मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैतानाचे वरदान

राजघराणं · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मनमोहन सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध, थयथयाट आणी तांडव सुरू केलेला आहे. राजकारणातल्या अवघड प्रश्नांना हातच घालायचा नाही. वास्तव समजूनच घ्यायचे नाही. महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ? आज शेतीमालाचे मार्केट कसे आहे ? शेतकरी माल पिकवतो. ट्रक ट्रान्सपोर्ट वाले तो माल - कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृ उ बा स) आणून टाकतात. कृ उ बा स शिवाय शेतकरी कोणालाही माल विकू शकत नाही. मोनोपली आहे. मराष्ट्रात झाडून सगळ्या कृ उ बा स राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला अशी समिती आहे. ही समिती निवडतो कोण ? तर मार्केट मधले व्यापारी. इथे लायसन्स राज आहे. नव्या व्यापार्यांना ह्या उद्योगात यायचे असेल तर कृ उ बा स (कृषी उत्पन्न बाजार समिती) चा परवाना लागतो. आतले व्यापारीच ही समिती निवडत असल्याने त्यांच्या बगलबच्च्यांशिवाय कुणालाही लायसन्स मिळत नाही. सरकारचे ह्यावर नियंत्रण असते.. अतिशय सभ्य भाषेत कृ उ बा स चे वर्णन - सरंजामशाहीचे हलकट अपत्य - असे मी करेन. अनेक कृ उ बा स वर सरकारी प्रशासक आहेत. वर्षानुवर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. उरलेल्या कृ उ बा स मधे नकली लोकशाहीचा ढोंगी तमाशा चालतो. उमेदवार आणी विजेते फिक्स असतात. मार्केट यार्डात पिढिजात दुकानांचे गाळे राखणार्यां - मोजक्या कुटुंबांचे अनिर्बंध साम्राज्य कृ उ बा स वर असते. हे पिढिजात सरंजामी मालक शेतकर्याला हवे तसे पिळतात. शेतमालाचा भाव कसा ठरतो ? याच्या काही पारंपारिक पद्धती आहेत. हत्ता पद्धत ही सर्वात किळसवाणी पद्धत. दलाल भाव ठरवताना एकमेकांच्या समोर बसून एकमेकाचे हात हातात घेतात, हातांवर मोठा हातरुमाल टाकतात आणि काही न बोलता एकमेकांची बोटे धरतात. त्या बोटधरणीतून मालाचे भाव ठरतात. त्या बोटधरणीतून एकमेकांना भाव पटला तर सौदा होतो, नाहीतर सौदा बिघडतो. इतरांना काय झालेय ते काही कळत नाही.या हाताच्या बोटधरणीतून होणार्‍या सौद्यास म्हणतात हत्ता. हस्त - हात - हत्ता. गुप्त लिलाव. हत्ता पद्धत ही दलालांचे पोट भरण्याची आणि शेतकर्‍यांना लुटण्याची गुप्त लिलाव पद्धती. अशा अनेक पारंपारिक गुप्त लिलाव पद्धती आहेत. १०० मधून चालू रेट वजा करून गुप्त भाषेत बोलणे वगैरे. मुंबईच्या मार्केट यार्डात ( कृ उ बा स ) हत्ता पद्धती सर्रास वापरतात. इतर अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या गुप्त पद्धती चालतात. बेकायदेशीरपणे चालतात. पुण्यासारख्या शहरात रेट फोडले जातात. पण भाव किती असावा ? हे मर्केट यार्ड मधले सरंजामदारच ठरवतात. शेतकरी भावासाठी आंदोलन करतात तेंव्हा हमीभावाची भीक सरकारकडून तोंडावर मारली जाते. हा हमीभाव काय आहे ? शेतमालाची किमान किंमत म्हणजे हमीभाव. ही सरकार जाहिर करते.अनेकदा ही तूट करदात्यांच्या पैशातून भरली जाते. कृ उ बा स मधल्या व्यापार्‍यांना त्याची झळ बसत नाही. शेतकर्‍याना सबसिड्या मिळतात हमीभाव मिळतो वगैरे वगैरे शहरी मध्यवर्गियांना माहित असते. भारतातला खूप मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे. पण खरे पाहता शेतीला निगेटिव्ह सबसिडी आहे. हे संतापजनक आहे. कोका कोला आणी बिसलेरी किती रुपयाला विकावी यावर सरकारी बंधन नाही. कारण ह्या वस्तू जिवनावश्यक गरजेच्या नाहीत. गहू, तांदूळ, भाज्या ह्या वस्तू जिवनावश्यक. मग ह्याचा दर सरकार ठरवते. कसा ? तर साखर महागली की साखर आयात करते. मागणी पुरवठा नात्याने भाव पडतात.