डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला.
आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली .
खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते .
अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते .
सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत.
विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती.
सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो ,
काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे .
म्हणूनच ऑगस्ट अखेरीस ऐन सुट्टीत आलेला हा कॅम्प आम्हाला एक पर्वणीच होता .
मी तर कॅम्प साठी बराच उतावळा होतो .मुख्य म्हणजे कॅम्पचा अनुभव आणि त्याला जोडून मिळणारा पैसा .हि दोन कारणे तर होतीच
पण एक अनामिक उत्सुकताही होती. कॅम्प च्या निमित्ताने तथाकथित ब्रिटीश लोकजीवन अगदी जवळून बघायला मिळणार होते .
डायबेटीस संदर्भातील कॅम्प असल्याने कदाचित भारतावर राज्य केल्यावेळच्या काही खाणाखुणा कुणा ब्रिटीश वृद्धाकडे सापडाव्यात
अशीही एक अनामिक इच्छा होती मनात .
पण डॉक्टर मार्टिन च्या एका निर्णयाने मी माझ्या मित्रांपासून दुरावलो गेलो होतो.
मिनेश आणि विशालचा आठवडा कॉवेनट्रीत जाणार होता तर पुढील आठ दिवस लीड्स माझ्या नशिबात होते .
जे काही कॉवेनट्रीत शोधण्याची इच्छा होती माझी कदाचित ते लीड्स मध्ये तरी मिळावे ही अपेक्षा मन करत होते.
एकट्याचा हा प्रवास बराच जड जाणार होता मला .
होती सोबत फक्त जिवाभावाच्या डायरीची ,माझ्या एकटेपणाची साथीदार जणू..!
एव्हाना गाडीने लंडन पार केले होते ...
दूरवर पसरलेल्या हिरवळीतून जाणारा लांबच लांब रस्ता ,शांत सौम्य वातवरण आणि हवेत गारवा होता.
रागीट सूर बदलण्याचा प्रयत्न मन करत होते .असलेली परिस्थिती मान्य करणेच हातात होते .
मी मलाच समजावले आणि जरा मन स्थिर करत बस मध्ये डोकावले.
ज्यांच्या सोबत काम करायचे त्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न माझा सुरु झाला .
२ मलेशियन २ चायनीज २ श्रीलंकन आणि मी १ भारतीय जोडीला १ पाकिस्तानी असे आम्ही आशियाचे प्रतिनिधित्व करणारे ८ लोक
आणि सीनियर डॉक्टर क्रो आणि म्यानेजर स्मिथ असे १० लोकांचे युनिट होते
मिनी बसचे प्रत्येक सीट व्यक्ती किंवा लगेज ने भरून होते .मी शेवटच्या सीटवर विंडो साइड ला बसून होतो .
सीट जोडून असल्याने मोठे होते म्हणून मग शेजारी माझी आकाशी रंगाची लगेज बॅग सीटवरच ठेवून होतो ..
माझी आवडती बॅग.भारतातून आलो तसे मुंबई ते लंडन प्रवासाचे स्टीकर बॅग अजूनही सांभाळून होती .
माझ्या बॅगेशेजारी अजून एक बॅग होती गर्द हिरव्या रंगाची .ती ही एका स्टीकर ची साक्ष जपून होती ..लाहोर ते लंडन ..
बॅगच्या शेजारी एक चेहरा जरा झोपी जाण्यचा प्रयत्नांत असलेला ..
एक ओझरता कटाक्ष टाकला मी त्याच्याकडे जरा नाराज सूर चेहऱ्यावर दिसलेत ...
माझी नजर पुन्हा गाडी बाहेरील दृश्यात रमली ..पण स्थिर होयील ते मन कसले ..चंचल मन पुन्हा विचारात रमले ...
कोण असेल हा? .कदाचित याचेही मित्र दुसरीकडे गेले असतील ...
कदाचित माझ्यासारखेच यालाही ऐन वेळी या गटात टाकले असेल .पुन्हा नजरेचे वेध त्याच्या बॅगेकडे गेले .
स्टीकर जरा निरखून बघितले .अरमान नाव दिसले .त्याचे नाव असावे बहुतेक मी कयास केला...
त्याच्याकडे सहजच नजर गेली...एव्हाना तो झोपला होता .
साधा सरळ चेहरा मुसलमान असल्याची कुठल्याही खुण चेहऱ्यावर नव्हती .ना लांब दाढी ना टिपिकल मुस्लीम लूक .
चेहरा साधा पण तरीही बोलका असा.आखीव रेखीव .माझ्या चेहऱ्याशी जरा साम्य वाटेल असा .
आणि अगदी अचानक डोक्यात एक शंका आली ..मी लगेच सीट वरून उठून स्मिथला गाठले
मला राहण्याच्या व्यवस्थेविषयी विचारणा करायची होती ..ऐन वेळी युनिट जॉईन केल्याने कसलाच अंदाज मला नव्हता .
स्मिथ जरा चक्रावला पण लगेच फाईल चाळत काही माहिती समोर केली त्याने.
राहायला जे रूम्स होतेत ते दोघांनी शेयर करून राहायचे होते.
माझे रागीट सूर वैतागात बदलले होते ..मला पाकिस्तानी व्यक्तीसोबत राहण्याची इच्छा नव्हती.
पण ब्रिटीशी स्मिथ समजावत राहिला .मी अरमान सोबतच राहावे म्हणून सांगत राहिला .
कमाल वाटली त्याची ..ज्याच्या पूर्वजांनी एक देश तोडून दोन अलग देश निर्माण केले होते
आज तोच मला एकत्र राहण्याचे महत्व सांगत होता ..मी सहमत नव्हतो ..पण बाकी कुणी तडजोड करायलाही तयार नव्हते .
मी नाराजीत माझ्या जागी आलो .विशाल ला फोनही केला .
घडत असलेल्या घटनांनी मी बहुतेक त्रस्त झालो होतो .कॅम्प ला आलो नसतो तर बरे झाले असते .ह्या विचारात सीट वर बसून होतो ,
खिडकीबाहेर फक्त नजर फिरे ..मन मात्र येणाऱ्या आठ दिवसांच्या चिंतेत बुडाले होते .
कॉलेज मध्ये पाकिस्तानी मित्र होतेत पण फक्त हाय हेलो मर्यादित मैत्री होती .सोबत राहणे म्हणजे अतीच होते जरा ..
भारतातून येतानाचे सल्ले आठवत होते ...या लोकांचा काहीच भरोसा नसतो हे मनात ठाम होते ..
कधीही कुठेही दहशतवादाशी यांचा संबंध असू शकतो याची अनेक उदाहरणे मनात आलेली ..
बॅगेला लॉक आणलेले म्हणून जरा बरे वाटले ..कितीही झाले तरी वैयक्तिक माहिती काहीही द्यायची नाही हे मनात अगदी पक्के केले ...
दरम्यान तो ही उठला होता ..बाहेरील जगात रमला होता ..
चार तासाचा प्रवास एकंदरीत..पण साध्या एक शब्दानेही एकमेकांशी बोललो नाहीत आम्ही ..
मी आय पॉड मध्ये मग्न झालेलो ..'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ची गाणी ऐकत ...गाणी ठीक होती.
फरहान च्या कविता अप्रतिम होत्या, पण त्याहून सुरेख म्हणजे चित्रपटाची थीम होती .
आयुष्य मिळते एकदाच आणि त्यात आलेले क्षणही एकदाच येतात ,तेच भरभरून जगावेत ह्या विचारांवर आधारित..
