मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाचु आनंदे!

सौरभ वैशंपायन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वाचन, माझ्या सर्वात आवडिच्या छंदांपैकी एक. तसे म्हणाल तर ट्रेकिंग, पेन्सिल स्केचेस, लिखाण हे माझे सर्वात आवडते छंद आहेत, खालोखाल टपाल तिकीटे गोळा करणे, संगीत ऐकणे, फोटोग्राफि, नाणी-नोटा जमवणे हे आणि असे अनेक छंद मला आहेत. एकेका छंदा बाबत थोडं थोडं लिहिन म्हणतोय. तर वाचन माझा आवडता छंद! किती वाचले या पेक्षा काय वाचले हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं. मुळात आपल्याला वाचता येतं हि भावनाच किती छान आहे?? मराठी-हिंदि-इंग्रजी तर आहेच पण तोडकं-मोडंक गुजराती पण मला वाचता येतं. कदाचित तुम्हाला वाटेल, वाचता येतं! यात काय विशेष? तर मग जे निरक्षर आहेत त्यांचा विचार करा. आणि मग त्यांनी कधी पु.ल. वाचले नसतील, कधी सावरकर वाचले नसतील, कुसुमाग्रज, बोरकर, हरीवंशराय बच्चन, चर्चिल, बर्नाड शॉ, पी,जी. वुडहाऊस - हेहि वाचले नसतील. त्यांनी काय गमावलय हे आता समजलं? ज्यांना वाचनाचा ’तिटकारा’ आहे अशीहि काहि "साक्षर" म्हणवणारी माणसं मी बघितली आहेत. त्यांची किव करुन विषय सोडुन देणं हे मी शिकलोय आता. वाचन-वाचन असं काय मोठं आहे त्यात? असहि कोणाला वाटेल तर तसहि नाहिये. "वाचणं" कठिण असतं. कारण ते नुसतं डोळ्यांपुरतं थांबत नसुन मेंदु-मन-हृदय आणि झालच तर रक्तापर्यंत जायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालच तर "वेडात मराठे वीर दौडले सात..." हे वाचताना असे रोमांच उभे राहतात अंगावर, तर याला रक्तात पोहोचणे असे म्हणतात. उत्तम लिहिणं जितकं कठिण असतं कदाचित त्याहुन उत्तम वाचणं कठिण असतं, कारण लिहिणार्‍याच्या भावना वाचणार्‍याला समजाव्यात यासाठी लिहिणार्‍याच्या लेखणी इतकचं वाचणारं मनं देखिल संवेदनशील असावं लागत. अर्थात वाचली जाणारी गोष्ट काय आहे त्यावर सगळं अवलंबुन आहे, कारण अर्थशास्त्राच्या पुस्तकात दिलेले पानभर आकडे, त्यांच्यातले बदल आणि बदलांची कारणं हे अगदी, "मला हे दत्तगुरु दिसले" या आनंदाने वाचणारी मंडळी या जगात आहेत. पण सगळ्यांनाच ते आवडेल असं नाहि ना? म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितक्या वाचनाच्या आवडि असु शकतात. मी काय वाचतो? हे इतरांना कळुन त्यांना काय फरक पडणार आहे ते मला माहित नाहि पण कदाचित माझ्या सारखाच चुकला फकिर मी जातो त्याच मशिदित आपला सजदा अदा करत असेल तर? म्हणजे माझ्या आवडि-निवडिचा किमान एक माणुस या जगात असावा अशी अपेक्षा धरुन जगताना "अरे? माझ्या बरोबर जर चुकल्या फकिरांचा जथ्थाच आहे!" हे समजलं. तर अजुन असे चुकलेले फकिर भेटावेत या आशेने हे सगळं लिहिणं. तसं म्हणाल तर मला वाचनाचं व्यसन आहे. पण काय आहे दारुड्याला देखिल काहि ठराविकच ब्रॅंड आवडतात, तर मलाहि तसेच ठराविक वाचनाचे प्रकार आवडतात. सर्वात आवडता प्रकार - इतिहास. म्हणजे तो इतिहास कोणाचा आणि कसला आहे ह्याला तितकंस बंधन नाहिये, हं, अर्थात अगदिच दहाव्या शतकातिल शेती आणि पशुपालनाच्या इतिहास वगैरे नाहि, पण सर्व साधारणपणे "इतिहास" या गोष्टिच्या चौकडित नीट बसतिल अश्या गोष्टी मला आवडतात. खरं बघता प्रत्येक घडुन गेलेली गोष्ट हि इतिहासच असते. मग ते युद्ध असो, एखादा शोध असो किंवा थोड्यावेळापूर्वी तुम्ही केलेली एखादि गोष्ट असो. पण त्याचे परीणाम जेव्हा एका राष्ट्राला किंवा संपूर्ण मानव जातीला भोगावे लागतात त्याचे वर्णन इतिहास म्हणुन करणे जास्त योग्य ठरते. मात्र इतिहासात ब‍र्‍याचदा चरित्रे समविष्ट असतात. ऐतिहासिक