म्हणजे बहुसंख्य शेतमालाची कमाल किंमतही सरकार ठरवते. जेंव्हा भाव चढतात तेंव्हा तोटा शेतकर्याचा होतो. जेंव्हा भाव पडतात तेंव्हाही तोटा शेतकर्‍याचा होतो. हत्ता सारख्या गुप्त पद्धती, कृ उ बा स वर मोजक्या कुटुंबांचे अनिर्बंध साम्राज्य, नकली निवडणुका, घोषित / कुठे अघोषित मक्तेदारी - मोनोपली. तोटा शेतकर्‍याचा होतो. त्या शेतकर्‍याकडून त्याच्या घरी जाउन माल उचलणार्‍या वेगवेगळ्या कंपन्या आल्या तर? बाजारात स्पर्धा निर्माण होईल- भाव चढतील. मुख्य म्हणजे बाजार खुला होईल. पारदर्शकता यील. भ्रष्ट आणी गुप्त मक्तेदारीला आळा बसेल. बाजारात व्यावसायीकता यील. शेतकर्‍याला फायदा होईल. हजारो शेतकर्यांच्या आत्महत्या घडून गेलेल्या आहेत. कर्जामुळे . का बरे ? शेतीवर अतिशय कमी फायदा मिळतो. किंवा तोटा होतो. शेतकर्‍याचा फायदा कसा वाढवता यील? एकतर शेतमलाचे वेस्टेज थांबवता येईल. लाखो किलो गहू सडून गेल्याच्या बातम्या आपण वाचतो आणी हळहळतो. का सडतो गहू ? का सडतात आणी फुकट जातात भाज्या ? शीतग्रुहे कुठे आहेत ? उत्तम प्रतीचा ट्रान्सपोर्ट कुठे आहे.? चांगली गोदामे कुठे आहेत ? हे सर्व उभे करण्यासाठी जे प्रचंड भांडवल लागते ते कुठे आहे ? आता पररदेशी कंपन्यांचे महाप्रचंड भांडवल गुंतणार आहे ते शेतकर्‍याच्या हिताचे आहे. एव्हढी साधी गोष्ट समजण्यासाठी अर्थतज्ञ असण्याची गरज नाही. कृ उ बा स आज मूठभर दलालांच्या हातात आहे. ग्राहकाला किती दराने माल विकायचा ? हेही मुठभर लोकच ठरवतात. खरेदी आणी विक्रीत किती फरक असावा ? दलालाने किती कमवावे? हे लोकशाहीत सरकार ठरवू शकत नाही. मग हमिभाव आणी आयात निर्यात धोरणातून सरकार जिवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित करते. हे बसते शेतकर्‍याच्या बोकांडी. दलालांना कायदा नाही; नफ्याची मर्यादा नाही; आणी सर्वात महत्वाचे म्हणजे स्पर्धा नाही. कृ उ बा स वर मोजक्या लोकांचेच नियंत्रण राहते. नव्या लोकांना त्यात प्रवेशच नाही. अडत्यांचे - दलालांचे राज्य आहे. आज कोका कोला आणी पेप्सीच्या किमती फार चढताना दिसत नाहीत. कारण मार्केट मधे टिकण्यासाठी या दोघांना स्पर्धा करावी लागते. किमती कमी ठेवाव्या लागतात. हे स्पर्धेचे तत्व शेतमालाला लागू होईल तेंव्हा त्याचा फायदा ग्राहकांना होईल. फायदा शहरी मध्यमवर्गियांना ही होईल. शेतकरी संघटनेने एफ डी आय चे स्वागत केलेले आहे. विरोधकांचे काय चालले आहे ? वंगव्यस्त अक्रस्ताळी ममतादीदी ची - मा, मिट्टी आणी मानुष - ही घोषणा - बंगाली माणुशचे राजकारण, बंगालची मिट्टी आणी दुर्गा मा. एव्हढीच मर्यादित आहे. दीदीला कोणताही राष्ट्रीय अजेंडा नाही. आर्थिक अजेंडा नाही. बंगालच्या स्थानिक निवडणुकांसाठी ह्याला पाड त्याला गाडचे राष्ट्रीय (?) राजकारण चालू आहे. दिखाउपणा. नाटकी भाषणे आणी अनभ्यस्त भावनीक राजाकारण यावर दीदींची ममता आहे. द्रमुक चे ही तसेच. मार्क्सचे अनुयायी मेनिफेस्टोच्या कॅपिटलात जे नसेल - ते सर्व विरुद्ध मानणार हे उघड आहे. "भारत देश हा खरे राष्ट्रच न्हवे. त्याचे कैक तुकडे पडल्याशिवाय गरिबांचे शोषण थांबणार नाही." असे कम्युनिस्टांचे म्हणणे जाहीर आहे. त्यांना झालेला अमेरिकाफोबिया नावाचा मानसिक आजार आधिच डयग्नोस झालेला आहे. कम्युनिस्टांच्या मागे भाजपाने लागावे हीच खरी धमाल आहे. ज्या कम्युनिस्टाना लाल माकडे म्हणून आजपर्यंत शाखा शाखात हिणवले - त्यांचीच वैचारिक शेपूट का धरताय ? सेना मनसेला अर्थकारणात गम्य नाही. भाजपा अनुयायांना परंपरागत सवय मोडवत नाहीसे दिसते. कम्यनिस्टांच्या विरुद्ध भूमिका घेणे म्हणजे राष्ट्रवाद. अशी नवी हिंदुत्वाची व्याख्या त्यांना शिकावी लागेल असेही वाटते. नाहितर भट्टीतल्या अणूपासून शेतमातीच्या ब्रम्हांडापर्यंत. कम्युनिस्टांच्या लाल मारुतीपुढे - भीमरूपी महारुद्रा म्हणणारा पक्ष - अशी कायमची ओळख मिळेल. बरे रिटेल क्षेत्रात परदेशी कंपन्या आल्या तर देशातला पैसा बाहेर जाईल हो.. अशी देशभक्तीची करूण किंकाळीही ऐकू येते