हा कॅम्प आणि हे क्षण हि एकदाच तर आयुष्यात आलेत ..मी हि हे क्षण जगण्याचा प्रयत्न करावा असे मन मला सांगत होते ..
जे समोर आहे त्यातूनच काहीतरी चांगले घडत राहते माझेच मन माझ्याशी बोलत होते !
मजल दरमजल करत अखेर लीड्स गाठले आम्ही.
आजचा दिवस आरामाचा होता .उद्यापासून काम सुरु होणार होते. प्रवासाचा जरा थकवा जाणवत होता ...
राहण्याची व्यवस्था मात्र सुटसुटीत होती .
तिसऱ्या मजल्यावरील सर्व ५ रूम्स आमच्या युनिट साठी राखीव होते .
रूम्स हवेशीर .दोन दरवाजे युक्त . एकातून प्रवेश आणि दुसरा दरवाजा ग्यालरीला लागून होता .ग्यालरी आटोपशीर होती लीड्स शहर छोटेसेच पण आकर्षक घरांनी नटलेले होते. या ग्यालरीतून जवळपास सगळे शहर नजरेत येत असे.
रात्री जेवतांना अरमान वगळता सर्वांशी जुजबी बोलणे झाले होते माझे ...
मी रूम मध्ये येवून झोपण्याच्या तयारीत होतो ...आणि त्याचा एक प्रयत्न माझ्याशी संवाद साधण्याचा ..
"आप हिंदुस्थान से हो ना... मुंबई से ??
मी : - किसने बताया ??
तो -बॅग का स्टीकर देखा....
मी - ओह अच्छा..और तुम अरमान... लाहोर से ...रायीट??
तो - जी हा बिलकुल सही ...आपका नाम युवराज है ?
मी - एस ..
तो - मेरे बडे भाई का निक नेम प्रिन्स है ...
एक स्मित हास्य दोघांच्या चेहऱ्यावर झळकले ....
तो -उर्दूकी मालुमात कहातक है..?
मी-कोई बोले तो समज लु थोडा बहोत ..हिंदी मिक्स बोल भी लेता हु कभी कभी ..पर उर्दू पढना या लिखना नही आता ..!
तो- मुझे हिंदीकी जानकारी है ..समज लेता हु ..पढ भी सकता हु ...और लिख भी ..!
मी -ओह ..ग्रेट ..!
हिंदी कुठून शिकला विचारावेसे वाटले ..पण का कुणास ठावुक नाही विचारले मी .तो मात्र बोलत राहिला ..अजून जरा स्वताची माहिती दिली त्याने ..
येथील शिक्षण संपलय ..विसा संपल्यात जमा आहे ..कॅम्प नंतर १५ दिवसांनी लाहोर परतीचा प्रवास आहे ..
आणि अशीच काही प्राथमिक माहिती ..मी माझ्याबद्दल जास्त काही न सांगणेच पसंद केले ..
सकाळी लवकर उठायचे असल्याने लवकर झोपनेच योग्य वाटले मला ...!
एक संवाद नकळत संपला ...जरा पूर्ण ..जरा आधा अधुरा असा...
एकटे राहण्याची पुढील प्रवासाची मनाने माझ्या तयारी केलेली.नव्या देशात नव्या लोकात नवी रात्र सुरु झालेली ..!
दुसरा दिवस कामाने अगदी व्यापून होता.पाणी पिण्याचीही उसंत न मिळावी असा ..
आम्ही प्रत्येक जन वैयक्तिक पातळीवर नेमून दिलेल्या गटानुसार काम करत होतो.
समोर असलेल्या पेशंटचा अचूक डाटा मिळवणे आणि ट्रीटमेंट डिटेल तारीखनुसार फाईल करणे.
कौशल्याचे आणि जिकरीचे काम होते सारे .त्यादरम्यान पेशंट ने विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरेही देणे सलग्न होते.
युनिट कॅम्प असल्याने पेशंट संख्याही जास्तीची असे..
दिवस मावळेपर्यंतचे काम शरीर आणि मनाला थकवून गेले होते.घरी येवून फ्रेश होवून जेवणही झाले होते .
शतपावली करत ग्यालरीत उभा राहून मी दिव्यांच्या रोषनाईतील लीड्स शहराकडे बघत होतो ...तसा अरमानही हि आला तेथे ...
"कैसा रहा दिन ??
मी- ..हेक्टिक बट नॉट ब्याड...आपका ?
तो- आदतसी हो गयी है कॅम्प कि ..सो ठीक हि था..
कामाबद्दल बोलता बोलता सहजच गप्पांचा ओघ बदलला त्याने ..
सुना है आपका मुलुख बहोत अच्छा है.? ..
मी- वो तो है ..सारे जहा से अच्छा है ..!
मी जरा स्मित हास्याने त्याकडे बघत बोललो ..तसे त्याचे पुढचे काही शब्द मलाही विस्मयीत करून गेलेत ..
तो - ...हा..सही..मेरे अब्बू भी हमे बचपन से यही बताते आ रहे है ..
सरहद के उस पार जो देस है ..वो बहोत अच्छा देस है ..वहा अमन है ..सुकून है ..और जिंदगी कमाल कि हसीन है ...
मला जरा नवल वाटले तो साधे आणि खरेपणाने बोलला हे जाणवले मला त्याचे वडील असे का म्हटले याचेही कारण नकळत समजले.
त्याच्या वडिलांच्या आजीचे माहेर दिल्लीचे होते..फाळणीनंतर आजी लाहोरलाच होती तिच्या मृत्यूपर्यंत
पण दिल्लीच्या आठवणी आणि भारताबद्दल्चे प्रेम तिने नातवंडांच्या मनात असे काही रुजवले होते कि
नकळत त्यांच्या कुटुंबात भारताबद्दल एक आपुलकी होती.
त्याला जोडून एक अनुभव त्याच्या मोठ्या भावालाही आला होता
पाकिस्तान लष्करात असलेल्या रेहान उर्फ प्रिन्स ची पोस्टिंग सतत सीमारेषेवर असायची.
सीमारेषेवर सततच्या वास्तव्यात भारतीय जवानांशी विशेष ओळख झाली होती .
सुरेश रावत हा भारतीय जवान तर त्याचा खास मित्र बनला होता ..
खर तर दोघा देशातील ते साधे जवान नकळत मैत्रीची नात्यात बांधले गेले होतेत.
तिरस्कार द्वेष जात धर्म ह्या सीमारेषा दोघांच्या मनानी सहज पार केल्या होत्या.
दोघा देशात मैत्री नसली तरीही शत्रुता तरी नको या विचारांचे दोघे .पण स्वताच्या भूमीचा दोघांनाही गर्व होता ..
यातच कारगिल युद्ध पुकारले गेले आणि अगदी ऐन मोक्याच्या क्षणी भारताविरुद्ध बंदूक चालविणाऱ्या रेहानने हात गमावला... कायमचाच
रेहान आता अपंग असल्याने अकाली निवृत्त आहे. सुरेशच्या आठवणी आजही त्याच्या मनात घर करून आहेत .
साऱ्या घरभर सुरेशची वेगळीच प्रतिमा तयार झालीये ...
अरमान बोलत राहिला. कधी डोळ्यासमोर रेहान येत राहिला. कधी सुरेश दिसत राहिला. मी नुसताच ऐकत राहिलो
माणूस ...माणुसकी...मैत्री ..आणि देशप्रेम साऱ्याच शब्दांचा मी माझ्यापरीने अर्थ लावत राहिलो.
