विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.
विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.
दीड वर्षापूर्वी विजयनगरच्या साम्राज्याला भेट दिली आणि मन खिन्न झाले. तेथे गेल्यावर त्या भग्न अवस्थेतील इमारती पाहिल्या आणि त्या साम्राज्याच्या गतकाळातील वैभवाची कल्पना येऊन रात्री झोपेचे खोबरे झाले. रात्री सारखे डोळ्यासमोर त्यावेळी कसे असेल या कल्पनेची दृष्ये येऊ लागली व पहाट केव्हा होतेय आणि मी परत केव्हा त्या साम्राज्यात जातोय असे वाटू लागले. असे बेचैन होत चार दिवस काढले आणि पुण्याला परत आलो. परत आल्यावर मी झपाटल्यासारखे विजयनगरवर मिळतील ती पुस्तके वाचून काढली व नेहमीच्या सवयीनुसार टिपाही काढल्या. यात बहुतेक वेळा ते वैभव, साम्राज्य ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले असेल अशा लोकांची प्रवास वर्णने मोठ्या चवीने वाचून काढली. त्यातून पेसच्या लिखाणाचे भाषांतरही करायला घेतले पण ते मागे पडले. त्या दरम्यान ज्यांनी भेटी दिल्या त्यांच्या विषयी माहिती गोळा झाली म्हणून म्हटले चला त्यांच्यावर तर अगोदर लिहू आणि मग पेसकडे बघू. या लेखमालिकेत मी तेथे काढलेली अनेक छायाचित्रेही टाकणार आहे. अगोदर नुसतीच छायाचित्रेच टाकणार होतो पण म्हटले जरा लिहावे ! आशा आहे तीही आपल्याला आवडतील. यातील वरचे हे पहिले चित्र प्रत्येक भागावर असेल. (थंबनेल स्वरूपात).
अगोदर विजयनगरच्या साम्रज्याबद्दल :
तेराव्या शतकात उत्तर भारतात मुसलमान साम्रज्याचा विस्तार झाला तेव्हापासून आपण इतिहासात डोकावूया. कारण त्याच्या मागे जायचे म्हणजे मला एक मोठे पुस्तक लिहावे लागेल. तर उत्तर भारत मुठीत आल्यावर मुसलमानांनी दक्षिणेकडे आपले हातपाय पसरायला सुरवात केली. विंध्यपर्वत ओलांडून त्यांनी दक्षिणेतील एकेक साम्राज्याचा नाश चालवला. ही क्रिया इतकी सावकाश चालली होती की त्यात लक्ष घातले तरच त्याचे स्वरूप लक्षात येऊ शकेल.
१२९३ मधे अल्लाऊद्दीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हाही त्याचा उद्देश फक्त संपत्तीची लुटमार एवढाच होता. या लुटालुटीच्या स्वा्र्यांमधे त्या काळात हे राजे अजून एक महत्वाचे काम उरकत आणि ते म्हणजे त्या प्रदेशाची तपशिलवार माहिती गोळा करणे. अल्लाऊद्दीन खिलजीनेही तेच केले. त्या माहितीत त्याला दक्षिणेत किती महापराक्रमी राजे महाराजे आहेत हे कळाले आणि त्यांच्या संपत्तीची मोजदाद करता येणे अशक्य आहे हेही कळाले. पुढे सिंहासनावर बसल्यावर त्याने पठाणी टोळ्यांचा बंदोबस्त करून दक्षिणेचा विचार करायला सुरवात केली. अल्लाउद्दीन खिलजी अत्यंत हुशार व धोरणी व्यवस्थापक होता. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे दक्षिणेकडची राज्ये जिंकायची म्हणजे पदरात विस्तव बांधण्यासारखे आहे. (त्या काळात). त्यापेक्षा त्या प्रदेशातील राजे एकामेकांशी भांडत राहिले, युद्ध करत राहिले तर ते कमकुवत राहतील व जेव्हा तो शेवटचे आक्रमण करेल तेव्हा प्रबळ अशी सत्ता त्या तेथे उरलेली नसेल. यासाठी त्याने दक्षिणेकडे फक्त खंडणी वसुलीचे ध्येय ठेवले. यासाठी त्याने मलिक काफूर याला दक्षिणेकडे पाठवून देवगिरी व वरंगळ ही दोन राज्य काबीज करून मांडलिक केली व तो त्यांच्याकडून नियमीत खंडणी वसूल करू लागला.
दक्षिणेकडे त्या काळात अजून दोन प्रबळ सत्ता होत्या त्यांची नावे होती – होयसळ व पांड्य. होयसळ राजांची राजधानी होती सध्याचे म्हैसूर आहे त्याच्या आसपास तर पांड्य राजांची राजधानी होती मदूरा येथे. थोडक्यात पांड्यांवर हल्ला करण्यासाठी होयसळांचे राज्य पार करूनच जावे लागे. अल्लाऊद्दीनच्या फौजांनी होयसळांचा पराभव करून पांड्यांच्या मदूरा व रामेश्वरही लुटल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. पण या भागात अल्लाऊद्दीनचा पूर्ण अंमल (महसूल सोडून) कधीच बसला नाही असे मानायला जागा आहे.
लवकरच अल्लाऊद्दीन खिलजीचा मृत्यू झाल्यावर देवगिरीच्या यादवांनी राजा हरपाल देव याच्या अधिपत्याखाली खिलजींची सत्ता झुगारून दिली व स्वातंत्र्य पुकारले. अल्लाउद्दीनचा मुलगा मुबारक खान हा सिंहासनावर बसला. या चिरंजीवांना मुसलमान इतिहासकारही त्या सिंहासनाला लागलेला डाग असे समजत होते, हे म्हटले म्हणजे त्याच्या लिलांबद्दल जास्त काही लिहायला नको. वर उल्लेख झालेल्या मालिक काफूरने याच्या खुनाचा प्रयत्नही केला होता. चोवीस तास हा बायकांच्या गराड्यात व मद्याच्या धुंदीत असे. जनानखान्यातील एकसोएक सुंदर बायकांच्यात राहून राहूनही याचे खरे प्रेम त्याच्या एका खुस्रो खान नावाच्या गुलामावर होते. पण बहूदा हे एकतर्फी असावे. कारण याच गुलामाने त्याचा खून केला. ( हा खरे तर एक शूर गुजरातचा हिंदू महार होता व तो धर्म बदलून मुबारकच्या पदरी लागला. असे म्हणतात की याने मुबारकचा सूड उगवण्यासाठी हे सगळे केले व शेवटी त्याचा खून केला.) असो. या मुबारक खिलजीने हरपालचे बंड शमवून त्याला पदच्यूत केले व त्याच्या जागी पहिल्यांदाच मुसलमान अंमलदार नेमला. हे झाल्यावर मात्र दक्षिण भारत खडबडून जागा झाला. व पुढे काय वाढून ठेवले आहे याची सगळ्या सत्ताधिशांना कल्पना आली. पण मुबारकखानाचा खून झाला, खुस्रोचे राज्य फार कमी काळ टिकले व तुघलकांनी दिल्लीची सत्ता काबीज केली. घियासुद्दीन आता दिल्लीच्या तख्तावर बसला. अर्थात त्यामुळे दिल्लीश्वराचे दक्षिणेवरचे लक्ष काही कमी झाले नाही कारण दक्षिणेतील संपत्तीची मोजदाद अगोदरच झाली होती. नशिबाने घियासूद्दीन काही दक्षिणेत आला नाही. त्याची कारकिर्द त्याचे तख्त संभाळण्यातच गेली. दिल्लीवरून आक्रमण होत नाही असे पाहून वरंगळच्या राजांनी मुसलमान अंमलदारांना हटविण्याचा प्रयत्न केला पण घियासौद्दीनचा मुलगा महंमद तुघलकाने त्यांना रोखलेच नाही तर त्याचा पूर्ण पाडाव केला व अल्लाउद्दीनला जे जमले नव्हते किंवा त्याने जे केले नव्हते ते याने करून दाखविले. या विजयाने उन्मादीत होऊन त्याने एकामागून एक राज्ये घशात घालायचा सपाटा लावला. वरंगळ नंतर त्याने अजून दक्षिणेकडे जात पांड्य राजावर आक्रमण केले व त्याचाही पराभव करून मदूरेला मुसलमानी अंमल बसवला. अल्लाउद्दीनने या राजांना जिंकले होते पण त्याने तेथे अंमल कधीच बसवला नाही. तो नुसती खंडणी गोळा करत असे. महंमद तुघलकाने (म्हणजेच उलुघ खान) ही चूक केली त्यामुळे त्या प्रदेशातील त्याच्या राज्याची देखभाल करणे त्याला कठीण जाऊ लागले. दक्षिणेकडे त्याचा एक आत्तेभाऊ त्याने ठेवला होता. त्याचे नाव होते बहाउद्दीन गुरशास्प. या बहाउद्दीननेच महंमदाविरुद्ध बंड केल्यामुळे त्याच्या कटकटी अजूनच वाढल्या. महंमद तुघलकाला वेडा महंमद म्हणायला आपण आपल्या शाळेतील इतिहासात शिकलो पण हा एक अत्यंत धोरणी, शहाणा पण अत्यंत क्रूर असा सुलतान होता. उत्तरेकडे सगळे लुटून झाले होते, व दक्षिणेकडे अमाप संपत्ती होती अशा परिस्थितीत त्याने देवगिरीला राजधानी हलवायचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य होता असे म्हणावे लागेल.
(नुकत्याच एका(च) देवळात सापडलेल्या संपत्तीवरून आपल्याला दक्षीणेकडे असलेल्या अनेक देवळातून असलेल्या संपत्तीची कल्पना येऊ शकेल).
याच काळात त्याच्या एका सेनापतीने, जलाल-उद्दीन-हसनशा याने तामीळ प्रदेशही अंमलाखाली आणला. या शूर सरदारालाच महंमदाने मदूरेचा सुभेदार म्हणून नेमले. (आपण माझा इब्न बतूतवरचा लेख वाचला असेल तर आपल्या लक्षात आले असेल की याच्या मुलीचे इब्न बतूतशी लग्न झाले होते व त्यामुळे तो अडचणीत आला होता) याचा मुलगा इब्राहीम हा महंमद तुघलकचा खजिनदार होता. या बाप लेकांनी मुहंमद तुघलकाविरूद्ध बंड करून मदूरेच्या राज्याचे स्वातंत्र्य जाहीर केले. अर्थातच इब्राहीमला ठार करण्यात आले व मुहंमद तुघलकाने या जलाल-उद्दीनवर आक्रमण केले.