आहे. पैसा म्हणजे काय वाटलं तुम्हाला ? नोटा ? का सोनं ? तसे असते तर सरकारी टाकसाळीत भरपूर नोटा छापाव्या आणी गरिबांना त्या मोफत वाटाव्यात. गरिबी हटाव चा रामबाण उपाय. नाही का ? पूर्वी युरोपातल्या एका देशाला आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींचा शोध लागला. भरपूर सोन आणल खणून. तेंव्हा सोन्याच्या मोहोरा प्रचारात होत्या. पाडली नाणी. बाजारात भरपूर सोन्याची नाणी आली. त्यामुळे सोन्याची किंमत कमी झाली अन वाढत्या चलनफुगवट्याने - महागाईने देश बुडाला. रशियाच्या बाबतीत एक जोक सांगितला जातो. सोव्हीएत रशियाच्या पडत्या काळात एक बाई ब्रेड आणायला गेली होती.चलनफुगवटा - महागाई प्रचंड. तिच्याजवळ टोपलीभर रुबल होते.ब्रेड खरेदीसाठी तेव्हडे आवश्यक होते. वाटेत चोराने टोपली पळवली. पण आतले रूबल फेकून दिले. कारण टोपलीची किंमत कितीतरी पटीने जास्त होती. पैसा म्हणजे उत्पादनक्षमता. त्या देशातली अर्थव्यवस्था, पायाभूत सोयी. आर्थिक व्यवहारांची संख्या. जनतेचा काम करण्यातला उत्साह. उत्पादन क्षमता म्हणजे पैसा. नोटेतून तो फक्त व्यक्त होतो. नोट म्हणजे पैसा न्हवे. नवे भांडवल नवे तंत्रज्ञान देशात आले तर उत्पादन क्षमता वाढेल का कमी होईल ? स्पर्धा आली तर आपली उत्पादन क्षमता वाढेल का कमी होईल ? इतर अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. आयटी मधे परदेशी गुंतवणुक आहे. १०० % पर्यंत परवानगी आहे. त्या क्षेत्रात देशी उद्योग झोपले का ? देशातला पैसा बाहेर गेला का ? नव्या उभारीने भारतीय उद्योग परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करते झाले. नवे तंत्रज्ञान आपण शिकलो. आपली उत्पादन क्षमता वाढली. पैसा वाढला. मूल्यवर्धन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. स्पर्धेशिवाय क्वालिटी कशी सुधारेल. वर्षानुवर्ष तेच दलाल - तोच बाजार - तोच शेतकरी. बदल शून्य. स्पर्धा शून्य. परिवर्तन हाच प्रक्रुतीचा नियम आहे. कायदा पाळा गतीचा . काळ मागे लागला. थांबला तो संपला.ईर्षा , स्पर्धा आणी मुक्त बाजारपेठ हा नव्या जगाचा मंत्र आहे. तो न म्हणणारे डब्यात जाणार आहेत. भारत देश हजारो वर्षे परकीयांच्या गुलामीत पिचला आहे. जातीव्यवस्थेमूळे अशक्त, भ्याड आणी अनुत्पादक झालेला हिंदू समाज हे त्याचे एक प्रमूख कारण आहे. सावरकरांनीही जातीभेदाच्या सात स्वदेशी बेड्या तोडा असे म्हटले आहे. जातीभेद केवळ मानीव आणी पुस्तकी (ग्रंथप्रामाण्य) आहेत असे ही सावरकर म्हणतात. वस्तुस्थिती काय आहे ? जातीव्यस्था ही एक उत्पादन व्यवस्था आहे. लोहाराची, सुताराची, कुणब्याची, अन दलालाची कामेही वंशपरंपरा चालत येतात. त्यात स्पर्धेला वाव नसतो. लोहाराच्या घरात उत्तम दलाल जन्मला तर ? याच्या उलटे झाले तर ? व्यक्तीची उत्पादन क्षमता ही व्यवस्था ठेचून टाकते. निकोप स्पर्धेला वाव देत नाही. त्याला भणंग तत्वज्ञानाचा मुलामा देत तोंड वर करत म्हणते - पहा पहा, आमच्या महान संस्क्रुतीत स्पर्धा नाही ! ईर्षा (साहस) नाही. सहकार्य आहे. कसल डोंबलाच सहकार्य ? साहस स्पर्धा आणी ईर्षा हा राष्ट्राच्या प्रगतीचा महामंत्र आहे. शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली न्हवती. ती त्यानी पोर्तुगाल वरून मागवली होती. स्वदेशाचे स्वातंत्र्य म्हणून आले. स्वदेशीच्या भक्तांना एव्हढेही समजू नये ? भारतातली शेती पावसावर अवलंबून आहे. दुष्काळाचे अस्मानी संकट शेतकऱ्याच्या डोक्यावर असतेच. बंद बाजारपेठेचे सुलतानी संकट त्याहून मोठे आहे. आस्मानी संकटाबाबत आपण फार काही करू शकत नाही. सुलतानी संकटापासून कोण वाचवेल? साहस, स्पर्धा, मुक्त - पारदर्शक - भ्रष्टाचारमुक्त - खुली बाजरपेठ हे भारतदेशासाठी वरदान आहे. स्वतःची पापे झाकण्यासाठी ते भ्रष्ट काँग्रेसने दिले. म्हणून वरदान आपण नाकारणार आहोत काय ? (संपादित)