एक धूसर अशी सीमारेषा मनात साठवत राहिलो ...!
नंतरचा दिवसही कामाने व्यस्त होता.कामाच्या ठिकाणी बाकी लोक दोघांच्या सोबतीने काम करीत होतीत
आज मात्र आम्ही दोघेच एकटे एकटे कामात मग्न होतो .
खर तर अरमान सोबत काम करणे मला सहज शक्य होते.कदाचित त्याच्या मनातही असेल असेच काही .
अधून मधून तो माझ्याकडे बघतही असे कामातला एकटेपणा त्याच्या चेहऱ्यावर जाणवत असे,
पण एकमेकांना न सांगणेच पसंद केले आम्ही.
संध्याकाळी परतीच्या प्रवासात घरी भारतात फोन केला मी रात्र असेल तेव्हा तिकडे.
आईला कॅम्पच्या गमतीजमती सांगत होतो. अगदी काळाची गरज म्हणून सोबत राहत असलेल्या अरमान बद्दल सारे काही सांगितले मी .
आणि आज कामात कसे एकटे पडलो ते हि सांगत राहिलो .
" माणसाची ओळख करणे तुला आता जमते आहे बाळा, मला त्या मुलाबद्दल जास्त सांगता येणार नाही.
पण माणसाला देश जात धर्म यावर मोजू नये कधी ..कर्म ..वागणूक..विचार आणि माणुसकी यानुसार त्याकडे बघ..
तो हि तुझ्यासारखाच दूर दूर देशात आहे . आहात तो सहवास मैत्रीपूर्ण असू दे ..
उडती पाखरे जेव्हा प्रवासात भेटतात तेव्हा तीच आपल्या सुखदुखाची भागीदार असतात.
सांभाळून रहा .स्वताबद्दल जपून बोल पण मनाला जरा मोकळेही कर ! "
आईचे बोलणे मी ऐकत राहिलो.आई मला लहानपणी सांगत असे
साऱ्या जगात देव एकच.माणसाने देवाला विभागले आणि माणसांनाही वेगळे केले माणसानेच असे तिचे म्हणणे असे.
आज तिचे तेच विचार मला खरे वाटायला लागले होते.
उंच आभाळात उडणारी पाखरे.कधीतरी ह्याच आकाशात सुरेश आणि रेहान भेटले होते.
मैत्रीची एक अधुरी कहाणी सहज ते जगले होते.
आता आभाळ माझे होते ..उंच उंच उडण्यासाठी ..आपलेपणाने जवळ येणाऱ्या अरमानचा विश्वास जपण्यासाठी ....!
आपलेपणाने आजही अरमान माझ्याशी बोलत राहिला ...
आजाद काश्मीर मधील आजोळी गेलेले बालपण आणि शिक्षण ..भावाप्रमाणे असलेले देशप्रेम .
त्यातूनच पाक सैन्यदलात अधिकारी होण्याची इच्छा ..लाहोर हून मेडिकल कॉलेज संपवून दिलेल्या सरकारी दलाच्या प्रवेश परीक्षा,
अनुभवास आलेला भ्रष्टाचार ...हुकलेल्या संध्या ...गाठलेला परदेस ...तुटलेले स्वप्न ...आणि ... संवेदित मन ...
मी नुसताच ऐकत राहिलो ..खूप तरल बोलणे होते त्याचे ..
मी माझेच प्रतिबिंब बघतोय असे जाणवायचे बोलतांना ...प्रत्येक गोष्ट मनापासून जगणारा ,भावनिक ,नात्यांचे महत्व लगेच जाणवायचे बोलतांना.
माणूस बदलतो...देश धर्म जात पात वागणे आणि विचार बदलतात ..बदलत नाहीत त्या मनामनातील संवेदना ..
मनाला धर्म नसतो ..मनाला जात नसते .मनाला समजतात फक्त एकमेकांच्या भावना
आज माझ्याच संवेदना मला अरमानशी बोलतांना जाणवत होत्या !
डायरीची पाने आजही भरून गेलीत .. एका अनोख्या विश्वासाला जपून गेलीत
मी मलाच नव्याने भेटल्याचे जाणवत राहिले मनातल्या संवेदना एका नवीन नात्याची सुरवात करून गेलीत..!
नंतरच्या दिवशी मात्र आम्ही सोबतीत काम केले आम्हाला सोबत बघून सार्यांच्याच भुवया उंचावल्यात खरे तर.
आणि स्मिथला तर बरेच नवलही वाटले आणि एक अनोखे समाधानही ..
अरमान कामात हुशार होता ..आणि मला त्याच्यासोबत काम करणे सहज सोपे जात होते
होम विझिट वर्क होते आज ..आणि ज्या अपेक्षेने कॅम्प ला आलो होतो आज ती अपेक्षाही पूर्ण झाली होती माझी
अगदी सुखद विस्मयीत अनुभव.मिस्टर हेन्री भारतावर राज्य केलेल्या ब्रिटीश दलातील एक साधा शिपाई होता .
वयाने शंभरी गाठली होती पण शरीर आणि मन अजूनही साथ देवून होते .
एका केयर टेकरच्या मदतीने आयुष्याचा शेवटचा टप्पा जगत होता .
मी भारतीय आहे बघून खर तर तो खुश झाला अल्बम मधील एक फोटो त्याने माझ्यासमोर केला ..
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया पाशी काढलेला त्याचा फोटो ..फोटोत सोबत त्याची बायकोही होती ,
आता ती ह्या जगात नव्हती फक्त आठवणी रूपाने हेन्री तिला जपून होता
भारत हा जगातील किती अनोखा देश आहे हे त्याच्या तोंडून ऐकणे एक सुखद अनुभव होता .
त्याला भारत मनापासून आवडायचा ..म्हणून अनेक फोटो त्याने जपून ठेवले होते अरमान आणि मी नुसतेच बघत राहिलो ...
आठवणींवर जगणारी माणसे ..आठवणी कश्या जपून ठेवतात हे एकमेकांना सांगत राहिलो ...!
आता मी कॅम्प मध्ये रुळायला लागलो होतो ...अनोळखी लोक ओळखीची झाली होती ..अरमान आणि मी तर अगदी जीवाभावाचे मित्र बनलो होतो ...
तासोनतास गप्पा करत असू..मुस्लीम धर्म ..अल्लाह ..पैगंबर ...कुराण या आणि अनेक विषयांवर तो शास्रोक्त बोलत असे ...
कधी मी ते मन लावून ऐकत असू तर कधी मला ते कंटाळवाणे वाटत असे.
त्याच्या बोलण्यातून त्याचे ज्ञान मात्र सहज जाणवत असे ..
पाकिस्तान बद्दल बोलतांनाही तो त्याच सहजतेत बोलत राही ...
गरिबी आणि भ्रष्ट राजकारणाने बरबटलेला देश ...अनेक सामान्य तरुणातही भारताविषयी असलेला द्वेष...तिरस्कार ..
त्यातूनच जन्मलेले अनेक कसाब ...
भारताचा विकास सहन न होणारी असंख्य लोक पाकिस्तानात आहेत ...!
पण एवढे मात्र नक्की भारतातील चित्रपटांना अनेक चाहते येथे आहेत ..सचिनला आवडता मानणारेही बरेच लोक आहेत .
