मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाव...

बिपिन कार्यकर्ते · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कवितेबद्दल थोडंसं काही वर्षांपूर्वी मी एका गावात काही वर्षं राहिलो होतो. माझ्या आयुष्यातला एक अतिशय सुंदर कालखंड मी तिथे घालवला. पुढे मी ते गाव सोडलं. पण त्या आठवणी काही जाणार नाहीत. परवा अचानक तिथे परत जायचा योग आला. पण गाव जरी तेच असलं तरी मी तिथे अनोळखीच ठरलो. मधे खूप दिवस गेले होते. ओळखीचं कोणी नव्हतं. आज अचानक हे लिहावंसं वाटलं. *** एक आहे गाव, त्याचं असंच काहीतरी नाव. तसं आहे ते नकाशात, पण खरं तर ते आहे माझ्याच मनात. पहिल्यांदा जेव्हा गाव पाहिलं होतं, तेव्हा खूपच अनोळखी वाटलं होतं. असं वाटलं, आपण कुठे आलो? मूळापासून तर नाही ना तुटलो? मग रडलो, धडपडलो, स्वतःच स्वःला समजवत राहिलो. मी केलं खरं गावात घर, पण गावानेच केलं मनात घर. कालचक्र फिरत होतं, भराभर पुढे जात होतं, जाताना सोनं देत होतं. असाच एक दिवस आला, गावातला शेर संपला. नाइलाज होता, खूप जड गेलं, पण गाव सोडावंच लागलं. *** कालचक्र फिरतच होतं, भराभर पुढे जातच होतं. आता... मी गावात नव्हतो, गाव मात्र तिथेच होतं.... नकाशातलं नकाशात, मनातलं मनात. परत गावात जायचे बेत करायचो, आणि येणार्‍या आठवणी दाबून टाकायचो. पण आठवणी कसल्या लबाड, आणि खरं म्हणजे मन हे आठवणींचंच झाड. *** परवा मात्र गंमतच झाली, परत गावाला जायची संधी मिळाली. मानातल्या मनात मोहरलो, तडक गावात दाखल झालो. सगळं कसं तस्संच होतं, गाव होतं तस्संच होतं, तरीही सारखं वाटत होतं काही तरी चुकत होतं त्याच गल्ल्या तेच रस्ते, पाय माझे भटकत होते, मन मात्र अडखळत होते, काय चुकतंय शोधत होते, पण शोधूनही काही कळतच नव्हते. माग मात्र मी नाद सोडला, मनाचा घोडा मोकळा सोडला, आणि एकदम जादू झाली, सगळी ओळख पटू लागली. गावाने मला कुशीत घेतलं, मलाही छान उबदार वाटलं, काय चुकत होतं एकदम समजलं, मीच चुकीच्या ठिकाणी गाव शोधलं. गाव तर आहे तिथेच आहे..... नकाशातलं नकाशात, मनातलं मनात.

वाचन 17051 प्रतिक्रिया 47

रेवती Tue, 02/10/2009 - 03:16
ग्रेटच झालीये कविता! असं एक तरी गाव प्रत्येकाच्या मनात असतच! रेवती

In reply to by रेवती

शितल Tue, 02/10/2009 - 18:57
सहमत. :) बिपीनदा एकदम मनात घर करून गेली तुझी लिहिलेली कविता. :)

मुक्तसुनीत Tue, 02/10/2009 - 03:27
मुक्तचिंतन रोचक वाटले. इंग्रजी मधे एक प्रसिद्ध वचन आहे त्याची आठवण झाली : "यू कॅन नेव्हर गो होम अगेन". किंवा , प्रसिद्ध गझलच्या त्या २ ओळी : अब न वो मैं हूं , न तू है, न वो माझीं है 'फराज' जैसे दो साये, तमन्नाओंके सराबोंमे मिलें (अर्थ : आता मी "तो" नाही , तूही "ती" नाहीस , तो भूतकाळही (माझीं) सुद्धा विरला. आता आपले भेटणे म्हणजे : तडफडवणार्‍या इच्छांच्या मृगजळातले , दोन सावल्यांचे भेटणे !)

मीनल Tue, 02/10/2009 - 04:22
काही जण कुठल्याही गावात गेले की उप-यासारखे राहतात ,काही आपलं म्हणून घेऊन राहतात,काहींना गाव आपल करतं. असाच अनुभव आलेल्यांना अधिक समजेल ही कविता. साधी सोपी पण मनातल सारं सांगणारी. उत्तम कविता. यमक सोडल तर ,कुठलेही `कवितेचे ` नियम न पाळलेली ,तरीही एक लय आहे. एकमेकात जोडणारा धागा आहे. *** दिले असूनही अखंड आहे. अगदी साधी भावना पण उत्तमपणे पोहोचवणारी आहे. मीनल.