वाचने 8804 वाचनखूण प्रतिक्रिया 43

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 17:22
>>>>शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली न्हवती. ती त्यानी पोर्तुगाल वरून मागवली होती. स्वदेशाचे स्वातंत्र्य म्हणून आले अत्यंत हास्यास्पद विधान. जसे काही ती तलवार नसती तर स्वातंत्र्य आलेच नसते. असो. लेखामधील इतर मताच्या व्यक्ती, संघटना यांबद्दल असलेल्या ओकार्‍या आणि गरळ कमी असती तर लेख बरा झाला असता आणि लेखन आक्रस्ताळी न वाटता "मत" म्हणून समोर आले असते.

In reply to by नाना चेंगट

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 17:29
आणि असल्या ओकार्‍या, गरळ, शब्दांची तोडफोड करुन घेतलेली नावे, आणि एकंदर थर्डक्लास भाषा संपादक मंडळाला चालत आहे असे दिसते. चला आता यापुढे असेच लेखन करावे म्हणतो.

In reply to by नाना चेंगट

राजघराणं Mon, 09/24/2012 - 17:32
शिवाजीने -आपली शस्त्रे पोर्तुगीजांकाडून खरेदी केली होती. आयात निर्यात आणी पारतंत्र्य याचा संबंध नाही एवढेच सुचवायचे होते. भाषा उत्तेजक आहे पण गरळ ओकारी वगैरे जरा अती होतय

In reply to by राजघराणं

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 17:39
>>त्याविरुद्ध कम्युनिस्ट, मंदिरनिष्ठ; वंगव्यस्त, आणी द्रविड्स्त मंडळींनी अनुक्रमे क्रांती, धर्मयुद्ध, थयथयाट आणी तांडव सुरू केलेला आहे. >>>महागाई, महागाई च्या भंपक बांगा ठोकत स्वस्त प्रसिद्धीची पायवाट वारंवार तुडवण्याचे कारण काय ? >>>>बंगालच्या स्थानिक निवडणुकांसाठी ह्याला पाड त्याला गाडचे राष्ट्रीय (?) राजकारण चालू आहे. >>>मार्क्सबाबाचे धर्मांध अनुयायी मेनिफेस्टोच्या कॅपिटलात जे नसेल - ते सर्व काफिर मानणार हे उघड आहे. "भारत देश हा खरे राष्ट्रच न्हवे. त्याचे कैक तुकडे पडल्याशिवाय गरिबांचे शोषण थांबणार नाही." असे कम्युनिस्टांचे म्हणणे जाहीर आहे. त्यांना झालेला अमेरिकाफोबिया नावाचा मानसिक आजार आधिच डयग्नोस झालेला आहे. कम्युनिस्टांच्या मागे भाजपाने लागावे हीच खरी धमाल आहे. ज्या कम्युनिस्टाना लाल माकडे म्हणून आजपर्यंत शाखा शाखात हिणवले - त्यांचीच वैचारिक शेपूट का धरताय ? गणपतीच्या वर्गणीपलिकडे सेना मनसेला अर्थकारणातले गम्य नाही. भाजपेयींना तर सव्वा रुपये दक्षिणेची परंपरागत सवय मोडवत नाहीसे दिसते. कम्यनिस्टांच्या विरुद्ध भूमिका घेणे म्हणजे राष्ट्रवाद. अशी नवी हिंदुत्वाची व्याख्या त्यांना शिकावी लागेल असेही वाटते. नाहितर भट्टीतल्या अणूपासून शेतमातीच्या ब्रम्हांडापर्यंत. कम्युनिस्टांच्या लाल मारुतीपुढे - भीमरूपी महारुद्रा म्हणणारा पक्ष - अशी कायमची हिंदू ओळख मिळेल. वानगी दाखल हे कटपेस्ट केले. या काय आरत्या आहेत का? हे असले लेखन? तुम्हाला त्यांचे मत, विचार पटत नाही म्हणून? सेनेने काय फक्त गणपती वर्गणी केली आहे जमा? मार्क्सचे मत नीट खंडन केले आहे का आजवर कुणी? कशाचा कशाला थांगपत्ता नाही. असो. चालू द्या. तुम्हीच तेवढे हुषार आणि बाकीचे आंडू पांडु... ग्रेट ! वाजपेयींना भाजपेयी? दक्षीणा परंपरागत सवय म्हणून त्यांचे ब्राह्मण्य काढले नाही?