काही लोकांना आजही बरीच आपुलकी वाटते. भारताशी आपले संबंध सुधारावेत हे मनापासून वाटते
याच विचारातील एक घर त्याचेही होते .साधी लोक ...कोणाच्या घेण्या देण्यात नसलेली .पाकिस्तान बद्दल प्रचंड प्रेम असलेली ...
पण कुठेतरी मनात भारताविषयी एक आपुलकी ठेवून असलेली ...!
भारताबद्दल मीही त्याला नव्याने काही सांगत राही ..
भारतीय क्रिकेट आणि चित्रपटांनी जगावर केलेला कब्जा तो जाणून होता .विज्ञानातील भरारी ...भारतीय तरुणाई .आजची मुंबई ..
भविष्यातील विकसित भारत ..विविधतेतील एकता माझे बोलणे तो नुसताच ऐकत राही ..
भारतातील मुस्लीम आणि हिंदू कसे सहज मित्र बनतात ते ऐकून त्याला नवल वाटे.
त्याला त्याच्या देशाचा सार्थ अभिमान होता ..मलाही माझा देश प्राणप्रिय होता ...
हि दोघे देश सद्यस्थितीत एकत्र येणार नाहीत हे आम्हीही जाणून होतोत ..
पण दोघांचे बोलणेच असे राही कि एकमेकांशी सतत बोलावेसे वाटत राही.. काहीतरी नवीन सांगावेसे ..काहीतरी नवीन ऐकावेसे वाटत राही.
पुढील दिवस सुट्टीचा होता ...
दिवसभर लीड्स शहर फिरलोत सारे ..लीड्स युनिवेर्सीटी कॅम्पस फिरणे हा एक नेत्रसुखद अनुभव होता ..
वर्ष्यातून एकदाच येत असलेला लीड्स फेस्टिवल तर संध्याकाळी बराच एन्जोय केला आम्ही.
लाउड वेस्टर्न मुजिक ..आणि क्ले पार्टी डान्स ..चिखलात नाचण्याचा वेगळाच आनंद ..
थंड पावसाच्या सरीत चिखलात गोंधळ घालणे ...सगळे अंग चिखलाने माखून होते सारे ...आम्हीही सारे चिखलमय होवूनच घरी परतलो ..
गरम पाण्याने अंघोळ करून मस्त फ्रेश होवून सारे एकमेकांशी बोलत बसले होतेत .पण अरमान आता घोळक्यात नव्हता ...थकला होता खूप ..
आराम करत असेल असे मला वाटले ..तरीही एक चौकशी म्हणून रूम मध्ये गेलो ...
बेड वर पहुडला होता तो ...मला बघताच उठून बसला ...डोळे लाल झाले होते त्याचे ...बरे नव्हते बहुतेक त्याला....
क्ले पार्टीमुळे ताप आल्याचे कळले मला .अंगाला हात लावला तर ताप बराच जाणवला ..मला बाहेर गप्पात जावेशे वाटत नव्हते ..
तो रात्री जेवणार नाही हे ऐकून मला उगीच एक काळजी वाटली ..
मेडीसीन सोबत आणले होतेत पण काहीतरी खाणे जरुरी होते. मी त्याला न सांगताच बाहेर गेलो ..
रत्नम म्हणून श्रीलंकन मित्र सोबत होता .टेस्को बंद होण्याची वेळ झाली होती ..नशिबाने जरा लवकर पोहचलोत आम्ही तेथे ...
काही सफरचंद आणि स्मॉल मिल्क कॅन घेवून घरी परतलो.दुध गरम करून ..सफरचंद कापून सोबत एनटीपायरेटिक मेडीसीन समोर आणलेत ....
मेडिसिन घे बरे वाटेल तुला मी आश्वासक बोललो त्याला .आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागलेत ...
" अरे रो क्यू रहे हों " ??मी अनाहूत बोललो
तो एक शब्दही बोलला नाही ..फक्त अश्रू ओघळत राहिलेत ..
खर तर कारण मलाही कळले होते .
वाळवंटातील सावलीची किंमत मी हि जाणून होतो.या वेळेस घरच्यांची आठवण आली असेल त्याला, हे मी जाणले .आणि समजावण्याच्या सुरात बोललो .
" बडे भाई का नाम प्रिन्स है ना....मेरा भी नाम युवराज है .वो होते तो शायद यही करते ना ..कुछ ऐसा ही समज लो .!"
त्याने नुसते उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले तापाने फणफणलेला हात माझ्या हातावर ठेवला .
त्या स्पर्शाच्या संवेदना मनात खोलवर काहीतरी जाणीव करून गेल्यात .
माझ्या समोर एक पाकिस्तानी मुस्लीम युवक नव्हता तर होता समोर फक्त एक माणूस .
माणुसकीची भाषा समजणारा एक तरल मनाचा माणूस .
तो जरा सावरला .थोडेसे खावून मेडिसिन घेवून झोपलाही ...मी हि जेवलो .झोपण्याआधी डायरीत आजची आठवण लिहून ठेवली .
तो अबोल होता पण त्याचे ओघळणारे अश्रू आणि हाताचे स्पर्श मला खूप काही सांगून गेलेत .
माणूस म्हणून जन्माला आलाय ...माणूस म्हणूनच जीवन जग ...आईचे शब्द न कळत आजही मला आठवून गेले ...!
आजचा दिवसही कामाच्याच नावाने होता .रात्रीच्या आरामाने... मेडीसीन ने ...अरमान पूर्ववत झाला होता ...
आजही दोघांनी सोबत काम केले .आजचा दिवसच खरे तर विशेष खास असा होता .
त्याच्या फोन मध्ये ईद च्या शुभेच्छा झळकत होत्यात तर भारतातील गणपतीबाप्पाच्या आगमनाचे सूर मला आनंदित करत होतेत ..
दरम्यान त्याने घरी फोन हि केला होता कालचा सारा वृतांत त्याच्या घरच्यांना कळाला होता .
मी हि घरी फोन करून कालचा प्रसंग सांगितला होता ...
काम आटोपून संध्याकाळी आजही ग्यालरीत आम्ही दोघे उभे होतोत ...
तो जरा नाराज होता ..ईद सारख्या सणाला या आनंदच्या क्षणाला घरच्यांची आठवण येणे साहजिकच होते .
मलाही आठवत होत..भारतातील बाप्पाचा जल्लोष .. गणपती उत्सवातील भारत म्हणजे एक सुखद पर्वणी असते ..
प्रत्येक सुखाची सर पैशात मोजता येत नाही हे आम्ही जाणून होतोत ..
कदाचित म्हणूनच काय कमावले काय गमावले हा विचार दोघांच्याही मनात सहज आला होता ..
मला जरा त्याचा मूड चेंज करावासा वाटला ..
"स्पेशल दिन पे ..स्पेशल लोगोसे बाते करो तो यादे भी स्पेशल होती है ...!"
मी जरा हसऱ्या नजरेने त्याच्याकडे बघत बोललो ..तसे त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघितले .
मी त्याला आपण एकमेकांच्या घरी फोन करू म्हणून सांगितले .खास विशेष हे कि...मी बोलणार त्याच्या घरच्यांशी आणि तो माझ्या घरी बोलणार होता .
दोघेही खूप उत्सुक झालोत ..तो माझ्या घरी बोलला .आईशी बोलतांना तो बराच नवखेपणा फील करत होता ..
आईने.. दादाने.. आस्तेवायिकपणे त्याची चौकशी केली तसा तो आनंदून गेला .
एका भारतीय कुटुंबाशी बोलायला मिळाल्याचे समाधान चेहऱ्यावर साफ झळकत होते त्याच्या .
