दिल्ले दान... घेतले दान...
आमचा लाडका वगैरे सुपरष्टार शेतकरी असल्याचे जाहीर झाले आणि 'सत्यमेव जयते' नुसार अखेर सत्याचा विजय झाला. (कोण रे तो भिखू म्हात्रेचा सत्या म्हणतोय? सुपरष्टारच्या कलागुणांची कदर नाही त्याला! ठेचा साल्याला!)
डोक्याला मुंडासे बांधून सुपरष्टार बैल हाकणार. जयावैनी डोईवर भाकरी न भाजी घेऊन मळ्यावर येणार, नाजूक लाडकी ऐशू उन्हातान्हात पिकाचं राखण करणार, गोफण घेऊन अभिषेक दगडं मारणार आणि पाखरांना बुजवण्यासाठी अमरसिंगजी बुजगावणं म्हणून शेतात उभं राहणार या विचारांनी कंठ अवरुद्ध झाला आणि श्वास घेता येईनासे झाले. टाय सैल केला तेव्हा कुठे बरे वाटले!
चित्रपट पाहणार्या अवघ्या देशाचा 'आयकॉन' असलेले अमितशेठ आता शेतकर्यांचेही आयकॉन होणार आणि अमिताभचं खत, अमिताभचं
एखाद्या सकाळची वेळ - किंवा मंगलप्रभात म्हणूया - होती. कोंबड्याने तिसरी बांग दिली आणि वेळेबरहुकूम भारनियमन सुरू व्हावे त्याप्रमाणे आकाशातल्या चांदण्या विझल्या आणि काजळी साचलेल्या कंदिलातील प्रकाशाप्रमाणे लालसर पिवळा प्रकाश पूर्वेकडे दिसू लागला. परसाकडे गेलेले अमितशेठ अजूनही घरी न आल्याने जयावैनींना काळजी वाटू लागली होती. वयोमानानुसार अमितजींना वेळेवर 'होत' नसे. थोडा जास्तच वेळ लागत असे. आणि 'इसबगोल' घ्या म्हटलं तर डाबरच्या उत्पादनांची जाहिरात करतो आणि इसबगोल घेतलं तर व्यावसायिक नीतीमत्तेचं काय होईल असं काहीसं अमितशेठ बोलून गेले होते. आयुष्यभर पर्वा न केलेल्या नैतिकतेचं गळू अमितशेठना आताच कसं झालं या काळजीनं जयावैनींना पोखरलं होतं. नाहीतरी उतारवयात विस्मरण होतंच म्हणा. फिल्मी आयुष्य आणि खरे आयुष्य यात गल्लत होतेच. चित्रपटातील संवाद चुकून बोलून गेले असतील या भावनेनं त्यांना काडीचा आधार दिला. मात्र हे शेतकर्याचं जीवन जगताना त्या पुरत्या वैतागल्या होत्या.
अंबाड्याच्या भाजीला ऐशूने टाकलेल्या लसणीच्या फोडणीचा चर्र असा आवाज झाला आणि जयावैनी तंद्रीतून जाग्या झाल्या. कोनाड्याजवळ अभिषेक उभा होता. सकाळपासून तीन वेळा दाढी करण्याच्या प्रयत्नात कापून घेतल्यामुळे त्याने 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्त असू द्यावे समाधानी' या उक्तीनुसार दाढी करण्याचा नाद आता सोडून दिला होता. त्याऐवजी दाढी खाजवण्याचे काम सुरु झाले होते. मात्र आपण उजव्या हाताने दाढी खाजवत आहोत आणि बाप तर डावखरा आहे हे त्याच्या अचानक ध्यानात आले आणि कोणाचे लक्ष नाही असे वाटून त्याने झटकन हात बदलला. तरी ऐशूने हे पाहिलेच आणि नाराजीने नाक मुरडले. बिच्चारा अभिषेक खजील झाला!
सुपरष्टार 'काम' आटोपून घराकडे येताना दिसत होते. मागोमाग हातात लोटा घेऊन अमरसिंगजीही होते. अंगणात आल्यावर अमरसिंगजींनी बंबाची राख घेऊन (स्वतःचे) हात खसाखसा धुतले आणि सुपरष्टारच्या पायावर पाणी ओतले. सुपरष्टार आत आल्याआल्या जयावैनी सुरू झाल्या.
'काय हे मानूस म्हनायचं का सोंग? पुरता वैताग आला मला आता.'
'अगं.'
'चला बगू परत 'जलसा' ला इथं मला जमत नाही. चुलीच्या धुरानं डोळ्याचा धबधबा झाला पार!'
'अगं पन.'
'ते काही नाही. चला म्हंते ना!'
'तू जरासंक ऐक तरी!'
'काय जगनं म्हनायचं का काय हे. सकाळी उठल्यावर शेनाने सारवून घ्या. बंब पेटवा. दुपारच्याला टकुर्यावर टोपली घेऊन उन्हातान्हात शेतात जा.'
'अगं जरा समजून घे.'
'शेती करन्यासाठी आपल्याकडं साधनं तरी हायेत का? बैल पन एकच आहे.'
ऐशूने चमकून अभिषेककडे पाहिलं. नेहमीप्रमाणे त्याच्या बथ्थड डोक्याला काही समजलंच नाही.
’आता, बैल मागवलेत की तिकडून. आनी बैलांस्नी म्हराटी यायला पायजेल असं कोनी म्हनू बी शकत न्हाई ना.’
’अहो पर मानसान्ला कुठेबी राहायची परवानगी अस्ते असं बैलांच्या बद्दल राज्यघटनेत लिव्हलेलं हाये का?’
'हे बघा कारभारनी. तुमच्या डोक्यात अक्कल कमी असं आम्ही म्हनून गेलोय ते काही खोटं नाही.'
'ऑ? आता काय झालं. चांगला मुंबईतला बंगला सोडून हितं घानीत राहायचं दळभद्री लक्षन तुम्हास्नी सुचलं तर तुम्ही शहाने आनी आम्हाला अक्कल न्हाई व्हय.'
'अहो, आता कसं सांगू.'
'काय ते'
'थोडं गप्प बसाल तर आम्ही बोलनार ना.'
'बोला की. म्या काय त्वांड धरलंय काय तुमचं!'
'अगं, सरकारनं शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याली हाये. आता आपन बी शेतकरी न्हाई का? मग? अभिषेकच्या लग्नाचा सम्दा खर्च आता हिकडून वसूल करता येईल बग. अमरसिंगजी काहीतरी इल्लम काढतीलच. काय अमरसिंगजी?'
'व्हय तर.'
'हांग्गाश्शी. मातुर येच्यासाठी आपल्याला थोडी कळ काढायला लागंल. घुसलं का आता टकुर्यात!'
’आता गं बया! व्हय व्हय. आता कुठं समजलं’
बापाच्या अचाट बुद्धीची ही युक्ती ऐकून अभिषेक अवाक झाला आणि आश्चर्याने तोंडात घातलेले बोट उजव्याच हाताचे आहे याचे त्याला भानही राहिले नाही!
व्यंगचित्र सौजन्य desicartoonist.blogspot.com
वाचन
16456
प्रतिक्रिया
38