In reply to by राजघराणं

मालोजीराव Wed, 09/26/2012 - 00:47
>>शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली न्हवती. ती त्यानी पोर्तुगाल वरून मागवली होती. तलवार पोर्तुगीज बनावटीची होती परंतु शिवरायांनी ती मागविली नव्हती ,खेम सावंत यांनी शिवरायांना हि तलवार दिली १६५९ साली! >>शिवाजीने -आपली शस्त्रे पोर्तुगीजांकाडून खरेदी केली होती. कृपया छत्रपतींचा एकेरी उल्लेख करू नये -मालोजीराव

राजघराणं Mon, 09/24/2012 - 17:52
१) ह्यात ओकारी कुठे आहे ? २) मी स्वतः शिवसैनिक . सेनेचा प्रचारही केला आहे. सेना मनसेने भरपूर चांगली कामे केलेली आहेत. त्यांना अर्थकारणातले काहीही कळत नाही हा मुद्दा आहे. ३) वाजपेयी सद्ध्या निव्रुत्त आहेत. विधान भाजपा बद्दल आहे. ४) मार्कस च्या मताची भरपूर खंडने प्रसिद्ध आहेत. थोडे गुगळा.

In reply to by राजघराणं

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 17:57
१) एक एक मुद्दे काढायला मला वेळ नाही. त्यामुळे जाउ द्या.. तुम्ही लै भारी. खुष? २) अर्थकारण म्हणजे सर्वस्व नाही. आणि अर्थकारण कळत नाही हा मुद्दा केवळ विधान आहे त्याचा पुरावा काहीही दिला नाही. ३) भाजपेयी म्हणजे भाजप का? मग सरळ भाजप म्हणायला लाज वाटली का? ४) मार्क्स आणि त्यांचे मुद्दे खंडन ... हॅ हॅ हॅ असो. गुगळायचे कसे ते माहित नाही. शिकून घेतो लवकरच तुमच्या लेखनाची स्टाईल मलाच काय संपादक मंडळाला पण आवडली आहे. बेस्ट !! संपादक मंडळाला णम्र विनंती ह्या लेखाला बेस्ट लेखाचे अवार्ड द्यावे. धन्यवाद.

In reply to by राजघराणं

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 18:03
हांग आश्शी .. मग हाच मुद्दा अत्यंत संयमित आणि प्रगल्भ पध्दतीने मांडता आला नसता का? उदाहरणार्थ.. पहिला परिच्छेद आणि दुसर्‍याची सुरवारत मी अशी केली असती. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारने रिटेल बाजारात विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. ह्या धोरणाला साम्यवादी, हिंदूत्ववादी, तॄणमुल तसेच द्रमुक पक्षांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. सध्या विरोधी पक्षांनी महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्ल़क्ष करत केवळ सवंग प्रसिद्धीचा मार्ग अवलंबला आहे असे एकंदरीत त्यांचा केवळ महागाई ह्या मुद्यावरच चाललेल्या आंदोलनांवरुन स्पष्ट होते. मात्र रिटेलमधे विदेशी गुंतवणूक असावी का नसावी याचा निर्णय करण्याआधी आपल्याला आजची शेतीमाल विक्रीची पद्धत नीट समजून घ्यावी लागेल. ...... असो.

In reply to by राजघराणं

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 18:16
प्रश्न पुणेकरांच्या भाषेचा नाही. वैचारीक किंवा तथ्यात्मक लेखन करतांना वाचक विचार आणि तथ्याकडे आकृष्ट व्हायला हवा, भावनांच्या आवेगात नव्हे. असले भावनांचे आवेग असलेले लेखन मी म्हणतो तेच खरे आहे आणि तुम्ही ते मानलेच पाहिजे अशा धाटणीचे होते. वाचकांनी विचार करुन निर्णय घेतलेला बरा, त्यासाठी भाषाशैली भिन्न वापरावी. लेखन कोणते आहे याच्याशी सुसंगत लेखन शैली असावी असे आमचे एक गुरु सांगत असत. असो.