मी हि बोललो त्याच्या घरी ..लाहोरस्थित त्याच्या घरच्यांना ईद च्या शुभेच्छाही दिल्यात ..
प्रिन्सशी बोलताना बराच आनंद वाटला ..सुरेशची मैत्री कसी सहज आठवणीत आहे हे तो नकळत सांगून गेला .. !
आम्ही दोघे या स्पेशल फोन्स नंतर खरच खुश झालो.
बराच वेळ बोलत राहिलोत मग .आठवनींना जागे करत राहिलोत.
मग कधी पाकिस्तानच्या गल्लीबोळातून ईद च्या सणाचा आनंद लुटत फिरणारा बालपणीचा अरमान समोर येत गेला .
तर कधी मातीच्या खेळण्या बनवत गणपती उत्सव जगणारा भारतातील लहानपणीचा युवराज नजरेसमोर आला .
एका खास दिवसाची हि आठवण छान जपली दोघांनी आम्ही ...खरच अनोख्या पद्धतीने जगलो होतात आज आम्ही .
आयुष्याच्या प्रत्येक वर्षी या सणाला या दिवशी ...ही आठवण कायमच मनाला आता येत राहील .
आपलीच सावली आपल्याला आयुष्यात एकदातरी भेटली होती ..आठवण साक्ष देत राहील ....!
कॅम्पच्या दिवसांची उलटी गिनती आता सुरू झाली होती .
सोबत काम सोबत गप्पा आम्ही हरवून गेलो होतोत आमच्याच आयुष्यात .
कामातून सुरु झालेला दिवस अरमान सोबत गप्पांनी संपत होता .
कधी खूप अर्थपूर्ण बोलणे असे तर कधी नुसतीच बडबड चालू असे .
काहीही असो आयुष्यातले ते क्षण खूप आनंदाने जगलोत आम्ही .
पण क्षण हे असेच असतात ..येतांना येतात नकळत ..जातांना मात्र अनेक जाणीवा करून जातात .
कॅम्पच्या शेवटच्या दिवशीही असेच मनात येत राहिले सारे .
परतीच्या प्रवासात कॅम्प अजून असायला हवा होता असे दोघांनाही वाटत राहिले .
रोजच्या आयुष्यापासून दूर दूर एक नवेच जीवन आम्ही जगलो होतो ..
ज्या अपेक्षेने मी कॅम्प ला आलो होतो त्यापेक्षा बरेच जास्त मला अरमान मुळे मिळाले होते .
काही तासात लंडन ला पोहचणार होतो आम्ही ..मी माझे मित्र आणि माझे जग पुन्हा नव्याने भेटणार होते .
त्यालाही काही दिवसांनी लाहोर परतीचा प्रवास होता .तो त्याचा देश आणि लोक सारेच काही बदलणार होते .
पाकिस्तानला जाण्याआधी परत भेटू आपण तो सतत सांगत राहिला .मी हि माझा फोन नंबर विना संकोच दिला ..!
पण लंडन मध्ये आहोत तोवरच आपला सवांद असेल .तू पाकिस्तानात पोहचलास कि मनात फक्त आठवण ठेव .
भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न चुकूनही करू नकोस ..माझ बोलन कदाचित तुटक असेल पण मला तेच योग्य वाटले ..
दोन्ही देशातील संबंध बघता नकळत अनेक प्रश्न उभे राहतात आणि मलातरी माझ्या लोकांमध्ये राहतांना काही बंधने पाळणेच योग्य वाटत होते .
जेवढा वेळ सोबत असतो तीच सोबत महत्वाची बाकी म्हणजे आयुष्य सारे आठवणींचा खेळ आहे .
त्याच आठवणीत मला त्याने जपावे ही इच्छा मी सांगत राहिलो ..!
माझ्या असल्या बोलण्याने खर तर तो नाराज दिसला .पण नंतर सारासर विचार करेल तेव्हा त्यालाही योग्य वाटेल ते याची मला खात्री होती !
प्रवास संपला ...सगळे आम्ही विखुरले गेलो .प्रत्येकजण आयुष्यात मग्न झालेत ...
लंडन मधील माझे रोजचे जीवन पुन्हा सुरु झाले ..पुन्हा मऊ मऊ गादी आणि ल्यापटोप च्या विश्वात मी रमायला लागलो ..
अरमानची आठवण मला अनेक वेळेस येत असे ... पण त्याचा राग संपला कि तो नक्की फोन करेल या अपेक्षेत मी होतो .
दरम्यान आठ दिवसाच्या आत केव्हाही हॉस्पीटलाला जावून रिपोर्ट मार्किंग आणि फीड ब्याक बुक भरणे अनिवार्य ठरले होते.
तिथे तरी मला तो भेटेल असे वाटत होते ...खर तर जाण्या आधी फोन करून सोबत जावू म्हणून सांगावेसे वाटले ..
पण मग तो हि फोन करू शकत होता .किंबहुना त्यानेच फोन करायला हवा होता म्हणून इच्छा असूनही त्याला फोन न करताच मी हॉस्पीटला गेलो होतो ..
मार्टिन... क्रो...स्मिथ आणि इतर बरीच लोक भेटली .रत्नम भेटलेला पण त्यालाही अरमान बद्दल जास्त माहिती नव्हती .
येवून गेला कि येणार आहे काहीच माहिती नव्हते .त्याने आज यायला हवे होते मन उगीचच त्याला भेटण्याची इच्छा करून होते ..
फिडबॅक बुक बळेबळेच लिहायला समोर घेतले ..आणि एक आश्चर्याचा धक्का बसला ..
अरमान कालच येवून गेला होता .काहीतरी तेथे तो आठवण लिहून गेला होता .मी अगदी कुतूहलाने सारे काही वाचायला लागलो .
नकळत त्याच्या शब्दांमध्ये सोबतीचे दिवस आठवायला लागलो .
' बचपन से एक सपना था किसी अपने से मिलना..
कोई अपना..वो जो बंदा वो नेक हो..दिल जिसका साफ हो ..
दुनिया कि भीड में .हजारो लोगो में.. मै तलाश करता रहा ऐसेही एक चेहरेकी |
जिंदगी यु हि रफ्तार से चलती रही...मे जीता रहा ..एक अधुरीसी ख्वाहिश में |अपनीही परछायीकी एक अनकही तलाश में |
आखिर तलाश खतम हुई |
वो मिला ..जिंदगी के एक अनजाने मोड पर...सात समंदर पार उसका मिलना अच्छा लगा |
ना वो मेरे देस से था ना मेरे धरम से ..सरहद के उस पार घर था उसका ,हिंदुस्तान में एक सुकून कि जिंदगी का आगाज था |
शायद कोई मजबुरी थी हमारी साथ वक़्त बिताने कि ..यही से शुरू हुवा एक कारवा |
बाते चलती रही..वक़्त गुजरता रहा |वो केहता रहा मै सुनता रहा ...
मेरे भी दिल ने बहोतासी बाते कही ,कभी मेरे बारे में.. कभी मेरे देस के बारे में |
बातो हि बातो में हम उलझते रहे ..बस एक दुसरे को ऐसेही जाणते रहे |
धीरे धीरे समझ में आता गया चाहे धरम अलग हो ...चाहे देस पराये हो पर है तो हम इन्सान हि |
ऐसे इन्सान जिनके एहसास बस जुडे थे तो दिलो से|
सिर्फ एक एहसास था ,ना कोई बंदिश थी ना हि कोई ख्वाहिश |
पर इन्सान से इन्सान को जुदा करनेका का ये मजहब बनाया किसने था ?