या सगळ्या धामधूमीच्या काळात कुठल्या ना कुठल्यातरी मुसलमान सत्तेची ठाणी सगळ्या रस्त्यांवर बसत व सामान्य हिंदू जनतेला त्याचा फार उपद्रव होई. होयसळमधे बल्लाळराजाला हे सर्व दिसत होते पण त्याची ताकद त्यावेळेस कमी असल्यामुळे त्याने गप्प रहायचे पसंत केले पण त्याची आतून तयारी चाललीच होती. त्याची राजधानी कन्ननूरच्या जवळ होती. आपल्या रयतेला मुसलमान सेनेच्या हालचालींमुळे अतोनात त्रास होतो असे कारण पुढे करून त्याने आपली राजधानी सुलतानाच्या परवानगीने तिरूवण्णामलई येथे हलविली. ती जागा आडमार्गावर असल्यामुळे त्याला तेथे स्वत:ची सैनिकी ताकद वाढवून मुसलमान अंमलदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य झाले. तो तेथे योग्य संधीची वाट बघत तयारीत बसला. लवकरच त्याला अशी संधी मिळणार होती.......
महंमद तुघलकच्या लहरी व अक्रस्ताळी क्रूर स्वभावामुळे त्याने असंख्य शत्रू निर्माण केले होते. मुसलमानांच्यातच त्याला विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी मुसलमान अंमलदारांनीच बंडे पुकारली. बहाउद्दीन गुरशास्प याने त्याला फार त्रास दिला. उत्तरेत सिंध गुजरात, बंगाल या प्रांताच्या सुभेदारांनी बंड केल्यावर मात्र त्याचे सिंहासन डळमळीत झाले. त्या काळी सुभेदार म्हणजे फार मोठे पद व अधिकार असे. (सुभेदार हे फार मोठ्ठा हुद्द होता. त्याच्या विभागाचा राजाच जणू हे लक्षात घेतले म्हणजे आपल्या हे लक्षात येईल की सुभेदारांचे बंड म्हणजे काय चीज असेल ते) या सगळ्या गोंधळामुळे तुघलकाचे लक्ष दक्षिणेकडून उडून उत्तरेकडे केंद्रीत झाले. हा काळ होता १३३५ सालच्या आसपासचा. हिंदूंसाठी अत्यंत महत्वाचा. आत्ताच काही केले तर... नाही तर कधीच नाही असा काळ.....या वेळी जर ही संधी हिंदू राजांनी घालवली असती तर मात्र भारतात हिंदू राहिले असते की नाही हे सांगता आले नसते....असा, महत्वाचा हा काळ.....
पण त्यावेळच्या परिस्थितीकडे जर आपण दृष्टी टाकली तर आपल्याला दिसेल की दक्षिणेत मुसलमानांची स्थिती तुलनेने भक्कम होती. मदूरेला मुसलमानी सत्तेची मुळे रुजली होती. पांड्य राजे नामशेष झाले होते व होयसळ सुलतानाचे मांडलिक होते. पण आतून आग धगधत होती. वरून जरी हे होयसळ मांडलिक होते तरी नाईलाजाने ते तसे रहात होते. त्यांच्या सभोवती मुसलमानी सत्तांचा फास आवळत चालला होता व त्यावेळचा होयसळांचा राजा वीरबल्लाळ प्रत्याघात करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत होता. या राजाची राजधानी हळेबीडला असल्यापासून त्याने सबूरीचे धोरण स्वीकारून संरक्षणाची तयारी चालवली होती हे आपल्याला दिसून येईल. थोडक्यात मुसलमानांचे मांडलिकत्व स्वीकारल्यास त्यांची आपल्यावर नजर राहणार नाही व आपल्याला सैन्याची जमवाजमव करायला वेळ मिळेल असे त्याचे गणित होते. त्याने पहिल्यांदा आपली सीमा सुरक्षित करण्याकडे लक्ष पुरवले.
त्याच्या राज्याच्या उत्तरेला सीमेवर तुंगभद्रा नदी होती तर पूर्वेला महत्वाचा कंपलीचा किल्ला. तुंगभद्राच्या उत्तर किनार्यावर अजून एक मजबूत किल्ला होता. त्याचे नाव होते आनेगुंदी. म्हणजे तुंगभद्रेच्या उत्तर तीरावर आनेगुंदी व दक्षिण तीरावर कंपलीचा किल्ला अशी रचना होती.
महंमद तुघलकाच्या राज्यात एकदमच बंडाळी सुरू झाल्यामुळे त्याचा कडक अंमल जरा ढिला झाला. त्यातच त्याच्या पर्शिया व अफगाणीस्तानच्या आक्रमणच्या तयारीत त्याचा खजिना पूर्ण रिता झाला होता. या संधिचा वीरबल्लळ याने फायदा उठवायचे ठरविले. अर्थात स्वातंत्र्य पुकारण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षे पुढे अडचणीही तेवढ्याच जबरी होत्या. पहिली म्हणजे त्याच्या दोन बाजूला मुसलमानी सत्ताच होत्या. एक देवगिरी व दुसरी मदूरेची. स्वातंत्र्य पुकारल्यावर दोन बाजूला हे दोन शत्रू लगेचच तयार झाले असते. कदाचित एका हिंदू राजा विरूद्ध हे दोन्ही मुसलमान बंड विसरून एकत्रही झाले असते. हे लक्षात घेता त्याला या दोन सुलतानांच्या एकामेकातील दळणवळण तोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्याने चोखपणे या दोन सत्तांमधे चौक्यांचे जाळे उभारले. इब्न बतूतने त्याच्या रिहालामधे या नाकेबंदीचा उल्लेख केलेला आहे. त्याने तर असे लिहिले आहे की या हिंदू राजाची मदूरेला वेढा घालण्याची तयारी होत आली होती.
जेव्हा मदूरेच्या सुभेदाराने सुलतानाविरूद्ध बंड पुकारले तेव्हा आता आपली संधी जवळ आली असे वीर बल्लाळला वाटू लागले. पण एकदम अविचाराने हालचाल न करता तो सुलतान महंमद काय करतो याची वाट बघू लागला. महंमदचे लक्ष आता उत्तरेकडे पक्के लागले हे लक्षात येताच वीरबल्लाळ मदूरेवर चाल करून गेला. यानंतर त्या काळाचा विचार केल्यास त्याने एक आगळीवेगळी गोष्ट केली. त्याने राजत्याग केला, स्वत:च्या मुलाला सिंहासनावर बसविले व स्वत:ला लढायांना वाहून घेतले. यावरून त्याला या मुसलमानांच्या विरूद्ध पुकारलेल्या युद्धाचे किती महत्व वाटत असेल हे लक्षात येते. या लढायांमधे त्याने मुसलमानांना मदूरेपर्यंत मागे रेटले व मदूरेवर हल्ला करण्यासाठी एक लाख पंचवीस हजार सैन्य गोळा केले. यात पंचवीस हजार मुसलमानही सामील होते. हे कदाचित देवगिरीपासून फुटलेले भाडोत्री सैनिक असावेत. आता त्याच्या आणि मदूरेमधे मुसलमानांचे त्रिचनापल्ली हे एकच ठाणे उरले होते. दुर्दैवाने या युद्धात वीरबल्लाळ मारल गेला व त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले. हा होयसळांना मोठ्ठाच धक्का होता.
इतिहासात वरंगळच्या दोन भावांनी हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली असे जे इतिहासात सांगितले जाते ते तपासून बघितले पाहिजे. वीरबल्लाळच्या धडपडींमुळे या साम्राज्याचा पाया यानेच घातला असावा असे मला वाटते. अर्थात हे आपण इतिहासकारांवर सोडून पुढे जाउया. वीरबल्लाळच्या मृत्यूनंतर जो राजा गादीवर आला तो दोन तीन वर्षातच मरण पावला. कशाने हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्याने व त्यानंतरच्या राजांनी व त्याच्या प्रधानांनी उत्तर सीमा मजबूत करायचे काम मोठ्या जोमात केले हे मात्र खरे. याच प्रयत्नात कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेल्यावर अशाच एका मजबूत तटबंदीची गरज भासू लागली असावी व विजयनगरचा उदय झाला असावा.
कंपलीचा किल्ला मुसलमानांच्या ताब्यात गेला १३२८ साली व त्याच्या आसपासचा काळ हा विजयनगरच्या स्थापनेचा काळ असे समजायला हरकत नाही. १३४० पर्यंत हरिहर व बुक्क यांची नावे विशेष उजेडात येत नव्हती हेही लक्षात घेण्यासारखे आहे. विजयनगरची तटबंदी उभारण्याचा काळ हाच या साम्राज्याच्या स्थापनेचा काळ समजायला हरकत नाही. १३२७/२८ च्या आसपासचा काळ !
१३२७ सालापासून पुढे सतत अनेक वर्षे या हिंदू राजांनी हा लढा चालू ठेवून हिंदूंचा प्रतिकार जागृत ठेवला याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. मुसलमानांशी टक्कर घेऊन हिंदूत्व जिवंत ठेवणे हे विजयनगरच्या राजांचे घ्येय होते. त्यासाठी दक्षिणेत ठिकठिकाणी उगवलेली मुसलमानी सत्तेची बेटे बुडविणे हाच एक मार्ग होता. हे ध्येय त्यांनी शेवटी पन्नास वर्षांनी साध्य केले असे मानायला हरकत नाही. मदूरेच्या मुसलमान सुभेदाराला संपविले तेव्हा या कार्याचा एक महत्वाचा भाग संपला. दुसरे एक लक्षात घेतले पाहिजे की जरी तुघलक उत्तरेत अडकले होते तरी त्यांचे मात:बर सरदार अजूनही दक्षिणेत प्रबळ होते व त्यांची ताकद वाढतच चालली होती. किंबहुना तेही स्वतंत्र होण्याच्या मागे लागले होतेच. उत्तरेकडे गुलबर्गा येथे बहामनी सुलतानाच्या कहाण्या कानावर येत असल्यामुळे उत्तर सीमा बळकट करायचे काम चालू झाले. यातच महंमद तुघलकानंतर दिल्लीच्या तख्तावर आलेल्या फिरोजशाने उत्तर हिंदूस्तान हेच आपले कार्यक्षेत्र ठरविल्यामुळे त्याने दक्षिणेकडे दुर्लक्ष केले. त्याचा फायदा घेऊन बहामनी सुलतानाने आपले राज्य दक्षिणेकडे वाढवायचे ठरवले. अर्थात त्यात वावगे काहीच नव्हते. कोणीही असेच करेल. पण त्यामुळे विजयनगरची उत्तर सीमा सुरक्षीत करण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य हरिहर, बुक्क व त्यांचे तीन भाऊ करत होते.