In reply to by नाना चेंगट

पैसा Mon, 09/24/2012 - 20:23
भाषेच्या मुद्द्यावर नानाशी सहमत. डॉक्टरना विनंती की तुम्हीच पक्षांबद्दलचे उल्लेख जरा सोबर भाषेत द्या, म्हणजे लेख अपडेट करू.

In reply to by पैसा

बंडा मामा Mon, 09/24/2012 - 22:31
माझ्या मते भाषा सभ्यतेच्या नियमांना धरुन आहे. वेबसाइट् सारख्या माध्यमांमधे लिहिताना मिसळीचा ठसका थोडा झणाझणीत असल्यास हरकत नाही. मिसळ्पावर तो अनेकदा अनुभवल आहे. पण इतरवेळेला मिसळीत पाणी झाले आहे वगैरे हिणवणार्या नाना चेंगटना आता एकदन मिसळ पानचट हवी हे काही पटले नाही. त्यांच्या मताविरुद्ध लिहिताना पाणी घालावे पण बाजुने लिहिताना अगदी चटकदार असे काही आहे क?

In reply to by पैसा

नितिन थत्ते Tue, 09/25/2012 - 10:47
>>पक्षांबद्दलचे उल्लेख जरा सोबर भाषेत द्या सहमत आहे. भडक आणि आक्रस्ताळ्या भाषेत लिहायचे असेल तर ते एकाच पक्षाबद्दल किंवा त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहायचे असते.

In reply to by नितिन थत्ते

सुहास.. Tue, 09/25/2012 - 10:54
भडक आणि आक्रस्ताळ्या भाषेत लिहायचे असेल तर ते एकाच पक्षाबद्दल किंवा त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहायचे असते. >> =)) =)) =)) आवरा ! ( जो पक्ष सर्वात जास्त वेळ सत्तेवर आहे आणि तोही सामजिक विषमतेच्या मुद्द्यावर, त्यावर झुंडीने हल्ला होणारच की नितीनदा ! ) सलग ८ वर्षापासून राजकारणात असलेला :)

In reply to by नितिन थत्ते

नाना चेंगट Tue, 09/25/2012 - 12:43
सहमत आहे. एकावेळेला एकाच पक्षाबद्दल किंवा त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल लिहायचे असते, एकावेळी सर्वांना का कोपच्यात घ्यायचे? नाही. थत्ते म्हणतात ते बरोबर आहे.

In reply to by राजघराणं

मृत्युन्जय Tue, 09/25/2012 - 10:53
योग्य ते बोलायला शिकण्यात गैर काय ते कळाले नाही की केवळ पुणे म्हटले की चिडचिड होते तुमची? बाकी धाग्याचा ट्यार्पी वाढवण्याचा प्रयत्न चांगला आहे.

कवितानागेश Mon, 09/24/2012 - 18:20
"पैसा म्हणजे उत्पादनक्षमता" हे बरोबर वाटत नाही. शिवाय " मूल्यवर्धन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे." हे पूर्णपणे पटत नाही. "भारत देश हजारो वर्षे परकीयांच्या गुलामीत पिचला आहे. जातीव्यवस्थेमूळे अशक्त, भ्याड आणी अनुत्पादक झालेला हिंदू समाज हे त्याचे एक प्रमूख कारण आहे." हे विधान गोंधळपूर्ण आहे. सविस्तर प्रतिसाद काही वेळाने..... आयात निर्यात अनेक शतकांपासून भरतियांना माहित आहे, आणि स्ववलंबन देखिल माहित आहे. त्यात अत्ताच्या सरकारने ( किंवा सैतानाने!? ) फार काही म्हत्त्वाचा शोध लावून दिलेला आहे असे नाही. सैतानाचे वरदान शेवटी सैतानाच्याच फायद्याचे असते! ;)

नाना चेंगट Mon, 09/24/2012 - 18:22
आणि हो महत्वाचे सांगायचेच राहिले... अनेक मुद्दे काढून तुमचे लेखन प्रत्येक वाक्य अन वाक्य मुळापासून नाकारता येईल.. पण जाऊ द्या ... इतर कूणी ते करतीलच ;)

प्रभाकर पेठकर Mon, 09/24/2012 - 20:10
नाना चेंगट ह्यांच्याशी सहमत. छचोर भाषेमुळे विषयाचे गांभिर्य कमी होते. भाषणांत अशी भाषा असेल तर 'काय धाडसी वक्ता आहे हो!', 'सॉल्लीड फोडला/झोडला एकेकाला. मानलं पाहिजे बुवा!' अशी प्रतिक्रिया ऐकू येते. भाषणांत/लेखनांत, मांडण्याचा प्रयत्न केलेल्या मुख्य विषयावर श्रोत्यांमध्ये/वाचकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तीचे कौतुक होते. विचारांना चालना मिळत नाही.