खुदा तुने दिलो को कभी जुदा तो नही किया ,
क्यू बने थे ये फासले .क्यू बनी थी ये दिवारे ?
सरहदे बनाके इंसानोको बाटा किसने था |
सारे सवालो के अनकहे जवाब मैं बस धुंडता रहा |ना कभी जवाब मिला कोई ,ना उन सवालो को मिटा सकू मैं कभी |
अब जिंदगी में हम कभी मिलेंगे नही शायद .अब एक पल का भी साथ ना हो हमारा ,
पर जो पल हम साथ थे वही कुछ यु खास थे |याद कुछ यु आता है वो अब मुझे |मानो मै खुदकोही याद कर रहा हु जैसे |
आगे जिंदगी यु हि चलती रहेगी ..शायद दोनो मुलको के बीच नफरत और बढती रहेगी,पर मेरे दिल में एक याद हमेशा रहेगी ...
सरहद के उस पार एक इन्सान ऐसा भी है जो बिलकुल मेरे जैसा है |
तमाम नफरतो के बीच मे भी उसके लिये खुशहाली कि दुवा इस दिल से निकलती रहेगी |'
मी निशब्द झालो... क्षणभर काही सुचलेच नाही मला .
पान पलटले आणि माझ्या नावाचा उल्लेख आणि खास माझ्यासाठी काहीतरी अजून लिहून गेला होता तो ..
मी वाचायला लागलो ..शब्दांना मनात साठवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु झाला माझा ....
"मुझे पता है युवराज तुम एक दिन ये जरूर पढोगे |.शायद यही अपनी आखरी मुलाकात समज लो ..
तुम सही थे ...हमे अपने लोग है ...दोस्त है ...हमारा जहा हि कुछ अलग है |
हम एक वतन के होते तो शायद जिंदगीभर अच्छे दोस्त बनके रहते थे | पर हालात कुछ ऐसे है के हम ना मिले वही शायद नेक हो ..!
५ दिन बाद फ्लायीट है | अपने देस वापस जा रहा हु ..हमेशा के लिये |
केहते है लोग चाहे बाते भूल जाते हैं ,पर वो एहसास कभी नही भुल पाते जो साथ बिताने से मिलते हैं |
तुम्हारे साथ बिता वक़्त भी कुछ ऐसे हि याद आता है |
शुक्रिया...उस सुहाने साथ के लिये, जब अपनोकि याद आयी थी .. तुम्हे सामने पाया था |
कसम से जिंदगी के एक हसीन मोड पर तुमसे मिलकर अच्छा लगा |
मानो कोई अरमान पुरा हो गया हो जैसे |हमारा साथ शायद यही तक था ...
जब बिछडना हमारा नसीब था तो मिले हि क्यू थे हम ..
बहोतसे सवाल आते है दिल मे ..पर कोई जवाब मिल नही पाता |
तुम याद आओगे हमेशा |तमन्ना बस इतनी कि तुम भी कभी यादो मे मुझे याद करते रहना |
साथ बीते लम्हो मे जिंदगी को आजमाते रेहना ..!
अपना खयाल रखना ..!
with miss bye forever....-अरमान ..!'
मी क्षणभर नुसताच बसून राहिलो .काहीतरी गमतोय असे वाटले. एक अनामिक दुखद भावना मनात दाटली .
मला त्याच्याशी बोलणे अगदीच जरुरीवाटले ..लगेचच त्याला फोन केला ..सीम रिजेक्शन आले .
त्याने लंडन सोडण्याआधी एकदातरी आम्ही भेटावे असे अगदी मनापासून मला वाटत राहिले .
उरलेले दिवस मी त्याच्या फोन ची वाट बघत राहिलो .रोज वाटायचे आज फोन करेल नाहीतर निदान म्यासेज तरी येयील एखादा .
पण माणसाच्या अपेक्षा कधी पूर्ण होतात .कधी नाहि होत.
तो जाण्याच्या दिवशी मला दिवसभर त्याची आठवण येत राहिली .तो भेटू शकत होता .पण नाहि भेटला तो.
उन्हा पावसाचा खेळ कुठेतरी थांबणारच असावा
त्याचा फोनही नाहि आला. तो निघून गेला..कायमचाच ...दूर दूर ..त्याच्या लोकांमध्ये .त्याच्या देशामध्ये ..!
खरच तो माझ्या देशाचा असता तर नक्कीच माझा मित्र असता .चुकतात काही भोगतात सारेच मन विचार करत होते .
त्याच्या आठवणीत न कळत काही अश्रू डोळ्यात दाटले होते ...नाते नसतानाही एक नाते अश्रुनीही जपले होते .
दिवस बदललेत ..काही महिनेही झालीत.मी माझ्या आयुष्यात नव्याने रुळलो आहे ..
तो हि खुश असेल त्याच्या रोजच्या जीवनात .आता आमची फक्त आठवणीत भेट होते ..
काही संवेदना आणि काही जाणीवा असतात .काही प्रश्न मलाही पडतात ...पण उत्तर मात्र सापडत नाही.
उन्हापावसाच्या खेळत आयुष्य पुढे चालत असते .आईचे बोलणे कधीतरी मनात माझ्या येत असते .
'सोबत असतो तोच काळ खरा महत्वाचा .बाकी सारे आयुष्य म्हणजे आठवणींचा खेळ आहे '
आठवतात मला अनेक क्षण मग त्याच्यासोबत जगलेले ...जात.. धर्म.. देश.. सीमारेषा.. अलगत पार केलेले .
मुक्त आभाळात उडती पाखरे एका प्रवासात भेटली होतीत .काही आठवणी आयुष्यभरच्या संवेदनारूपी जपली होतीत .
छान वाटतात ह्या जाणीवा ...छान असतात ह्या भावना .आपल्याच सावलीला भेटल्याच्या मनात जपलेल्या संवेदना ..
असा एक अनुभव .असा एक प्रवास ,असा एक कॅम्प आणि असा एक अरमान होता .
आठवतात कधी कधी सारे सारे क्षण मला ...मी मलाच भेटल्याचे जाणवत राहते ...
कधी डायरीच्या पानात ...कधी आठवणींच्या जगात ..अरमानशी न कळत बोलणे होते ...!
-------------------------------- THE -END --------------------------------------------
-- डॉक्टर युवराज पाटील..!
प्रतिक्रिया
3 Oct 2012 - 8:34 am | हंस
व्वा! अतिशय सुंदर! शेवटचा उर्दूतला उतारा तर थेट मनाला भिडला!
3 Oct 2012 - 9:12 am | जेनी...
अप्रतिम !.
दोन्हि देशांचे आपापसातले वैर हे मित्रांच्या मैत्रीवर काहिहि फरक पाडु शकत नाहित ,फरक फक्त पडतो तो त्या मैत्रिला एकत्र बांधुन ठेवण्यात .
ही मैत्रि फक्त मनात जपली जाईल ,पण प्रत्यक्षात मात्र एकमेकाना परत भेटणं ही किती मुश्किल असेल याची कल्पनाहि करवत नाहि .
खुप छान मांडलयत .अगदी जिवंत .
3 Oct 2012 - 10:23 am | इरसाल
उत्तम असं काहीतरी वाचायला मिळाल.
मनस्वी आनंद झाला.
पुलेशु.