पुस्तकांबाबत म्हणाल तर तसे बरेच काहि वाचुन झालेय पण "अजुन-अजुन" किंवा "परत-परत" चा सोस काहि सुटत नाहि उलट वाढतच जातो. श्रीकृष्ण, चाणक्य, चंद्रगुप्त, छत्रपती शिवराय, बाजीप्रभु, मुरारबाजी, तानाजी, येसाजी, नेताजी पालकर, राणाप्रताप, छत्रपती संभाजीराजे, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, चिमाजी अप्पा, सदाशिवराव भाऊ, राघोबादादा, माधवराव, सवाई माधवराव, नाना फडणविस, महदजी शिंदे, औरंगजेब, शहाजीराजे, अकबर, विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, अंनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, सुखदेव, राजगुरु, नेताजी, गांधीजी, नेहरु, जीना, सरदार पटेल, माऊंटबॅटन, लिनलिथगो, हो-ची-मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो, चे, हिटलर, मुसोलिनी, चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन, दलॅंदिआ, द गॉल, मोल्टोवो, मार्शल झुकोव्ह, गोबेल्स, रोमेल, चेंबर्लेन, जनरल पोलस, रीबेन्ट्रॉप, रुड्स्टेंड, हिंडेन्बुर्ग, गोअरींग, लुडेन्डॉर्फ, फ्रॅन्को, जनरल कावाबे, जनरल मुगुताची, माओ,चॅंग-कै-शेक, चंगेजखान, बाबर, सातवाहन, नेपोलिअन, सिकंदर, मॅझिनी, गॅरीबाल्डी, मोशे दायान, गोल्डा मायर, नासर, गडाफि, इदि-आमेन, डेव्हिड बेनगुरियान, सादात, यासर अराफात, होस्नी मुबारक, एरीय शेरॉन, वाईझमन, मि. बाल्फोर, या आणि अश्या अजुन शेकडो जणांचा मी देणेकरी आहे. यात काहि औरंगजेब, चंगेजखान, गडाफि, स्टॅलिन अश्या राक्षसतुल्य माणसांची नावे आहेत मला माहित आहे. पण तरी इतिहासप्रेमी म्हणुन यांचा मी देणेकरी निश्चित आहे. या व्यक्तीं बरोबरच अर्थात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, चीन, रशिया, जपान, कोरीया, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, इराण, इराक, लेबनॉन, इस्त्राएल, गाझा, इजिप्त, ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया(आता झेक आणि स्लोवाकिया), इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल, इटली, अमेरीका, क्युबा, नेदरलॅंड, फिनलॅंड, पोलंड, या देशांचाहि त्या बाबतीत मी अतिशय ऋणी आहे. शिवराय-संभाजीराजे-राम-कृष्ण-विवेकानंद या कथा अगदि आजीच्या मांडिवर बसुन वाचल्या-ऐकल्या आहेत. पण वाचनाची आवड म्हणा किंवा चांगलं-वाईट कळण्याची "अक्कल" आल्यानंतरचं वाचणं असेल कदाचित पण या इतिहास प्रेमाला सर्वात पहिला हातभार लागला तो गोविलकरांचा, विशेषत: भगतसिंग व मदनलाल धिंग्रा यांच्या वरची त्यांची पुस्तके छानच आहेत. मग "जाणता" म्हणण्या सारखा झालो तेव्हा वीर सावरकर आणि वि.ग. कानिटकर या दोघांनी तर माझ्या वर "वत्सा तुजप्रत कल्याण असो!" असे म्हणत अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची लुट केली. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, काळेपाणी, हिंदुपदपातशाही बरोबरच वि.ग. कानिटकरांच्या नाझी भस्मासुराचा उदयास्त, इस्त्राएल:युध्द युध्द आणि युध्दच, माओ:क्रांतीचे चित्र आणि चरीत्र, धर्म:गांधींचा आणि सावरकरांचा, या पुस्तकांची अक्षरश: पारायणे झाली आहेत. आणि प्रत्येक वेळी पुस्तक वाचुन झालं कि, "अरे? हे मागच्यावेळी लक्षातच आलं नव्हतं कि" असंच वाटतं. या पुस्तकां बरोबरच बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपतीची" किमान १०-१२ पारायणे केली आहेत. किती जणांची नावे सांगु? किती पुस्तकांची नावे सांगु? त्यांच्या बद्दल लिहित बसलो तर बहुदा हा सगळा ब्लॉगच भरुन जाईल. तरी इतिहास वाचायचा असेल तर वरील ३ नावां बरोबर इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, वि.