हे विविध आमट्या, रस्से, भात, भाज्या, पोळ्या, चटण्या, कोशिंबीरी, लोणची, पापड असे विविध रंगी आणि विविध ढंगी असते. ते जमिनीवर किंवा टेबलावर बसून निवांत जेवावे लागते. आपल्या इथे बफे पद्धतीचे जेवण असले तरीही टेबल-खुर्च्या मांडलेल्या असतात. त्यामुळे थाळीत जेवण घेऊन, टेबलापाशी बसूनच आपण जेवतो. अर्थात, मधे मधे उठून आपल्याला हवा असलेला पदार्थ पुन्हा पुन्हा घेऊन येणे हा प्रकार एकूणच भोजन आनंदाला उणेपणा आणतो. त्यामुळे पंगत पद्धतच सर्वांना रुचते. पण, पंगत पद्धत चांगली (आपल्याला सोयीची म्हणून) आणि बफे पद्धत वाईट हे अधोरेखित करण्यासाठी जे वर्णन केले आहे, जसे:
भोजन नाही हा जमला बुभुक्षितांचा मेळा , आप्त ,स्वजन झाले भोजनासी गोळा , भोजनासी गर्दी झाली भारी , करती पहा कैसी मारामारी , गर्दी करती अन्ना भोवती , जैसी गिधाडे भक्षा भोवती , कोणी करेना कोणाची पर्वा , भोजन हवे आधि सर्वा , पहा भोजनाचा देखावा कैसा , घेऊन कटोरा उभा याचक जैसा,
हे अजिबात पटले नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त Sun, 05/05/2013 - 10:08
दिल्ली वा उत्तर भारतात असे दृश्य नेहमी बघायला मिळते (अतिशय उच्चभ्रू मंडळी सोडल्यास), असे नमूद करू चाहतो.