3 Oct 2012 - 11:24 am | अन्या दातार
सुरेख अनुभव, उत्तम कथनशैली. :)
3 Oct 2012 - 11:43 am | यशोधरा
आवडलं.
3 Oct 2012 - 12:08 pm | सस्नेह
तरल शब्दातील भावस्पर्शी कथन.
3 Oct 2012 - 2:05 pm | मेघवेडा
तरल कथन आवडले.
3 Oct 2012 - 2:38 pm | प्रभाकर पेठकर
पाकीस्तानी सुशिक्षितांमध्ये भारतियांबद्दल चांगली भावना अनेकदा दिसून आली आहे. ती ७० ट़क्के खरी आणि ३० टक्के नाटकी असते असा अनुभव आहे. वरील लिखाण आणि अरमान ह्यांच्या भावना ७० टक्यात बसतात एवढे नक्की. अशिक्षित वर्गात हेच प्रमाण उलटे आहे. ३० टक्के प्रेम आणि ७० टक्के तिरस्कार. पाकिस्तान्यांच्या आणि भारतियांच्या एकमेकांच्या द्वेश भावनेला दोन्ही देशातील राजकारणी आहेत ह्याशी बहुसंख्य सुशिक्षित पाकिस्तानी सहमत आहेत.
एकदा PIAने मस्कत - मुंबई प्रवास, कराचीमध्ये एक रात्र वास्तव्य करून, करण्याची संधी मिळाली. PIAच्या तांत्रिक दोषामुळे कराची-मुंबई प्रवासाचे आरक्षण करण्यासाठी त्यांच्या कचेरीत २ तास बसून राहावे लागले. परीणामतः हॉटेलची नाश्त्याची वेळ संपली आणि त्यांनी दिलेली विनामुल्य नाश्त्याची कुपन्स बाद झाली. मला भूक लागली होती. आणि मी तिथल्या वेटरला समजाऊन सांगितले की बाबा, मी उशीरा आलो ही माझी चूक नाही. तुमच्या PIAच्या तांत्रिक दोषाचा फटका मला बसला आहे. माझ्या जवळ कुपन्स आहेत मला नाश्ता मिळाला पाहिजे. पण, तो उर्मट होता. चेहर्यावर आणि शब्दांमध्ये पुरेपूर तुच्छता आणून त्याने 'इथे मोफतचे अन्नछत्र उघडलेले नाही' अशा अर्थाचे वाक्य माझ्या तोंडावर फेकले. झाले. आधीच भूक लागली होती. माझा आवाज चढला. मी मॅनेजरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. 'मॅनेजर नही है।' असे सांगून मला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यावर अधिक 'बाचाबाची' झाली आणि एक टायवाला सदगृहस्थ तिथे अवतरला. तो बहुधा किचन मध्ये गेला होता. त्याने आधी त्या वेटरा तिथून हाकलले. माझ्याशी अत्यंत नम्र आणि आदराने बोलला. माझी समस्या समजून घेतली. आणि नाश्त्याची वेळ संपल्याने मर्यादीत नाश्ता तो देऊ शकेल म्हणाला. मी सुद्धा माझा आग्रह सोडून त्याला म्हणालो, ' मला कॉफी आणि एक व्हेज. सँड्विच मिळाले तरी आनंद होईल' त्याने ताबडतोब व्यवस्था केली. आणि वेटरच्या मग्रूर वागण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आजूबाजूला २०-२५ पाकिस्तानी बघे जमा झाले होते. ते काही आक्रमक वगैरे नव्हते. सर्वसामान्य बघे होते. काउंटर जवळ त्या वेटरचा आणि मॅनेजरचा वाद सुरु होता. तो वेटर म्हणत होता,' मी नाही म्हंटले असताना तुम्ही त्याला नाश्ता का दिला? ह्या हिन्दूस्तानी बद्दल एवढे प्रेम का उफाळून आले?' ह्या त्याच्या वाक्यावर आणि 'हिन्दूस्थानी' ह्या शब्दावर आक्षेप घेत (कारण तो त्याने एखाद्या शिवी सारखा उच्चारला होता.) मी जागेवरच उठून उभा राहिलो आणि माझी तर्जनी त्याच्यावर रोखून 'आपली जीभ आवर.' असे हिन्दीत ओरडलो. मॅनेजरने लगेच त्याला किचनमध्ये ढकलले.
माझा नाश्ता संपल्यावर मी मॅनेजरला धन्यवाद देऊन रात्रीच्या जेवणाची वेळ किती वाजता संपते हे विचारले. आणि मी वेळेत हजर राहीन असे सांगून बाहेर पडलो. रात्रीचे जेवण मस्त होते. मॅनेजर वैयक्तिक लक्ष देऊन होता.
तिथेच हॉटेलच्याच लॉबीत एक तयार कपड्यांचे दुकान होते. त्या दुकानाचा मॅनेजर म्हातारा होता. फाळणीपूर्वी भारतात, मुंबईत राहिलेला होता. मोहम्मद अली रोड बद्दल वगैरे त्याला माहिती होती. बोलता-बोलता भावूक झाला होता. त्याला मृत्यूपूर्वी मुंबईला भेट द्यायची इच्छा होती. भारतिय शास्त्रीय संगिताबद्दलही त्याला बर्या पैकी माहिती होती (मलाच नव्हती) आणि भारतीय, हिन्दू संस्कृतीबद्दलही आस्था होती. त्याचे एक वाक्य मला फार भावले. तो म्हणाला, 'जमिनपर लकिर मारनेसे मुल्क अलग किये जा सकते है, इन्सान के मन अलग नही किये जा सकते।' तेंव्हा, राजीव गांधींची हत्या झाली होती त्या बद्दलही त्या म्हातार्या दुकानदाराने दु:ख व्यक्त केलं होतं.
मस्कत मध्येही इतक्या वर्षांच्या वास्तव्यात अनेक पाकिस्तानी व्यक्तींशी संपर्क आला. काही चांगले कांही वाईट स्वभावाचे.
गांधी चित्रपट प्रदर्शित झाला तो पाहून आल्यावर रात्री बहुतेक उपहारगृह बंद झाली होती. एक पाकिस्तानी उपहारगृह उघडे होते. ते माझ्या घराजवळ असल्याने मी अनेकदा तिथे जेवायला जायचो. त्या उपहारगृहाचा मालक मला ओळखायचाही. आम्ही मित्र तिथे जेवत बसलो असताना एक पाकिस्तानी ग्रुपसुधा जेवत बसला होता. योगायोगाने ते सुद्धा गांधी चित्रपट पाहून आले होते. त्यांच्यातील एकाला चित्रपटाबद्द्ल भयंकर आक्षेप होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्या चित्रपटात जीनांना खलनायकम्हणून चितारले आहे. त्यावरून तो चित्रपटाच्या निर्माता/दिग्दर्शकाला हिन्दूस्थानी सरकारकडून पैसे खाल्लेले आणि हिन्दूस्थानचे चमचे असे तावातावाने संबोधित होता. वातावरण तापलं. पण त्यांच्याच ग्रुपमधल्या एक्-दोघांनी त्याला शांत करायचा प्रयत्न केला आणि उपहारगृहात भारतियही जेवत आहेत हे त्याच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर,' तो क्या हुवा। मै क्या डरता हूँ क्या उनसे?' असे मोठ्याने म्हणाला. शेवटी, उपहारगृहाचा मालक मध्ये पडला आणि त्याला समजाविले/शांत केले
माझ्या घरची, कॅफेटेरियाची सर्व सुतारकामे करणारा एक पाकिस्तानी उत्तम कारागिर आहे..