स.वाळिंबे, अरुण साधु, सच्चिदानंद शेवडे, विश्वास दांडेकर, डॉ. म.अ.मेहेंदळे, पु.ग.सहस्त्रबुध्दे, रविंद्र गोडबोले, विन्स्टन चर्चिल, विल्यम शिरर, हिटलर, विश्वास पाटिल, पु. ना. ओक, शेजवलकर, आनंद हर्डिकर, सदानंद मोरे, य.दि.फडके, नरहर कुरुंदकर, सेतुमाधवराव पगडि, जदुनाथ सरकार, प्रतिभा रानडे, शेषराव मोरे, गो.नी.दांडेकर, भा. द. खेर हि काहि प्रमुख लेखकांची नावे मला चटकन आठवतात. विन्स्टन चर्चिल यांची Greate War speeches, My life, World Crisis, हि अगदि डौलदार शैलीतील पुस्तके आहेत. "वक्ता" म्हणजे काय ते हिटलर, चर्चिल, सावरकर यांच्याकडे बघुन समजते. आनी त्याची छाप त्यांच्या लिखाणावर सहज दिसते. बाकि कोणा बाबत काहि सांगत नाहि मात्र वि.ग.कानिटकरांबाबत एक गोष्ट सांगाविशी वाटते, त्यांच्या लिहिण्याची शैली मला खुप आवडते. म्हणजे एखाद्या महत्वाच्या घटनेपासुन ते सुरुवात करतात आणि मग अलगद त्या घटनेच्या मुळ कारणापासुन सुरुवात करतात. २ उदाहरणे देतो - माओ:क्रांतीचे चित्र आणि चरीत्र या पुस्तकाची सुरुवात ते अशी करतात - "शहराच्या वेशीबाहेर धुपाच्या धुरात आणि छाती पिटणार्‍या भिख्खुंच्या घोळक्यात एक प्रेतयात्रा स्मशानाकडे जात होती. ती राजाची प्रेतयात्रा होती, आणि त्या प्रेता बरोबरच अख्खि राजवटच मसणवटीकडे निघाली होती." आणि इथुन मग ते तो राजा कोण होता? राजवट कोणाची होती, ती सत्तेवर कशी आली? मग त्यावेळी चीनचे सामाजिक जिवन कसे होते हे सांगत अलगद आपल्याला ४ हजार वर्ष मागे नेतात. दुसरे उदाहरण - नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकातुन - "२६ फेब्रुवारी १९२४ रोजी म्युनिच येथे, बव्हेरीयातील सत्ता उलटुन लावण्याचा कट केल्या बद्दल ३ जणांवर खटला भरला होता. न्यायालयाच्या कामाला सुरुवात होताच हिटलरले सांगितले - झालेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकट्याची आहे, पण १९१८ साली ज्यांनी देशाशी हरामखोरी केली त्यांच्या विरुध्द उठावणी करणे देशद्रोह कसा असु शकेल?" अशी सुरुवात करुन तो उठाव कसा झाला हे सांगतात, हिटलरला काय शिक्षा झाली तेहि सांगतात आणि मग हा हिटलर होता तरी कोण? पहिल्या महायुद्धाच्या राखेतुन बलशाली जर्मनी त्याने कसा उभा केला हे जाणुन घेणे महत्वाचे आहे असे म्हणतत आणि इथुन सुरु होते हिटलरच्या जन्मापासुनची कहाणी ते थेट जपानवर अणुबॉंब पडेपर्यंत. दुसरा आवडता प्रकार आहे विज्ञानकथा अथवा शोधांच्या कथा वा वैज्ञानिकांच्या कथा. यात शोध, शोधाची गरज, शोधाचा दिवस, त्याचे परिणाम या सगळ्या बरोबर शोध लावणार्‍यांचे चरित्र देखिल उलगडत असते. अश्या कथा लिहिणार्‍यां मध्ये पहिलेच पुस्तक हातात आले ते - ’प्रेषित’ - डॉ. जयंत नारळीकर, मग त्यांचीच ’आकाशाशी जडले नाते’ आणि ’वामन परत न’ आला हि पुस्तकेहि वाचनात आली. पाठोपाठ निरंजन घाटें बरोबर मैत्री झाली लहान मुलांना अगदि झाडांच्या पानाचा रंग हिरवा का असतो इथ पासुन ते अगदि अणुबॉंबपर्यंत सहज सोप्प्या शब्दात हा माणुस काहिहि समजावु शकतो. आणि इतकेच नाहि यांचेच "शस्त्रागार" पुस्तक वाचले आणि मी रणगाडे व विमानांचा तुफान चाहता बनलो. मी चुकत नसेन तर बाळ फोंडके हे लेखक सुद्धा विज्ञानाशी संबधित गोष्टिंवर खुप काहि लिहितात. त्यांचे लिखाणहि खुप अप्रतिम असते. यांच्या पाठोपाठ हातात आले "एक होता कार्व्हर" वीणा गवाणकरांनी लिहिलेले A1 पुस्तक. आणि मग एक जादुचा दिवा हाताला लागला - श्री मोहन आपटे. त्यांचे "अग्निनृत्य" हे पुस्तक मी किमान ३ वेळा वाचलेय. अणुबॉंब कसा बनला याची साद्यांत माहिती त्यांनी दिलीये. म्हणजे सर रदरफोर्ड यांनी