होयसळांकडून या पाच भावांकडे सत्ता कशी आली हा एक संशोधनाचा विषय आहे व यासंबंधी अनेक प्रवाद चर्चिले जातात. पण हे बंधू होयसळांच्या पदरी सरदार असावेत व नंतर त्यांच्या हातात ही सत्ता आली किंवा त्यांनी ती घेतली या प्रवादावर विश्वास ठेवायला हरकत नाही. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्यावरील नेल्लोर ते पश्चिम किनार्यावरचे बेळगाव ही सरहद्द सांभाळत होते. सध्याचा दक्षिण महाराष्ट्र हा हरिहरच्या ताब्यात होता व तो उत्तरेच्या मुसलमानांना थोपवून धरत होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्यम नावाचे राज्य पूर्वकिनार्यावर होते. मधला भाऊ बुक्क जो इतिहासात पसिद्ध आहे हा विशेष कर्तबगार असून त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. अजून दक्षिणेकडे शिमोगाजवळ अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता.
इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते व मुसलमानी सत्तेला न जुमानता त्यांच्या छाताडावर पाय देऊन ते ताठ मानेने राज्य करत होते. त्या काळातील परिस्थितीचे आकलन ज्यांना आहे त्यांना हे काम किती अवघड होते याची कल्पना येऊ शकेल.
उत्तरेत काळाच्या ओघात हिंदू संस्कृती वरीच नष्ट झाली. भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद.....
क्रमश:.....
जयंत कुलकर्णी.
या अगोदर येथे जे वाक्य होते त्याने कदाचित गैरसमज व्हायची शक्यता असल्यामुळे (एका मित्राच्यामते) ते काढून टाकण्यात आलेले आहे. पण जे वाचणार आहेत त्या सर्वांचे आभार मानतो.
वाचने
40248
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
स्वातंत्र्यदिनाची उत्तम भेट! आम्ही वाचायला तयारीतच आहोत! तब्ब्येतीत येऊ द्या!
वाचतेय..
लेखाचा पहिला भाग सुंदरच झालाय.
अगदी प्रदीर्घ लेख मालिका होउदेत, वाचतोय आम्ही .
सुरेख . अप्रतिम.
लेखातून मलाही बरेच तपशील नव्याने समजले.
*पण त्यासाठी काहीएक ब्ब्याकग्राउंड माहित असणे आवश्यक वाटते. इथल्या सगळ्यांनाचा ते ठाउक असेल (११९१ च्या पुडह्चे) असे नाही. मी सविस्तर प्रतिसाद दिला की तुमचे मालिकेचे पुढचे भाग येत नाहीत हे निरिक्षण आहे. त्यामुळेगती ब्याकग्राउंड मी इथे देणे उचित नाही. वाचकांनी आधी ती माहीत करुन घेतली तर लेख अधिक चांगला उमजेल.
विजयनगरचे राज्य हे फक्त भारतीय इतिहासात नाही तर आख्ख्या दक्षिण आशियातील इतिहासातील महत्वाची घटना आहे; असे म्हणतो.
मालिका पूर्ण होइल अशी आशा करतो.
स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा. *
In reply to वा by मन१
मनोबा,
आपल्या सविस्तर प्रतिसादाने अजून काय लिहायचे ते कळते हे खरे पण लेखकाने ज्या मर्यादेत लिहायचे ठरवलेले असते ते सगळं मग विचारांपुढे कोलमडते. व विचार मालिका खंडीत होते. दुसरे म्हणजे प्रत्येक इतिहास जर सुरवातीपासून लिहायचा म्हटला तर त्याचा एकेक ग्रंथ लिहावा लागेल व त्यालाही मर्यादा आहेत.
आपण प्रतिक्रिया जरूर द्या मलाही त्या आवडतात पण मी वर म्हटले त्याचाही विचार करावा ही विनंती.....:-) मी क्रुसेडवर लिहायचे थांबवले याचे कारण आपली प्रतिक्रिया नसून त्याची फेराआखणी करण्याचे काम चालू केले आहे. आता माझ्या असे लक्षात येते आहे की तसे लिहिले तर साधारणत: ए-४ साईझची तीनशे पाने सहज होतील. आता ही मी केव्हा लिहिणार आणि केव्हा आपण वाचणार...पण मी ते लिहिणार आहे...पण आता नंतर... आता दुसर्या महायुद्धावर तीनशे पाने लिहून झाली आहेत अजून सहाशे आहेत...मधे मधे येथे लिहितोच...परत लिहिताना मनावर परिणम होतो तो वेगळाच. उदाहरणार्थ ज्यूंच्या छळाबद्दल चाळीस एक पाने लिहिली आणि लिहायचा मूडच गेला. म्हणून जरा हे वेगळे काहीतरी लिहायला घेतले आहे.....मला वाटते आपण समजून घ्याल..
In reply to मनोबा, आपल्या सविस्तर by जयंत कुलकर्णी
नंतर... आता दुसर्या महायुद्धावर तीनशे पाने लिहून झाली आहेत अजून सहाशे आहेत...मधे मधे येथे लिहितोच...परत लिहिताना मनावर परिणम होतो तो वेगळाच
अशा अनुभवातून गेलेलो असल्याने समजू शकतो इतकेच म्हणतो. जमेल तितकी भर खाली घालतोच आहे.
In reply to मनोबा, आपल्या सविस्तर by जयंत कुलकर्णी
सर आम्ही अजून पण कृसेड मालिकेची वाट बघतोय
वा जयंतराव! एका उत्तम विषयाला हात घातला आहे. अनेकदा या विषयी माहिती घेण्याची इच्छा होते पण आमच्या हातून अपेक्षित श्रम करण्यासंबंधी टाळाटाळ होते. तुम्ही या लिखाणासाठी, माहिती जमवण्यासाठी खूपच श्रम करत असणार यात शंकाच नाही तरी यामुळेच आमचं काम परस्पर होत आहे, यात आनंद आहेच. :-)
या लेखमालेचे पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.
(जयंतरावांचा पंखा) प्रास
विजयनगरच्या साम्राज्याची ओळख एका उत्तम लेखमालिकेतुन होईल असे दिसत आहे. माहितीपूर्ण लेखाची उत्तम सुरुवात केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. वाचतोय.
कुलकर्णी साहेब, लेखनात मधुन थोडीफार कला स्थापत्य शैलीबद्दल ओघात ओघात काही माहिती देता आली तर कृपया टाका.
-दिलीप बिरुटे
In reply to व्वा. उत्तम भाग. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक प्रकरण त्यावरच टाकायचा विचार आहे......
माझ्या माहितीची भर घालतोय.
शाळेतल्या इतिहासात खुबीनं "तराई इथल्या युद्धात पृथ्वीराजास मारुन मोहम्मद घोरी ११९१ साली सत्तेवर आला. पृथ्वीराज चौहान हा दिल्लीचा शेवटचा हिंदू राजा." इतकच लिहिलेलं असतं. आणि तिथून पुढे कुतबुद्दीन ऐबक, गुलाम घराणे, रझिया सुल्तान्,खिल्जी, तुघलक ते थेट लोदी हे शब्द असे काही लिहिलेले असतात की सध्या आपण ज्याला दक्षिण आशिया/भारतीय उपखंड म्हणतो त्यात सर्वत्र ही सर्व सुलतान मंडळी राज्य करु लागली असं वाटायला लागतं.(बहुतांश तपशील बहुसंख्य लोकांच्या शाळेनंतर लक्षात रहात नाहीत; ११९१ नंतर दिल्लीत सुलतानशाही आली म्हणजे भारतभर सल्तनत पसरली हा समज डोक्यात बसलेला असतो. कारण उघड आहे. दिल्ली ही आजची राजधानी आहे. तिथे राज्य तो भारताचा राजा हे अध्याहृत धरुन तिथल्या राजवंशांची सनावळी दिलेली असते. सुलतानपूर्व काळ अर्ध्या पानात आटपता घेतात.) आता आख्ख्या भारतातील मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सधयच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.)
.
.
इस ६३०-७००... आख्ख्या भारतात कुठेही फारशी मुस्लिम सत्ता नाही. खुद्द भारतात प्रबळ केंद्र सत्ता नाही. प्रभावशाली नंद, मौर्य घराणी मागे पडून सातेकशे वर्षे ओलांडली आहेत. मध्य भारतातील मोठ्या भागावर गुप्त घराण्याची असलेली सत्ताही संपुष्टात येउन दोनेक शतके झालेली. सम्राट म्हणवून घेणार्या हर्षवर्धान नावाच्या मोठ्या राजाचा काळ नुकताच होउन गेलेला आहे. उत्तर, पश्चिम, मध्य भारतात अनेकानेक लढाउ पण फुटकळ, विस्कळित राजपूत घराण्यांची व काही ठिकाणी जाट, सिंधी ह्यांची सत्ता. ह्या सर्वांचय आपसात फार वैर वगैरे नाही; पण नुसत्या कुरबुरी सुरु आहेत. लहान राज्ये; कुठलीही मोठी आघाडी नाही. तिकडे ६५० च्या आस्पास एकाएकी अरब टोळ्या संघटित होउन जबरदस्त शक्तीने भारवले गेल्यासारखे आख्खे मध्यपूर्व पालथे घालीत होत्या. तोवर संपूर्ण मध्यपूर्व तुलनेने प्रबळ अशा तुर्कस्थानतील बायझेंटाइन रोमन सत्ता व पारशी लोकांचे इराण मधील वैभवी, मागील हजार वर्शात समृद्धीचा दबदबा निर्माण केलेल्या साम्राज्यात विभागलीए गेली होती. अरब ह्या स्म्पूर्ण चित्रात क्षुल्लक होते, कुनीच नव्हते.
इस्लाम च्या उदयानंतर अचानक दोनेक दशकात आख्खी मध्यपूर्व एकापाठोपाठ एक असे विजय संपादत अरबांनी जिंकली. आजच्या पाकिस्तान -अफ्गाणिस्तानच्या पश्चिमेपासून ते थेट आख्खी मध्य्पूर्व, त्याला जोडून भूमध्य समुद्राचा सर्व भाग, उत्तर आफ्रिका(आजचे इजिप्त, लिबिया, मोरोक्को वगैरे) आणि समुद्र पार करुन खुद्द स्पेन ताब्न्यात घेतला!!
पुढेही इटालीच्या काही भागात त्यांनी आक्रमण केले, पण फ्रँक राजांनी शेवटी युरोपातली ती घोडदौड थोपवून धरली.(हे परमप्रतापी शार्लमान ह्या फ्रँको-जर्मन सम्राटाचे पूर्वज्/आजोबा. )
अधिक माहितीसाठी माझे जुने प्रतिसादः-
http://www.misalpav.com/node/21744#comment-399275
http://www.misalpav.com/node/21744#comment-400231
http://www.misalpav.com/node/21744#comment-400256
.