मन१ Mon, 09/24/2012 - 20:45
विषयातील फारसे गम्य नाही. त्यामुळे भाष्य करणे बरोबर नाही. गंगाधर मुटेही शेतकर्‍अयंच्या सद्य अडाचणींबद्द्ल पोटतिडकिने लिहिताना दिसतात. त्यांचेही ढोबळ मुद्दे(हत्ता पद्धत वगैरे) हेच होते. रामदास काकांच्या लेखात "बापट भाव"चा उल्लेख होता, क्रिप्टिक भाशेत, न समजेल असा भाव अडत्यांनी वापरायचा म्हणून. " वाटेत चोराने टोपली पळवली. पण आतले रूबल फेकून दिले. कारण टोपलीची किंमत कितीतरी पटीने जास्त होती." हा जोक वाटला नाही. हे फारच भीषण वाटले.

अर्धवटराव Mon, 09/24/2012 - 21:45
माणसाचे फुफ्फुस बिघडले. त्याला प्राणवायुचा योग्य पुरवठा झेपेनासा झाला. मग काय, आणा बाहेरुन सिलेण्डर आणि मास्क. हे मास्क गरज म्हणुन आवश्यक आहेच, पण त्याची फुफ्फुसाशी निकोप स्पर्धा वगैरे म्हणावी काय? शेतकर्‍याचं, कष्टकर्‍याचं हीत आपली व्यवस्था जपू शकली नाहि... पण त्याला उत्तर म्हणुन एफ.डी.आय. ? एफ. डी. आय. कडे एक अर्थनिती म्हणुन बघावे बस्स. त्याचे फायदे तोटे अर्थशास्त्राच्या कसोटीवरच तोलावे... उगाच समाजशास्त्राची आवरणे त्याला लाऊ नये. बाकी राहिला प्रश्न कम्युनिस्ट, भाजपीय, द्रवीड वगैरे वगैरे... ते राजकारण आहे. त्यांनी उडवलेली राळ सत्ताधार्‍यांच्या धुळवडीचे उत्तर आहे. त्यात त्या पक्षांची अर्थनिती शोधणे म्हणजे बालीशपणाचा कळस. ( उदा. सुरेश प्रभु बहुतेक शिवसेने मध्ये होते आहेत. शिवसेनेचा नद्याजोड प्रकल्पाचा तो खरा चेहेरा आहे, रामदास कामत नाहि) असो. लेख पूर्णपणे भरकटला आहे. अर्धवटराव

बंडा मामा Mon, 09/24/2012 - 22:27
लेखातली मते स्पष्ट शब्दात आणि ठामपणे मांडली अहेत. भाषा आक्रमक असली तरी सभ्यतेच्या मर्यदा ओलांडनारी नाही,

दादा कोंडके Tue, 09/25/2012 - 01:50
हे सगळं ठिक आहे. पण हा निर्णय घेण्याशिवाय आपल्यासमोर पर्यायच नाही असं वाटत नाही का? धान्यसाठा करण्यासाठी गोदामे बांधायला, भ्रष्टाचारने पोखरलेल्या शासनव्यवस्थेला वठणीवर आणायला, आणि दळणवळण व्यवस्था सुधारायला बाहेरच्या कंपन्या कशी मदत करणार आहेत तेच कळत नाही. ते फक्त त्यांचाच फायदा बघतील. आपल्याकडे मॅकडी-डॉमिनोजची चेन येउन किती वर्षं झाली? वीस मिनिटांत डिलीवरी होते की नाही? त्यामुळे सुधारले आहेत रस्ते?

In reply to by दादा कोंडके

स्पंदना Tue, 09/25/2012 - 05:51
मला वाटत जस सी एस टी किंवा बांद्रा स्टेशनच झाल तसा काहीसा फरक पडेल. जेंव्हा कंपन्या शेतीमालात त्यांचा नफा शोधतील तेंव्हा तो माल चांगल्याप्रतिचा यावा अन रहावा म्हणुन पैसा गुंतवतीलच ना? मे बी शेतकर्‍यांना हिरव्या पालेभाज्यांसाठी प्रॉपर इरीगेशन (पाणी वाया न घालवता (ठिबक सिंचन)) अन ग्रीन हाउसेसची सुविधा पुरवली जाइल. आजकाल ऑर्गेनिकच फॅड असल्यान तस विकसित करायचा प्रयत्न केला जाइल. थोडक्यात ही शेती जी आता दैवाच्या नशिबी आहे, ती थोडीबहुत स्थीर होइल. अन शेतकर्‍यान आपल्यालाच माल विकावा म्हणुन थोडा बहुत शेतकर्‍याचाही फायदा बघितला जाइल. प्लस अ‍ॅड्वर्टाइझ करण्यासाठी त्याम्ना आपण किती शेतकर्‍यांचे कैवारी आहोत ही ही सिद्ध कराव लागेल नाही का? आता आम्ही माल घेउन जातो घेवारी अक्षरशः लुटतात. काय करायच? मे बी सिंगापुर मध्ये कश्या कोल्डस्टोरेज, वा इथल कोल्स आणि वुलवर्थस जसे धंदा करतात तस काहिस होइल. फक्त शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांनी लाटल्या नाहित हे पाह्यल पाहिजे. म्हणजे शेतकरी ठरवेल कोणत्या ग्रुपला जॉइन व्हायच ते.