अणु दिशा बदलतो, आणि केंद्रकात देखिल कसा फरक पाडतो हे सिध्द केल्यापासुन सुरुवात करुन आईनस्टाईन यांच्या E=mc(square) सुत्राने काय भुकंप घडवले तिथपर्यंत आणि जर्मनीच्या "ग्योटेन्गेज" विद्यापिठा पासुन ते जपानवर अणुबॉंब पडेपर्यंत व्हाया "मिशन लॉस-अलमॉस आणि मिशन अलसॉस" त्यांनी सगळं सविस्तर उलगडलय. किमान २२५ पानांच पुस्तक आहे. मराठीत तरि इतकि सुंदर-सहज-ओघवति भाषा घेउन अणुबॉंब बद्दल माहिती देणार पुस्तक माझ्या तरी वाचनात नाहि. पण बॅड न्युज अशी आहे कि सध्या ते आउट ऑफ प्रिंट असल्याने बाजारात ते मिळत नाहिये. सुदैवाने मला सरांचे "अणुबॉंबची कथा" हे लेक्चर ऐकायला मिळाले, स्वत: आपटे सर बोलायला उभे राहिले कि वा!वा!! काय सांगाव? आपण किती "दगड" आहोत हे समजतं. तो माणुस जगातल्या कुठल्याहि विषयावर बोलु शकतो हे आता मला त्यांच्या ८-१० लेक्चर्स मधुन समजलय. शिवाय सरांचे "आक्रमिले नभ" हे विमानांच्या शोधा विषयी असलेलं अप्रतिम पुस्तक देखिल वाचलयं. आपटे सरांचीच "मला उत्तर हवय!" अश्या नावाची पुस्तकांची एक मालिकाच आहे लहान मुलांसाठी. आवर्जुन वाचावित, वाचायला द्यावित अशी हि पुस्तके आहेत. आता सुरु होतो तो कादंबर्‍यांचा प्रदेश. इथेहि बर्‍याच कादंबर्‍या आणि कादंबरीकारांची नावे सांगता येतील. कादंबर्‍यांमधे स्वामी, श्रीमान योगी, राधेय या रणजित देसाईंच्या, आणि मृत्यंजय, युगंधर व छावा या शिवाजी सावंतांच्या कादंबर्‍या खुपच सुंदर आहेत. विश्वास पाटिलांची देखिल संभाजी छान जमुन आलिये. त्यांचीच नेताजींवरील महानायक उत्तम आहे. म्हणजे महानायकची जवळपास ६-७ भाषेत भाषांतरे झाली आहेत. पानिपतहि चांगली आहे. रविंद्र गुर्जरांच्या अनुवादित कादंबर्‍या वाचनिय असतात, सर्वात चांगले उदाहरण - सत्तर दिवस आणि पॅपिलॉन, पण पॅपिलॉनचा दुसरा भाग बॅंको मात्र मला नाहि आवडला. या शिवाय सेकंड लेडि, एअरपोर्ट ७७ या देखिल त्यांच्या उल्लेखनिय अनुवादित कादंबर्‍या आहेत. विजय देवधरांच्या कादंबर्‍या देखिल बर्‍याचदा अनुवादित असतात. त्यांची सर्वात जबरदस्त कादंबरी म्हणजे - डेझर्टर. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते हे सत्तर दिवस आणि डेझर्टर या दोन्हि कादंबर्‍या दाखवतात. प्रत्येकाने किमान एक वेळ वाचाव्या इतक्या सुंदर कादंबर्‍या आहेत या. गोनिदांच्या कादंबर्‍या खुप हळुवार असतात. ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ उगीच चुटपुट लावुन जाते. त्यांच्या दास डोंगरी राहतो, मृण्मयी, मोगरा फुलला या जराश्या अध्यात्मिकतेकडे झुकणार्‍या कादंबर्‍या आहेत, कदाचित काहिंना त्या कंटाळवाण्या वाटतिलहि. तर गोनिदांच्या ’कादंबरीमय शिवकाल’ मध्ये ५ कादंबर्‍याचा संच केलाय. आणि या पाचहि कादंबर्‍या क्रमश: आहेत. म्हणजे पहिल्या कादंबरीचा संदर्भ पाचव्या कादंबरीच्या शेवटच्या ओळीतहि आहे. आता पाच कादंबर्‍या काय आणि कश्या आहेत हे मी कसे सांगणार? पण वाचुन बघाच. इतर म्हणाल तर सच्चिदानंद शेवड्यांच्या पुनरुथ्थान आणि रक्तलांछन, मारीयो पुझोची गॉड-फादर, पेंढारकरांची "रारंगढांग" तर जब्ब्ब्ब्बदस्त आहे. ना.सं.