ह्या इराण हा अखंड भारताचा सख्खा शेजारी. भारताचे काय झाले ह्या दरम्यान?
आख्खे पर्शिअन राज्य अरबांनी जिंकले. त्याकाळात इराणी/पारशी राज्यात अफगाणिस्तानचा काही पश्चिम भग, आर्मेनिया, अझरबैजान(बहुतेक उझ्बेक व ताजिकही) हे आजचे मध्य आशियातील देश येत होते. हे सर्व अरबांनी जिंकले दहा बारा वर्षात जिंकले;ते कायमचेच. इथे पुन्हा कधीच मुस्लिमेतर सत्ता उभी राहू शकली नाही.*( अपवाद अत्यल्पकाळ बौद्ध -ख्रिश्चन मंगोल टोळ्या, त्यांचे राजे.)
इराण इतक्या झपाट्याने कायमचा काबीज केल्याबरोबर अरब सेनापतीची ताकद वाढ;ली(नाव विसरलो). आधीचे लश्कर, अधिक हे नव्याने जिंकलेले लश्कर+ जिंकलेले संपत्ती ह्याने तो अजेय भासू लागला. इराण घशात घातल्यावर चारच वर्षात त्याने आजच्या सिंध्-बलुच इत्यादी भागात स्वरी केली.काही अल्प भाग जिंकलाही ; मात्र लागलिच तो मारला गेला पुढच्या युद्धात. पर्शिया जिंकणारी सत्ता पुढील पन्नास साठ दशके इंचभरही पुधे सरकू शकली नाही.
इस ७१५ मध्ये मात्र मुहम्मद बिन कासीम ह्या बगदादच्या सुल्तानाच्या भाच्याने(की पुतण्याने??) पराक्रम गाजवला.
तरुण वयातच झंझावाती मोहीम काढत तो आत भारतात शिरला. सिंध त्याकाळात व्यापाराने भरभराटीस आले होते.(दक्षिण भारत व सूरत ह्यांच्याप्रमाणेच मध्य युगीन व्यापारात.) जगातील त्याकाळातल्या सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर(तेव्हाची मुंबै) म्हणजे "देबल"बंदर हे सिंध राजा दाहिर ह्याची राजधानी होते. आजच्या पाकिस्तनातील हैद्राबाद आणि कराची ह्या ठिअकणी कुठल्यातरी दोन मोठ्या लढाया झाल्या. त्यातल्या दुसरीत दाहिर मारला गेला. आख्खे सिंध , बलुचितस्तान, पाकिस्तनातील मक्रान, मुल्तान मधील बराच भाग आयताच कासिमला मिळाला. पुढे त्याने पाकिस्तानतील पंजाबातील अजूनही भाग जिंकला. आनी वर्षभरातच कुठल्या तरी कारणाने तो मेला.
काही जण म्हणतात की त्याची बाप्पा रावळ ह्या चितोडमधील गुहिलोत घराण्याच्या संस्थापक महाराण्याने अजमेर, जैसलमेर ह्या छोट्या राज्यांची मदत घेउन थोपवली. पण हे मात्र खरे की त्याने जिंकलेला बराच भाग त्याच्य अमृत्युनंतर पुन्हा बाप्पा रावळने जिंकला. इस . ७५०.मुस्लिम सत्ता फक्त सिंधच्या इवल्याशा भागात शिल्लक. पुढे सरकलेली नाही. ह्याच काळात त्यांनी इतरत्र किती भूभाग काबीज केला ते पहायचे तर माझा वरचा प्रतिसाद व त्यातील लिंका पहाव्यात.
पुढे वाचायला इच्छुक...तेव्हा येवु द्या.
ह्यानंतर पुढे सुमारे तीनेकशे वर्षे भारतात कुठीहे मुस्लिम सत्ता वाढलेली दिसून येत नाही!
थेट इसवीसन १०२१ उजाडते. अफगाणिस्तानमधील बराच भाग अजूनहई गैर मुस्लिम आहे. तिथे बौद्ध मतानुयायी बरेच आहेत.राजा खत्री/क्षत्रिय आहे. जयपाल त्याचे नाव. तो लढाईत हरला गझनीच्या महमूदाकडून आणि मारल गेला. त्यान्म्तर त्याचा मुलगा जयपाल सत्तेवर आल. तोही मारला गेला. आजचा आख्खा अफगाणिस्तान आता मुस्लिम सत्तेखाली गेला. सन १०२१. गझनीचा महमूद कुठला होता? ह्या राजांच्या शेजारीच त्याचं राज्य होतं. दोनेकशे वर्षापूर्वी जेव्हा पर्शिअन राज्य मुस्लिम सत्तेखाली गेलं, तेव्हा अफगाणिस्तानचा जो भाग मुस्लिम सत्तेखाली गेला, त्यात हा भाग होता. पर्शिअन सत्तेबाहेरच्या, पण त्याच्या लगतच्या भागात राजा जयपाल राज्य करीत होता. पुरुषपूर्/पेशावर ही त्याची राजधानी होती. आजही हे ठिकाण पाक- अफगाण सीमेवर आहे. इथे पठाणांची संख्या प्रचंड आहे.
गझनीच्या मेहमुदाने सतत वीस-बावीस वर्षे भारतावर स्वार्या केल्या. अफ्गाणिस्तानपासून ते थेट खाली गुजरातेत समुद्रकिनारी सुरटी सोमनाथ पर्यंत तो येइ. अगणित संपत्ती जिंकून, लुटून घेउन जाई. अगणित माणसांना गुलाम म्हणून बाहेरच्या जगात विकले जाई.
गझनीच्या मेहमुदास किम्वा त्याच्या पूर्वजास(सेबुकतजिन वगैरे तुर्क वंशीय सत्ताधार्यास) त्यातल्या त्यात जयपाल आणि त्याच्यानंतर त्याचा मुअल्गा आनंदपाल ह्याने बर्यापैकी रोखून धरले होते.
ह्यांचा एका नंतर एक असा काही वर्षात संपूर्ण पाडाव झाल्याने मग तितके सामर्थ्यशाली राज्य वायव्य भारतात उरले नाही.
आजचे अफगाणिस्तान, पाकिस्तान इथे एक सत्तेची मोठी पोकळी निर्माण झाली. स्थानिक फुटीर जमीनदार स्वतंत्र झालो असे सम्जू लागले.
पण साहजिकच त्यापैकी कुणीही लागलिच अंगावर येउ लागलेल्या मेहमुदास रोखू शकले नाही.(ते क्षुल्लक जमीनदार होते. मोठा राजा आधीच ठार झालेला.) त्यामुले मेहमुदास गुजरातेत येइअपर्यंत फार मोठा असा प्रतिरोध प्रथम झालाच नाही. गुजरातचे राज्य तसे मोठे होते. सौराष्ट्र हा बहग त्यांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र होता. चालुक्यांचीच ही एक शाखा होती.
पण अरेरे. खुद्द गुजरातेतही ह्या परकीय आक्रमकाचा कुणी पराभव करु शकले नाही. नाही म्हणायला एक दोन स्वार्यांत पुढल्या वेळी माळव्याच्या राजाने म्मोठी फौज उभारायचा प्रयत्न केला. पण त्यावेळी मेहमुदाने त्याच्याशी झुंजच घेतली नाही, पर्यायी रस्त्याने तो अलगद लुटीसह निघून गेला.
तर, इ स १०२० च्या आसपस. मुस्लिम सत्ता कुठवर? तर अफगाणिस्तान+ पाकिस्तानी पंजाबचा काही भाग आणि सिंध्-ब्बलुच इतकाच भाग(गुज्रातला पोचण्यासाथी तुर्की टोळ्यांना लागनारा पॅसेज त्यांनी जिंकून घेत्ला, पण त्याही संपूर्ण बहगावर एक्संध अशी सत्ता त्यांनी स्थापित केलीच नाही.).
गुजरात, राज्स्थान, आजचे भारतातले पंजाब,खुद्द काश्मीर अजूनही स्वतंत्र होते; वेगवेगळ्या राजांच्या आमदानीखाली होते.(युपी, एम पी तर लांबचीच गोष्ट राहिली.)
पाकिस्तानातील पर्वतास प्रसिद्ध खैबर खिंड असणार्या पर्वतास"हिंदुकुश" का म्हणतात? कारण स्वारी नंतर अगणित लोकांना, लाखो लोकांना तो ओढत फरफटत घेउन जाई. जनावरांहोन वाइट आवस्थेत नेले जात असताना त्या परवताच्या डोंगराळ भागात, प्रतिकूल परिस्थितीत लाखो हिंदू कैदी मरत, गवताच्या पत्यासरखे म्हणून त्याचे नाव हिंदुकुश. विकिपिदियावरही हीच माहिती असल्याचे आठवते आहे.
.
http://en.wikipedia.org/wiki/Brahmana_Hindu_Shahis_of_Afghanistan इथे बरीच माहिती मिळेल.
कश्मीर राज्याचा अकराव्या शतकाअतील राजकवी कल्हाणाने आपल्या "राजतरंगिणी" ह्या ग्र्म्थात ह्याचे बरेच उल्लेख केले आहेत.
युद्द्धांबद्दल अधिक माहिती हवी असल्यास अगुगल्ब्बुक्स वर http://books.google.co.in/books?id=7U0hY3wtXe4C&pg=PA54&lpg=PA54&dq=jaipal+king+punjab&source=bl&ots=BSxb9M4GAh&sig=sMjzaMz3kDNX9j4vTVGL-HIeSoY&sa=X&ei=0YYrUI7IJYzJrAe-iYG4Cw&ved=0CBQQ6AEwAw#v=onepage&q=jaipal%20king%20punjab&f=false वाचावे. पान एकावन्न ते साठ दरम्यान.
In reply to भर्..भाग३... इ स ७५० च्या पुढे by मन१
जयपाल आणि आनंदपाल हे भारताचे खरे राष्ट्रपुरुष मानले पाहिजेत असे वाटते.
गझनीच्या मेहमुदाने सतत वीस-बावीस वर्षे भारतावर स्वार्या केल्या. अफ्गाणिस्तानपासून ते थेट खाली गुजरातेत समुद्रकिनारी सुरटी सोमनाथ पर्यंत तो येइ. अगणित संपत्ती जिंकून, लुटून घेउन जाई. अगणित माणसांना गुलाम म्हणून बाहेरच्या जगात विकले जाई. या मुस्लिम प्रणित हिंदू गुलामगीरी विषयी अजून माहिती मिळेल का?