In reply to by सहज

खूपच आवडली कविता! तीन वर्ष जिथे राहिले होते तिथे परत कधी गेले तर असंच वाटेल, असं आम्ही सगळे शेवटी शेवटी म्हणायचो. खूप 'होमसिक' वाटलं. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

संदीप चित्रे Tue, 02/10/2009 - 05:19
मनापासून लिहिलं की खूप सुंदर उमटतं त्याचं उत्तम उदाहरण >>पहिल्यांदा जेव्हा गाव पाहिलं होतं, तेव्हा खूपच अनोळखी वाटलं होतं. असं वाटलं, आपण कुठे आलो? मूळापासून तर नाही ना तुटलो? >> काय बरोबर मनातले विचार ओळखलेस मित्रा...

प्राजु Tue, 02/10/2009 - 05:32
अगदी मनापासून लिहिलं आहेस रे बिपिनदा. संदीपशी सहमत आहे. मनापासून शोधलं की, मनातलं गाव विनासायस मिळतं.. अगदी जसंच्या तसं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

दशानन Tue, 02/10/2009 - 08:00
वरील सर्वांशी सहमत. सुंदर कविता ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

In reply to by दशानन

अनिल हटेला Tue, 02/10/2009 - 08:08
साधी आणी सुंदर कविता !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

नितिन थत्ते Tue, 02/10/2009 - 08:25
सहमत छान प्रवाही आणि लयदार खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

वल्लरी Tue, 02/10/2009 - 08:22
खुप छान कविता... साधी,सरळ नी सुरेख रचना.... :) गाव तर आहे तिथेच आहे..... नकाशातलं नकाशात, मनातलं मनात आवड्ले... ---वल्लरी

छोटा डॉन Tue, 02/10/2009 - 08:39
मनाच्या हळव्या कोपर्‍यातुन निघालेली एक अतिशय साधी, सरळ, सोपी कविता ... आवडली एकदम.
गाव तर आहे तिथेच आहे..... नकाशातलं नकाशात, मनातलं मनात.
क्या बात है ...! साधेपणानेच पण भावना एकदम क्लास उतरल्या आहेत बिपीनदा. पुलेशु. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

सुचेता Tue, 02/10/2009 - 12:56
अगदी असचं म्हणाव अस वाटल म्हणुण खास येवुन सांगीतल. सुचेता

विसोबा खेचर Tue, 02/10/2009 - 11:05
पण आठवणी कसल्या लबाड, आणि खरं म्हणजे मन हे आठवणींचंच झाड. बिपिनदा, जियो यार! खूप हळवी कविता केली आहेस! तात्या.

ब्रिटिश Tue, 02/10/2009 - 11:14
माजा गाव भिनलाय माज्या आंगा आंगात रक्तच जनू पीढ्यानपीढ्या युगानूयुगे *** बिपीनभाय मस्त कवीता मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मूकवाचक Wed, 09/12/2012 - 12:47
+१ (गाव असो की आणखी काही , 'ex' च्या आठवणीने हळवा होत नाही असा माणूसच विरळा!).

भडकमकर मास्तर Tue, 02/10/2009 - 13:54
उत्तम... मजा आली.. गद्यासारखीच कविता सुद्धा छान... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री Tue, 02/10/2009 - 14:02
कल्लास रे काका .. भेंडी काय लिहलं आहेस !! असाच एक दिवस आला, गावातला शेर संपला. कसलं ओघावतं लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टीसारखं सागितलयेस !! नाइलाज होता, खूप जड गेलं, पण गाव सोडावंच लागलं. साधे सोपे शब्द, सहज सुबक विण आहे त्यांची. कविता फार म्हणजे फार आवडली !!

शाल्मली Tue, 02/10/2009 - 15:51
मस्त झाली आहे कविता! झकास! गाव तर आहे तिथेच आहे..... नकाशातलं नकाशात, मनातलं मनात. मस्त! --शाल्मली.