इनामदारांच्या कादंबर्‍या या ऐतिहासिक पात्रांच्या असतात औरंगजेबा वरची शहेनशहा, पळपुट्या बाजीरावावरची मंत्रावेगळा, थोरल्या बाजीरावांवरिल राऊ या चांगल्या कादंबर्‍या आहेत. सध्या अजय झणकर(बहुदा हेच नाव आहे)यांची द्रोहपर्व, हि कादंबरी गाजतेय, ती वाचायची बाकि आहे. अपर्णा वेलणकर यांनी डेबोरा एलिस यांच्या ब्रेडविनर,परवाना, परवानाज जर्नी, मड सिटी या छोट्या कादंबर्‍यांची मराठित सुंदर भाषांतरे केली आहेत. ह्या कादंबर्‍या अफगाणिस्थानच्या सद्य परीस्थितीवर आहेत, विषेशत: तिथल्या स्त्रीया आणि मुलिंचे काय हाल होतात हे त्यात दाखवले आहे. नॉट विदाऊट माय डॉटर हि देखिल त्याच वळणाची अशीच खिळवुन ठेवणारी कादंबरी. Paulo Coelhoच्या The Alchemist, Veronika decides to die या कादंबर्‍या वाचाव्याच वाचाव्या. व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवडि देखिल झकास. अरे हो! शिरीष देशपांडे यांची राजा शिवाजी सध्या दुसर्‍यांदा वाचायला घेतली आहे. मनन करण्याजोगी कादंबरी आहे. जाता-जाता अजुन एक - चार्ली चॅप्लिन वरची हसरे दु:ख. चरचरीत चटका लावुन जाणारी कादंबरी आहे. आधीच आवडिचा असलेला चार्ली मग अजुनच आपला वाटायला लागतो, मग पु.लं.ना जसं नंदा प्रधानच्या डोक्यावरुन उगीच प्रेमाने हात फिरवावा असे वाटले, तसेच काहिसे आपल्याला चार्ली बाबत वाटते. तश्या शेकडो कथा-कादंबर्‍या वाचायच्या बाकि आहेत. बघु किती वाचुन होतात ते. निसर्गाशी नाळ जोडणार्‍या कथा-लेख मला मनापासुन आवडतात. अर्थात त्यात व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या बरोबर Jim Corbett हा कथालेखकहि आपल्याला त्यांच्या बरोबर तिथे जंगलात घेऊन जातो leopard of Rudraprayag, आणि कुमाउंचे नरभक्षक हि उल्लेखनिय पुस्तके आहेत.रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता वाचताना अंगावर काटा उभा राहतो. १२५ माणासं मट्ट करणार्^या चित्याला Jim Corbett ने कसे मारले याची कथा आहे ती. व्यंकटेश माडगुळकरांच्या जंगलातील दिवस, वाघाच्या मागावर आणि सत्तांतर या छान कथा आहेत. सत्तांतर हि जंगलातील माकडांच्या टोळ्यांवर उभी केलेली कथा आहे. त्या माकडांना काल्पनिक नावे आहेत. जंगलातील माकडांच्या टोळ्या कश्या वाढतात? त्यांच्यावर टोळिचा नायक कसा नियंत्रण ठेवतो? टोळिचा नायक कसा बदलतो? जर टोळित नर पिल्लु असेल तर त्याला आपला जीव का गमवावा लागतो? किंवा टोळितुन हाकलवलेली तरुण वानरे दुसर्‍या टोळ्यांना कसा त्रास देतात? या सगळ्यावर अतिशय ओघवत्या शिलित त्यांनी सगळं लिहिलय. उदाहरणा दाखल - "चार वर्षांमागं मुडानं, मोगा ज्या वानरांच्या टोळितला, त्या टोळीवर हल्ला केला होता. वयानं उताराला लागलेल्या प्रमुख नराशी हाणामारी करुन त्याचा डावा खांदा फाडला होता. पराभव पत्करुन आपला जनाना, लहान पोरंबाळं सोडुन तो पळुन गेला होता. तो पळताच मुडानं मोगासकट ती पाचहि नरं पोरं हाकलवुन लावली होती. आज पाचहि पोरं वयात आली होती, कधीकाळी दुसर्‍याने बळकावलेली आपली वडिलोपार्जित सत्ता घेण्यासाठी मोगा संधी बघत होता. त्यांना माद्या हव्या होत्या, फळझाडं हवी होती, टोळीवर सत्ता हवी होती. काळाप्रमाणे संघर्षहि सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच, असली तर भरतीच असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंड भरमसाठ वाढतात, गर्दि होते तेव्हा तेव्हा संघर्ष बळावतो, ज्यांना बोलता येतं ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतुन दाखवतात. ज्यांना बोलता येत नाहि, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्षातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, कि शस्त्रास्त्र वापरली जातात ज्यांना शस्त्रात्र माहितच नसतात ते सुळे, नखं वापरतात." एका बैठकित वाचुन व्हावी अशी हि धावती कथा आहे. मारुती चित्तमपल्लींची - पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं,रानवाटा, जंगलाची दुनिया, पक्षीकोश, केशराचा पाऊस हि चांगली पुस्तके आहेत. इतर पुस्तकं म्हणाल तर पु.ल.,व.