मागे कुणीतरी उपक्रमावर, हिंदू कारागीर मध्य-पूर्वेत नेऊन मुसलमानांनी आपल्या मशिदी बांधल्या, सजवल्या अशा स्वरूपाचे विधान केले असता, त्याची टर उडवण्यात आली होती, असे अर्धवट आठवते.
भारत एक खोज मधील "विजयनगरचे साम्राज्य उदय आणि अस्त" ही मालिका अप्रतिम अशी होती.
In reply to भारत एक खोज. by कलंत्री
त्या (काही अल्पसंख्य दुखावले जाऊ नयेत म्हणून केलेल्या) संपादित भागांपेक्षा येथील भाग जास्त चांगला वाटतो. जास्त खरा खुरा वाटतो!
जयंतराव,
स्वातंत्र्यदिनी ही चांगली भेट दिलीत. त्यांत मनोबांचे अभ्यासू प्रतिसाद वाचून आनंदात भर पडत आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
महंमद तुघलकाला वेडा महंमद म्हणायला आपण आपल्या शाळेतील इतिहासात शिकलो पण हा एक अत्यंत धोरणी, शहाणा पण अत्यंत क्रूर असा सुलतान होता.
शाळेत शिकवला जाणारा इतिहास हा त्यावेळेस ब्रिटिशांच्या चष्म्यातून असावा. पण निदान तो खोटा तरी नसावा. आता काँग्रेजी राजवटीत , तर खरा इतिहासच बदलून टाकण्याचे काम जोमाने चालू आहे. त्यामुळे, पुढच्या पिढ्यांना आपल्याला कळला,तेवढाही इतिहास कळण्याची शक्यता नाही.
वाचतोय.
उत्तम संकल्प. अनेक धन्यवाद.
मनोबा तुमचेही धन्यवाद.
निव्वळ अप्रतिम ...
येवुद्या ..
इस ११९१ ला राजकीय पटलावर काय स्थिती होती? आजचा सर्व अफगाणिस्तान, बराचसा पाकिस्तान सुल्तानांच्या अंमलाखाली(इराण मधील अब्बासिद किम्वा अफगाणमधील गझनी-घोरी) किंवा स्थानिक सुलतानांच्या ताब्यात होता.
उरवरित भारत अजूनही अनाघ्रत होता. पश्चिमेस चालुक्य सोळंकी ह्यांचे गुजरात मध्ये राज्य होते. गुर्जर्-प्रतिहार घराणी पंजाब, पश्चिम राजस्थान इथे राज्य करीत होती. बहरतातला पंजाब,हरयाना, दिल्ली उत्तरेकडचा राजस्थान पृथ्वीराज चौहान ह्याच्या ताब्यत होता.
इस ११९१ मध्ये चौहानांच्या राज्याची व घोरीच्या राज्याची सीमा अशी पंजाबच्या भागात भिडत होती. अरे हो. घोरी कोण? मघा मी गझनीचा मेहमुद म्हणालो ना, त्याच्या वारसादारांना सत्तेवरून दूर करुन सत्तेवर आलेले घोरी घराणे.
मुहम्मद घोरी हा त्यांचा राजा. ११९१ला हरयाणामधील करनाल जवळ तराई येथे मोठीच लढाई झाली. त्यात पृथ्वीराजाच्या सैन्याचा विइजय झाला. घोरीचे सैन्य धूम मघारी फिरले. सरहिंद ह्या पंजाबच्या पश्चिम टोकापर्यंत जाईपर्यंत ते थाम्बलेच नाही. ह्याक्षणी पाठलाग करुन त्यांना कायमचे संपवणे पृथ्वीराजास शक्य असूनही त्याने केले नाही. कारण?? इतिहासास कारण ज्ञात नाही. गौरवीकरण करणारे "त्याने क्षमा केली " असे म्हणतात, पण त्याला मुदलात माफी मागायला आलेच कोण होते हे कुणीच सांगत नाही.असो.
११९२ ला घोरी परत आला. अधिक तयारीने, मोठ्या सैन्याच्या व प्रशिक्षित मनुष्यबळाच्या साह्याने आला. जम्मोच्या एका हिंदू राजानेही त्याला दरम्यान राज्य पुनःउभारणीत मदत केली म्हणतात. त्याला मदतीस बरेच फितुर पृथ्वीराजाच्या पक्षातील मिळाले. त्यात पृथ्वीचा सासरा, आजच्या कनौज(कानपूर जवळ राज्य असणारा) इथे राज्य करणारा जयचंदही घोरीच्या पक्षाला जाउन मिळाला. पुन्हा जोरदार युद्ध झाले. घोरी जिंकला. पृथ्वीराज चुअहानस त्याने आधी कैद केले. नंतर मारुन टाकले.
"दिल्ली सल्तनत" हा शब्द स्थापित झाला. पण कसा? घोरी दिल्लीलाच रहायचे ठरवू लागला. पृथ्वीराजची पत्नी संयोगिता हिच्यावर त्याने बलपूर्वक अधिकार स्थापित केला. खुद्द कनौज राज्य जिंकले. तरीही बराचसा बहरत अजून अनाघ्रत होता. "दिल्ली गेली" म्हणजे आख्खा भारत गेला असे चित्र नव्हते.
आख्खा राजस्थान स्वतंत्रच होता. अजमेरच्या चौहान वंशीयांनी कागदोपत्री मांडलिकत्व स्वीकरलं तरी सत्ता त्यांचीच होती. मेवाड, ग्वाल्हेर्,मारवाड, जैसलमेर्,जोधपूर ही संस्थाने अजूनही स्वतंत्रच होती. गुजरात- एम पी बॉर्डारवर मांडूगड्ला एक स्वतंत्र स्म्स्थान होते. गुजरात अजूनही चालुक्यांच्या ताब्यात होती. मध्य भारतात इतर काही घरानी सत्तेत होती. वन विभाग अधिक असेल तिथे स्थानिक भिल्ल, गोंड ह्यांचे राज्य होते. महाराष्तृआत समुद्रकिनारी व घाटामाथ्यावर नानेघाटानजीक यदवांनी अंकित केलेली कोळी जमात राज्य करत होती. बहुतांश महाराष्तृअ, उत्तर कर्नाटक इथे यादवांचे राज्य होते. ओरिसाचे राज्य स्वतंत्र होते.(नाव विसरलो राजांचे). बंगालला सेन्-पाल घरानी राज्य करत होती. दक्षिण भारतात चार प्रमुख प्रबळ घराणी होती. चोळ्-पांड्य्-पल्लव - होयसळ. गंग सत्ता बांधकाम वास्तुकला, शास्त्र ह्यात पुढारलेली असली तरी ह्यापैकीच कुणाची तरी अंकित असे.( "चामुंडरये करवियले" असे लिहिलेला कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील शिलालेख ह्यांच्याच कारकिर्दीतील.) गोव्याच्या आसपसच्या बहगात कदंब राजसत्ता होती.
थोडक्यात, पंजाब, हरयाणा ते दिल्ली आणि गंगा-यमुना ह्या नद्यांच्या मधली जागा, दिल्लीच्या पूर्वेस काही भाग.
घोरी काही मुघल किम्वा मराठा शासकांप्रमाणे फार मोठ्या भागाचा राज नव्हता.(भारताचया फार मोठ्या भागाचा.)
स्वातंत्रदिनाच्या शुभ अवसरी जयंतरावांचे स्वातंत्र्यलढ्याचे लेख वाचायला मिळावेत यापरते सुख काय...
धन्यवाद सर जी.
अर्धवटराव
ह्याही संपूर्ण शंभर वर्षात सत्ता संतुलन आपल्याला वाटते तितके काहीच बदलले नाही. मी जो वरती पोलिटिकल सीन सांगितलाय, तो पुढील शंभर वर्षे तस्साच होता. (११९१ ते १२९२).
घोरी गेला; घोरीनंतर त्याचा गुलाम कुतुबुद्देन ऐबक सत्तेवर आला. ह्याने त्याकाळात अगदि नावाजल्या गेलेल्या दिल्ली परिसरातील(किला- ए -रायपिठोरा जवळील) सत्त्तावीस हिंदु-जैन सुम्दर मंदिरे फोडली. त्यातून जमलेल्या ढिगार्यातून सुप्रसिद्ध कुतुब मिनार उभा केला. ह्या नंतर वेगवेगळे सत्ताधीश येत राहिले.
११९२ च्या आसपास खिल्जी घराणे दिल्लीच्या सत्तेवर होते. आज ज्यास ग्रँड ट्रंक रोड म्हणतात, जो ढाका-ध्नबाद्-मुघसराय- बनारस -कानपूर्-अमृतसर्-लाहोर -पेशावर्-काबूल इतका लांब पसरलाय , त्याच्या दोन्ही बाजूस खिल्जींची सत्ता होती. बंगाल/बांग्लादेश ते पंजाब ह्यांना जोडनारा पॅसेज त्यांनी जिंकला होता.
उर्वरित भारत, वरती सांगितल्याप्रमाणं विखुरलेला.
१२९० च्या दशकाअत जलालुद्दीन खिल्जी ह्या सुल्तानानं प्रथमच ही सत्ता दणिण्-पश्चिम्-मध्य भारत अशी वाढवण्यासठी मोठी फौज रवाना केली. त्यात त्याचा पुतण्या (व जावई?) अलाउद्दीन ह्यास मोठी फौज देउन रवाना केले.
त्याने प्रथमच मेवाड, मारवाड, मांडूगड(एम पी- गुजरात ह्यांच्या बॉर्डारवरील राज्य), आख्खा गुजरात्,बुर्हाणपूर, एलिचपूर अशा झांझावाती मोहिमा सुरु केल्या. महाराष्तृआच्या बर्याच भागावर शासन असणार्या देवगिरीवरही विजय मिळवला. दक्षिणेत पार तेलंगणा पर्यंत(आजचे आंध्र प्रदेश) भाग जिंकले. फार मोठ्या भागावर थेट किम्वा अप्रत्यक्ष खिल्जी घराणे आले. इस १३२० सालापर्यंत.
पूर्वीची कित्येक वैभवशाली म्हणवली जाणारी घराणी दोन्-तीन युद्धातच पार नेस्तनाबूत झाली. सारं काही संपल्यासरखं वाटू लागलं.......
पण काही काळच. काहीच काळात second generation dynasty , दुसर्या टप्प्यातील घराणी उदयाला येणार होत्या. ती पुन्हा स्वतंत्र होणार होती. राजस्थान बराच जिंकला गेला व चितोडच्या गुहिलोत घराण्याकडून काही काळ घेतलाही गेला तरी त्यांचाच एक दूरचा वंशज अधिक परमप्रतापी सिसोदिया घराण्याची स्थापना करणार होता.त्यातच राजा कुंभ, राणाप्रताप होणार होते.