सर्वांचेच आभार. शनिवारी मला खोबारला जाऊन बरोब्बर १० वर्षं झाली. योगायोग असा की नेमका त्याच दिवशी अजिबात ध्यानी मनी नसताना अचानक मी परत खोबार मधे पोचलो... जवळ जवळ ६ वर्षांनी!!! खूप वेळ एकटाच पायी भटकलो. सगळ्या खुणा शोधल्या. एक दोन मित्रांना भेटलो, संध्याकाळी परतलो. नंतर दोन दिवस दुसर्‍याच ठिकाणी होतो. काल परत यायला विमानात बसलो आणि अचानक हे शब्द बाहेर यायला लागले. लिहायला काहीच नव्हतं. मग विमानात, विमान लागलं तर वापरायची एक कागदी पिशवी असते, ती घेतली आणि सगळं लिहून काढलं. कवितेच्या तंत्राबद्दल यमक आणि जाणवणारी लय इतकं सोडलं तर बाकी काही कळत नाही मला. तेवढं मात्र जरा नीट केलं. बाकी सगळं जसं सुचलं तसंच आहे. संदीप आणि धनंजय.... धन्यवाद. बिपिन कार्यकर्ते

चतुरंग Tue, 02/10/2009 - 19:03
एखाद्या व्यक्तीशी जुळावी तशी नाळ गावाशी जुळते. आठवणींचं सामान इतस्ततः विखुरलेलं असतं. काही कडू बर्‍याचशा गोड! गाव सुटलं तरी आठवणी सुटत नाहीत, ती तहान दुसर्‍या गावानं भागत नाही. आपण सारखे दिसणारे संदर्भ शोधत रहातो, बेचैन होत रहातो. गावाने मला कुशीत घेतलं, मलाही छान उबदार वाटलं, काय चुकत होतं एकदम समजलं, मीच चुकीच्या ठिकाणी गाव शोधलं. गाव तर आहे तिथेच आहे..... नकाशातलं नकाशात, मनातलं मनात. क्या बात है! जियो!! चतुरंग

शशिधर केळकर Tue, 02/10/2009 - 23:19
बिपिन भौ! सहीच एकदम. पहिल्या कवितेपासून सुरुवात आणि ही उडी कुठल्या कुठे! 'कविता लिहिणे इतके सोपे असते?' असे वाटावे इतकी छान उतरली आहे. पण अधून मधून लेखही येऊदेत, एकदम कवी नका होऊन जाऊ!

शुभान्गी Tue, 02/10/2009 - 23:26
बिपिनभाऊ, मस्तच.... मनातील भाव अतिशय सुरेख शब्दान्कीत केले आहे......... कशी झाली खोबार ट्रीप??

जयवी Wed, 02/11/2009 - 22:58
बिपिन.....तुझं खोबार तुला पुन्हा सापडलं तर..... :) मस्तच लिहिलं आहेस.

वाहीदा Wed, 02/11/2009 - 23:40
तुझे गाव वाचुन, ते पल आठवले जेव्हा अम्मी ईहलोक कायम चा सोडण्या आधी आपल्या मिट्टी च्या लोकां ना भेटायला गावी गेली होती, ती खुश होती, हसत होती पण तिच्या हास्यात एक वेगळीच उदासीनता फक्त मलाच जाणवत होती... तिच्या भावना मी माझ्या शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे .... बहोत उदास थी उस दिन, मगर हुवा क्या था ?? हर एक बात भली थी , फिर बुरा क्या था ?? हर एक लब्ज पे लाजीम नहीं, के गौर करुं, जरा सी बात थी , वैसे भी सोचना क्या था ?? गली वही थी, मकाम वही था, ईसी खयाल से आई थी , फिर पुछना क्या था ?? उन बेजान दिवारों में, मै अपनापन कहांसे धुंनडूं ? जब मतलब की हवस ने सीना ही छन्नी कर दिया .... मै जिसकी जमें रही आखरी जद तक , खुदा बरकलों आखीर यह सिलसिला क्या था ?? ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

खुबसूरत. म्हणूनच तू लिहित जा. उन बेजान दिवारों में, मै अपनापन कहांसे धुंनडूं ? जब मतलब की हवस ने सीना ही छन्नी कर दिया .... काय म्हणायचंय ते समजलं. मै जिसकी जमें रही आखरी जद तक , खुदा बरकलों आखीर यह सिलसिला क्या था ?? हे उर्दू थोडं वरून गेलं. समजव. बिपिन कार्यकर्ते

आपला अभिजित गुरुवार, 02/12/2009 - 00:07
सध्या तुझा जुन्या स्म्रुती गोळा करण्याचा पंचकलमी कार्यक्रम दिसतोय बिपीनदा!! स्नेहसंमेलनं काय, गावच्या ट्रिपा काय...! मजा करा लेको!!