पु., व्यंकटेश माडगुळकर, इरावति कर्वे, यांच्या शिवाय हा लेखा पूर्णच होऊ शकत नाहि. आणि यांच्या बाबत म्या पामराने काय सांगावे? यांच्या बरोबरच सुहास शिरवळकर, श्री सिकंदर, मीना प्रभू, शिरीष कणेकर, अच्युत गोडबोले, श्रीकांत सिनकर, डॉ. आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, आशा बगे, महेश एलकुंचवार. हि नावं महत्वाची आहे. तसं बघता "एलकुंचवार" या आडनावाची व्यक्ती(खरंच किती "आड" गेलेलं नाव आहे)या जगात असेल असे कधी वाटले नव्हते. तसे वाटण्याचं काहि कारणहि नव्हतं. पण माधवी पुरंदरे यांनी ’वाचु आनंदे’ हे २ भागांचे पुस्तक संपादित केले आहे, त्यात महेश एलकुंचवार यांचा वाड्याविषयी एक छोटा उतारा घेतला होता. मला खुप आवडला होता तो. त्यांचा बालपणीचा वाडा अगदि डोळ्यासमोर उभा केला होता त्यांनी. सुहास शिरवळकर यांची ’दुनियादारी’ हि कादंबरी एकदा वाचण्यासारखि आहे, या पुस्तकात शिरवळकरांची भाषा शिवराळ आहे. पण ती कादंबरीच कॉलेज-कट्ट्याची आहे. त्यामुळे पहिल्या २ प्रकरणांनंतर त्या भाषेची सवय होऊन जाते. गुढ किंवा भयकथा म्हणाव्या अशी पुस्तके मी फारच कमी वाचली आहेत फारशी आवडत नाहित मला, तरीहि नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी चांगले लेखक आहेत गुढकथांचे. मतकरींची ’कोहम’ मला जास्त आवडली. थोडी अध्यात्मिक पुस्तके पाहिजे असतील तर विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, व डॉ. वर्तकांची पुस्तके चांगली आहेत, समर्थ संप्रदायाचे सुनिलदादा चिंचोलकर देखिल छान लिहितात, वामनराव पै किंवा आठवले गुरुजींचं लिखाणहि उत्तम आहे. ओशो सगळ्यांनाच पचेल-रुचेल असा नाहिये कारण ’संभोगातुन समाधीकडे’ म्हंटल्यावर बरेच जण त्या पुस्तकाला हात लावत नाहित, मात्र त्या पुस्तका सकट किमान एकदा वाचावित अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, त्यातुन आपण काय घ्यावं हा आपला प्रश्न आहे. असो, ’साद देती हिमशिखरे’ नावाचे चांगले पुस्तक मध्ये वाचनात आले होते पण लेखकाचे नावच लक्षात येत नाहिये. शिवाय माझ्या मित्राने ’Left side of god' म्हणजेच कालीमाता म्हणजेच तांत्रिक विधीवरचे एक पुस्तक सुचवले आहे, बघु कधी वाचता येईल ते? साहस कथांमध्ये परत विजय देवधरांनी अनुवादित केलेल्या कथा चांगल्या असतात. त्यांच झुंज मृत्युशी नावचं एक पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचलं होत, त्यातली - खंडणी करीता ३ दिवस जमिनीखाली एका शवपेटीत जिवंत डांबलेल्या मुलाची कथा मला अजुन आठवतेय. शिवाय कोणा एका लेखकाची ’आणखी एक पलायन’ फारच थरारक सत्यकथा आहे. K.G.B. चे अंतरंग देखिल चक्रावुन टाकणारी कथांची मालिका आहे. बाकि म्हणाल तर इतर छोट्या-मोठ्या कथा वाचत असतोच अधुन मधुन. कवितांच म्हणाल तर वीर सावरकर, कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर, बालकवी, गदिमा, वसंत बापट, भाऊसाहेब पाटणकर, सुरेश भट, शांता शेळके, बहिणाबाई, हरीवंशराय बच्चन, सौमित्र, संदिप खरे, ह्या कवींनी जगणं आनंदि केलय माझं. आणि संदिप खरे तर आजकाल चिकन-गुनिया सारखा भराभर पसरत चाललाय. आपण तर बुआ फॅन आहोत त्याच्या कवितांचे. बाकि वि. दा. सावरकर, गदिमा, कुसुमग्रज, वसंत बापट, शांता शेळके या सिध्दहस्त कवीं-कवियत्रींबद्दल काय वर्णावे? समर्थांनी सांगितलेली कवीत्वाची लक्षणे यांच्यात पुरेपुर आहेत. अजुन काय आणि किती लिहावे? तर असा आहे माझा वाचन-प्रपंच. समर्थांनी म्हंटले आहे - दिसामाजी काहितरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचत जावे॥ आता समर्थांनी सांगितले ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे ना? - सौरभ वैशंपायन(मुंबई).