दक्षिणेत चोळ पांड्य पल्लव ह्यांचा ऑरा आता उतरता वाटत असला तरी नव्या जोमाने विजयनगर उभे राहू पाहणार होते. पण त्याल थोडा अवकाश होता.
*************************************************************
.
जकुंच्या लेखाची ही पार्शभूमी आहे. ह्यानंतरचे कित्येक तपशील त्यांनी अगदि छान दिलेले आहेत.
@ जकु काका :-
१.हरिहर बुक्क हे विद्यारण्यस्वामी ह्यांचे शिष्य होते म्हणतात. काही जणांकडून ऐकलय की विद्यारण्यस्वामी हा संन्यासी मुळात तेव्हाच्या दक्षीण पिठातील शंकराचार्यंचा सख्खा धाकटा भाउ. कुणाकडून ऐकलय की शंकराचार्य ह्या पदावर बसलेल्या व्यव्क्तीचेच ते दुसरे नाव होते.(चानक्य = विष्णुगुप्त =कौटिल्य आहे ; तसेच.)
.
२.तुघलक काळाच्या नको तितका पुढे होता असे कधीकधी वाटते. हाही वेडाचा प्रकार. तांब्याची नानी बनवायची ह्याची स्कीम आख्खी अर्थव्यवस्था खिळखिळी करुन गेली. एकाएकी राजधानी एक सनक आली म्हणून दूर हलवायला घेतली; त्याची किमतही त्याच्या साम्राज्यला मोजावीच लागली. आजवर कुणाही केंद्रिय भारतीय राज्यसत्तेने विचारही न केलेली हिंमत त्यानं केली. हिमालय ओलांडून चीनवर स्वारी करायचा प्रयत्न!
ह्यात अगणित सैनिकांनी जीव गमावला. फार मोठी सैन्य शक्ती वाया गेली.
ह्यतील कुठलीही गोष्ट यशस्वी ठरली असती तर तो नक्कीच visionary म्हणवला गेला आसता.outstanding achievers , genius ह्या यादीमध्ये त्याचं नाव अलेक्झाम्डर किम्वा चंगीझ क्खान ह्यांच्याप्रमाणच घेतलं गेलं असतं. पण त्यानं इतका सपाटून मार खाल्ला, त्यातही सर्व किंमत त्याच्य अनागरिक आणि सैनिकाम्ना विनाकारण द्यायला लागली; त्यामुळे त्याची दृष्ती ही "वेडाचा झटका"च ठरली.
********************************************************
मी दिलेली background तुमच्यासारख्या बर्याच जणांना अधीच तोंडपाठ असणार ह्यात शंका नाही. पण बर्याच जणांच्या इतिहासच्या आठवणी शालेय दिवसानंतर पुसट होतात, म्हणून हे टंकनश्रम.
जयंतराव, काही शका आहेत. वेळ मिळेल तर जास्त माहिती द्यालच ही आशा आहे.
या हरिहर आणि बुक्कांचे गुरुजी मध्वाचार्य किवा विद्यारण्य होते असे उल्लेख वाचले आहेत. हे नक्की कोण होते?
देवगिरीचा हरपाळदेव गोवा/बनवासी इथल्या कदंबांचा संबंधित होता. आणि संगम घराण्याचेही लागेबांधे कदंबांशी कुठूनतरी पोचत होते. देवगिरीचे यादव आणि संगम यांचे आपसात काही नाते होते का?
हरिहर आणि बुक्क स्वतःला महामंडलेश्वर म्हणवतात. बुक्काचा मुलगा हरिहर दुसरा मात्र स्वतःला राजाधिराज म्हणवतो. म्हणजे त्याच्या काळात संगम पूर्णपणे सार्वभौम झाले असावेत.
एक जरा अवांतर शंका. अनेगुंदी वरूनच मराठीत "अनागोंदी" शब्द आला आहे का?
In reply to काही शंका by पैसा
बाकीचं माहिती नै पण अनागोंदी हा शब्दप्रयोग त्या आनेगुंदी संस्थानच्या राजावरून आलेला आहे. त्या राजाचा धर्मार्थ खर्च कैच्याकै असून तिजोरीवर लै ताण पडत असे, तस्मात तत्सम अंदाधुंदी कुठे दिसली तर त्यास अनागोंदी कारभार म्हटले जाते. पण हा कोणता राजा व याचा काळ काय हे माहिती नै.
भारतात हिंदूंची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या कल्पना, त्यांच्या काव्य शास्त्र विनोद या विषयीच्या कल्पना याचे दृष्य स्वरूप कोठे दिसत असेल ते फक्त दक्षिणेकडेच..व याचे श्रेय जाते विजयनगरला हे निर्विवाद.....
१००% सहमत. लेख आवडला.
तसेच मनोबांचे प्रतिसादही आवडले. पुढील भागांच्या अन प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
दक्षिणेतील संपत्तीची मोजदाद अगोदरच झाली होती. हे कसे काय म्हणता ते समजले नाही. अनेक अफवा कानावर आल्या असतील - अंदाज आला असावा पण मोजदाद झाली नसावी.
माझ्या मते - ही संपत्ती देवळातील तळघरात ठेवली जात असे. (आठवा ब्रिटिशांनी लुटलेला त्रंबकेश्वरचा नासक हिरा व खजिना) तेथे गाभार्यात तरी फक्त ठरावीक लोकांनाच प्रवेश होता. माझ्या माहिती प्रमाणे या तळ घरांचा प्रवेश गाभार्यातूनच करता येतो. या शिवाय शिवा-शिव इत्यादी सामाजिक प्रघात पाहता बहुतेक लोक संपत्तीच्या जवळपासही पोहोचू शकत नसावेत. मुसलमान तर त्याहून दूर!
त्यामुळे मोजदाद शक्य वाटत नाही.
In reply to दक्षिणेतील संपत्ती by निनाद
मोजदाद म्हणजे मोजणे या अर्थाने वापरलेला नाही. मला असे म्हणायचे आहे की कोठे काय लपवलेले आहे त्याची माहिती झालीच होती...किंवा त्याचा अंदाज आला होता...हे वाक्य त्याच्या अगोदरच्या वाक्याच्या संदर्भात घ्यायला पाहिजे..
लेख अतिशय उत्तम आहे.
काही वेळा विस्मृतीत गेलेला किंवा सांगितलाच न गेलेला इतिहास असा समजत राहतो हे ही नसे थोडके. त्यामुळे तुमच्या या लेखनाची माझ्या लेखी मोठीच किंमत आहे.
हे कष्ट घेतल्या बद्दल धन्यवाद द्यावेत तेव्हढे कमीच!
बल्लाळराजा हा तर जणू शिवाजी च्या आधीचा शिवाजीच!
इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे यांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते व मुसलमानी सत्तेला न जुमानता त्यांच्या छाताडावर पाय देऊन ते ताठ मानेने राज्य करत होते. त्या काळातील परिस्थितीचे आकलन ज्यांना आहे त्यांना हे काम किती अवघड होते याची कल्पना येऊ शकेल.
एकुणच विजय नगर चे साम्राज्य आणि हरिहर कंप बुक्क व त्यांचे इतर दोन भाऊ यांच्या विषयी माझी माहिती इतकी तोकडी आहे हे लक्ष्यात आल्यावर शरम वाटली!
तसेच मन१ यांचे प्रतिसाद म्हणजे पर्वणीच आहे. त्यांचे प्रतिसाद या सगळ्या लेखासाठी लागणारी पार्श्वभूमी अतिशय उत्तम प्रकारे तयार करत आहेत. त्यांच्याही अभ्यासपूर्ण लिखाणासाठी अनेकानेक धन्यवाद!
त्या प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रुपांतर करून याच लेखात त्याचा - त्या लेखात याचा दुवा द्यावा ही संपादकांना विनंती.
कुलकर्णी सर आणि मन१ या दोघांच्याही डेडिकेशन ला सलाम.
उत्तम.
हाच धागा इतरत्र टाकण्याचा उपक्रम केला असता तर अफवा पसरवता म्हणून संपादकीय कात्री चालली असती किंवा तुमची विचारवंती खिल्ली उडवली गेली असती हे नक्की !
असो.
लेखमाला अप्रतिम होणार यात काहीच शंका नाही.
त्याकाळी देवगिरीवर सत्ता बहमनी सल्तनतची होती ना? हे बहमनी सुलतान तुघलकापासूनच फुटून निघाले होते का?
मनोबाच्या प्रतिसादांनी पण लेखात मोलाची भर घातली आहे.
वाचनखूण साठवली आहेच.
उत्तम धागा.
जयंतकाकांचे धागे असेही खुपच ज्ञानवर्धक असतात
बहुतांश लोकांना वाटते की अरबी आक्रमणासोबत भारतात इस्लाम पसरला. त्यात तितकं तथ्य नाही. अरबी आक्रमणाने फक्त सिंध- बलुच ह्या दोन प्रांतातला काही भागच तेवढा गेला.(माझा प्रतिसाद, भाग३ पहावा.)
भारतात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सत्ता आली ती खैबर खिंडीच्या मार्गातोन. इकडून हल्ले ज्यांनी केले त्यात क्वचितच इराणी किंवा अरबी सत्ता होत्या. इतर सर्व वेळेस हे मध्य आशियातील नव इस्लामप्रवेशित राज्यकर्ते होते.(उझबेक्-ताजिक्-तुर्क्, किरगीझ, नंतर मंगोल, मुघल व तत्सम.) (हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने)आता मी एक वादग्रस्त विधान करणार आहे :-
अरब फारसे क्रूर राज्यकर्ते, विध्वंसक, ह्या इतरांइतके तरी नक्कीच नव्हते. धार्मिक पगडा असल्याने बर्यापैकी त्यांचय थेट अंमलाखालील प्रदेशात कायद्याचे राज्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाई. इतकेच नव्हे , आधीचे ज्ञान,पुस्तके ते पूर्णतः नष्ट करीत नसत! बरेचसे आपल्या भाषेत, अरबीत घेउन जात.
अरेच्चा! पण मग आमच्याकडे घरी दारी काय बोलतात की मुस्लिम राजवटीत भारतीय ज्ञानाची भयानक नासधूस झाली, वाट्टोळे झाले. नाश झाला वगैरे. तक्षशिला , नालंदा ही जागतिक दर्जाची विद्यापीठे लोखंडी वरवंट्याखाली पिसली गेली. ते खोटे काय?
नाही. ते काही खोटे नाही. पण नासधूस "इस्लामी" राज्यकर्त्यांनी केलीही असेल. अरबांनी नाही.