सारांश, चांगले-वाईट, सौम्य-भडक स्वभावाचे सर्वप्रकारचे पाकिस्तानी भेटतात.
पाकिस्तानी भिकारी मात्र भिक मागण्यासाठी भारतियांनाच निवडतात. भारतिय सहृद्य असतात आणि त्यांच्या दु:खभर्या कहाण्यांना सहजी बळी पडतात, असा त्यांचा अनुभव असतो.
3 Oct 2012 - 3:37 pm | सस्नेह
>>> 'जमिनपर लकिर मारनेसे मुल्क अलग किये जा सकते है, इन्सान के मन अलग नही किये जा सकते।' <<<
हे सामान्य माणसांना समजतं...राजकारण्यांना नाही...
3 Oct 2012 - 4:19 pm | इरसाल
बड्या बड्या चीजा अपने दिलमे छुपाके बैठेले है जरा पिटारा खोलके २/४ चिजा फेकोहो मिपापे.हम उत्तेमे खुश हो लेन्गे!
3 Oct 2012 - 2:50 pm | हरिप्रिया_
आवडलं!!
आठवणीच्या जगातल्या गप्पा हे खासच..
3 Oct 2012 - 3:13 pm | पियुशा
बबल्या उर्फ युवराज ;)
छान लिहीले आहेस :)
3 Oct 2012 - 3:59 pm | स्पंदना
तुम्ही लिहिल आहे खासच. लिखाण आवडल. अंतर ठेवुनच जपलेल्या आठवणीही आवडल्या.
3 Oct 2012 - 4:55 pm | सोत्रि
मस्त! खूपच छान!!
-(संवेदनशील) सोकाजी
3 Oct 2012 - 5:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर, अनुभव कथन चांगलं व्यक्त केलं आहे. लिहित चला.
-दिलीप बिरुटे
3 Oct 2012 - 7:13 pm | रेवती
लेखन आवडले.
3 Oct 2012 - 9:17 pm | जाई.
लिखाण आवडल!!!!!
पण मी हे कुठेतरी वाचल्यासारख वाटतय
3 Oct 2012 - 9:34 pm | जेनी...
मी मराठी किवा मुक्तपिठ नामक ऑर्कुट समुह ह्या दोनच ठिकाणी असु शकते माझ्या माहिति नुसार ,
ह्या व्यतिरिक्त अजुन कुठे असेल तर ते बब्ल्यालाच माहित :)
3 Oct 2012 - 9:37 pm | जाई.
अस का!!! धन्यवाद
लेखक महोदय ऊत्तर देतीलच
3 Oct 2012 - 10:16 pm | भाग्या
खूपच छान.
अरमान तुम्हाला भेटेल ही सदिच्छा.
3 Oct 2012 - 11:20 pm | निशदे
फारच छान......... दोन सामान्य माणसांच्या तारा जुळल्या की देश, सीमा, भूगोल सर्व बाजूला पडते आणि फक्त मैत्री शिल्लक राहते. पण तुम्ही त्याच्याशी कमीतकमी पत्रव्यवहार ठेवायला हरकत नव्हती असे वाटते. असो.
तुमची पुनश्च भेट व्हावी अशी सदिच्छा. :)
4 Oct 2012 - 12:02 am | प्रास
व्वा डॉ. युवराजराव!
छान लिहिलंय.
मिपावर स्वागत.
असेच लिहिते रहा.
पुलेशु
4 Oct 2012 - 7:52 am | ५० फक्त
छान लिहिलंय,
4 Oct 2012 - 10:42 am | अस्मी
अप्रतिम!! लेखन आवडलं.
4 Oct 2012 - 4:53 pm | मोहनराव
छान, अप्रतिम!
4 Oct 2012 - 5:10 pm | तुझा बबल्या
ही कथा "मी मराठी " कथा स्पर्धेत लिहिली
आणि "मुक्तपीठ" समूहावरील वाचकांना वाचायला दिली
आणि हे ठिकाण तिसरे ..या व्यतिरिक्त कुठे वाचनात आली असेल
तर मलाही कळवा..नक्की आठवणीने ..!
4 Oct 2012 - 5:19 pm | तुझा बबल्या
सर्व वाचकांचे मनापासून आभार
प्रभाकर राव ..आपले अनुभवदेखील येथे लिहिलेत ..आनंद वाटला ..
थ्यांक्स फॉर द्याट
4 Oct 2012 - 7:03 pm | शैलेन्द्र
अतिशय सुंदर लेखन.. खुप आवडलं.
5 Oct 2012 - 3:24 pm | बॅटमॅन
आयला एकच नंबर!!!!!!! मानलं डॉक्टरसाहेब तुम्हाला _/\_
5 Oct 2012 - 7:21 pm | बहुगुणी
शैलीतील ओघही आवडला. आणखी लिहा.
पेठकरांचा प्रतिसाद का दिसत नाही? काहींना दिसला हे त्यांच्या प्रतिसादावरून कळतंय, आपल्यालाच चांगलं काही वाचायला मिळालं नाही ही रुखरुख लागून राहिली आहे. तो प्रतिसाद पूर्ण दिसेल का? (फक्त शीर्षक दिसतं आहे...)
6 Oct 2012 - 4:49 am | इन्दुसुता
लेखन अतिशय आवडले
6 Oct 2012 - 8:52 am | किसन शिंदे
जबराट लेखन!! अतिशय आवडलं.
6 Oct 2012 - 4:34 pm | मैत्र
स्टिरिओटाईप (?) केले जाते सगळ्यांनाच. सगळेच पाकिस्तानी काही कसाब आणि सईद चे भाऊबंद नसतात.
विशेषतः इतर देशात बरीच वर्ष राहिलेले वेगळा विचार करु शकतात. करतात.
त्याच बरोबर काही लोक चांगले वागले म्हणजे सगळेच पाकिस्तानी बाहेर चांगले वागतात असं नाही.
मागे अशाच एका धाग्यावर अदिती किंवा शिल्पा ब (नावातील चूभू देघे) यांनी अतिशय त्रासदायक अनुभव मांडले होते..
माझ्या बरोबर सध्या एक पाकिस्तानी आहे आणि तो इथे २०-२२ भारतीयांच्या देसी पार्टि मध्ये वगैरे सगळीकडे येतो. कधीही अवघडून वागत नाही. दुसर्या कोर्स मधला एक पाकिस्तानी नेहमी गजल, भारतीय फायनान्स मार्केट यावर बोलतो. बरेचदा मदत करतात. बहुतेक वेळा पाकिस्तानी हे इतर कोणत्याही देशातल्या नागरिकांप्रमाणे वागतात + त्यांना देशाबद्द्दल इतर लोक विशेषतः युरोपियन, कोरियन इ. पेक्षा अर्थातच जास्त जाण आणि माहिती असते.
काही वेळा कामचुकार पणा जास्त दिसला आहे. पण तो भारतीयांमध्ये नसतो असं काही नाही.
डॉ. युवराज, लेख अतिशय उत्तम आहे. अजून येऊ द्या. पण एक अनुभव समतोल पणे घेतला पाहिजे असं वाटतं.
6 Oct 2012 - 7:51 pm | चिगो
आवडले.. लेखनशैली सुंदर आहे तुमची, डाॅक्टरसाहेब.. लिहीते रहा.
6 Oct 2012 - 8:48 pm | सुनील
छान अनुभव आणि तो मांडलायदेखिल सुरेख!