सुहास.. Tue, 09/25/2012 - 10:22
गणपतीच्या वर्गणीपलिकडे सेना मनसेला अर्थकारणातले गम्य नाही. >> =)) =)) =)) जावईशोध !! गणपती ची वर्गणी?? सेना आणि मनसे ?? हे कुठल्या ग्रहावरून शोधले ब्वा आपण ?

मृत्युन्जय Tue, 09/25/2012 - 11:03
लेखातले बाकी सगळे ठीक आहे. पण भारतात आधीपासूनच रिलायन्स फ्रेश, बिग बझार, स्टार बझार, अपना बझार, डी मार्ट, सुभिक्षा (बंद झाले बापडे) आहेच की. त्यांच्यामुळे असा काय फतरा फरक पडला आहे शेअतकर्‍याना? मग वॉलमार्ट तरी काय दिवे लावणार? आणि ते दिवे लावणार न्सतीलच तर फक्त खुप्ल्या अर्थव्यवस्थेचे ढोल बडवण्यात काय मतलब आहे? खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सुबत्ता आली पण या काळात किती मोठ्या भारतीय कंपन्या उभ्या राहिल्या याचा काही विदा उपलब्ध आहे का? लायसन्स राज मध्ये बजाज, टाटा, बिर्ला, गोदरेज, अंबानी, व्हिडीओकोन अशी साम्राज्ये उभी राहिली. खुल्या अर्थव्यवस्थेत किती भारतीय कंपन्या पुढे आल्या? खुल्या अर्थव्य्वस्थेने थम्स अप चा घास घेतलेला आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुढे येउ शकणार्‍या कितीतरी कंपन्या या खुल्या अर्थव्यवस्थेनेच मारल्या. उदाहरणच द्यायचे झाले तर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे उदाहरण देता येइल. एक व्हिडीयोकोन सोडले तर बाकी जवळजवळ सगळ्या भारतीय कंपन्या डुबल्या किंवा डुबण्याच्या मार्गावर आहेत. असो. एका वेगळ्या लेखाचा विषय आहे हा आणि मोठ्या आकडेवारीचा सुद्धा. रिटेल क्षेत्रामुळे अल्पकाळात बरेच फायदे आहेत हे नाकारता येणार नाही पण दीर्घकालीन तोट्याचा विचार कोणीतरी केलेला असले म्हणजे मिळवले. आणि हो तो शेतकर्‍यांचा फायदा वगैरे सर्व हास्यास्पद आहे. शेतकर्‍यांना काहिही घसघशीत फायदा नाही.

पिंगू Tue, 09/25/2012 - 17:11
भांडवलदार कुठेही नफा दिसत असल्याशिवाय गुंतवणूक करत नाही, हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. तेव्हा रिटेल मध्ये परकीय भांडवलदारांचा शिरकाव होऊन अल्पकालीन फायदा होईल. विदेशी भांडवलदारांना लोककल्याण किंवा समाजकल्याण या गोष्टींमध्ये काडीचेही स्वारस्य नाही आणि जेव्हा त्यांच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम होईल, तेव्हा त्यांचा खरा चेहरा उघडा होईल. तेव्हा रिटेलमुळे विकासाचा राजमार्ग खुला होईल, हा निव्वळ भ्रम आहे.

आशु जोग Tue, 09/25/2012 - 23:41
प्रथम सांगितले पाहीजे लेख छान आहे, माहितीपूर्ण आहे. कुणाचा चांगला लेख असेल तर काहीजण अकारण आपलं पोट दुखवून घेतात. प्रतिसादांमधेही शक्यतो पहिली जागा पटकावतात. असो... -- आमच्या देशात पैसा कुठाय ही बोम्ब जुनी आहे. देशात पैसा, साधने नसतील इतक्या परदेशी कंपन्या कशा येतात. बरं घेणारा भारतीय पिकवणारा भारतीय मग तिसर्‍याचा लाभ कशाला कर्वावा.

डीलर Wed, 09/26/2012 - 15:19
भारत सध्या तरी अमेरीके सारखी आयात मालाची मोठी बाजारपेठ नाही. मझ्या माहीती प्रमाणे फक्त ३०% देशी माल ठेवण्याची सक्ती आहे. बाकी माल आयात करता येइल. समजा वॉल मार्टला शेतमाल आयात करून स्वस्त पडला तर काय करायच? की हे promoting efficiencies and perfect competition in international trade अस धरायच? बाकी परकीय चलन या गोष्टी नंतर विचार करू.