मुहम्मद पैगंबरापूर्वीही भारतात मागील सलग हजार वर्षे आक्रमणे होतच होती. ती मध्य आशियायी भटक्या टोळ्यांकडूनच होत होती. कुठल्या भागातून होत होती? तर मध्य आशियातून . हा भाग कुठला? इराण, अफगाणिस्तानच्या उत्तरेस हा भाग होता, पामीर पठाराच्या पलीकडे. ऑक्सस नदी (अमू दर्या) हा त्याचा केंद्रबिंदू. हा भाग इराण्-अफगाणच्या जरा वरती आहे. आजच्या USSR मध्ये हा येतो. कॅस्पिअन समुद्रापासून ते थेट चीनच्या उत्तरेला मंगोलियापर्यंत इतका विस्तृत हा पॅसेज आहे. इथे नानाविध भटक्या टोळ्या होत्या. नागरी जीवन त्यास ठाउक नाही. साहजिकच त्या अधिक प्रतिकूल स्थितीत राहणार्या, अधिक क्रूर होत्या. हूण ह्या अतिक्रूर टोळीनं ऑक्सस नदीच्या इंटीरिअर मधून जबरदस्त मुसंडी मारत तिथे राहणार्या कुषाण टोळ्यांना हुसकावून लावायला सुरुवात केली. कुषाण थोडे बाहेर फेकले जाउ लागले. ते ऑक्सस नदीपासून थोडे दूर असणार्या पठारावरील शक टोळ्यांच्या भागात घुसून शकांना हाकलू लागले. तिथून मार खात सुटलेले शक प्रचंड संख्येने, मोठ्या वेगाने नासधूस करीत अफगाणिस्तानमार्गे वायव्य , पश्चिम व उत्तर भारतात घुसले.
त्यांच्या मागावर असलेले कुषाण लागलिच पुढल्या शंभर एक वर्षात भारतात आले. कुषाण राजे विम्,कुजुल कॅडफिसस व मग नंतर कनिष्क ह्याम्नी उत्तर भारतात विशाल साम्राज्य स्थापले.
ह्या शक सत्रपांच्या आणि कुषाण सम्राटांच्या वंशजांचा कसतरी पराभव उज्जैन वगैरेमधील पराक्रमी राजांनी(विक्रमादित्य की यशोवर्मन??) केला नाही तोवर पटलावर गुप्त नावाचे भारतीय साम्राज्य आजच्या मध्य्-उत्तर भारतत उदयस आले.
अगदि त्याच वेळी वायव्येत हाहाकार उडवत अफगाणिस्तानमार्गे हूण घुसले. ते कुषाणांच्या पाठलागावर होते ना!
त्यांना कसे तरी कधी सरळ लढत देत, कधी माघार घेउन नंतर हुसकावून लावत बहरतीयांनी थोपवून धरले. हळूहळू स्थानिक लोकसंख्येहून ते फारच कमी असल्याने इथल्याच संस्कृतीत सहज आत्मसात केले गेले. इथल्यांशी त्यांनी( मागे शिल्लेक राहिलेल्यांनी) रोटी-बेटी व्यवहारही केले म्हणतात.
इस्लामच्या उदयानंतर पर्शिअन राज्य अखंड जिंकून कायमचे इस्लामिक बनवल्यावर त्याला लागून असलेल्या भागातही इस्लामचा प्रभाव वाढला. हा भाग म्हणजेच वरती सांगितलेला मध्य आशिया( "मध्य पूर्व आशिया" नाही, हे लक्षात घ्या) एकानंतर एक ह्या टोळ्या धर्मांतरीत होउ लागल्या. आणि ह्यादरम्यान केंद्रिय भारतीय सत्ता दुबळी पडत होती. प्रचंड लढाउ पण छोटी छोटी अशी अनेक राज्ये भारतभर निर्माण होत होती. बाहेरच्या हल्ल्यांना थांबवायला मध्यवर्ती साम्राज्यच नव्हते.(हर्षवर्धनाचा अल्पकाळ वगळता.)
थोडक्यात आधी ज्या मार्गाने भारतात हल्ले होत होते, तेच तसेच पुढे सुरु राहिले. फक्त ह्यावेळेस हल्ले करणारे इस्लाम चा झेंडा घेउन आले होते.
मागच्या वेळेस ते आले तेव्हा त्यांचा सडकून पराभव झाल्यानंतर ते इथलेच एक झाले. ह्यावेळेस तसे का झाले नसावे?
अनेकानेक कारणे आहेत. त्यापैकी एक प्रमुख म्हणजे इथे आल्या त्या तेव्हा शक्-कुषाण -हूण ह्या रानटी टोळ्या होत्या. इथल्या स्थिर, नागरी जीवनाच्या तेही हळूहळू प्रेमात पडले नि तसेच रहायचा प्रयत्न करु लागले. सांस्कृतिक दृष्ट्या त्यांच्याकडे मूलभूत विचारसरणी वगैरे काहीच नव्हते. त्यांची पाटी कोरी होती!!
कोर्या पाटीवर सहज इथल्या संस्कृतीचे मुळाक्षरे गिरवली गेली. पण इस्लामी झेंडा घेउन आलेल्या,त्यांच्याच वंशज मंडळींची पाटी कोरी नव्हती. मूळची रानटी, आक्रमक्र, अन त्याहून वाईट म्हणजे विध्वंसक वृत्ती होतीच, भरीस भर विनाश करण्याचे निमित्त ह्या लोकांनी धर्मग्रंथातून शोधून काढले. पाण्याने भरलेल्या बादलित नव्याने दूध टाकता येत नाही, तसेच काहीसे झाले. आपल्या समजूतींना हे घट्ट धरून होते. म्हणून मग ही तोडफोड नासधूस झाली.
जर खरोखरीच अरब इथे पोचले असते, तर इस्लामचे first hand रुप इथे मिलाले असते. शिवाय, अरबांना जित समजाकडूनही खूप काही शिकायची हौस होती.निदान त्यानिमित्ताने आपले गणित -अ खगोल्-साहित्य ह्यातील बरेच काही अनमोल वाचले तरी असते; भाषांतरित रुपात का असेना. आजही जे गणित, शून्याचा उपयोग जगाला माहित झाला तो अरबांकडूनच. त्यांनीच ते ज्ञान शिकलं, वापरलं; विकलं.
शिवाय अरब आले असते तर समुद्री आरमारात इथल्या भूमीवरच्या बलढ्य म्हणव्ल्या जाणार्या सत्ता भीगी बिल्ली व्हायच्या(हो, अगदि मुघलही समुद्री ताकदीत हीन्-दीन्-दुबळे होते.) ते झाले नसते. इस्लामच्या उदयाच्य पूर्वीपासूनच अरब खलाशी जगभर व्यापारासाठी हिंडत. ते उत्तम पारंपरिक दर्यावर्दी होते.त्यांनी उत्तम आरमार तरी उभारले असते.
असो. जर्-तर ची बहषा खूप झाली/. मुद्दा हाच, की भारतात ज्या शक कुषाण हूण टोळ्या आधीच हजारेक वर्शे हल्ले करीत सुटल्या होत्या, त्या नंतरही येत राहिल्या, फक्त ह्यावेळेस त्यांचे धर्मांतर झाले होते. ते पगन्स , निसर्गोपासक्,भटके नव्हते.
In reply to संकीर्ण... भारतात नासधूस अरबांनी फारशी केलेली नाही. by मन१
एव्हढा खजीना आहे तुमच्यापाशी.. एखादी लेखमाला होऊन जाउ दे ना.
अर्धवटराव
In reply to संकीर्ण... भारतात नासधूस अरबांनी फारशी केलेली नाही. by मन१
//(हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने)आता मी एक वादग्रस्त विधान करणार आहे :-
अरब फारसे क्रूर राज्यकर्ते, विध्वंसक, ह्या इतरांइतके तरी नक्कीच नव्हते. धार्मिक पगडा असल्याने बर्यापैकी त्यांचय थेट अंमलाखालील प्रदेशात कायद्याचे राज्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाई. इतकेच नव्हे , आधीचे ज्ञान,पुस्तके ते पूर्णतः नष्ट करीत नसत! बरेचसे आपल्या भाषेत, अरबीत घेउन जात.///
हे विधान वादग्रस्त ठरेल हे आपणच म्हटले आहे ते बरं. ते वादग्रस्त का आहे हे आता सांगतो. एकतर अरबस्तानातील टोळ्यांचा अभ्यास आपला पूर्ण नाही. मी मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे सलादीनच्या युद्धांचा अभ्यास करताना मला जे वाचायला मिळाले ते आपण म्हणता त्याच्याशी विसंगत आहे. मु्सलमानांमधे थोर विचारवंत, कवी, वैद्य, गणिती इ.इ. होऊन गेलेच त्याचा उल्लेख माझ्या अनेक लेखात मी केलेला आहे. पण दुर्दैवाने जेव्हा एक धर्मसेना म्हणून उभे राहताना त्यांची वागणूक अत्यंत वेगळी पहिल्यापासून होती. थोडक्यात..ते क्रूर, विध्वंसक होतेच पण हुशारही होते एवढे म्हणता येईल. अर्थात त्या काळात सर्व धर्मांचे अनुयायी कमी जास्त प्रमाणात हे करत असत. पण हिंदूधर्माच्या अनुयायींबद्दल मला तरी जास्त ऐकिवात नाही. अशोकाने कलिंग राजाशी झालेल्या युद्धात मोठ्या प्रमाणात कत्तल केली व सगळ्यात जास्ती मृत्य़ भारतात शैव व वैष्णव यांच्या भांडणात झाले असेही ऐकिवात आहे. पण निश्चित माहि्ती नाही. आपल्या म्हणण्यानुसार अरब जर भारतात वेळेवर पोहोचले असते तर हा विध्वंस झाला नसता असे असेल तर ज्या काळात अरब कट्टर मुसलमान नव्हते त्या काळात त्यांनी इराण त्यांच्या वर्चस्वाखाली आणले त्या इराणमधे एवढा विध्वंस का झाला याचे उत्तर देता येत नाही. हे म्हणजे जपानी सुसंस्कृत होते म्हणून अत्याचार केले नसते असे म्हटल्यासारखे आहे. जपानी अधिकारी संध्याकाळी हायकू लिहित व सकाळी मुंडकी उडवीत.....मनोबा असे नसते....
अर्थात हे माझे मत आहे.
In reply to //(हिंदुत्ववाद्यांच्या by जयंत कुलकर्णी
अत्याचार्....विध्वंस........ राजसत्तेचा नाश्.... नागरिकांचा छळ.... हे झाले नसते असे माझे म्हणणे नाही.