वाचने 7053 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पिवळा डांबिस Sun, 08/24/2008 - 03:48
श्री. सौरभ वैशंपायन, इतका सुंदर आणि माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी जसे भेटल्यावर परस्परांची गळाभेट घेतात तशीच काहिशी माझ्या मनाची भावना झाली आहे.... प्रसंगी अखंडित वाचत जावे॥ आता समर्थांनी सांगितले ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे ना? क्या बात है! संपूर्णपणे सहमत!! तुम्ही लेख खूपच सविस्तर लिहिला आहे त्यामुळे सगळ्याच पुस्तकांचा परामर्ष इथे प्रतिक्रियेत घेणे शक्य नाही. मला चरित्रं (आत्म वा दुसर्‍याने लिहिलेली) वाचायला आवडतात. केवळ नेतेच नव्हे तर समाजसुधारक, वैज्ञानिक, लेखक, कवी, चित्रकार, नट, गायक, समाजातील हर अंगात क्रियाशील असलेले लोक. तुमच्या लेखात उल्लेख नाही पण मला तर "आम्ही आणि आमचा बाप" हे पुस्तकही आवडलं. ना सं इनामदारांच्या कादंबर्‍यात मंत्रावेगळा आणि शहेनशहा तर आवडलेच पण "झेप" ही त्रिंबकजी डेंगळ्यावरची, एका सामान्य परिस्थीतीतून वर आलेल्या माणसाची कथा ही आवडली. मृत्यंजय बेजोड आहेच पण युगंधर इतकी नाही आवडली. मृत्युंजयाची सिक्वेल वाटली. इतकी की काही काही ठिकाणी तसेच (शब्दशः) वर्णन वाटले. विज्ञानकथांमध्ये आपले जयंतराव मस्त आहेतच पण आयझॅक असिमॉव्हला विसरलात का? तो तर सर्व विज्ञानकथा लेखकांचा गुरु आहे की! आणि स्टीफन हॉकिंग? मला वाटतं स्वतः नारळीकरही ही दोन नांवे मान्य करतील!!:) तुमच्या लेखाचा अजून एक फायदा हा की यातील बरीच पुस्तकं मी अजून वाचलेली नाहीत. तेंव्हा आता काय काय वाचायचं ते मनसुबे करायला सुरुवात केलीय!:) बाय द वे, ’साद देती हिमशिखरे’ नावाचे चांगले पुस्तक मध्ये वाचनात आले होते पण लेखकाचे नावच लक्षात येत नाहिये. या पुस्तकाचे अनुवादक आहेत डॉ. रामचंद्र जोशी. मूळ पुस्तक इंग्रजीत आहे, "टोवर्डस द सिल्व्हर क्रेस्टस ऑफ हिमालयाज" मूळ लेखक: जी. के. प्रधान. अफलातून पुस्तक आहे... अर्थशास्त्राच्या पुस्तकात दिलेले पानभर आकडे, त्यांच्यातले बदल आणि बदलांची कारणं हे अगदी, "मला हे दत्तगुरु दिसले" या आनंदाने वाचणारी मंडळी या जगात आहेत. अहो, ते पण मनोरंजक असतं हो! जसं च ची भाषा यायला लागली की त्यातली दुर्बोधता नाहिशी होते तसंच अर्थशास्त्राची भाषा येऊ लागली की त्यात गोडी येते. त्यातले आलेख समजू लागतात. वेगवेगळे निर्देशांक एखाद्या कमनीय स्त्रीच्या मापांप्रमाणे मन वेधून घेतात!! :) कुठल्याही शास्त्राचं तसंच आहे. सुरवातीला दुर्बोध वाटतं पण एकदा त्यात गम्य आलं की गोडी वाढते. "ग्रंथ हेच गुरू" हे एकदा ठरल्यानंतर हाडामांसाच्या गुरुंची जरूरी भासत नाही आता... असो. आपला लेख विस्त्रूत आहे, लिहिण्यासारखे बरेच आहे, पण पुन्हा केंव्हातरी.... असेच लिहीत रहा, आपला ब्लॉग असेल तर पत्ता द्या. पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! आपला स्नेहार्थी, पिवळा डांबिस

व्वा !!! आपले पुस्तक वाचनाचे वेड,आवड आणि काही वाचनीय पुस्तकावरील धावते भाष्य आवडले. त्याबरोबर काही पुस्तकांची स्वतंत्र परिक्षणे येऊ द्या !!! -दिलीप बिरुटे

भाग्यश्री Sun, 08/24/2008 - 09:19
तुझ्या ब्लॉगवर हा लेख वाचला होता, तेव्हाच मी अवाक झाले होते तुझं वाचन पाहून.. बरीच पुस्तकं वाचायची आहेत अजुन.. तुझा लेख, मेघनाचा पुस्तकांचा धागा नक्कीच उपयोगी पडतील..!

सहज Sun, 08/24/2008 - 10:17
लेख आवडला. अनुभवविश्व समृद्ध होण्याची क्रिया फारच सुंदर. पुस्तकात वाचलेल्या कथाप्रसंगाचे, स्थळाचे वर्णन एक कृष्णधवल आठवण बनुन मेंदुत रहाते व जेव्हा कधी त्या वर्णन केलेल्या स्थळाला प्रत्यक्ष भेट द्यायचा योग येतो व एकदम ती आठवण रंगीत बनते. फारच सुखद अनुभव! चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद!

मुक्तसुनीत Sun, 08/24/2008 - 10:17
लेख आवडला. ज्यांनी तुम्हाला इतके दिले आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला भरभरून लिहावेसे वाटणारच. हा "बर्डस आय व्ह्यू" आवडला. पुष्कळच वाचले आहे तुम्ही ! धावता आढावा छानच झाला आहे ; आता जमेल तसे एकेका पुस्तकाचा कंद उघडून दाखवा की :-) अवांतर : तुमच्या "ब्याड म्यान" च्या यादीत हिटलर , स्टॅलीन नसल्याबद्दल थोडे आश्चर्य वाटले.