मंदिरे आणि उत्तमोत्तम शिल्प फुटलीही असती, त्यांचय ठिकर्अय उडाल्याही असत्या.
.
मी "ज्ञान", ग्रंथ्,पुस्तके, कला ह्यांच्या जपणुकीबद्दल बोलतोय. वेगळे उदाहरण द्यायचे तर चंगीझ खानाच्या नेतृत्वाखालील मंगोलांनी जगाला त्यावेळपर्यंतचे सर्वात मोठे साम्राज्या काय असते हे दाखवले. त्याचा उदय झाला १२२०च्या असपस.
त्यांच्या क्रौर्याच्या कथा इतक्या प्रसिद्ध आहेत की त्याच्या जवळपासही इतर कुणी अगदि भारतातले खिल्जी-घोरीच काय, जपानीही फिरकत नाहीत असे पाश्चात्य इतिहासकार मानतात. हा माणूस जाइल तिथे फक्त आणि फक्त विध्वंसच करी. आख्खे समरकंद हे अत्यंत देखणे, आखीव रेखीव शहर त्याने महिन्याभरात भस्मसात केले. तो फक्त विनाश करी.
त्याच्याच नंतर दीडेकशे वर्षानी मंगोलांचा अजून एक सम्राट झाल....तैमूरलंग हा त्याच्या सवाई क्रूर होता.त्याने हत्याकांडाचे नवीन उच्चांक प्रस्थापित केले.फक्त एक फरक होता.......
.
.
तो शहर बेचिराख करत नसे, निर्मनुष्य करी.रहिवाशांच्या कत्तली करी. शहर ताब्यात घेइ. तिथल्या उत्तमोत्तम कलाकुसरी वस्तू, बनवणारे कारागीर सोबत घेउन जाइ.चांगले ग्रंथ गोळा करी.जतन करी. तो लायब्ररिअनला मारी, पण लायब्ररी जाळत नसे!
अरब थेट सत्तेत आले तर त्यांनी जितांच्या कत्तली केल्याच नसत्या असे नाही. casualties होणारच होत्या. पण त्यांनी इथले पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा, आत्मसात करायचा नक्कीच प्रयत्न केला असता असे वाटते. ग्रीक्-रोमन- बायझेंटाइन ह्यांच्याशी त्यांचे हाडवैर. पुन्हा पर्शिअन राजापेंक्षा ह्यांनी अधिक कडक प्रतिकार केल्याने अरब ह्यांच्यावर अजूनच चिडलेले. जमेल तिथ्ते ते ह्यांना हाणायचा प्रयत्न करीत. पण त्यातही त्यांनी अनेकानेक ग्रीक्-रोमन तत्व्ज्ञांचे, खगोलशास्त्रीय पुस्तकांचे उत्तम भाषांतर केले, म्हणून ते ग्रंथ आजही तगले. त्यांची वास्तूकला ह्यांनी शिकली.
"अरबांनी नवीन देवळे बांधून दिली असती" हा माझा मुद्दाच हा नाही. त्यांनी तोडालीही असती. पण ज्ञान जतन होण्याची अधिक शक्य्ता होती; बस्स इतकेच म्हणतोय.(नालंदा अणि तक्षशिला महिनमहिने जळाल्याने काय नुकसान झाले आहे ह्याचा आता कधीही थांगपत्ता लागू शकत नाही. बृहतकथा मंजिरी वगैरे सारखे ग्रंथ अस्तित्वात होते इतकेच आज आपल्याला ठाउक आहे. त्यांच्यावरची भाष्ये उपलब्ध आहेत, पण मूळ ग्रंथच नाही असे बर्याच ठिकाणी आहे.)
In reply to अत्याचार....विध्वंस.... by मन१
//मी "ज्ञान", ग्रंथ्,पुस्तके, कला ह्यांच्या जपणुकीबद्दल बोलतोय////
शक्यता कमी आहे. तैमूर स्वत:चा इतिहास स्वत: लिहायचा व तो एक फ्रॉड होता असे अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे. बरेच लोक त्याच्याविषयी त्याच्या पुस्तकावरून मते बनवतात.
//तो शहर बेचिराख करत नसे, निर्मनुष्य करी.रहिवाशांच्या कत्तली करी. शहर ताब्यात घेइ. तिथल्या उत्तमोत्तम कलाकुसरी वस्तू, बनवणारे कारागीर सोबत घेउन जाइ.चांगले ग्रंथ गोळा करी.जतन करी. तो लायब्ररिअनला मारी, पण लायब्ररी जाळत नसे!///
त्याने दिल्ली व त्यासारखी अनेक शहरे जाळून टाकली होती. दिल्लीच नाही तर बगदादच त्याने जाळले होते. ्हिंदूस्थानात त्या काळी सर्व ग्रंथ संपत्ती देवळात ठेवलेली असायची. देवळे जाळल्यावर पुस्तके जाळली नाहीत असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उरला प्रश्न त्याच्या सुसंस्कृतपणाचा. तो स्वत: अशिक्षित होता व रानटी होता पण अत्यंत शूर होता. त्याला युद्धशास्त्राची फार चांगली जाण होती व दशहतीच्या फायद्याचा त्याचा चेंगीज खाना इतकाच अभ्यास होता. ग्रंथ ही संपत्ती आहे हे तत्व त्याला माहिती होते का नाही याचीच शंका आहे. पण हो संपत्तीची त्याला चांगली जाणीव होती त्यामुळे त्याने संपत्ती गोळा केली हे आपल्याला त्याने लिहिलेल्या ्तथाकथीत आठवणींमुळे कळते. आपण ही विधाने कशाच्या आधारावर करत आहात हे समजले तर बरे होईल.....कारागिरांबाबत म्हणाल तर जगभरातून त्यांना गुलाम म्हणून नेले जाई व उपयोग झाल्यावर त्यांना ठार केले जाई....
//अनेकानेक ग्रीक्-रोमन तत्व्ज्ञांचे, खगोलशास्त्रीय पुस्तकांचे उत्तम भाषांतर केले, म्हणून ते ग्रंथ आजही तगले. ///
तगले या शब्दाचा अर्थ होतो की नाहीतर ते नष्ट झाले अ्सते. तसे नसून ज्ञानाची देवाणघेवाण सतत चालू होती. त्यातून त्यांनी ते ग्रंथ आपल्या बरोबर नेले व त्यावे भाषांतर केले. ते सर्व ग्रंथ लॅटीन किंवा जी काही भाषा असेल त्यात अजूनही उपलब्ध आहेतच. उदाहरणार्थ एव्हिसेनाची पुस्तकेही लॅटीन/इंग्रजीमधे उपलब्ध होती (१००० साली).
एक तर तैमूर हा उझबेग होता (बहुतेक. कृपया तपासून बघा). ते जाऊदेत.... पण समजा अस्सल अरब येथे आले असते तर ज्ञानाचा विध्वंस या शिवाय काहीही झाले नसते हे अनेक उदाहरणांनी सिद्ध करता येईल. ज्या ज्या ठिकाणी परकीय आक्रमक गेले त्यात मला वाटते ब्रिटिशांनी आपण म्हणता ते कार्य केले आहे असे कदाचित म्हणता येईल. इराणमधे झरतृ्ष्टीयांचा ग्रंथाचा खजिना अरबांनीच नष्ट केला व याचे दाखले इंटरनेटवर जागोजागी पसरले आहेत व अभ्यासण्यास उप्लब्ध आहेत...
//पण ज्ञान जतन होण्याची अधिक शक्य्ता होती; बस्स इतकेच म्हणतोय.(नालंदा अणि तक्षशिला महिनमहिने जळाल्याने काय नुकसान झाले आहे ह्याचा आता कधीही थांगपत्ता लागू शकत नाही. बृहतकथा मंजिरी वगैरे सारखे ग्रंथ अस्तित्वात होते इतकेच आज आपल्याला ठाउक आहे. त्यांच्यावरची भाष्ये उपलब्ध आहेत, पण मूळ ग्रंथच नाही असे बर्याच ठिकाणी आहे.)////
यावरून आपल्याला जर अरब आले असते तर ही ग्रंथसंपदा वाचली असती असे आपले म्हणणे दिसते पण पर्शियावरून तसे काही झाले असते असे वाटत नाही.....
यात काही चूक असेल तर....बरोबर करा..
थोड्या उशिराच हा लेख वाचनात आला.
लेख आणि त्या खालील प्रतिसादही माहितीत उत्तम भर घालत आहेत.
धन्यवाद.
आमचा मिपामधला शिरकाव फार जुना नसल्याने ही लेखमालिका नजरेस आली नव्हती. तेव्हा सर्वप्रथम ती वर आणणार्याचे धन्यवाद !
जकुसाहेब, वेळ काढून जरूर सविस्तर लिहा... इतिहासाच्या शालेय पुस्तकातील त्रोटक (आणि बर्याचदा सत्याचा विपर्यास होइल इतपत पोलिटिकली करेक्ट) माहितीच्या पुढे मजल गेलेली नाही. पण या ऐतिहासिक कालखंडाची सविस्तर ओळख करून घेण्याची प्रबळ इच्छा आहे.
तुमच्या या लिखाणाने ती इच्छा पूर्ण होते आहे म्हणून तुम्हाला अनेकानेक धन्यवाद !!!
In reply to आमचा मिपामधला शिरकाव फार जुना by डॉ सुहास म्हात्रे
चित्रे दिसत नाहीत...
छान!
नुकतेच हम्पी दर्शन घतले आहे.. या लेखमालिकेतील पुढिल लेख आहेत का?
माहीतीपूर्ण धागा. या धाग्याचा संदर्भ http://www.misalpav.com/node/25471 यामधे आल्याने आत्ता पाहीला.
अनेकदा आमचे इतिहासाचे ज्ञान ३०० ३५० वर्षांपलिकडे जातच नाही.
विजयनगर, चाणक्य यांचा इतिहासही आम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.
धागा परत वर काढण्याबद्दल क्षमा मागावी कि काय कळत नाहीये पण जयंत साहेब, या लेखाचा पुढचा भाग तुम्ही लिहिला आहे का? असेल तर दुवा द्यायची कृपा करावी.
एवढे छान लेखन अर्धवट सोडू नका. मिपा खरंच श्रीमंत आहे ते तुमच्या सारख्या लेखकांमुळेच.
संपादक मंडळ - एक तक्रार आहे पण. मिपावर लेखांचा शोध थोडे जटील काम आहे. त्याबाबत काही करता येऊ शकेल का?
http://www.misalpav.com/node/22689
यात पहिल्या सगळ्या भागांच्या URL दिलेल्या आहेत......धन्यवाद !
व माझे सगळे लेख येथे आहेत.....
http://www.misalpav.com/user/9199/authored
_/\_