ऋषिकेश Sun, 08/24/2008 - 10:29
लेख आवडला त्यातही
उत्तम लिहिणं जितकं कठिण असतं कदाचित त्याहुन उत्तम वाचणं कठिण असतं
१००% सहमत बाकी काहि ठिकाणी जरा जास्त बारकावे आहेत.. जसं इतिहासातील व्यक्तींची नावं वगैरे ती लांबण टाळून लेख नेटका करता येईल असं वाटलं पण विषय क्लास.. अजून येऊ द्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 10:43
सौरभशेठ, अतिशय सुंदर लेख. खूप मोठा आढावा घेतला आहेस. तुझा वाचन-व्यासंग पाहून मला तर स्वत:बद्दल न्यूनगण्डच वाटतो आहे. आपलं काय साला तुझ्याइतकं वाचन नाय बा! :) असो, अजूनही असेच उत्तमोत्तम लेख येऊ देत, ही विनंती... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

II राजे II Sun, 08/24/2008 - 10:55
अतिशय सुंदर लेख. खूप मोठा आढावा घेतला आहेस. तुझा वाचन-व्यासंग पाहून मला तर स्वत:बद्दल न्यूनगण्डच वाटतो आहे. आपलं काय साला तुझ्याइतकं वाचन नाय बा १००% सहमत. अगदी मनातलं बोललात तात्या !! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सौरभ वैशंपायन Sun, 08/24/2008 - 21:41
सगळ्यांना ले़ आवडला हे बघुन खुप बरं वाटल. शिवाय मला अजुन काहि नविन पुस्तके मिळाली(म्हणजे लिस्ट). सध्या तरी मी वॉल्ट डिस्ने: द अल्टिमेट फेन्टसी . लोकमान्य ते महात्मा(खंड १) : सदानंद मोरे. चकवाचांदणः मारुती चित्तमपल्ली. आणि हसरे दु:खः भा. द. खेर हि ४ पुस्तके वाचतोय.

सौरभ वैशंपायन Sun, 08/24/2008 - 21:52
नमस्कार. "मृत्यंजय बेजोड आहेच पण युगंधर इतकी नाही आवडली. मृत्युंजयाची सिक्वेल वाटली. इतकी की काही काही ठिकाणी तसेच (शब्दशः) वर्णन वाटले." - हो बरोबर, म्हणुन कोणी सावंत वाचणार असेल तर मी सल्ला देतो - "आधी छावा-युगंधर्-मृत्युंजय या क्रमाने जा चुकुन उलटा क्रम झाला तर वाचन कंटाळ्वाणं बनेल!" बा़कि, अजुन लेखक दिलेत म्हणुन धन्यवाद.

मैत्र Tue, 08/26/2008 - 18:51
सौरभ, काय जबरदस्त वाचन... मीही असाच चुकलेला फकीर... पण इतका मोठा आवाका नाही आणि गेल्या काही वर्षात तर बिलकुल नाही.. पण असंख्य पुस्तकं आणि लेखकांची नावं वाचून विलक्षण आनंद झाला. काही वेगळी पुस्तकं वाचणारं आणि आवडणारं कोणी भेटलं तर कसं वाटतं हे फार काळात अनुभवलं नव्हतं. मला इतिहास आणि ऐतिहासिक कादंबर्‍यांचं वेड होतं. गेल्या वर्षी चक्क ऑक्सफर्ड ईंडियन हिस्टरी विकत घेऊन वाचलं. पण अगदी इतिहास वाचणारे कमीच असतात. तुमचा इतिहासाचा अभ्यास पाहून थक्क झालो. विजय देवधरांचं डेझर्टर पाहून झकास वाटलं...गुंथर बान्हमन डेझर्टर ... अनेक पारायणं झाली असतील... एकदा अतिशय अचानकपणे खुद्द विजय देवधर पुण्याच्या आय आय टी एम या हवामान संशोधन संस्थेत भेटले आणि इतका आनंद झाला की त्यांच्याशी काय बोलावं हेच सुचेना... त्यांचं अजून एक चांगलं पुस्तक म्हणजे साहसांच्या जगात. तसंच शहेनशहा, राऊ आणि पिडा काकांनी उल्लेख केलेली 'झेप' उत्तम आहे. त्रिंबकजीची दुर्दैवी अखेर फार चुटपुट लावून जाते. दुनियादारी वाचून सुशि खुप वाचले पण दुनियादारी ची सर नाही.पुढे एस पी मध्ये मुद्दाम उदय विहार मध्ये कटिंग चहा साठी जात होतो :) गोनीदांची पुस्तकं वेड्यासारखी वाचली होती... काही लिहाल का? 'माचीवरला बुधा' हे माझं सर्वात आवडतं .. इतकं लहानसं पुस्तक असं काही मनात घर करून राहतं... दुसरं एक विशेष आवडलेलं -गंगाधर गाडगीळांचं लोकमान्य टिळकांवरची चरित्रवजा कादंबरी -- 'दुर्दम्य'. तुमचं वाचन बघून न्यूनगंड नाही वाटला तर उलट काय काय वाचायचं आहे हे समजलं. तुम्ही अजून लिहा यावर आणि जमल्यास एक एक लेखक घेऊन लिहा... म्हणजे मिपाकरांना त्यांची वैशिष्ट्यं समजतील ... तुमची शैलीही छान आहे.. आम्हाला नवीन आणि वेगवेगळी पुस्तकं कळतील... काही विशेष वाटलं तर एकेका पुस्तकाचं रसग्रहण लिहाल का? हा तुमचा लेख मोठा आहे पण ही तुमच्या पुढच्या लिखाणाची सुरुवात असावी अशी इच्छा. या मस्त लिखाणासाठी धन्यवाद!